Skip to main content

श्रेष्ठ मराठी कादंबर्‍या

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 08/03/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील काही श्रेष्ठ कादंबर्‍याची माहिती कुणी देउ शकेल काय? जसे-- पडघवली-गोनीदा तुंबाडचे खोत- श्री. ना. पेंडसे मुखवटा-अरुण साधू ययाती- वि. स. खांडेकर ---- (वाचनप्रेमी) वल्ली

वाचने 57346
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

तुंबाडचे खोत नुकतीच हातावेगळी केली आहे. त्यामुळे दोन शब्द नक्कीच सांगता येतिल. (माझ्या आकलनाप्रमाणे)कोकणात गावप्रमुखाला खोत ही पदवी आहे. देशावरच्या पाटलांचे हे कोकणातील प्रतिरूप. पण यांची जात देशावरल्या पाटलांसारखी मराठा नव्हे तर ब्राह्मण. लौकिक जात वेगळी असली तरी जुलूम, अत्याचार, घमेंड दोन्हीकडे समान. साने गुरूजींचे पूर्वजही गावाचे खोत होते. श्री.ना. पेण्डसे त्यांच्या या कादंबरीत मराठेशाहीच्या पडझडीपासून स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकापर्यंतचा काळ मांडतात. या कालविस्तारामुळे कादंबरीचा पृष्ठविस्तारही जबरदस्त १३०० पानांचा झाला आहे. कव्हर म्हटल्याप्रमाणे यातली ना एक घटना दुसर्‍यासारखी आहे ना एखादे पात्र. समान आहे तो फक्त तुंबाडचा प्रेक्षापट. फ्लॅशबॅक तंत्राने कादंबरी सुरू होते. एक सद्गृहस्थ आपली मुळे शोधण्यास तुंबाडला येतात. गावाचे वातावरण त्यांना मोहून टाकते. ह्या रम्याद्भूत दुनियेचे हे इतिवृत्त ते ऐकू लागतात. हा या कादंबरीचा आरंभबिंदू. कोणी मोरया नावाचा आद्यपुरूष वास्तव्यास तुंबाडला येतो आणि हे घराणे तुंबाडचे होते. विहिरीतला पोहरा जसा वर येतो आणि खाली जातो तद्वत या घराण्यातल्या लोकांचे आचरण त्यांच्या कीर्तीस वा दुष्कीर्तीस कारणीभूत ठरत जातो. समाजमनावर दंतकथांचे लेपन कसकसे होते, याचे रेखाटन सुरेख आहे. एका पिढीतला खलनायकाचे नंतरच्या पिढीत नायक बनून जाणे पेंडसे नकळत सांगून जातात. सिद्धी मिळवण्याकरिता आदल्या पिढीत एक खोत बंधू नरबळी देतात. इंग्रजी अमल नुकताच सुरू झालेला हा काळ. आमचे राज्य कसे न्यायाचे हे दाखवण्यास इंग्रज त्यांना अटक करून शिक्षा करतात पुढे हेच आद्य स्वातंत्र्यवीर म्हणून प्रसिद्ध होतात. नरसू आणि बापु वकील यांच्या माध्यमातून घेतलेला गांधीवेध मला आवडला. कोकणात गांधी वा काँग्रेस रूजली नाही. ती का नसावी याचा तर्क पेंडश्यांनी पकडलेल्या कोकणी वृत्तीतून करता येतो. सुरूवातीला मुंबईकर माणसाने तुंबाडला पाहून भारावून वगैरे जाणे मला अगदीच बाळबोध वाटले. पण दुसर्‍या प्रकरणापासून पेंडसे तुम्हाला कवेत घेतात. आवाक्यामुळे वाचकांचे होणारे विस्मरण गूहित धरून पेंडश्यांना काही काही प्रसंगाच्या उजळण्या करणे भाग पडले असावे. अशी काही पाने अतिशय कंटाळवाणी वाटतात. एकूण कादंबरी चांगली आहे पण मराठीतील ही सर्वश्रेष्ठ कादंबर्‍यांपैकी नसावी. मला पेंडश्यांच्याच रथचक्र वा गारंबीचा बापू याहून चांगल्या कलाकृती वाटतात.

In reply to by विसोबा खेचर

तुंबाडचे खोत पेंडश्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. - (बजापा) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by अभिरत भिरभि-या

श्री.ना. पेण्डसे माझे आवडते लेखक.. तुमचे परिक्षण छान आहे.. मला आवडली होती. पण तुम्ही लिहिल्याप्रमाणे रथचक्र व गारंबीचा बापू याहून जास्त आवडल्या. त्यांची ओक्टोपस सुधा खूप छान आणि उजवी आहे. तुंबाडचे खोत मधे बर्याच ठिकाणी परिच्छेद च्या परिच्छेद रिपीट होतात आणि एखाद्या व्यक्तिचे तेच तेच वर्णन आढळ्ते. तरिही पूर्ण वाचेतोवर उत्कंठा टीकून राहाते. त्यांचे लेखन जरूर वाचावे असेच आहे.

चवथीत असताना प्रथम वाचली. नंतर परत परत पारयणं केली. ययाती, शर्मिष्ठा, देवयानी, पुरु अशी पात्रे असून. ही पौराणीक कथा आहे. माहीत असेलच. ययाती हा तारुण्याचा उपभोग घेऊनही परत तृषार्त राहीलेला होता आणि त्याने आपल्या मुलाचे पुरुचे तारुण्य घेतले. मला फार फार फार आवडली होती ही कादंबरी. अधिक माहीती येथे सापडेल-http://en.wikipedia.org/wiki/Yayati ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शिवाजी महाराजांसारख्या उभ्या महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानी असलेल्या युगपुरूषाच्या नानाविध पैलू असणार्‍या व्यक्तिमत्त्वाचे चित्रण साकारण्याचे शिवधनुष्य रणजित देसाईंनी उचलले आणि त्यांना ते पेललेही! पहिल्याप्रथम पुस्तकाचं नावच थेट काळजाला भिडतं! महाराजांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे चित्रण, त्यांचे राजकीय कर्तृत्व, एक थोर सेनानी, मुत्सद्दी राजा म्हणून त्यांची होणारी जडणघडण, स्वराज्यस्थापनेची त्यांची ईर्ष्या, त्या कार्यात त्यांना आलेले अढथळे, अडथळ्यांवर त्यांनी केलेली मात, संघर्ष, आनंद, आसू आणि हसू या सगळ्या सगळ्याचं सुरेख रेखाटन केलंय देसाईंनी 'श्रीमान योगी' मध्ये. आणखी एक दिसून आलेली बाब म्हणजे (विकीपीडियावरून साभार) श्रीमान योगी ही कादंबरी इतिहास आणि कल्पना यांचा सुरेख संगम आहे. खरं पाहता ऐतिहासिक ललितकृति ही अशीच तयार होते. देसाईंनी महाराजांचा लिखित इतिहास, कल्पित दंतकथा आणि आख्यायिका या सार्‍यांचा सुयोग्यरित्या वापर करून 'श्रीमान योगी' एक परिपूर्ण ऐतिहासिक कादंबरी बनविली आहे. इतकी परिपूर्ण, की 'श्रीमान योगी' वाचताना महाराज अगदी जसेच्या तसे आपल्या समोर उभे राहतात. घडलेला प्रत्येक प्रसंग आपण मनातल्या मनात त्या त्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहून येतो आणि यातच लेखकाचं यश सामावलेलं आहे. थोडक्यात, पुलंच्या हरीतात्यांप्रमाणे देसाईही सनांच्या गणितात न अडकता, भूतकाळवाचक क्रियापदांनी इतिहास दूर न नेता आपल्याला महाराजांच्या इतिहासाची सैर घडवून आणतात. प्रत्येक लेखकाला हे जमतेच असे नाही. त्यात भरीस भर म्हणजे शिवाजी महाराजांशी निगडित प्रत्येक गोष्टीवर इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे आहेत! आणि महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला शेकडो पैलू आहेत. अशा परिस्थितीत साहित्यरूपात महाराजांच्या आयुष्याचे चित्रण करण्या जिकिरीचे काम देसाईंनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. मराठी मनांत घर करून राहिलेली 'श्रीमान योगी' ही निश्चितच मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ रचनांपैकी एक असावी. -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!

In reply to by मेघवेडा

श्रीमानयोगी ला नरहर करुंदकरांची प्रस्तावना आहे. तीच एका उत्क्रुष्ट कादंबरीच्या तोडिची आहे !! (भारावलेला) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

श्रीमानयोगी ला नरहर करुंदकरांची प्रस्तावना आहे. तीच एका उत्क्रुष्ट कादंबरीच्या तोडिची आहे !!
सहमत आहे..

In reply to by मेघवेडा

श्रीमान योगी ही कादंबरी म्हणून निश्चितच श्रेष्ठ आहे पण ऐतिहासिक चरित्रे कादंबरीत रेखाटताना कादंबरीकाराने घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे नकळतच त्यातील काही ऐतिहासिक व्यक्तींवर काही प्रमाणात अन्याय होतो जसा की ह्या कादंबरीत संभाजी राजांवर झालेला आहे. तेव्हा ऐतिहासिक कादंबरी रेखाटताना मूळ इतिहासाची प्रतारणा न होणे हे सर्वस्वी कादंबरीकारावरच अवलंबून आहे.

आप्ल्या सूची मधे खालील कदंबर्‍या वाढ्वा. एकच कदंबरी लिहून "कदंबरीकार" म्हणून नाव मिळ्व्लेल्या विश्राम बेदेकर यांची "रणांग्ण", श्री नां ची "ल्व्हाळी", गो नी - "कुण्या एकची भ्रमणगाथा" महाद्जी शिंदे यांच्या जिवनावरिल "चंबळेच्या पलिक्डे"

गो नी दा. मोगरा फुलला तुका आभाळायेवढा दास डोंगरी रहातो भागिरथाचे पुत्र क्रुष्णवेध विश्वास पाटील पानिपत झाडाझडती महानायक सु.शि. जमिन आसमान

धागा काढून चोवीस तास होऊनही अजून कुणास 'कोसला' कशी सुचली नाही, याचे आश्चर्य वाटले. त्याशिवाय हे ही चालू शकेल. आनंदओवरी / देव चालले - दि. बा. मोकाशी या धाग्यावर कुणास आधुनिकोत्तर मराठी साहित्यात फारसा रस नसावा असे वाटते, त्यामुळे भाऊ पाध्ये, विलास सारंग वगैरे नाही पण दलित/स्त्री साहित्यातील काहीतरी येईल असे वाटले होते. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

प्रत्येकाची आवाड निवड वेगळी. त्यामुळे आपण वाचलेली व आपणास आवडलेली पुस्तेके आपण सुचवावी. दुसर्‍यांच्या आवडीवर उगीच टीकाटिप्पणी कशाला? असो. मला आवडलेल्या कादंबर्‍या जेवढ्या आठवतील तेवढ्या सांगतो... १. स्वामी : रणजीत देसाई ( माधवराव पेशव्यांच्या जीवनावर ) २. दुनियादारी : सुहास शिरवळकर ३. महानायक : विश्वास पाटील ( नेताजी बोस यांच्या जीवनावर ) ४. तांबड्फुटी : गोनीदां ५. मृत्युंजय : शिवाजी सावंत स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by चिंतातुर जंतू

अण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' कादंबरी विलक्षण आहे. या यादीत आत्मचरित्रे घालायची मुभा असती तर शंकर खरात यांचं 'तराळ-अंतराळ', दया पवारांचं 'बलुतं', आनंद यादवांची 'झोंबी', इत्यादी पुस्तकेही जोडता आली असती.

मधु मंगेश कर्णिकांची 'माहीमची खाडी' ही छोटेखानी कादंबरी पण जबरदस्त आहे. माहीमच्या खाडीकिनारी राहणार्‍या झोपडपट्टीवासियांच्या जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन ही कादंबरी घडवते.

मी नेहमी म्हणतो तसं नकळत जमलेली, तीन वेगवेगवेळ्या लेखकांनी वेगवेगळ्या काळात लिहिलेली ट्रायॉलॉजी म्हणजे --
  • कोसला : भालचंद्र नेमाडे
  • दुनियादारी: सुहास शिरवळकर
  • शाळा: मिलिंद बोकील
बाकी बरीच नावं इथे दिसली म्हणून पुन्हा देत नाही पण विश्वास पाटील ह्यांची 'पानिपत' भन्नाट आहे.

In reply to by संदीप चित्रे

मला बिढार ,झूल ,जरीला पण आवडल्या होत्या.याच मालीकेत हिंदू पण यायची होती .प्रकाशित झाली की नाही ते समजले नाही.

वर बरीच नावे आली आहेत त्यात अजून एकः दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ (लोकमान्यांच्या जीवनावरील ऐतिहासीक संदर्भाधारीत कादंबरी). -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

रंगनाथ पठारे यांची ताम्रपट १९४२ ते १९७७ राजकीय पातळीवर घडलेल्या घडामोडीचा सर्वसामान्य माणसावर झालेला परीणामाचा वेध घेणारी कांदबरी म्हणजे ताम्रपट. देशातील राजकारण, स्वातत्र्य सेनानी देश स्वातत्र्य झाल्यावर संयुक्त महाराष्ट्रा साठी घेतलेली उडी त्यानंतर सहकार क्षेत्रातील प्रगती आणि ताम्रपट मिळवण्यासाठी काही निवडक भुरट्यानी घेतलेले देशप्रेमीचे सोंग आणि या सर्वावर निंरतर लक्षात राहील असा नाना सिरुर यांचा आर्दशवाद!!! या सर्व मुद्द्याचे अगदी सुटसुटीत केलीली मांडणी कुठेही गुंतागुत होऊ न देता महाराष्ट्राच्या राजकारणात राहीलेली पोकळी भरुन काढणारी कांदबरी म्हणजे ताम्रपट!!!

मराठी वाचक कधीही विसरु शकणार अशी श्यामची आई -सानेगुरुजी निशाणी डावा अंगठा -रमेश इंगळे पार्टनर - व. पु. काळे राधेय - रणजित देसाई राऊ , झुंज -ना. सं. इनामदार अमृतवेल - वि. स. खांडेकर गोफ --गौरी देशपांडे रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर बनगरवाडी,सत्तांतर -व्यंकटेश माडगुळकर धग - उद्धव ज. शेळके डॉलर बहू - सुधा मूर्ती पालखी -दि.बा मोकाशी महानंदा ,प्रदक्षिणा -जयवंत दळवी

In reply to by सुनिल पाटकर

पालखी -दि.बा मोकाशी
आमच्या स्मृतीनुसार ही कादंबरी नसून अनुभवलेखन आहे. १९६१ मध्ये वारीबरोबर चालत जाण्याचे मोकाशींनी योजले होते. त्यानुसार ते काही दिवस गेलेही, पण पुण्यात पूर आल्याने ते परत आले. त्या अनुभवांचे हे वर्णन आहे. पुस्तक उत्तम आहे, पण कादंबरी मात्र नव्हे. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

कादंबर्‍यांमधून लेखकाचे विश्वास, त्याची माणसांची/परिस्थितीची निरीक्षणे, समजशक्ती, धाडस असे निकष लावले तर मला वाटते, गारंबीचा बापू , पडघवली, रथचक्र आणि तुंबाडचे खोत अशी नावे पुढे यावीत.. एम टी आयवा मारू ही वाचली होती, तिच्यातील वेगळेपणाने, आणि मुख्यत्वे जहाज, समुद्र, त्यातल्या रूपकांमुळे लक्षात राहिली. सध्या माझे मराठी वाचन फार कमी झाले आहे, त्यामुळे एवढेच.

शिवाजी सावंत
  • मृत्युंजय
  • छावा
रणजित देसाई
  • स्वामी
गंगाधर गाडगीळ
  • दुर्दम्य
गो नी दा.
  • कुण्या एकाची भ्रमणगाथा
  • दास डोंगरी रहातो
भा. रा. भागवत
  • दु:ख पर्वताएवढे (व्हिक्टर ह्युगो च्या ला मिझरेबल्सचा तेवढयाच ताकदीचा अनुवाद)
राजेंद्र खेर
  • धनंजय
विचार करता लगेच आठवल्यात त्यांची ही यादी. राघव

अशा प्रकारच्या याद्यांत सहसा न दिसणार्‍या पण मराठी साहित्यात महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या काही कादंबर्‍या: क्षिप्रा, सरहद्द आणि जन हे वोळतु जेथे (कादंबरीत्रयी) - शरच्चंद्र मुक्तिबोध रीटा वेलिणकर - शांता गोखले एका श्वासाचं अंतर - अंबिका सरकार - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

सरकार व गोखले यांच्या दोन नव्या कादंबर्‍या गेल्या २ वर्षांमधे आलेल्या आहेत. गोखल्यांची "त्या वर्षी" सरकारांची "अंत ना आरंभही" स्टँडर्ड याद्यांमधे न आढळणार्‍या नावांची यादी अजूनही वाढवता येईलच. त्यामधे मतभेद होऊ शकतात. शाम मनोहर उद्धव शेळके

विश्राम बेडेकरांची रणांगण

१- एन्कीचे राज्य- विलास सारंग २- सात सक्कं त्रेचाळीस- किरण नगरकर ३- कोसला- भालचंद्र नेमाडे ४- अच्युत आठवले आणी आठवण- मकरंद साठे ५- नातिचरामि- मेघना पेठे ६- मुखवटा- अरुण साधु पटकन आठवल्यात त्या या बाकी नंतर सवडीने प्रतिसाद देतो

In reply to by मारवा

मारवा साहेब, अच्युत आठवले आणी आठवण- मकरंद साठे ही कादंबरी अाहे का? नावावरून तसं वाटंलं नाही. मकरंद साठे चांगलं लिहीतात, म्हणून विचारतो.

In reply to by मारवा

मुखवटा मला फार आवडलेली कादंबरी. त्याची अप्रतिम सुरुवात अन कुळाचा धांडोळा मनात घर करुन गेला. उभे केलेले एकेक कॅरेक्टर कसे लख्ख दिसते नजरेसमोर. अरुण साधूंच्या बाकी कादंबर्‍यात पण हे वैशिष्ट्य मला फार भावते. इव्हन त्यांनी अनुवादित केलेल्या शुभमंगल (सुटेबल बॉय) मध्ये पण वाईड कॅन्व्हास, मोठा पिरिअड अन स्ट्रॉन्ग कॅरेक्टरायझेशन आवडले होते. मध्यंतरी खरडफळ्यावर आदूबाळाशी झालेली चर्चा मुख्य्त्वे तुंबाडच्या खोतांवर झालेली पण बरीच माहीती देऊन गेली. तुंबाडचे खोत तर ऑलटाईम फेवरेट. अरुण साधू कुठे पीडीएफ अथवा ईबुकात सापडतील का?

जयवंत दळवी धर्मानंद - पौगंडावस्थेतील मुलाच्या नजरेतुन त्याच्या पुर्ण कुटुंबाची कहाणी. यात गावातील काही पात्रेसुद्धा येतात. कादंबरी मनाची पकड घेते/ महानंदा - तळकोकण / गोवा येथे देवदासींची प्रथा पुर्वी होती त्या पार्श्वभुमीवरची एक चटका लावणारी प्रेमकथा

जयवंत दळवींची चक्र आणि सारे प्रवासी घडीचे. श्री.ना.पेंडशांच्या रथचक्र, हद्दपार, एल्गार, आॅक्टोपस आणि लव्हाळी. मला तुंबाडचे खोत आवडली पण या कादंबऱ्या म्हणजे मास्टरपीस. विश्राम बेडेकरांची रणांगण व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी आणि सत्तांतर. गो.नी.दांडेकरांची माचीवरला बुधा ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायला फारसं आवडत नाही तरी मृत्युंजय, श्रीमान योगी, छावा ,राऊ या आवडल्या होत्या.

In reply to by बोका-ए-आझम

सारे प्रवासी घडीचे
+१०० लिहिणारच होतो पण कादंबरी म्हणावे का व्यक्तीचित्रे का कथा अशी शंका आली म्हणुन लिहीली नाही. ते काहीही असो पण सुंदर आहे पुस्तक. कधी विनोदी कधी भावनिक. पुर्वी वाचले होते आणि लगेच विकत मिळतेय का बघत होतो पण मिळाले नाही. मात्र २०१२ की १३? मधे नविन आवृत्ती आली ती ताबडतोब विकत घेतली.

In reply to by बोका-ए-आझम

बाकी श्री. ना. पेंडसे तर बाप माणुस पण मला त्यांच्या सगळ्यात जास्त आवडणार्‍या कादंबर्‍या - लव्हाळी, हत्या
विश्राम बेडेकरांची रणांगण
याबद्दल थोडक्यात माहीती देऊ शकाल का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हॅर्टा ही जर्मन ज्यू तरुणी आणि चक्रधर हा मराठी, भारतीय तरुण यांची दुस-या महायुद्धाच्या आधीच्या अस्वस्थ दिवसांत एका समुद्रप्रवासात झालेली भेट, प्रेम अाणि ताटातूट असा काहीसा रणांगण चा प्ला‌ॅट आहे. देशाभिमान, राष्ट्रवाद, स्वार्थ आणि प्रेम अशा अनेक themes आहेत. ब-याच गोष्टी प्रेक्षकांना स्वतःहून माहित करुन घ्याव्या लागतात. धर्म आणि देश यांचं माणसाच्या आयुष्यात प्रेमाच्या तुलनेत असलेलं स्थान यावर कादंबरी भाष्य करते - हे माझं मत. आणि मला प्रचंड आवडली कारण युद्ध हा स्वतःच इतका नाट्यमय विषय आहे. बेडेकरांनी त्याचा सामान्य माणसांवर होणारा परिणाम फार छान लिहिला आहे.

अरुण साधूंची सिंहासन आणि मुंबई दिनांक आवडली होती… ७० रीतल्या मुंबईच अत्यंत समर्पक वर्णन केलाय त्यात.

शाळेत असताना अरुण साधूंची मुंबई दिनांक कादंबरी वाचली होती. कादंबरी मस्त आहे. पुन्हा एकदा वाचायला मिळाली तर नक्की आवडेल. आणखी एक आवडलेली कादंबरी नारायण धारपांची चंद्राची सावली. भयकथा / गूढकथा असूनसुध्दा वाचायला मस्त आहे. कथानक शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वाचनप्रेमी भाते

गोनिदांची "मोगरा फुलला" ही ज्ञानदेवांच्या जीवनावरील कादंबरी मला खुप आवडते. मी वाचलेली ही पहिली कादंबरी. कादंबरी आवडण्याचं कारण जरा हळूवार आहे. मी तिसरीला किंवा चौथीला असेन. व्यवस्थित वाचता येऊ लागल्याने मी घरी आलेल्या वाण सामानाच्या पुडयांना आलेले जुने वर्तमानपत्रांचे तुकडे मन लावून वाचत असे. बाबांनी हे पाहिले आणि जवळच्या छोटेखानी शहरातील वाचनालयातील सभासदत्व घेऊन ही कादंबरी मला वाचण्यासाठी आणली. तेव्हा गोनिदांनी ज्ञानदेवाशी भेट घालून दिली आणि तो माझा सवंगडीच बनला. मनात मतांची अनेक स्थित्यंतरे होऊनही बालवयात हा कादंबरीत भेटलेला सखा कायम सोबत राहीला.

१. रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर २. दगा - बाबा कदम. कोणी काही म्हणू दे, आपल्याला बाबा कदम प्रचंड आवडतात. ३. प्रेषित - जयंत नारळीकर ४. वामन परत न आला - जयंत नारळीकर ५. विप्लवा - अरूण साधू ६. मंत्रजागर - सुहास शिरवळकर ७. तांडव - महाबळेश्वर सैल

नयनतारा देसाई यांच्या ऐतिहासिक कादंबर्या पण छान आहेत...

मला माहीत असलेल्या काही:- १) पिंपरितला आगोबा २) मोरवाडीतला आग्यावेताळ ३) चिमणहत्तीची छळबखळ आगामी:- येतीलच नावांसाहित! ;) बघा अता तुम्हीतुम्ही... ल्लूल्लुल्लू http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-036.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

साहीत्य उपलब्ध आहे काय सगळे तीन्ही घेतल्यास काही सूट आहे काय? परगावच्या (अभ्या चौकशी करीत होता,तेव्हा त्याला भेट कराव्या म्हणतोय.) माग्णीचे काय करता? सध्या इतकेच. ता.क. सध्या नवीन कादंबरी कुठली चालू आहे. आडगावाचा अडाणी वाचक नाखु

१) जयवंत दळवी २) श्री. ना. पेंडसे ३) पु. भा. भावे ४) रणजित देसाई ५) गो. नी. दांडेकर ६) पं. महादेवशास्त्री जोशी ७) बाबा कदम ८) ना. स. इनामदार ९) सुहास शिरवळकर १०) रवींद्र भट ११) बाबुराव अर्नाळकर १२) गुरुनाथ नाईक १३) अनंत सामंत प्रामुख्याने इतर वाड.मयप्रकार हाताळणारे १) अर्थातच पु. ल. देशपांडे २) मधु मंगेश कर्णिक ३) चिं त्र्यं. खानोलकर ४) उद्धव ज. शेळके ५) रा. रं. बोर्हाडे ६) महादेव मोरे ७) बा. भ. बोरकर (यांनी "भावीण" नावाची कादंबरीही लिहिली आहे.) ८) अनंत काणेकर ९) वि. वा. शिरवाडकर १०) पुरुषोत्तम कालेलकर ११) रमेश मंत्री १२) रमेश पवार १३) दया पवार १४) लक्ष्मण माने वगैरे

In reply to by कापूसकोन्ड्या

एम टी आयवा मारू प्रचंड आहे!! त्याशिवाय १. मृत्युंजय आवडते सावंतांची २. महानायक विश्वास पाटील ३. दुर्दम्य (लोकमान्यांचे चरित्र) गंगाधर गाडगीळ ४. हसरे दुःख भा द खेर ५. दिग्विजय ६. वॉल्ट डिज्नी चरित्र (लेखक अनुवादक आठवेना आता) ७. राजा शिवछत्रपती ८. स्वामी ९. राऊ १०. पानीपत १२. कादंबरी नाही तरी एक होता कार्वर नमूद करतोय १३. संभाजी- विश्वास पाटील १४. माझेही एक स्वप्न होते - डॉ कुरियन ह्यांचे चरित्र

बाबा कदमाचा प्रचन्ड मोठा फॅन. बिनधास्त, मॅडम, डार्करुम, प्रलय, स्टार विटनेस सर्वच आवडतात आणि सग्रही आहेत

इनकलाब - मृणालिनी जोशी भगतसिंगांच्या जीवनावर आधारित एक अप्रतिम कादंबरी..

खरंच अप्रतिम कादंबरी आहे. हातातनं सोडवत नाही अशी कादंबरी आहे. लेखक मुरलीधर खैरनार आता आपल्यात नाहीत हे दुर्दैव!

शोध +१