स्वनियंत्रण, संयम - एक प्रस्ताव
नमस्कार,
सर्वप्रथम हा प्रस्ताव - चर्चा म्हणून तसेच व्यावहारीक आचरण म्हणून मी नेहमीप्रमाणेच केवळ एक मिपासदस्य म्हणून मांडत आहे. त्याचा संबंध जरी माझ्यासकट सर्वांनी जनात आणि मनात कसे वागावे याच्याशी मुख्यत्वे मर्यादीत असला तरी मिपा संबंधात संपादकांचे विशिष्ठ धागे संपादन करताना धोरण काय असावे या संदर्भात देखील आहे.
हा वेगळा काथ्याकुटाचा धागा सुचण्याचे तात्कालीक कारण जरी हिमानी सावरकरांचे पत्र असले तरी तशा अनेक चर्चा येथे चालू असतात. या संदर्भात प्रथम मला सांगायचे आहे की हिमानी सावरकरांचे पत्र आणि विचार मला अजिबात पटले नाहीत आणि मान्य देखील नाहीत. याचा अर्थ त्या धाग्यातील त्यांच्यावर टिका करणार्यांचे म्हणणे मान्य आहे असा अजिबात करून घेऊ नये. पण, स्वतःला स्वातंत्र्यवीरांच्या नात्यातील म्हणत असताना सावरकरांच्या तत्वाच्या पूर्ण विरुद्ध ह्या विचार पसरवत आहेत आणि हे जास्त खटकते. द्रष्टे, नेते, पुढारी यांच्या जवळील व्यक्तींनी वास्तवीक जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा असते. अर्थात तसे न वागून हिमानी सावरकर ह्या अपवाद नसल्याचेच जास्त करून सिद्ध करत आहेत. असो.
प्रयोजन:
आपण कुठेही राहात असलो तरी आज इथे म्हणजे मिपावर येताना केवळ मराठीची आवड आणि त्या भाषेत संवाद साधण्यासाठी येतो. संवाद पण अशांबरोबर ज्यांना आपण कधी पाहीलेले नाही अथवा वास्तवात भेटलेलो नाही. बर्याचदा एकमेकांची नावेपण माहीत नसतात, आडनावे तर अजूनच दूर आणि जात तर त्याहूनही माहीत असणे दूर असते/असायला हवे. मात्र मग चर्चा विषय असे शोधले जातात अथवा बातम्याच अशा असतात ज्यातून आडून अथवा प्रत्यक्ष जातीवरून भांडणे, वाद सुरू होतात.
माझे व्यक्तिगत मत मी बर्याचदा इथे आणि इतरत्र लिहीले आहे आणि जिथे शक्य असते तिथे प्रत्यक्षात देखील मांडतो, आचरतो. आपण आता स्वतःला सुशिक्षित, अधुनिक वगैरे सर्व समजतो आणि समजत असलो नसलो तरी २१ व्या शतकातील अधुनिकतेला अनुसरून आपण स्वतःला "मनापासून" बदलणे आवश्यक आहे. त्यातील सर्वाता महत्वाचा भाग म्हणजे मनापासून जात हा विषय आधी टाळायला लागणे. हळू हळू तो आपल्या आणि इतरांच्या मनातून आपोआप जाऊ लागेल याची खात्री आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे जो काही कुणाला कुळाचार वगैरे करायचा असेल, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कुटूंबातील दैनंदीन (खाण्यापिण्यासहीत कशाचाही) सवयी असतील त्या बदलायच्या अथवा त्यात स्वतःला/इतरांना कमी-जास्त मानावे. पण तो कुळाचार असुंदेत "जातीचार" नाही. शिवाय आज आपल्यातला कोणीही पुर्णपणे अगदी आपल्या आई-वडीलांच्या वेळपर्यंतचे संस्कार आत्मसात करून वागत नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. मग केवळ हे जातीचे बिरुद अथवा जातीचे चष्मे कशाला ठेवावेत?
जात आणि जातीचा विषय, हे त्या संदर्भात असे एक विष आहे जे चघळताना कुठलीतरी धुंदी चढते आणि एकमेकांशी शिरजोरी करत असताना नकळत स्वतःच झुंज देणारे बैल अथवा कोंबड्या होतो. तो खेळ कोण करत असते, बघत असते आणि त्याचा वापर करते हे वेगवेगळ्या वेळेस वेगळे असू शकतात आणि तो एक वेगळ्याच चर्चेचा विषय आहे. पण ह्या झुंझीच्या धुंदीत आपण समाज म्हणून रक्तबंबाळ होत असतो आणि स्वतःचे, संपुर्ण समाजाचे एका परीने नजिकच्या आणि दूरच्या भविष्याकरता नुकसानच करत असतो. कारण शेवटी विष ते विष. आज एकाला भोवले तर उद्या दुसर्याला आणि परवापर्यंत सर्वांनाच... म्हणून हा विषय गांभिर्याने घ्यावात अशी विनंती आहे.
प्रस्तावः
आपण एका दिवसात जग बदलू शकणार नाही. जगच कशाला स्वत:ला अगदी प्रकृतीच्या कारणासाठी पण चांगल्या सवयी लावताना अवघड जाते. तर ह्या संदर्भातील बदल सोपे कसे म्हणता येतील? पण एक साधी सुरवात म्हणून किमान मिपासंदर्भात (आणि शक्य झाल्यास इतरत्र स्वतःसंदर्भात) तरी आपण काही गोष्टी पाळाव्यात असे म्हणावेसे वाटते:
- सगळ्यात सोपे जातीविषयक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिसाद देणे सोडणे आणि चर्चा त्या मार्गाला जात असेल तर कितीही चांगले (जातीविरहीत) स्वतंत्र मुद्दे माहीत असले तरी अशा चर्चांमधे न पडणे आणि स्वतः तशा चर्चा सुरू न करणे. त्यामुळे निदान स्वतः मुळे ती चर्चा आणि त्यातून नकळत पडणारी फूट वाढत नाही...(एक कारण हात शिवशिवत असूनही हिमानी सावरकरांच्या पत्रावरील चर्चेत मी पडलो नाही ते).
- दुसरा भाग म्हणजे अशा चर्चा जेंव्हा मूळ प्रस्ताव सोडून वाहवत जातात तेंव्हा संपादकांनी पूर्णपणे काढून टाकणे.
- आता असा प्रश्न येऊ शकतो की असे बरेच विषय असतात ज्यांच्या संदर्भात लिहीणे म्हणजे जातीय ठरू शकेल, पण उद्देश तसा नसेल. उ.दा. कोणी अमुक एका पद्धतीचे माशाचे कालवण अथवा तमुक पद्धतीची पुरणपोळी, असे काही लिहीणे म्हणजे जातीय आहे का? माझ्या लेखी नाही. कारण वर आधीच म्हणल्याप्रमाणे त्यात बर्याचदा कुटूंबातील अथवा पुर्वीच्या (जातींमुळे तयार झालेल्या) समाजातील पद्धती आहेत ज्या आजकाल सर्वसमाजात खाण्याच्या हौशीने एकत्रीत होत आहेत. चायनीज फ्राईडराईस म्हणताना जसे त्यात राष्ट्रीयत्वापेक्षा पद्धत असते तसेच काहीसे या बाबतीत होते. असे इतरही काही या संदर्भात बसणारे मुद्दे असू शकतात.
- दुसरा भाग हा ऐतिहासीक गोष्टींसंदर्भात आहे. ज्यांना कुठल्याही ठोस पुराव्यानिशी कुठल्याही बाजूने जुनी अथवा नव्याने आलेली माहीती मांडायची असेल त्यांनी मांडावी पण उगाच कुठल्याच बाजूने पुरावा काय म्हणत वाद घालणे अयोग्य वाटते. तसे विषय चालू करणे तर त्याहूनही अयोग्य वाटते. पण कुठल्याही संदर्भात माहीतीपूर्ण (स्कॉलर्ली) चर्चांवर परत जातींविषयक स्वतःपुरते नियम पाळत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाद, टोमणे न घालता माहीतीपूर्ण (स्कॉलर्ली) चर्चा करावी अथवा त्या पूर्णपणे दुर्लक्षित करून सोडून द्याव्यात. उ.दा. आंबेडकरांचे, गांधीजींचे, सावरकरांचे आणि तसेच इतर अनेक समाजधुरीणांचे विविध विचार, ऐतिहासिक चुका यांवर कोणी संदर्भासहीत लिहीले (संदर्भ मिळणे बर्याचदा सोपे आहे) तर तो विषय अभ्यासू ठरेल. पण संदर्भाविना, मुद्दामून "आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट" जर कोणी लिहू लागले तर ते योग्य नाही. असे अनेक विषय असू शकतात. पण संयम न सोडता त्यावर अभ्यासू लेखन होऊ शकते याची खात्री आहे.
- त्यातूनही जर कोणाला जातीसंदर्भात पोटतिडकीने लिहायचेच असेल तर त्यांनी स्वत:च्या खर्या नावाने (जमल्यास छायाचित्रासहीत :) ) लेखन प्रकाशित करावे. उगाच कुठली तरी नावे तयार करून विरुद्ध, बाजूने अथवा एकमेकांमधे विष कालवले जाईल असे लिहू नये. (अर्थात तसे लिहीले गेले तर एका सोपी लिंक संपादकांच्या हातात आहेचः "रद्द" )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेखातील
मिसळपाव
सहमत आहे.
तेच
आवडला हा
विकासरावा
या
सहमत...
विकास, अतिशय उत्तम चर्चाप्रस्ताव मांडल्याबद्दल अभिनंदन!
+१,
चांगला चर्चाप्रस्ताव
बरेचसे मान्य
धनंजय व चित्रा यांच्यासारखेच म्हणतो.
म्हणणं पट्या
स्वनियंत्रण असलेच पाहिजे.
हिमानीबाई
वा!
धन्यवाद
- "चतुरंग म्हणतो: जातीयवादाचा तिढा हा आपल्या मनातून ह्या गोष्टी हळूहळू हद्दपार करत नेण्यानेच सुटणार आहे...." - हेच म्हणायचे आहे. यातील हळूहळू या शब्दास देखील "हद्दपार" या शब्दाइतकेच महत्व आहे. सामाजीक बदल हे क्रांतीने होतात अथवा उत्क्रांतीने. माझे म्हणणे चतुरंगप्रमाणेच "उत्क्रांती"वर (हळूहळू हद्दपार) आधारीत आहे. तसेच मत मराठमोळा यांचे दिसले.
- धनंजय, चित्रा, nile आणि कर्कः मोकळी चर्चा होणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच मी अशा चर्चांमधे असाच सूर लावला तरी त्या काढून टाकाव्यात असे म्हणले नाही. पण कुठेतरी तसे करत असताना सामाजीक प्रौढत्व येणे गरजेचे आहे. ज्यांना जातीचा अभिमान बाळगायचा असेल, त्यांनी स्वत: नक्की आज आपण नक्की काय जातीमुळे आलेले कुळाचार पाळतो याचा विचार करून बोलावे. ज्यांना इतर जातींचा तिरस्कार आहे त्यांनी नक्की आपल्याला, आपल्या पिढीला, व्यक्तिगत इतर जातींकडून काय त्रास झाला या संदर्भात विचार करून बोलावे. बिरूटेसरांनी म्हणल्याप्रमाणे अशा प्रकारच्या चर्चा ह्या संदर्भांचे आदानप्रदान करत करायला काही हरकत नाही. न पेक्षा मिपा अथवा इतर अशी अनेक संस्थळे ही असल्या जातिय भांडणाला "सेफ हेवन्स" ठरतील.
- शहारूख यांची कल्पना चांगली आहे: एखादी चर्चा ताळतंत्र सोडत असल्यास अप्रकाशीत करण्याऐवजी लॉक करायची कल्पना आणि त्यामुळे ती वाचकांना दिसेल अशी व्यवस्था करणे महत्वाचे वाटते. (हिमानीबाईंचा धागा अप्रकाशित केला आहे - मी नाही पण चर्चा घसरत चालली हे पाहून इतर कोणी सुजाण संपादकाने).
सरतेशेवटी हिमानी सावरकरांबद्दलः हिमानी सावरकरांचा उद्देश हा द्वेष पसरवणे नक्कीच नसावा मात्र त्यांच्या अॅक्शनची परीणती जर त्यातच होत असेल तर त्याला पाठींबा देणे योग्य वाटत नाही. त्यांच्या काकांचे (नथुराम गोडसेंचे) म्हणणे आणि गांधींजींबद्दलचे राजकीय मुद्दे कुणाला कितीही मान्य असले/होवू शकले तरी त्यांच्या अॅक्शनचे परीणाम आपण आजही सर्वत्र भोगत आहोत असे वाटते. सावरकरांचे वाक्य वाचल्याचे आठवते की स्वतंत्र (लोकशाही) राष्ट्रात विरोध हा बॅलटने दाखवावा बुलेटने नाही. पण त्यांच्या पुतणसुनेचे तसे विचार वाटत नाही. हिंदू राष्ट्र ह्याचा सावरकरी अर्थ त्यांना समजला आहे असे वाटत नाही. पण तो वेगळ्या वादाचा मुद्दा आहे. आणि दादोजी कोंडदेवांसंदर्भात - माझ्याकडे ब्रिटीशकालीन संदर्भ आहेत. मात्र मी येथे त्यावरून नवीन धागा काढू इच्छित नाही. ज्यांना "अभ्यासासाठी" हवे असतील त्यांनी अवश्य व्य.नि. करा. (कुरघोडीसाठी वापरू नये ही विनंती). धन्यवाद.शहारूख
स्वागत
अनुमोदन