Skip to main content

हरिद्वारचा कुंभमेळा आणि भाजप

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 17/04/2021 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
हरिद्वारमधे कुंभमेळ्यात झालेले पहिले शाही स्नान हे सध्या सुशिक्षितांच्या रागाचे निमित्य ठरत आहे. करोनाची दुसरी लाट दररोज शेकडो बळी घेत आहे,दिवसेंदिवस बळींचा आकडा वाढत आहे. असे असूनही कुंभमेळ्याला परवानगी मिळालीच कशी? अगदी वर्तमानपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली गेली होती दोन दिवसांपूर्वी. येत्या २७ एप्रिलला चौथे शाही स्नान आहे आणि ते करण्याविषयी विचार सुरू आहे. ३० एप्रिलला मेळ्याची अधिकृत समाप्ती आहे. बहुतेक आखाडे शाही स्नानावर ठाम आहेत. साधू म्हणताहेत की कधीतरी मरायचंच आहे तर शाही स्नान करुन,देवाचा आशिर्वाद घेऊन मरु. अतिरेकी धर्मगंडी विचारांनी भारलेल्यांकडून समंजसपणाची, जबाबदारीने वागण्याची फार अपेक्षा ठेवता येणारच नाहीये पण मुद्दा हा आहे की केंद्र शासनाने अशा परिस्थितीत परवानगी दिलीच कशी. बरं दिली तर परिस्थितीचे गांभीर्य अोळखून कुंभमेळा ऐनवेळी रद्द का नाही केला? तो रद्द करणं हे इतकं कठीण असावं? जीवापेक्षा धार्मिक स्नान महत्वाचं आहे? राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. भाजप आणि कुंभमेळा यांचा हिंदू धर्माशी अभेद्य संबंध असला तरी त्यापायी होणारा जीवाचा खेळ नक्कीच निषेधार्ह आहे. कुंभमेळ्यातून करोनाचा प्रसार झाला हे लक्षात न घेता त्याची तबलिगींच्या मेळाव्याशी तुलना करुन त्यापेक्षा कुंभमेळा बरा. तबलिगींसारखे घाणेरडे प्रकार किंवा उद्दामपणा तरी आम्ही हिंदूंनी केलेला नाही असे काही कुंभमेळा समर्थकांचे म्हणणे आहे. कुंभमेळ्याचा उद्देश हिंदू मेळे तबलिगींच्या मेळ्यापेक्षा जास्त शिस्तबद्ध,स्वच्छ आणि नेटके आहेत हे दाखवणे हा आहे का? काहीजण म्हणत आहेत की जिथे कुंभमेळा नव्हता अशा बर्‍याच ठिकाणी करोना पसरला की. त्याचं काय करणार? पण जिथे पूर्वनियोजन करुन करोनाचा प्रसार रोखणे शक्य आहे तिथे तो रोखणे महत्वाचे की जिथे नियंत्रण ठेवणे कठीण आहे अशा ठिकाणांशी तुलना करत बसायचं? या सगळ्यात तोटा होईल तो भाजपचा. सगळं माहित असून आणि शक्य असूनही करोना पसरु दिल्याने भाजपचा जनाधार काही प्रमाणात कमी होईल आणि विरोधक याचा उपयोग प्रचारात करतील इतके मात्र नक्की!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8100
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आपली बुद्धी देवाच्या हवाले केली की असच होणार. Frontline workers अक्षरशः जीवाचं रान करत आहेत आणि यांचं आपलं दुसरंच काहीतरी. एक डॉक्टर म्हणून मी खूप नाराज आहे अश्या बातम्या पाहून. शब्दच नाहीत.......

अत्यंत चुकीचा निर्णय होता कुंभ मेळा भरवायला परवानगी देणे.खूप लोकांचे प्राण त्या मुळे धोक्यात आले.

'शाही' स्नानाचा जो प्रकार सध्या समोर दिसत आहे तो निन्दनीय आहे ह्यामध्ये शंका नाही. तदनुषंगाने मला पडलेला दुसरा प्रश्न विचारून घेतो. गोसावी आखाड्यांच्या महंन्तांच्या ह्या स्नानाला 'शाही' हे विशेषण कसे चिकटले? 'शाही' हा शब्द फारसी उगमाचा आहे असे वाटते. निदानपक्षी तो संस्कृत उगमाचा निश्चित नाही. असे असता हिंदू परंपरेतील ह्या स्नानविधीला तो विशेषण म्हणून कसा चिकटला?

धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर, हे पाळल्या जात नाही, तोपर्य॔त असे होतच राहणार..

कुंभमेळा झाला नसता तरी काही बिघडले नसते अर्थात महाराष्ट्रातल्या केसेस कुंभमेळ्यामुळे नसाव्यात

In reply to by अमर विश्वास

अगदी ब्राझील,आफ्रिका,अमेरिका,सर्व देशातून वाहक लोकांनी मुंबई मध्ये विषाणू आणला आहे आता त्याचे कॉकटेल होवून दुसराच भयंकर strain इथे निर्माण झाला आहे. कुंभ मेळावा ज्या भागात झाला त्या सर्व प्रदेशातून रोज मुंबई,पुण्या मध्ये लाखो नाही पण हजारो लोक येतात. आणि तुम्ही म्हणतात कुंभ मेळावा हा राज्यातील केस वाढायला कारणीभूत नाही.

In reply to by Rajesh188

दुसराच भयंकर strain इथे निर्माण झाला आहे. >>>>>>>>>>>>>>> कुठला स्ट्रेन ? नाही तुम्ही WHO लाही मार्गदर्शन करता ... (राज्य सांभाळता येत नाही .. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे काय लक्ष द्यायचे ) ह्या भयंकर स्ट्रेन ला तुमच्या मार्गदर्शनाखाली WHO ने काही नाव दिले असेल ना ?

सेल्फ गोल करू नका हो .... The new variant, called B.1.617, was initially detected in India with two mutations -- the E484Q and L452R. It was first reported late last year by a scientist in India अहो हा मागच्याच वर्षी रिपोर्ट झालाय. त्यांनंतरही जानेवारी फेब्रुवारीत साथ कमी होती ... गलथान कारभार आणि लोकांचा हलगर्जी पण यामुळे महाराष्ट्रात साथ वाढली आहे

कुंभमेळा या प्रकाराविषयी मला तरी अजिबात ममत्व नाही आणि सध्याच्या काळातच नाही तर कधीही कुंभमेळा झाला नाही तरी त्याविषयी वाईट वाटावे असे मला तरी काही वाटत नाही. तसेच सध्याच्या परिस्थितीत तरी कुंभमेळा व्हायला नको होता याविषयी दुमत नसावे. तरीही कुंभमेळ्याच्या नावावर साप साप म्हणून जमिन बडवायचा प्रयत्न होत आहे असे दिसते. कुंभमेळ्यात मकरसंक्रातीपासून (१४ जानेवारी) चैत्र पौर्णिमेपर्यंत (यावर्षी २७ एप्रिल) एकूण ९ स्नाने असतात आणि त्यापैकी ४ स्नाने शाही स्नाने असतात. यावर्षी ही शाही स्नाने ११ मार्च, १२ एप्रिल, १४ एप्रिल आणि २७ एप्रिल या चार दिवशी तर साधी स्नाने १४ जानेवारी, ११ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी आणि २१ एप्रिल या पाच दिवशी होती. हे सगळे https://www.tourmyindia.com/kumbhmela/bathing-dates.html वरून कळले. शाही स्नानांच्या दिवशी सामान्य परिस्थितीत अक्षरशः एखाद-दीड कोटी लोक जमतात. साध्या स्नानांच्या दिवशी पण काही लाखांमध्ये लोक जमतात. हे सगळे यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यांवरील बातम्या वाचलेल्या आठवतात त्यावरून. याचाच अर्थ १४ जानेवारी ते ११ मार्चपर्यंत चार साधी स्नाने आणि १ शाही स्नान झाले. म्हणजेच या दोन महिन्यात सामान्य परिस्थितीत हरिद्वारमध्ये एखाद-दीड कोटी लोक आले असते हे नक्की. या वर्षी अगदी त्याच्या अर्धे लोक जरी आले तरी तो आकडा कित्येक लाखांमध्ये जातो- हरिद्वारच्या लोकसंख्येपेक्षा बराच जास्त. यापैकी काही रिकामटेकडे लोक हरिद्वारमध्येच दोन महिने तळ ठोकून असतील, काही या पाचपैकी एक-दोन स्नानांना येऊन-जाऊन असतील याचीही कल्पना करता येते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या दोन महिन्यात हरिद्वारमध्ये कित्येक लाख लोक आले. हे सगळे लोक पूर्ण वेळ गंगा नदीच्या आसपासच असतील असे मानायचे कारण नाही तर शहरात आजूबाजूला जा-ये करत असतील ही शक्यता जास्त. तसेच इतके लाखो लोक आले म्हटल्यावर शेकडो-हजारो फेरीवाले, छोटेमोठे स्टॉल चालवणारे लोक वगैरे किती भाऊगर्दी असेल याची कल्पना यावी. तसे असेल तर आतापर्यंत हरिद्वार कोरोनाचा हॉटस्पॉट बनायला हवा होता. तसे झालेले दिसले नाही. कालपरवाच बघितले की पूर्ण भारतात दर दहा हजार लोकांमागे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त रूग्ण आहेत. इतर हॉटस्पॉट म्हणावेत तर मुंबई, पुणे, नागपूर आणि विदर्भातील शहरे, दिल्ली, भोपाळ, लखनौ वगैरे. पण जिथे लाखो बाहेरचे लोक दोन महिन्यांपेक्षा जास्त होते तिथे मात्र हॉटस्पॉट झालेला दिसत नाही. दुसरे म्हणजे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पूर्ण भारतातील रूग्णांपैकी महाराष्ट्रात ६०-६५% रूग्ण होते. इतर सगळ्या राज्यांमध्ये आकडे इतक्या वेगाने वाढत नव्हते पण महाराष्ट्रात मात्र वाढत होते. बंगालमध्ये निवडणुकांच्या निमित्ताने लाखांच्या प्रचारसभा, हजारोंचे रोड शो गेले दीडेक महिने तरी सुरू आहेत. बंगालमध्ये लोकसंख्येची घनता महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त आहे. कलकत्त्यात ब्रिगेड मैदानात एक सभा म्हणजे ८-१० लाख लोक त्यात असतात. महाराष्ट्रात असे ८-१० लाख लोक एकत्र आले आहेत असे कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही रूग्णांचे आकडे महाराष्ट्रात कितीतरी जास्त आहेत. काल महाराष्ट्रात ६७,७१३ आणि बंगालमध्ये ७,७१३ नवीन रूग्ण आले असे कोव्हिड१९.ओआरजी या वेबसाईटवरून कळले. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांचे आकडे लपवणारे सरकार आहे पण बंगालमध्ये अशी लपवाछपवी करणारे सरकार नसल्याने त्या आकड्यांवर विश्वास ठेवायला हरकत नसावी. तरीही मिडिया बातम्या देताना कसे नाट्यमयीकरण करते याचे एक उदाहरण म्हणजे बंगालमध्ये रूग्णांच्या संख्येत चौपट वाढ अशी बातमी न देता ४००% वाढ अशी बातमी देतात. चार पेक्षा ४०० हा आकडा खूप मोठा असल्याने वाटते की अरे बापरे किती मोठी वाढ झाली आहे. रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहेच आणि ते नाकारायचा प्रश्न नाही पण जिथे निवडणुक किंवा कुंभमेळा यापैकी काहीही नाही अशा महाराष्ट्रात ही वाढ त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आहे याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा कुंभमेळा आणि बंगालमधील निवडणुका यामुळे रूग्णसंख्या वाढली हा प्रचार मिडियात जो गेले काही दिवस दिसत आहे त्यामागे वेगळा काही अजेंडा आहे का हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. बरं निवडणुका तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही आहेत. तिथे मतदान होऊनही गेले तरी याविषयी विशेष काही आरडाओरडा झाल्याचे ऐकिवात नाही. केरळही बंगालप्रमाणेच लोकसंख्येची प्रचंड घनता असलेले राज्य आहे. त्यामुळे जे मुद्दे बंगालला लागू होतात तेच केरळलाही लागू होतात पण त्याविषयी कधी बातम्यांमध्ये उल्लेख बघितला नाही. तेव्हा प्रश्न पडतो की दुसर्‍या लाटेत हे कोरोनाचे आकडे वाढत आहेत त्यामागे गर्दी हेच नक्की कारण आहे की गर्दीबरोबरच अजून काही कारण आहे? मुंबईतल्या लोकलमध्ये गर्दी म्हणाल तर एक गोष्ट सांगतो. ऑफिसमध्ये माझ्या टिममध्ये एक बंगालमधील कृष्णनगरचा आहे. हे ठिकाण कलकत्त्यापासून १२० किलोमीटर्सवर आहे. तो गेल्या मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर मुंबईत अडकला होता पण जूनमध्ये विमाने सुरू झाल्यानंतर घरी गेला आणि आता तिथूनच काम करत आहे. कामानिमित्त तो अगदी ऑगस्ट-सप्टेंबरपासून कलकत्त्याला जा-ये करत आहे. मुंबईत लोकल ट्रेन आहेत तशा कलकत्त्यातही आहेत आणि त्यावेळी त्या ट्रेन सामान्यांसाठी बंद होत्या. त्यामुळे सगळी तोबा गर्दी बसमध्ये होत होती आणि अनेक लोक टपावरूनही प्रवास करत होते असे त्याने सांगितले. सोशल डिस्टन्सिंगची ऐशीकीतैशी कलकत्त्यात अगदी ऑगस्ट-सप्टेंबरपासून होत आहे. तरीही मुंबईएवढीच लोकसंख्येची घनता असून कलकत्त्यात मात्र रूग्णसंख्या इतकी वाढलेली दिसत नाही. तेव्हा मिडियात हे सगळे येत आहे त्यामागे काही दुसरे कारण तर नाही ना ही शंका नक्कीच वाटते. बाकी पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे कुंभमेळे कायमचे बंद जरी झाले तरी माझ्यात तरी कणभरही फरक पडणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकडेवारी च्या जंजाळात तुम्ही कशाला अडकत आहात. काही प्रश्न. १) corona क्लोज संपर्कात आल्यावर संक्रमित होतो की नाही होत? कुंभ मेळाव्यात क्लोज संपर्कात लोक आली होती की नव्हती ? २) मुख पट्टी चा वापर केल्यावर संक्रमण होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो हे खरे आहे का? कुंभ मेळाव्यात मुख पट्टी च वापर सर्व लोकांनी केला होता की नव्हता? ३) तिथे आलेली माणसा ही देशभरातून आली होती त्या सर्व लोकांकडे २४ तास अगोदर चा Rt pcr टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट होता का? असेल तर वरचे १ आणि २ नंबर च्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. ह्या सर्व प्रश्नांची तुम्हीच उत्तर शोधा. का महारष्ट्र सोडून बाकी राज्यात बाधित लोकांच्या क्लोज संपर्कात आले तरी corona होत नाही तो फक्त महाराष्ट्रात च होते असे तुम्हाला आकडेवारी देवून सूचित करायचे आहे का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकडेवारी च्या जंजाळात तुम्ही कशाला अडकत आहात. काही प्रश्न. १) corona क्लोज संपर्कात आल्यावर संक्रमित होतो की नाही होत? कुंभ मेळाव्यात क्लोज संपर्कात लोक आली होती की नव्हती ? २) मुख पट्टी चा वापर केल्यावर संक्रमण होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो हे खरे आहे का? कुंभ मेळाव्यात मुख पट्टी च वापर सर्व लोकांनी केला होता की नव्हता? ३) तिथे आलेली माणसा ही देशभरातून आली होती त्या सर्व लोकांकडे २४ तास अगोदर चा Rt pcr टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट होता का? असेल तर वरचे १ आणि २ नंबर च्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. ह्या सर्व प्रश्नांची तुम्हीच उत्तर शोधा. का महारष्ट्र सोडून बाकी राज्यात बाधित लोकांच्या क्लोज संपर्कात आले तरी corona होत नाही तो फक्त महाराष्ट्रात च होते असे तुम्हाला आकडेवारी देवून सूचित करायचे आहे का?