एक माहिती हवी आहे.
शहरात राहणार्या बहुतांश मराठी लोकहो! तुमच्या घरात हिंदीभाषिक कोणीही नसूनही,किंवा तुमच्या अवतीभोवती हिंदी भाषिकांचा घोळका सतत नसूनही आपल्याला सहजपणे हिंदीतून कसं काय बोलता येतं? विशेष परिश्रम न घेताही हिंदी शब्द कसे आठवतात? वाक्ये बरोबर कशी काय तयार होतात मनात? हिंदीतून बोलताना शहरी मराठी लोकांना(विशेषत: महानगरातल्या) मनात मराठी वाक्याचे हिंदीत भाषांतर करावे लागत नाही. सहजपणे बोलता येतं हे भाषांतर न करता सहजपणे एखादी भाषा बोलता येणं मानवी मेंदू कसं शक्य करतो? किंवा हे कशामुळे होतं? हिंदी आणि मराठीत बरेचसे शब्द समान आहेत किंवा हिंदी मालिका ,हिंदी सिनेमे यांच्या भडिमारानेच हे शक्य झालंय का? तसं असेल तर मराठीशी अजिबात मिळतीजुळत्या नसणार्या भाषेतील कार्यक्रम अनेक महिने ऐकले तर त्या भाषेत हिंदी येतं तितक्या सहजपणे बोलता येईल का? म्हणजे मनात मराठी वाक्याचं लक्ष्यित भाषेत भाषांतर न करता?
प्रतिक्रिया
8 Jun 2022 - 8:05 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदी ही लादलेली भाषाय. लहानपणापासून टिवी, क्रिकेट काॅमेंट्री, महाराष्ट्रात जन्मूनही मुद्दाम हिंदी न बोलनारे हिंदीभाषीक, हिंदी सिनेमे, हिंदी टीवी सिरीयल ( आधी फक्त दुरदरश्न चा एकच हिंदी लादनारी वाहीनी होती). ह्या मुळे हिंदी आपोआप बोलली जाते.
9 Jun 2022 - 9:25 am | तुषार काळभोर
लहानपणापासून टिवी, क्रिकेट काॅमेंट्री, महाराष्ट्रात जन्मूनही मुद्दाम हिंदी न बोलनारे हिंदीभाषीक, हिंदी सिनेमे, हिंदी टीवी सिरीयल ( आधी फक्त दुरदरश्न चा एकच हिंदी लादनारी वाहीनी होती). ह्या मुळे हिंदी आपोआप बोलली जाते.
+१
फक्त बळेच लादली जातेय असं वाटत नाही. किंवा केवळ महाराष्ट्रातच लादली जातेय, असं नसावं. सगळीकडे लादली जातेय. बाकी ठिकाणी वाकत नाहीत. आपण वाकतो. बाय द वे, पुण्यात रस्त्यावर जितक्या सहजतेने एखादा दुकानदार, रिक्षावाला हिंदीत बोलतो, तितक्याच सहजतेने अमदाबादेत हिंदी संवाद साधला जातो. अर्थात दोन गुजराती एकमेकांशी गुजरातीच बोलतात.
आपण येथे कमी पडतो, असे वाटते. आपल्याला हिंदी येते, यात प्रॉब्लेम नाहीये, आपण सार्वजनिक वापराची भाषा हिंदी करून ठेवलीये, हा प्रॉब्लेम वाटतो.
8 Jun 2022 - 8:50 pm | साहना
देवनागरी वाचता येत असल्याने हिंदी वाचणे सोपे जाते आणि त्यामुळे आपोआप हिंदी साहित्य वाचन होते. वाचनाने शब्दसंग्रह वाढतो.
9 Jun 2022 - 10:47 am | उपयोजक
हे ही खरे! धन्स
8 Jun 2022 - 10:46 pm | जेपी
1) शाळेत असताना राष्ट्र प्रबोदिनी हिंदी ची परिक्षा 5ते 10 असयची,परिक्षा पास जाहली की प्रमाणपत्र मिळायच.
2) अता व्यवसाय निमीत्त ग्राहकला कळ्णरी भाषा बोलावी लागते. मग हिंदी असो की गुजराती.
बाकी पैसा महत्त्वपूर्ण
8 Jun 2022 - 11:46 pm | सौन्दर्य
मला वाटतं एखादी भाषा सतत कानावर पडत राहिली, त्या भाषेशिवाय आपले दैनंदिन व्यवहार अडत असतील तर नकळत आपण ती भाषा शिकतो. ह्याच्याच विरुद्ध एखादी बोलता येणारी भाषा ऐकू येईनाशी झाली किंवा तिची गरज दुय्यम झाली तर अशी भाषा लगेच विसरायला देखील होते.
माझा जन्म मुंबईत झाला व वयाच्या तिशीपर्यंत मुंबईतच वाढलो. माझे लहानपणीचे मित्र बहुतेक गुजराती व ख्रिश्चन होते. ख्रिश्चन मित्र आपापसात एकतर गोव्याची कोकणी किंवा मंगलोरीयन कोंकणी बोलायचे. गुजराती मित्र अर्थातच गुजरातीतून. मात्र आपापसात बोलायची भाषा हिंदी होती त्यामुळे मराठी बरोबरच, गुजराती, कोकणी व हिंदी भाषा बोलायला सहजच शिकलो. पुढे नोकरीनिमित्ये गुजरातला गेल्यामुळे गुजराती बोलण्याबरोबर लिहू व वाचू देखील लागलो.
गेली कित्येक वर्षे कोकणी बोलायला न लागल्यामुळे त्या भाषेतील अनेक शब्द विसरायला झाले आहेत.
मुंबईत जन्मल्यामुळे हिंदी ही मराठी बरोबरच आपोआप येऊ लागली. पाचवीपासून मराठीच्या शिवाय हिंदी व इंग्रजी भाषा शिकायला लागल्या त्यामुळे हिंदी सतत बरोबर राहिली. वर साहना ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे हिंदी व मराठी देवनागरीतूनच लिहिली जात असल्यामुळे हिंदी शिकताना लिपीचा अडथळा राहिला नाही.
पुढील जीवनात हिंदी चित्रपट, त्यातील सुमधुर गाणी, शेरो-शायरी ह्यामुळे हिंदी जास्तच जवळ आली.
जितक्या जास्त भाषा येत असतील तितके त्या भाषा बोलणाऱ्यांच्या आपण अगदी जवळ जातो.
8 Jun 2022 - 11:56 pm | अमरेंद्र बाहुबली
मात्र आपापसात बोलायची भाषा हिंदी होती त्यामुळे मराठी बरोबरच, गुजराती, कोकणी व हिंदी भाषा बोलायला सहजच शिकलो. पुढे नोकरीनिमित्ये गुजरातला गेल्यामुळे गुजराती बोलण्याबरोबर लिहू व वाचू देखील लागलो.
तुम्ही महाराष्ट्रात राहून तुमच्या गुजराती मित्राशी हिंदीत बोलायचात ,पण गुजरातेत जाऊन गुजराती बोलूच काय लिहू नि वाचूही लागलात. छान! मराठीला शत्रूंची गरज नाही ते का म्हणतात हे कळाले.
10 Jun 2022 - 11:21 pm | सौन्दर्य
वर प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे भाषा सतत कानावर पडत राहणे आणि त्या भाषेत बोलण्याची गरज भासणे ह्या दोन गोष्टींमुळे भाषा आपोआपच शिकली जाते, त्यासाठी विशेष श्रम घ्यावे लागत नाहीत.
"मराठीला शत्रूंची गरज नाही ते का म्हणतात हे कळाले" - तुमच्या ह्या वाक्यामुळे ह्याला थोडेसे राजकीय वळण लागल्यासारखे वाटले. लहानपणी हे राजकीय विंचू डसलेले नसतात. निखळ मैत्री व आपापसात संवाद साधण्याची उर्मी ह्या दोनच निकषांवर भाषा शिकली बोलली जाते. बालपणी, "मी मुंबईत राहतो जी महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळे मी सगळ्यांशी फक्त मराठीतूनच बोलेन व इतरांनी देखील माझ्याशी फक्त मराठीतच बोलले पाहिजे" असा पवित्रा घ्यायला पाहिजे होता असे कोणी ना शिकवले ना सांगितले त्यामुळे आजही मी मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषा बऱ्यापैकी बोलू, लिहू व वाचू शकतो ह्याचा मला आनंद आहे.
मी मराठी आहे, मला मराठीचा नुसता अभिमानच आहे असे नसून माय मराठीचा मी आदर करतो, माय मराठीवर माझे प्रेम आहे. मी आजही मराठी मित्रांसोबत मराठीतच बोलतो, इमेल्स मराठीत लिहितो, व्हाट्सअपवर मराठीत लिहितो, चुकीच्या मराठीत आलेले फॉरवर्ड्स चुकांची दुरुस्तीकरूनच पुढे पाठवतो. मित्र-परिवारात कोणी चुकीचे मराठी बोलले तर ते सुधारण्याचा प्रयत्न करतो. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकून, दहावीपर्यंत गुजराती मित्रांबरोबर राहूनही उत्तम मराठी बोलतो, लिहितो व वाचतो.
इथे अमेरिकेत जन्मलेली आमची पुढची पिढी मराठी पुस्तके किती वाचेल हे सांगता येणं जरी कठीण असले तरी मराठी बोलता आले पाहिजे ह्या बाबतीत मी आग्रही आहे आणि तसा प्रयत्नही करतो. मला हे सांगताना आनंद वाटतोय की आज १० ते १५ वर्षे वयाची आमची पुढची पिढी उत्तमी मराठी बोलते.
मुंबईत आज मराठी माणूस किती उरला आहे हा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे मुंबईत मराठी माणूस इतरांशी प्रथम दर्शनी हिंदीत बोलतो ह्यात चूक असे काहीच नाही. मात्र एकदा का समोरच्याला मराठी येतं हे कळल्यावर देखील मराठीत न बोलणे हे चुकीचे आहे.
आपल्या मातृभाषेचा आग्रह जरूर धरावा पण म्हणून दुसऱ्या भाषेचा दुस्वास करू नये ह्या मताचा मी आहे.
11 Jun 2022 - 12:20 am | अमरेंद्र बाहुबली
थोडक्यात मला मराठीचा अभिमान, आदर, गर्व सर्व आहे पण महाराष्ट्रात मी हिंदीत ईतरांशी संवाद साधतो पण परराज्यात गेल्यावर त्यांची भाषा बोलतो, लिहीतो, वाचतोही.
11 Jun 2022 - 4:15 am | सौन्दर्य
त्यांची आमची असे काही नाही. मला भारत देशातील सर्व भाषा आपल्याच वाटतात. संधी मिळाली तर त्या शिकण्याचाही प्रयत्न करणार.
11 Jun 2022 - 4:45 am | सौन्दर्य
त्यांची आमची असे काही नाही. मला भारत देशातील सर्व भाषा आपल्याच वाटतात. संधी मिळाली तर त्या शिकण्याचाही प्रयत्न करणार.
11 Jun 2022 - 4:46 am | सौन्दर्य
त्यांची आमची असे काही नाही. मला भारत देशातील सर्व भाषा आपल्याच वाटतात. संधी मिळाली तर त्या शिकण्याचाही प्रयत्न करणार.
9 Jun 2022 - 7:09 am | कंजूस
या सबबीवर हिंदी बोलली जाते. खरं म्हणजे सिनेमांत, चानेलवर,रेडिओ स्टेशनांवर सतत शुद्ध हिंदी ऐकतात पण चुकीचं बोलणंच खपतं. कुणी सुधरत नाही. नेहमीच्या शब्दांत स्त्रिलिंगी हिंदी शब्द ( गाडी,नाक,आवाज . . )पुल्लिंगीच वापरले जातात.
12 Jun 2022 - 2:15 pm | चौथा कोनाडा
अशा रेडिओ चॅनल्समुळे मराठीत मोठी भेसळ होत आहे.
9 Jun 2022 - 9:46 am | श्रीगुरुजी
सध्या हैद्राबाद मध्ये आहे. येथे दुकानांच्या पाट्यांवर तेलगूत नाव लिहिण्याचा फारसा आग्रह दिसत नाही. बऱ्याच दुकानांवर फक्त इंग्लिशमध्ये दुकानांचे नाव लिहिले आहे.
10 Jun 2022 - 12:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
भाषेचा आग्रह आंध्रात्/तेलंगणात नाही. खरे तर भाषावार राज्यांचा निर्मीतीचा आग्रह आंध्रप्रदेशातून चालु झाला होता.
दोन वर्षापुर्वी आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ह्यांनी तेलुगु माध्यमातील शाळांनी तेलुगु ऐवजी इंग्रजीतून शिकवावे असा आदेश दिला जो सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहे. राजकीय विरोध झाला पण तेलुगु मध्यमवर्गात ह्या निर्णयाबद्दल नाराजी नव्हती.
10 Jun 2022 - 1:35 pm | उपयोजक
कायमचे अमेरिकेत रहायला जायचे असते. तेलुगू माध्यमातून शिकून ते अवघड जाईल असे त्यांना वाटत असावे.
9 Jun 2022 - 10:08 am | सुबोध खरे
माझ्या कडे येणाऱ्या अनेक जाधव, शिंदे यासारख्या आडनावांचे पालक आपल्या मुलांशी हिंदीत बोलतात आणि वर त्याला मराठी येत नाही म्हणून थोड्याशा शेखीने मला मराठीत सांगतात.
कारण मूल युरो स्कुल पवार इंटरनॅशनल सारख्या हुच्च शाळेत जात असतं तेथे सर्व प्रांताधर्माचे लोक असतात त्यामुळे तेथे जास्त करून हिंदि किंवा इंग्रजी बोललं जातं हे पालुपद.
अशा वेळेस मी काही वेळेस त्यांना समजावून सांगतो कि मुलांशी जितक्या भाषा बोललं तितक्या ते सहजपणे शिकतील.
माझ्या मामे बहिणीने पारशी मुलाशी लग्न केले आहे तिच्या मुलीला मराठी आणि पारशी गुजराती ( शाळेमुळे हिंदी आणि इंग्रजी) या भाषा उत्तम पणे येतात. ती तिच्या पारशी आजी आजोबांबरोबर उत्तम गुजरातीत आणि मराठी आजी आजोबांबरोबर उत्तम मराठीत बोलते.
मी लष्करात असल्याने तेथे सर्व प्रांतीय लोक होते आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले असले तरी परंतु आम्ही मुलांशी कटाक्षाने मराठीच बोलतो. त्यामुळे दोन्ही मुलांना उत्तम मराठी बोलायला येते.
10 Jun 2022 - 11:37 am | तर्कवादी
उपयोजक,
१) माझ्या पिढीतील (म्हणजे चाळिशी ओलांडलेले) लोकांना तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येईल असे मला वाटत नाही. लहानपणी माझ्या आसपासही कुणी हिंदी भाषिक नव्हते शाळेतही नव्हते, पण मला निदान ७-८ वर्षांचा असल्यापासून तरी हिंदी समजायची हे नक्की. कारण घरी टीव्ही आला होता. टीव्हीवर हिंदी मालिका बघणे व्हायचे. रामायण, महाभारत, स्पेस सिटी सिग्मा, इंद्रधनुष ई रविवारच्या मालिका आवडीने बघायचो आणि आजही त्या आठवतात. कधी चित्रपट व इतर दिवशी प्रसारित केल्या जाणार्या मालिका पण बघायचो. पण हिंदी कसे समजायचे ? मला वाटते की मालिका / चित्रपटांतले न समजणारे शब्द आई बाबांना विचारुन शिकलो असेन , आता नक्की आठवत नाही.
२) माझ्या वडीलांच्या पिढीतील काही लोकांनी साधारणतः चाळिशीपर्यंत टीव्ही तर पाहिला नव्हता पण चित्रपटगृहांत जावून वयाच्या १०-१५ वर्षांपासून हिंदी चित्रपट बघितले असावेत. पण तरीही त्यावेळी ते चित्रपट समजण्याइतपत हिंदी त्यांना कसे येत होते हे मला माहित नाही. फक्त समजायचे की बोलता ही यायचे ? सर्वच घरांतून चित्रपटगृहांत जावून चित्रपट बघण्यास परवानगी नसे. मग अशा लोकांना हिंदी कितपत समजायचे ? या पिढीतले (१९५० च्या दशकात जन्मलेले) अनेक लोक अजूनही आहेत, जे गावात वा छोट्या शहरात जन्मले व आयुष्याचा दीर्घकाळ अशाच ठिकाणी घालवला (जिथे परराज्यातील स्थलांतरित लोक फारसे आलेले नाहीत अशा ठिकाणी) अशा लोकांना विचारता येईल.
३) माझ्या आजोबांची पिढी - यातले बहुतांशी आता हयात नाहीत. यांनी आयुष्यात चाळिशीपर्यंत तरी फारसे चित्रपट पाहिले नसावेत व साठच्याआधी टीव्ही पण पाहिला नसावा. मग त्यांना कितपत हिंदी येत होते ? बोलता यायचे का ? आता हे लोक हयात नसल्याने त्यांना विचारता येणार नाही पण क्र २ मध्ये नमूद केलेल्या गटातील लोकांकडून या गटातील लोकांबद्दल (म्हणजेच आई-वडीलांकडून आजी-आजोबांबद्दल) थोडीफार माहिती करुन घेता येईल.
पण तरी आणखी काही मुद्दे विचारात घेता येतील
१) महाराष्ट्रात नेहमीच परप्रांतिक लोक कमी अधिक प्रमाणात स्थलांतरित होत आलेले आहेत तर व्यापारानिमित्ताने कमी अधिक प्रमाणात परप्रातियांशी जोडले जाणे हे ही महाराष्ट्राला नवे नसावे. गुजराती, राजस्थानी , सिंधी व्यापारी पिढ्यान पिढ्या महाराष्ट्रात येत असावेत असा माझा कयास आहे (विदा मागू नये) त्यामुळे त्यांच्याशी संपर्काची भाषा हिंदी असल्याने हिंदीचे जुजबी ज्ञान नेहमीच असावे
२) काही शतकांपुर्वी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही वगैरे राज्यकर्ते असताना हिंदी-फारसी-मराठी अशा मिश्रणाची संपर्क भाषा ( खासकरुन सत्ताकारणातली, दरबारातली) असू शकेल काय ? तसेच मोगल साम्राज्यातले सरदार, स्वतः औरंगजेब, त्याची मुले महाराष्ट्रात मोहिमांवर येत राहिलेत.. त्यांचे सैन्य , अधिकारी, बुणगे ह्यांचा स्थानिकांशी व्यवहार चालतच असेल तो कोणत्या भाषेत असावा ? त्याशिवाय कोकणाज्वळ सिद्धी, मुंबईत इंग्रज, पारशी, गोव्यात पोर्तुगीज होते. त्यांच्याशी होणार्या व्यवहाराची भाषा काय असावी ? पुढे पेशव्यांच्या काळात मराठा राज्य वाढले, मांडलिक राजपुत राजे, इतर काही राज्ये, दिल्लीचे तख्त यांच्याशी संपर्क भाषा काय असावी ?
मला वाटते हिंदीचे जुजबी ज्ञान नेहमीच मराठी जनतेला असावे असाही कयास आहे.
मी इतिहासतज्ञ नाही. मनो वा प्रचेतस किंवा इतर दिग्गज मिपाकरांकडून याबद्दल काही माहिती मिळू शकल्यास बरे होईल.
३) याशिवाय पारतंत्र्याचा काळ वा स्वातंत्र्योत्तर सुरुवातीचा काळ - या काळात महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रीय राजकारणाचे , नेत्यांचे आकर्षण असावे असे वाटते. मग त्यामुळे गांधी , नेहरु , पुढे इंदिरा गांधी अशा नेत्यांची भाषणे प्रत्यक्ष वा आकाशवाणीवर ऐकणे यामुळे ही मराठी लोकांना हिंदी भाषा थोडीफार अवगत होत राहिली असावी.
एकूणातच महाराष्ट्र हे नेहमीच खूप हॅपनिंग राज्य राहिले आहे... ते बंदिस्त स्वरुपाचे कधीच नव्हते असे दिसते.अगदी सातवाहन काळात नाणेघाटातून बराच व्यापार चालायचा असे मिपाच्या काही धाग्यातून कळते , तर नंतरच्या काळातही पारशी, इंग्रज, गुजराती , सिंधी, राजस्थानी , उ,प्र व बिहारी अशा अनेकांना महाराष्ट्राचे आकर्षण दिसून येते.
10 Jun 2022 - 1:37 pm | उपयोजक
तर्कवादी
10 Jun 2022 - 11:24 pm | सौन्दर्य
उत्तम स्पष्टीकरण
12 Jun 2022 - 4:20 pm | तर्कवादी
धन्यवाद सौन्दर्य
10 Jun 2022 - 11:49 am | माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम चर्चा.
शक्यता कमी आहे. पण कन्नड कार्यक्रम अनेक महिने बघितलेले मराठी भाषिक बर्यापैकी कन्नड बोलतना पाहिले आहेत. कारण कन्नड व मराठीतही अनेक समान शब्द आहेत. मात्र तामिळ्/मल्याळमबद्दल खात्री देता येणार नाही.
हिंदी व मराठीत/गुजरातीत अनेक समान शब्द आहेत. त्यामुळे अनेक हिंदी भाषिकाना/गुजराती लोकांना मराठी समजण्यास अडचण येत नाही.
मराठीसारखी संस्कृतोत्भव भाषा ३/४ महिने सतत कानावर पडली तर त्या भाषेतील वाक्ये बोलण्यास अडचण येणार नाही.
12 Jun 2022 - 3:57 am | शेखर काळे
प्रथमतः, अत्यंत योग्य विषय आणि त्याबद्दल अभिनंदन.
माझे असे मत आहे की, त्या त्या भाषेत सुसंगत विचार करणे आणि नुसते शब्द आठवणे यात बराच फरक आहे - आणि तो आपण रोजच अनुभवतो.
आजकाल मराठीत इंग्रजी शब्द आणणे किंवा इतर भाषांतील शब्द आणणे हे आता सर्वमान्य झाले आहे आणि त्यात कोणाला आपल्यात काही कमतरता आहे असे वाटत नाही.
अमेरिकेत आल्यावरही बरेच दिवस मला यात काही गैर आहे असे वाटत नव्हते. त्यातच मला माझ्या वडिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समग्र वाङ्मय भेट दिले. तेव्हापासून मी प्रयत्नपूर्वक इंग्रजी, मराठी किंवा हिंदी मधून विचार करायला लागलो.
मी नागपूरचा असल्यामुळे व्याकरण सुसंगत हिंदी बोलता येत होतं, त्यातून विचार करता येत होता. पण मधल्या काळांत इंग्रजीमध्ये विचार करून ते मराठी किंवा हिंदी मध्ये भाषांतर करून बोलायची वाईट सवय लागली होती. त्यामुळे वाक्य काहीच्या काहीच तयार व्हायची. "मला जायची आवश्यकता आहे" (I need to go).
हिंदी चित्रपटांचा विचार करता - त्यात व्याकरण सुसंगत शुद्ध हिंदी अथवा मराठी बोलले जाते - हा एक वादाचा विषय आहे. आपण जर त्या भाषेला प्रमाण मानून आपल्याला हिंदी किंवा मराठी येतं असं समजलो तर आपल्या भाषेची पातळी खाली जाते आहे, असं मला वाटतं. ते खरंच आहे.
आपल्या मेंदु नेहमीच कामचुकारपणा करतो. काही शब्द, काही बरोबर वाटणारी वाक्ये, असं वेळच्या वेळी आठवलं कि आपल्याला ती भाषा पुरेशी आली असं वाटतं.
सहजपणे हिंदी (मराठी भाषिकांसाठी) शब्द वाक्यांत आले म्हणजे हिंदी येते असे नाही.
जाता जाता .. मराठी मध्ये हिंदीची कशी भेसळ होते आहे याचे एक उदाहरण - आजकाल सगळेच 'बोलले' जाते - गाणे बोलतात, तो काय बोलला, मी बोलले ..
अरे .. मराठीत कितीतरी छान छान शब्द आहेत - गायले, म्हटले, सांगितले, म्हणाला, विचारले, उत्तर दिले, इत्यादी ..
असो ..