Skip to main content

आज काय घडले .... मार्गशीर्ष व. ३० कौरवेश्वर दुर्योधन याचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 14/01/2021 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्योधन वध शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले. दुर्योधन अनाथ व असहाय होऊन घोड्यावरून फिरत होता. रणभूमीपासून एक कोस अंतरावर एक सरोवर होते. त्या सरोवरांत मायेने पाण्याचे स्तंभन करून दुर्योधन विश्रांति घेत स्वस्थ राहिला. पांडवांना ही बातमी कळल्यावर त्यांचे सैन्य जयघोष करीत सरोवराच्या काठी आले. धर्मराज आणि दुर्योधन यांच्या मर्मभेदक संभाषणानंतर दुर्योधन स्फुरण पावून नागाप्रमाणे त्वेषाने खांद्यावर गदा घेऊन सरोवराबाहेर आला. भीम गदा हातात घेऊन त्याच्याशी झुंजण्यास सिद्ध झाला. भीमाचे बळ जास्त होते. दुर्योधन गदायुद्धांत कुशल होता. भीमास जय मिळण्याचे चिन्ह दिसेना. श्रीकृष्ण अर्जुनास बोलले, “आतां कपटाशी कपट, मायेशी माया पाहिजे.” हे ऐकून अर्जुनाने आपल्या डाव्या मांडीवर थाप मारून भीमास इषारा दिला; त्याप्रमाणे संधि साधून दुर्योधन गदेचे घाव चुकविण्यासाठी उडी मारीत असतां भीमानें त्याच्या मांडीवर आपल्या गदेचा प्रहार केला. त्यासरशी दुर्योधन ओरडतच जमिनीवर पडला. भीमसेन आनंदाने गर्जु लागला. तेरा वर्षे अंतःकरणांत दाखून ठेवलेल्या क्रोधाचा व वैराचा असा शेवट पाहून त्यास आवेश चढला. यानंतर अश्वत्थामा-द्रोणाचार्यांचा पुत्र-संतापानें बेहोष होऊन त्याच रात्री गुप्तपणे पांडवांच्या शिबिरांत गेला आणि आपल्या पित्याचा वध करणारा धृष्टद्युन्म, आणि युधामन्यु, उत्तमौजा, शिखंडी, द्रौपदीचे पांच पुत्र या सर्वांची त्याने क्रूरपणे कत्तल केली. ही आनंददायक बातमी दुर्योधनास कळविण्यांत आली. मरणकाळच्या असह्य वेदना सोसणाऱ्या दुर्योधनास ही वार्ता ऐकून हर्ष झाला. "भीष्म, द्रोण, कर्ण यांच्या हातून न होणारा पराक्रम अश्वत्थामा, तूं करून मला अंतसमयीं आनंद दिलास. तुझे कल्याण असो. तुमची आमची आतां स्वर्गात भेट." एवढे शब्द कसेबसे उच्चारून दुर्योधनाने मार्गशीर्षे व. ३० ला प्राण सोडला. -५ नोव्हेंबर इ. स. पू. १९३१
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1867
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by सतिश म्हेत्रे

काहीतरी विटरेस्टींग समजते हे धागे वाचल्यावर. पैजारबुवा,

निधन ? त्याकाळी योद्धा मेल्यावर तो 'वीरगती' प्राप्त करत असे ना ?

अश्या दुर्लक्षित योद्ध्याला/ राजनेत्याला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे प्रगत विचार समाजाला पटले नाही हे त्यांचे दुर्दैव !