Skip to main content

प्रभावी भाषणासाठी...

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/12/2021 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील काही जणांवर आपले व्यवसाय वगळता सार्वजनिक मंचावर छोटेमोठे भाषण देण्याचा प्रसंग कधीतरी येतो. अशा प्रसंगांमध्ये कौटुंबिक मेळावा, मित्रांचे संमेलन, सामाजिक उत्सव आणि विविध विशेष दिनांचे कार्यक्रम इत्यादींचा समावेश होतो. माझ्यावर अशी वेळ आतापर्यंत बरेचदा आलेली आहे. तेव्हा आपल्यासमोर उपस्थित असणारा श्रोतृवर्ग हा विविध वयोगटांतील आणि विभिन्न प्रकृतींचा असतो. अशा प्रसंगी थोड्या वेळात प्रभावी बोलणे ही एक कला आहे. ही कला मी प्रयत्नपूर्वक विकसित करीत राहिलो. त्यासाठी काही थोरामोठ्यांच्या भाषणांचा व त्यांच्या मेहनतीचा अभ्यास केला. माझ्यावर झालेले शालेय शिक्षकांचे संस्कारही यासाठी उपयोगी पडले. तसेच वक्तृत्वकलेसंबंधी काही पुस्तके वाचली. या अभ्यासातून माझ्यावर काही चांगल्या वक्त्यांच्या कृतींचा प्रभाव पडला. पुढे त्यात स्वानुभवाने काही भर घालता आली. या संदर्भातील काही रंजक व रोचक माहिती, अनुभव आणि किस्से आपल्या सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी हा लेख लिहितोय. माझ्याप्रमाणेच इथल्या वाचकांमध्येही काही हौशी वक्ते असू शकतील. त्यांनीदेखील आपापले असे अनुभव प्रतिसादांमध्ये जरूर लिहावे ...

१.

सुरुवात करतो नामवंत साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या संदर्भातील एका प्रसंगाने. हा किस्सा रवींद्र पिंगे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे. एकदा शिक्षणदिनाच्या निमित्ताने आकाशवाणीने पुलंना अवघ्या ४ मिनिटांचे भाषण देण्यासाठी बोलावले होते. पिंगे तेव्हा तिथले अधिकारी होते. त्यांचा अंदाज होता की, पुलं भाषणाच्या फार तर तासभर आधी येतील आणि उत्स्फूर्तपणे ते छोटेसे भाषण ठोकून देतील ! परंतु तसे अजिबात घडले नाही. पुलं पिंगे यांना दोन दिवस आधी भेटायला गेले. त्यांनी त्यांच्याशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली. आधी या विषयावर कोण कोण व काय बोलून गेले आहे, त्याची सुद्धा चौकशी केली. मग भाषणाच्या तयारीसाठी २४ तास मागून घेतले. घरी गेल्यावर पुलंनी त्यावर पुरेसा अभ्यास करून अडीच पानी मजकूर तयार केला. दुसऱ्या दिवशी ते आकाशवाणीत गेले. तिथे त्यांनी आधी भाषणाची तालीम केली आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी तयार होऊन बसले. हे छोटेखानी भाषण त्यांनी बरोबर ३ मिनिटे ५९ सेकंदात बसवले होते. एका लहानशा भाषणासाठी पुलंसारखा मुरब्बी साहित्यिक किती मेहनत घेतो हे वाचून मी थक्क झालो. श्रोत्यांना प्रेमात पाडणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणारे भाषण देण्यासाठी ते किती परिश्रम करीत हे यातून शिकता आले. …

२.

दुसरा किस्सा आहे इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान आणि साहित्यिक विन्स्टन चर्चिल यांचा. ते पट्टीचे वक्ते होते पण त्यांनी कधीही उत्स्फूर्त भाषण केले नाही. ते भाषणाची पूर्वतयारी अगदी कसून करीत. आधी उत्तम मसुदा तयार करीत. तो झाला की स्वतःच्या बायकोला तो खणखणीत आवाजात पण संथपणे वाचून दाखवत. अगदी पाच मिनिटांचे औपचारिक भाषण असले तरी त्याच्या ६-७ तालमी ते घरी करीत. अंघोळीच्या वेळेस ते आपले भाषण स्वतःलाच मोठमोठ्याने म्हणून दाखवत. प्रत्यक्ष भाषणाचे वेळी मात्र ते भाषण वाचून दाखवत. त्यांचे कुठलेही भाषण १५ मिनिटांच्या आत संपणारे असे हेही एक विशेष. बोलण्याची मंदगती आणि थांबत थांबत बोलण्याची पद्धत ही त्यांची खास वैशिष्ट्ये. अशी दांडगी मेहनत केल्यानेच त्यांना वक्तृत्वात उत्तुंग यश मिळाले. त्यांच्या कित्येक भाषणांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्यांची तडाखेबंद विक्री झाली. एकेकाळी आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या या मुत्सद्द्याची भाषण-पूर्वतयारी पाहून आपण स्तिमित होतो. लेखन असो वा भाषण, कठोर परिश्रमाला पर्याय नाही हेच त्यांच्याबद्दलच्या या माहितीतून मला शिकता आले. वरील दोन नामवंत उदाहरणे दिल्यावर एक मुद्दा स्पष्ट करतो. आपण जरी या मंडळींसारखे व्यावसायिक वक्ते नसलो, तरीही त्यांचा तयारी व मेहनतीचा गुण आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. एखाद्या मर्यादित परिचित समूहात देखील जर आपण तयारीनिशी व परिपक्वतेने बोललो, तर त्याचेही वेगळेच समाधान मिळते. आपल्या छोट्याशा पण चांगल्या बोलण्याला मिळालेली श्रोत्यांची दाद आनंददायी व उत्साहवर्धक असते. ...

३.

आता वळतो एका मार्गदर्शक इंग्लिश पुस्तकाकडे. त्याचे नाव आहे Write better, Speak better. लेखकद्वयाची नावे आता आठवत नाहीत. ते रीडर्स डायजेस्टचे प्रकाशन आहे. एका शब्दात सांगायचे तर हे पुस्तक म्हणजे बावनकशी सोने आहे ! मी ते वयाच्या तिशीच्या आतच वाचले. पुस्तकाच्या शीर्षकात दोन कलांचा उल्लेख आहे. या कलांमध्ये मला आजपर्यंत जी काही थोडीफार गती मिळाली त्याबद्दल मी या पुस्तकाचा कायम ऋणी आहे. उत्तम लिहिणे व बोलणे यासंबंधी पुस्तकात मिश्कील शैलीत अमूल्य मार्गदर्शन आहे. (त्यापैकी लेखनकलेसंबंधी मी या संस्थळावर अन्यत्र प्रतिसादांमधून पूर्वी काही लिहिले आहे). पुस्तकातील बरेचसे आता विसरलो आहे, पण जे एक-दोन मुद्दे तेव्हापासून मी आत्मसात केले ते चांगलेच लक्षात आहेत. पहिला मुद्दा आहे वक्त्याच्या आत्मविश्वासासंबंधी. लेखकाने एक काल्पनिक परिस्थिती वर्णिली आहे. त्यामध्ये एखाद्या सामान्य हौशी वक्त्यासाठी काही सूचना केली आहे. समजा, एखाद्या सार्वजनिक मंचावर भाषणांचा कार्यक्रम आहे. त्यांमध्ये एक जण सामान्य माणूस आहे आणि बाकीची सर्व तालेवार मंडळी आहेत-अगदी वक्तृत्व शिरोमणी वगैरे. त्यांच्यापैकी एखादा अगदी राष्ट्रप्रमुख सुद्धा असू शकेल ! अन्य मंडळी देखील उच्चपदस्थ मान्यवर आहेत. वरील सर्वांनाच क्रमाने बोलायचे आहे. आता इथे गोची होते ती त्यातल्या सामान्य माणसाची. समारंभ सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावर या सगळ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे प्रचंड दडपण येते. त्याच्यात क्षणभर कमालीचा न्यूनगंड येतो. इथे या पुस्तकाचे लेखक त्याला बळ देतात. कसे, ते त्यांच्याच शब्दात लिहितो : “अशा वेळेस वरील वक्त्यांच्या समूहातील सामान्य माणसाने अजिबात बिचकू नये. मनात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. जगातील प्रत्येक माणसात कुठला ना कुठला गुण हा जबरदस्त असतो. हा जो गुण आहे तो बाजूच्या अन्य वक्त्यामध्ये बिलकुल नाही असे समजा. त्यांचे गुण त्यांच्यापाशी, पण ‘मी’ हा मीच आहे ही भावना पक्की करा. मग तुमची पाळी येईल तेव्हा निर्भिडपणे जे काय बोलायचं आहे ते मनापासून बोला. तुमचे भाषण सुद्धा लोक उचलून धरतील” अशी भावना जर प्रत्येक होतकरू वक्त्याने मनात ठेवली तर त्याचा आत्मविश्वास नक्की उंचावेल. पुस्तकातील या सूचनेचा मला काही प्रसंगात चांगला उपयोग झाला आहे. वक्तृत्वासाठी लागणाऱ्या निर्भिडपणाची त्यामुळे सुरेख जोपासना करता आली. आपले भाषण फुलवण्यासाठी आपण बरेचदा म्हणी, वाक्प्रचार आणि थोरामोठ्यांची अवतरणे इत्यादींचा वापर करतो. त्या संदर्भात पुस्तकात काही चांगल्या सूचना आहेत. शंभर वर्षे जुन्या म्हणी, घासून गुळगुळीत झालेले वाक्प्रचार, सुमार कोट्या, इत्यादी गोष्टी भाषणात कटाक्षाने टाळा, नव्हे गाळा, असे लेखकांचे आग्रही प्रतिपादन आहे. या स्वरूपाच्या गोष्टी आपण भाषणात अंतर्भूत केल्याने त्यावर श्रोत्यांकडून रटाळपणाचा शिक्का बसण्याचा धोका असतो. अन्य लोकांची अवतरणे अगदी गरज असली तरच आणि ते सुद्धा संपूर्ण भाषणात एखादेच वापरावे हेही चांगले. ज्या सभांमध्ये वक्त्याला ‘माइक’ (microphone)चा वापर करून बोलायचे असते त्यासंदर्भात काही मौलिक सूचना या पुस्तकात आहेत. आता त्याबद्दल पाहू : अ) माइक वापरून बोलताना एक घोडचूक अनेक जण करतात. आपले बोलणे सुरू करण्यापूर्वी समोरच्या माइकमध्ये जोराची फुंकर मारून आवाज उमटतो का, ते पाहतात. हे अत्यंत अयोग्य आहे. अनेक वक्त्यांनी अशाप्रकारे माइकमध्ये वारंवार फुंकर मारल्याने आपल्या तोंडातील बाष्प त्यात जाऊन साठते व लवकरच त्याच्यातील विद्युत यंत्रणा खराब होते. म्हणून ही सवय कटाक्षाने मोडली पाहिजे. त्याऐवजी माइक हातात घेतल्यावर श्रोत्यांकडे दूरवर पहात, “हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना सर्वांना ?” असे स्पष्टपणे विचारावे हे उत्तम. (माइक हातात घेणाऱ्या प्रत्येकाने अशी फुंकर मारून ठेवणे हे पुढच्या वक्त्याच्या अनारोग्याला निमंत्रण देत असते. सध्याच्या महासाथीच्या काळात तर हा मुद्दा अधोरेखित व्हावा). आ) काही सभांमध्ये एखाद्या वक्त्याला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा असतो. अशा भाषणांमध्ये बहुतेकांकडून एक चूक सतत होत राहते. वक्त्याच्या समोर माइक असतो. पण वक्ता परिचय करून देताना सलग श्रोत्यांकडे न बघता मध्येमध्ये काटकोनात मान वळवून पाहुण्यांकडे बघत राहतो. यामुळे होते असे की, त्याचे निम्मेअधिक बोलणे माइकच्या कक्षेत येत नाही आणि श्रोत्यांना ऐकूच जात नाही. इथे वक्त्याने एक महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे. पाहुण्यांचे नाव, हुद्दा आणि परिचय हे सर्व सुस्पष्टपणे सांगताना तोंड पूर्णपणे माइकसमोर आणि नजर श्रोत्यांकडेच ठेवली पाहिजे. आपले सर्व बोलणे संपल्यावरच पाहुण्यांकडे मान वळवून त्यांना अभिवादन करावे. भाषणाची पूर्वतयारी, त्याचा गाभा, प्रत्यक्ष संवादफेकीचे कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबी यासंबंधी कितीतरी चांगली माहिती या पुस्तकातून मला समजली. अशा या सुंदर पुस्तकाबद्दल लेखक आणि प्रकाशक यांना मनोमन वंदन ! ...

४.

आता अजून एका पुस्तकाबद्दल. ‘सभेत कसे बोलावे’ हे माधव गडकरी यांचे छोटेखानी पुस्तक आहे. त्यातून काही मूलभूत गोष्टी शिकता आल्या. चांगल्या वक्तृत्वासाठी चौफेर वाचन व मननाची गरज लेखकाने अधोरेखित केली आहे. श्रोत्यांना आपला एखादा विचार पटवण्याची काही माध्यमे असतात. त्यापैकी विनोद हे सर्वात मोठे व उपयुक्त माध्यम असल्याची टिपणी त्यात आहे. महत्वाचे म्हणजे भाषणाची सुरुवात हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे लेखक सांगतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “जो वक्ता पहिल्या पाच मिनिटात सभा ताब्यात घेतो तो अर्धी लढाई जिंकतो”. या विवेचनातून मी भाषणाची सुरुवात नेहमी आकर्षक व प्रभावी होईल याकडे विशेष लक्ष दिले. वेळोवेळी त्याची पसंती श्रोत्यांकडून मिळाली. आपल्या भाषणातील शब्दांचे सुस्पष्ट उच्चार हा या कलेतील एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी बोलण्याच्या बाबतीत काही जोडाक्षरे आणि पुढे विसर्ग असलेल्या काही अक्षरांचे उच्चार कष्टपूर्वक व्यवस्थित करावे लागतात. स्वतःचे उच्चारण सुधारण्यासाठी एक रोचक सूचना मी एका साप्ताहिकातील लेखात वाचली होती. ती आता लिहितो. त्या लेखकाने असे म्हटले होते की, पुढील वाक्य सर्व वक्त्यांनी रियाज केल्यासारखे रोज अनेक वेळा स्वतःशी मोठ्याने म्हणावे : “पश्चिमेकडून जो माझा मित्र आला तो माझा जीवश्च कंठश्च मित्र होता”. वरील वाक्य वारंवार म्हटल्याने आपल्या स्वरयंत्राच्या विविध भागांना नियमित व्यायाम होत राहतो. त्यातून आपले उच्चार सुस्पष्ट राहतात. पूर्वी मी हे वाक्य स्नानगृहात असताना नियमित रोज १० वेळा म्हणायचो. अलीकडे मात्र अंगात आळस भरला आहे. नव्या लेखनाचा विषय सुचणे असो किंवा भाषणाची मोठ्याने तयारी करणे असो, त्यासाठी स्नानगृह हे खरोखरच उत्तम ठिकाण आहे असा (चर्चिलप्रमाणेच) माझाही अनुभव ! तिथे आपल्याला मिळणारा खाजगी अवकाश आणि निवांत मनस्थिती या गोष्टी दोन्ही कलांच्या विकासाच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत. ....

५.

एखाद्या समूहातील संभाषण हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो. व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनापासूनच होते. शालेय शिक्षकांचे संस्कार त्या दृष्टीने अर्थात महत्त्वाचे ठरतात. या संदर्भात आमच्या एका शिक्षकांची आठवण सांगतो. शिकवण्याच्या ओघात त्यांनी एकदा एक महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली. बऱ्याचदा समूहात वावरताना समाजातील एखादा कटू, अप्रिय किंवा गडबडघोटाळ्याचा विषय निघतो. अशा वेळेस, जर त्याच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा आपण उल्लेख करणार असू तर त्या संदर्भात तारतम्य बाळगले पाहिजे असे त्यांचे मत होते. अशा वादग्रस्त घोटाळ्यासंदर्भात बोलताना कुठल्याही व्यक्तीचे थेट नाव घेऊ नका अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली. थेट नाव घेण्यापेक्षा त्या व्यक्तीचे अप्रत्यक्ष वर्णन करावे. ते जर हुबेहूब जमले तर तिचे नाव न घेताही श्रोत्यांना जे काही समजायचे ते बरोबर समजते ! नंतर मोठे झाल्यावर या शिक्षकांचा हा सल्ला अधिक उमजला. कोणावरही जर आपण पुराव्याविना काही जाहीर आरोप करत असू तर ते अत्यंत बिनबुडाचे ठरतात. उलट, जर का आपण नाव घेऊन कोणाबद्दल असे काही वावगे बोललो तर बदनामी केल्याचे किटाळ आपल्यावर येऊ शकते. त्यादृष्टीने आमच्या गुरुजींची ही शिकवण मौलिक होती. आज समाजात जेव्हा काही वाचाळवीर येता जाता काही व्यक्तींची नावे घेऊन खुशाल वाटेल ते बरळताना दिसतात तेव्हा आमच्या या शिक्षकांची वारंवार आठवण होत राहते. ...

६.

वयाची चाळिशी उलटल्यानंतर आम्ही काही सहकारी मित्रांनी मिळून एक ‘वाट्टेल ते’ या स्वरूपाचा भाषणकट्टा चालवला होता. त्याच्या संयोजनाची जबाबदारी मी आपण होऊन स्वीकारली होती. त्यासंबंधी एक स्वतंत्र लेख, ‘कथा एका कट्ट्याची’ यापूर्वीच इथे लिहिला आहे. त्या उपक्रमातूनही भाषणासंबंधी बरेच काही शिकता आले. त्यात आम्हा मित्रांपैकी क्रमाने प्रत्येक जण काही दिवसांच्या अंतराने सर्वांसमोर बोलत असे. या उपक्रमातून आपल्या अन्य सहकारी मित्रांच्या बोलण्याची लकब, देहबोली, संवादक्षमता, आवाजातील चढ-उतार आणि विनोदनिर्मिती अशा गुणांचे निरीक्षण मला जवळून करता आले. त्यातून स्वतःच्या वक्‍तृत्व विकासाला चांगली चालना मिळाली. उत्स्फूर्त ( किंवा आयत्या वेळी विषय समजल्यानंतर ) बोलणे ही देखील एक वेगळी कला आहे. त्यासाठी संबंधित भाषणाची ' तयारी' हा भाग उद्भवत नाही. परंतु, एकंदरीत आपल्या आयुष्यातील वाचन, चिंतन, मनन आणि बहुश्रुतता या शिदोरीवर ते करता येते. जेवढी या गोष्टींची बैठक असेल त्यानुसार ते वठते. …

७.

प्रत्यक्ष गुरु, पुस्तकरूपी ज्ञान आणि अन्य वक्त्यांचे निरीक्षण या सर्व प्रकारांनी आपण आपली वक्तृत्वकला घडवत जातो. वयानुसार जसे आपण या कलेत मुरत जातो तशी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. वरील सर्वांपेक्षाही आपला सर्वोत्तम गुरु असतो तो म्हणजे स्वानुभव ! भाषणादरम्यान आपल्या हातून घडलेल्या चुका आपल्याला नंतर जाणवतात. अन्य वक्त्यांकडून वारंवार घडणाऱ्या चुकांचेही निरीक्षण होत राहते. विविध सभांमध्ये काही मूलभूत शिष्टाचार पाळले जातात किंवा नाही, हेही नजरेत भरते. अशा निरनिराळ्या चुका आपल्या पुढच्या भाषणात होणार नाहीत याची आपण खबरदारी घेऊ लागतो. समाजात काही सभांमध्ये वक्त्यांची ठराविक रटाळ छापील वाक्ये, बोलण्याच्या पद्धती आणि वेळखाऊपणा हे वर्षानुवर्ष चालू असलेले दिसते व ते खटकते. अशा काहींचा आता आढावा घेतो. समजा, एखाद्या सभेत सात-आठ जण ओळीने बोलणार आहेत. सुरुवातीच्या दोन-तीन वक्त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे ते म्हणजे, आपल्याला नेमून दिलेली वेळ आपण पाळावीच. जर आपण त्या वेळेचे उल्लंघन करत राहिलो तर आपण तळाच्या क्रमांकाच्या वक्त्यांवर अन्याय करीत असतो. पण वास्तवात बहुतेकदा हे वरचे श्रोते वेळमर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे बिचाऱ्या तळातील वक्त्यांची बोलण्याची वेळ येते तेव्हा बहुतेकदा श्रोते कंटाळलेले असतात ! श्रोत्यांच्या कंटाळलेपणाचे भान तळाच्या वक्त्यांनी (नाइलाजास्तव) बाळगणे गरजेचे आहे. पण इथेही तसे होत नाही. जेव्हा असा तळाच्या क्रमांकावरील वक्ता बोलायला उठतो तेव्हा उगाचच वेळ खाणारी काही रटाळ वाक्ये कशी बोलली जातात त्याची ही जंत्री :

• “माझ्या आधीच्या दिग्गज वक्त्यांनी सगळे काही बोलून ठेवल्याने खरंतर मला आता बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही..”

• “श्रोतेहो, तुम्ही सगळे आता कंटाळले असाल व चहापानासाठी/ घरी जायला उत्सुक असाल. तेव्हा मी काय तुमचा फार वेळ घेत नाही”... (असे म्हणून पुढे भाषणाचे रटाळ लांबण लावणे ! ).

• भाषण सुरू करताना व्यासपीठावरील सर्वांची नावे त्यांच्या हुद्दा व बिरुदांसकट सर्व वक्त्यांनी पुन्हा पुन्हा घेत बसणे, हे तर श्रोत्यांसाठी महाकंटाळवाणे. ....आणि शेवटी...

• आभार प्रदर्शन करणाऱ्याच्या तोंडचे ठराविक नकोसे वाक्य, “तुम्ही जरी आता खूप कंटाळला असलात तरी आभार प्रदर्शनाचे ‘गोड काम’ माझ्याकडे आलेले आहे आणि मी ते अगदी थोडक्यात(?) करणार आहे ......”

असे अजून काही नमुने विस्तारभयास्तव टाळतो. माझ्या मते वर नमुना म्हणून दिलेली घासून गुळगुळीत झालेली व वेळखाऊ वाक्ये तळाच्या वक्त्यांनी टाळावीत. आपल्याला जो काही निसटता वेळ मिळाला आहे त्यात स्वतःच्या मोजक्याच महत्वाच्या मुद्यांना हात घालावा आणि भाषण नेटके ठेवावे. श्रोत्यांचा उत्साह टिकून असेपर्यंतच वक्त्यांच्या भाषणाला अर्थ राहतो. त्या मर्यादेनंतर तो श्रोत्यांवर झालेला नकोसा भडीमार असतो ! असा हा माझा हौशी वक्तृत्वकलेचा आतापर्यंतचा अभ्यास व प्रवास. त्यातील सुखदुःखे आणि काही रोचक अनुभव तुमच्यासमोर मांडले. प्रतिसादांमधून आपणही आपले अनुभव जरूर लिहा. लेख आणि प्रतिसाद यांच्याद्वारे झालेल्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आपल्या सर्वांचाच मनोविकास घडावा ही सदिच्छा ! ....................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 41693
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by हेमंतकुमार

बरेचदा लोक, अश्या प्रसंगासाठी ठेवणीतले कपडे वापरतात. ते कपडे नेहमीच्या वापरात नसल्यामुळे, एकतर घट्ट किंवा सैल होतात, अजुन बटणे तुटणे, काजे ढिले होणे, खिसा फाटणे असले प्रकार अचानक होतात, आणि मन त्यात गुंतुन जाते. त्यामुळे कपड्यांची आधी चाचणी घ्यावी. जर टाय बांधायची असेल, नेमक्या त्या वेळी जास्त वेळ लागतो. त्यामुळे एकदा मार्गदर्शक चित्रमालिका जवळ असणे महत्वाचे.

मी आठ वर्षे MBA कोर्स साठी शिकवत होतो ... त्यात एक विषय Presentation Skills हा पण होता ... presentation (किंवा भाषण) ची तयारी करताना संभाव्य प्रश्न (आणि त्याची उत्तरे) हा सुध्दा तयारीचाच एक भाग असणे आवश्यक. काही वेळा मुद्दाम असे काही मुद्दे योग्य जागी तोडायचे कि आपल्याला आवश्यक ते प्रश्न येतील ... विशेषतः प्रेझेंटेशन करताना योग्य जागी थांबून काही प्रश्न ? असे विचारणे योग्य ठरते .. श्रोत्यांचा "attention span" हा २० मिनिटांपेक्षा कमी असतो त्यामुळे सलग मोठे प्रेझेंटेशन टाळून प्रश्नोत्तरे वगैरे रुपी ब्रेक देणे श्रेयस्कर ठरते

२ वर्षां पूर्वी जे भाषण लोकसभेत गाजले ते लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी केले होते. हे भाषण वेळ काढुन ऐकावे असेच आहे. जाता जाता :- सोसायटीत जे काही खेळ किंवा इतर उपक्रम व्हायचे त्यात मी लहान असताना भाग घ्यायचो. लोकमान्य टिळक यांच्यावर मी छोटे से भाषण दिले होते. माईक समोर दोन शब्द बोलल्यावर समोरचे लोक अचानक ते भाषण ऐकण्यासाठी शांत झाले होते आणि लोकांच्या गजबजण्याचा आवाज असा शांततेत बदलल्यामुळे माझा गळाच त्या वेळी सुकुन गेला होता. :))) काय बोलावे ते सुचेना... भाषणात पुढे काय पुढे बोलायचे ते आठवेना ! पण नंतर बोलु लागलो... जरासे घाई घाईतच पुढचे भाषण केले [ जसा काही वाघच माझ्या पाठी लागला असावा. ] आणि 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' ही लोकमान्यांनी दिलेली घोषण देऊन ते शेवटी संपवले. दुसरे पारितोषक म्हणुन डिक्शनेरी मिळाली होती, ती अजुन माझ्याकडे आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अच्छा लगता है मुझे उन लोगों से बाते करना, जो मेरे कुछ भी नही लगते...पर फिर भी मेरे बहुत कुछ है |

१.
प्रेझेंटेशन करताना योग्य जागी थांबून काही प्रश्न ? असे विचारणे योग्य ठरते
>>> +११ .................. २. '
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' ही लोकमान्यांनी दिलेली घोषण
>> हे मूळ वाक्य टिळकांनी इंग्लिशमध्ये उच्चारले होते. त्याचा मराठी अनुवाद करताना कित्येक वर्षांपूर्वी एक मूलभूत चूक झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या असंख्य पिढ्यामध्ये ती पुढे चालू राहिलेली आहे. यासंदर्भात एक चांगला लेख मागे मी वाचला होता. त्यात याचे स्पष्टीकरण आहे. आपण इंग्लिश वाक्याकडे नीट पाहिले असता "Swaraj is my birthright, and I shall have it!" योग्य भाषांतर : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच असे आहे. "स्वराज्य" साठी 'ते' असे सर्वनाम आहे दुसरा मुद्दा. जी गोष्ट जन्मसिद्ध अधिकार असतो ती झगडून मिळवण्याचा प्रश्नच येत नाही ! म्हणजेच, वाक्याचे दोन भाग स्वतंत्रपणे विचारात घ्यायचे आहेत : १. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि २. ते स्वराज्य मी मिळवणारच

In reply to by हेमंतकुमार

मराठी अनुवाद करताना कित्येक वर्षांपूर्वी एक मूलभूत चूक झालेली आहे ओह्ह हे माहित नव्हते. यापुढे लक्षात ठेवीन. जन्मसिद्ध अधिकार असल्यानो तो अधिकार मिळवणारच असे ते झाले असावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अच्छा लगता है मुझे उन लोगों से बाते करना, जो मेरे कुछ भी नही लगते...पर फिर भी मेरे बहुत कुछ है |

आजच्या छापील सकाळच्या सप्तरंग पुरवणीत ' नेहरु विरुद्ध मुखर्जी : अविस्मरणीय शाब्दिक द्वंद्व" हा चांगला लेख आहे. भारताची पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये झाली. तेव्हा संसदेमध्ये अनेकांची आक्रमक भाषणे झाली. ती चर्चा हा संसदेच्या इतिहासातील हे एक उत्कृष्ट वाद-विवाद मानला जातो. चर्चेदरम्यान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले घणाघाती भाषण गाजले. सोळा दिवस चाललेल्या चर्चेत संदर्भात दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत ती अशी : 1. Nehru : The debates that defined India 2. Sixteen stormy days

आतापर्यंतच्या चर्चेत आपल्यातील काहीजणांनी जगातील विविध चांगल्या आणि दखलपात्र वक्त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी काहींच्या भाषणांचे दुवे/फिती सुद्धा दिलेल्या आहेत. अशा वक्त्यांची एकूण संख्या २५ झालेली आहे ! मी सहज त्या नावांचे विश्लेषण केले. त्या सर्व वक्त्यांची विभागणी खालील प्रमाणे करता येईल : १. राजकारणी : अब्राहम लिंकन, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, ॲडॉल्फ हिटलर, विन्स्टन चर्चिल, बिल क्लिंटन, जवाहरलाल नेहरू, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, बराक ओबामा, नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, ज्यामयांग नामग्याल. २. साहित्यिक : आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, माधव गडकरी, शिवाजीराव भोसले. ३. अभिनेता : बिल पुलमन ४. अर्थतज्ञ : मिल्टन फ्रीडमन ५. काल्पनिक पात्र : Dwight Schrute. वरील क्रमांक १ व २ च्या गटांपैकी काही जणांचे योगदान त्या दोन्ही क्षेत्रांमध्ये आहे. एखादे नाव राहून गेले असल्यास क्षमस्व. आतापर्यंतच्या चर्चेत अतिशय उत्साहाने भाग घेऊन वरील नामवंत वक्त्यांचे सर्वांना स्मरण करून दिल्याबद्दल मी सर्व संबंधित सभासदांचा मनापासून आभारी आहे !

In reply to by हेमंतकुमार

यात लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन/सेल्फ हेल्पवाल्यांचा पण समावेश करायचा असेल तर त्या विषयातील माझे आवडते वक्ते आहेत- १. वेन डायर २. गॅब्रीएल (गॅबी) बर्नस्टिन ३. बॉब प्रॉक्टर ४. नॉर्मन व्हिन्सेंट पील

सुंदरबाई हॉलला पुस्तक प्रदर्शन लागले होते, तिथं सहज डोकावलो तर हे खालील पुस्तक दिसले होते, अर्थात मी हे विकत घेतले नाही कारण मला इतके अपील झाले नाही. पण असे स्पीच कलेक्शन्स वाचायला मजा येत असेल नाही एकंदरीत ? .

* वाचायला मजा येत असेल नाही एकंदरीत ? >> नक्कीच. असे पुस्तक सावकाशीने सहा महिने घेत वाचल्यास अधिक छान वाटेल.

अनेक प्रकारे करतां येईल. मी मुख्य चार प्रकार केले आहेत. १. शैक्षणिक आणि प्रशिक्षणविषयक. या भाषणात माहिती खच्चून भरलेली असते. कन्टेन्ट रिच. शिस्तबद्ध मांडणी आणि कमी शब्दात सत्याचा शोध घेत जास्तीत जास्त माहिती. तपशिलांना बर्‍याच वेळां उदाहरणांची, आकृत्यांची आणि ध्वनीचित्रांची जोड; यामुळे क्लिष्ट विषय सोपे केलेले असतात. नारळीकर, काकोडकर, माशेलकर, जे आरडी, रतन टाटा, टाटा समूहाचे पेंडसे, मुळगांवकर यांची भाषणे विचारप्रवर्तक असत. वाचून आश्चर्य वाटेल पण अर्थशास्त्र विषयातल्या एम एच्या विद्यार्थ्यांसाठी जॉर्ज फर्नांडीस यांना आमंत्रित केले जात असे. प्रशिक्षणातील भाषणात पालखीवाला यांची ब्रेबॉर्न स्टेडियममधील भाषणे प्रख्यात आहेत. कायद्यात झालेले नवे बदल समजून त्याची औद्योगिक क्षेत्रात व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी भाषणसत्रे, परिषदा भरवल्या जातात. तीही उत्कृष्ट असतात. ठक्कर नावाचे एक तज्ञ वकील कामगार कायद्यात झालेल्या बदलांवर मुंबईला सेन्ट झेविअरमध्ये भाषणे आयोजित करीत. गुणशेखरन नावाचे एक तज्ञ एक्साईज कायद्यावर भाषणे आयोजित करीत. दोन्ही छानच असत. औषध उद्योग नवीन आलेल्या औषधांवर उत्पादन विभागातील व्यक्तींसाठी प्रशिक्षण भाषणे ठेवीत. जागतिकीकरणानंतर औषध उत्पादनविषयक कायदे बदलले. तेव्हाही प्रशिक्षणे आयोजित केली गेली. सरकारतर्फे कांही उत्साही अधिकारी कामगार कायद्यांविषयक तसेच औषध उत्पादन कायद्यांविषयक भाषणे आयोजित करीत. रिचर्ड फेनमन यांचे सन १९५९ सालातले नॅनो तंत्रज्ञानावरील भाषण जगविख्यात आहे. अमेरिकेत सभागृहात तिकीट लावून भाषणे ठेवली जात असत आणि अनेक वेळा सर्व तिकिटे विकली गेल्यावर उभे राहून भाषण ऐकायला कमी दरात तिकीट मिळत असे. असे अनेक वेळां होत असे. चांगल्या भाषणात अपेक्षित प्रश्न, त्यांची उत्तरे बहुधा असतात. नवीन प्रश्नांसाठीही वेळ ठेवलेला असतो. अनेक वेळां मूळ भाषणापेक्षां प्रश्नोत्तरे जास्त रंगतात. २. प्रचारकी भाषणे आणि ३. तत्त्वज्ञानावरील आणि धार्मिक भाषणे. या प्रकारांवर वर बरेच आलेले आहे. मी कधी गेलों नाही म्हणून त्यांबद्दल काही लिहू शकत नाही. ४. ललित विषयांवरील व्याख्याने. यात वसंत व्याख्यानमालेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. म. वा. धोंड, विद्याधर गोखले इ.ची भाषणे ऐकायला बरीच गर्दी जमत असे. छान लेखाबद्दल धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

सुधीरभाऊ सुंदर वर्गीकरण आणि विश्लेषण ! धन्यवाद.
वसंत व्याख्यानमालेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सहमत. यावरून या व्याख्यानमालेचा एक जुना अनुभव. तेव्हा बी जी कोळसे पाटील यांचे व्याख्यान होते. तरुणांसह अनेक जण त्यासाठी उत्सुकतेने आले होते. सगळ्यांचा अंदाज होता की ते मानवत हत्याकांड यासंबंधी बरच काही बोलतील. प्रत्यक्षात त्यांनी भाषणात त्याचा फारसा काही उल्लेख केला नाही आणि ते एकंदरीत कायदा आणि समाज या विषयावरच बोलले. गतवर्षी ही व्याख्यानमाला ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यात एका दिवशी दिलीप माजगावकर यांची मुलाखत घेतली होती. ती छान होती. काही वेळेस नुसते भाषण ऐकण्यापेक्षा मुलाखतीतून अधिक रंजक माहिती मिळते. अर्थात ते मुलाखत घेणारा व देणारा या दोघांच्या कौशल्यावर ठरते.

भाषणे जगभर लोकप्रिय होती. त्यांच्या भाषणांचा संग्रहही पाहिल्याचे आठवते आहे. आल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नोबेलसन्मानार्थ दिलेल्या सर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफीत गेल्यावर्षी कायप्पावर आली होती. ते भाषण सुरेखच होते.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची इंग्रजी भाषणे जगभर लोकप्रिय होती.
ते काय बोलायचे ते श्रोत्यांना समजायचे का? हा खोचक प्रश्न नाही तर हा प्रश्न विचारायचे एक कारण आहे. एकदा मी त्यांचे भारतीय तत्वज्ञानावरील पुस्तक ग्रंथालयातून वाचायला आणले होते. त्यातील इंग्लिश भाषा फारच वेगळ्या आणि खूपच वरच्या पातळीवरील होती. जी.आर.ई ची वर्डलिस्ट करून त्यावेळी थोडाच काळ झाला असल्याने मला इंग्लिश शब्द बरेच येतात असा त्यावेळी गैरसमज झाला होता. पण कुठचे काय. दर वाक्यावाक्याला डिक्शनरी उघडावी लागत होती. असले शब्द बहुतेक शशी थरूरच वापरत असतील. स्वल्पविराम वापरून किंवा nevertheless, albeit, yet वगैरे उभयान्वयी अव्यये वापरून पाचसहा ओळींची मोठी मोठी वाक्ये होती. त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायला एकेक वाक्य तीनचार वेळा तरी कमितकमी वाचावे लागले होते. या प्रकारात पुस्तक वाचायचा आनंदच गेला. त्यानंतर हे पुस्तक वाचायची आणि समजून घ्यायची आपली लायकी नाही हे लक्षात आले आणि तो नाद सोडून दिला. राधाकृष्णन वगैरेंपुढे आपण अगदी छोटे लोक आहोत. अगदी चिलटंच आहोत. तरीही एक गोष्ट जाणवतेच की कोणत्याही प्रकारच्या संवादाचे (लिखित किंवा भाषण) महत्वाचे उद्दिष्ट असते की आपले म्हणणे समोरच्यापर्यंत पोचले पाहिजे. एकदम मोठेमोठे शब्द वापरल्याने किंवा जड वाक्यरचना केल्याने त्यातच अडचण निर्माण झाली तर ते चांगले संवादकौशल्य म्हणावे का? सामान्य लोक-अगदी इंग्लिश मातृभाषा असलेले लोकही जी.आर.ई वर्डलिस्टमधील शब्द दररोजच्या व्यवहारात कधी वापरत नाहीत. त्यापेक्षा दहापट अधिक कठीण शब्द वापरले जात असतील तर संवादात नक्कीच अडचण निर्माण होईल ना? राधाकृष्णन हे खूप 'पोचलेले' आणि सामान्य माणसाच्या पातळीपेक्षा खूप वर होते. एखादी गोष्ट त्यांनी कितीही सोपी करून सांगितली तरी माझ्यासारख्याच्या झेपेपलीकडील असेल कदाचित. पण त्यामुळे लेखक आणि वाचक (किंवा कदाचित वक्ता आणि श्रोता) यांच्यात एक दरी निर्माण होते हे पण तितकेच खरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

लिखित किंवा भाषण) महत्वाचे उद्दिष्ट असते की आपले म्हणणे समोरच्यापर्यंत पोचले पाहिजे. एकदम मोठेमोठे शब्द वापरल्याने किंवा जड वाक्यरचना केल्याने त्यातच अडचण निर्माण झाली तर ते चांगले संवादकौशल्य म्हणावे का?
>>>> अगदीच सहमत. श्रोत्यांना समजणारे बोलणे हे सर्वात महत्त्वाचे. यासंदर्भात एक अनुभव. महाराष्ट्रातील एक बुजुर्ग आहेत. ते तज्ञ असलेल्या कलेचा प्रांत एकदम वेगळा आहे. परंतु ते बऱ्यापैकी लेखन व भाषण या प्रांतातही लुडबूड करीत असतात. त्यांच्या कुठल्याही लेखनातील पहिल्या पाच सहा ओळी वाचल्या किंवा भाषणाची पहिली दोन मिनिटे जरी ऐकले, तरीसुद्धा त्यातील क्लिष्टता आणि रुक्षपणा जाणवतो. पुढचे वाचावे/ऐकावेसे वाटत नाही. कुठलीतरी टोकाची विचार सरणी रटाळपणे मांडून श्रोत्यांना प्रभावित करता येत नाही.

In reply to by हेमंतकुमार

या वरुन अजून एक थोर व्यक्तीमत्व आठवले आपले सर्वांचे लाडके म्हागृ... कोणत्याही समारंभात यांच्या हाती माइक आला की ते जे सुरु होतात त्याला काही तोडच नाही. पैजारबुवा,

म्हागृ.
>>> +११ .... ओबामा यांचे त्यांना निवडणूक जिंकून देणारे भाषण व त्याचे विश्लेषण . आवडले.

वाचतोय सर्व. -दिलीप बिरुटे

लेख आणी प्रतीसाद एक व्हर्च्युअल ब्रेन स्टाँर्मीग झाल्या सारखे वाटले. लेखकांचे अभिनंदन. शीव खेरा यांचे पण वक्तृत्व आवडले. प्रो चक्रवर्ती यांनी क्रिकेटचा सामना घेत मॅनेजमेंट कौशल्य यावर जवळपास तीन तास भाषण दिले होते.

लेख एकपट तर प्रतीसाद दसपट यशस्वी झाले आसे म्हणायचे आहे म्हणून शुद्धिप्रतीसाद. चुक भूल सुधारून घेणे.

पुन्हा एकवार सर्व प्रतिसादकांचे आभार ! चर्चेदरम्यान आपल्यातील अनेकांनी उत्तम वक्त्यांचे संदर्भ देऊन अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणली. यानिमित्ताने आपल्यातील काही हौशी वक्त्यांचे अनुभव सर्वांना समजले. या देवाणघेवाणीतून आपल्या सर्वांना ही कला अधिक विकसित करता येईल.

अ‍ॅड. बाबुराव कानडे यांनी आचार्य अत्रे यांच्याविषयी व्याख्यानांची मालिका केली आहे.. त्यातला पहिला भाग सह्याद्री वाहिनीवर रविवार, दिनांक ९ जानेवारी २०२२ ला सकाळी ११.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. इच्छुकांनी जरुर बघा.

आज सहज युट्युबवर चक्कर टाकली असता खूप पूर्वी दूरदर्शन वर झालेला जसपाल भेटींचा फ्लॉप शोचा एक भाग पहिला. या भागाचे नाव समारंभाचे प्रमुख पाहुणे असे आहे. त्यात प्रमुख पाहुण्यांनी पैसे देऊन भाषण लिहून आणण्यापासून अनेक प्रसंगांची धमाल टिंगल आहे. ज्यांनी पूर्वी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा

प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला. त्यांच्या या प्रभावी वृत्तनिवेदनाने आपण जणू त्यांच्या प्रेमातच पडायचो !

सुधा मूर्ती यांची इंग्रजी भाषणं आवडतात. अरूणा ढेरे यांना दोन महिन्यांपूर्वीच ऐकायला सुरू केलंय,खुप सुंदर आवाज आणि सखोल अभ्यास यामुळे मंत्रमुग्ध होतो. अशियाटिक सोसायटीच्या अनेक व्याख्यानमाला इंटरनेटवर आहेत.प्रत्यक्ष भाषणं फारच कमी ऐकली आहेत.

सुधा मूर्ती यांची इंग्रजी भाषणं आवडतात. अरूणा ढेरे यांना दोन महिन्यांपूर्वीच ऐकायला सुरू केलंय,खुप सुंदर आवाज आणि सखोल अभ्यास यामुळे मंत्रमुग्ध होतो. अशियाटिक सोसायटीच्या अनेक व्याख्यानमाला इंटरनेटवर आहेत.प्रत्यक्ष भाषणं फारच कमी ऐकली आहेत.

रसिक वाचक,ठाणे प्रस्तुत ग-गप्पांचा. पुष्प तिसरे :चंद्रशेखर टिळक त्यांची भाषणशैली आवडली. टिळक आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीचा प्रसंग ऐकण्यासारखा आहे.

यंदाच्या बालदिनी चोपडा येथील रहिवासी चेतना मराठे हिची भारतीय संसद भवनातील मध्यवर्ती कक्षात भाषण करण्यासाठी निवड झाली होती. तिच्या भाषणातून तिने संसद सदस्यांची मने जिंकली. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो. त्यासाठी यंदा देशभरातून 25 विद्यार्थ्यांची निवड झाली होती.