Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुबोध खरे on Wed, 06/23/2021 - 13:51
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
कर्नल सतिश मिश्रा हे लष्कराच्या विमंडळात वैमानिक होते त्यांनी लिहिलेल्या एका (सत्य) कथेचा स्वैर अनुवाद शेवटची इच्छा आम्ही आमच्या तळावरून रुटीन ट्रेनिंग सोर्टीला निघालो होतो तेंव्हा मध्येच जेव्हा एलसी( प्रत्यक्ष ताबा रेषेवर) पोस्टकडे एक जखमी झालेल्या सैनिकाला (कॅस इव्हॅक) घेऊन जाण्यासाठी रेडिओ कॉल आला. तेव्हा आम्ही प्रत्यक्ष ताबा रेषेवर असलेला तो तळ गाठला आणि लँडिंग करताना दिसणारे दृश्य असे होते. सर्वत्र एकच खळबळ उडालेली होती .. चिंता, राग, भावनाकल्लोळ इ दिसत होते. शीख सैनिकांच्या तुकडीने त्यांच्या एका कनिष्ठ सैनिकाला घेरलेले होते. त्यांनी त्याला एका तात्पुरत्या स्ट्रेचरमध्ये आणले .. पण ते स्ट्रेचर आमच्या छोट्या चित्ता हेलिकॉप्टर मध्ये मावणार नाही इतके मोठे होते. पटकन त्याला एका चादरीत गुंडाळले गेले आणि हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात चढवले. या मुलाकडे नजर टाकली तर जेमतेम विसावं वर्ष लागलेला जवान होता तो. सुरुंगाच्या स्फोटामुळे त्याच्या युद्धाच्या युनिफॉर्मच्या चिंध्या झाल्या होत्या .. तो तेंव्हा बोलत होता, कदाचित उसने अवसान/ चेहऱ्यावर धैर्याचा आव आणून. त्याचे बहुतेक मित्र म्हणत होते .. "ओये डरियो ना .. सब ठिक हो जौगा ..". त्याच्या उदरावर स्फोटाचा आघात झालेला होता .. कदाचित भुई सुरुंग वर पाय पडला असेल .. किंवा इतरांना वाचवण्यासाठी याने आपल्या शरीराची ढाल केली असेल .. कोणालाही काहीच माहिती नव्हते .... कमरेभोवती कापडाचा तुकडा बांधला होता .. कदाचित त्याची स्वत: ची पगडी असावी. हेलिकॉप्टर मध्ये मागील प्रवाशांच्या साठी असलेल्या सीट वर दुमडल्या आणि त्याला हेलिकॉप्टरच्या जमिनीवर झोपवले, केवळ तसेच त्या अवस्थेतच त्याला ठेवता येऊ शकत होते. आतापर्यंत आम्ही पण चिंताग्रस्त झालो होतो. हे जखमी सैनिकाला परत आणण्याचे माझे पहिलेच मिशन होते आणि एक लेज (कामचलाऊ) हेलिपॅड वर उतरवण्याचा मला अनुभव नव्हता. परंतु मी टेक ऑफ केला आणि वेग घेण्यासाठी ताबडतोब मी दरीमध्ये उताराला लागलो ( गुरुत्वाकर्षणामुळे उतरताना हेलिकॉप्टर चा वेग लवकर वाढू लागतो.) मला लवकरात लवकर त्याला बेस रुग्णालयात पोहोचवायचे होते. माझ्या वरिष्ठ पहिल्या पायलटने माझ्या कडे एक कडक नजरेने पाहिले. त्याबरोबर मी परत उतरणे सोडून समतल उड्डाण चालू केले,तेव्हा माझी घोडचूक माझ्या लक्षात आली. वेगाने उंची कमी केल्यामुळे त्या सैनिकाच्या पोटातून आतडी बाहेर आली आणि रक्ताचा एक ओघळ माझ्या पाया खाली आलेला दिसला रक्तावर पाऊल पडेल या भीतीने, हे रडर (RUDDER) सुकाणू वर नियंत्रण ठेवणे आवश्यक असतानादेखील मला पाय हलवावेसे वाटत नव्हते. त्यानंतर जे घडले तेदेखील अगदी हृदयद्रावक होते .. तो तरूण त्याच्या कुशीवर पडून हे शांतपणे पहात होता .. कदाचित आमची अस्वस्थता त्याला जाणवत होती .. आणि प्रचंड वेदना आणि संभाव्य मृत्यू समोर ठाकलेला दिसत असूनही त्याच्या नजरेत आत्मसन्मान आणि असामान्य धैर्याची भावना होती .. त्याच्या कमरेला बांधलेल्या कपड्याच्या एका टोकाने जमिनीवरील रक्त पुसण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या कडे पाहून माझ्या हृदयात कालवा कालव झाली डोळे भरून आले आणि मला हेलिकॉप्टर चालवणे कठीण झाले. मी माझ्या वरिष्ठ वैमानिकाला हेलिकॉप्टरचे नियंत्रण घेण्यासाठी विनवले. त्याच्या परवानगीने मी स्वत: ला बांधलेला पट्टा सोडला आणि परत हेलिकॉप्टर च्या मागील बाजूस चढलो .. त्याच्याशी बोलण्यासाठी त्याला एक प्रवाशी हेडसेट दिला, तो आपले बळ एकवटून होता. "क्या नाम भाई? .. तू ठिक है?" "सिपाही गुरविंदर साहबजी" .. आणि टिपिकल फौजी जोश मध्ये "मैं ठीक हूं साहब" "काके ..सुबह सुबह पुरीयां थोडी कम खाया कर ... xx .... सब बहार निकल रही है पेट फाड के" .... आणि मग त्याने एक हलकीशी स्मित दिले ... "लंबी पेट्रोलिंग थी साहबजी, इसलिये थोडा झ्यादा ठूस लिया था" ...... "साले फिर तो तूने पिठ्ठू में अंडे और केले भी छुपाये होंगे" .... हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले ..... "रखे थे साब ... लेकीन पिठ्ठू तो वहीं रे ग्या". त्याच्याशी तीन चार वाक्ये बोलल्यावर तो म्हणाला .. "साब .. मेरा ना, हमशा से मन था एक बार हेलीकॉप्टर में घुमने का .. देखणे का ऊपर से कैसा दिखता है" ..... मग मला जाणवलं की पाठीवर पडलेला तो आपल्या कुशीवर वळला होता .. काचेच्या केबिनच्या बाहेर पाहण्यासाठी. "अब तो तू पहेले बतना था .. तेरे पिंड( गाव) के ऊपर से घुमा लाते .. गर्ल फ्रेंड है तेरी? .. बोल तो सही उसके घर के ऊपर से चले?" .. दोन चार मिनिटे मी त्याच्याशी बोललो यानंतर मी जमिनीवर पडलेले रक्त स्टॉकनेटने पुसून टाकले. त्याला चार शब्द धीराचे सांगितले. जर काही हवे असेल तर मला सांगण्यास सांगितले, आणि मी परत माझ्या सीटवर चढलो. तो बाहेर पाहत होता आणि शांतपणे गुरवाणी तील शब्द उच्चारत होता. आम्ही काही मिनिटांनी बीएच( बेस हॉस्पिटल) ला पोहोचलो. त्याला वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे सोपवून आम्ही तळावर परतलो. पण मी पूर्ण वेळ त्याचाच विचार करत होतो. ... त्याचा धीरोदात्तपणा .. खानदानी वृत्ती .. त्याच्याबद्दल विचारपूस करण्यासाठी संध्याकाळी बीएच ला फोन केला ... दुर्दैवाने गुरविंदर वाचला नाही. सैनिकी जीवनात तुम्हाला जवळच्या मित्रांच्या अचानक मृत्यूचा अनुभव घ्यावा लागतो .. हा संपूर्णपणे अनोळखी असा मुलगा ज्याने माझ्या स्मृतीवर/ विचारावर इतका प्रभाव का पडला होता कि त्यातून बाहेर पडणे कठीण जावे .... हजारो विचार मला खात होते ... केवळ 40 मिनिटांच्या सहवासात हा मला इतका जीव लावून गेला होता तर डॉक्टर, जे अशांच्या वर जीव लावून उपचार करतात पण त्यांना वाचवण्यात अपयश आल्यावर त्यांना काय वाटत असेल? त्याच्या जाण्यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा ज्यांचा रक्तामांसाचा तरुण मुलगा असेल अशा आई बापाना काय वाटत असेल? पण या कोणत्याही विचारांपेक्षा माझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं ... इथं एक मुलगा होता जो आपल्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी आपल्या मित्रांना "मेन जलदी ठीक हो के आ जवांगा"( मी लवकर बरा होऊन परत येईन) सांगून धीर देत होता ... एक मुलगा ज्याच्या शरीरावर सर्वत्र स्फोटामुळे जखमा झाल्या आहेत तो रडत नव्हता, ओरडत नव्हता .. आपली व्यथा दाखवत नव्हता .. कोणालाही किंवा कशावरही दोष देत नाही ... निर्मळपणाचे चित्र होते .... अपराधीपणा, राग, पश्चाताप, दया नाही .... कुटुंब किंवा आईला बोलवत नाही ..आपला जीव जात असताना सुद्धा तोंडाने प्रार्थना म्हणत असताना देवाला दोष न देता सुंदर आयुष्य दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासारखे शब्दच त्याच्या ओठातून बाहेर पडत होते. मृत्यूच्या दारात असताना सुद्धा कोणतीही नकारात्मक भावना नव्हती. तो त्याऐवजी त्याच्या स्वप्नाबद्दल बोलत होता .. हेलिकॉप्टरमध्ये बसून वरुन गोष्टी पहाण्याची त्याची इच्छा. त्याच्याशी झालेली इतकी संक्षिप्त भेट हि "नितळ पारदर्शक आत्म्या"शी भेट झाल्या सारखी होती .. आपल्या म्हणण्याप्रमाणे खरा "आत्मा" .. तो शुद्ध वाहणाऱ्या निवळशंख झऱ्यातील पाण्यासारखा होता .. "लपविण्यासारखे काहीच नाही आणि दर्शविण्यासाठी काहीही नव्हते .... फक्त प्रवाहाबरोबरच जात आहे" ... तो कोणत्याही प्रकारे मरत नव्हता तर तो फक्त त्याच्या आयुष्यातील "क्षण" "जगत" होता. ज्या वयात अगदी थोडासा त्रास किंवा नुकसान झाले कि आपण जगाला दोष देण्यास किंवा त्याच्या विरोधात लढण्यास तयार असतो, त्या वयात त्या तरुण मुलाचा धीरोदात्तपणा आणि मृत्यू समोर ठाकलेला असतानासुद्धा असलेला शांत अविर्भाव हा माझ्यासाठी आयुष्यभराचा एक धडा होता. माझा देवावर किंवा परम चैतन्यावरचा विश्वास दृढ करणारा .. मनापासून केलेली शुद्ध इच्छा ही कधीच अनुत्तरीत नसते ..... जर तो जखमी झाला असताना आम्ही उड्डाण केलेलं नसतं किंवा वाईट हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर तो आमच्या हेलीकॉप्टर वर चढला नसता तर त्याची "शेवटची इच्छा" अपूर्ण राहिली असती ... जणू काही देवाने त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा खेळ रचला होता ... कदाचित म्हणूनच तो आमच्याबरोबर प्रवास करणारा एक आत्मा होता. . . कोणताही मृत्यू साजरा केला जाऊ शकत नाही परंतु त्याच्या अंतिम इच्छापूर्तीचे एक साधन झालो होतो याचे एक समाधान मात्र मला वाटत होते. आपल्या संसारात आपण गुंतलेले आहोत आपलॆ आसक्ती कधी कमी होणार नाही किंवा आपल्याला जीवनात भौतिक त्याग करणे शक्य होणार नाही .. परंतु कदाचित आपण आध्यात्मिक समाधान मिळवू शकू. .... मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहिती नसते. सन्माननीय मृत्यू येण्यासाठी आपण प्रथम समाधानाने जगायला हवे. गुरविंदरने आप्ल्याला हेच शिकवले ..... चला आनंदी आणि समाधान पूर्ण आयुष्य जगू या .. आयुष्याचा प्रत्येक क्षण. कर्नल सतीश मिश्रा (निवृत्त) हि अतिशय चटका लावणारी कथा वाचून मला लष्करात सेवा करणाऱ्या माझ्या शूर सैनिकांची आठवण झाली. जखमी झालेले असताना जसे मिळेल तसे त्यांना उपचारासाठी नेत असताना ते आपल्या मित्रांवर, वरिष्ठांवर, उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर दुर्दम्य विश्वास ठेवतात आणि हे सगळे आपल्याला वाचवणारच आहेत असा भरोसा बाळगतात. त्यात त्यांना अपयश आले तरी ती देवाची इच्छा मानतात. साधी भोळी निर्मळ हृदयाची "माणसं" असतात हि.
  • Log in or register to post comments
  • 12967 views

प्रतिक्रिया

Submitted by सौंदाळा on Wed, 06/23/2021 - 14:11

Permalink

चटका लावणारी घटना

चटका लावणारी घटना मृत्यूपंथाला लागलेल्या माणसाशी कसे बोलावे समजत नाही. खोटा खोटा धीर द्यावा का हलकेफुलके बोलावे का शेवटची इच्छा विचारावी का देवाचे नाव घ्यावे सगळेच अवघड.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 06/23/2021 - 16:03

In reply to चटका लावणारी घटना by सौंदाळा

Permalink

+१ अतिशय चटका लावणारी कथा

मृत्यूपंथाला लागलेल्या माणसाशी कसे बोलावे समजत नाही. खोटा खोटा धीर द्यावा का हलकेफुलके बोलावे का शेवटची इच्छा विचारावी का देवाचे नाव घ्यावे सगळेच अवघड. >> खरंय! त्या जवानाप्रमाणे मृत्यूला धीरोद्दातपणे सामोरे जायची शक्ती परमात्मा सर्वांना देवो..
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Wed, 06/23/2021 - 16:05

In reply to चटका लावणारी घटना by सौंदाळा

Permalink

अशा माणसाशी काहीही बोलु नये

फक्त शिकत जावं... त्याच्याकडुन.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 06/23/2021 - 15:33

Permalink

वेगळेच जाग समोर आणले डॉक्टर

वेगळेच जाग समोर आणले डॉक्टर साहेब तुमच्या अनुभवांचे शक्य असेल तर पुस्तक काढा
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 06/23/2021 - 18:07

Permalink

वाचतांना ....

अचानक अक्षरे धूसर झाली ....
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Wed, 06/23/2021 - 18:31

Permalink

वाचता वाचता हेलावलो.

वाचता वाचता हेलावलो. निशब्द _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Wed, 06/23/2021 - 20:55

Permalink

निशब्द

कदाचित म्हणूनच तो आमच्याबरोबर प्रवास करणारा एक आत्मा होता. . .
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Wed, 06/23/2021 - 22:44

Permalink

सॅल्यूट !

खरे साहेब, ही कथा चार वेळा वाचली तरी प्रत्येक वेळी डोळे भरून आले. त्या बहादूर सैनिकांसाठी कोणतीही विशेषणे कमीच पडतील. तुम्ही इतकी चांगली कथा आमच्यापर्यंत आणल्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/23/2021 - 23:32

Permalink

.

🙏
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/24/2021 - 00:40

Permalink

नि:शब्द

गुरिवंदरच्या अतुलनीय धैर्‍याबाबत लिहायला माझ्याकडे शब्दच नाहीत. ___/\___. ही कथा आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी डॉ. सुबोध यांना अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 06/24/2021 - 10:36

Permalink

गोष्ट आवडली

मस्त लिहिली आहे, गुरविंदर आणि पायलट दोघांचा संवाद आवडला. माझ्या समोर जर कदाचित असा भयंकर जखमी आणि मरणोन्मुख माणूस आला तर माझे हातपाय लटपटायला लागतील. त्याच्याशी असल्या हलक्याफुलक्या गप्पा मारणे फारच लांब राहिले. दोघांच्या धैर्याला सलाम (खरेतर तिघांच्या, कारण या सगळ्या भानगडीत वरिष्ठ पायलट शांत पणे हेलिकॉप्टर उडवत राहिला) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by सुरिया on गुरुवार, 06/24/2021 - 11:10

Permalink

अफाट धैर्याचे अप्रतिम वर्णन.

अफाट धैर्याचे अप्रतिम वर्णन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on गुरुवार, 06/24/2021 - 14:08

Permalink

हृदयस्पर्शी

__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 06/25/2021 - 12:45

Permalink

चटका लावणारी हौताम्य !

चटका लावणारी हौताम्य !
त्याच्याशी झालेली इतकी संक्षिप्त भेट हि "नितळ पारदर्शक आत्म्या"शी भेट झाल्या सारखी होती .. आपल्या म्हणण्याप्रमाणे खरा "आत्मा" .. तो शुद्ध वाहणाऱ्या निवळशंख झऱ्यातील पाण्यासारखा होता .. "लपविण्यासारखे काहीच नाही आणि दर्शविण्यासाठी काहीही नव्हते .... फक्त प्रवाहाबरोबरच जात आहे"
... तो कोणत्याही प्रकारे मरत नव्हता तर तो फक्त त्याच्या आयुष्यातील "क्षण" "जगत" होता.
वाह !
  • Log in or register to post comments

Submitted by सुरसंगम on Fri, 06/25/2021 - 14:05

Permalink

चटका लावणारा शेवट.

चटका लावणारा शेवट. वंदन त्या शुर वीराला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वराजित on Fri, 06/25/2021 - 14:37

Permalink

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 06/25/2021 - 15:04

Permalink

असंबद्ध प्रश्न आहे पण

तरी खूप दिवस मनात आहे. भरती झाल्या नंतर एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केलेल्या एकदम नवख्या नवं सैनिकांना डायरेक्ट युद्ध भूमीवर का पाठवले जाते. माझ्या मित्रांनी सांगितलेलं प्रसंग . नुकतेच प्रशिक्षण पूर्ण झालेली त्याची तुकडी ल (स्थळ सांगत नाही) सरळ लढण्यास पाठवले आणि जवळ जवळ पूर्ण तुकडी बळी पाडली. ज्यांना काहीच पेच डाव पेच ह्याचा अनुभव नाही.लढण्याचे प्रत्यक्षात अनुभव नाही.त्या वीस बावीस वर्षाच्या अल्प अनुभवी तरुणांना का प्रत्यक्ष युद्ध भूमीवर पाठवले जाते. त्याचा रिझल्ट काय येणार हे जवळ जवळ निश्चित च असते.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 06/25/2021 - 15:43

In reply to असंबद्ध प्रश्न आहे पण by Rajesh188

Permalink

राजाराम सीताराम, ही मिपावरील लेखमाला वाचा ... आणि ..

कैलासवासी सोन्याबापू, यांनी लिहिलेले लेख वाचा .... -------
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 06/25/2021 - 16:15

In reply to राजाराम सीताराम, ही मिपावरील लेखमाला वाचा ... आणि .. by मुक्त विहारि

Permalink

नक्की वाचतो

Link दिली तर बरं होईल. माझ्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणून तर घ्यायचेच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 06/25/2021 - 17:52

In reply to नक्की वाचतो by Rajesh188

Permalink

राजाराम सीताराम एक, राजाराम

राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो
http://www.misalpav.com/node/18126
एकूण १९ भागांची मालिका आहे !
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Fri, 06/25/2021 - 18:10

In reply to राजाराम सीताराम एक, राजाराम by चौथा कोनाडा

Permalink

व्वा! धन्यवाद!!

विस्मरण झाले होते. परत वाचतो!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 06/25/2021 - 19:23

In reply to राजाराम सीताराम, ही मिपावरील लेखमाला वाचा ... आणि .. by मुक्त विहारि

Permalink

अकादमी लेखमालिका

कैलासवासी सोन्याबापू यांनी लिहिलेली अकादमी ही लेखमालिका जरुर वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 06/26/2021 - 09:51

In reply to असंबद्ध प्रश्न आहे पण by Rajesh188

Permalink

प्रश्न असम्बद्धच आहे.

प्रश्न असम्बद्धच आहे. कोणतीही अख्खी तुकडी प्रशिक्षणानंतर लगेच अख्खी तुकडी म्हणून राहत नाही तर त्याच रेजिमेंटच्या वेगवेगळ्या बटालियन मध्ये विखरून पाठवले जातात. अख्खी तुकडी अननुभवी कधीच नसते. इतके बाळबोध विचार एखाद्या राष्ट्राच्या सैन्याचे असतील असे तुम्हाला सांगणारा विद्वानच असेल. एखाद्या लहानशा तुकडीसाठी सुध्दा चेन ऑफ कमांड म्हणजे सर्वात कनिष्ठ, कनिष्ठ, मध्यम अनुभवी आणि अनुभवी असे सर्व सैनिक आणि अधिकारी असतात. प्रत्यक्ष युद्धभूमी म्हणजे काय? १९९९ नंतर घोषित युद्ध झालेले नाही. अघोषित युद्ध तर मुंबई पुण्यातही चालू आहे. प्रत्यक्ष ताबारेषा म्हणजे काय? भुई सुरुंग कुठे असतात? नक्षलवादी, माओइस्ट इ लोक प्रत्यक्ष ताबा रेषेवर नसतात पण केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान भारताच्या अंतर्भागात का बळी पडतात? किती वर्षाच्या अनुभवानंतर सैनिकांना युद्धभूमीवर पाठवायला पाहिजे? आणि असा अनुभव कोणत्या मोबाईलच्या ऍप मध्ये किंवा संगणकाच्या खेळात मिळतो?
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sat, 06/26/2021 - 14:15

In reply to प्रश्न असम्बद्धच आहे. by सुबोध खरे

Permalink

आणि असा अनुभव कोणत्या

  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sat, 06/26/2021 - 14:16

In reply to प्रश्न असम्बद्धच आहे. by सुबोध खरे

Permalink

आणि असा अनुभव कोणत्या

आणि असा अनुभव कोणत्या मोबाईलच्या ऍप मध्ये किंवा संगणकाच्या खेळात मिळतो? एपिक रिप्लाय _/\_ :)
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Fri, 06/25/2021 - 19:07

Permalink

_/\_

नमन.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sat, 06/26/2021 - 15:23

Permalink

प्रशिक्षित सैनिक ही देशाची संपत्ती आहे

प्रशिक्षित सैनिक ही देशाची संपत्ती आहे त्यांची कमीत कमी हानी होणे हा हेतू युद्धात असलाच पाहिजे अमेरिका नी इराक आणि अफगाणिस्तान मध्ये युद्ध केले .त्यांच्या सैनिकांची कमीत कमी अगदी नगण्य जीवित हानी झाली. पण आपण जेव्हा अतिरेकी किंवा दुसऱ्या सैन्याशी लढलो तेव्हा आपली जीवित हानी प्रचंड झाली. उदाहरण कारगिल युद्ध. असे का घडते आहे ह्याचा विचार तर झालाच पाहिजे. अनेक तरुण सैनिक लढावू विमान कोसळून मेले आहेत. हे का घडतंय ह्याचा विचार झालाच पाहिजे. एक वर्षाचे प्रशिक्षण घेवून कोणीच निशांत ,कुशल सैनिक बनत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 06/26/2021 - 19:47

Permalink

हे वीर योद्धे या देशाचे रक्षण

हे वीर योद्धे या देशाचे रक्षण करताना आपली आहुती देतात म्हणुनच आपण सुखासीन जीवन जगतो... दरवर्षी दिवाळीत पाकिस्तान आपल्या सीमेवर गोळीबार करतो आणि या गोळीबारात आपले योद्धे वीरगतीस प्राप्त होतात... हे असं अनेक वर्ष चालु आहे ! जेव्हा सर्वांच्या घरी दिवे लावले जातात, तेव्हा मात्र अनेक कुटुंबियांच्या घरातले दिवे कायमचे मालवले जातात... मागच्या वर्षी देखील हेच झाले... एका बहिणीला भाऊबीजेच्या दिवशीच भावाचा मृतदेह पहावा लागला !

मदनबाण.....

  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sat, 06/26/2021 - 20:16

Permalink

कारवाई मध्ये मृत्यमुखी पडणाऱ्या सैनिकांची कारण शोधली जातात का?

१)कारवाई करताना काय चुका झाल्या? २)वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे होते का? ३) चुकीच्या माहिती मुळे सैनिकाचे जीव गेले का? ४)अयोग्य दर्जा ची हेल्मेट,चिलखत त्याला कारणीभूत आहेत का प्रतेक कारवाई नंतर त्याची समीक्षा होत असावी नसेल होत तर झाली पाहिजे. सैनिकांचे जीव अमूल्य आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 06/26/2021 - 20:20

Permalink

प्रशिक्षित सैनिक ही देशाची

प्रशिक्षित सैनिक ही देशाची संपत्ती आहे त्यांची कमीत कमी हानी होणे हा हेतू युद्धात असलाच पाहिजे. ७० वर्षे स्वातंत्र्यानंतर आणि त्याच्या अगोदर २ शतके भारतीय लष्करात हि गोष्ट कुणाच्याच कशी लक्षात आली नाही हे आश्चर्यच आहे नाही का? असे का घडते आहे ह्याचा विचार तर झालाच पाहिजे. हो ना सगळे लष्करी तज्ज्ञ मठ्ठच आहेत. एक वर्षाचे प्रशिक्षण घेवून कोणीच निशांत ,कुशल सैनिक बनत नाही. काय सांगताय? आम्हाला वाटायचं कि प्रशिक्षण संपलं की माणूस लगेच तज्ज्ञच होतो.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com