Skip to main content

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 05/06/2026 23:01 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.

मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.

सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच. अनेक ठिकाणी रश्यात काही बाही पदार्थ "मिसळलेले" आढळले आहे. अगदी माश्याचा रस्सा, कालचा रस्सा वगैरे.

मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ असते. मुख्य असते मटकी, पण ती असते अगदी कमी

बाकी भुस्कट फरसाण ते तर आयते तयार असते अन कोणत्या तेलात अन पिठात बनवतात काय माहीती. अगदी मक्याच्या पिठाचेही फरसाण, शेव असते. 
(मी असे पदार्थ तयार करणार्या मशिनरीच्या कंपन्या अन सर्वीस जवळू पाहीली आहे. नावाजलेल्या कंपन्यांत कन्व्हेअर बेल्ट, मिक्सर मध्ये अगदी आळ्या सापडलेल्या आहेत.)

बाकी पाव तर तयार असतात. अन बहुतेक वेळा ताजे असतीलच असे नाही.

अन आजकाल पापड, जिलेबी, गुलाबजाम काय देतात!!

नुसते कौतूक.

#MisalPav #मिसळपाव


वाचने 3303
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

आमच्या शेजारी मुळचे सिन्नर  तालुक्यातील होते. ते गावाहून मटकी आणत त्या मटकीची  उसळ खूपच चवदार लागायची . मिसळीची चव मटकीवर अवलंबून  असते. त्यामुळे खेड्यात मिळणारी मिसळ ही शहरात मिळणाऱ्या मिसळीपेक्षा चवदार असते.  

 


In reply to by आग्या१९९०

खेड्यात एकमेकांना तोंड दाखवायचे असते. सामाजिक दबाव असतो.

शहरात कोणी कोणाला ओळखत नाही. खायचे तर खा नाहितर येतील छप्पन.


दुर्दैवाने हे खरे आहे. मिसळीत भजी टाकली, उसळ नी शेव जास्त असलेले फरसाण! चविष्ट रस्सा असेल तर मिसळी इतका उत्तम पदार्थ नाही! कधी धुळ्यात आला तर सिंधीची मिसळ चाखा! 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

सिंधी धुळ्यात अन नाशिक मुंबैत आण्णा मिसळ बनवतो. भैये जिलबी फापडा कारागीर आहेत. वेटर ओरीसाचे, बंगालचे.

या अन चढा आमच्यावर. खा आमचे धंदे..


In reply to by पाषाणभेद

हाहा, खरं आहे! बाकी धुळ्यात हजारेंची मिसळही फेमस आहे. ९.३० च्या आधी पोहोचावे लागते नाहीतर संपते.


बहुतेक वेळा लेखक आणि प्रतिसादकर्ते वेगळ्या ग्रहांवर असतात असे वाटते. इथे पाभेंना मिसळीला शिव्या घालणे अपेक्षित आहे तर पब्लिक इथं चांगली मिसळ मिळते नि तिथं चांगली मिसळ मिळते करुन राह्यलेत. लेखकाला उभारी येईल असे प्रतिसाद देत चला लोक्स !


In reply to by धर्मराजमुटके

धर्मराज सर,

 __/\__

 

बघाना, मिसळीचा ९०% कच्चा माल आयता मिळतो. आजकाल तर हाटेलींना मटकी देखिल आयती तयार मिळते. बाकी हाटेली, हातगाडीवाले केवळ व्यवस्थापन बघतात.

 

अन मोठे मोठे हाटेलीवाले गावाबाहेर जागा घेऊन हाटेल पर्यटन सुरू करत आहेत. त्यात पक्षी दाखवाणे, जत्रेतली खेळणी ठेवणे, फुगे फोडणे असे असते. एक कुटूंबाला सुटीचे पर्यटन समजू शकते पण मग तेथे मिसळीच मिळते.

 

घरातल्या गृहीणी याच्या पेक्षा जास्त निगूतीने, कष्टाने इतर अनेक पदार्थ चविष्ट, स्वच्छ, आरोग्यपूर्ण बनवत असतात.

 

२०-२० क्रिकेट सारखी मिसळ चटपटीत, लवकर पोटभरू पदार्थ आहे. 


In reply to by धर्मराजमुटके

धर्मराज सर,

 __/\__

 

बघाना, मिसळीचा ९०% कच्चा माल आयता मिळतो. आजकाल तर हाटेलींना मटकी देखिल आयती तयार मिळते. बाकी हाटेली, हातगाडीवाले केवळ व्यवस्थापन बघतात.

 

अन मोठे मोठे हाटेलीवाले गावाबाहेर जागा घेऊन हाटेल पर्यटन सुरू करत आहेत. त्यात पक्षी दाखवाणे, जत्रेतली खेळणी ठेवणे, फुगे फोडणे असे असते. एक कुटूंबाला सुटीचे पर्यटन समजू शकते पण मग तेथे मिसळीच मिळते.

 

घरातल्या गृहीणी याच्या पेक्षा जास्त निगूतीने, कष्टाने इतर अनेक पदार्थ चविष्ट, स्वच्छ, आरोग्यपूर्ण बनवत असतात.

 

२०-२० क्रिकेट सारखी मिसळ चटपटीत, लवकर पोटभरू पदार्थ आहे. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

उसळ अगदी कालची असली तरी केवळ गरम रस्सा यावर हाटेल चालू शकते.

 

वा रे ते रे डाव,

एक मिसळ

दहा दहा पाव.

 

ए आण रे रस्सा.


पुष्कळ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी मिसळपाव हा एक नवा पदार्थ (विशेषत: पुण्यात) प्रचलनात येत होता. दिल्ली, इंदूर वगैरेमधे ऐकिवात नव्हता. आमचे सगळे नातेवाईक पुण्यात असल्याने एकदा पुण्याला गेलो की सगळ्यांकडे जावे लागायचे (त्याकाळी अगत्याने घरी बोलवायची प्रथा संपलेली नव्हती) पण गम्मत म्हणजे सगळ्यांकडे "मस्तपैकी मिसळपाव बनवली आहे" हेच. अगदी वैताग आला होता. भेट नको पण मि.पा. आवर असे झाले होते. फालतू पदार्थ आहे. 


In reply to by चित्रगुप्त

नाशकात तर मखमलाबाद रोड हा मिसळपाव रोड गणला जातो आहे. 

लोकं पर्यटनाला जावे तसे मिसळपाव खाण्याला जातात.

 

माझा मुख्य आक्षेप मिसळपाव हा अतिशय कमी पाककौशल्य असलेला, अवाजवी प्रसिद्धी दिलेला पदार्थ आहे.

 

त्यापेक्षा थालीपिठ, सांजा, घावण वगैरे बनवायला जास्त कष्ट पुरतात. परंतु ते आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने चांगले, स्वच्छ, आरोग्यपूर्ण असतात.

 

मिसळीच्या किंमतीही गैरलागू आहेत. 


२०-२० क्रिकेट सारखी मिसळ चटपटीत, लवकर पोटभरू पदार्थ आहे.  >>>>
  मी ह्याबाबत असहमत आहे. अनेक ठिकाणी वाईट मिसळ मिळते मान्य! पण ज्या ठिकाणी चविष्ट मिसळ मिळते तिथे नक्कीच कष्ट घेतलेले असतात! रस्सा वडा आणी मिसळसाठी काही दुकाने फेमस असतात, तिथला रस्सा हा तेलकट नी मसालेदार नसतो तरीही चविष्ट असतो त्या साठी कष्ट असतात!  अश्या ठिकाणची मिसळही चविष्ट असते. मी मैदा खात नाही त्यामुळे पावही खात नाही मिसळ पोळीसोबत खातो. त्यामुळे ९० टक्के ठिकाणी वाईट मिळत असली तरीही ज्या दहा ठिकाणी मिसळ मिळते ती चांगलीच असते. बाकी घरात बनलेली मिसळ भयंकर असते, कुणाच्याही घरी खा. चित्रगुप्त काकानी बरोबर सांगितले, कुणाच्या घरी गेलो नी मिसळ आली खायला तर समजायचं कार्यक्रम झाला. 🤣

 


ऐक्चुअली मिसळपाव हा ओव्हर्हाईप्ड पदार्थ झाला आहे. 

सर्व मराठीभाषकांची सामायिक मालकी आणि प्रत्येकाचे त्यात योगदान असताना केवळ प. महाराष्ट्राच्या काही भागाने विषेषत: पुणेकरांनी जणू काही याचा सातबारा आपल्या नावावर केला आहे. बरं केला तर केला पण काही व्हैल्यु ऐडिशन म्हणावे तर ते तसे नाही. उगी उपासाचीच कर, चुलीवर कर, तंदूरला कर, आत कोळसा टाकून स्मोकी इफेक्ट दे असले हांडगे प्रकार मिसळपाव संदर्भात सुरु आहेत. मिसळपावचे खरे दर्दी चाहते मिसळपावकडून काय अपेक्षा करतात त्यापेक्षा स्वत:ला काय पाहिजे तेच घालायचे आणि सर्वांना ते आवडायला पाहिजे, त्याचे रिव्ह्युस चांगले आले पाहिजेत , ओरिजैनिलिटी ला कोलून, प्रतिस्पर्ध्याची उणेदुणी काढूनच स्वत:ला सिध्द करायचा अट्टाहास ह्यामुळे अट्टल खवय्ये आता "नको मिसळपाव" ह्या लेव्हलला आले आहेत. खवय्यांना आता असल्या पुळचट प्रयोगांचा आणि ते करणाऱ्या लोकांचाही राग आला आहे. कदाचित अशा प्रयोगातून मिसळपावचा मूळ आत्मा कुठेतरी गवसेल म्हणून वारंवार मिसळपाव कडे येणाऱ्या खवय्यांचाही भ्रमनिरास होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपला वेळ आणि पैसा खर्चून काहीतरी भुस्सा भरण्याची वेळ सतत येत गेल्यास इतर चवींकडे आणि ते मिळणाऱ्या स्थळांकडे लोकांनी आपला मोहरा वळवायची वेळ आली आहे. 

मूळ मिसळपाव म्हणजे काय आहे हे आता खरोखरच सम्जून घ्यायची वेळ आली आहे. 


In reply to by अभ्या..

सर्व मराठीभाषकांची सामायिक मालकी आणि प्रत्येकाचे त्यात योगदान असताना केवळ प. महाराष्ट्राच्या काही भागाने विषेषत: पुणेकरांनी जणू काही याचा सातबारा आपल्या नावावर केला आहे. बरं केला तर केला पण काही व्हैल्यु ऐडिशन म्हणावे तर ते तसे नाही. उगी उपासाचीच कर, चुलीवर कर, तंदूरला कर, आत कोळसा टाकून स्मोकी इफेक्ट दे असले हांडगे प्रकार मिसळपाव संदर्भात सुरु आहेत.

१००% सहमत, त्यात बळेच नाशिक विरुद्ध पुणे लुटपुटूची भांडणे, इत्यादी प्रकार पण आहेत. एकदा तर चिकन मिसळ प्रकार बघितला होता, म्हणजे काय ! ? तर रात्रीचा उरलेला तांबडा रस्सा फरसाण ओतून पाव अन् कांदा कोथिंबीर पेरून कस्टमरच्या माथी मारणे !. 

मिसळ सोबतच मटन भाकरी हॉटेल एक पेव फुटल्यागत मातली आहेत एक "महसुली कागदपत्रांच्या नावाने" असलेल्या हॉटेल मधे तर reel वर reel कसल्या तर कस्टमर खायला बसलेला असताना मालक येणार अन् स्वतःच त्याच्या (ग्राहकाच्या) पानातली भाकरी कुस्करून त्यावर रस्सा ओतून कालवून देणार अन् खावा खावा करत आग्रह करणार ! च्यामारी ! आपल्या पानात दुसऱ्याने हात टाकलेले कसे खावे बुवा! बरं घरी समजा पोरे बाळे आईबापाच्या पानात जेवत असतील ते एक ठीक आहे पण हे तिऱ्हाइत माणसाने येऊन डायरेक्ट भाकरी काला करून देणे लैच विचित्र वाटले होते.


In reply to by वृषभ खोंडे

कस्टमर खायला बसलेला असताना मालक येणार अन् स्वतःच त्याच्या (ग्राहकाच्या) पानातली भाकरी कुस्करून त्यावर रस्सा ओतून कालवून देणार अन् खावा खावा करत आग्रह करणार ! च्यामारी !

 

बरं येणार ते येणार... पण धोतर, छाटण, खांद्यावर घोंगडी, पायात कापशी, हातात किलोचे कडे अन एक काठी अश्या युनिफॉर्मात येणार.

फाईव्हस्टार वाल्यांनी महाराजाच्या ड्रेसला दरवान म्हणून डाऊनग्रेड केले, सिकुरिटीवाल्यांनी एअरफोर्स वर्दीला तसेच केले..

मुद्दा कोणताही व्यवसाय लहान मोठा नाही पण "जिथल्या गोष्टी तिथे" हे कधी कळणार कुणास ठाऊक.


In reply to by वृषभ खोंडे

कस्टमर खायला बसलेला असताना मालक येणार अन् 

  आणि इतर अनेक रिळांमध्ये विविध सुंदरी भरजरी साडीत आणि नथ घालून मॅनेजरचं गल्ल्यावरचं काम, भटारखान्यात पातेल्यात काहीसे नाममात्र ढवळणे, आचारी लोकांवर ओरडून घाई करणे आणि टेबलांच्या मध्ये फिरून जेवायला बसलेल्या ग्राहकांची प्रेमळ चौकशी असे सर्व करताना दिसतात. तशाच त्या एका कॅफेतल्या काऊंटरवर असलेल्या मुली. या सर्वांचे लांब केस कौतुकास्पद असतीलही, पण त्याच्या बटा सदैव मोकळ्या सोडलेल्या बघून जेवणात त्यातले काही केस येतील अशी भीती वाटते..

 


महाराष्ट्रात लोकांचे दोन प्रकार आहेत.  

१) ज्यांना मिसळ आवडते ते --विविध ठिकाणी मिसळ चाखायला जातात आणि मिसळपाव सारख्या स्थळावर सुद्धा येतात.

२) बाकी लोक -- मिसळ ही पदार्थ म्हणून कशी चांगली नाही यावर  फालतू चर्चा करतात  


हा हा हा.. मला सर्वात जास्त रोचक वाटणारा प्रकार म्हणजे मिसळीसारख्या पोटभरू आणि कधीकधी चविष्ट निघणाऱ्या पदार्थाबाबत भाषिक अस्मितेपेक्षा तीव्र प्रादेशिक अस्मिता असतात. आमची मिसळ खरी अस्सल.. वाटाणा विरुद्ध मटकी, जहाल विरुद्ध मवाळ.. पापडी विरुद्ध फरसाण.. पोहे विरुद्ध बटाटा..


पाव सॅम्पलची पुढची जनरेशन आहे.

बेकरीतून मिळणारे पदार्थ  पुर्वी वर्ज्य होते. हळूहळू ब्रिटिश स्थिरस्थावर झाले व याचा  प्रसार  दोन स्तरावर  झाला. एक उच्चभ्रू जे साहेबांचे अनुकरण करण्यात  धन्यता  मानत होते. दुसरे गरीब कष्ठकरी ज्यांना ही गोष्ट  पोटभरण्यासाठी सहज व स्वस्त  होती. त्यातून 

 

चहा बटर

चहा पाव 

बन मस्का

पाव सॅम्पल 

वगैरे पदार्थ पुढे आले.

 

भारतातील  पहिली बेकरी केरळ मधे सुरू झाली. नाताळ करता केक हा प्रमुख  पदार्थ  साहेबासाठी अनिवार्य असल्याने तो तिथेच बनू लागला. मग पुढे पाव,बटर, बिस्किट, पेस्ट्रीज अशी अनेक रूपे विकसीत  झाली.  असो ही एक वेगळीच जिल्बी पडू शकते. 


In reply to by कर्नलतपस्वी

बिस्कीट हा तर वेगळाच मूर्ख पदार्थ आहे, २५ टक्के साखर ७० टक्के मैदा पाम तेल नी काय काय व्याक! 


In reply to by कर्नलतपस्वी

बिस्कीट हा तर वेगळाच मूर्ख पदार्थ आहे, २५ टक्के साखर ७० टक्के मैदा पाम तेल नी काय काय व्याक! 


अजिबात खात नाही. 

 

बिस्किट पेक्षा गोड शंकरपाळी खावी.

 

तसेही मैदा,साखर  गुळ कमीच  जवळपास खातच नाही. 

 


एकुणच मिसळपाव च्या दर्ज्याबद्दल सहमत आहे. 

वीसेक वर्षांपूर्वी मिळायची तशी मिसळ आता क्वचित मिळते. 

खेड्यात खरेच चांगली मिसळ मिळते. पुण्यात आजही  मोजक्या ठिकाणी मिळते. अधुन मधुन आवडीने खातो सुद्धा. 

नाशिक ला मिसळपाव ला जरा वाईट दिवस आले आहेत. आधीची सर्व चांगली मिसळ मिळण्याची ठिकाणे एक तर बंद झाली आहेत किंवा दर्जा खालावला आहे. 

यात मिसळपाव ची काय बी चूक नाय 🤩


हे मत मी पूर्वी इथेच कुठेतरी मांडले आहे.

हा पदार्थ स्केल होणारा आहे, बेरोजगार लोकांना तुलनेने कमी भांडवल वापरुन मिसळ आणि तत्सम दुकाने टाकता येतात, वरती आजकाल ते 'आमच्या सगळीकडे शाखा आहेत' या फ्रंचाइजिकरणाला आलेले ग्लॅमर. आणि त्यामुळे जो तो उठतो तो क्लाऊड किचन आणि तसले चाळे करत बसतो.



सगळ्या हायवेवरती ऑस्करवाडी मिसळ वगैरे अत्यंत भंगार नावांच्या शाखा दिसत असतात पस्चिम महाराष्ट्रात.

 

मिसळ, गुळाचा चहा, पावभाजी वगैरे या गोष्टी इतक्या डोक्यात जातात की विचारू नका. 

 

पावभाजी हा काय कचरा खात असतात लोक?

 

 

 


In reply to by हणमंतअण्णा शंक…

आता या लेखानंतर आणि या प्रतिसादानंतर झणझणीत, जळजळीत, इत्यादि मिसळींच्या खेरीज जलील मिसळपाव अशी एक कॅटेगरी येईल. ;-)


आमच्या ऑफिसजवळ जोगेश्वरी मिसळ नावाचा प्रकार आहे.
लोणच्याची फोड बसेल एवढी वाटी दही आणि तेवढ्याच वाटीत मटकी, 
काकडीचा एक काप, गाजराचा एक काप
नखाएवढा लिंबू, तो चिमटीत धरून पिळताना निसटून दुसऱ्याच्या टेबलावर उडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. २ पाव जास्तीचे घेऊन बिल फक्त १३० रुपडे .
चव यथातथाच.

मित्राने सांगितल्यावर घराजवळच नवीन झालेल्या मोरया मिसळ हा प्रकार अनुभवण्यास गेलो.
८० रुपयाची मिसळ आणि अमूल बटर सदृश्य लावलेले पाव मात्र अगदी पाहिजे तेवढे मोफत. 
उत्साहाने गेलो आणि एक पावतच ती पाणीदार मिसळ खाण्याची ईच्छा मेली.
काउंटरवर पैसे दिले तेव्हा त्या मालकाने मिसळ अशी शिल्लक का ठेवली हे विचारायची तसदी सुद्धा घेतली नाही.

मुंबई कराड रस्त्याला तर मिसळीची दुकाने जत्रेप्रमाणे लागली आहेत. पण एखाद्या  देखील हॉटेलात चवदार म्हणून मिसळ मिळेल तर शप्पथ.


In reply to by सतिश पाटील

आज सकाळीच जोगेश्वरी मिसळ खाल्ली! भयंकर प्रकार होता.


प्रसिद्ध नाटककार गोविन्द बल्लाळ देवल आणि कोल्हापूर मध्ये एक मिसळ वाल्याकडे जात होते 
त्याची मिसळ तीच खरी मिसळ असे म्हणतात 
त्यानंतर तशी मिसळ झाली  नाही

देंवल गेल्यानंतर त्या मिसळ वाल्याने एखाद वर्षात त्याचे हॉटेल बंद केले.  

तिकडे मिसळ खाणारे कोणीही  जिवंत राहणार नाहीत असे भाकीत एक महान ज्योतिषाने केले होते , दुर्दैवाने ते खरे झाले


In reply to by ताजे प्रेत

तिकडे मिसळ खाणारे कोणीही  जिवंत राहणार नाहीत असे भाकीत एक महान ज्योतिषाने केले होते , दुर्दैवाने ते खरे झाले

>>>>

 

अगदी अगदी. प्रत्येक हॉटेल बाबतीत हे वैश्विक सत्य आहे..


मिसळीचा हाईप करण्यामध्ये एक मोठे योगदान यूट्यूब वर बिहारी accent मध्ये shorts video बनवणाऱ्या पोरांचे आहे. 

 

आईये दोस्तों आज आपको दिखाते है महाराष्ट्र का एक फेमस खाना जो की खाने में बहुत ही मजेदार और मसालों से यूुक्त रहता है !


महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात एकाहून एक जबरदस्त रेसिपीज सापडतील. आजी लोकांच्या अनुभवातुन ऐकलेल्या ह्या पाक सिद्धींचे नीट डॉक्युमेंटशन झाले तर जबर कूक बुक होईल ती एक.


मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.
- अगदी काही अंशी सहमत; परंतु हाइप सगळ्याच लोकप्रिय पदार्थांची होते / केली जाते, त्यात मिसळीलाच सिंगल आउट करणे म्हणजे ...

मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.
- पूर्णतः असहमत; कोणताही पदार्थ करायला कौशल्य लागतेच. अर्थात ते कौशल्य सर्वांकडे असतेच असे नाही. एक ग्लास पाणी दे म्हटलं तर रेसिपी सांग असेही म्हणणारेही लोक्स् असू शकतात!

लेखात मिसळीच्या दर्जाच्या तक्रारी आहेत त्या चूक आहेत असे नाही पण त्यामुळे मिसळ औवरहाइप्ड् पदार्थ कसा होतो हे कळले नाही.


बाकी चिंचवड भाजी मार्केटात नेवाळे मिसळ मी अनेकदा चाखली आहे व ती मला आवडते. इतर अनेक ठिकाणांची मिसळ अजिबात आवडली नाही. काही ठिकाणांची आवडली. मिसळ पाव माझा आवडता पदार्थ (व आवडते पोर्टल) आहे हेवेसांन!

 


 


हाइप सगळ्याच लोकप्रिय पदार्थांची होते / केली जाते, त्यात मिसळीलाच सिंगल आउट करणे म्हणजे

 

बाडीस

असेच नको इतके हाइप केलेले पदार्थ म्हणजे

अमृतसरी छोले,

पंजाबी लस्सी,

बटर चिकन

 


एक तात्विक प्रश्न आहे. मला गुलाबजाम, बासुंदी, रबडी, फिरणी, जिलबी, इत्यादि गोड पदार्थ आवडंत नाहीत. म्हणून ते अत्युक्त ( = ओव्हरहाईप्ड ) आहेत.

 

हे कितपत बरोबर मानावं ?

 

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

मला वाटतं की प्रामुख्याने लेख आणि प्रतिसादांत आवडणे, न आवडणे यापेक्षाही मिसळीसारखा (तुलनेत) लो एफर्ट पदार्थ (याला शब्द काढा मराठी चपखल) हा त्या मानाने फारच नावाजला गेला आहे आणि अतिरिक्त प्रमाणात चर्चेत असतो किंवा मराठी अधिकृत खाद्यसंस्कृतीतला एक मुख्य आघाडीचा खास पदार्थ म्हणून मानला जातो याला लोकांचा आक्षेप आहे. तुमच्या उदाहरणात गुलाबजाम किंवा जिलबी यापेक्षा दूधपोहे किंवा गूळदाणे असे लो एफर्ट पदार्थ टाका. कदाचित काहीसे साम्य दिसेल. तळटीप: अनेकांना मिसळ हा पदार्थ बनवायला अवघड आणि व्यापाचा वाटू शकत असेल. त्याबद्दल म्हणणे नाही.


In reply to by गवि

गवि,

 

ध्येयस्तंभ बदलून प्रश्न टाकतो की इडली डोसा अत्युक्त मानावेत का? ते ही तुमच्या निकषांत मिसळीच्या जवळपास जाणारे आहेत.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

इडली हाही तुलनेत लो एफर्ट पदार्थ मानता येईल. पण मिसळीला असलेली हाईप इडलीला असल्याचे मला तरी जाणवले नाही. म्हणजे "अरे.. आमच्या मद्रास साईडची (किंवा गुंटूरची) इडली म्हणजे विचारू नका. तीच अस्सल इडली." किंवा "आमच्या इकडे इडलीत अमुक इतका उडीद आणि वरून तूप चटणी घालून देतात.. अहाहा.. काय ते खमंग कॉम्बिनेशन.. आणि "आमचे चेन्नई साईडचं सांबार तुमच्या मदुराईसारखे नुसते लालभडक तर्रीवालं नसतं बरं का. सौम्य पण चव आणि दर्जाची पूर्ण काळजी घेतात". किंवा "१९६७ पासून प्रसिद्ध मामलेदार किंवा फौजदार इडली.. अरे ती नाही खाल्लीत तर तूने क्या खाया?" वगैरे ऐकले आणि ऐकवले जात असेल तर तुमचे म्हणणे ग्राह्य धरता येईल. दाक्षिणात्य वर्तुळात असे होत असेल तर तिथे राहणारे कोणी सांगू शकेल. इडली अस्मिता आणि वाद.. ;-)


In reply to by गवि

"दावणगेरे लोणी डोसा" हा आता एक असाच उदो उदो केलेला पदार्थ झाला आहे.   

 

जाता  जाता - इडली हा इतका लो एफर्ट पदार्थ नाही.


एक तर तांदूळ आणि उडीद डाळ आदल्या दिवशी भिजत घालून वेगवेगळे वाटून मग आंबवण्यासाठी ठेवून द्यावे लागतात. मग त्याचे मिश्रण फेटून इडली पात्रात लावून वाफवून घ्यावे लागते.  याशिवाय इडली नुसती खाता येत नाही तर त्याच्याबरोबर निदान एक आणि चवीसाठी तीन पर्यंत चटण्या सुद्धा कराव्याच लागतात.   आणि नारळाची  चटणी करायची असली  तर नारळ खवून घेण्यापासून तयारी लागते.   

 त्यामुळे जर दाक्षिणात्य लोकांसारखा हा आपला रोजच्या नाश्त्याचा पदार्थ नसेल तर इडली साठी अतिरिक्त मेहनत नक्की घ्यावी लागते.     

 

 


In reply to by सुबोध खरे

बरोबर आहे. 

इडली, सांबार, डोसे किंबहूना गृहिणी जे जे पदार्थ बनवते त्यासाठी खुप कष्ट असतात. इडली वगैरे साठी तर कोणते तांदूळ असावेत त्यापासून तर आदल्या दिवशीच तयारी करावी लागते. वाटण घाटण असते.

थालिपिठही काही सोपे नाही.

माझा मुख्य आक्षेप मिसळ अतिशय सोप्या पद्धतीने तयार केली जाऊ शकते. त्यातील बहूतेक पदार्थ आयते तसेच कमी दर्जाचे असले तरी फरक पडत नाही. 

कशीही करा, बहूदा चव जमूनच जाते. न जमली तर माझी मिसळ कशी निराळी असे होते.

अन मुख्य म्हणजे बहुतेक हॉटेलातले, टपर्यांवरचे कारागीर हे भैये लोकं झालेत. माझा त्यामुळेही संताप होतो.

 


In reply to by पाषाणभेद

अन मुख्य म्हणजे बहुतेक हॉटेलातले, टपर्यांवरचे कारागीर हे भैये लोकं झालेत. माझा त्यामुळेही संताप होतो.

 

तुम्हाला चवीशी घेणेदेणे आहे का विक्रेत्याच्या आधारकार्ड सोबत ? रामखिलावन मिश्रा उत्तम इडली बनवू शकणार नाही असे काही लिखित नाही विधीचे/ विधात्याचे/ माणसाच्या कायद्याचे ! तसेच श्रीमुरुगन वेत्रीवेल उत्तम चाट पण बनवू शकेल ! तुमचा आक्षेप जर "जाधव/ कुलकर्णी कचोरी सेंटर" का नाहीत ? असे असतील तर चितळे बंधू जिंदाबाद म्हणून खाली बसतो बापडा !


In reply to by कपिलमुनी

काय हो हे मुनिवर्य? 

 

बादवे.. 

 

अजून ९९७ वेळा केल्यास सहस्रावर्तन होईल सूर्याच्या नामजपाचे. 😜

 

ह घ्या हे वे सां न ल 


In reply to by गवि

लो एफर्ट = सुलभ ( साला हा शब्द इतका बदनाम झालाय की तो मिसळीचा परिणाम वाटतो) , सहज , सोपा 

हे मराठी वर्ड्स  युज करायला   कसलेही  ऑब्जेक्षन  इझिली डिनाय होऊ शकेल.


In reply to by विजुभाऊ

सुलभ ( साला हा शब्द इतका बदनाम झालाय की तो मिसळीचा परिणाम वाटतो)

 

 

ठ्ठो... 

 

 


In reply to by गवि

पुणे तिथे काय उणे ? तर आता नवीन  'सुलभ मिसळपावालय' सुरु करा रे कुणीतरी. 

मंजे क्यूआर स्क्यान केला की समोर मशिनीतून टप्पदिशी 'सुलभ मिसळपाव' चे प्याकिंग येऊण  पडेल, असे काहीतरी.


In reply to by विजुभाऊ

सुलभ ( साला हा शब्द इतका बदनाम झालाय की तो मिसळीचा परिणाम वाटतो) 

 

एक नंबर !!!


In reply to by गवि

बरोबर आहे. 

मेहनतीच्या मानाने तिला उगीचच जास्त प्रसिद्धी मिळाली. 


मिसळपाव मराठी लोकांशिवाय इतर कुणी खात नाही.  माझ्या आठवणीप्रमाणे सिंधी कँपात {मुगाची} उसळ पावात घालून खायची पद्धत होती ती अजूनही आहे. 


मी पुण्यातलाच पण पत्नी दिल्लीची आहे.  २०१२ नंतर आता ती इथे पुण्यात आली.  तिने मिसळ हा पदार्थ पाहिला, खाल्ला आणि तिला आवडला.  मग घरात कधी मटकीची उसळ केली तर त्यावर कांदा, टमाटे, कोथिंबीर कापून त्यावर लिंबू पिळून आणि फरसाण टाकून त्याची मिसळ बनवू लागली.  हेच सोपस्कार तिने मुगाच्या आणि वाटाण्याच्या उसळीसोबत देखील केले आणि या उसळींचीही मिसळ बनवून खाल्ली.  आमच्या सासूबाई देखील काही काळ आमच्या सोबत इथे राहिल्या होत्या आणि त्यांनी हे पाहिले.  मग एकदा त्यांनी काबुली  चण्याची उसळ केली असता त्यावरही असेच उपचार केले.  ते पाहून माझी पत्नी नाराज झाली.  

मूग, मटकी किंवा वाटाणा यांचीच फक्त मिसळ बनवायची असते.  काबूली चण्यांची नाही असे तिने सांगितले.  पण त्यावेळी मी मध्यस्थी करीत सासूबाईंचे लॉजिक अगदीच चूकीचे नाही हे सांगितले.  कारण मूग मटकी आणि वाटाणा या खाद्यान्न वर्गातच काबूली चणे देखील समाविष्ट होतात आणि त्यामुळे त्यांना काबूली चण्यांच्या उसळीचीही मिसळ बनवावी असे वाटणे स्वाभाविक आहे.  


In reply to by चेतन सुभाष गुगळे

आमच्या सासूबाई देखील काही काळ आमच्या सोबत इथे राहिल्या होत्या आणि त्यांनी हे पाहिले.  मग एकदा त्यांनी काबुली  चण्याची उसळ केली असता त्यावरही असेच उपचार केले.  ते पाहून माझी पत्नी नाराज झाली.  

-- हे वाचून प्रश्न पडला आहे की 'आमच्या सासूबाई' म्हणजे नेमकी कुणाचे सासू ? तुमची की तुमचा सौं.ची ?

सौं. ची असेल तर मग स्वाभाविकच आहे असले भलते सलते चाळे न खपणे. 

ह.घ्या.


प्रचंड मेहनत करुन रचलेली मुगल ए आझम सारख्या चित्रपटातली गाणी लोकप्रिय होणे आणि

मामींची सुंदर मुलगी, संजू राठोड, ढींच्याक पूजा, सोनुचा विश्वास नसणे टाईप गाणी लोकप्रिय होणे 

यात फरक आहे.  पहिल्या प्रकारच्या गाण्याच्या चाहत्यांना दुसऱ्या प्रकारच्या गाण्यांच्या लोकप्रियतेचा राग येणे सारखीच गोष्ट म्हणजे हा धागा आणि त्याचे सार आहे.  

https://www.youtube.com/watch?v=4KdKHgGvv8U&pp=ygUdbWFtaSB0dW1jaGkgbXVs…


In reply to by साहना

बहुतेक मराठी पदार्थ हे overhyped आहेत ! 

 'बहुतेक' म्हणजे नेमके कोणकोणते बरे ?
 


In reply to by चित्रगुप्त

बहुतेक overhyped पदार्थ : 
- मिसळ 
- पोहे 
- वडा पाव 
- झुणका भाकर 
- वरण भात 
- तथाकथिक सोलकढी 
- कोथिंबीर वडी 
- थालीपीठ 
- आमटी 
- मसाले भात  
- ठेचा (गरिबीचे अन्न ) 
- पिठले 
- बोंबील फ्राय 
- तांबडा रस्सा 
- पांढरा रस्सा 
- करंजी 
- मोदक 
- उकडीचे मोदक 
-

सध्या खाणावळींत मिळणारे बहुतेक पदार्थ हे अत्यंत सुमार दर्जाचे, सुमार दर्जाचे पदार्थ घालून बनविलेला carb-स्लोप असतो.


Contemptible (तिटकाऱ्यास योग्य) 
- साखरभात 
- साबुदाणा खिचडी 
- पुरणाचे डिंग


थोडा आदर शक्य आहे ह्या कॅटेगरीत पदार्थ : 
- भरली वांगी आणि वांग्याचे भरीत  
- श्रीखंड 
- अनारसे 
- खान्देशी खिचडी 
- आगरी समाजाची पोपटी 
- पूर्णपोळी 
- डिंकाचे लाडू

आदरास प्राप्त 
-  आळुवडी 
- खरवस 
- केळफुलाची भाजी 
- खारे बांगडे ची कढी ( त्रिफळ घालून) 
- भरलेली कारली (आंत prawns घातलेली)

हे मत वैयक्तिक आणि विनोदबुद्धीचे असून कुणाचेही मन दुखविण्याचा उद्देश नाही.  

 

 

 


In reply to by अनिरुद्ध.वैद्य

लिहिले आहे की,

आता मराठी म्हणता आहात तर कोणते हे विचार करतोय.

कोकणस्थ आणि गोयंकार ह्यांचे सर्व वगळून उर्वरित मराठी अन्न छान असते..


In reply to by साहना

एकंदरीत मराठी पदार्थ खावेत का नाही ? हे जाहीर करून टाका एकदाचे म्हणजे सगळ्यांचा जीव (तरी) भांड्यात पडेल (वाणसमान पडले नाही तरी)


ओव्हरहाईप ह्या शब्दाचाच इतका overhype झाला आहे का आज तात्विक निषेधार्ह थालीपीठ, मिसळ, करंजी, लाडू, मराठी पदार्थ, दक्षिणात्य पदार्थ सगळेच एकदम शिजवून खात खात आंदोलन करायची ईच्छा होते आहे पण मॅगी आणि अंडी उकडणे ह्याच्यापुढे मजल जात नसल्यामुळे गप पडतो ! सगळेच ओवर हाइप असेल तर मर्त्य मानवाने खावे काय आणि उदराग्नी/ क्षुधा इत्यादी शांत कशी करावी ?


खरंच मिसळ हा ओव्हरहाईप्ड आहे ... आणि भेसळ हेही खरेच आहे. 

तयार करायला अतिशय सोपा म्हणुन ग्राहकांच्या माथी मारलाय हाटेलवाल्यांनी 

 

दर्जाची तर गोष्ट करायलाच नको, 

 

सोलापुर रोडला गेलं आणि हडपसर पार केलं की पोहे सुद्धा मिळत  नाहीत ,.... सगळी कडे शिवनेरी मिसळपाव  वैताग येतो साला. 

पुणे आनी पिंचिवाडीमध्ये पण जोगेश्वरी मिसळने  प्रचंड प्रदुषण करून ठेवलंय ..

 

कधीतरीच ठिक आहे.