मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला

सोत्रि · · दिवाळी अंक

आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला

आहार, निद्रा, मैथुन आणि भय ह्या आदिम संवेदनांपैकी भय ही संवेदना सजीवाला त्याच्या अस्तित्व रक्षणासाठी प्राप्त झालेली प्रेरणा आहे. ह्या भयाच्या संवेदनेमुळे सजीव, जीवाला होऊ घातलेला धोका समजू शकतो आणि जीवनप्रवाह अपघाती संपण्यापासून जीवाचे रक्षण करू शकतो. हे अतिशय नैसर्गिक आहे, जीवनप्रवाह चालू राहण्यासाठी  होणारी नैसर्गिक प्रेरणा.

उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक टप्प्यात जेव्हा जीवामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचं अस्तित्व नव्हतं तेव्हा जीव आपलं नियत कर्म करून अनंतात विलीन होऊन जायचा, खऱ्या अर्थाने. (म्हणजे जन्म मृत्यूचा फेऱ्यात न अडकता, हे फक्त ह्या संकल्पनेवर विश्वास असणाऱ्यांसाठी, बाकीच्यांनी सोडून द्यावे). पण पुढे उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यात मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचा विकास होऊन ही इंद्रियं अस्तित्वात आली. अहंकारामुळे अस्तित्वाच्या मी-पणाची भावना अस्तित्वात आली तर मन, बुद्धी इंद्रियांमुळे कर्म-संस्कार अस्तित्वात आले. अहंकारामुळे 'अहं ब्रह्मास्मी' ह्या जाणिवेशी फारकत होऊन अस्तित्वाच्या मोहाच्या पडद्यामुळे मी म्हणजे शरीर ही भावना प्रबळ झाली. ज्या क्षणी ही भावना प्रबळ झाली त्याच क्षणी त्या शरीराच्या अस्तित्वाच्या नष्ट होण्याच्या भितीची भावना प्रबळ झाली आणि तिचा कर्म-संस्कार झाला (म्हणजेच जन्म मृत्यूचा फेरा सुरू झाला).  

सजीवांपैकी मनुष्यप्राणी जसा जसा उत्क्रांत होत गेला तसा तसा त्याच्यातील बुद्धीचा विकास वेगाने होत गेला. संकल्प-विकल्पात्मक मनाने ह्या विकसित बुद्धीच्या साहाय्याने भय ह्या नैसर्गिक संवेदनेचा (प्रेरणेचा) विस्तार करून अहंकाराच्या मदतीने आदिम भीतीला अनेक आयाम दिले. माणसाने भौतिक प्रगतीत जशी जशी घोडदौड सुरू केली तशी तशी वेगवेगळ्या भयाचे आविष्कार (PHOBIA) अस्तित्वात येत गेले. भयाचे हे अनेक प्रकार असले आणि आपल्या मनात सदैव भीती वास करीत असली तरी,  मनुष्याला सगळ्यात जास्त भय जर कुठल्या गोष्टीचे वाटत असेल तर ते मृत्यूचे.

जन्माला  येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास जीवाच्या हातात नसतो. त्या दोन श्वासावर त्याची हुकुमत किंवा सत्ता चालत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर काय? ह्या अस्तित्वाच्या अज्ञाताच्या भयाने मृत्यूचा धसका बसलेला असतो. ह्या भीतीमुळेच मृत्यू ह्या घटनेचे महत्त्व जीवाला कळलेलं नव्हतं. परंतु बुद्धीच्या प्रगल्भतेमुळे मनुष्याला "कोsहं" हा प्रश्न पडला आणि त्याने त्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. अनेक थोर साधकांनी, अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी, बुद्धावस्था प्राप्त करून घेऊन जन्म-मृत्यूचे रहस्य उलगडवले. मी म्हणजेच शरीर हा जो मोहाचा पडदा पडला होता तो दूर करून आपण म्हणजे देह नाही ह्या सत्याचा छडा लावला. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसतो पण त्या दोन श्वासांच्या दरम्यानचे सगळे श्वास मात्र आपल्या हातात असल्याने त्या सर्व श्वासांना आपल्या  नियंत्रणात ठेवून जीवन समृद्ध करत जीवन जगण्याची कला (आर्ट ऑफ लिविंग) विकसीत केली. आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व बुद्धांनी आणि अरिहंतांनी विविध साधनामार्ग शोधून त्या मार्गांनी मोक्षप्राप्तीचा (कर्म-संस्कार निर्मूलनाचा) पर्याय उपलब्ध करून दिला. फक्त वैराग्य मार्गानेच नव्हे तर प्रपंचात राहूनही मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवून दिला. पण फक्त जगण्याची कलाच महत्त्वाची नाही  तर त्याच बरोबर 'मृत्यूची कला' (आर्ट ऑफ डाइंग) ही तितकीच महत्त्वाची आहे हेही त्यांनी समजावून दिले आहे, फक्त दर्शनमार्गानेच नव्हे तर योगमार्गानेदेखील. पण ही मृत्यूवर प्रेम करायला लावणारी 'मृत्यूची कला' समजण्यापूर्वी जन्म आणि मृत्यू ह्या घटना समजणे महत्त्वाचे आहे.

जीवनप्रवाह हा ऊर्जेचा एक अखंड प्रवाह आहे. ही ऊर्जा म्हणजेच चैतन्य, परब्रह्म! ऊर्जा एका आकारातून दुसऱ्या आकारात साकार होत सतत प्रवाही असते. आकार निर्माण होणे आणि नष्ट होणे ही अटळ वारंवारता आहे कारण नित्य काही नाही, सर्व साकार सृष्टी अनित्य आहे. जन्म ही घटना, ऊर्जेचे एक जीर्ण आकार सोडून नवीन आकारात साकार होणे आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आणि जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहेच!

जन्म  - अविरत आणि अखंड विचारप्रवाह, त्यानुसार शरीरावर निर्माण होणाऱ्या संवेदना  आणि त्या संवेदनांनुसार प्रतिक्षिप्त होणारे कर्मसंस्कार, हा घटनाक्रम पहिल्या श्वासापासून चालू होणे आणि हे सर्व प्री-प्रोग्राम्ड होऊन 'ऑटो पायलट' मोड मध्ये काम सुरू होणे  हा जन्म. हेच जन्म झालेल्या सजीवाचे जीवन, ऊर्जेचे साकार रूप. अविरत आणि अखंड विचारप्रवाहामुळे निरनिराळे कर्मसंस्कार मनाच्या खोल डोहातून उफाळून वर, मनःपटलावर येत असतात आणि सजीव त्या कर्मसंस्कारांवर प्रतिक्षिप्त होत कर्मेंद्रियांद्वारे आयुष्यभर कर्म करत असतो.   

मृत्यू - ही अनेक जैविक घटनांपैकी फक्त एक जैविक घटना आहे. पण ती फार महत्त्वाची घटना आहे कारण फार महत्त्वाचे ऊर्जेचे संक्रमण ह्या घटनेतून होत असते (आणि पुढचा जन्म ह्या घटनेशी अत्यंत संलग्न असतो). वर सांगितलेल्या ऑटो-पायलट घटनाक्रमानुसार मृत्यू समोर आल्यावर ते मृत होईपर्यंत अनंत विचार मनःपटलावर उमटतात आणि त्या विचारांवर प्रतिक्षिप्त होत कर्म केल्याने कर्मसंस्कार घडतात (हेच कर्मसंस्कार पुढच्या जन्म ह्या घटनेवर प्रभाव टाकतात, संचिताच्या स्वरूपात). पण मृत्यूचे भय असल्याने त्यावेळी येणारे विचार हे त्याच भावनेने पछाडलेले असतात. सर्व काही निसटून जाणार ही भावना आणि त्यामुळे येणारी व्याकुळता ही मृत्यू ह्या अटळ घटनेला कष्टप्रद आणि वेदनादायी तर बनवतेच पण त्याच्याशी संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेलाही प्रभावित करते. त्यामुळे ऊर्जेचे संक्रमण पुढील कोणत्या आकारात आणि कसे साकार होणार हे मृत्युसमयी असलेल्या ऊर्जास्थितीवर (मन:स्थितीवर) अवलंबून असते. म्हणजेच मृत्युसमयी शांत चित्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे!

जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना संलग्न असतात त्यामुळे ह्या दोन्ही घटना नैसर्गिकरीत्या होणे हे फार गरजेचे असते. कारण हे ऊर्जा संक्रमण असते. मृत्यू होतो जेव्हा जीर्ण शरीर (आकार) प्राण किंवा चैतन्य म्हणजेच ऊर्जा वाहून नेण्यास असमर्थ होते. तेव्हा अखंड प्रवाही असलेली ऊर्जा जीर्ण आकारातून नवीन सक्षम आकारात संक्रमित होते. हे नैसर्गिकपणे होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अपघाती, अनपेक्षित, अकस्मात, आत्महत्या असा अनैसर्गिक मृत्यू  योग्य नाही. अशा अनैसर्गिक मृत्यूच्यावेळी चित्त शांत नसल्याने त्यावेळी उफाळून येण्याऱ्या कर्मसंस्कारांवर नियंत्रण करता येत नाही आणि त्याचा प्रभाव ऊर्जा संक्रमणावर म्हणजेच पुढच्या संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेवर पडतो. म्हणजेच मृत्यू (ऊर्जा संक्रमण) हा नैसर्गिक असायला हवा. ह्यामुळेच धर्मग्रंथांमध्ये आत्महत्या हे पाप असं म्हटलं आहे. परंतु मोक्षप्राप्त सिद्ध योगपुरुषांनी (उदा. संत ज्ञानेश्वर) समाधी अवस्थेत जाऊन देह त्यागणं हे अनैसर्गिक नाही. कारण मोक्षप्राप्तीमुळे कर्म-संस्काराचे निर्मूलन झालेले असते आणि त्यामुळे त्या मुक्तावस्थेत ऊर्जा संक्रमणाची घटना घडताना पुढचा आकार (जन्म) नसतो, असतं ते फक्त अनंतात विलीन होणं.

'आर्ट ऑफ डाइंग' म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला त्यामुळेच फार महत्त्वाची आहे, मृत्युसमयी चित्त शांत ठेवण्यासाठी आणि मृत्यू नैसर्गिक होण्यासाठी. मरणावर प्रेम करायचे म्हणजे भौतिक जगात घडणाऱ्या अनेक अटळ घटनांपैकी मृत्यू हीदेखील एक अटळ घटना आहे हे समजून त्याला निर्विकार आणि निर्विचारपणे हसतमुख सामोरे जाणे आणि तो केव्हाही येऊ शकतो हे ध्यानात ठेवून त्यासाठी कोणत्याही क्षणी सज्ज असणे! पण अशी सज्जता असणे किंवा मृत्यूच्या असे प्रेमात असणे हे 'लव्ह ऍट फर्स्ट साईट' इतके सोपे नसते. 'आर्ट ऑफ डाइंग' साठी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' येणं फार गरजेच आहे.  कारण ह्या दोन्ही कला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकमेकीँना पूरक असलेल्या. त्यांच्यामुळेच मृत्यूच्या प्रेमात पडून त्याला सामोरे जाण्याची सज्जता करता येणं शक्य असतं. जीवन जगत असतानाच जन्म आणि मृत्यू यांची संलग्नता समजून मृत्यूवर प्रेम करण्याची कला शिकायची म्हणजे मग प्रत्यक्ष मृत्यू होताना त्याला सहजतेने सामोरे जाता येते.

पण हे साधायचे कसे? त्यासाठी काही मार्ग नाही का? इतक्या प्राचीन आणि सनातन तत्त्वज्ञानात ह्यावर काहीच उहापोह झाला नाहीयेय का? तर, आतापर्यंत होऊन गेलेल्या बुद्धांनी आणि ऋषिमुनींनी ह्यावर प्रचंड काम करून ठेवले आहे. गौतम बुद्धाची सारी शिकवण ही जीवनावर पर्यायाने मृत्यूवर प्रेम करायला  शिकवणारीच आहे. पंचशीलाचा आधार घेत शील - समाधी - ज्ञान ह्या त्रिसूत्रीचे अनुसरणं करणे हीच 'आर्ट ऑफ डाइंग' आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग', दोन्ही. ह्यातला समाधी हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. ह्या समाधीअवस्थेतच देहातीत अवस्थेची अनुभूती येते. गौतम बुद्धाने शोधलेल्या आणि शिकवलेल्या विपश्यना ध्यानप्रक्रियेतली भंग ही अवस्था आणि  पातंजली योगसाधनेतली समाधी हाच टप्पा आहे. प्राणायामामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून कुंभक ही अवस्था लावली जाते. अथक प्रयासाने हीच कुंभक अवस्था (श्वास आत किंवा बाहेर रोखणे) श्वासावर नियंत्रण करण्याची गरज न पडता नैसर्गिकरीत्या होते आणि तिचा कालावधी जितका जास्त तितकी देहातीत अवस्थेची अनुभूती प्रबळ होत जाते. त्या देहातीत अनुभूतीमुळे मी म्हणजेच शरीर ह्या प्रबळ भावनेतून सुटका होण्याचे ज्ञान मिळते. ह्या भावनेतून सुटका करून घ्यायची झालेली ही जाणीव आणि शेवटचा श्वास, ह्या दरम्यान विद्यार्थी आणि साधक बनून, अविरत ध्यानसाधना करत, समाधीअवस्थेचा सराव म्हणजेच 'आर्ट ऑफ डाइंग'. हेच असते मनुष्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट, Purpose of life!

ह्या समाधी अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विचार/विकार मनःपटलावर येतात, त्या विचारांशी निगडित कर्म-संस्कार घेऊन. त्या कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवल्यास मृत्युसमयी शांत चित्त ठेवणे सहज शक्य होते. शरीर जीर्ण झाल्याने, शेवटचा श्वास घेऊन सोडताना, सर्व कर्म-संस्कारांच्या अंतिम आणि अफाट रेट्यामुळे शरीरातल्या ऊर्जेचे (चैतन्य किंवा प्राणाचे) संक्रमण होते, ही घटना म्हणजेच मृत्यू. त्यावेळी उफाळून येणारे  कर्म-संस्कार हा अनेकविध भावनांचा कल्लोळ असतो. त्या अनेकविध भावनांपैकी जी भावना प्रबळ असेल त्यानुसार शेवटचे कर्म घडून त्याच्या प्रभावाने ऊर्जा संक्रमणाचा पुढचा आकार (जन्म) ठरतो. पुनर्जन्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणाऱ्यांसाठी मृत्युसमयी होणाऱ्या अनेकविध भावनांचा कल्लोळ आटोक्यात ठेवणे इतकाच मुद्दा लक्षात घेतला तरीही चालेल.

समाधी अवस्थेत देहातीत शून्याची अनुभूती येते जी शेवटचा श्वास घेतला जातो तेव्हा होत असते. साधनेमुळे त्या अवस्थेची अनुभूती सरावाने मिळालेली असल्याने त्याला सामोरे जाताना  भांबावून आणि दडपून (Overwhelmed) न जाता  चित्त स्थिर राहते. तसेच साधनेमुळे कोणत्याही कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची, प्रतिक्षिप्त न होण्याची कला साधलेली असते. त्यामुळे मृत्युसमयी भयामुळे येणाऱ्या कर्म-संस्कारांवर तटस्थ राहता येऊन सर्व व्याकुळता टाळता येते. ही साधना आयुष्यभर करायची असते, अगदी शेवटाच्या श्वासापर्यंत. ही साधना म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला. ह्या प्रेमामुळेच मृत्यूला न घाबरता किंवा त्याच्यासाठी अधीर न होता, तो जेव्हा येईल तेव्हा त्याच्या कवेत अलगद सुपूर्द  करता येणे शक्य होऊन शांतपणे अनंतात विलीन होता येते.

ह्या मृत्यूवर प्रेम करण्याच्या कलेमुळेच (आर्ट ऑफ डाइंगमुळे) मृत्यू हा नकोशी घटना न होता त्या मृत्यूचा वैयक्तिक सोहळा साजरा करता येतो.



वाचने 31310 वाचनखूण प्रतिक्रिया 35

सतिश गावडे Sat, 11/14/2020 - 19:35
छान लिहीलं आहे. यातील बऱ्याच गोष्टी कळतात पण वळत नाहीत. अडी-अडचणी समोर आल्या की या ज्ञानाचा विसर पडतो आणि मन गटांगळ्या खाऊ लागते. बौद्धिक पातळीवरील आकलन सहज स्वभाव किंवा सहज अवस्था बनण्यासाठी काय करावे? या प्रश्नाचे उत्तर काही जण "साधना" असे देतात. मात्र हे उत्तर बरेचसे ambiguous आहे. कारण साधना शब्दाचा व्यक्तीगणिक अर्थ वेगळा असू शकतो. मार्गदर्शन करावे __/\__

In reply to by सतिश गावडे

सोत्रि Tue, 11/17/2020 - 08:52
सतिश, प्रतिसादाबद्दल आणि योग्य तो प्रश्न चर्चेला आणल्याबद्दल धन्यवाद.
बऱ्याच गोष्टी कळतात पण वळत नाहीत. अडी-अडचणी समोर आल्या की या ज्ञानाचा विसर पडतो आणि मन गटांगळ्या खाऊ लागते.
ह्याला जीवन ऐसे नाव. मन स्थितप्रज्ञ नसल्याने अडी-अडचणीच्या घटनांच्यावेळी मन, ऑटो-पायलट मोडमधे जाऊन स्मृतींच्या आधारे प्रतिक्षीप्त क्रिया शरीराकडून करून घेते. मन स्थिर करता येण्याचा सराव असल्यास अडी-अडचणी समोर आल्या की या मनाचे गटांगळ्या खाणे ताब्यात ठेवता येऊ शकते.
बौद्धिक पातळीवरील आकलन सहज स्वभाव किंवा सहज अवस्था बनण्यासाठी काय करावे?
मन आणि शरीर ह्यांचा परस्परसंबंध अभ्यासाने समजावून घेतल्यास आणि ते एकमेकांवर परिणाम करत आपला स्वभाव कसा बनवतात ह्याचे अनुभवाच्या पातळीवचे आकलन करून घेतल्यास बौद्धिक पातळीवरील आकलन सहज स्वभाव बनू शकतो. त्यासाठी मन आणि शरीर ह्यांचा परस्परसंबंध अनुभूतीच्या पातळीवर समजावून घेण्याचा सराव करावा लागेल. हा सराव म्हणजेच साधना आणि ध्यान (मेडीटेशन) हा सरावाचा मार्ग. ही फारच शास्त्रिय आणि एक्स्पेरिएन्शल प्रोसेस आहे; ह्यात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही. ह्या ध्यानाचे अनेक मार्ग / पद्धती आहेत. प्रत्येकाने आपापल्या अनुभूतीनुसार आपापला मार्ग निवडायचा. अमूक एकच मार्ग योग्य असे काही नसते. मी स्वतः ट्रान्सडेंटल मेडीटेशन, इनर इंजीनियरींग, आर्ट ऑफ लिव्हींग, प्राणायाम (राजयोग), झेन, कृष्णा कॉन्शसनेस (एस्कॉन) आणि विपश्यना ह्या वेगवेगळ्या ध्यानसाधनापद्धतींंनुसार सराव (साधना) करून बघितला आहे. विपश्यना साधनापद्धतीने सराव करताना आलेला अनुभव किंवा अनुभूती ह्यामुळे 'बौद्धिक पातळीवरील आकलन सहज स्वभाव बनण्यासाठी' ही ध्यानसाधनापद्धती माझ्यासाठी योग्य आहे हे मी अनुभवांती ठरवले. त्याबद्दल इथे अधिक विस्तृत लिहीलं आहे.
कारण साधना शब्दाचा व्यक्तीगणिक अर्थ वेगळा असू शकतो.
ते तसं अनेक साधनामार्ग असल्याने होणं सहाजिक आहे. आपला आता असलेला स्वभाव बदलून नविन सहज स्वभाव (मन स्थिर ठेवता येऊ शकणारा) बनवणं हे एक रात्रीत होणे शक्य नाही; म्हणूनच त्याचा सराव करावा लागतो, हीच साधना.
मार्गदर्शन करावे
हा शालजोडीतला चांगला होता, अगदी 'चद्दर मे लपेट लपेट के' स्टाईलमधे :=)) - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

सतिश गावडे Tue, 11/17/2020 - 19:59
हा शालजोडीतला चांगला होता, अगदी 'चद्दर मे लपेट लपेट के' स्टाईलमधे :=))
नाही हो सोकाजीनाना. हा स्वानुभवातून आलेला अतिशय प्रामाणिक प्रश्न होता. आणि तुम्ही छान शंका निरसन केलेत त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by शा वि कु

सोत्रि Tue, 11/17/2020 - 08:52
ह्याचे कारण कदचित माझी लेखनमर्यादा असू शकेल. नेमकं काय पटलं नाही हे सांगितल तर लेखातल्या तृटी (लेखनमर्यादा) समजून घेणे माझ्यासाठी सोपे पडेल. (पुढील लेखांसाठी त्याचा उपयोग होईल) - (अभ्यासू) सोकाजी

गोंधळी Sat, 11/14/2020 - 22:41
एक शंका म्हणजेच मृत्युसमयी शांत चित्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे! या साठी मृत्यू ची वेळ तुम्हाला आधीपासुन माहित असावी लागेल.पण अचानक्,अवेळी ही(तरुणपणी) मृत्यू येतोच की.

In reply to by गोंधळी

कानडाऊ योगेशु Sat, 11/14/2020 - 23:24
हेच म्हणणार होतो. इथे असेही सूचीत करायचे असेल की नेहमी सावधचित्त राहा.मृत्यु कधीही येऊ शकतो ह्याचे नेहमी भान ठेवणे महत्वाचे आहे.क्रान्तिकारकांची मनोस्थिती अशीच असावी त्यामुळे त्यांचे मृत्यु उदात्त गणले जातात.

In reply to by कानडाऊ योगेशु

सोत्रि Tue, 11/17/2020 - 08:54
नेहमी सावधचित्त राहा.मृत्यु कधीही येऊ शकतो ह्याचे नेहमी भान ठेवणे महत्वाचे आहे
बरोबर! - (भानावर येण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

टर्मीनेटर Sun, 11/15/2020 - 14:30

@सोत्री

'आर्ट ऑफ डाइंग...'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सुधीर कांदळकर Tue, 11/17/2020 - 08:50
शब्दजंजाळात न अडकता सावरकरांनी अतिशय साध्या रीतीने - अन्नपाण्याचा त्याग करून देह ठेवला होता. तत्त्वज्ञानाचा भाग मला कळत नाही तरी तो भाग वगळून मध्यवर्ती कल्पना आवडली. एका वेगळ्या, चांगल्या विषयावरील लेखाबद्दल धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

सोत्रि Tue, 11/17/2020 - 08:57
तो भाग वगळून मध्यवर्ती कल्पना आवडली
ती मध्यवर्ती कल्पनाच लेखाचा आशय होता. - (कल्पक) सोकाजी

सौंदाळा Tue, 11/17/2020 - 11:51
दिवाळी अंकात मृत्यू बाबतचा लेख असूनही कुठेही दुःखदायक, बिभीत्स वाटला नाही. उलट लेख वाचून सकारात्मक आणि हलकं वाटलं यातच लेखाचे आणि लेखकाचे यश आलं. सोत्री उत्तम लेख आणि दिवाळीच्या शुभेच्छा

धर्मराजमुटके Tue, 11/17/2020 - 16:41
"अन्ते या मति सा गति" मनुष्य अंतिम समयी ज्या प्रकारचा विचार करतो त्या प्रकारे त्याला पुढील गती प्राप्त होतो असे शास्त्र वचन आहे. मात्र शास्त्रातील वचने दिसायला जितकी सोपी असतात तितकीच आचरणात आणायला अवघड असतात. मी आयुष्यभर दारु पीत आलो आणि शेवटच्या क्षणी दुध पिईन असे कोणी ठरविले तर ते शक्य होत नाही. त्या क्षणीही दारुचीच आठवण येईल. म्हणून एखादा गुरु जेव्हा तुम्हाला "अन्ते या मति सा गति' चा अर्थ शिकवितो तेव्हा तो हे ही सांगतो की अंतःकाळी मनाप्रमाणे मती वळविता येत नाही त्यासाठी जन्मभर अभ्यास करावा लागतो. म्हणजेच आयुष्यभर जशी मती असेल तशीच अंत:काळी गती प्राप्त होईल.

चामुंडराय Wed, 11/18/2020 - 06:50
छान लिहिलंय ! आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा आर्ट ऑफ लव्हिंग माहिती होते परंतु आर्ट ऑफ डाईंग हि नवीच संकल्पना वाटली. वाचल्यावर निर्वाणषट्कम् आठवले. न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः । न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥ Neither am I bound by Death and its Fear, nor by the rules of Caste and its Distinctions, Neither do I have Father and Mother, nor do I have Birth, Neither do I have Relations nor Friends, neither Spiritual Teacher nor Disciple, I am the Ever Pure Blissful Consciousness; I am Shiva, I am Shiva, The Ever Pure Blissful Consciousness.

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/19/2020 - 10:53
अनुभवातुन तावूनसुलाखुन लिहिलेले प्रांजळ लेखन आवडले "जीये मार्गीचा कापडी महेश अजुनी" असे आमचा ज्ञानोबाराया म्हणतो ते उगाच नाही. पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/19/2020 - 21:18
सोत्रीसेठ, लेखन वाचलं. समजतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, म्हणूनच लेखन आवडलं. उत्तम विवेचन. लिहिते राहा सेठ. . -दिलीप बिरुटे

मित्रहो Fri, 11/20/2020 - 13:26
लेख आवडला. मी फक्त एवढेच शिकू शकलो कि मृत्यु कधीही येऊ शकतो तेंव्हा मन सतत शांत ठेवा. भावनांवर ताबा मिळवा. हे सार अंमलात आणणे फार कठीण आहे. शारीरीक वेदनांवर ताबा मिळावायचे शिकू शकतो पण भावनिक आवेगावर नियंत्रण ठेवणे जरा कठीणच.

चौथा कोनाडा Wed, 11/25/2020 - 13:19
आर्ट ऑफ डाईंग वर प्रथमच वाचण्यात आले.
आतापर्यंत होऊन गेलेल्या बुद्धांनी आणि ऋषिमुनींनी ह्यावर प्रचंड काम करून ठेवले आहे. गौतम बुद्धाची सारी शिकवण ही जीवनावर पर्यायाने मृत्यूवर प्रेम करायला शिकवणारीच आहे. पंचशीलाचा आधार घेत शील - समाधी - ज्ञान ह्या त्रिसूत्रीचे अनुसरणं करणे हीच 'आर्ट ऑफ डाइंग' आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग', दोन्ही. ह्यातला समाधी हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. ह्या समाधीअवस्थेतच देहातीत अवस्थेची अनुभूती येते. गौतम बुद्धाने शोधलेल्या आणि शिकवलेल्या विपश्यना ध्यानप्रक्रियेतली भंग ही अवस्था आणि पातंजली योगसाधनेतली समाधी हाच टप्पा आहे.
प्राणायामामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून कुंभक ही अवस्था लावली जाते. अथक प्रयासाने हीच कुंभक अवस्था (श्वास आत किंवा बाहेर रोखणे) श्वासावर नियंत्रण करण्याची गरज न पडता नैसर्गिकरीत्या होते आणि तिचा कालावधी जितका जास्त तितकी देहातीत अवस्थेची अनुभूती प्रबळ होत जाते. त्या देहातीत अनुभूतीमुळे मी म्हणजेच शरीर ह्या प्रबळ भावनेतून सुटका होण्याचे ज्ञान मिळते. ह्या भावनेतून सुटका करून घ्यायची झालेली ही जाणीव आणि शेवटचा श्वास, ह्या दरम्यान विद्यार्थी आणि साधक बनून, अविरत ध्यानसाधना करत, समाधीअवस्थेचा सराव म्हणजेच 'आर्ट ऑफ डाइंग'. हेच असते मनुष्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट, Purpose of life!
खुप सुरेख रित्या मांडलेय ! लेख आवडला हेवेसांनले !

गॉडजिला Sun, 09/05/2021 - 10:53
त्या विचारांशी निगडित कर्म-संस्कार घेऊन. त्या कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवल्यास मृत्युसमयी शांत चित्त ठेवणे सहज शक्य होते
काहीही ह सोत्री... अशी प्रतिक्रिया न देण्याची सवय (उर्फ साधना) मरताना काहीही उपयोगाची नाही. जरा कोणाला तरी तुमचा गळा काही सेकंद दाबून धरायला सांगा अथवा डोके पूर्णपणे पाण्याने बादलीत नाकतोंड बुडेल असे बूचकळा आणि बघा बरे किती शांत चित्तने गुदमरता येतेय ते...कितीही पुस्तके, अथवा तथाकथित ध्यान साधना कामी आली ते दूध का दूध अन् पानी का पानी होऊन जाईल. काहीही म्हणजे काहीही... बुध्द २९ व्या वर्षी घरा बाहेर पडला अन ३५ व्या वर्षी एनलाईट झाला देखील... इतर बसले प्रतिक्रिया न द्यायची सवय वापरत वर्षांनु वर्षे...

In reply to by गॉडजिला

सोत्रि Mon, 09/06/2021 - 17:37
जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना संलग्न असतात त्यामुळे ह्या दोन्ही घटना नैसर्गिकरीत्या होणे हे फार गरजेचे असते. कारण हे ऊर्जा संक्रमण असते. मृत्यू होतो जेव्हा जीर्ण शरीर (आकार) प्राण किंवा चैतन्य म्हणजेच ऊर्जा वाहून नेण्यास असमर्थ होते. तेव्हा अखंड प्रवाही असलेली ऊर्जा जीर्ण आकारातून नवीन सक्षम आकारात संक्रमित होते. हे नैसर्गिकपणे होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अपघाती, अनपेक्षित, अकस्मात, आत्महत्या असा अनैसर्गिक मृत्यू योग्य नाही. अशा अनैसर्गिक मृत्यूच्यावेळी चित्त शांत नसल्याने त्यावेळी उफाळून येण्याऱ्या कर्मसंस्कारांवर नियंत्रण करता येत नाही आणि त्याचा प्रभाव ऊर्जा संक्रमणावर म्हणजेच पुढच्या संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेवर पडतो
तुम्ही हा परिच्छेद बहुदा वाचला नसावा. - (नैसर्गिक) सोकाजी

In reply to by सोत्रि

गॉडजिला Tue, 09/07/2021 - 05:55
असो… माझा मुद्दा आपणास मी समजावु शकलो नाही ही माझी चुक. बाकी मी माझी योग्य अयोग्य समज प्रदर्शीत करु शकतो लोकांची मते खोडणे अथवा माझी मानायला लावणे हा माझा विरंगुळा नाही परीणामी जो आप समझे वो ठिक समझे… एव्हडं नक्कि अगर आप साधक न होतें तो प्वाइंट अवश्य समझते… (साधक असुनही प्वाइंट समजणारा) -गॉड़जिला.

पुनर्जन्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणाऱ्यांसाठी मृत्युसमयी होणाऱ्या अनेकविध भावनांचा कल्लोळ आटोक्यात ठेवणे इतकाच मुद्दा लक्षात घेतला तरीही चालेल.>>>>> हा मुद्दा वाचकांनी लक्षात घ्यायचा आहे ना? कि मृत्युशय्येवरील व्यक्तीने? त्याला तर हे शक्य होणार नाही. पण यावरुन एक किस्सा आठवला. बी प्रेमानंद जे अब्राहम कोवूर यांच्या चळवळीचा वारसा चालवणारे एक निरिश्वरवादी ( विवेकवादी / बुद्धीप्रामाण्यवादी) चिकित्सक कार्यकर्ते. त्यांच्या आजारपणात शेवटच्या दिवसात एक अशी अफवा / बातमी पसरली कि त्यांनी ईश्वराची संकल्पना मान्य केली/ इश्वर मानला. त्यामुळे एक स्केप्टिक लोकांनी त्यांचे एक स्टेटमेंट घेतले की मी ईश्वर मानीत नाही व त्यांची सही घेतली व ते पत्रक प्रसिद्ध केले.( आता मला त्याचा दुवा देता येणार नाही पण मला मेल आले होते) त्यानंतर ते गेले. खरं तर अशा अवस्थेत स्टेटमेंट घेतल्यावर त्याला कितपत अर्थ असणार आहे.

तुम्हाला सांगतो, जरी आत्ता असं वाटत असलं १००% की आपण आहोत , देहाच्या आत आहोत आणि होतो, तर असं कोणच नाही आहे ! देअर ईज नो डेथ ! बॉडी जन्मली तेव्हाही आपण नव्हतो, आत्ता ही नाही आणि नंतर तर नाहीच नाही! इट इज लाईक अ मुव्ही , आपल्याला कधीच काहीच करायचं नव्हतं, जस्ट आयडेंटिफिकेशन इज सो स्ट्राँग कि आपल्याला वाटतं आपण मरणार , आपल्याला जन्म मृत्यु काहीच नाही आणि नव्हतं किंवा आपला काहीच संबंध नाही दोन्हींशी ! कळालं तुम्हाला तर लई भारी होईल , नाही, तर जस्ट रिमेंबेर धीस ! आत्ता सुद्धा मी हे लिहितोय कारण हे मला चक्क तुमचा लेख पुन्हा वाचताना उलगडलं , ज्याच्याशी आपला काहीही संबंध नव्हता, त्याची फक्त आणि फक्त कल्पना करून आपण घाबरत होतो, थोड्क्यात, मृत्यु ही माणसाने आत्ता केलेली कल्पना आहे , मृत्यु असं काही नाहीच आहे आणि नव्हतं ! >> म्हणजेच मृत्युसमयी शांत चित्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे! कुणाचा मृत्यु ? हाच एक प्रश्न होता ! एकच सांगीन , डोंट वरी !! आपल्याला मृत्यु वगैरे असं काही नाही ! व्यक्ती जाते वगैरे असं काहीही नाही ! गॅरंटीड ! लाईफटाईम गॅरंटी ! कळू दे अगर न कळू दे ! अगदी आत्ता सुद्धा, आपण आहोत पण नसल्यासारखे आहोत ! इट इज वेरी इंटरेस्टींग, नोबडी डाईज, नोबडी एवर बॉर्न ,देअर इज नोबडी ! इट इज जस्ट अ प्ले ! इट्स अ गिफ्ट फॉर यु !

In reply to by उन्मेष दिक्षीत

सोत्रि Tue, 01/18/2022 - 17:08
मी म्हणजेच शरीर हा जो मोहाचा पडदा पडला होता तो दूर करून आपण म्हणजे देह नाही ह्या सत्याचा छडा लावला.
मृत्यू - ही अनेक जैविक घटनांपैकी फक्त एक जैविक घटना आहे
ह्या वरच्या वाक्यांमधून तुम्ही जे म्हणताय तेच लेखात मांडलं आहे, थोडं वेगळ्या पद्धातीने.
आपल्याला मृत्यु वगैरे असं काही नाही
आपल्याला म्हणजे कोणाला ? :=))
बॉडी जन्मली
म्हणजे नेमकं काय झालं? :=)) असो, शब्दांचे खेळ खेळत राहयचं म्हटलं तर त्याला काही अंत नाही आणि लेखाचा तो उद्देशही नाही; जे अनुभवलं ते शेयर करणं हा उद्देश होता. - (अभ्यासू) सोकाजी

कर्नलतपस्वी Sat, 01/15/2022 - 18:12
गहन विषय आहे पण जास्तीत जास्तं सोप्या शब्दात व्यक्त केला आहे.लेखकाचे अभिनंदन. लेख वाचताना माझ्या सारख्या द्विधा मनस्थितीतला आणी खुपच उशीरा जाग आलेला किती आचरणात आणू शकतो याबद्दल जरा शंका वाटते. धकाधकीच्या जीवनात हे सर्व शक्य होईल ? "आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण ",आशी परीस्थिती म्हणून कबीरदास कर्मकांडाचे प्रखर विरोधी, संत म्हणतात ते काहीस पटतं, जे काही आहे ते इथेच ,स्वर्ग आणी नरक इथेच. वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा। यहाँ ही राम, यहॉँ ही रहमाना।। पुनर्जन्म ही संकल्पना कर्मकांडाशी निगडीत आहे. जसे मरणाचे भय तसेच पुनर्जन्माचे. कुठलेही कर्म करताना त्याचे चांगले वाईट फळ ,त्यातूनच स्वर्ग नर्क कल्पना. यावर कबीरदासजी नीट आपल्या गुरूला सुद्धा निरुत्तर केले. प्रतिसाद देताना कुणितरी म्हटलं की आयुष्य भर दारु पिऊन मृत्यू समयी दूध पिऊ पण तसे होत नाही. तसेच साथ संगत सुद्धा विचारांचे नियमन करतात. कबीर तन पंछी भया, जहां मन तहां उडी जाइ। जो जैसी संगती कर, सो तैसा ही फल पाइ। मृत्यू बद्दल कबीरदासजी समजवतात की हा अटळ आहे. म्हणून त्याबद्दल भय वाटण्याचे कारण नाही जो उग्या सो अन्तबै, फूल्या सो कुमलाहीं। जो चिनिया सो ढही पड़े, जो आया सो जाहीं। आए हैं तो जायेंगे राजा रंक फ़कीर।  एक सिंघासन चढ़ चले एक बंधे जंजीर। जर मृत्यू अटळ आहे तर कसे वागले पाहिजे याची शिकवण देताना म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए, जग हँसे हम रोये, ऐसी करनी कर चलो, हम हँसे जग रोये। काखेत कळसा गावाला वळसा या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचा साई त्याचा जवळच आहे तो त्यानेच शोधला पाहिजे. ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग । तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग । जेव्हा साई भेटेल तेंव्हा सर्वांची एकच स्थिती मग संत नामदेव , कबीर आसो किवा बोरकर. काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ संत नामदेव. जा मरने से जग डरे ,मेरे मन आनंद , जब मरिहूँ तब पाइहौं पूरण परमानंद। संत कबीर नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा कवी बोरकर मृत्यू समोर दिसताना कबीरदासजी मृत्यू का नको त्याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात, राम बुलावा भेजिया, दिया कबीरा रोय । जो सुख साधू संग में, सो बैकुंठ न होय । तसेच कवी बोरकर सुद्धा , स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा. हे जर बरोबर असेल तर मला तुमचा लेख समजला असे समजेन. धन्यवाद