भारतातील रस्ते-अपघात
मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करणे (गर्दीने भरलेल्या बाजारात नव्हे; महामार्गावर, घाटात वगैरे), उजवीकडे वळताना उजव्या मार्गिकेत येऊन उभे राहणे आणि डावीकडे वळणाऱ्या गाडीचा मार्ग अडवणे, चुकीच्या मार्गिकेतून उजवीकडे वळणे (डावीकडे वळताना तसा प्रश्न येत नाही), इंडिकेटर न लावणे, राष्ट्रीय महामार्गावर सोडलेली कानाला टॅग असलेली गुरे सोडणारे त्यांचे मालक अशी काही उदाहरणे सांगता येतील.
(१) दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू महामार्गावरून घर - पुणे - घर असा प्रवास केला. दोन्ही वेळा उजव्या मार्गिकेतून जाणाऱ्या अवजड वाहनांनी आम्हाला हैराण केले. हा आमचा वैयक्तिक त्रास म्हणून समजू नये. पोलिसांनीही या समस्येची दखल घेतली आहे. एक वर्षापूर्वीची बातमी आहे, फरक पडलेला दिसत नाही.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/state-to-crack-down-on-heavy-vehicles-cutting-hway-lanes/articleshow/80193520.cms
(२) आंबा घाटात एका ट्रक चालकाने सिगारेट घेण्यासाठी आपला मोठ्ठा मल्टी-ऍक्सल ट्रक वळणात उभा करून ठेवला. एका कार चालकाला त्या वळणात रिवर्स गिअर मध्ये चढावात गाडी मागे घ्यावी लागली एका चढून येणाऱ्या ट्रकला जागा करून देण्यासाठी.
(३) खंबाटकी घाट चढायला सुरुवात होते त्याच्या आधी एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलेल्या गाड्या तर डावीकडच्या लेन मध्ये महामार्गाच्या कुंपणाच्या आत मध्येच पार्क केलेल्या होत्या.
यातील काही गोष्टी आमच्याकडूनही अजिबात होत नसतील अशी मी शाश्वती मी देत नाही. पण त्या गोष्टी टाळण्यावर आमचा भर असतो.
या गोष्टी केवळ लिखित नियमांविरुद्ध आहेत म्हणून केवळ त्याचा आग्रह धरावा असे नव्हे. रस्त्यावर वाहतूक सुरळीत चालण्यासाठी सर्वच वाहनांनी काही संकेतांचे पालन करणे हे सर्वांच्याच सुरक्षेसाठी हितावह आहे. असे संकेत न पाळण्याचे दुष्परिणामही आपल्या देशातील लोकांना भोगावे लागतात.
भारतात जगातील एकूण वाहनांपैकी १% वाहने असूनही रस्ते अपघातात मृत्यूंपैकी ११% मृत्यू भारतात घडतात. भारतात २०१५-२०१९ या काळात दरवर्षी साधारण दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. राष्ट्रीय महामार्गांची लांबी एकूण रस्त्यांच्या लांबीच्या २% असूनही एकूण मृत्यूंपैकी ३६% मृत्यू तिथेच होतात. एकूणच अपघातांचा आर्थिक फटका हा दीड लाख कोटी रुपयांचा असल्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा अंदाज आहे.
रस्त्यावरील अपघात हे वाहने, रस्ते, चालक आणि पादचारी (एकूण मृत्यूंपैकी १७% पादचारी असतात) यांच्यातील संबंधांतून घडत असतात.
५४ देशातील साडेतीन लाख किमी रस्त्यांच्या अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसले कि गरीब देशातील ९५% रस्त्यांवर पदपथ नाहीत, ९६% रस्त्यांच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती आहे, ५०% पेक्षा अधिक रस्त्यांवर रस्ता ओलांडण्याची रास्ता क्रॉस करण्यास सुविधा नाही असे दिसून आले. श्रीमंत देशात हेच प्रमाण अनुक्रमे ५०%, ७३%, ५% असे आहे. आपल्या आजूबाजूला आपण रस्ते पाहत आहोतच त्यामुळे आपण यात कुठे आहोत याची आपल्याला कल्पना आहेच.
दुसरा महत्वाचा घटक म्हणजे चालक म्हणजेच आपण लोक. संशोधनात असे दिसून आले आहे की अपघाताच्या भीतीपेक्षा वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणीचा चालकांवर जास्ती चांगला परिणाम होतो. सीट-बेल्ट आणि हेल्मेट यांचा वापरही अपघाती मृत्यू रोखण्यात महत्वाचा आहे. चालकांना परवाना देताना त्यांचे प्रशिक्षणही अपघात रोखण्यास आवश्यक आहे. Graduated Driver Licensing (GDL) नावाची परवाना देण्याची पद्धत ऑस्ट्रेलिया मध्ये सुरु झाली. आता ती पद्धत अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड इथेही वापरली जात आहे. या पद्धतीत लेखी परीक्षा, १२० तासांचे निरीक्षणाखाली ड्रायविंग, तसेच नंतरही ओव्हर स्पीडींग, मद्यपान याकरता जिरो-टॉलरन्स असे नियम आहेत. कायमचा परवाना मिळवण्यात या मध्ये १ वर्षाचा काळ लागू शकतो. पण यामुळे नवीन चालकांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. नियमांची अंमलबजावणी आणि प्रशिक्षण याही बाबतीत आपण कमी पडतो असे वाटते.
मी २०१९ मध्ये जर्मनीत गेलो होतो. तिथे वाहतुकीची शिस्त अगदी लक्षात येण्यासारखी होती. माझ्या एका मैत्रिणीला भेटायला मी चालत निघालो होतो. तिच्या घराजवळ पोहोचलो तर ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिच्या इमारतीखाली उभी होती. मधला रास्ता मोकळा होता. अर्थात, मी इथल्या सवयीने होतो तिथूनच रस्ता ओलांडायला गेलो, पण मला तिने थांबवले आणि योग्य ठिकाणाहून ओलांडायचा सल्ला हातानेच दिला. मी तेव्हा PhD विद्यार्थी होतो आणि २-४ दिवस राहून आणि तिथला फरक पाहूनही वाट्टेल तसा रस्ता ओलांडण्याची सवय टाळू शकलो नाही. हा प्रसंग आठवला तर मला लाज वाटते.
जोसेफ हेन्रिक यांच्या पुस्तकातील खालील वाक्य जसेच्या तसे देऊन थांबतो.
“During the five years leading up to the end of immunity in 2002, diplomats from the UK, Sweden, Canada, Australia, and a few other countries got a total of zero tickets. Meanwhile, diplomats from Egypt, Chad, and Bulgaria, among other countries, got the most tickets, accumulating over 100 for each member of their respective diplomatic delegations. Looking across nations, the higher the international corruption index for a delegation’s home country, the more tickets those delegations accumulated. The relationship between corruption back home and parking behavior in Manhattan holds independent of the size of a country’s UN mission, the income of its diplomats, the type of violation (e.g., double-parking), and the time of day.”
संदर्भ
[1] Road Accidents in India - 2019, Ministry of Road Transport & Highways
[2] Road Safety opportunity and Challenges: Low and Middle Income country profiles,
World Bank, 2020
[3] https://www.vaccinesforroads.org/how-safe-are-the-worlds-roads/
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरंच
गडकरी साहेबांनी काही किस्से मुलाखतीत सांगितले होते
माझा एक मित्र नेहेमी म्हणतो
बरेच अपघात गाड्यांचे अपघात हे
पुणे नगर रस्ता
वेगाची धुंदी
अतिवेगामुळे ६७% अपघाती मृत्यू होतात असा मंत्रालयाचा अहवाल म्हणतो
फक्त भारतासाठी
रस्ता सर्वांसाठी असतो याच्याशी एक तत्व म्हणून असहमत
रस्ता पब्लीकचा हाय हो
एक भयानक अनुभव
ही मानसिकता तात्पुरत्या स्वरूपात कशी निर्माण होते
दुचाकीवरून जात असताना तळेगाव
खरी समस्या वेगळीच आहे
कॅमेरे तर चेष्टा आहे
बहुदा डुप्लिकेट नंबर कोणीतरी
काही तरी दोष आहे system मध्ये
तंत्र ज्ञान खूप प्रगत आहे
थोड्याशा अंतरावरचा यु टर्न
अगदी खरंय !
८०% गोष्टी भारतीयांच्या डीएनए मधे फिक्स झाल्या आहेत.
चांगला लेख
विषय पुण्याचा आहे म्हणून
मी जेव्हा पादचारी च्या भूमिकेत असतो
बेशिस्त वाहने ह्यांचा क्रम
या मुद्द्यांवर अधिक
नक्कीच झाली असणार.
हलकाच प्रतिसाद
दिवसेंदिवस गाडी चालवणे मुश्किल होत चालले आहे
>> दर वर्षी चालकांची परीक्षा
दर वर्षी चालकांची परीक्षा घेतली तर अर्धे चालक नापास होतील
दुचाकीस्वार
Fine मारून प्रश्न सुटत नाहीत
चांगला लेख