स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि आठवणी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
14 Dec 2020 - 4:34 pm

स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग

स्मृतींची चाळता पाने -अनगाव

स्मृतींची चाळता पाने -अनगाव2

स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती

माझ्या आठवणीप्रमाणे १९५५मध्ये एका स्वयंसेवी संस्थेने ठाण्याचा मासुंदा तलाव साफ करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी तिथे फक्त दलदल आणि निळी कमळे उगवलेली होती. आता जो रस्ता दिसतो तो नव्हता.त्यामुळे पलीकडे जायचे असल्यास कौपिनेश्वर मंदिराला वळसा घालून जावे लागे.
त्यामुळे ठाण्यातील सर्व शाळा कॉलेज, कामगार वर्ग सगळ्यांना गांधी जयंती निमित्त आवाहन केले गेले आणि २ ते ९ ऑक्टोबर व नंतरही काही दिवस श्रमदानाने तलाव साफ करण्याचे ठरले. आम्हा विद्यार्थ्यांबरोबर शाळेचे शिक्षकही सहभागी झाले आणि प्रत्येकी ८-१० जणांची रांग करून कामगार जसे विटा वगैरे वाहून नेतात तसे आम्ही तलाव साफ करायला उभे राहिलो.झाडांची मुले तलावात खूप खोलवर गेली होती त्यामुळे मोठी माणसे पायात गमबूट घालून पाण्यात उतरून झाडे ओढून काढत असत व मागे पाठवीत असत. सकाळी ७-११ व नंतर पुन्हा २-७ वाजेपर्यंत महिनाभर काम चालू होते. त्यामुळे बरीच जागा मोकळी झाली आणि आता जो रस्ता कौपिनेश्वर मंदिरामागून जातो तो भराव टाकून तयार केला गेला. तो तलाव आता खूपच सुशोभित केला आहे आणि बोटिंगची सोय,कारंजे ,बसायला कठडे वगैरे केले आहेत. पण त्यामागे ठाण्यातील सर्व शाळा कॉलेजेस ,संस्था यांचे श्रम आहेत हे मान्य करावेच लागेल. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा ह्या कामात हातभार लागला याचा मला अभिमानच आहे.

आमची जी चाळ आहे त्या ठिकाणी लाल मातीचा डोंगर होता त्यामुळे या वस्तीला लालबाग असे नाव पडले असे माझे काका सांगत. आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे चाळीतील सर्व बिऱ्हाडे एकमेकांशी मिळून मिसळून राहत. दिवाळी आली कि सगळ्या घरातून भाजणी भाजण्याचे वास यायला लागत.प्रथम धान्ये भाजून मग जात्यावर भाजणी दळली जाई , नंतर सगळ्या बायका एकत्र येऊन एकमेकींच्या मदतीने चकल्या करंज्या शंकरपाळे असे वेळखाऊ पदार्थ बनवत असत. आम्ही मुलेही मधेमधे लुडबुड करत असू व जमेल तशी मदत करत असू. हे सगळे पदार्थ तेव्हा आजच्या सारखे सहज बाहेर तयार मिळत नसत व वर्षातून एकदाच दिवाळीला घरी केले जात त्यामुळे त्यांचे अप्रूप असे. दिवाळीनंतर सर्वांचा एकत्र फराळ होत असे. त्यात प्रथम रविवारी सकाळी १० च्या सुमारास पुरुषवर्ग एकत्र जमून आपापले फराळाचे पदार्थ आणत व एकत्र बसून गप्पा टप्पा करत खात. नंतर दुपारी ४ वाजता बायका व मुले जमत असत व त्यांचा फराळ होई. कोणाचा कोणता पदार्थ चांगला झाला आहे अशी स्पर्धा लागत असे. जिचा जो पदार्थ नावाजला जाई तिच्या अंगावर मूठभर मांस चढत असे. मे महिन्यातही बटाटा किस ,पापड ,चीकवड्या हे सर्व वर्षभराचे वाळवणाचे पदार्थ एकमेकींच्या मदतीने होत असत. आम्ही लहान मुले पापड वाळत घालायचे आणि मधेच लाट्या मटकावयाचे काम करत असू. तसेच तुटके पापड खाणे हाही उद्योग असे. मात्र मध्येच आईचे लक्ष गेले तर ओरडा बसे.
दिवाळीनंतर आमच्या शेजारी लोहोकरे नावाचे कुटुंब राहत असे त्यांच्याकडे दणक्यात तुळशीचे लग्न होत असे. खऱ्या लग्नाप्रमाणे अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जात आणि लग्न लागल्यानंतर सर्वांना चिवडा लाडू चहा कॉफी देत असत. तसेच बायकांना हळदीकुंकू व अत्तर लावत असत आणि गुलाबपाणी शिंपडणे वगैरे कामे मुलांकडे असत.

कोजागिरी पौर्णिमेला चाळीतील मोठी मुले सगळ्यांकडून वर्गणी गोळा करून मसाला दूध व भेळीचा कार्यक्रम करत असत तसेच होळी पौर्णिमेला मधल्या मोकळ्या पटांगणात होळी लागत असे आणि पूजा होत असे. नवरात्रात आम्ही मुले आई व काकू तसेच इतर बायकांसोबत घंटाळी मंदिरात जात असू. त्यावेळी तो परिसर अगदी मोकळा होता. सगळीकडे शेत आणि गावात वाढलेले असे. पहाटे तिथून जायला प्रसन्न वाटे. आता तेथे सर्वत्र मोठ्या इमारती झाल्या आहेत. नौपाडा, कोपरी कॉलनी परिसरातही शांतता होती. आनंदाश्रम कॉलनीत आईचे मामा राहत असत आणि काही गणित वगैरे अडले तर आई त्यांच्याकडे विचारायला जाई. विठ्ठल सायन्ना मंदिर येथे आमची मराठी शाळेची सहल जात असे. कोपरी कॉलनीला बारा बंगला परिसर म्हणत कारण तेथे कलेक्टर मामलेदार न्यायाधीश लोकांचे बंगले होते.
तसेच उपवन, मखमली तलाव ,वसंत विहार, वृन्दावन आणि श्रीरंग सोसायटी हे सर्व त्यावेळचे लांब वाटणारे भाग आता शहराचाच एक भाग आहेत आणि गजबजून गेले आहेत. आजही मी मुलीकडे किंवा बहिणीकडे गेले कि रिक्षाने तो सगळं भाग फिरून येते आणि झालेले बदल टिपते.(क्रमशः)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

14 Dec 2020 - 8:14 pm | सौन्दर्य

मुंबईच्या अनेक भागांचे असेच वर्णन वाचायला आवडेल. माझे बालपण मालाड, बोरिवली भागात गेले असल्यामुळे लवकरच लिहीन.

गामा पैलवान's picture

14 Dec 2020 - 9:14 pm | गामा पैलवान

राजेंद्र मेहेंदळे,

आयशप्पत, जणू या माझ्याच आठवणी वाटताहेत. वरील सर्व ठिकाणं पाहत मी लहानाचा मोठा झालो. तुमच्या आईंना ओळखणारी बरीच जुनी लोकं मलाही माहीत असतील बहुतेक. तुमच्या आई ज्या दगडी शाळेत शिकल्या तिच्या बाजूला माझ्या आजीचं घर होतं. आईवडील मला त्यांच्याकडे ठेवून कामावर जायचे. तिथे चोरपोलीस खेळल्याने चरईचे गल्लीबोळ आजूनही मला तोंडपाठ आहेत. आज त्या पायाखालच्या वाटा ओळखीच्या आहेत, पण कौलारू घरं जाऊन तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत.

ठाण्याला कौपीनेश्वर मंदिर व तळ्याच्या मधून जाणारा शिवाजी पथ त्याकाळी अस्तित्वात नव्हता, हे निरीक्षण अगदी अचूक आहे. मंदिराला तळ्यात उतरायला पायऱ्या होत्या, असं जुने लोक म्हणायचे.

तुमच्या आडनावावरनं आठवलं की आमच्या लहानपणी ठाण्यात मेहेंदळे नामे दोन शैक्षणिक व्यक्तिमत्वे होती. पहिल्या विजया वामन मेहेंदळे या ब्राह्मण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका होत्या. तर दुसरे मेहेंदळे मास्तर महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्यांना बन्या म्हणायचे. मात्रं त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय भारदस्त होतं. दोन्ही शाळा ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या असल्या तरी दोन्ही मेहेंदळ्यांचा आपसांत संबंध नव्हता. हे मोठं नवल म्हणून आम्हां पोरट्यांत चर्चिलं जाई.

असो. जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. मजा आली.

आ.न.,
-गा.पै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Dec 2020 - 2:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
बरेचदा लिहिताना असे वाटते की लोकांना हे चर्‍हाट आवडेल कि नाही? पण ज्या लोकांना ठाणे,दादर,कल्याण वगैरे बद्दल माहिती असेल किवा तेथे रहिले असतील्,जाणे येणे असेल त्यांना या लिखाणाबद्दल ममत्व वाटेल. नसल्यास जुन्या आठवणी म्हणुन वाचुन सोडुन देतील. तरी चालेल.
आपण उल्लेख केले दोन्ही मेहेंदळे ओळखीचे नाहित. तसेतर कल्याणात आमच्या घराजवळ राहणारी ४-५ मेहेंदळे कुटुंबे आमची नातेवाईक नाहीत. माणुसघाणेपणा हा मेहेंदळ्यांचा विशेष असावा कदाचित.

सौंदाळा's picture

14 Dec 2020 - 9:20 pm | सौंदाळा

हा भाग पण मस्तच

सिरुसेरि's picture

15 Dec 2020 - 6:52 pm | सिरुसेरि

छान आठवणी व लेखन .

Rajesh188's picture

6 Jan 2021 - 5:43 pm | Rajesh188

मी पण काही दिवस चाळी मध्ये राहिलो आहे.
सर्व सण एकत्रित साजरे करणे आणि एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची चाळ संस्कृती उत्तम च होती.

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 8:54 pm | चौथा कोनाडा

स्मरणरंजन लेखन आवडले.
माझ्याही बालपणीच्या आमच्या गावातील आठवणी झाल्या !