मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका लग्न समारंभाची सफर (भाग २)

जागु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एका लग्न समारंभाची सफर (भाग १) http://www.misalpav.com/node/7933 निघताना रस्त्यावरील गणेश मंदीराचे गाडीतुनच दर्शन घेऊन त्याला आमचा प्रवास सुखरुप पार पाडण्याची इच्छा व्यक्त करुन पुढे निघालो. आम्ही ज्या मार्गावरुन चाललो होतो तो परिसर गावाचा होता. आजुबाजुला संपुर्ण गावं आणि कंटेनर यार्ड होते. रस्त्याला झाडी खुप तुरळक होती. त्यामुळे उन्हाचे तिव्र चटके सोसत आम्ही प्रवास करत होतो. लहान मुलांच्या पोटातील कावळे शांत झालेले पण आता आम्हा मोठ्यांच्या पोटात ते गडाबडा लोळायला लागले होते. आता रस्त्यात कुठेतरी वडापाव मिळेल तो आपण खाऊ अस ठरवून आम्ही गाडीत बसुन रस्त्यावर वडापावची गाडी शोधू लागलो. पण तेंव्हा १२.३० च्या आसपास वाजले होते. सगळे वडापाव वाले त्यांच्या पोटातले कावळे शांत करायला गेले होते. १५ मिनीटे रस्ता पुढे गेला तरी कुठेच वडापाव सापडला नाही काही टपर्‍या बंद होत्या तर काहीमध्ये बेसनचा गाळ शिल्लक होता. आता वडापावचा नाद सोडून आम्ही केळी किंवा जे काही मिळेल ते घेउन खाण्याचा विचार केला पण तेही काहीच आमच्या नशिबात नव्हते. कारण तो सगळा गावठाण एरिया होता. जी दुकाने होती ती घराला लागुन होती. आणि ती सगळी जेवणाची वेळ असल्याने बंद होती. सुदैवाने आम्ही लहान मुलांसाठी जो खाऊ आधिच घेतला होता त्यात त्यांची भुक भागवता आली. जिथे पुरुष मंडळी ही ह्या सुत्रधारांवर बोटे मोडत होती तिथे आम्ही बायकांच्या तोंडानी त्यांना किती शिव्या श्राप (सॅण्डर्ड) दिल्या असतील ह्याचा काही हिशेबच नाही. तेच एक करमणूकीच साधन आमची भूक आणि उन्हाचे चटके सहन करायला मदत करत होत. मध्येच कोणाचतरी घड्याळाकडे लक्ष गेल आणि आपण लग्नासाठी जातोय ह्याची आठवण झाली. एव्हाना लग्न लागूनही गेल असेल म्हणून आमच्यातील किशोरवयीन मुलाने पुढे गेलेल्या वर्‍हाडापैकी कुणालातरी फोन केला तेंव्हा कळले की अजुन नवरा विवाहस्थळी पोहोचला नाही १० मिनिटांत पोहोचेल. जाता जाता पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदीरात तो दर्शन घेण्यासाठी उतरला होता. आमच्या वर्‍हाडामधली बरीचशी भाविक मंडळी बल्लाळेश्वराचे दर्शन मिळेल म्हणून लग्नाला यायला निघाली होती. पण वेळ भरपुर झाल्याने आम्ही परत येताना बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे ठरवले. आमच्या चारही गाड्या आता इतक्या सुसाट चालल्या होत्या की सव्वा वाजता आम्ही पालीला पोहोचलो. तिथुन अजुन अर्धा तासाच्या अंतरावर विवाह स्थळ होते. मंदीराच्या मार्गावरच आम्हाला सरबत-गोळ्याच्या गाड्या दिसल्या आणि डोळे थंड झाले. चारही गाड्या आपोआप येऊन सरबतांच्या गाड्यांजवळ येऊन थांबल्या आणि मेंढरे सुटल्या प्रमाणे सगळी गाडीतली मंडळी (दोन मामा सोडून) सरबताच्या गाड्यांभोवती जमा झाली. प्रत्येकाच्या कोरड्या पडलेल्या घशातून सुत्रधारांच्या दोषांच्या पिचकार्‍या उडत होत्या. त्यांच्या नावाने नाक मुरडत आम्ही एक-एक गोळा आणि दोन ग्लास सरबत प्यायलो. लहान मुलांचे कपडे गोळ्याच्या रसाने लग्नाला जायच्या आधिच माखले. सगळ्यांच्या ओठावरती गेलेली लिप्स्टीक सरबताच्या कलरने परत नविन रुपात आली. आता पोटातल्या कावळ्यांची तहान भागली होती पण भुक अजुन तशीच होती. आता ह्यातील तरूण तडफदार मंडळी जी होती ते म्हणजे आम्हा बायकांचे नवरे. आपले कसे हाल झाले गाडीत किती उन लागले ह्याचे कौतुक सांगण्यासाठी आम्ही निघताना त्यांच्या गाडीजवळ गेलो. सरबत प्यायला न आलेले ते दोन सांगकामे मामा गाडीत पाठी बसले होते. त्यांच्याकडे बघुन त्यांना बोलावुन घेण्यासाठी, वारंवार का फोन येत होते ह्याचा आम्हाला तिथे उलगडा झाला. त्यांचे पेटलेले डोके शांत करण्यासाठी त्यांनी पिशवीतून आणलेल्यापैकी पावशेर ते घशाखाली उतरवत होते. हे काय ??? आम्हा सगळ्या बायकांची प्रतिक्रिया. त्याने ते लाजले आणि पुढे गेलेल्या वर्‍हाडातील काही मंडळींनी ही मागवली असल्याचा खुलासा केला. आमचे नवरे ह्या सगळ्या पासुन अलिप्त होते म्हणून नशिब नाहीतर आम्ही तिथेच वरात काढली असती. नवरर्‍यांनी आमची कौतुक ऐकून घेऊन तेही त्यात समदु:खी असल्याची जाणीव करुन दिली. त्यांनी रस्ता सुसह्य करण्यासाठी सुत्रधार, नवर्‍याच्या घरातील मंडळींवर विडंबन गिते रचली होती. आणि ती गात गात ते येत होते आणि भरपूर तोंडसुख उपभोगत होते. आता आम्ही परत आमच्या उरलेल्या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी गाडीत जाऊन बसलो....

वाचने 3111 वाचनखूण प्रतिक्रिया 4

ओ जागुबै अर्धवट का हो संपवलीत कहाणी ? साठाउत्तरी सफल संपुर्ण करा ;) पुढची गंमत जंमत पण येउद्या !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

प्राजु 29/05/2009 - 08:02
पुढे काय?? लवकर लिही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/