राजस्थान ट्रिप भाग - २
राजस्थान ट्रिप भाग १ इथे पाहु शकता : https://www.misalpav.com/tourism/53598
डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आम्ही दिल्ली एअरपोर्टवर पहाटे ५ वाजता पोहचलो. फ्रेश होऊन कॅब ज्यांची होती त्या प्रदीप भाईंना फोन केला , त्यांनी आमच्या बरोबर येणाऱ्या ड्राइव्हरचा फोन नंबर शेअर केला होता. त्यांनाही फोन केला. त्यांनी १५ मिनिटात पोहचतो असे सांगितले आणि पोहचलेसुद्धा. बॅगा कॅरीअरवर चढवून आम्ही वृंदावनला निघालो. जाताना आमच्या गुडगावच्या मेंबरला घेतले. तिने खाण्याचे पदार्थ, साखर, पावडर, कॉफी, मॅगी , शॅंपू, साबण असे सामान आणले होते. ते डिकीत चढवले . यमुना एक्सप्रेस वे वरून आम्ही वृंदावनला निघालो.
डिसेंबरमध्ये दिल्ली भागात प्रचंड धुके असते. खरेतर रात्रभर जागुन प्रचंड झोप आली होती तरीही समोरची धुके पाहुन गाळण उडाली. वेग अत्यंत कमी होता. मधुनच कोठे ट्रक आडवा येतोय, गाडी येतीय, अगदी समोर आली आणि ड्रायव्हर ने ब्रेक मारल्यावर काही समोर आहे याचा पत्ता लागायचा. अजूनच घाबरायला होत होते. सकाळी ९-९ः३० वाजले तरी धुके होतेच. ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर मात्र भितीचा लवलेश नव्हता. हिटर लावुन ते निवांत गाडी चालवत होते.
१०ः३० च्या दरम्यान आम्ही वृंदावनात पोहचलो. प्रचंड थंडी, स्वेटर, शाल , कानटोपी , शुज, मोजे घालुन बसलेले तरीही थंडी वाजतच होती. ब्रजनिवास या हॅाटेल ला आम्ही फोन केला, फक्त फ्रेश व्हायचे होते, सातमधल्या दोन जणांनी फक्त अंघोळ केली कारण पाणी गरम होत नव्हते. वृंदावन मथुरा येतील सर्व मंदिरे सकाळी ८-९ वाजता चालु होवून दुपारी बारा/एक वाजता बंद होतात. दुपारी ४ वाजता पुन्हा उघडून रात्री ८-९ ला बंद होतात. आम्ही फक्त बाके बिहारी मंदीर आणि निधी वन पाहणार होतो. दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग असते. लोक मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर जी प्रसाद, फुलं वैगेरे साठी जी दुकान होती त्यांच्याकडे चप्पल, शूज ठेवतात. अतिशय अरुंद गल्ल्या , त्यामुळे गाडी आपल्याला कोठेतरी लांब अंतरावर सोडते. तिथुन पुढे ई- रिक्षा आपल्याला मंदिराच्या जवळच्या गल्लीत सोडतात. सातही जणांना एका रिक्षात कोंबून आम्ही जवळपास च्या गल्लीत पोहचलो . २०० रुपये घेतले. तिथुन पुढे लोक पळत आहेत तिकडे पळायचे. वृंदावनात माकडे चष्मा, गॉगल पळवतात त्यामुळे तो गाडीतच ठेवुन जायचा पण मुलं ऐकत नसतात. आम्ही पर्स मध्ये ठेवतो म्हणुन घेतलाच. कानात वारे भरते त्यांच्या, त्यामुळे आपण काही सांगितले तरी ते ऐकत नसतात.
प्रचंड गर्दी , उघडी गटारे, खच्च भरलेले रस्ते. फुल प्रसादाची दुकाने, मुंग्यासारखी माणसं…
जय कन्हैया लाल की , हाथी घोडा पालखी .
राधे राधे , राधे राधे..ने सर्व परिसर नुसता दुमदुमत असतो . जयघोष सुरु असतो . भक्त टाळ्या वाजवत असतात. भजन म्हणत असतात.
बाके बिहारी मंदिराच्या दर्शन रांगेत आम्ही उभे राहयलो. अंतराळीच मंदिरात पोहचलो. गर्भग्रुहाचा पडदा उघडत होता . झाकत होता. फुलांची परडी , हार देण्यासाठी देणगी मागत होते नाहीतर तो हार त्या हारांच्या ढिगाऱ्यात फेकायचे आणि अंतराळीच दुसरीकडे कोठेतरी बाहेर पडायचे . परत चप्पल, शूज मिळवण्यासाठी गल्ली शोधायची, मग आपल्या चपला बुटे त्या ढिगातुन शोधायचे. नशीब असेल तर दोन्ही वेळेवर मिळतात अन्यथा दुसरी चप्पल बुट शोधायला अर्धा तास पक्का.
मागे एकदा आम्ही आणि आमची मुलगी असे आम्ही वृंदावन ला गेलो होतो. २-३ तास रांगेत उभे राहिल्यावर माझी मुलगी मी आता रांगेत थांबणार नाही म्हणाली. प्रचंड पाय दुखत होते पण तिला तसेच समजावून सांगत होते तोवर एक मोठा सांड गर्दीत घुसला. लोक त्याची शेपटी पिरगाळत होते. उधळला तर काय होईल? 40-50 तरी नक्की मरतील अशी परिस्थिती होती पण लोक तरीही त्याला चुचकारत होते. मग मात्र माझी मुलगी रांग सोडुन मागे जायला लागली. सर्व लोक आम्हाला दर्शन न घेता चाललो म्हणुन काहीही बोलत होते. शेवटी आम्ही त्या दिवशी दर्शन घेतले नाही. मथुरा आग्रा पाहुन तिसऱ्या दिवशी सकाळी मी एकटीने दर्शन घेतले.
असो , हे अवांतर सांगितले आणि त्याला कारण पणतसेच आहे. यावेळी मुलीने दर्शन रांगेत उभा राहण्यास किरकिर केली नाही. कारण मुलीच्या ॲाफिसमधले तिला म्हणाले होते,
“बाके बिहारी का बुलावा आता है, ऐसेही नही जाता कोई वृंदावन”
बाके बिहारी दर्शन करुन आम्ही निधी वनात गेलो. भगवान कृष्ण तिथे रासलीला रचतात. रात्री तिथे कोणीही जात नाही नाहीतर आंधळे होतं अशी आख्यायिका आहे. पुर्ण जाळीने पॅक केलेल्या तुळशीच्या वनातून आमचे एक एक पाऊल पुढे पडत होते. भजन म्हणत होते, फुलांच्या परड्या सावरत त्यातुन मार्ग काढत होते.
राधे राधे राधे राधे
परिसर नुसता दुमदुमून गेला होता. त्यातही जाळीवरुन माकडे उड्या मारत होती. एका छोट्याशा मंदिरात कृष्णाची सेज रात्री सजवतात आणि सकाळी ती अस्ताव्यस्त होत असते अशीही आख्यायिका आहे.
लोक राधाराणीला साज शृंगार पेटी चढवत होते, बांगड्या, कुंकु पावडर, अत्तर, साडी असे त्या पेटीत असते, काही लोक दक्षिणा देतात.
माझी मुलगी गर्दीतुन वाट काढत तिच्या चुलत बहिणीला घेवुन वाट काढत पुढे जात जिथे थोडी रिकामी जागा आहे तिथे जाळीला पाट टेकून उभी राहिली. त्या जाळीजवळ येऊन माकडाने तिचा चष्मा एवढ्या छोट्या जाळीतुन ओढला , लोकांनी जवळचे लाडू, प्रसाद दिले त्या जाळीतुनच पण माकडाने लाडू खाल्ले पण चष्मा काही दिला नाही. तिने ५ हजार खर्चून तो लेन्सकार्ट मधुन दोनच दिवसांपूर्वीच घेतला होता. मी तिच्यावर चष्मा का घातलास म्हणून आणि ती माझ्यावर तु ह्या निधी वनात कशाला घेवुन आलीस म्हणुन करवादत होती.
सगळा मुड गेलेला, भुक लागलेली. आम्ही गुगलवर रेटिंग पाहुन एक हॅाटेल निवडले. रिक्षा वाल्यांना तिथे पोहोचायला सांगत होतो पण कोणालाही ते कोठे आहे माहीत नव्हते. शेवटी एक रिक्षावाला म्हणाला, “कहासे ढुंढा है, ब्रजवासी में जाओ!”
आम्ही तिथे गेलो, जेवण खुप छान होते. सेल्फ सर्व्हीस आहे. जेवुन बाहेर येवुन आमच्या गाडीची वाट पाहत होतो तोवर तिथे आलेल्या अजुन एकाचा चष्मा (आमच्यापैकी नाही )माकडाने पळवला. मुलीने परत मला वृंदावनात आल्याबद्दल सुनावले.
नंतर आम्ही मथुरेला गेलो , कृष्णजन्मभुमी पाहिली, माझी मुलगी तिथेही आत आली नाही. रात्री आम्ही आग्र्यात मुक्कामी पोहचलो. तिथले गोयल पॅलेस नावाचे हॅाटेल आम्ही बुक केले होते. प्रचंड थंडीमुळे सर्व ठिकाणी छोट्या छोट्या कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या होत्या. आमची रुम तिसऱ्या मजल्यावर होती, लिफ्ट नव्हती, बॅग वर चढवायला कोणीही हेल्पर नव्हता. हॅाटेल बुक करताना तो माणूस प्रचंड गोड बोलत होता. ऐनवेळी हॅाटेल चेंज करणे शक्य नव्हते. कारण त्यावेळी पीक सिजन असल्याने दर अतिशय महाग होते आणि बुकिंग फुल होते.गरम पाणी सकाळीच मिळणार होते, एक्सटेंशन फोन चालत नव्हते. अतिशय थंड पाण्याने फ्रेश झालो. जेवायला त्यांच्याच दुसऱ्या जवळच्या हॉटेल मध्ये गेलो. अतिशय घाणेरडे जेवण.. जाता जात नव्हते.
सकाळी अंघोळ करुन आम्ही बॅगा कॅरीअर वर चढवल्या. रस्त्यात देवीराम स्विटस् मध्ये आम्ही बेडई पुरी , जिलबीवर ताव मारला. सकाळी सकाळी प्रचंड गर्दी होती.चव अप्रतिम होती. नाश्ता करुन आम्ही ताजमहाल पाहायला गेलो.
गाडी पार्किंग पासून पुढे १ ते १.५ किलोमीटर चालत जावे लागते. तिथे असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्ट मधुन ताजमहालला पोहोचलो. गाडी पार्क करेपर्यंत हजार लोकं विचारायला येतात, गाईड आणि गाडी साठी पण तिथुन सरळ पुढे गेल्यावर सरकारी कार्ट असतात, त्यांचा रेटही २० रुपये पर पर्सन असतो. आरामात पोहचलो. तिकीट ॲानलाईन काढले होते. प्रचंड गर्दी,आत जाण्यासाठी भरपूर गेटस्, चेकिंग. पाणी नेता येत पण खाण्यासाठी काहीही नेता येत नाही. कडक चेकि्ग करतात. आत गेलो पण ताजमहाल धुक्यात हरवला होता. इतकी गर्दी असुनही आत आल्यावर ती गर्दी ताजमहालात सामावली आणि तरीही भरपूर रिकामी जागा होती इतका मोठा परिसर आहे. शू कवर घालून आपल्याला मुख्य इमारती मध्ये प्रवेश मिळतो. वर जाण्याचे वेगळे तिकीट आहे, आत ताजमहाल , म्युझियम आणि मशिद आहे , सुंदर बाग आहे. ऊन अजिबात नव्हते, सकाळच्या वेळी ताजमहाल अतिशय सुंदर दिसतो. तो एक अनुभव आहे.
ताजमहाल पाहुन आम्ही आग्रा फोर्ट पाहिला, शिवाजी महाराजांचा पुतळा आग्र्याच्या फोर्ट समोर आहे. मन भरून येते तो पुतळा पाहुन. इथे गाईड आवर्जून घ्यावा , छान माहिती सांगतात, छान फोटो काढतात.
फोर्ट पाहुन आम्ही जयपूर ला निघालो. रात्री ९.३० च्या दरम्यान आम्ही जयपूरला पोहचलो.
इथुन पुढे राजस्थान ट्रिप चालु.. त्याविषयी तिसऱ्या भागात…
सीझनला का जावू नये हे लक्षात ठेवणे.
आम्ही सप्टेंबरमध्ये जातो. श्रावणातला पाऊस होऊन गेला की राजस्थान सुखावतो. निसर्ग खुलतो. गर्दी नसते. इकडे महाराष्ट्रात गणपती असतात त्यामुळे शाळेला दांड्या मारल्या तरी चालतात. तिकडे राजस्थानातही कोटा, जयपूर ठिकाणीही सार्वजनिक गणेशोत्सव असतो. बाजारात मूर्ती असतात. छान वातावरण असते. कोट्यात राजवाड्यात अनंत चतुर्दशी मुख्य उत्सव असतो. सार्वजनिक सुट्टी असते.
In reply to सीझनला का जावू नये हे लक्षात ठेवणे. by कंजूस
यावर्षी सप्टेंबरात तोच प्लान…
यावर्षी सप्टेंबरात तोच प्लान केलेला आहे. जोधपुर आणि जैसलमेर.
धन्यवाद!
खरयं, सिझनला जावू नये.
मस्त सुरुवात.
मस्त सुरुवात.