मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिला आघाडीची जुगलबंदी २

क्रान्ति · · जनातलं, मनातलं
http://www.misalpav.com/node/8695 आता मोहरा शंकर जयकिशनजींकडे. त्यांच्या संगीतातली प्रोफेसरमधलं 'हमरे गांव कोई आयेगा', जानवरमधलं ' आंखों-आंखों में किसीसे बात हुई' चोरी चोरीमधलं मनभावन के घर जाये गोरी', आणि जिस देशमें मधलं 'क्या हुआ ये मुझे क्या पता?' हे पद्मिनीवर चित्रित झालेलं गीत! पण या सगळ्यांपेक्षा मला आवडतं ते बसंतबहारमधलं हे अप्रतिम गीत! कर गया रे निम्मीच्या चेह-यावरचे भाव, लताबाईंचा आवाज आणि तो जीवघेणा प्रश्न "पत्थर की मूरत के दर्शन करा दूं?" वा! दु:ख इतकं सुरेल असतं? असंच सुरेल दु:ख नौशादमियांच्या मदर इंडियामधल्या 'दुनियामें हम आये हैं तो जीनाही पडेगा" मध्ये दिसतं. असं गाणं गात दु:खाला, संकटाला सामोरं गेलं तर ते नक्कीच विरघळेल! नौशादमियांच्या मेरे मेहबूब मधल्या कव्वालीचा थाट काय वर्णावा! साधना आणि अमिताची अहमहमिका, कुणाचा सखा जास्त सुंदर! आणि ही छेडछाड शेवटी दोघींचा सखा एकच तर नाही? या शंकेवर संपते! लताबाई आणि आशाबाई या रिद्धी-सिद्धी तर नाहीत? मुगलेआझमची निगार आणि मधुबालाची कव्वाली, चढेल निगारला गुलाब, तर नम्र, लीन मधुबालाला काटे, "जहेनसीब, कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता!" शमशादजी आणि लताबाई! क्या बात है! किस्मत आजमाकर हम भी देखेंगे! संगीतकार रवी यांची चौदहवी का चांद मधली 'शरमाके ये क्युं सब परदानशीं आंचल को संवारा करते हैं?' ही देखिल आशाजी आणि शमशादजी यांची सुरेल जुगलबंदी! जुन्या झीनत चित्रपटातली 'आंहे न भरी शिकवे न किये' ही लहानपणच्या नूरजहांची आणि ब-याच इतर गायिकांनी गायिलेली कव्वाली पण याच माळेतली! कव्वालीवरून आठवलं, रोशनजींच्या 'बरसात की रात' मधली 'ना तो कारवां की तलाश है' या कव्वालीत एक सुरेल अंतरा आशाबाई आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात आहे, चारच ओळींच्या त्या अंत-याची सुरुवात आशाबाईंच्या आलापानं होते, तो आलाप अक्षरशः काळजात घुसतो! शामाच्या चेह-यावरची निराशा, तबस्सुमचा अगतिकपणा आणि बस! याच चित्रपटात सुमन कल्याणपुर आणि मुबारक बेगम यांचं हे गौडमल्हारातलं अप्रतिम गीत! गरजत बरसत सावन आयो रे सावन असाच यायला हवा ना सुरेलपणे? आणि चित्रलेखाला कोण विसरेल? 'काहे तरसाये जियरा' या कलावती रागातल्या गीताची मोहिनी कधीतरी कमी होणं शक्य आहे? आशाबाई आणि उषाबाईंचं हे अप्रतिम गीत अजूनही ताजंतवानं आहे, फुलत्या गुलाबासारखं! हे गीत श्रवणीय आहे, प्रेक्षणीय फारसं नाही, म्हणून दुवा देत नाही. काही पोशाखी चित्रपटांत अशी गाणी नेहमीच येत गेली. जी. एस. कोहली यांचं तुमको पिया दिल दिया कसं विसरणं शक्य आहे? याच चित्रपटात [शिकारी] हेलन आणि रागिनी यांच्यावर चित्रित मांगी हैं दुवाएं हमने सनम कमी ऐकायला मिळतं पण तेही सुरेख आहे. बर्मा रोड नामक चित्रपटात एक असंच सुंदर गीत आहे, कुमकुमवर चित्रित असलेलं. लताबाई आणि उषाबाई यांचं हे गीत आहे, 'बांके पिया कहो हां दगाबाज हो"हेच ते चित्रगुप्त यांच्या संगीतातलं गीत. तसंच परवरीश या चित्रपटात 'जाने कैसा जादू किया रे बेदर्दी बालम' हे आशाबाई आणि सुधा मल्होत्रा यांचं गीत, संगीत इक्बाल कुरेशी यांचं! क्रमशः

वाचने 1709 वाचनखूण प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्त कलंदर 27/07/2009 - 00:37
मी या आधीच्या तुमच्या लेखावर दिलेली प्रतिक्रिया... http://www.misalpav.com/node/8695#comment-135333 हा लेख भाग-२ आहे? की आधीचाच अद्ययावत केलाय? अद्ययावत वाटत नाही कारण उल्लेख वेगळे आहेत.. पण मग मुखपृष्ठावर पहिल्या लेखाचा दुवा दिसत नाहीये.. चुकुन उडवलात की काय?? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!