शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
25 Mar 2021 - 7:35 pm

नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो.

माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न! दोघं ब-याच काळानंतर आणि लॉकडाउननंतर सोबत भेटले तेव्हा सुरुवातीला खूप उत्साहाने खेळले आणि मस्ती करत होते. नवीन भेटीला खूप एंजॉय करत होते. लॉकडाउनमध्ये मित्र- मैत्रिणींसोबत खेळणं हा प्रकार मुलांनी अतिशय जास्त मिस केला. आणि मुलांच्या अंगात इतकी ऊर्जा असते की आपल्याला त्यांना किती त्रास होत असेल ह्याची‌ कल्पनाही येत नाही. ज्यांच्या अंगात इतकी ऊर्जा सळसळत असते की ते दोन मिनिटही शांत बसू शकत नाही, त्यांना दिवस, महिने नाही तर वर्षभर शांत राहावं लागणं ही किती मोठी शिक्षा असेल!! पण मुलांची‌ क्रिएटिव्हिटी इतकी जबरदस्त असते की, ते त्यातूनही बरोबर मार्ग शोधतात! एकटी खेळत असतानाही इतरांच्या सोबत खेळत आहेत असा गोंगाट करतात आणि कल्पनेतून आनंद घेतात!

तर अदू आणि प्रसन्न सोबत खेळत असताना सुरुवातीचा आनंदाचा भर ओसरल्यावर त्यांच्यात एक वेगळीच गोष्ट सुरू झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये ते एकमेकांसोबत तुलना आणि स्पर्धा करायला लागले. एकमेकांसोबत खेळणं व खेळ शेअरिंग करून खेळता खेळता एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले. आणि हे बघ मी किती मोठं करतो, तुला येतं का असं त्यांचं बोलणं सुरू झालं. आणि नंतर तर ते पुढे वाढतच गेलं. त्यातच अनेकदा छोटी मुलं मोठ्या मुलांकडून ऐकू नयेत अशा गोष्टी ऐकतात आणि अबोध प्रकारे त्या बोलतात. त्याचाही दुस-यांना त्रास होतो. अशा वेळेस त्यांना शांतपणे सांगावं लागतं. आणि मुळात मुलांना शांत बसा हे ओरडून सांगायचंच नसतं. उलट त्यांचं जास्त ऐकून घ्यायचं‌ असतं. त्यामुळे मुलं शांत होतात.

पण हे बघताना कुठे तरी जाणवलं की, आपण मुलांना जे वातावरण देतोय त्यातून त्यांना अनेक गोष्टी मिळत आहेत. आणि "मोठ्यांच्या" जगामध्ये जे रोग पसरलेले आहेत त्याची लागण त्यांच्या भावविश्वालाही झालेली आहे. मोठ्यांचा एक खूप मोठा रोग म्हणजे स्पर्धा किंवा शर्यत! अगदी सदैव लहनापणापासून आपल्याला स्पर्धा किंवा शर्यतच शिकवलेली असते. मग ती गोष्ट परीक्षेतल्या मार्क्सची‌ असेल किंवा कोण लवकर जेवतो ही असेल. अनेक ठिकाणी सातत्याने हेच सांगितलं जातं. सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली ती ससा आणि कासवाची गोष्ट! त्या गोष्टीतली गंमत व मजा नाकारता येणार नाही. आणि त्यामध्ये जो संदेश आहे तोही चांगला आहे की जो सातत्याने प्रयत्न करतो तो जिंकतो. त्याउलट जो एकदमच जोर लावतो आणि सातत्य ठेवत नाही तो हारतो. एका मर्यादित अर्थाने हा संदेश चांगला आहे. पण तरीही त्यामध्ये कुठे तरी शेवटी "हार" आणि "जीतच" सांगितली जाते. आणि मुळात ससा आणि कासव हे किती वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत हेच सांगितलं जात नाही. ससा हा वनामधला तृणभक्षी प्राणी तर कासव हा मुख्यत: जलाशयाजवळ राहणारा उभयचर आणि सरीसृप प्राणी! दोघांच्या शरीर रचनेमध्ये आणि प्रकृती- प्रवृत्तीमध्ये किती मोठा फरक! आणि दोघांची शर्यत लावण्याची कल्पनाच मुळात किती निर्बुद्धपणाची असेल!

निसर्गामध्ये कोणाचीच कोणाची रेस नसते. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या प्रकृती- प्रवृत्तीनुसार आणि स्वभावानुसार विहरत असतो. पण नकळत आपण मुलांना ह्या चुकीच्या गोष्टी सांगतो. त्यातून मग प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धेची किंवा शर्यतीची भावना येते. आणि त्यातूनच मग मुलं ताण करून घेतात आणि पुढे पुढे ह्यातूनच मानसिक त्रासही मुलांना होतात. त्याउलट त्यांना प्रत्येक जण किती युनिक आहे, किती वेगळा आहे हे सांगायची‌ मोठी गरज जाणवते. दोघं सोबत खेळत असतील तर दोघांनी एकमेकांशी तुलना न करताही किती सुंदर खेळता येऊ शकतं हे त्यांना अनुभवण्याची संधी द्यायला पाहिजे. किंवा जर एकच खेळ असेल तर एकाने तो खेळावा व दुस-याने त्याला प्रोत्साहन द्यावं, मदत करावी व आलटून पालटून दोघांनी तो खेळावा असं त्यांना सांगायला पाहिजे. पण पालक म्हणून आपल्याला त्याची आधी सवय असायला पाहिजे. जर तुलना आणि स्पर्धेचं विष आपल्याच मनात असेल तर आपण मुलांना ते कसं सांगू शकणार? दोघं सोबत खेळताना अजिबात तुलना मध्ये येऊ न देता दोघंही वेगवेगळं आणि सुंदर खेळू शकतात किंवा अगदी वेगळी चित्र काढू शकतात किंवा खेळण्यांमधून वेगळीच काही गंमत करू शकतात, असं वातावरण त्यांना द्यायला पाहिजे. आणि ही गोष्ट इतकीच नाही. नकळत आपण स्त्री- पुरुष तुलना मुलांना सांगत असतो. हे बघ मला किती चांगलं जमतं, बाबाला जमतं का, असाही सूर अनेक ठिकाणी आढळतो. इथेही पालकांनी स्वत: आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि स्वत:मध्ये हे स्पर्धेचं किती विष भिनलंय हे समजून घ्यायला पाहिजे! आणि तुलना किंवा स्पर्धेऐवजी प्रत्येकाला जे आवडतं ते कसं सुंदर करता येईल असा विचार करायला पाहिजे. असं पालकांनी केलं तरच हे शर्यतीचे अडथळे हळु हळु दूर होऊ शकतील! पण पालक तर स्वत:च मुलांना खोटेपणा आणि पॉलिटिक्स शिकवत असतात!

अदू व प्रसन्नच्या खेळामध्ये व गमतीमध्ये एक गोष्ट मात्र जाणवली की मुलं एकमेकांवर नाराज असली व भांडत असली तरी त्यांनाही काय चुकतंय ह्याची आतून जाणीव असते. गरज असते ती त्यांना ऐकून घेण्याची व शांत प्रकारे त्यांना जवळ धरून समजुत काढण्याची. आणि आपण असं थोडं जरी केलं तर मुलं आपल्याहून जास्त मॅच्युरिटी दाखवतात. आणि मुलं अगदीच साजुक तुपातली राहू नयेत म्हणून पालकांनीही मुलांसोबत गमती गमतीमध्ये भांडलं पाहिजे. मी तर अदू सायकल चालवताना तिच्या वाटेमध्ये येऊन तिला गमती गमतीमध्ये अडवतो! एकदम मध्येच येऊन अडथळा आणतो. म्हणजे उद्या तिला सायकल चालवताना कोणी मध्ये आला तर तिला ते अगदीच नवीन नसेल. प्रसन्नने एक प्रश्न खूपच मोठा विचारला. एकदा एका मुलीसोबत त्याचं भांडण झालं आणि त्याला खूप राग आला आणि त्याने तो लगेच बाहेर काढला आणि तिला मारलं. नंतर सगळं शांत झाल्यावर मला भेटला तेव्हा त्याने मला विचारलं निन्नू (म्हणजे निरंजन मामा), मला सांग मला राग आला तर मी काय करू रे? मी माझा राग कसा बाहेर काढू? पाच वर्षांच्या मुलाच्या ह्या प्रश्नाने मला अवाक् केलं. काय उत्तर सांगणार! आणि हा प्रश्न खरं तर इतका मोठा की त्याला उत्तर देऊन थोपवायचं का, हाही प्रश्न पडला. थोडा विचार करून मग हळुच सांगितलं की, तुला जर राग आला ना तर तू जरा मस्त पळून ये किंवा जोराने पाय आपट किंवा जोराने ओरड.

आज मुलांना आपण अगदी आदर्श वातावरण देऊच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आज सगळ्या गोष्टी इतक्या बदलत आहेत की परिपूर्ण असं आपण काहीच देऊ शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी मुलं कार्टून बघणार आहेत आणि मोबाईलही धरणार आहेत. समाधान एका गोष्टीचं वाटतं की, मुलं सध्या इतकी मोबाईल बघत आहेत की, हळु हळु कदाचित ते स्वत:हूनच मोबाईलला कंटाळतील आणि मग त्यातून मुक्त होतील. पण मुलांसोबत एक गोष्ट नेहमी खरी असते की, आपण काय करतो किंवा काय सांगतो ह्यापेक्षा आपण काय आहोत, हे मुलं खूप नीट बघत असतात. आणि आपलं being त्यांच्यापर्यंत बरोबर पोहचत असतं. त्यामुळे मुलांना शब्दाने किंवा ओरडण्याने एखादी गोष्ट सांगून जितका फरक होत नाही तितका त्यांना ती गोष्ट आपल्या being मधून- आपल्या स्वत:च्या असण्यातून सांगण्यामधून पडू शकतो.

स्पर्धेपेक्षा वेगळं दुसरंही काही असू शकतं. आणि ते म्हणजे स्पर्धेऐवजी प्रेम. संगीत किंवा गणितासंदर्भात चढाओढ नाही तर तल्लीनता, त्याचा आनंद व त्या गोष्टीचं प्रेम. आणि खरं शिकणं हे प्रेम असताना व आवड असतानाच शिकता येतं. पण तसं कुठेच होत नाही. एखादी गोष्ट मनातून येऊन ती स्वत:हून शिकणं होत नाही आणि सगळं बाहेरून लादलं जातं. विचारवंत इमर्सनने एका युवकाचं कौतुक करताना एक गोष्ट सांगितली. तो त्याच्या गावातला पहिला ग्रॅज्युएट होता. लोकांनी इमर्सनला म्हंटलं की, तो आमच्या गावातला पहिला ग्रॅज्युएट आहे, त्याबद्दल तुम्ही काही बोला. तेव्हा इमर्सन बोलला की, मी‌ आधी महिनाभर त्याला भेटेन, त्याची ओळख करून घेईन आणि मगच बोलेन. महिन्यानंतर इमर्सन परत लोकांना भेटला आणि त्या युवकाबद्दल त्याने मत दिलं. तो म्हणाला की, हा युवक खरोखर कौतुकास्पद आहे, तो अद्भुत आहे. आणि मी त्याचं कौतुक ह्यामुळे करतो की, युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊनही त्याने आपली प्रतिभा वाचवली आहे! त्याची प्रतिभा अद्याप टिकून आहे!

- निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com अदूला लिहिलेली ६ वाढदिवसांची पत्र व माझे बाकी लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

समाजजीवनमानप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Mar 2021 - 8:01 pm | मुक्त विहारि

युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊनही त्याने आपली प्रतिभा वाचवली आहे! त्याची प्रतिभा अद्याप टिकून आहे!

हे आवडले...

सौन्दर्य's picture

25 Mar 2021 - 11:26 pm | सौन्दर्य

मला वाटते आज जे साठ -पासष्ठ वर्षांचे आहेत त्यांनी त्यांच्या बालपणी नेहेमीच स्पर्धा अनुभवली आहे. अलीकडच्या आणि पलीकडच्या वयांच्या मंडळींविषयी फारसे काही सांगता येणार नाही पण थोड्याफार फरकाने अनुभव तेच असतील असे मला वाटते.
ह्या स्पर्धेमुळे माझे काही व्यक्तिगत नुकसान झाले आहे, मनात न्यूनगंड निर्माण झाला असे मला काहीही वाटत नाही. ह्या उलट मी असे म्हणेन की जीवनाच्या स्पर्धेला मी नीटपणे तोंड देऊ शकलो.
मुलं ही फार लवचिक असतात, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, त्यामुळे लहापणी स्पर्धा करावी लागली तर त्यातून त्यांच्या जीवनावर दूरगामी वाईट परिणाम होतील असे मला वाटत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2021 - 3:02 am | श्रीरंग_जोशी

लहान मुलांचे वागणे, खेळणे, बागडणे व भोवतालच्या गोष्टींचे त्यांच्यावर पडाणारे प्रतिबिंब या बद्दलची निरिक्षणे उत्तमपणे मांडली आहे.

माझी मुलगीही तुमच्या अदूच्या वयाची असेल. तिच्या सतत येणार्‍या एका प्रश्नाचे उत्तर देणे बरेचदा कंटाळवाणे व आव्हानात्मक असते.

तो प्रश्न म्हणजे 'आता मी काय करू?'. नेहमीची उत्तरे म्हणजे, चित्र काढ, पुस्तक वाच, खेळण्यांमधले काही प्रकार कर (जिग सॉ पझल वगैरे). हे सर्व करुन झालेलं असल्याने ते सोडून मी काय करू हा पुढचा प्रश्न असतो. (आम्ही जिथे राहतो तिथे हिवाळा बरेच महिने असतो अन घराबाहेर फार काळ थांबणे शक्य नसते). शेवटी वैतागून मी म्हणतो एक तर तू स्वतः नवे काही तरी शोध किंवा काहीही न करता शांतपणे बसून रहा. काहीही न करणे ही पण एक कला आहे :-). हे उत्तर तिला अजिबात पटत नाही. झोप सोडल्यास काहीही न करता शांत बसून राहणे हे तिला ठाऊकच नाही. तिला शाळेत पूर्ण वेळ जायला मिळण्याच्या संधीची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत ;-).

मुक्त विहारि's picture

26 Mar 2021 - 7:59 am | मुक्त विहारि

एकच अपत्य असेल आणि कुणी खेळायला नसेल तर, सगळ्याच लहान मुलांना कंटाळा येतो..

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2021 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

हो, मला एकच अपत्य आहे.
कोविड-१९ मुळे या वयाच्या मुलांना अधिकच त्रास होतो. नाही तर किमान मित्र मैत्रिणींबरोबर त्यांच्या किंवा स्वतःच्या घरी खेळणे हा पर्याय उपलब्ध होता.

माझ्या बायकोला पण सख्खे बहीणभाऊ नाहीत...

पण तिला एकटेपण कधीच जाणवले नाही

चाळीत रहात असल्याने, ती घरात कमी आणि मैत्रींणीच्या घरी जास्त वेळ असायची

लहान मुलांना, शक्यतो घरात खूप वेळ ठेवू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे...

मार्गी's picture

27 Mar 2021 - 5:39 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद! अनेक प्रकारे चर्चेत इतकी भर घातल्याबद्दल धन्यवाद! :)

मी एका अँगलने मुद्दे मांडले होते व बाकीचे अँगल्सही अर्थातच महत्त्वाचे आहेतच. नैसर्गिक स्पर्धा तर असतेच प्रत्येक ठिकाणी.

@ श्रीरंग जोशी जी, ओके! मुलं खूप क्रिएटीव्ह असतातच. त्यांच्यासोबत आपल्यालाही पर्याय शोधता येतात. मी मुलीला कडेवर घेऊन घरात वॉक करायचो. त्यात गप्पा व्हायच्या. किंवा ती तीन बहिणी फूटबॉल खेळत आहेत असं सिम्युलेशन करते व पळत पळत कॉमेंटरीही करते. दम लागला तरी असं खेळते. किंवा सगळ्या जवळच्यांना ऑडिओ पत्र/ लिहून पत्र पाठवते मूड असला तर.

श्रीरंग_जोशी's picture

28 Mar 2021 - 12:46 am | श्रीरंग_जोशी

मार्गी साहेब - माझ्या प्रतिसादावरील प्रतिसादासाठी धन्यवाद. माझी वरची माहिती खूपच थोडक्यात अन प्रतिकात्मक अशी होती. माझी मुलगी स्वतः कल्पकणे खेळायचे व वेळ घालवायचे मार्ग शोधून काढत असते. पालक म्हणून आम्हीही जमेल तेवढे नवे काही तरी शोधून काढतो किंवा स्वतःच्या लहानपणाचे खेळ खेळतो. तरी पण कंटाळा येतोच.

भोवतालचे काही पालक जणू काही कोविड-१९ अस्तित्वातच नाही असे वागत असतात. आम्ही तसे करत नसल्याने मुलीला तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर पूर्वीसारखे मोकळेपणाने खेळता येत नाही. आउटडोअर अन ते ही अंतर ठेवून खेळावे लागते.