Skip to main content

कवितेतील सौंदर्य स्थळं

लेखक नंदू यांनी सोमवार, 05/10/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणालाही दुखावणं हा या धाग्याचा उद्देश नाही. किंबहुना कवितेच्या व्याकरणाच्या आणि वृत्तांच्य्या क्लिश्टतेत न शिरता ढोबळमानाने तिची सौंदर्य स्थळं समजावून घेणं हाच आहे. आपल्या मिपावरील एका कवितेला मिळालेल्या प्रतिसादांकडे पाहता एकंदरीत ही कविता जवळ जवळ सर्वांनाच नादमाधुर्यामुळे आवडली आहे. नादमय रचना हे उत्तम काव्याचं एक लक्षण आहे हे मान्य पण केवळ नादमय शब्द रचनेमुळे कविता आवडली असं खरच म्हणता येतं का? असंच जर असेल तर कुठल्याही नादमय पण निरर्थक शब्द किंवा अक्षरांच्या रचनेला चांगली कविता म्हणावं का? उदाहरणार्थ हिंदुस्थानी अभिजात संगितातील तराणे अतिशय नादमधुर असतात पण त्यात कविता कुठे असते? सदर कविता तर सोडाच पण कवितेतील अनेक शब्दच मला कळले नाहीत. दुर्बोधता हा आणखी एक वादाचा विषय आहे. असो. माझ्या समजुती प्रमाणे चांगल्या कवितेचे काहि मुख्य निकष खालील पैकी एक किंवा अधिक असु शकतात. १. सोपी प्रासादिक रचना ( संतांचे अभंग) २. परिणामकारक विषय मांडणी ३. विषयाशी सुसुत्रता ४. प्रसंगाचं किंवा घटनेचं मोजक्या शब्दांत रेखाटन ( वेडात मराठे ) ५. वाचकाशी connectivity. ६. शब्दापलिकडलं सांगण्याची क्षमता (गालिब) कवितांच्या या आणि इतर सौंदर्यस्थळांबाबत या विषयावरील जाणकार आणि तज्ञ मंडळी आपली मतं मांडतील या अपेक्षेत. चु.भू. द्या. घ्या. नंदू

वाचने 5656
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

:T :T :T :T :T :T दहावी होउन लई दिस झाले आता.. पण शीर्षक वाचुन अमंळ मौज वाटली.. मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

पण शीर्षक वाचुन अमंळ मौज वाटली.. आमच्या कवितांमधील सौंदर्य स्थळं सगळ्यांना माहितियत.....अर्थातच वन अ‍ॅन्ड ओनली "ती" (येशेशी मधी मर्‍हाटीत ६३ पडलेला)परभो

सौदर्यस्थळ शोधत बसाल तर कविता हातची जाईल. जशी समोर येईल तशा कवितेला दाद द्या.. :) उद्या मिळणा-या मोरापेक्षा आज मिळणारे कबुतर चांगले असे कूणीतरी म्हणुन गेले आहे. ते कवितेला सुद्धा लागु आहे. बाकी कविता आणि सौदर्य असे वाचुन मोठ्या उत्सुकतेने आलो होतो, अंमळ निराशाच झाली ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मला कवितेतल्या सौंदर्य स्थळांबद्दल समजत असे एका कवियत्रीचे मत आहे. तिच्या अनेक कविता प्रकाशित व्हायच्या आधी मला ऐकायला मिळतात. मी मला भाग्यवान समजते. मी जाणकार आणि तज्ञ नाही तरी माझ मत देत आहे. कवितेचा विषय,त्याचे नाविन्य,मांडणी, शब्द, त्यांची मांडणी,सुसुत्रता,उपमान, उपमेय,संदर्भ, कवितेच्या ओळी व एकूण मांडणी,पुनरावृत्ती,कवितेचा शेवट कवितेची गेयता ( असायलाच हवी असे नाही.) कुठली कविता कुणाला आवडावी हे सब्जेक्टेव्ह आहे. कारण विविध असू शकतात. एखादी मजेदार कविताही आवडू शकते.तसेच एखादी गंभीर ,तर कुणाला रडवणारी. आवडते ते लक्षात राहते ,त्यावर विचार केला जातो. आवडत नाही त्याचा ही विचार होतो कधी कधी. काहीही असो.. प्रत्येक वेळी कारण मिमांसा होते असे नाही.म्हणजे .. का आवडली का नाही त्याचा शोध केला जात नाही. मला सर्वात कवितेचा अर्थ(मेसेज) महत्त्वाचा वाटतो. मीनल.

काव्य म्हणजे काय यावर विद्वानांनी खूप चर्चा केली आहे. 'वाक्य रसात्मक काव्यम्' रस हा काव्याचा आत्मा आहे. 'रमणियार्थ प्रतिपादक शब्दः काव्यम्' रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. तर कोणी म्हणते कवितेतील 'ध्वनी' हा काव्याचा आत्मा आहे तर कोणी म्हणते उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणेज काव्य, वृत्तबद्ध लेखनास काव्य म्हणावे, वगैरे इत्यादी इत्यादी. एखादी कविता वाचल्यानंतर आपल्याला त्या रचनेतील शब्दांची मांडामांड आवडते. तर कधी तालात म्हणता येते म्हणून तिचा नाद आवडतो. तर कधी कवितेतील आशय आपल्याला भावतो, त्यातील भावना आपल्या वाटतात. तर त्यातील कल्पना आपल्याला आवडते, एखादी कविता आपल्याला का आवडली, त्याचे उत्तर आपल्याला सहजपणे सांगता यायला हवे. अशीच कविता मला तरी आवडते. उगाच शब्दांचा पसारा, दुर्बोधता, आणि उगाच वाचकांची परिक्षा घेणार्‍या कवितेपासून आम्ही चार हात दूर असतो. अर्थात कविता समजायला थोडी 'समज' असायला हवी . तरच कवितेतील सौंदर्य स्थळे समजून घेता येईल असे वाटते. अर्थात प्रतिभावंत कवीच्या उंचीवर जाऊन कवितेतील सौंदर्यस्थळांचा आनंद घेणारा रसिकही विरळाच. पण, चारोळ्या, आरोळ्या, आणि नुसत्या कविता पाडणार्‍यांनी आपण कवितेतून काही तरी वेगळे सांगत आहोत ही भावना ठेवली पाहिजे. आपण कवी आहोत अशी ओळख सांगितल्याबरोबर लोक का पळतात त्याचीही उत्तर शोधले पाहिजेत असे वाटते. रमेश दीक्षीत नावाचा कवी म्हणतो- आता कुठे तयांना हे एक मान्य झाले कविता जिथून येते ते एक दु:ख आहे. असो, चर्चा रंगली तर कवितेच्या सौंदर्यस्थळावर अजून बोलु काही. :) स्वगत : कवितेतील सौंदर्यस्थळे शोधण्यासाठी काही उत्तम कवितांची चर्चा झाली पाहिजे. -दिलीप बिरुटे

कवी ग्रेस म्हणतात कवितेला व्याकरणात अडकवू नका

व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो ... त्या प्रमाणेच प्रत्येकाची सौन्दर्याची व्याख्या आणि आवड निवड वेगळी असते.. त्यामुळे कवितेतील सौन्दर्यस्थळे कोणती याचे एकच उत्तर येउ शकत नाही . कोणाला शब्द आवडतात कोणाला रचना तर कोणाला शाब्दीक करामती .. व्याकरण दृष्ट्या निर्दोष असलेली कविता आवडेलच असे नाही .. आणि कुठल्याही नियमात न बसेल अशी कविता आवडू शकते.