Skip to main content

राजस्थान ट्रिप - तयारी, भाग १

लेखक जेडी यांनी मंगळवार, 14/04/2026 18:51 या दिवशी प्रकाशित केले.

राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची तिकीट काढून ती काही कारणाने रद्द करावी लागली होती. म्हणून यावेळी विमानाने प्रवास करायचा ठरला. डिसेंबरमध्ये जाण्यासाठी चांगली वेळ असते, असे गुगलने सांगितले होते, त्यामुळे डिसेंबर मध्ये जायचे ठरले. त्यासाठी अगदी चार महिने आधीपासून तयारी सुरू झाली.
आम्ही सात जण जाणार होतो. पैकी सहा जण पुण्यातून आणि एक जण गुडगावमध्ये जॉईन करणार होते. आम्ही सप्टेंबरमध्येच जाण्याची 'एअर इंडिया' आणि परतीची इंडिगोची विमान तिकीट बुक केली. “हे पाहू, ते पण पाहू” करत करत अखेर १४ दिवसांची ट्रिप ठरली. “परत कधी येणार आहे, आताच पाहू” असे म्हणत आम्ही हा भारी-भक्कम प्लॅन आखला.
नुसती तीन महिने आधी तिकीट बुक करून आम्ही खुश होतो, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा हॉटेल बुक करायला लागलो, तेव्हा हॉटेल्सचे दर तिप्पट वाढलेले दिसले. जवळपास दोन महिने हॉटेल्स, Airbnb शोधणे, काय पाहायचे त्याची यादी करणे सुरू होते.
आमचे दादा-वहिनी परत इकडे येतील याची शक्यता खूप कमी असल्यामुळे ताजमहाल पाहायचे ठरवले. तीनदा दिल्लीला जाऊनही संसद भवन पाहायचे राहून गेले होते, म्हणून तेही कव्हर करायचे होते. कोण तिकडे फिरायला गेले आहे, काय चांगले आहे यावर ऑफिसमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा झाल्या. भरपूर व्हिडिओ पाहिले.
“एअर इंडिया चे तिकीट कशाला काढलेस?” म्हणून मला प्रत्येकाने सुनावले, पण नंतर इंडिगोचा गोंधळ पाहून मी स्वतःला नशीबवान समजले.
जातेवेळीची फ्लाइट सकाळी साडेसहाला होती आणि साडेआठला पोहोचणार होती. दिवसभर आम्ही दिल्लीमध्ये जे पाहता येईल ते पाहून दुसऱ्या दिवशी आग्र्याला मुक्कामाला जाणार होतो. पण अचानक एअर इंडियाकडून फ्लाइट कॅन्सल झाल्याचा मेसेज आला. त्यांनी दोन ऑप्शन दिले – रि- शेड्यूल करा नाहीतर रिफंड घ्या. आम्ही आधीच हॉटेल बुक केली होती, त्यामुळे दिलेल्या दोन ऑप्शनपैकी एक आम्ही रीश्येडूलचा पर्याय निवडला.आमच्या पैकी दोन जण पहिल्यांदाच विमानप्रवास करणार होते, त्यामुळे त्यांना विमानातून खाली शहर दिसावे म्हणून तीन विंडो सीट मिळतील अशा पद्धतीने सहा सीट बुक केल्या, होत्या. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजले होते पण फ्लाइट कॅन्सल झाल्यावर दुसरी निवड करताना सीटबद्दल विचारायचे आम्ही पूर्णपणे विसरलो.
जेव्हा बोर्डिंग पास हातात आले, तेव्हा शेवटच्या ओळीतल्या सहा सीट आम्हाला मिळाल्या होत्या. त्यात विंडो शेजारी बसलेल्यांना नुसता विमानाचा पत्राच दिसत होता. आम्ही सगळे एकाच ओळीत बसलो होतो. रात्रीची वेळ असल्याने सगळे विमानात झोपले. दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यावर मात्र थंडीत अक्षरशः गारठून गेलो.
आधीच्या वेळेनुसार आम्ही दिल्लीला पोहोचून संसद भवन, इंडिया गेट पाहून रात्री आग्र्याला जाणार होतो. पण वेळ बदलल्यामुळे “दिल्लीला पोहोचल्यानंतर काय करायचे ते तिथे ठरवू” असे ठरवले आणि थेट वृंदावनला जायला निघालो. दादा-वहिनींना वृंदावनातील बांके बिहारी आणि मथुरेतील कृष्ण जन्मभूमी पाहायचे होते, म्हणून त्याप्रमाणे जायचे ठरवले.
पूर्ण पंधरा दिवसांत रोज काय पाहायचे, एका दिवसात किती स्थळे पाहायची, सगळे नाही जमले तर काय सोडायचे—याचे पूर्ण नियोजन केले होते. त्यासाठी गुगल शीटवर तारखेनुसार आणि वेळेनुसार स्थळे, हॉटेल्स, प्रवासाची वेळ अशी सगळी माहिती भरली होती.
हॉटेल बुक करणे हे एक दिव्यच होते. रेटिंग, बजेट, रिव्ह्यू, तारखा जुळवणे—सगळेच कठीण होते. प्रत्येक ठिकाणी फोन करून विचारायचो की सात लोकांना दोन रूम मिळतील का, आम्ही निवांत झोपू शकू का, आणि २४ तास गरम पाणी मिळेल का. बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स तीन रूम घ्या असे सांगत होते, पण त्यामुळे बजेट खूप वाढणार होते. पुन्हा फोन, पुन्हा तेच प्रश्न—असेच जवळपास दोन महिने चालले.
शेवटी आम्ही तीन ठिकाणी होम स्टे, तीन ठिकाणी हॉटेल आणि वाळवंटात सॅंड ड्युन कॅम्प बुक केला.

ठिकाण हॉटेल / होम स्टे कालावधी आमची रेटिंग
ब्रज निवास हॉटेल (फक्त फ्रेश होण्यासाठी) २ तास ⭐⭐⭐
आग्रा गोयल पॅलेस १ दिवस ⭐
जयपूर लीला होम स्टे ३ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
उदयपूर घराना Airbnb २ दिवस ⭐⭐⭐
जोधपूर हॉटेल स्टार इन २ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज २ दिवस ⭐⭐⭐
सॅंड ड्युन प्रिन्स डेजर्ट कॅम्प १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज १ दिवस ⭐⭐⭐
दिल्ली होम स्टे, ग्रेटर कैलाश १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
आणखी बरीच तयारी केली—उबदार कपडे, खाण्याचे पदार्थ, बॅगांचे वजन, किती बॅगा घ्यायच्या, औषधे इत्यादी.
सर्वात महत्त्वाची तयारी होती ती दिल्लीपासून परत दिल्लीला येईपर्यंत फिरण्यासाठी कॅबची. आम्ही इनोव्हा क्रिस्टा बुक केली. जरी आम्ही सात जण असलो, तरी त्यात १२ वर्षांवरील दोन मुले होती, त्यामुळे कॅरियर असलेली कॅबच घेतली. ही कॅब आम्ही गुगलवर शोधली होती आणि त्यांनी खरंच अफलातून सर्व्हिस दिली. कोणी विचारले तर मी नक्की डिटेल्स देईन.
सर्वात महत्त्वाची तयारी बॅगांची होती. त्या कॅरियरवर मावतील अशाच घ्यायच्या होत्या आणि फक्त चारच बॅगा घ्यायच्या ठरवल्या. त्यात एक तीन-बॅगांचा सेट आणि एक मिडियम साईज बॅग घेतली.
बरंचसं खाण्याचं सामान, मास्क, मेकअप साहित्य, मॅगी, चहा, साखर इत्यादी आमच्या गुडगावच्या मेंबरने आणले.

पुढील सर्व ट्रिपचे रोमहर्षक अनुभव घेण्यासाठी आणि राजस्थान का पहायचे होते हे वाचण्यासाठी भेटूया पुढच्या भागात...


वाचने 272
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तीन सहली राजस्थानात झाल्या तरीही तीस टक्केच राजस्थान पाहिले आहे. अर्थात हे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हल्ली यूट्यूबवर चांगले विडिओ येतात. उदाहरणार्थ Agam explorer आणि Suroj Palmal आवडते लोक.