मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....

नागनिका · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे. या प्रकरणातील व्यक्ती नरमांस भक्षण करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे भयानक कृत्य का केले गेले असेल हा प्रश्न राहून राहून सतत मनात येतो. असे करून यातील दोषी व्यक्तींना कोणते सुख मिळाले? खाणे, पिणे आणि शरीरसुख उपभोगणे हेच मानवी सुखाचे टोक आहे का? अशा घटनांमुळे पाश्चात्यांच्या भोगवादाची परिसीमा लक्षात येते. आणि मनुष्याच्या शाश्वत सुखाची संकल्पना मांडणाऱ्या भारतवर्षामध्ये आपण जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो ! पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. याउलट भारतीय तत्वचिंतनामध्ये सुख ही संकल्पना केवळ भौतिक किंवा इंद्रियजन्य आनंदापेक्षा आत्मानंदाचा विचार करते. यामध्ये सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि शाश्वत पातळीवर केला गेला आहे. इंद्रिय सुखापेक्षा आत्मिक सुखावर भारतीय तत्वज्ञान भर देते. आत्मिक सुख म्हणजे आत्मस्वरूपाच्या अनुभूतीतून प्राप्त होणारे सुख. उपनिषदांमध्ये आत्मा हा नित्य, शुद्ध आणि आनंदस्वरूप मानला आहे. जेव्हा मनुष्य देह, मन आणि बुद्धी यांपलीकडे जाऊन आत्मस्वरूपाची ओळख करून घेतो, तेव्हा त्याला आत्मिक सुखाची अनुभूती येते. ‘कोहम्’ (मी कोण आहे?) पासून सुरु झालेला प्रवास ‘सोहम्’ (मी परमात्मा आहे) पाशी येऊन थांबतो. हा प्रवास बाह्य जगातून अंतर्जगाकडे नेणारा आहे. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुखाची एकेक पातळी मनुष्य गाठत जातो. या सुखाची अनुभूती इंद्रियांनी अनुभवता येत नाही; ती अंतःकरणाच्या शुद्ध अवस्थेत प्रकट होते भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.. “सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्।” म्हणजे मनुष्याचे जे परमसुख आहे ते बुद्धीने जाणता येते, ते इंद्रियांपलीकडचे आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोगाचे सोपान चढून या सुखासनावर मनुष्य बसू शकतो. कठोपनिषद सांगते — “श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः।” (मनुष्यापुढे श्रेयस आणि प्रेयस असे दोन मार्ग असतात.) प्रेयस म्हणजे इंद्रियसुख; श्रेयस म्हणजे आत्मिक कल्याण व आनंद. आत्मिक सुख हे श्रेयस मार्गाने मिळते. वेदांनुसार अज्ञान हे दुःखाचे मूळ आहे, आणि ज्ञान म्हणजे आत्मिक सुखाचा स्रोत. श्रेयस मार्ग खडतर असला तरी हा मार्ग माणसाला आत्मज्ञानी बनवतो. प्रेयसातच अडकून राहणारे अंतिमतः भोगवादीच बनतात. ईशावास्य उपनिषद म्हणते विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥ (जो विद्या व अविद्या दोन्ही जाणतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो. अविद्येने तो मृत्यूवर विजय प्राप्त करतो तर विद्येने मोक्षपदास जातो.) येथे अविद्या म्हणजे जीवन व्यवहारासाठी लागणारे भौतिक ज्ञान आणि विद्या म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे आत्मज्ञान. कसे जगायचे याचे उत्तर अविद्या देते. का जगायचे याचे उत्तर विद्या देते. याचा समतोल ज्याला राखता आला त्याला शारीर मर्यादा राहत नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्षादि चार पुरुषार्थांची संकल्पना भोग नाकारत नाहीत तर धर्माच्या चौकटीत राहून मोक्ष पदापर्यंत पोहोचवतात. भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते . आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात भारतीय तत्वचिंतन अधिकच अर्थपूर्ण ठरते. पाश्चात्य भोगवादाच्या तुलनेत भारतीय त्यागवाद नक्कीच सरस ठरतो. म्हणूनच माणसातील माणूसपण विसरून त्याला परब्रह्मपदावर नेऊन ठेवणारे भारतीय तत्वज्ञान संपूर्ण विश्वास अनुकरणीय आहे! स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन !

वाचने 5022 वाचनखूण प्रतिक्रिया 74

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 13:06
उत्तम आणि समयोचित (एपस्टीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर) लेख!
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात.
_/!\_ - ('कोहम्'चा प्रवासी) सोकाजी

हा अत्यंत चुकीचा दावा आहे. बहुतेक भारतीयांना अलीकडे असे वाटत आहे की पाश्चात त्यांनी फक्त मटेरियल गोष्टींमध्ये आनंद शोधला आहे परंतु हे एका विवक्षित न्यूनगंडातून मांडले जाणारे अत्यंत उथळ असत्य. युरोपात अनेक ठिकाणी जुन्या मॉनेस्टरीज आहेत जिथे ऐहिक सुखांचा पूर्ण त्याग करून लोक अध्यात्म साधना करतात. पाश्चा त्यांनी एक प्रश्न सोडवले का तर सोडवले आणि त्यातून त्यांना आज उत्तम जीवनशैली मिळालेली आहे. एखाद्या खेडेगावात राहणारे युरोपियन कुटुंब आणि भारतात अगदी मोठ्या शहरात देखील राहणारे भारतीय कुटुंब यांच्यामध्ये युरोपियन कुटुंब हे जास्त सुखी आणि समाधानी आहे. शिवाय युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे. ला ग्रांडे बेलेजझा हा सोरिंतीनोचा चित्रपट पहा. त्यामधली नन म्हणते की मी दारिद्र्याचे व्रत घेतले आहे. एक फार सुंदर प्रसंग या चित्रपटात आहे. एका धन दांडग्या माणसाच्या घरात ही नन मुक्कामाला थांबलेली असते मात्र सुख सुखासीन बेडवरती न झोपता ती तिच्या सवयीने खाली फरशीवरच झोपते. पहाटे बाहेर बाल्कनीत येते तेव्हा तिथे बाल्कनीत अनेक फ्लेमिंगो उतरलेले असतात. काल झालेल्या रात्री झालेल्या अत्यंत lavish डिनर मध्ये उरलेले अन्नपदार्थ हे फ्लेमिंगो खात असतात. आणि ही नन एक हळुवार फुंकर घालते आणि हे फ्लेमिंगो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. ॲनी बेझंट त्यांनी भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली असे आम्ही शाळेत वाचले होते. यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही धर्मांच्या शिकवणुकीचा तौलनिक अभ्यास करणारी माणसे असावेत. पाश्चात्य तत्त्वज्ञ लोकांमध्ये तुम्ही म्हणता तशी मांडणी अजिबात दिसत नाही त्यामुळे तुमचे आकलन उथळ आहे एवढेच नमूद करू इच्छितो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 13:55
युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे.
जस्ट फॉर क्युरियोसिटी, कोणकोणते धर्म यात येतात की युरोपियन धर्म असा एक धर्म म्हणता आहात? - (क्युरियस) सोकाजी

In reply to by सोत्रि

जेव्हा आपण 'युरोपियन धर्म' म्हणतो, तेव्हा त्यात प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे विविध पंथ (कॅथोलिक, ऑर्थोडॉक्स इ.) येतात, कारण तिथल्या मॉनेस्टरीज किंवा मठांची परंपरा याच धर्माशी घट्ट जोडलेली आहे. (सेंट बेनेडिक्ट यांनी स्थापन केलेले मठ. येथील भिक्षूगरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकतेची शपथ घेतात, मी जिथे राहतो तिथून जवळच असा एक मोठा मठ आहे जिथे आजही अतिशय साधेपणाने जीवन घालवणारे लोक आहेत.) ऑर्थोडॉक्स यांच्यात उदाहरण ग्रीसमधील माउंट अ‍ॅथोस. सेंट फ्रान्सिस सारख्या लोकांनी तर होली पॉवर्टी सारखी तत्वे मांडून आयुष्यभर त्यांचा प्रसार केला. मात्र, ख्रिस्ती धर्माच्या आधीही युरोपमध्ये स्टोईक (Stoic) किंवा पायथागोरियन यांसारखे विचारप्रवाह होते, जे ऐहिक सुखांपेक्षा संयम आणि साधेपणाला जास्त महत्त्व देत असत. थोडक्यात सांगायचे तर, युरोपीय संस्कृतीत केवळ एका धर्माचा प्रभाव नसून, ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून ही 'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही. (धर्माचे ओरिजिन हा टेक्निकल मुद्दा इथे अपेक्षित नाही. नाहीतर ख्रिस्ती धर्म हा इस्रायली धर्म होईल. हेच बौद्ध धर्माच्य बाबतीत आहे. आज बौद्ध प्रामुख्याने पौर्वात्य देशांतला प्रबल धर्म आहे)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नागनिका गुरुवार, 02/12/2026 - 14:51
एका सिनेमाच्या एखाद्या प्रसंगावरून तुम्ही युरोपिय धर्माची तळी उचलत आहात? Annie Besant या भारतीय धर्मावरून प्रभावित होऊन त्यांनी फिलोसॉफीकल सोसायटीची स्थापना केली होती. त्याचे प्रेरणा स्थान मूळ देशाच्या संस्कृतीशी नवते. Stoic पंथ वेद्निर्मिती नंतर सहस्रोवर्षानंतरचा आहे. तोपर्यंत वेदातील ज्ञान जवळ जवळ सर्व जगामध्ये पसरले होते. असो.. वैयक्तिक टिप्पणी करून ' झिरो सिव्हिक सेन्स' ट्रेंड तुम्ही फारच गांभीर्याने घेतलेला दिसतोय.

In reply to by नागनिका

>> पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. असे लिहिताना मात्र आपण एकदम ऑब्जेक्टिविटीची परिसीमाच गाठली आहे जणू. मी कुठल्यही धर्माची तळी वगैरे उचलत नाही. वेदांमधे फक्त ज्ञान आहे हा एक खूप मोठा गैरसमज अनेक लोक करून घेतात. वेदांमधील साधारण ९०% ते ९५% भाग हा कर्मकांडाचा आहे ज्यात सगळ्या भौतिक सुखांच्या याचना आणि गरजांसाठी केलेले यज्ञयाग मंत्रे कथा आणि असेच भरताड आहे. येस. इंद्रियसुखे. ऐहिक सुखे. केवळ ठराविक भाग निवडून ९५ टक्के भाग मात्र सोयीस्कर दुर्ल़क्षित करून तुम्ही काय वेगळे करत आहात? साधारणतः उर्वरित भागात आधिभैतिक प्रश्नांचा वेध घेतला आहे. शिवाय त्यातही मुळात केवळ आणि केवळ एत्तदेशियांच्या इन्जिनियसपणातून हे ज्ञान डिस्कस झाले असा फारच गोड गैरसमज करून घेतलेला दिसतो. मुळात आर्य पुरुष इथे कुठून आले? ज्याप्रमाणे अल्केमी या गोष्टींनी आयुर्वेदात रससिद्धांत वगैरे गोष्टी इन्ट्रोड्यूस झाल्या त्याच प्रमाणे वेद असोत किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञान, ज्ञान हे कोलॅब करून आणि कल्पना एक्सेंज करून विकसित झालेले असते. बाकी आपण केवळ न्यूनगंडात्मक आणि मुख्य म्हणजे अज्ञानमूलक आत्मस्तुतीतच मग्न राहणार असाला तर जो जो वांछील तो ते लाहो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विवेकपटाईत Fri, 02/13/2026 - 10:15
उत्तम लेख. स्वामी दयानंद यांची संपूर्ण विचारधारा विज्ञान निष्ठ होती. वेदांची विकृत व्याख्या करणाऱ्यांवर त्यांनी चपराक लावली. देशांत शुद्धी आंदोलन सुरू केले. शिक्षण संस्था उघडल्या. आज आर्य समाजाच्या १५०००० शाळा आणि कॉलेजेस आहेत. शेकडो गुरुकुल ही आहेत. याशिवाय स्वामी दयानंद चे शिष्य स्वामी रामदेव यांनी तर नवीन शिक्षा बोर्ड स्थापित केला आहे. आजच्या घटकाला पाचशेच्या जवळ शाळा भारती शिक्षा बोर्ड शी संबंधित झालेल्या आहेत. पुढील पाच-सात वर्षात ही संख्या काही हजारांवर जाईल. .बाकी अण्णा तुम्ही ही इतरांप्रमाणे निश्चित न्यूनगंडाने पछाडलेले आहात. ऋग्वेद तुम्ही वाचलेला नाही. बाकी आयुर्वेद पूर्णतः विज्ञान निष्ठा आहे. आज आयुर्वेदातील अनेक औषधी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर रिसर्च द्वारा प्रमाणेच झालेल्या आहेत. आजच्या घटकाला देशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा जिथे सेल पासून ऍनिमल ट्रायल्स ची पूर्ण सुविधा आहे एका आयुर्वेदिक कंपनी जवळ आहे. असो. बाकी स्वामी दयानंद त्याकाळचे सर्वात मोठे प्रगतिशील आणि पुरोगामी व्यक्तित्व होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:04
ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून
धन्यवाद! हीच क्युरीयासिटी होती.
'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही.
ह्याबद्दल जरा वेगळं मत आहे माझं. कॅपिटलिझम आणि त्यावर आधारित सध्याची अर्थव्यवस्था ही पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांनी जगावर लादलेली इकॉनॉमिकल चौकट आहे. ज्याच मूळ भोगवाद किंवा इंद्रियसुखांची लोलुपता हे आहे. जगात कोणी समाधानी असता कामा नये हा या अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. जर सगळे समाधानी झाले, कन्टेन्डेड झाले, तर उत्पादन कसं चालू राहणार आणी वाढणार आणी मग प्रचंड नफा कसा मिळणार? म्हणून 'अधिकचा हव्यास' सतत असेल अशी इकॉनॉमिकल चौकट राबवली आहे. त्या आत्यंतिक नफ्यातून येणार्‍या अफाट आणि अमर्याद पैशामुळे, इंद्रियसुखांची परीसीमा गाठण्याचा हव्यास वाढत जातोय. एप्स्टीन हे उघड झालेलं फक्त एक प्रकरण. पण म्हणून हे फक्त पाश्चिमात्य देशांतच होतंय का? तर नाही, जिथे जिथे अफाट आणि अमर्याद पैसा आहे तिथे तिथे हे आहेच. भारतीय तत्वज्ञानात, आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनशास्त्रांनी, सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पातळीवर केला आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञानात 'त्याग आणि शिस्तीची' तत्व (उदा. होली पॉवर्टी सारखी) आहेत त्यांच्यामागे भारतीय तत्वज्ञानाइतका सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पारमार्थिक विचार नाहीयेय. हेच पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांत व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो उदो असण्याचं कारण आहे. सुदैवाने आपला भारतीय तत्वज्ञानाचा वारसा हा पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा परिपक्व आहे. मी ह्या लेखातल्या फक्त ह्या गाभ्याशी सहमत आहे.
भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते.
हा तुमच्या आक्षेपाचा अजून एक बेस आहे की नाही ते माहिती नाही पण असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे. भावनिक होऊन अशी आत्यंतिक मतं मांडली जातात हे मान्य असल्याने मी पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा लेखातील काही काही मतं 'विथ पिंच ऑफ सॉल्ट' घेतली होती. - (संतुलित) सोकाजी

Bhakti गुरुवार, 02/12/2026 - 14:05
वेदांकडे चला स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन _/\_
एपिस्टन फाईलचे अनेक रील, त्याची माहिती एकामागून एक पाहिली.ते पाहताना अक्षरशः भडभडून ओकून द्यावं वाटल. जग हॆ सैतान प्रवृत्तीने भरलेलेच आहे. सत्ता, पैसा, व्यभिचार याने बरबटलेले आहे.तरीही या जगात आपल्याला जगायचं आहे. मी पण त्या दिवशी "ज्ञानयोग" पुस्तक वाचले .तेव्हा कुठे शांत झाले ... अशा वेळी मला वेदांत, अद्वैत यांचा खूप आधार होतो.विवेकानंद यांच्या भाषेतलं वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे.जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.

In reply to by Bhakti

एपस्टिनचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून एका वर्षाने म्हणजे साधारणः २०२० च्या आसपास पासून मी त्याच्या मागावर होतो. फॉर सो मेनी ऑदर रीजन्स. खूप मोठा रॅबिट होल आहे हा. आता वरती आले आहे हे फक्त केवळ वरवरचे अर्धवट सत्य आहे असे मला वाटते. त्याच्या फाइलस (एकूण संख्या चाळीस लाख) मधल्या काही फाइल्सची सर्वच्या सर्व पानेच्या पाने रिडॅक्ट केलेली आहेत म्हणजे अक्षरश: एकही शब्द खुला नाही. यावर कधीतरी विस्ताराने लिहिण्याचा विचार आहे मात्र वेळे अभावी ते कधी शक्य होईल कुणास ठाऊक.

In reply to by Bhakti

तो गुन्हेगार होता हे कोर्टात सिद्ध झाले आहे त्यामुळे त्याच्या अनैतिक कृत्याचे मी कोणतेही समर्थन करत नाही. मला फक्त इतकेच म्हणाय्चे होते की यात सर्व बाजूंचे लोक गुंतले आहेत त्यामुळे निष्पक्ष सत्य कधीही बाहेर येणार नाही.

In reply to by Bhakti

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:10
भक्तीतै, वेलकम बॅक!
वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे, जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.
हा बाउन्सर डोक्यावरून गेला. - (विचारात पडलेला) सोकाजी

In reply to by Bhakti

Bhakti Sun, 02/15/2026 - 09:53
अजून एक सांगायचं राहिल. एपिस्टिन फाईलमधली काही नाव बिल गेटस, स्टीफन हौकिंग!!!! बापरे एके काळी कदाचित आतापर्यन्त जे अनेकांचे आदर्श होते... त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. त्यामुळे हॆ प्रकरण "अंधश्रद्धा"ने घेरलेले आहे ही चर्चा आहे. आदर्श कोणालाच मानायचं नाही (ती भक्तगिरी असतें )आपली विचार क्षमता वाढवत न्यायची, हॆ आधीच ठरवलं होतं. अशा मोठ्या लोकांची नाव वाचून जे ठरवलं त्याला अजून बळकटी मिळाली.

In reply to by Bhakti

मी पुन्हा सांगतो आहे. एकूण फाइल्स ची संख्या चाळीस लाखांहून जास्त आहे. त्यात अनेक ईमेल्स, अगदी त्याच्या संग्रहातले न्यूजपेपर आर्टिकल वगैरे सगळेच आहे. केवळ त्याचे ईमेल्स वगैरे नाहीत. एपस्टाइन हा फिज़िक्सचा प्रोफेसर देखील होता. त्याने फिज़िक्स शिकवले होते. श्रीमंत झाल्यावर त्यांने त्याच्या बेटावर अनेक शास्त्रज्ञांना चर्चांना निमंत्रित केले होते. त्यातल्या कित्येकांना तो काय काळे धंदे करत होता हे माहीत असणे हे गृहीत धरू नका. स्टीफन हॉकिंग बरोबर एक गुंडाने फोटो काढला म्हणजे हॉकिंग गुंड ठरत नाहीत. स्टीफन हॉकिंग यांनी कोणतेही अत्याचार केले आहेत असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. >> त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती. स्टीफन हॉकिंग यांचे नाव आले आहे आणि त्यांचे फोटो असले म्हणजे ते गुन्हेगारच आहेत असा अर्थ काढणे अजिबात योग्य नाही. मी अगदी मोदींच्या चारित्र्यहननाचा देखील विरोध करतो. माझे आणि त्यांचे किती पटते हे सगळ्यांना ठाऊक आहेच मात्र त्यांना ठरकी म्हणणे, किंवा त्यांना देशद्रोही ठरवणे याला माझा विरोध आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

https://www.theguardian.com/us-news/2024/jan/05/prince-andrew-clinton-hawking-what-do-the-epstein-documents-say-about-key-people या मधे स्पष्ट सांगितले आहे की हॉकिंग यांच्यावर जी राळ उडत आहे ती पूर्णपणे बेसलेस आहे. पासिंग उल्लेख आले की गुन्हेगार ठरवावे ही कसली मनोवृत्ती आहे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti Sun, 02/15/2026 - 13:30
तरी मी अजून मोठी नाव लिहायचं टाळलं आहे. स्टीफन हॉकिंग तिथे असल्यामुळे अंधश्रद्धा या प्रकरणाशी जोडली जाण्याची जास्त शक्यता मला वाटत आहे. adrenochrome हार्वेस्टिंग करून लहान मुलाचा बळी दिला जातं असावा असा अनेकांनी दावा केलाय. कशाला ही अंधश्रद्धा??अमाप सत्ता "उपभोगायला" मिळावी म्हणून..
तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती.
माझ्याकडून अशा अपेक्षा नका करू. आणि मला माहितेय या शंका करोडो लोकांच्या आहेत, केवळ माझ्या नाही.

In reply to by Bhakti

कॉमी Mon, 02/16/2026 - 11:59
करोडो लोकांना असल्या म्हणजे त्या व्हॅलीड शंका आहेत असे नव्हे. हे ॲड्रेनोक्रॉम वैगेरे अत्यंत बॉटम ऑफ द बॅरल अर्थात अत्यंत बेसलेस अफवा आहेत.

In reply to by Bhakti

एपस्टिन फाईल्स हा प्रकार विशेष फॉलो करत नाहीये. मात्र एपस्टिन फाईल्समध्ये जे काही आहे हे धक्कादायक असले तरी नवीन नसावे. आणि भारतातही असे प्रकार होत नाहीत असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे मंडळींच्या उपस्त्रिया, नाटकशाळा वगैरे असायच्याच. त्यांना लग्नाच्या बायकोचे स्थान थोडीच होते? ठेवलेल्या बायका सोडून त्यांची फार किंमत केली जात होती असे वाटत नाही. ती जुनी गोष्ट झाली म्हणून समजा सोडून दिली. पण आताच्या काळातही असे प्रकार चालत नाहीत असे आहे का? भारतातील एका मोठ्या बी-स्कूलमध्ये चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी असेल तर प्लेसमेंट कमिटीमधल्याबरोबर झोपावे लागेल अशी मागणी प्लेसमेंट कमिटीतील कोणत्या मुलाने केली किंवा अशी चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी म्हणून मुली झोपायला पुढे झाल्या असे दोन्ही बाजूंने चालणारे परस्परांना सहकार्य करणारे प्रकार झाल्याचे रेडिट आणि कोरावर कालपरवा वाचले. असले प्रकार पूर्वीही होत असले तरी नाकासमोर चालणार्‍या माझ्यासारख्याच्या ते लक्षात आले नसावेत. आपल्यासारख्यांना हे सगळे धक्कादायक वाटले तरी sex sells is a fact. मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये सेल्समध्ये क्लाएंटबरोबर बसून दारू प्यायली आणि मुलगी असेल तर दुसरे काही प्रकार केले तर मग कंपनीला जास्त बिझनेस आणता येतो आणि जास्त बिझनेस आणला की कॉर्पोरेट शिडी अधिक वेगाने चढता येते. दिसायला चांगली आणि ढिले कॅरॅक्टर असेल तर अशा मुली अशा ठिकाणी भरपूर प्रगती करतात. अर्थात भरपूर प्रगती झालेल्या सगळ्या तशाच असतात असे मला नक्कीच म्हणायचे नाही पण असे करणार्‍यांची भरपूर प्रगती होते हे पण तितकेच खरे. या सगळ्या गोष्टी सगळीकडे पडद्याआड चालूच असतील- केवळ एपस्टिन फाईलने ते बिंग फोडले म्हणून ते उघड झाले इतकेच. शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच असतात. तेव्हा या बाबतीत भारतीय लोक फार वेगळे असतील असे वाटत नाही. एपस्टिन फाईलमुळे पाश्चिमात्य लोक भोगवादात बुडलेले पण भारतीयांची सद्सदविवेकबुध्दी जागृत असते असे काही असेल असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti Sun, 02/15/2026 - 13:40
नक्कीच सद्सदविवेकबुध्दीवर भारतीय लोकांचीच मक्तेदारी नाही. अर्थात भारतातही हॆ प्रकार घडतात, काही तरी उजेडातही येत नाही. आसाराम आणि त्याच्या भक्तांचा किळसवाणा प्रकार कोणीच विसरले नाही. पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.

In reply to by Bhakti

पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.
याविषयी असहमत असायचा प्रश्नच नाही. कोणी कसला आधार घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. त्याविषयी इतरांना काही आक्षेप असायचे कारण नाही.पण हा मुद्दा जरा वेगळा आहे. मुद्दा हा की एपस्टिन फाईल्सच्या निमित्ताने पाश्चिमात्य (लोक/संस्कृती/तत्वज्ञान) भोगवादात बुडलेले आहे त्यापेक्षा भारतीय तत्वज्ञान अधिक चांगले आणि चुकीचे प्रकार करण्यापूर्वी भारतीय मन शंभरदा विचार करते आणि आपला त्यागवाद अधिक श्रेष्ठ आहे या दाव्यावर सगळी चर्चा आहे. कोणी कोणता मार्ग जोखाळावा याच्याशी त्याचा संबंध नाही.

विजुभाऊ गुरुवार, 02/12/2026 - 15:16
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का?

In reply to by विजुभाऊ

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:19
धर्म हा कुठल्यारती एका विचारसरणीवर (Dogma) आधारलेल्या संप्रदायाचं किंवा पंथाचं (Cult) दुकान असतं. दुकान चालवायचं म्हणजे गिर्‍हाइकं आकर्षित करावी लागतात. परलोकात सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असं हे दाखवलेलं गाजर असतं, मार्केटींग गिमीक. :=)) बोला, तुम्हाला काय हवय, रंभा उर्वशी की ७२ हूर?

😜

- (अधार्मिक) सोकाजी

In reply to by विजुभाऊ

मूकवाचक Fri, 02/13/2026 - 09:52
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात - आत्मिक आनंदाच्या तुलनेत कमी प्रतीचे मानत असतील, सरसकट पाप मानत नाहीत. परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. - अशा गोष्टींचा जेमेतेम बुद्धीमत्ता आणि सरासरीपेक्षा कमी विवेकबुद्धी असलेल्या लोकांवरच प्रभाव पडतो. उदा: अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल अशा पद्धतीने, ओरबाडून आज भोगले नाहीस, तर ते पुण्यकर्म ठरेल आणि परलोकात त्याचे बक्षिस मिळेल अशी लालूच दाखवणे. हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते.

In reply to by मूकवाचक

सुबोध खरे Sat, 02/14/2026 - 19:18
"एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते". कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे. म्हणजेच धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे. माणूस आयुष्यात शेवटी अशा एका टप्प्यावर येतो कि त्याला ऐहिक सुखे किंवा भोग यातील रस संपतो. (अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत होते असे नाही). विशेषतः स्वतःला दुर्धर आजार झाला किंवा स्वतःच्या गाडी जवळच्या माणसाचा मृत्यू/ दुर्धर रोग झाल्यास अशा वेळेस माणसाला धर्मच नव्हे तर कर्मकांडे सुद्धा मानसिक बळ देतात. त्यामुळे तरुणपणी धर्म आणि कर्मकांडे यांच्यावर प्रच्छन्न टीका करणारी माणसे सुद्धा शेवटी त्यांच्या आहारी जाताना दिसतात. एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत. मी आमच्या आई आणि वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर कोणतेही संस्कार ना करणारा असलो तरी मी सहसा कुणाच्या धार्मिकतेवर टीका करत नाही. कारण शेवटी माणसाला कोणती गोष्ट मानसिक आधार देऊ शकते हे सांगणे कठीण आहे मग ती कितीही पोकळ असली तरी.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Sat, 02/14/2026 - 20:24
कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे.
क्रूरतेचं मूळ अनेकदा अत्यंत कट्टर विचारसरणीत असतं ती धार्मिक असो वा राजकीय. जेव्हा एखादी विचारधारा स्वतःला “एकमेव सत्य” मानते आणि विरोधकांना अमानुष ठरवते, तेव्हा हिंसा सुलभ होते. इतिहास असंही दाखवतो की धर्मप्रेरित व्यक्तींनी महान मानवतावादी कार्यही केलं आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्थांनी मानवी हक्कांची जपणूकही केली आहे. म्हणून प्रश्न “कोण जास्त क्रूर?” असा नसून, “कट्टरता, सत्तेची लालसा आणि मानवीकरणाचा अभाव कुठे निर्माण होतो?” हा अधिक मूलभूत प्रश्न आहे.
कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे.
समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात. . बाकी उरलेला प्रतिसाद धर्म किंवा तत्वज्ञानापेक्षा मानसिक जपणूक किंवा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून आहे.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Mon, 02/16/2026 - 19:58
"समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात." मूलभूत गल्लत आहे. एक हुकूमशहा आणि अक्खी विचारसरणी यात कम्युनिस्टांनी आपल्याच लोकांचे केवळ क्रांतीच्या विरोधात असल्याच्या संशयावरून कोट्यवधी लोकांचे शिरकाण केले आणि क्रांती साठी रक्त सांडणे यात काहीही चूक नाही असेच हे लोक मानतात. किंबहुना ते अपरिहार्य आहे असेच मानणारी हि शुद्ध हलकट जमात आहे. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 02/17/2026 - 17:52
इतिहासात काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही, हत्या आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाले हेही सत्य आहे. पण एखाद्या विचारसरणीचे सर्व अनुयायी “शुद्ध हलकट जमात” आहेत असे म्हणणे योग्य ठरत नाही. सैधांतिक मांडणी आणि त्याची अंमलबजावणी ह्यातील दरी हेही एक कारण असले तरी स्टालिन, माओ किंवा पॉल पॉट ह्यांच्या उदाहरणातही त्यातील अपराधांची जबाबदारी त्या राजवटींवर आणि नेत्यांवरच येते. पण संपूर्ण विचारसरणीचे सर्व अनुयायी एकसारखे आहेत असे म्हणणे वस्तुस्थितीशी जुळत नाही. कोणत्याही विचारसरणीचे मूल्यमापन करताना तिची तत्त्वे, तिची अंमलबजावणी, आणि त्या काळातील राजकीय-सामाजिक संदर्भ वेगळे करून पाहणे अधिक न्याय्य ठरते. तुमच्या मते "आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे जर शुध्द हलकट जमातीचे असतील" तर ह्या विधानाचा पुन्हा विचार करुन बघा. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही. निरपराध आदीवासी दोन्ही बाजूंनी नाडले आणि मारले गेले होते. अनेक आदिवासी भागांमध्ये जमीन, जंगल हक्क, विस्थापन, शोषण यांसारख्या प्रश्नांमुळे असंतोष वाढला. त्या पार्श्वभूमीवर काहींनी माओवादी चळवळीला पाठिंबा दिला. पण त्यामुळे निरपराधांवरील हिंसा योग्य ठरत नाही. पण ह्यातील ज्यांना पश्चाताप व्हायला हवा असे वाटते त्यांना शासन करतानाही कित्येक निरपराध आदीवासींचा बळी गेला आहे. त्याच वेळी, त्या प्रदेशांतील सामाजिक-आर्थिक समस्या आणि राज्याच्या धोरणांचाही विचार करणे आवश्यक ठरते. हिंसा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन कोणत्याही बाजूने झाले तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 02/17/2026 - 20:02
काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये कोणत्या कम्युनिस्ट राजवटीत असं झालेलं नाही ते सांगा. आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे हलकट नाही तर दुसरं काय म्हणायचं हे आपणच सांगा सरकारने, सरकारचे, सरकारसाठी असलेले लोक म्हणजे कम्युनिझम अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

मूकवाचक Mon, 02/16/2026 - 11:04
तथाकथित निधर्मी लोक आणि त्यांचे निधर्मगुरू कट्टरपणा आणि क्रौर्य या बाबतीत तसूभरही कमी नाहीत. धार्मिक गुरू किंवा संस्था यांची चांगली बाजू हेतूपुरस्सर बघायचीच नाही, मात्र त्या संबंधातले भ्रष्टाचाराचे उदाहरण सापडले की आकाशपाताळ एक करायचे अशी वैचारिक फॅशन रूढ झाली आहे. तथाकथित समाजवादी, समतावादी, पुरोगामी वगैरेंना तोच मापदंड लावला जात नाही. असो. फरक एकाच बाबतीत आहे - पुरोगामी, समाजवादी लोक परलोकात काहीतरी मिळेल अशी लालूच दाखवत नाहीत. इहलोकातच आपल्या कामगिरीची बक्षिसी (राष्टीय/ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पैसा/ शिष्यवृत्त्या(!), आपल्या पाळीव माध्यमांमधून प्रतिष्ठा मिळवून देणे वगैरे) मिळेल अशी भक्कम 'इकोसिस्टीम' त्यांनी उभी केलेली आहे.

In reply to by सुबोध खरे

धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो.
अरे वाह, तुलनात्मक डेटा असेल इतिहास असेल तर वाचायला आवडेल.
एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत.
अरे वाह, एका अनुभवाने धार्मिक झाला म्हणायचा माणूस. वाचावे ते नवलच. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू Tue, 02/17/2026 - 13:45
धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. @सुबोध खरे, आपले विचार, व्यासंग व अनुभव यांचा आदर आहे तथापि, या बाबतीत मी सहमत होण्याइतका माझ्याकडे डेटा नाही. माझ्या समजुतीनुसार एक समाज म्हणून धर्मांध असो वा निधर्मी असो, खरा हिंदू कधीही क्रूर असू शकत नाहीत. हं बाकी, इतर काही पंथीय लोक क्रूरपणाची परिसीमा गाठतात याच्या घटनांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत.

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त Mon, 02/16/2026 - 20:43
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का? मुळात व्यापक अर्थाने 'भोग' ही मनुष्यप्राण्याच्या अगदी मूलभूत गरजांपैकी एक आहेसे दिसते.

कॉमी गुरुवार, 02/12/2026 - 16:21
Epstein फाईल्स मध्ये नसलेल्या गोष्टी किंवा बादरायणी संबंध लाऊन अचाट दावे सध्या नेटवर पसरले आहेत. आपण काळजी घ्यावी. तुम्ही दिलेले उदाहरण घ्या. मेलमध्ये कॅनिबल हा शब्द आला म्हणजे एपस्टीन मानवी ऑर्गनचे बुफे भरून जेवायचा असा अर्थ होत नाही. त्या मेल्समध्ये casual मेल पण आहेत. उगाच शब्द त्यात आला म्हणजे काही गुन्हा घडला असे नाही. बाकी लेख अत्यंत एकसुरी वाटला. ह्यात मांडण्यासारख्या अनेक दुसऱ्या बाजू आहेत. पश्चिमी कसे खराब आणि आपण कसे हुच्च ह्याच्या अगदी विरोधी मत मांडणारा लेख सुद्धा सहज पाडता येईल.

अकिलिज Fri, 02/13/2026 - 19:23
चौकात लाल सिग्नल लावा. एक भारतात लावा. एक युरोपात लावा. फरक डोळ्यांनी बघा. कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार कसे व्यवस्थित करते. ते बघा. टोलच्या रांगात सगळे कसे व्यवस्थित लायनीत जातात. एकमेकांना कसे घूसू देतात. बघा मजा. लहान मुलांना कानफटवणे हे ज्यांच्या अंगवळणी पडले आहे त्यांना पेशन्सने बोलणे कसे शिकवणार. भारतवर्षाचा अभिमान जरूर वाटावा. पण जे चूक आहे ते मान्य तर करायला शिका.

एकदा खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून मी ट्रेकला जात होतो. जागा नसल्याने दोन सीटच्या गॅप मध्ये उभा होतो, एक कला अध्यात्म, धर्म, देव ह्याबद्दल दुसऱ्या काकाना सांगत होते, अतिशय मंत्रमुग्ध वातावरण होते, अर्ध्या एका तासाने त्या काकानी हातातली शेंगा खाऊन उरलेली टरफल्यांची पिशवी खिडीकी बाहेर टाकली.

स्वधर्म Fri, 02/13/2026 - 23:21
नागनिका जी, आपले चिंतन वाचले. लहानपणी मला आणि बहुतांश लोकांना आपण म्हणता तसेच वाटत आले आहे. शरीराच्या पलिकडे असलेल्या स्व व अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन भारतीय तत्वज्ञानात आहे, हे मान्य. पण जाण आल्यावर हळू हळू भारतीय संस्कृतीबाबतचा तथाकथीत अभिमान गळून पडला. इथे लिहिलेले विचार भाबडे आहेत की धूर्त आहेत असा प्रश्न पडला. त्यामुळे मनात आलेले काही प्रश्न आपल्यासमोर ठेवत आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटते ते वाचायला आवडेल. १. भारतीय संस्कृती प्राचीन आहे त्यामुळे ती जास्त प्रगत असायला हवी होती. तसे काही सध्या आढळून येते का? आपला समाज जगातील इतर समाजांच्या तुलनेत अधिक सुखी समाधानी आहे का? भारताचा आनंद निर्देशांक जगात तळाला का असावा? २. भारतीय मनाची बैठक समरसतावादी आहे, समतावादी नाही. नेता अचानक गेल्यानंतर त्या पक्षातील सर्वात लायक माणसाला कधीच संधी मिळत नाही. नेत्यालाही ती विशिष्ट घराण्यातले असल्यामुळेच मिळाली होती. कितीही गैरप्रकार समोर आले तरी लोकांना त्याचे काहीच वाटत नाही. उलट लोक असेच होणार हे मानून पुढे गेले. ही कसली महान संस्कृती? सर्व नागरीक समान आहेत असे मानणारी लोकशाही भारतात का रूजू शकली नसावी? ३. आर्थिक विषमता व वर्गाधारीत शोषण सर्वच समाजात आढळून येते. अधिक क्षमता असलेले लोक आर्थिकदृष्ट्या प्रबळ समाज गट तयार करतातच. पण 'जात' ही फक्त आणि फक्त जन्माधारीत संकल्पना फक्त दक्षिण पूर्व आशियातच का आढळून येत असावी? आपल्याच रक्तामासाच्या बांधवांचे केवळ जातीआधारित शोषण जगात इतर कुठेही नाही. तसेच स्त्रियांना जरूर देवी बनवून देव्हार्‍यात बसवले गेले पण तिला समान मानले का नसावे, तिचे शोषण हजारो वर्षे का झाले असावे? ४. भारतीय संस्कृतीतले सगळेच संत बंडखोर होते. त्यांचा तत्कालीन समाजाने छळच केला व नंतर त्यांची पूजा केली. हे अगदी ज्ञानेश्वरांपासून र धों कर्वे, महात्मा फुले यांच्यापर्यंत हे असेच आहे. एवढे सांस्कृतीक संचित असलेल्या भारतीय समाजाला चांगले काय हे वेळीच का ओळखता आले नसावे? ४. चांगल्या संस्कृतीचा सर्वात मोठा मानक न्याय असावा. पण भारतीय समाजात नेहमीच न्याय का नसावा? अगदी मर्यादा पुरूषोत्तम राम हाही न्यायासाठी नाही तर वडीलांच्या इच्छेचा मान म्हणून वनवासाला गेला. न्याय महत्वाचा असता तर त्याने वडीलांच्या इच्छेपेक्षा त्यांना तत्कालीन न्याय्य काय हे सांगायला हवे होते. सीतेशी राम जसा वागला (अग्नीपरिक्षा), तसे आजच्या काळात कोणी वागले तर तो माणूस वंदनीय ठरेल काय? न्यायापेक्षा वडीलधारे, परंपरा काय म्हणते हेच इथे का महत्वाचे आहे? न्यायासाठी भांडणारे आयुष्य खर्च करतात, पुस्तके लिहितात. आपल्या समाजात न्याय मुळीच सहज नाही. म्हणून बहुसंख्य लोकांना सुखी समाधानी आयुष्य लाभते असे वाटत नाही. संघर्ष अटळ का?

In reply to by स्वधर्म

जेन झी शी बोलल्यावर मला एक लक्षात आले की या मुलांना खूप फ्रस्ट्रेशन आहे. पण त्यांना त्यांचा राग कुठेच काढता येत नाही. या मुलांना जगात काय चाललं आहे हे सगळी कडे दिसत असते. प्रगत समाजांत आपल्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बरोबर जगात अनेक जण सहज PDA करतात मात्र भारतीय मुलांना आपल्या प्रियकर प्रेयसी यांना स्पर्शही करता येत नाही. या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून त्यांच्यात अनेक न्यूनगंड तयार होतात आणि ते आपली व्यवस्था ही एक 'संस्कृती' असून कशी 'त्यांच्याहून' भारी आहे वगैरे जस्टिफिकेशन देत राहतात. मग त्यांना भूतकाळातून हे आधिभौतिकाचे तुकडे काढून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत राहण्याचा एक विचित्र न्यूनगंडात्मक छंद लागतो. प्रत्यक्षात बिचाऱ्याची बत्तीशीपर्यंत जातीबाहेर सोडाच जाती अंतर्गत देखील लग्ने होत नाहीत. जेन झी मुलाना आजकाल एका कसल्या तरी सनातन धर्माचे वेड लागले आहे. प्रत्यक्षात तो धर्म काय आहे आणि तो कशाशी खायचा हे त्यांना कळत नाही. कारण पदोपदी रोजच्या जगण्यात आणि त्या उदात्त आधिभौतिक प्रिंसिप्लस मधे नेहमीच टोकाची विसंगती दिसत राहते. एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात. मात्र त्या सनातन धर्माचे या आत्ताच्या जगातले ऐहिक मॅनिफिस्टेशन मात्र कसे वर येतात तर कॅफे मधे जाऊन हनुमान चालीसा म्हणणे. कुठं कालिदास वगैरची उदबत्ती लावताय दोस्तांनो? अधिभौतिकाची आणि ज्ञानमार्गाची प्रचंड मोठी परंपरा असूनही आज सगळी कर्मकांडे प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात कंठाळी पद्धतीने सेलेब्रेट केले जातात. प्रत्येक देवस्थानाला अद्वैत लांबच राहिले, द्वैतही सोडा एकदम अंधश्रद्धेच्या आसपास जाणारी अनेक कर्मकांडेच मोठी करायचा छंद जडला आहे. एकेकाळी फक्त गणपती असणारा आज प्रत्येक गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. यात कुठेही मला ज्ञानमार्गाचा मोठेपणा दिसत नाहीच तर बहुतेक समाजाला केवळ ट्रांसॅक्शनल कर्मकांडातच गुंतून पडायचे आहे असे स्पष्ट दिसते. एकूण दिलको बेहलाने के लिए ये वेदांत अच्छा है असेच आहे बहुतेकांचे. ९९ टक्के लोक काही का करेनात, लिंचिंग वगैरे का करेनात आपण मात्र चार दोन सूक्ते काढून काहीतरी वैश्विक गफ्फा हाणत राहायच्या.

In reply to by स्वधर्म

सोत्रि Sat, 02/14/2026 - 07:17
स्वधर्म, तुमचा प्रश्न नागनिका यांना आहे आणि त्या/ते उत्तर देतीलंच. पण, मी माझं मत सांगण्यास तुमची हरकत नसावी हे गृहीत धरून माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. लेखातून मी इंटरप्रीट केलेला गाभा असा आहे की: कॅपीटलीस्ट पाश्चात्य देशांमधे भौतिक चंगळवादाचे प्रस्थ प्रचंड आहे; एपस्टीन प्रकरण त्यासाठी बॅकड्रॉप/वानगी म्हणून. अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन जे भारतीय तत्वज्ञानात आहे ते पाश्चात्य तत्वज्ञानात तितकं मुलभूत आणि सखोल नाहीयेय. त्यामुळे भौतिक चंगळवादातून बाहेर का पडायचे किंवा त्यापलीकडे काही आहे हेच माहिती होत नसल्याने अधिकाअधिक भौतिक चंगळवाद हेच धेय्य बहुतांशी पाश्चात्य देशांमधे आहे. सुदैवाने, सखोल भारतीय तत्वज्ञानामुळे आपल्याला एक दिशा किंवा मार्ग उपलब्ध आहे अधिभौतिकाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही 'भारतीय संस्कृती' हा मुद्दा सामाजिक अंगाने मांडताय, जो योग्य आहे आपल्यजागी, पण तो ह्या धाग्याचा विषय नाही, माझ्या आकलनानुसार. (डिस्क्लेमरः आधिच्या प्रतिसादात म्हटलं तसं धाग्याच्या फक्त ह्या गाभ्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.) - (मत मांडण्याचा अधिकार जपणारा) सोकाजी

In reply to by स्वधर्म

नागनिका Sat, 02/14/2026 - 09:09
स्वधर्मजी विस्तृत प्रतिसादाबद्दल आपले आभार ! संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. पण संस्कृती जितकी flexible तितकी लवकर रुजते, विस्तारते आणि टिकते ही. ज्या संस्कृती एकाच एका गोष्टीला चिकटून असतात, काळाप्रमाणे बदलत नाहीत त्या लोप पावतात.( उदा. सुमेरिअन, रोमन इ.) त्याचप्रमाणे न्यायाच्या संकल्पन बदलत जातात. पण व्याख्या तीच राहते. द्वापारात नियोग न्याय्य होता. पण सध्या नाही. तसेच त्रेतायुगात काही गोष्टी सामान्य होत्या, ज्याचे आज अप्रूप वाटते. द्वापारात राजपरिवारातील व्यक्ती ब्रह्मचारी असण्याचे प्रमाण नगण्यच होते. म्हणून भीष्माचे राजत्याग करून ब्रह्मचारी राहणे काहीतरी अद्भुत वाटले त्या लोकांना. तुमच्या तिसर्या मुद्याशी मी सहमत आहे. ककारण तोच तर विरोधाभास आहे. जे ज्ञान , संस्कृती पूर्वजांनी दिली त्याचा विसर पडला व भौतिक चंगळवाद सोकावला. त्यामुळे किंबहुना अज्ञानामुळे अशी परिस्थिती आहे. ( वरील काही प्रतिसादात सिग्नल, टरफले अशी काही उदाहरणे दिली आहेत. त्यालाही हेच म्हणणे लागू होते. चांगले वागणे म्हणजे काय ते माहित असते, पण ते का वागायचे हे माहित नसल्याने अशी कृती होते. सगळ्याचे मूळ अज्ञान आहे.) बाकी सोकाजींना धन्यवाद. त्यांनी लेखाचा गाभा योग्य सांगितला.

In reply to by नागनिका

स्वधर्म Sun, 02/15/2026 - 03:17
नागनिका जी, धन्यवाद, पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रतिसादात नाहीत. >> संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. इथे आपल्या बोलण्यात विरोधाभास आहे. आपण रोमन, सुमेरियन वगैरे संस्कृती बदलल्या नाहीत म्हणून नष्ट झाल्या अशी उदाहरणे देत आहात, पण वैदिक संस्कृती (अपौरुषीय वेद, गीता इ.) रोमन, सुमेरियन संस्कृतीपेक्षाही प्राचीन आहे. ती कुठे बदलली? तुम्ही तर त्याच न बदललेल्या प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगत आहात ना? उलट पाश्चात्यांनी जुन्या रोमन वगैरे संस्कृती लवचिकपणे सोडून दिल्या व नवे विचार (रिनायसन्स इ.) बदल घडवले. त्यामुळे त्यांनी अधिक चांगल्या संस्कृती विकसित केल्या असा निष्कर्ष निघतो व म्हणून त्यांची संस्कृती श्रेष्ठ ठरत नाही का? तुंम्ही दिलेले नियोगाचे उदाहरण (अपत्यप्राप्ती कशी करावी?) हे न्यायाच्या बाबतीत मुळीच महत्वाचे वाटत नाही. एकतर ते पुराणातले उदाहरण आहे, इतिहासातले नाही. दुसरे म्हणजे कुणालातरी ब्रम्हचर्य अप्रूप वाटणे वगैरे मुळीच महत्वाचे नाही. न्यायाच्या बाबतीत सर्वांना एकाच गुन्ह्याला समान शिक्षा अपेक्षित आहे. ते भारतात कधीही नव्हते. कारण गीतेत सांगितलेले वर्णाश्रम व वर्णधर्म जे हजारो वर्षे समाज पाळत आला. या एका गोष्टीने भारताचं इतकं नुकसान केलं की आपण मागासच राहिलो व अजूनही आहोत. त्याचा कसला अभिमान बाळगायचा? >> सगळ्याचे मूळ अज्ञान आहे. हजारो वर्ष इतके महान ज्ञान उपलब्ध असूनही बहुसंख्य भारतीय समाज अज्ञानी असेल तर आपण ज्याला ज्ञान म्हणता ते ज्ञान तरी कसं म्हणायचं? @सोकाजी लेखाचा मूळ गाभा एपस्टीन सारखे लोक पाश्चात्य समाजात निर्माण होतात पण भारतीय समाजात तसे होत नाही कारण "... भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते ." असा आहे. पण हे खरे नाही कारण आपल्याकडे प्रज्वल रेवण्णा प्रकरण घडले जे तुम्हाला आठवत असेलच. त्याला निवडून द्या असे आवाहन गंगापुत्र, सनातन संस्कृतीपूजक महानेत्याने त्याच्या मतदारसंघात सभा घेताना केले होते. त्याच्यावर शेकडो स्त्रियांचे शोषण करून व्हिडिओ चित्रिकरण केल्याचा आरोप सिध्दही झाला होता. त्याला शिक्षा झाली आहे. दुवा: https://www.bbc.co.uk/news/articles/c87edydwpv7o हा आपल्याकडचा एपस्टीनच नव्हे तर काय? असे अनेक असतील पण आपल्याकडे थोरामोठ्यांच्या भानगडी उजेडात येत नाहीत. आपण पाश्चात्य समाजात एपस्टीन घडतो त्याल्या घृणास्पद समजत आहात पण पाश्चात्य समाजात अनेकांना आपली पदे, संपत्ती एपस्टीन प्रकरणात नांव आल्यामुळे सोडावी लागली व त्यांना शिक्षा मिळाली. आपल्याकडे मात्र ज्यांचे नांव आले त्यांना अजून तरी काहीही झालेले नाही या वास्तवाकडे संपूर्ण डोळेझाक करत आहात. हा भेदभाव हेच तथाकथित सनातन संस्कृतीच्या अनुयायांचे मुख्य लक्षण आहे हे सिध्द होतंय. @हणमंत आण्णा शंकर यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने नागनिकाजी आपले आकलन न आवडणार्‍या वास्तवापेक्षा लहानपणापासून सांगितल्या गेलेल्या भावनिक अभिमानाने प्रेरित तर नाही ना, याचा विचार करावा ही विनंती. वरती हणमंत आण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे "...एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात." असे तुमचे झालेले नाही ना?

मला एक प्रश्न नेहमी पडतो. सध्याच्या काळातील पाश्चिमात्य तत्वज्ञ आपलेच तत्वज्ञान अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. वेन डायर, बॉब प्रॉक्टर, एकहार्ट टोली वगैरे बोलतात तेव्हा कुठेतरी जाणवते की निदान तेवढ्यापुरते तरी ते आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत. नॉर्मन व्हिन्सेंट पील हे तर ख्रिस्ती धर्मगुरूच होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात बायबलचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. त्याप्रमाणेच नेव्हिल गॉडर्ड यांच्या बोलण्यात आणि लिखाणातही जिससचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. मात्र इतरांच्या बोलण्यात/लिहिण्यात जिसस किंवा ख्रिस्ती धर्माचा उल्लेख क्वचितच येतो. तसेच ते कुठेतरी आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत पण अधिक सुलभ पद्धतीने असे जाणवते. उगीच कसलाही अभिमान नाही (ज्याला मी उपहासाने वेदकालीन जंगलात भटकणे म्हणतो), हे जग म्हणजे सगळी माया आहे, त्यात गुरफटून जाऊ नका आणि आपले चित्त प्रभूचरणी लीन ठेवा म्हणजे भवसागर तरून जाल वगैरे दिसायला भारदस्त दिसणारी पण त्यातून नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणारी भाषा वापरत नाहीत. उलट काय करणे अपेक्षित आहे हे अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. हे असे का होत असावे? दुसरे म्हणजे नॉर्मन व्हिन्सेंट पील किंवा नेव्हिल गॉडर्ड अगदी बायबलमधील भाषा बोलत जरी असले तरी ते जे काही बोलतात ते मला तरी नक्कीच पटते. बायबलमध्ये मला माहित नसलेल्या पण अनेकांना आक्षेप असलेल्या काही गोष्टी असतील त्याविषयी मला काहीच भाष्य करता येणार नाही कारण त्या गोष्टी माहित नाहीत. मात्र अगदी बायबलमध्ये जरी सकारात्मक विचारांविषयी काही उल्लेख असतील तर माझ्या 'सहिष्णू' हिंदू आणि भारतीय मनाला ते अजिबात खटकत नाही. तस्मात वेदांमध्ये किंवा भारतीय तत्वज्ञानात चांगल्या गोष्टी आहेत हे मान्य केले तरी मात्र भारतीय तत्वज्ञानातच सगळे काही आहे आणि इतर ठिकाणी भुसा भरला आहे अशी परिस्थिती कदाचित नसावी. दुसरे म्हणजे भारतीय तत्वज्ञान महान आहे असा दावा करणार्‍यांपैकी किती जणांंनी त्याचा खरोखरच अभ्यास केलेला असतो हा प्रश्नही पडतो. आणि आपले तत्वज्ञान पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा करायचा असेल तर दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. असे दावे करणार्‍या किती जणांनी तो खरोखरच केलेला असतो हा पण प्रश्न पडतो. ही एक जनरल गोष्ट लिहित आहे- इथल्या चर्चेतील कोणालाही उद्देशून ते नाही तेव्हा अकारण गैरसमज नसावा. भारतीय तत्वज्ञान म्हटले की आम्हीच काय ते श्रेष्ठ आणि इतरांना काही कळत नाही या गृहितकापासून सुरवात करून मग आपल्या गृहितकाला अनुसरून असलेली तेवढीच वाक्ये उचलणारे लोक वैयक्तिक चर्चेत बघितले आहेत. माझी जी काही थोड्याफार लोकांशी याविषयी चर्चा केली आहे त्या मर्यादीत सॅम्पल सेटवर आधारीत विधान आहे. ते सर्वांना लागू पडेल असा माझा अजिबात दावा नाही. असे लोक अर्थातच मिपावर नाहीत आणि त्यापैकी बरेच आता या जगातही नाहीत त्यामुळे त्यांना इथे चर्चेत बोलावता येणार नाही. पण अशा अ‍ॅप्रोचमधून वृथा अभिमान निर्माण होणे आणि आपलीच कॉलर ताठ करणे सोडून फार काही साध्य होते असे वाटत नाही. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन. आता आपण आपल्या भारतीय सखोल चिंतनाकडे वळूया. तत्त्वज्ञानामध्ये भारताकडे आता सांगण्यासारखं काय आहे? काहीच नाही. इथे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे आजही तत्त्वज्ञान मांडता येते याचा भारतीयांना विसर पडला आहे. आणि दुसरा मुद्दा आमच्याकडे ऑलरेडी सगळेच आहे अशी आत्मस्तुती करण्याचा जडलेला रोग. महाराष्ट्र पुरते बोलायचे तर गुलाबराव महाराज किंवा वाई मध्ये असलेली प्रज्ञशाळा अशा प्रकारचे प्रयत्न दिसतात. पूर्णवाद किंवा अविभक्त आत्मवाद या गोष्टी मागच्या शतकात मांडलेल्या दिसतात. मात्र त्या काही नोवेल गोष्टी नव्हत्या आणि त्यांना समकालीनत्व तर नव्हतेच नव्हते. पुन्हा या सगळ्या गोष्टी मेटा फिजिकल किंवा मेटामटा फिजिकल असल्याने वितंड घालायची आवड असणाऱ्या वादप्रवण भारतीयांना एवढेच जमले आहे. अमर्त्य सेन यांनी वादाळू भारतीयांवर एक पुस्तक लिहिले आहे परंतु त्यातून शालीतून जोडेच मारलेले आहेत अनेक लोकांना ते कौतुकपर पुस्तक वाटते. मात्र साहित्य असो किंवा राजकारण जर्मन तत्वज्ञांनी संपूर्ण जग उलथापालथ केले. अलीकडे मी अनेक तत्त्वज्ञांचे लेक्चर्स असतो आणि मार्कूस यांची लेक्चरे सध्या माझी अत्यंत आवडती आहेत. त्यात त्यांनी मांडलेला जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत किंवा नव नव वास्तववाद हे खूप महत्त्वाचे सिद्धांत असून त्याचा एकूण समाजावर किंवा वैज्ञानिक प्रगतीवर किंवा अतिवैज्ञानिक प्रगतीवर परिणाम होणार आहे. यातील जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत आपल्या जग मिथ्या आहे या सिद्धांत यापेक्षा वेगळा आहे कृपया त्यांची गल्लत करून घेऊ नका. नाहीतर पुन्हा आत्मवस्तुतीचे एक रान तुम्हाला मोकळे झाल्यासारखे वाटेल. मात्र अशा दर्जाचे काम मला भारतातील कुठल्याही तत्त्वज्ञाने मग ते आध्यात्मिक क्षेत्रातून असो किंवा अकादमी क्षेत्रातून असो मांडल्याचे दिसत नाही. मग समृद्ध ज्ञानमार्गी परंपरा असलेल्या भारतामध्ये एवढे स्टॅगनेशन का आले आहे? याचे कारण भारत सामाजिक प्रश्नांमध्ये एवढा गुरफटून गेलेला आहे की कोणताही पंथ जात पाहत वगैरे न पाहता जन्माला येणारी बुद्धिमत्ता ही आयुष्यभर त्याच गोष्टींशी झुंजण्यात खर्ची होते. आणि त्यातूनही काही उरलंच तर ते आत्मस्तुती किंवा भारतीय अध्यात्माने आणि धर्मांनी तत्त्वज्ञानाच्या बुरख्या आडून घालून दिलेली कर्मकांडे करण्यातच खर्च होतात. चंद्र सूर्यकुमार यांचे म्हणणे मला पटते. यात पुन्हा भारतीयांना जडलेली व्हॅलीडेशनची सवय द्रुगोचरच होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन.
धन्यवाद. मार्कस गॅब्रिएल यांच्याविषयी माहित नव्हते. त्यांचे पण व्हिडिओ बघतोच. मी आतापर्यंत अभारतीय तत्वज्ञांपैकी जास्त करून अमेरिकन तत्वज्ञ फॉलो करत आलो आहे (अपवाद फक्त एकहार्ट टोली- ते पण मुळचे जर्मनीचे). मार्कस गॅब्रिएल यांच्याच पिढीतील अमेरिकन गॅब्रिएल (गॅब्रिएला?) उर्फ गॅबी बर्नस्टीनची पुस्तके आणि व्हिडिओ पण आवडतात. बाकी वेन डायर, नॉर्मन व्हिन्सेंट पील, लुईज हे, नेव्हिल गॉडर्ड, इस्थर-जेरी हिक्स वगैरे माझे अगदी ऑल टाईम फेव्हरेट आहेत. धन्यवाद.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वर म्हटल्याप्रमाणे नॉर्मन व्हिन्सेन्ट पील, नेव्हिल गॉडर्ड यांची पुस्तके/व्हिडिओ मला आवडतात. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी केवळ बायबलमधील आहेत आणि आपल्या कोणत्या स्त्रोतात नाहीत म्हणून पटल्या तरी ते नाकारणे मला तरी आवडत नाहीत. उदाहरणार्थः १. Isaiah 41:10 – “Fear thou not; for I am with thee…” याची मला फारशी गरज पडते असे नाही पण अक्कलकोट स्वामींचे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे वचन किती वेगळे आहे? २. Romans 12:2 – “Be ye transformed by the renewing of your mind…” विचार बदला- आयुष्य बदलेल हे केवळ बायबलमध्ये लिहिले आहे म्हणून नाकारायचे का? ३. Proverbs 23:7 – “For as he thinketh in his heart, so is he.”- जसा विचार कराल तसे बनाल हा कॉमन सेन्स नाही का? बायबलमध्ये लिहिले म्हणून तो कॉमन सेन्स नाकारायचा? ४. Matthew 21:22 – “And all things, whatsoever ye shall ask in prayer, believing, ye shall receive.”, Mark 11:24 - “Therefore I say unto you, What things soever ye desire, when ye pray, believe that ye receive them, and ye shall have them.” अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही. तरीही हे तत्वतः पटते. ५. Matthew 21:21 - “…If ye have faith, and doubt not… if ye shall say unto this mountain, Be thou removed… it shall be done.” Luke 17:6 - “If ye had faith as a grain of mustard seed, ye might say unto this sycamine tree, Be thou plucked up by the root… and it should obey you.” - आपल्याकडे मुकं करोति वाचालम... पेक्षा हे वेगळे आहे असे मला तरी वाटत नाही. (स्पष्टीकरणः ही सगळी वचने मला तोंडपाठ आहेत असे नक्कीच नाही. अशाप्रकारचे वर उल्लेख केलेल्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये वाचले होते ते आठवले आणि मग नक्की वचन कोणते, ते बायबलमधील कोणत्या पुस्तकात आहे वगैरे चॅटजीपीटीला विचारले). तेव्हा आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हे नक्कीच- त्यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हा अ‍ॅटिट्यूड थोडा संक्षींप्रमाणे वाटतो. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/14/2026 - 16:24
अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही.
चंसुकु तुम्ही वर कोट केलेली वचनं म्हणात असाल तर, भगवत गीता ही सगळी वचनं कव्हर करते.
मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडेच आहेत, आपल्याकडे चांगल्याच गोष्टी आहेत आणि आपल्याकडेच चांगल्या गोष्टी आहेत
असंं न म्हणता, त्यांच्याकडेही चांगल्या गोष्टी आहेत असं म्हणणं जास्त सयुक्तिक असेल, पण चांगल्याच आहेत असं म्हणता येत नाही. माझ्या दृष्टीने त्याची कारणमिमांसा देतो, जरा शब्दबंबाळ असेल पण भावना समजून घ्या अशी विनंती. पाश्चिमात्य तत्वज्ञ प्रामुख्याने भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याबद्दल (पर्सनल डेवलपमेंट) बोलतात. ज्यामुळे ते स्पष्टीकरण आपल्या रोजच्या जीवनाशी रिलेटेबल होऊन सोपे वाटते आणि समजते. उदाहरणार्थ नॉर्मन व्हिन्सेंट पील यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं.
  • The Power of Positive Thinking
  • True Joy of Positive Living: An Autobiography
  • You Can If You Think You Can
  • Positive Thinking Every Day: An Inspiration for Each Day of the Year
  • A Guide to Confident Living
  • Six Attitudes for Winners
  • Confidence
  • Reaching Your Potential
नेव्हिल गॉडर्ड यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं
  • Your Faith is Your Fortune
  • The Power of Awareness
  • Feeling Is the Secret
  • The Power of Imagination: The Neville Goddard Treasury
  • Relax More, Try Less: The Easy Path to Abundance
  • The Wealth Mindset: Understanding the Mental Path to Wealth
  • Imagination Creates Reality
पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
अगदी सहज शक्य आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकू- लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वगैरे हे सांगतात. ते अधिक रिलेटेबल वाटत असावे.
शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे- ते शब्दात व्यक्त करता येणार नाही हे अगदी १००% मान्य. पण मग अशी अनुभूती ज्यांना खरोखरच होत असेल ते लोक 'आमचेच काय ते सगळे चांगले आणि इतरांकडे भुसा भरला आहे' असा अ‍ॅटिट्यूड ठेवतील का? माझ्या मर्यादित सॅम्पल सेटमध्ये मी ज्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांच्या आर्ग्युमेंटची सुरवातच भारतीय तत्वज्ञान श्रेष्ठ किंवा पाश्चिमात्यांच्या तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ इथपासून झालेली बघितलेली आहे. असेलही. अजिबात नाकारत नाही. पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे. अभ्यासाअंती जे अनुमान निघायला हवे तेच प्रिमाईस म्हणून वापरले तर कसे चालेल? माझे अशा बहुसंख्य लोकांशी पटत नाही ते त्या कारणाने. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/14/2026 - 19:17
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही
नक्कीच! भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे हे सगळं आणि तत्सम तत्वज्ञान जोपर्यंत ध्यानमार्गाने प्रत्यक्ष अनुभवत नाही तोपर्यंत कळणं, उलगडणं कठीण आहे. ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी
हे इंद्रियजन्य असं असायला हवं कारण पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही.
तुम्ही कशाच्या शोधात आहात (seeking) त्यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही 'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन' वगैरे ह्या संदर्भात शोधत असाल तर ते time and space ह्या मितीतच आहे. जर शोध 'beyond time and space' च्या उलगड्याचा असेल तरच भारतिय तत्वज्ञान रिलेटेबल वाटेल. स्वानुभवाचं उदाहरण देतो, मी विपश्यना ध्यानमार्गावर जाण्याआधि इस्कॉनच्या गीता सेशन्सला जायचो. एका बौद्धिक लेवलपर्यंत गोष्टी कळत होत्या, समज येत होती पण आकलन अथवा उअलगडा होत नव्हता. म्हणजे, रागावर ताबा ठेवा, कामावर (इंद्रियांवर) विजय मिळवा, कुठल्याही परिस्थिरतीत समअवस्थेत रहा. उपदेश म्हणून हे पटत होतं. पण म्हणजे त्यासाठी नेमकं काय करा ? त्यासाठीचा मार्ग, तंत्र, एक्झॅक्ट प्रकिया हे काही त्या सेशन्समधे नव्हतं. सगळं कृष्णावर सोपवा आणि निष्काम कर्म करा, तो सगळा भवसागर पार करून नेण्यास समर्थ आहे, भक्ती करा, नामस्मरण, कीर्तन करा हे असं सगळं असायच. पण दुसरा काही योग्य मार्ग माहिती नसल्याने त्यातच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, उलगडा होत नव्हता तरीही. पण विपश्यना ध्यानमार्गाची माहिती झाल्यावर, त्या मार्गावर चालल्यावर गीतेतल्या श्लोकांचे अर्थ वाचताना साकार होऊन आपोआप उलगडायला लागले (आणि विपश्यना ही अप्लाईड गीता आहे हे कळलं). त्यामुळे ते रिलेटेबल वाटणं हे काय शोधता आहात त्यावर अवलंबून आहे.
पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे.
अर्थातच! विपश्यना धानप्रणालीची उपयुक्तता कळल्यावर ती इतकी मुलभूत कशी आणि इतर तत्वज्ञानात त्याच्या रिलेटेड, जवळ जाणारं काही आहे का हे अभ्यासण्यासाठी मी बहुतेक सगळ्या धानप्रणालींचा (इनर इंजीनियरिंग, सुदर्शन क्रिया, ट्रान्स्डेंटल मेडिटेशन, ओशोंच डायनॅमिक मेडीटेशन, ब्रम्हकुमारी राजयोग, सहज योग, एखार्ट टोल्लींच Present Moment मेडीटेशन, Landmark Forum, Natural Language Processing (NLP)) अवलंब करून बघितला. त्याने जो तुलनात्मक अभ्यास झाला त्यावरच माझी जी मतं आहेत ही बेतलेली आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
प्रश्न हा की एकहार्ट टोलींसारखे अभारतीय लोक तीच गोष्ट सोप्या भाषेत सांगतात पण आपलेच लोक शाब्दिक अवडंबरात का अडकतात?
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
तसे नसावे. वेन डायर अनेकदा हायर सेल्फ चा उल्लेख करतात. Your sacred self हे त्यांचे पुस्तकच आहे. त्यात लिहिलेले beyond time and space असेच आहे. वर म्हटल्याप्रमाणे असे पाश्चिमात्य तत्वज्ञ बोलतात किंवा लिहितात तेव्हा ते आपलेच तत्वज्ञान मांडत असतात हे जाणवते. पण ते विनाकारण जडजंबाल नसल्याने आणि नक्की काय करायचे हे सांगितले असल्याने अधिक रिलेटेबल वाटते. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या (म्हणजे भारतीय) लोकांना याविषयी बोलायला लागल्यावर नक्की काय करायचे या प्रॅक्टिकल गोष्टींपेक्षा आपली भारतीय संस्कृती किती महान, आपले तत्वज्ञान किती महान असले अभिमान लगेच चावतात. त्यामुळे मग आपोआप वेदकालीन जंगलात भटकणे सुरू होते. त्यापेक्षा मग सिधी बात नो बकवास असा अ‍ॅप्रोच असलेले वेन डायर, एकहार्ट टोली, नेव्हिल गॉडर्ड हे मला तरी अधिक भावतात.

नेहरूंचे सचिव एम.ओ.मथाईंचे Reminiscences of the Nehru Age हे पुस्तक आहे. मला वाटते ते भारतात मिळत नाही. ते पुस्तक मी अमेरिकेतील विद्यापीठाच्या ग्रंथालयातून वाचले होते. त्यात एक उल्लेख होता. आंतरजालावर त्या पुस्तकाचे पी.डी.एफ अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यात आपले दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही उल्लेख आहेत. राधाकृष्णन हे मोठे तत्वज्ञ होते आणि भारतीय तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता हे तर सर्वमान्य आहे. १९५२ ते १९६२ या काळात राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती असताना राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्याकाळी सुरवातीला पदांची हायरारकी- राष्ट्रपती- पंतप्रधान यानंतर तिसर्‍या क्रमांकावर उपराष्ट्रपती होते. तेव्हा राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे आग्रह धरला होता की हायरारकी राष्ट्रपती-उपराष्ट्रपती-पंतप्रधान अशी हवी. म्हणजे थोडक्यात मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे असा त्यांचा आग्रह होता. इतकेच नाही तर त्यावेळेस सुरवातीला राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनाच हवाई दलाची विमाने वापरायचा अधिकार होता. तो अधिकार उपराष्ट्रपतींनाही- म्हणजे स्वतःला मिळाला पाहिजे असा आग्रह राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे धरला होता. हे दोन्ही आग्रह नेहरूंनी मान्य केले. १९५७ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर परत राष्ट्रपती पदाची निवडणुक होती तेव्हा राधाकृष्णन यांना राष्ट्रपती व्हायचे होते पण तेव्हाही उपराष्ट्रपती पदावर समाधान मानावे लागले म्हणून ते रूसून बसले होते. तेव्हा नेहरूंनी तुम्हाला पुढच्या वेळेस राष्ट्रपती करू असे आश्वासन दिले. हा सगळा विरोधाभास वाटत नाही का? एकीकडे भारतीय तत्वज्ञान beyond body and time जाते पण त्याचवेळेस मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे, पहिल्या क्रमांकाचे पद मिळाले नाही म्हणून रुसून बसायचे, मला हवाईदलाची विमाने वापरायला मिळाली पाहिजेत हा आग्रह धरायचा हे काही समजले नाही. त्यापेक्षा- हो मला श्रीमंत व्हायचे आहे म्हणून मला लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वापरायचा आहे आणि त्यासाठी गरजेचे असेल इतके आध्यात्म मी वापरेन असा अ‍ॅप्रोच असलेले बॉब प्रॉक्टर अधिक श्रेष्ठ नाहीत का? निदान जगासमोर दाखवायला दोन वेगळे चेहरे तरी नाहीत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sun, 02/15/2026 - 10:05
चंसुकु, ५०% सहमती ५०% असहमती. डिटेलमधे प्रतिसाद लिहीतो पण २-३ दिवसांनी, लॅान्ग विकेंड आहे, ट्रीपवर आहे. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

जरूर. वाट बघत आहे. ५०% असहमती कशामुळे असावी? याविषयी माझा अंदाज असा की तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास असलेल्या व्यक्तीने ऐहिक सुख नाकारावेच असे काही नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला वाटते की ऐहिक सुख नाकारू नये ही अपेक्षा ठीक आहे पण एखादी गोष्ट मिळाली किंवा मिळाली नाही तरी त्यामुळे त्या व्यक्तीला काहीही फरक पडला नाही पाहिजे- शेवटी beyond body and time हा अनुभव अधिक महत्वाचा नाही का? तेव्हा एखादी गोष्ट (अमुक एका क्रमांकाचे पद आणि त्या पदाला नसलेले अधिकार) आपल्याला मिळाली पाहिजे हा आग्रह जर धरला गेला असेल तर मग त्या व्यक्तीला ती गोष्ट हवी आहे असाच अर्थ होतो- तस्मात मिळाली किंवा मिळाली नाही तरी काहीही फरक पडत नाही अशी परिस्थिती नसावी. दुसरे म्हणजे beyond body and time असा अनुभव जेन्युईनली आलेले किती लोक असतील? फार नसावेत. पृथ्वीवरील बहुसंख्य लोक मी, माझे पैसे, माझे मानमरातब, माझी गाडीघोडा वगैरेंमध्येच गुरफटलेले असतात. समजा आपल्याकडे beyond body and time वर बरेच काही असेल पण ९९% लोक ज्या स्थितीत असतात त्यांच्यासाठी काहीच नाही का? काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे याविषयी लिहित नाहीये. काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे त्याविषयी जी पुस्तके/भाषणे आताच्या काळात असतात त्याविषयी लिहित आहे. की मग परत भवसागर तरून जायला प्रभूचरणी लीन व्हा अशी दिसायला भारदस्त दिसणारी पण कसलाही अर्थबोध न होणारी तीच भाषा?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अप्पा जोगळेकर Sun, 02/15/2026 - 12:32
एखाद्या तत्वज्ञानाचा अभ्यास असणे आणि ते तत्वज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात अमलात आणणे यात काहीच फरक नाही का ? हे 'एखादा माणूस डॉकटर असतो ततरी तो व्यसनी कसा, तो आजारी का पडतो, तो जंक फूड का खातो' असे विचारण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांचा उल्लेख श्रीमान योगी किंवा उपभोगशून्य स्वामी असा केला जातो किंवा भगवान श्रीराम यांचा मर्यादा पुरुषोत्तम असा उल्लेख होतो त्यामागे या व्यक्तींचे प्रत्यक्ष वर्तन तपासले जाते अभ्यास नाही. एवढे लांब कशाला जा मनमोहन सिंग साहेब जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्री होते तेंव्हा भारताने कशा पद्धतीने तेलरोखे उभारून ठेवले होते हे सगळ्यांना माहिती आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

यात एक मोठा फरक आहे. तुम्ही मांडलेली इतर उदाहरणे करायच्या गोष्टी आहेत तर अध्यात्म - तत्वज्ञान या अनुभवायचा गोष्टी आहेत. एखादी गोष्ट करायची कशी हे स्वतः न करता इतरांना उत्तम प्रकारे शिकवता येऊ शकते. रमाकांत आचरेकरांनी सचिन घडवला. ते एक उत्तम शिक्षक होते पण सचिनप्रमाणे त्यांनी शतके ठोकली होती का? पण जर एखादी गोष्ट अनुभवायची असेल तर ती इतरांना सांगण्यापूर्वी स्वतः न अनुभवता कशी सांगता येईल हे समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Sun, 02/15/2026 - 16:42
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतचा वाङमयचौर्‍याचा खटला अत्यंत प्रसिध्द आहे. जदुनाथ सिन्हा यांच्या डॉक्टरेटसाठीच्या प्रबंधातील ११० परिच्छेद जसे च्या तसे राधाकृष्णन यांनी आपल्या 'इंडीयन फिलॉसॉफी भाग २' या पुस्तकात वापरले असा खटला १९२८ साली गाजला होता. त्यात अखेर दोन्ही बाजूंनी न्यायालयाच्या बाहेर तडजोड केली. राधाकृष्णन हे बडे प्रस्थ होते तर सिन्हा हे विद्यार्थी होते. अशा परिस्थितीत जर राधाकृष्णन यांना न्यायालयाबाहेर तडजोड करावी लागली असेल तर ते त्यांच्या इंटीग्रिटीवर पुरेसे प्रकाश टाकणारे आहे. त्यांनी आपल्या मुलींची लग्नेही बालवयात केली होती असे वाचले होते. एकूण ते पुस्तके आदर्शांवर लिहीत होते तरी आचरण अजिबात तसे नव्हते असे म्हणावे लागते. अशा व्यक्तीचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवसच शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे खूप फॉरवर्ड्स वाचले आहेत. पण आपल्या समाजात बोलण्याला आचरणापेक्षा जास्त महत्व आहे हे वारंवार दिसते.

चित्रगुप्त Mon, 02/16/2026 - 20:19
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते .
फक्त दोनचार दिवस 'क्राईम पॅट्रॉल' चे काही भाग बघा. भारतातल्या सर्वसाधारण, अगदी निरुपद्रवी वाटणार्‍या व्यक्ती देखील किती अमानुष, भयंकर गुन्हे करत असतात, याचे आश्चर्य वाटेल. थोड्याफार फरकाने जगभरातल्या मनुष्यप्राण्याचे अंतरंग सारखेच असल्याचे आढळून येते.

कांदा लिंबू Mon, 02/16/2026 - 22:26
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते. . कोणतेही कुकर्म करताना हिंदू मन शंभर वेळा विचार करते. असं म्हणायला हवं. बातम्यांतून, आजूबाजूच्या सामाजिक वर्तनातून दिसणारे अपवाद वगळा. "सर्वे संतु सुखिनः, सर्वे संतु निरामया" व "जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||" असं म्हणणारे हिंदू संस्कृती आणि "काफिरांना संधी मिळताच ठार मारा, त्यांची संपत्ती लुटा, स्वर्गप्राप्ती होईल" असं म्हणणारी परकीय संस्कृती यापैकी काय खरोखर श्रेष्ठ असणार हे निश्चितपणे ठरवता येत नसेल त्यांच्याकडून अध्यात्म,भोग, त्याग इत्यादी वरच्या मताची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे ?