मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा दिन

कर्नलतपस्वी · · जनातलं, मनातलं
कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा ! – कुसुमाग्रज मिसळपाव परिवारात सामील झाल्यावर सुरुवातीला काही कवीता, मनोगते,मुक्तके राजभाषा हिन्दी मध्ये लिहिल्या, प्रतीसाद संमिश्र आले, गदारोळ माजला, टपल्या, टोमणे,काही शालजोडीतले, काही पुणेरी वर वर स्तुतीपर पण सरळ कसोट्यालाच हात घालणारे. माय मराठीत जन्मलो पण कमी वयातच दूर जावे लागले म्हणून सहवास कमी लाभला. राजभाषेचा सहवास भरपूर. दोघींवर तितकेच प्रेम. आता परत माय मराठीच्या कुशीत आल्या मुळे मराठी भाषेतील अमूल्य रत्ने दृष्टीक्षेपात आली. त्यातीलच एक कुसुमाग्रज', प्रसिद्ध असलेले मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर.आज त्यांची जयंती आणी आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन याचे औचित्य साधून काही आठवणी काही मनोगत. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील प्रख्यात कवी, नाटक कार, कादंबरी कार, लघु कथा लेखक आणि मानवतावादी होते. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या " विशाखा" या कविता संग्रहातील "क्रांतीचा जयजयकार" कवितेने जन आंदोलन तीव्र करण्यात अहम योगदान दिले. "कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल सरणावरती आज अमुची पेटता प्रेते उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार आई, खळखळा तुटणार गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!" पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात काही काळ काम करण्याची संधी मीळाली तेव्हा "वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट ,बेकेट " कुसुमाग्रजांची ही नाटके बघितली,शिवाय शिरवाडकर जवळून बघायला,ऐकावयास मिळाले.तंतरलेल्या आयुष्यातील मंतरलेले दिवस होते. खुप आठवणी पण नंतर कधीतरी. आई कडून मीळालेली मातृभाषा आणी शाळेतल्या बाईंकडून मिळालेल्या इतर भाषांचे दान याने जीवन समृद्ध होते यात तिळमात्र शंका नाही.सर्वानाच मातृभाषेचा अभिमान असणे स्वाभाविक तसाच मला पण आहे.भाषावार प्रातं रचना केल्यामुळे फायदा की नुकसान यात न पडता मी म्हणेन की प्रत्येक मायभाषेचे संवर्धन, संगोपन व्यवस्थित होत आहे आणी त्यातील अमूल्य विचारधन आज आपल्याला उपलब्ध आहे. आज मराठी भाषा दिना निमित्त सर्व मिपाकरांच्या मायबोली वरचे प्रेम, अट्टाहास आणी योगदानाबद्दल हार्दिक अभिनंदन व मराठीच्या एक शिर्ष पाईक कुसुमाग्रज यांना अभिवादन करून लेख संपवतो.

वाचने 4193 वाचनखूण प्रतिक्रिया 12

श्रीगणेशा Sun, 02/27/2022 - 15:43
कर्नल साहेब आणि सर्व मिपाकरांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! कुसुमाग्रजांनीच लिहिलेल्या स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेतून:
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी। माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।।
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे व्याख्यान ऐकण्यात आलं: https://youtu.be/UwrI1ameaos

In reply to by श्रीगणेशा

कर्नलतपस्वी Mon, 02/28/2022 - 22:25
तूनळी वरील डाॅ चे व इतर मान्यवरांचे भाषण ऐकून कुमार एक सरांनी दिलेला प्रतिसाद आठवला. मराठी मधे इतर भाषांची कमीत कमी सरमिसळ व्हावी. याबाबत गझलकार यांनी माऊली आणी तुकाराम महाराज चा जो संदर्भ सांगीतला आहे तो मात्र पटला नाही.

In reply to by श्रीगणेशा

कर्नलतपस्वी Mon, 02/28/2022 - 22:31
तूनळी वरील डाॅ चे व इतर मान्यवरांचे भाषण ऐकून कुमार एक सरांनी दिलेला प्रतिसाद आठवला. मराठी इतर भाषांची कमीत कमी सरमिसळ व्हावी. याबाबत गझलकार यांनी माऊली आणी तुकाराम महाराज चा जो संदर्भ सांगीतला आहे तो मात्र पटला नाही. कुसुमाग्रज पारतंत्र्यात होते आणी आग्ल भाषीय परक्या मुठभर लोकांनी जो जुलूम केला त्या बद्दल चा राग कवितेत व्यक्त केला आहे. एत्तदेशीय भाषेबद्दल नसावा आसे वाटते. धन्यवाद

हेमंतकुमार Sun, 02/27/2022 - 16:29
सर्व मिपाकरांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मराठी बोलू, मराठी लिहू, मराठी लिहिताना अन्य भाषांची सरमिसळ कमीत कमी ठेवू आणि मराठी संस्थळाचे मराठीपण जपूयात ! ...हे आवाहन.

अनिंद्य Sun, 02/27/2022 - 20:20
मला दोन दिवसांपासून एक प्रश्न पडलाय. कवी वि वा शिरवाडकरांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) 'मराठी भाषा गौरव दिवस' की 'मराठी भाषा दिन' ? १ मे ला मराठी भाषा दिन असतो ना ? जाणकारांनी प्रकाश टाकावा

In reply to by अनिंद्य

कर्नलतपस्वी Sun, 02/27/2022 - 22:21
१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.[३][४] १ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. स्त्रोत विकिपीडिया चुकीची दाखल घेऊन भद्र शब्दातून व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद, क्षमस्व

In reply to by कर्नलतपस्वी

अनिंद्य Mon, 02/28/2022 - 12:32
तुम्ही योग्य स्पिरिट मध्ये घ्याल असे वाटले होते म्हणूनच विचारले मी :-) शुभेच्छा !