Skip to main content

मृत्युंजय

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 09/05/2009 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
(आमचे मित्र श्री. चंद्रशेखर महामुनी ह्यांच्या सौजन्याने त्यांचे मित्र श्री. मंदार चोळकर यांनी लिहिलेली हि अप्रतीम कविता आम्हाला मिळाली, मंदार यांच्या परवानगीने ही मिपावर प्रसिद्ध करत आहे.) धड धड धड रथचक्र निघाले, उधळीत धूळ अंबरी, अवतरला......मृत्युंजय संगरी मित्राच्या वचनास जागतो, दिला शब्द तसेच वागतो... कवच कुंडले सहज त्यागतो, स्वाभिमानी असून ठरला...जो अहंकारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी अवध्य नाही, ज्याला माधव,तुच्छ गांडिव, दुर्बळ पांडव... स्पर्शला ज्या, कवचीत पराभव... आसूड होऊन बरसे घेऊन...सूड जो अंतरी ! अवतरला......मृत्युंजय संगरी पराक्रमी जो....जो महादानी, असा जन्मला नाही कोणी... परशुराम शिष्योत्तम असुनी... कपटाने लढला, महारथी... तो अत्याचारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी सज्ज होइ म्हणे अर्जुना, सावध करतो तो श्रीकृष्णा नव्हेच पोकळ रणगर्जना... सूत पुत्र का उगाच झाला...कौरव सेना अधीकारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी जसे वीजांचे ...चाले तांडव, तसे भयंकर लढती बांधव... युद्ध निर्णय...होय असंभव... कोण डावा..कोण उजवा...सर्वश्रेष्ठ धनुर्धारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी इंद्रवज्र अन् सुर्यकिरण हे... पुन्हा न व्हावे...असेच रण हे... साशंकीत का आज मरण हे.. प्रशनचिन्ह का प्रथम उमटले...असे कुरुक्षेत्री ! अवतरला......मृत्युंजय संगरी बाण थकले...त्राण ही नाही... प्राण आता...कंठाशी येई... शक्ती संपली ...युक्ती न काही, कुणी न पुढती येतो, जातो... कुणी न माघारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी शाप गुरुचा घातक ठरला, अस्त्रे शस्त्रे कर्ण विसरला... दैवगतीचा फेरा कसला ? त्यात रथाचे चाक अडकले....धरतीच्या उदरी ! अवतरला......मृत्युंजय संगरी हताश राधेय उतरे खालती, घाम ओघळे...भाळावरती... सांगे तेव्हा...पार्थसारथी... हीच संधी, आहे अर्जुना... सोड नियम अन् शस्त्र घे हाती...दुश्कुर्ती संव्हारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी बाण ताणला...स्मरुन देवता, मृत्युंजय मृत्युस भेटता... धडावेगळे शीर जाहले.. पुत्र कुंतीचे पाच राहीले.. एक संपले शापित जीवन...स्वकुळास उद्धारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4097
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

परा, मृत्युंजय खासच! बाण ताणला...स्मरुन देवता, मृत्युंजय मृत्युस भेटता... धडावेगळे शीर जाहले.. पुत्र कुंतीचे पाच राहीले.. एक संपले शापित जीवन...स्वकुळास उद्धारी ! अवतरला......मृत्युंजय संगरी कर्ण ही व्यक्तिरेखा 'मर्मबंधातली ठेव' आहे! क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

कर्णाची शोकांतिका झाली पण त्याची बीजे अधर्माने केलेल्या कृत्यांमध्ये दडली होती. कृष्णाने अर्जुनाला बाण मारवयास सांगितला तेंव्हा कर्णाने हा धर्म नव्हे असे सांगितले.. तेंव्हा कृष्णाने.. लाक्षागृह, द्रॉपदीवस्त्रहरण, चक्रव्यूहामधे अधर्माने समूहाने मिळून केलेला अभिमन्यूचा वध ज्यामधे कर्ण सहभागि होता,...ईत्यादी अनेक गोष्टींचे स्मरण करून देऊन ....त्यावेळी दुर्योधनास हे अयोग्य असे न सांगता साथ देणार्‍या कर्णा ; तेव्हा कूठे गेला होता तुझा धर्म ? असे विचारले... तेव्हा कर्ण निरूत्तर झाला.... त्यामूळे शोकांतिका झाली खरी कर्णाची. पण त्यास कारण तोच होता..... विषवृक्षाच्या सावलीमधे बसून त्याला पाणी घालून, त्याची फळे खाल्यावर अजून काय होणार..... एच.बी.

सही रे परा .. अश्याच मस्त मस्त कविता टाकत रहा. भिक्कारड्या विडंबनांनी वैताग आला.

In reply to by आनंदयात्री

भिक्कारड्या विडंबनांनी वैताग आला.
यात्रीजी ... हिण आणि हिणकस विडंबणांबद्दल आपलं हेच मत नाही ना ?

क्रांती म्हणते ते खरेच् आहे... मर्मबंधातली ठेवच.! वा ! परा ! काय दिसते आहे.. आपल्या कर्णाची कविता..! मस्त रे..!