✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?

र
राजेंद्र मेहेंदळे यांनी
गुरुवार, 06/05/2025 - 17:40  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का? मी चालकांच्या बाजूने मुळीच बोलत नाहीये, अपराध्याला शासन हे झालेच पाहिजे पण नेहमी चूक फक्त चालकाचीच असते का? मला खटकणारे काही मुद्दे इथे मांडतो आहे --रस्त्यावरील अतिक्रमणे - आजकाल अनेक मुख्य रस्ते आणि गल्ल्या अतिक्रमणाने व्यापल्या आहेत. बघता बघता एखाद्या कोपऱ्यावर एक टपरी लागते, कालांतराने तिथे पत्रे, मग कच्चे बांधकाम ,मग पक्के बांधकाम असे होत जाते. बहुतेकदा या सगळ्याला स्थानिक गुंडपुंड नगरसेवक यांची मान्यता असते. त्यामुळे कोणी बोलत नाही. या टपरीच्या आजूबाजूने मग अजून टपऱ्या उभ्या राहतात. तिथे येऊन खाणारे पिणारे तिथेच आडव्या तिडव्या गाड्या लावून खातात. त्यामुळे मूळ २ गाड्या जाऊ शकतील असा रस्ता जेमतेम एक गाडी जाईल इतकाच राहतो. इथे अपघात झाला तर जबाबदार कोण ? चालक, की टपरीवाला की तिथे कशाही गाड्या लावणारी गिऱ्हाइके किती हप्ता घेणारे गुंडपुंड? - बेशिस्त वाहतूक- सिग्नल न देता गाड्या वळवणे, अचानक यु टर्न घेणे, दुचाकी कशाही दामटणे, उलट साईडने येणे , ट्रिपल सीट , अरुंद रस्त्यावर पार्किंग करणे यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार? -अवजड वाहने- शहरात बरेच ठिकाणी जुनी बांधकामे पडून नवीन केली जातात. जुनी इमारत ३-४ मजली असते तर नवीन १५-२० मजली. अर्थातच ती लवकर पूर्ण व्हावी म्हणून पाडकामाला जेसीबी पोकलेन , सिमेंट साठी मिक्सर ट्रक , राडारोडा वाहायला डंपर लागतात. छोट्या गल्ल्यांमध्ये ही वाहने वळवायला जागा नसते. त्यामुळे जिथे दुचाकी, तिचाकी जात होत्या तिथे अचानक ही राक्षसी वाहने धावू लागतात. यासाठी काही नियम आहेत की नाही? इथे अपघात झाल्यास कोण जबाबदार? - रस्त्यावर तुंबणारे पाणी आणि गटारे- आत्ताच पुण्यात पाऊस पडून गेला आणि ठिकठिकाणी पाणी साठले. नाले सफाईत भ्रश्टाचार चालतो हे आता सगळ्यनांच माहिती आहे. शिवाय रस्त्यावरचे चुकीच्या पद्धतीने बुजवले खड्डे , नको तिथे बसवलेले पेव्हर ब्लॉक या पाणी तुंबण्यात भर घालतात. सगळीकडे चांगले फुटपाथ नसल्याने चालणारे रस्त्यामधून चालून हे सांडपाणी टाळायला बघतात. मग दुचाकी अजून रस्त्यामधून जातात आणि चारचाकीला जायला जागाच राहत नाही किंवा जेमतेम दुभाजकाजवळ एक लेन राहते. इथे अपघात झाल्यास कोण जबाबदार? -बेशिस्त पार्किंग - बहुतेक जुन्या सोसायट्यांमध्ये पार्किंग उपलब्ध नसते आणि रहिवासी त्यांच्या चारचाकी रस्त्यावर लावतात. ही जागा माझीच अशी त्या जागांवरून भांडणेही होतात. छोटी गल्ली असेल तर सम विषम पार्किंगचा नियमही पाळला जात नाही. इथे अरुंद रस्त्यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार? असे काही मुद्दे बरेच दिवस मनात घोळत होते म्हणुन मांडले ईतकेच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3132 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

समाजात वाढलेल्या बेपर्वाईची

युयुत्सु
गुरुवार, 06/05/2025 - 18:00 नवीन
समाजात वाढलेल्या बेपर्वाईची जीवशास्त्रीय चिकीत्सा करणारा लेख मी इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता. जीवशास्त्रीय कारणे समजून घेतली तर या समस्या हाताबाहेर गेल्या आहेत, हे कटुसत्य मान्य करावे लागते. https://www.misalpav.com/node/52557 Image removed.
  • Log in or register to post comments

आय पी एल.....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/05/2025 - 18:57 नवीन
आय पी एल मधील चेंगराचेंगरी,काळुबाईच्या यात्रेतील भगदाड किंवा रस्त्यावर ह,आणले अपघात याचे कारण केवळ बेशिस्त वाहतूक, बेशिस्त पादचारी, बेशिस्त नागरीक आणी डोळेझाक करणारे कायदा सुव्यवस्थेचे मालक. मेलो तरी बेहत्तर, आम्हीं नाही सुधारणार.
  • Log in or register to post comments

डीसीपी ट्राफिक ला लिहिलेले पत्र

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 06/05/2025 - 21:42 नवीन
मा. महोदय, पुण्यात वाहतुक यंत्रणा निष्प्रभ झाली आहे. लोक आक्रमक पद्धतीने वाहतूक नियम तोडताना दिसतात कारण कुठलीही कारवाई होत नाही. रहरदारीवर लक्ष ठेवणारे कॅमेरे काम करत नसावेत. सेकंदा सेकंदाला पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन होत आहे. नुकतेच मी या अंदाधुंद वाहतुकीचा बळी होता होता मी वाचलो आहे. दिनांक- 15/04/2024 स्थळ- कर्वे रस्त्यावरील डहाणुकर कॉलनी चौक वेळ- सायंकाळी 6.05 मी एक जेष्ठ नागरिक असून डहाणुकर कॉलनी कडून हॅपी कॉलनी कडे चौकातून स्कूटरवरुन जात होतो. सिग्नल पुर्णपणे ग्रीन होता. अचानक वारजे कडून डेक्कन कडे जाण्यार्‍या रस्त्याने काही दुचाकीस्वार लाल सिग्नल बेफिकिरीने तोडून जात होते. थोडक्यात मला धडकता धडकता वेगाने निघून गेले. माझी स्कूटर जरा घसरली पण मी वाचलो. ही परिस्थिती अपवादात्मक नसून पुण्यात सर्रास या गोष्टी सातत्याने घडत आहेत. वाहतूक पोलिस प्रत्येक ठिकाणी ठेवणे शक्य नाही. पण traffic monitoring system with camera ही यंत्रणाच काम करत नाही. हे कॅमेरे नुसतेच शोभेचे झाले आहेत. प्रबोधनाची तमा नाही व शिक्षेचे भय नाही अशी परिस्थिती झाल्याने वाहतुक अराजक पुण्यात निर्माण झाले आहे. अपघात होता होता वाचल्याची संख्या प्रचंड आहे. त्याची कुठेही नोंद होत नाही. पोलिसांकडून काही कारवाई होईल अशी नागरिकांकडून असलेली अपेक्षा व्यर्थ आहे पोलिसांकडून युद्धजन्य परिस्थिती सारखी आक्रमक कारवाई जर सातत्याने होत राहिली तरच या बेबंद नियम तोडणार्‍यांना वचक बसेल. सिग्नल तोडून बेफान वेगाने जाणे, उलट दिशेने जाणे हे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याने तो केवळ वाहतुकीचे नियम तोडल्याचा गुन्हा नाही. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आहे. आपण जरी कितीही वाहतुकीचे नियम पाळले तरी इतरांनी ते पाळले नाही तर धोका तुमच्या जीवाला निर्माण होत असतो. तरी या बाबत योग्य ती कारवाई व्हावी.
  • Log in or register to post comments

सदोष फूटपाथ मुळे अपघात

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 06/05/2025 - 21:51 नवीन
13 डिसेंबर 2024ला शुक्रवारी मॉर्निंग वॉक करून घरी येताना ठेच लागून तोंडावर पडलो. फ़ूटपाथ वरील फरशी तुटली होती. डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाली लोकांच्या मदतीने उठून घरी आलो सोसायटीच्या समोरच पडल्याने चालत घरी आलो. शेजारच्या कनवाळू डॉक्टर बाईंनी शाश्वत हॉस्पिटलला मला घेऊन गेले व ऍडमिट केले. कॅशलेस.वैद्यकीय विमा होता त्यामुळे पुढील सर्व गोष्टी हॉस्पिटलने केल्या. ऒपरेशन करुन प्लेट मनगटात टाकली. एनेस्थिशिया मधे अजून काही अडचणी आल्या त्यामुळे आयसीयू व व्हेंटिलेटर लावावा लागला
  • Log in or register to post comments

लहानपणी अकबर-बिरबलाची गोष्ट

सुक्या
गुरुवार, 06/05/2025 - 23:22 नवीन
लहानपणी अकबर-बिरबलाची गोष्ट वाचलेली. ५ प्रश्नांचे एकच उत्तर. तसेच तुमच्या "अपघात झाल्यास कोण जबाबदार?" ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. जबाबदार आहे ती "जनता". मी हे गमतीने नाही तर अगदी सिरियसली बोलतोय. जोपर्यंत भारतीय मुलांना / तरुणांना सार्वजनीक ठिकाणी कसे वागावे ह्याचे शिक्षण मिळत नाही तोवर ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. तुम्ही जबाबदारी ढकलुन पोलिस, गावगुण्ड, अतीक्रमण, भ्रष्टाचार यांना कितीही जबाब्दार धरले तरी या सार्‍या समस्येचे मुळ एकच आहे "बेशिस्ती". त्यावर ईलाज एकच आहे. जनतेने शिस्तीत वागावे. फक्त उदाहरणादाखल घ्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपरीवर खायला जे लोक येतात त्यांना तिथे यायला कुणी जबर्दस्ती करते का? मग त्याचे खापर कुणावर फोडणार? जर कुणी तिथे खाल्लेच नाही तर ती टपरी तिथे राहणार नाही. असो. भारतीय लोकांची बेदरकारी फक्त भारतातच नाहीये. परदेशात ही बरेच लोक असेच वागतात. भारतीय लोकांचा सिविक सेंस हा गमतीचा विषय आहे. तीच गत स्वच्छतेची. तेव्हा दुसर्‍यांवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे ईतकाच सल्ला देईन.
  • Log in or register to post comments

कायदा व सुव्यवस्था

प्रकाश घाटपांडे
Fri, 06/06/2025 - 11:09 नवीन
जनता बेशिस्तीने वागत असल्यास कारवाई चे अधिकार पोलिसांना आहेत. ९० टक्के लोक जर कायदा धाब्यावर बसवत असतील तर अराजक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

तीच गत फळे , भाजीपाला विकणार्यांची

सौन्दर्य
गुरुवार, 06/05/2025 - 23:34 नवीन
आज सर्वच मोठ्या शहरात रस्त्यावर फळे, भाजीपाला विकणार्याची आणि त्यांच्याकडून विकत घेणाऱ्याची संख्या प्रचंड वाढली आहे. हे विक्रेते संपूर्ण फुटपाथ, खुपसा रस्ता अडवून उभे राहतात. मंडईपेक्षा त्यांचा माल स्वस्त मिळत असल्यामुळे मंडई ओस पडलेली असते व रस्ते व्यापलेले असतात. वर सुक्यानी म्हंटल्याप्रमाणे अश्या सर्व विक्रेत्यांवर बहिष्कार घालणे हाच एक मार्ग रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याचा आहे.
  • Log in or register to post comments

आपल्या देशातील लोकांना

विवेकपटाईत
Fri, 06/06/2025 - 09:58 नवीन
आपल्या देशातील लोकांना कायद्यांचे पालन न करण्याचे बाळकडू लहानपणा पासून पाजले जाते. एक ही पालक बगीच्यात क्रिकेट खेळू नका गवत खराब होईल असे मुलांना म्हणत नाही. बिना हेलमेट घालून जाणार्‍या अवयस्क तरुणांना त्यांचे आई वडील कधीच जाब विचारत नाही. कचरा कुठे ही फेकला जातो. आज नालीची सफाई झाली असली की दुसर्‍या दिवशी पासून दुकानदार आणि रहवासी नालीत कचरा ओतून ती लवकर पुन्हा भरली जाईल याचा बंदोबस्त करतात. चालत्या गाडीतून, रस्त्यावर, कार्यालयात पानाची पीक ओकली तरी कुणी आक्षेप घेत नाही इत्यादि. जनता ही व्होट बँक असल्याने सरकार ही दुर्लक्ष करते. बाकी या सर्वांचा परिणाम जनतेलच भोगावा लागतो. हिंदीतली "जैसी करनी वैसी भरनी" ही म्हण भारतीय लोकांना तंतोतंत लागू पडते।
  • Log in or register to post comments

मुघलांचा इतिहास इतक्या

सुबोध खरे
Fri, 06/06/2025 - 10:25 नवीन
मुघलांचा इतिहास इतक्या विस्तृत प्रमाणात शिकवण्यापेक्षा नागरिकशास्त्र सविस्तर पणे शिकवणे आवश्यक आहे. दुसर्याच्या त्रासाची अजिबात फिकीर न करणे हे बहुसंख्य वेळेस होणाऱ्या अपघातांचे कारण आहे. मग यात बेशिस्त पार्किंग असो कि उलट दिशेने गाडी चालवणे असो कि सिग्नल तोडणे, वेगाने गाडी चालवणे, किंवा वेळेवर ब्रेकचे सर्व्हिसिंग न करणे असो. डीजे लावून मिरवणूक काढणे, ढोल ताशे वाजवत रस्ता बंद करून वरात/ मिरवणूक नेणे ( यात नवरात्र आणि गणपती विसर्जन येते), मशिदीवर बेफाट आवाजात दिवसात पाच वेळेस अजान देणे हा याच मनोवृत्तीचा परिणाम आहे. दुसऱ्याला त्रास देऊ नये हे आपल्याला नागरिकशास्त्रात शिकवलेच जात नाही. राज्यसभेच्या निवडणूका कशा होतात, लोकसभेचे सदस्य किती आणि विधानसभेचा अध्यक्ष कसा निवडला जातो याच बरोबर नागरिकांची कर्तव्ये काय हे किमान पाच वर्षे तरी शिकवले गेले पाहिजे. उगाच तीन भाषा आणि कार्यानुभव शिकवण्यापेक्षा या गोष्टी शिकवल्यातर याच मुलांचे आयुष्य पुढे थोडे अधिक सुसह्य होईल. ( त्यांच्या आयुष्यकाळात भारताची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता नाही)
  • Log in or register to post comments

सिव्हिक सेन्स

प्रकाश घाटपांडे
Fri, 06/06/2025 - 11:05 नवीन
सोसायटी असो वा अपार्टमेन्ट : आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे. वरच्या मजल्यावर राहणारे मोठ्यांदा आवाज करतात, सतत फर्निचर हलवतात, जोरात गाणी लावतात.. अश्या सततच्या आवाजांमुळे मानसिक शांतता बिघडू शकते..म्हणून civic sense हा लहानपणापासूनच बिंबवला पाहिजे, नुसता १० मार्कांकरिता असून काही उपयोग नाही महाराष्ट्र टाइम्स - ॲड. रोहित एरंडे © पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर https://vedhkaydyacha.blogspot.com/2025/03/blog-post_25.html
  • Log in or register to post comments

पहिल्यांदा हे मान्य केले पाहिजे

स्वधर्म
Fri, 06/06/2025 - 17:24 नवीन
पहिल्यांदा हे मान्य केले पाहिजे की, - आपण सर्व जगात महान नाही. - आपली संस्कृती सर्वात महान नाही - आपण प्रगत झालो नाही, ते खूप दूर आहे. थोडक्यात आपण खूप मागास समाज आहोत. हे मान्य केले तरच सुधारणेला वाव आहे. असं म्हणतात की प्रश्न आहे हे मान्य करणे हीच प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा