मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोव्हीड माझा अनुभव

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोव्हीड माझा अनुभव करोनाची साथ आली तेंव्हापासून मी आणि माझी पत्नी दोन्ही वेळेस दवाखान्यात जातच होतो. हा रोग आपल्याला केंव्हा ना केंव्हा तरी होणार हे माहितीच होते. याचे कारण येणाऱ्या रुग्णांपैकी कोणी ना कोणी कोणतेही लक्षण नसणारा रोगवाहक( asymptomatic carrier) असणारच होता. त्याशिवाय इतरत्र म्हटल्याप्रमाणे आपण भारतीय लोक बेजबाबदार आहोत हे आपण परत परत सिद्ध करून दाखवत असतो. बायको गरोदर असताना सुद्धा दवाखान्यात मास्क न घालणे, मास्क नाकाच्या खाली ठेवणे, वाल्व्ह असलेला मास्क घालणे, बोलताना मास्क काढून बोलायला सुरुवात करणे, दोन खुर्च्यात ५ फुटाचे अंतर ठेवले तरी खुर्ची सरकवून जवळ येऊन बसणे. फोन आला तर मास्क काढून मोठ्या आवाजात गप्पा मारत राहणे असे करणारे अक्षरशः शेकड्यात रुग्ण पाहिले आहेत आणि आजही इतकी रुग्ण संख्या वाढत असतानाहि असेच वागत आहेत. असे करता करता साधारण १५ ऑगस्ट च्या सुमारास मला थोडी कणकण जाणवू लागली होती. माझ्या मुलीचे लग्न ऑक्टोबर मध्ये आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीची दगदग होते आहे असे वाटले. मग तीन दिवसांनी ताप आला तो १०० " फॅ होता. माझ्याकडे अनेक गरोदर स्त्रिया सोनोग्राफी साठी येतात मग उगाच धोका कशाला? म्हणून मी दवाखान्यात जाणे बंद केले. बायकोने पण धोशा लावला होता कि तू कधीही सुटी घेत नाहीस आणि हि साथ आल्यावरसुद्धा पूर्ण वेळ काम करतो आहेस. दोन दिवस ताप होता म्हणून शेवटी बायकोच्याच आग्रहाखातर मी फुप्फुस रोग तज्ज्ञाला (डॉ सुब्रमण्यन नटराजन) फोन केला. हे डॉक्टर माझ्या चांगले परिचयाचे आहेत आणि वडिलांना NSIP हा फुप्फुसाचा आजार आहे म्हणून त्यांच्याकडे गेले दीड वर्षे उपचार चालू आहेत. त्यांनी चाचणी करून घ्या असा सल्ला दिला त्याप्रमाणे RTPCR हि चाचणी खाजगी लॅब मधून २१ ऑगस्टला करून घेतली. त्याचा लिखित निकाल मला आलाच नाही तर तो महापालिकेकडे गेला. परंतु तेथल्या तंत्रज्ञाने फोन करून तो पॉझिटिव्ह आहे असे दुसऱ्या दिवशी सांगितले. २२ ऑगस्ट ला महापालिकेच्या टी वॉर्ड ऑफिस मधून फोन आला कि तुमची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि तुमचे वय ५५ आहे तेंव्हा तुम्हाला रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.( ५० वर्षावरील सर्व रुग्णांनी भरती होणे आवश्यक आहे असा फतवा अगोदर महापालिकेने काढला होता आणि दुसऱ्या दिवशी तो मागे घेतला होता) यावर मी त्या कर्मचाऱ्याला सांगितले कि हा फतवा मागे घेतलेला आहे. त्यावर ती कर्मचारी म्हणाली कि सर आम्हाला असे कोणतेही पत्रक आलेले नाही. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि आपण वृत्तपत्र सुद्धा वाचत नाही का? त्यात सर्व सविस्तर आलेले आहे आणि आपण आपल्या विभागातून चौकशी करू शकता. तेंव्हा मी अजिबात भरती होणार नाही तर मी घरीच क्वारंटाईन होणार आहे आणि मी डॉ सुब्रमण्यन नटराजन यांच्या देखरेखीखाली असणार आहे. मी स्वतः एम डी डॉकटर आहे त्यामुळे रोग केव्हा बळावू शकतो आणि गुंतागुंत केंव्हा होते हे सर्व मला माहिती आहे. मला एकंदर चार पाच दिवस फक्त ताप आला त्यासाठी मी पॅरासिटामॉल ( क्रोसीन) ची एक गोळी घेत असे तेवढी एकच गोळी मला दिवसभर पुरत असे. ( याचा डोस दिवसात ३ ते ४ वेळेस आहे) कारण आपल्याला ताप नक्की केंव्हा येतो आणि त्याचा आकृतिबंध ( पॅटर्न) काय आहे हे पाहायचे होते.या बरोबर माझ्या तोंडाची चवही गेली होती आणि वास सुद्धा नीटसा जाणवत नसे. मला डॉक्टर सुब्रमण्यन यांनी फॅवीपिराव्हीर हैड्रोक्सी क्लोरोक्वीन आणि आयव्हरमेक्टीन हि तीन औषधे चालू केली. पहिल्या दिवशी २४ गोळ्या ( १२ सकाळी आणि १२ संध्याकाळी) घ्यायच्या होत्या आणि पुढचे चार दिवस दिवसभरात १२ (६ सकाळी आणि ६ संध्याकाळी) अशा घ्यायच्या होत्या. या २४ गोळ्या घेतल्यापासून पुढचे ५ दिवस माझे पोट डब्ब होत असे. थोडासा खाल्लं तरी पोटात ट्राफिक जॅम ची संवेदना येत असे. भूक लागत होती परंतु एक पोळी खाल्ली कि पोट भरल्याची संवेदना होत असे. प्रत्यक्ष कॉव्हिडचा नव्हता इतका परिणाम त्या गोळ्यांचा होत होता. परंतु आलीया भोगासी असावे सादर या नात्याने मी मानसिक दृष्ट्या तयार झालो. एक सुदैवाची गोष्ट म्हणजे मला गोड चव व्यवस्थित लागत होती त्यामुळे श्रीखंड गुलाबजाम सारख्या गोष्टींबरोबर मी पोळी खाऊ शकत होतो आणि फळं सुद्धा व्यवस्थित खाता येत होती. परंतु आंबट, तिखट आणि खारट चवी मात्र बदलून गेल्या होत्या. पावभाजीची चव मातकट येत होती. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणून मी डॉक्टर सुब्रमण्यन याना घरच्यांची चाचणी करावी का याबद्दल विचारले त्यावर ते म्हणाले इतके दिवस तुम्ही एकत्रच राहत आहेत तेंव्हा तुमच्या बायकोला आणि मुलांना झाला असणारच उगाच चाचणी वर पैसे खर्च कशाला करताय? त्यांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या बायकोची चव आणि वास दुसऱ्या दिवशी गेले. मुलीला बारीकसा ताप आला आणि मुलाला थोडासा घसा खराब झाला. दोन्ही मुले दुसऱ्या दिवशीच ठीक ठाक झाली. बायकोच्या तोंडाची गेलेली चव आणि वास मात्र परत यायला पाच सहा दिवस लागले. माझा आणि बायकोचा दवाखाना २१ दिवस पूर्ण बंदच होता. मुलाने वर्क फ्रॉम होम घेतले होते आणि मुलीचे काम तर फ्री लान्सिंगचा आहे. चार पाच दिवसांनी आम्ही सर्व व्यवस्थित झालो होतो. यानंतर घरी केवळ विश्रान्तीच घेत होतो. दिवसात १०-१२ वेळेस आम्ही दोघे पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही. मला कधीही श्वास घ्यायला त्रास झाला नाही.मला खोकला सर्दी हे सुद्धा झाले नाहीत. दोन वेळेस मी एक्स रे काढून घेतला तो व्यवस्थित होता. इतर चाचण्या सुद्धा ठीक होत्या( डी डायमर, सी रीएक्टिव्ह प्रोटीन, सी बी सी, क्रिऍटिनिन इ ). अशक्तपणा मात्र फार जाणवत असे म्हणजे घरात थोडेसे काम केले कि दमायला होत असे. असे झाल्यावर मी बऱ्याच वेळेस पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही. कोण रुग्ण कधी सायटोकाइन स्टॉर्म मध्ये जाईल हे कधीच सांगता येत नाही.यामुळे त्यावर आम्ही डोळ्यात तेल घालून नजर ठेवत होतो. माझे असंख्य डॉक्टर मित्र, वैद्यकीय नियतकालिके, शोध निबंध यांच्यातून गेले ६ महिने मिळत असलेल्या विविध वैद्यकीय माहितीच्या आधारे आम्हाला एवढे माहिती होते कि साधारणपणे आपल्याला होणार आजार इतक्या पातळीवर बळावणार नाही. कारण आम्ही सडपातळ आहोत आम्हाला कोणालाही मधुमेह हृदयविकार रक्तदाब नाही. माझा रक्त गट ओ पॉझिटिव्ह आहे( ज्यात रोग गंभीर होण्याची शक्यता कमी असते.( ए पॉझिटिव्ह ला अशी शक्यता जास्त असते). आम्ही सर्व प्रतिबंधात्मक हैड्रोक्सी क्लोरोक्वीन घेत होतो. असे असले तरी "मन चिंती ते वैरी न चिंती" या न्यायाने सगळे गंभीर आजार आणि वाईटात वाईट गुंतागुंत याबद्दलचे विचार डोक्यात आले होते. मी दोन्ही मुलांना जवळ बोलावून माझा १ कोटी रुपयाचा टर्म विमा आहे. आमच्या सगळ्यांचा १५ लाखाचा आरोग्य विमा आहे त्या सगळ्याची कागदपत्रे दाखवून ठेवली. आपल्याला काही झाले तर आपल्याकडे किती पैसे आहेत ज्यावर आपल्यामागे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल कि नाही याचाही पूर्ण विचार करून झाला. एकदा आपल्या आयुष्याचा आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यावर माझे मनही शांत झाले. अर्थात बायकोजवळ मी हे काहीच बोललो नाही. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेऊन मी २१ दिवसांनी आपला दवाखाना परत चालू केला. सुरुवातीचे दोन तीन दिवस मला अशक्तपणा जाणवत असे. माझा दवाखाना २१ दिवस बंद होता तरीही बरेच रुग्ण माझ्यासाठी थांबून होते. त्यात काही कर्करोगाचे रुग्ण होते ज्यांची केमोथेरपी झालेली होती, कोणी हर्निया शल्यक्रियेसाठी साठी थांबला होता. अशा लोकांना पाहून मला भरून आले. १७ दिवस महापालिकेच्या कर्मचाऱयांनी दिवसात ३ वेळेस फोन करून अक्षरश:त्रास दिला कधी सकाळी ११ वाजता २ वाजता ३ वाजता ४ वाजता कधीही फोन येत असे. तुमची तब्येत कशी आहे तुमचे तापमान किती आहे हृदयाचे ठोके किती आहेत प्राणवायूची पातळी किती आहे असे विचारून कंटाळा आणला होता. अगदी मी स्वतः हे सर्व सांगितले आणि मला कोणताही त्रास नाही म्हणून सांगितले तरी परत परत केवळ रकाने भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेच तेच प्रश्न विचारून अगदी काव आणला होता. त्यांना कितीही सांगितले कि आता कोणताही त्रास नाही आणि तुमच्या फॉर्म मधील लक्षणांच्या सर्व रकान्यात काही नाही असे भरा असे सांगूनही काही कर्मचाऱ्यांच्या डॉक्त्यात शिरतच नसे. असो १७ दिवसांनी हा त्रास संपला. सरकारी रेमेडोकेपणा कसा असतो ते म्हणजे माझी चाचणी २१ तारखेला झाली आणि त्याचा निकाल २२ ला आला म्हणजे मला २१ तारखेला कोव्हीड झाला होता त्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन असणे आवश्यक आहे परंतु या लोकांनी आपल्या रेकॉर्डमध्ये २४ तारीख टाकली होती. त्यातील एका कर्मचाऱ्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणाच्याही डोक्यात ते शिरतच नव्हते. शेवटी मी कंटाळून तो प्रयत्न सोडून दिला. समाजाची वृत्ती-- कोव्हीडची साथ सुरु झाल्यापासून मार्च महिन्याच्या सुरुवातीला मी भाड्याने राहत असलेल्या सोसायटीच्या लोकांनी कुरबुर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सरकारी लॉक डाऊन होण्याच्या अगोदरच १० मार्च पासूनच यांनी सोसायटीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना इमारतीत येण्यास बंदी घातली होती. कचरेवाल्याला सुद्धा इमारतीत खालूनच कचरा घेऊन जायला सांगितले होते. मी सांगायचं प्रयत्न केला कि इमारतीतील २५ लोकांनी लिफ्टने खाली येण्यापेक्षा एकाच कचरे वाला ज्याला सॅनिटायझर वापरून सर्वांचा घराबाहेर ठेवलेले कचरा घेऊन जाऊ दे. पण नाही यावर मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता कि हीच स्थिती मोलकरणीची आहे यावर तुम्ही भाडेकरू आहात आम्ही तुम्हाला सोसायटीच्या बाहेर काढू म्हणून मला धमकी दिली गेली . मी तेंव्हा भांडण नको म्हणून गप्प राहिलो. नंतर १ जूनपासून सरकारने अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना( घरगुती कामगार प्लमबर इलक्ट्रिशियन इ) सोसायटीत परवानगी नाकारता येणार नाही असे परिपत्रक काढले तरी आमच्या सोसायटीत कामवाल्या कर्मचारुयाना परवानगी नाकारली होती. मधल्या काळात व्यवस्थापकीय समितीतील( मॅनेजिंग कमिटीतील) एका सदस्याला कोव्हीड झाला म्हणून तो रुग्णालयात भरती झाला त्याच्या बायको आणि दोन्ही मुलींना कोव्हीड झाला.त्याना मी फोन करून सर्व समजावले आणि काही मदत लागली तरी मला फोंन करा असेही सांगितले. हा माणूस रेशन चे दुकान चालवतो आणि ते सर्व पूर्ण बरे झाला तरी त्याचं घरात आजही कामवाल्या बाईला परवानगी नाही. अजून दुसऱ्या घरात दोन जणांना कोव्हीड झाला होता. म्हणजे मोलकरणीला इमारतीती परवानगी दिली तर कोव्हीड होईल या त्यांच्या दाव्याला कोणताही आधार नाही हे सिद्ध हि झाले. शेवटी २८जुलै रोजी मी सोसायटीला एक पत्र दिले कि सरकारच्या पत्रकाप्रमाणे तुम्हाला मोलकरणीला थांबवता येणार नाही. आम्ही दोघे अत्यावश्यक सेवा मध्ये गणले जातो आणि आमच्या मुलीचे ऑक्टोबर मध्ये लग्न आहे तर आमच्या घरी एका घरगुती कर्मचाऱ्यास परवानगी द्या. यावर त्यांनी परवानगी नाकारली. मी त्याना परत सांगितले कि जे काही सांगायचे ते मला लेखी द्या आणि अशी परवानगी नाकारली तर मी सोसायटी आयुक्तांकडे तक्रार करेन. त्यांना आमच्या भागाचे आमदार श्री मिहीर कोटेचा यांचा व्हिडीओ सुद्धा पाठवला ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते कि सोसायटीच्या अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना थांबवता येणार नाही असे केल्यास त्यांच्यावर सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल. यावर त्यांनी ताठर भूमिका घेतली आणि मला सांगितले कि तुम्ही "भाडेकरू" आहात आम्ही तुमच्याशी संपर्क ठेवणार नाही जो काही व्यवहार करायचा आहे तो घरमालकाशीच करू. मी दुसऱ्या दिवशी श्री मिहीर कोटेचा याना फोन केला त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीचा फोन घेतला आणि बहुधा सेक्रेटरीला "समजावले" असावे. कारण १ ऑगस्ट पासून आमच्या घरी एका घरगुती कर्मचाऱ्यास सोसायटीने परवानगी दिली. आम्ही दिलेले पत्र पाहून आमच्या मजल्यावरील इतर दोघांनी सुद्धा आम्च्या घरगुती कर्मचाऱ्याला परवानगी द्या म्हणून मागणी केली त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा घरगुती कर्मचारी येण्यास सुरुवात झाली. व्यवस्थापकीय समितीतील( मॅनेजिंग कमिटीतील) एक आपल्या वृद्ध आईला आजार आहे म्हणून आमच्या घरि दाखवायला आला. सेक्रेटरीच्या बायकोला ताप आला म्हणून त्याने रात्री साडे अकरावाजता दोन वेळेस फोन केले. एका सदस्याला कामावर रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते त्यासाठी आला होता. इमारती तील डॉकटर आहे त्याचा फायदा उठवण्यासाठी मात्र सर्व लोक पुढे आले होते. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एक भाडेकरूंच्या( हे भावनगरहुन आलेले होते) पत्नीचा गर्भपात झाला. त्यांची सर्व सोय आम्ही केली. यानंतर त्याने घरच खाली करून तो बायकोला घेऊन परत भावनगरला निघून गेला. आम्हाला कोव्हीड आजार झाला आहे हे महापालिकेकडून सोसायटीच्या सेक्रेटरीला कळवण्यात येते ते सोसायटीतील सर्व सदस्यांना कळवण्यात आले. परंतु एकही महाभागाने आम्हाला साधा फोन करण्याची तसदी घेतली नाही कि तुम्हाला काही हवे आहे का? औषध मागवून हवंय का? भाजी फळे किराणा इ पाहिजे का? एकही सदस्याने संबंध ठेवला नाही. घरात मोलकरीण नाही, आम्ही सर्व आजारी अशक्तपणा आलेला असल्यामुळे आम्ही जवळच असलेलय एका शेफ कडून पार्सल मागवणे चालू केले यामुळे भांडी घासणे आणि स्वयंपाक करणे त्यापासूनही सुटका झाली. बाकी झाडू मारणे कपडे वाळत घालणे हि कामे होतीच. एवढेच नव्हे तर सेक्रेटरीने आमच्या घरमालकांना असेही कळवले कि याना कोव्हीड झाला असूनही हे बाहेर फिरताना आढळले असे बेजवाबदार वर्तन सोसायटी खपवुन घेणार नाही त्यांना योग्य ती समज द्यावी. मी घरमालकाला कळवले कि मी एक्स रे काढण्यासाठी गेलो होतो. कारण घरी एक्स रे होत नाही बाकी सर्व रक्त चाचण्या कर्मचाऱ्याला घरी बोलावून केल्या गेल्या आहेत. आणि सेक्रेटरी आणि कंपनी केवळ आकसाने असे वर्तन करीत आहेत. हाच मेसेज मी सेक्रेटरीला सुद्धा पाठवला. आश्चर्य म्हणजे आमच्या आजाराबद्दल आम्हची साधी विचारपूस न करणाऱ्या एका सदस्याला परवा पासून ताप आहे तर त्याने आम्हाला फोनवरून काय करायचे याबद्दल सल्ला मसलत केली. आपण याना २० दिवसात काहीही विचारलं नाही याची थोडीशी लाज/ खंत असावी असेही नाही. असाच अनुभव माझ्या माहितीतील असंख्य डॉक्टरांना आला आहे.डॉक्टर कोव्हीड केंद्रात कामालाआहेत म्हणून त्यांनी बाहेरच राहावे अशी असून सूचना केली गेली. अत्यावश्यक सेवा असूनही बहुसंख्य स्त्री डॉक्टरांच्या घरी घरगुती कर्मचाऱ्याला बहुसंख्य सोसायटीत परवानगी नाही. गाझियाबाद येथे नीलकमल कॉम्प्लेक्स या सोसायटीने तेथे राहणाऱ्या पण दिल्लीत काम करणाऱया दोन डॉक्टरांना त्यांच्या मुळे सोसायटीत कोव्हीड येण्याची शक्यता आहे म्हणून सोसायटीत येण्यास मनाई करणारा हुकूम जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला. त्या आदेशात असे म्हटले होते कि दिल्लीत ळक्म करणाऱ्या डॉक्टरांनी तेथेच आपली राहण्याची सोया करावी. यावर इंडियन मेडिकल असोसिएशन ने जिल्हाधिकारी आणि सोसायटीच्या लोकांना नोटीस जारी केली कि जसे हे डॉक्टर दिल्लीत काम करत आहेत तसेच आमचे गाझियाबादचे सगळे डॉक्टर येथे कोव्हिडच्या रुग्णांसाठी काम करत आहेत. आमच्या डॉक्टरांच्या मुळे सुद्धा नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांना कोव्हीड होण्याची शक्यता आहे. तेंव्हा असा धोका टाळण्यासाठी त्यांना विनंती आहे कि यापुढे नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांनी वैद्यकीयसेवेसाठी गाझियाबाद सोडून इतर कोणत्याही शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घ्यावी हि विनंती. त्यांनी जिल्हाधिकारी याना अशी बेकायदेशीर आणि अधिकाराच्या बाहेरचे ( out of jurisdiction) पत्रक काढल्याबद्दल न्यायालयात का खेचले जाऊ नये अशी नोटीस जारी केली. या नोटीशीनंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आणि नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांचे धाबे दणाणले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपले पत्रक मागे घेतले. समाजाची वृत्ती हि इतकी स्वार्थी झाली आहे. यामुळे माझ्या माहितीतील असंख्य डॉक्टर अक्षरशः आपला व्यवसाय बंद करावा काय या विचारात आहेत. अशाच तर्हेचे काही विचार आम्हाला झालेल्या या आजारापूर्वी लिहिलेल्या लेखात मी व्यक्त केले होते https://www.misalpav.com/node/46888 गरज सरो आणि वैद्य मरो हि म्हण किती योग्य आहे.

वाचने 32334 वाचनखूण प्रतिक्रिया 70

कानडाऊ योगेशु गुरुवार, 09/10/2020 - 13:12
डॉक्टरसाहेब कोव्हिड विरूध्दचा लढा जिंकल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे व तुमच्या पूर्ण कुटुंबियांचे अभिनंदन. लेखात लिहिलेले सोसायटी सदस्यांचे वर्तन उद्विग्न करणारे आहे.

चौकटराजा गुरुवार, 09/10/2020 - 13:59
आमच्या सोसायटीत ही दोन रेडॉलोजिस्ट आहेत . पैकी एक सध्या घरी क्वारन्टाईन आहेत . सोसायटीत पहिली केस जेंव्हा झाली त्यावेळी हे सध्याचे डॉक सोडून दुसरे जे माझे मित्र आहेत त्यानाच कोविड झाला की काय असा मला संशय आला. पण पहिला रोगी हा एका तिसर्याच डोक्टरांच्या घरी निघाला. त्यान्चे वडील. ( मुलग्याची लॅब आहे ). मोलकरणी बाबतीत असाच गोंधळ आमच्या सोसायटीत झाला. एका फ्लटधारकाने तर म्हण्जे थर्मो गन सोसायटीला भेट दिली पण मोलकरीण घरी आलीच पाहिजे असा आग्र्ह धरला. माझे जे फिजिशयन आहेत. त्यान्च्याकडे मी गेले ९ महिने गेलेलो नाही. मीच माझा डॉक बनलो आहे. पण आज ना उद्या मला माझी किडनीसंबन्धित आल्ट्रासाउन्ड करावी लागणारच आहे. नशीब घरी साखर पहाता येते. जेनेरिक औषध घेऊनही मधुमेह उत्तम कन्ट्रोल मधे आहे. या कोविड मुळे दन्तचिकित्सा, नेहमीची फिजिशियन तपासणी करायला मन तयार नाही. आमच्या डॉ ना तुम्ही कसे आहात असा उलटाच प्रश्ण मी व्हॉटस अ‍ॅप वर विचारीत असतो मधून मधून .या लेखाने मला काही उत्तरे नक्कीच मिळाली. तळमळ स्पेशालिस्ट डॉ सुबोध खरे जी लवकर बरे व्हा. व्याहीभेटीत व्याह्याला दणकून मिठी मारता आली पाहिजे बरं !

राजाभाउ गुरुवार, 09/10/2020 - 16:17
कोव्हीड १९ मधुन बरे झाल्या बद्दल तुमचे व तुमच्या कुटुंबाचे मनापासुन अभिनंदन. सोसायटी सदस्यांचे वर्तन खरच उद्विग्न करणारे आहे. पण सुरुवाती पासुनच सरकार, माध्यम यांची भुमिका हा व्हयरस आपला शत्रु आहे, आपले त्याच्या बरोबर युध्द आहे व आपल्याला ते जिंकायचे आहे अशी आहे, यामुळे १+१ या न्यायाने व्हयरस आपला शत्रु आहे तर ज्याच्या शरीरात हा व्हयरस आहे तो पण आप्ला शत्रु आहे अशी लोकांची मनोभुमिका झाली असेल काय ? अर्थात असे वागणार्‍या लोकांचे अजिबात समर्थन करता येणार नाही, पण अशी असंवेनदशीलता सगळीकडेच दिसत आहे तर कारणे काय असावीत. भय हे एक महत्वाचे कारण तर दिसत आहे.

खेडूत गुरुवार, 09/10/2020 - 17:47
अभिनन्दन! इथे माहिती दिलीत त्याबद्दल आभार! एक परिचित डॉक्टर जवळ/ किमान माहितीतअसायला हवा हे खरेच.

In reply to by खेडूत

चौकटराजा गुरुवार, 09/10/2020 - 18:20
भारत देशात साम्प्रत आरोग्य सेवेची अवस्था भयानक आहे. बी ए एम एस वाल्याला कोणी डोक्टर मानीत नाहीत. एम बी बी एस वाले फॅमिली फिजिशयन कमी कमी होत चाललेत व एम डी लेव्हलचे सर्व डॉक इतक्या प्रेशर खाली असतात की त्याना पूर्ण वेळ आपल्या पेशण्टला द्यायला सवड नाही. एम डी डॉक ची २० दिवस अगोदर वेळ ठरवून घ्यावी लागते. त्यामुळे आयत्या वेळी कुणाला तब्बेत दाखवायची असा प्रश्न पडला की खाजगी रुग्णालयाची ओ पी डी गाठावी तर तिथेही २० दिवस अगोदर वेळ ठरवून घ्यावी लागते पण तुमचा विमा आहे असे तुम्ही इम्र्जन्सी ओ पी डी ला नुसते सांगा , भराभर सूत्र हलतात त्यावेळी मात्र सर्व एम डी तुम्हाला पुरेसा वेळ , विविध टेस्ट सह तत्पर असतात. हा नुसता माझा अनुभव नाही. एक रुगणालयाच्या ब्लड बॅन्केत काम करणार्या एका परिचिताचे हेच कथन आहे.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/10/2020 - 19:26
कोव्हीड १९ मधुन बरे झाल्या बद्दल तुमचे व तुमच्या कुटुंबाचे मनापासुन अभिनंदन. खूप कठीण प्रसंगातुन निभावले आहात तुम्ही.

गामा पैलवान गुरुवार, 09/10/2020 - 22:16
खरे डॉक्टर, करोनाचा नाकरोना झाल्याबद्दल आनंद वाटला. तुम्ही ज्या तडफेने महापालिकेच्या गाढवांना हाताळलंत ते आवडलं. खरं तर पायदळी तुडवायच्या लायकीची आहेत ती, पण जाउदे....! सहनिवासातल्या शेजाऱ्यांचं वर्तन खेदजनक असलं तरी आश्चर्यकारक अजिबात नाही. ही आधुनिक युगातली अपृश्यता आहे. तिच्यासोबत जगायला शिका, एव्हढंच सुचवेन. आगाऊ सल्लेबाजीबद्दल माफी असावी. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे गुरुवार, 09/10/2020 - 22:48
यात अस्पृश्यता नाही की विशेष काही नाही. हा साधा सरळ स्वार्थ आहे. स्वतःला गरज पडल्यावर शेजाऱ्यांनी संपर्क केलाच की. माझ्या पत्नीची मैत्रीण सहा महिन्यांच्या अगोदर तिच्याकडे आली होती. तिच्या सासऱ्यांच्या इच्छा पत्रावर माझ्या पत्नीने डॉक्टर म्हणून सही करावी. तिचे सासरे गेली पाच सहा वर्षे मनोविकार तज्ज्ञाकडून इलाज करून घेत आहेत आणि तशी औषधे चालू आहेत. ते गेली 2-3 वरचे ग्लानीत असतात. असे असून माझ्या पत्नीने ते उत्तम मानसिक स्थितीत आहेत असे प्रमाणपत्र द्यावे असा तिचा आग्रह होता. तिला समजावून सांगितले की तुझ्या नणंदेने हे इच्छापत्र बनावट आहे आणि माझ्या वडिलांनी मानसिक स्थिती ठीक नव्हती कारण तिला आपल्या वडिलांचा काय इलाज चालू आहे हे तिला पूर्णपणे माहिती आहे. त्यावर ती समजावत होती की माझी नणंद असे काही करणार नाही. तिला माझ्या पत्नीने समजावले की एकतर पैशाची गोष्ट आली की माणसे फिरतात आणि असे खोटे प्रमाणपत्र देणे हे माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. या नंतर ती नाराज होऊन गेली आणि गेले 7-8 महिने तिने कोणताही संपर्क ठेवलेला नाही. डॉक्टर झाले की असे संबंध ताणले जातात. मी पत्नीला शांतपणे सांगितले की उद्या तिला परत गरज पडेल तेंव्हा ती संपर्क करेल तू उगाच दु:ख करत बसू नको. माणसे स्वार्थी असतात आणि त्यांनी संबंध सुद्धा स्वार्थासाठी ठेवलेले असतात. जेंव्हा तुमची नाती त्यांच्या स्वार्थाच्या आड येतात तेंव्हा ती ताणली जातात किंवा तुटतात.

सुबोध खरे गुरुवार, 09/10/2020 - 22:48
यात अस्पृश्यता नाही की विशेष काही नाही. हा साधा सरळ स्वार्थ आहे. स्वतःला गरज पडल्यावर शेजाऱ्यांनी संपर्क केलाच की. माझ्या पत्नीची मैत्रीण सहा महिन्यांच्या अगोदर तिच्याकडे आली होती. तिच्या सासऱ्यांच्या इच्छा पत्रावर माझ्या पत्नीने डॉक्टर म्हणून सही करावी. तिचे सासरे गेली पाच सहा वर्षे मनोविकार तज्ज्ञाकडून इलाज करून घेत आहेत आणि तशी औषधे चालू आहेत. ते गेली 2-3 वरचे ग्लानीत असतात. असे असून माझ्या पत्नीने ते उत्तम मानसिक स्थितीत आहेत असे प्रमाणपत्र द्यावे असा तिचा आग्रह होता. तिला समजावून सांगितले की तुझ्या नणंदेने हे इच्छापत्र बनावट आहे आणि माझ्या वडिलांनी मानसिक स्थिती ठीक नव्हती कारण तिला आपल्या वडिलांचा काय इलाज चालू आहे हे तिला पूर्णपणे माहिती आहे. त्यावर ती समजावत होती की माझी नणंद असे काही करणार नाही. तिला माझ्या पत्नीने समजावले की एकतर पैशाची गोष्ट आली की माणसे फिरतात आणि असे खोटे प्रमाणपत्र देणे हे माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. या नंतर ती नाराज होऊन गेली आणि गेले 7-8 महिने तिने कोणताही संपर्क ठेवलेला नाही. डॉक्टर झाले की असे संबंध ताणले जातात. मी पत्नीला शांतपणे सांगितले की उद्या तिला परत गरज पडेल तेंव्हा ती संपर्क करेल तू उगाच दु:ख करत बसू नको. माणसे स्वार्थी असतात आणि त्यांनी संबंध सुद्धा स्वार्थासाठी ठेवलेले असतात. जेंव्हा तुमची नाती त्यांच्या स्वार्थाच्या आड येतात तेंव्हा ती ताणली जातात किंवा तुटतात.

योगी९०० Fri, 09/11/2020 - 07:13
खरे डॉक्टर... कोव्हीड १९ मधुन बरे झाल्या बद्दल तुमचे व तुमच्या कुटुंबाचे अभिनंदन. तसेच अनुभव इथे टाकल्याबद्दल धन्यवाद..!! सोसायटी सदस्यांचे वर्तन खरंच बेकार आहे. बर्‍याच वेळेला तुम्ही इतरांना मदत केलेली आहे पण तुमचीच साधी विचारपुस लोकांनी करू नये याची चीड आली. पण तुमचा मुळ स्वभाव + लष्करातल्या आधीच्या नोकरी मुळे निस्वार्थीपणे काम करण्याची सवय आणि अंगी बाणवलेला डॉक्टर धर्म यामुळे तुम्ही हे सर्व विसरून परत लोककल्याणाकडे वळणार हे निश्चित. मुलीच्या लग्नसमारंभासाठी शुभेच्छा..!!

बाप्पू Fri, 09/11/2020 - 14:56
खरे सर.. सर्वप्रथम तुम्ही कोरोनमुक्त झालात याबद्दल तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन. स्वतः ची आणि कुटुंबातील सर्वांची काळजी घ्या. बाकी या कलीयुगात गरज सरो आणि वैद्य मरो हे सर्वत्रच चालते त्यामुळे तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. तुमचे काम असेच सुरु ठेवा. मुलीच्या लग्नासाठी शुभेच्छा.. !! ------------------ लोकांची मानसिकता नेमकी समजत नाहीये. लोकांच्या बेशिस्त पणा मुळे आज कोरोना फोफावलाय. मी ज्या ज्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तु आणायला जातो तिथे रांगेत 4-5 fur अंतर ठेवून उभा असतो पण इतरांना कोरोना हा प्रकार माहित नसल्यासारखे मी मोकळ्या सोडलेल्या जागेत मध्ये येऊन उभारतात.. दुकानाच्या बाहेर एक व्यक्ती सामान खरेदी करत असेल तर मी त्या व्यक्तीपासून मागे 4-5 फुटावर उभा राहतो.. अचानक मध्येच एखादा उपटसुभं माणूस डायरेक्ट दुकानदाराच्या जवळ जाऊन अमुक अमुक दया असे मागू लागतो.. त्यावेळी दुकानदार सुद्धा त्याला रांगेत या हे सांगण्याची तसदी घेत नाही.. ही परिस्थिती सर्वत्र आहे. त्यामुळे भारतातील कोरोना लस येईपर्यंत आटोक्यात येणार नाही हे अंतिम सत्य आहे. 2020 मध्ये भारत इतर कुठे नाही पण कोरोना मध्ये महासत्ता होईल हे nakki..

In reply to by बाप्पू

माहितगार Fri, 09/11/2020 - 22:55
...रांगेत 4-5 fur अंतर ठेवून उभा असतो पण इतरांना कोरोना हा प्रकार माहित नसल्यासारखे मी मोकळ्या सोडलेल्या जागेत मध्ये येऊन उभारतात.. दुकानाच्या बाहेर एक व्यक्ती सामान खरेदी करत असेल तर मी त्या व्यक्तीपासून मागे 4-5 फुटावर उभा राहतो.. अचानक मध्येच एखादा उपटसुभं माणूस डायरेक्ट दुकानदाराच्या जवळ जाऊन अमुक अमुक दया असे मागू लागतो.. त्यावेळी दुकानदार सुद्धा त्याला रांगेत या हे सांगण्याची तसदी घेत नाही.....
गेले सहा महिने माझाही अनुभव असाच आहे. कमी गर्दी असताना सगळ्यांच्या नंतर आपला नंबर लावून कसे बसे दुकानाच्या काऊंटरपर्यंत पोहोचलो तर कमीत कमी सेकंदात वापस येण्याचा माझा प्रयत्न असतो तरी देखिल एखादी व्यक्ती मागाहून अचानक येऊन भूसकन घुसतेच आणि परत मास्क वगैरे नसतो. तसे दुकानांमध्ये जाणेही कमी केले आहे व्हॉट्सअ‍ॅपवर सामान यादी पाठवून घरी मागवणे किंवा ऑनलाईन मागवणे असे सगळे करतो पण त्यातुनही जो किमान संवाद करण्यासाठी पोचावे तर त्यात सुद्धा हा जाच अनुभवास येतो.

सोसायटीचा अनुभव खरेच बेकार आहे. पुणेकर तर भाडेकरुंबद्दल फारच खत्रुडपणा दाखवतात हे स्वतः भाडेकरु असताना बघितले आहे. आणि आता तर भाडेकरु कोविड पेशंट आणि त्यात डॉक्टर असेल तर बघायलाच नको. असो. तुमचा अनुभव ऐकुन वाईट वाटले. दुसरीकडे पालिकेचेसुद्धा पाट्या टाकण्याचे काम चालले आहे कारण नक्की काय करायचे हे कोणालाच माहिती नाहिये. त्यामुळे रेमेडोक्यासारखी दिलेली प्रोसीजर पाळत आहेत. पण डॉक्टर असल्याने तुम्ही दोन्हीकडे पुरुन उरलात हे ऐकुन बरे वाटले. सुदैवाने आमच्या सोसायटीत मोलकरणींना कधीच बंदी नव्हती आणि आता ४-५ पेशंट निघाले आहेत पण ईमाने ईतबारे कायप्पावर मेसेज टाकुन कळवत आहेत आणि होम क्वारंटाईन होत आहेत.

कानडाऊ योगेशु Fri, 09/11/2020 - 19:49
एक प्रश्न आहे. कोविड झालेल्या रुग्णाकडे घरी राहण्याचा पर्याय असु शकतो का? एका ऐकिव माहितीनुसार एका वृध्द दांपत्याला कोविड झाला होता पण दोघांनाहे इस्पितळात भरती व्हायचे नव्हते. घरीच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला होता पण पोलिसांनी जबरदस्ती करुन इस्पितळात भरती करवले. (डॉकटर रोज आला तर लाखभर रुपये द्यावे लागतील अशी काहीशी भीती घातली.)

Bhakti Fri, 09/11/2020 - 21:55
डॉक्टर पेशा कायम वंदनीय आहे,पण या कोरोना काळात हा आदर जास्तच वाढला आहे.आपल्या कुटूंबीयांचे अभिनंदन आणि आभार !माझे डाक्टर नातलग सध्या पेशंट, स्वतः चे आरोग्य ,कुटुंब,घरकाम(सध्या मोठ्या शहरात मजूर मिळना) सर्व खुप धीराने करतात.कौतुक या क्षेत्राचे.

श्रीरंग_जोशी Sat, 09/12/2020 - 01:36
कोविड-१९ च्या संकटाचा यशस्वीपणे सामना केल्याबद्दल तुमचे व तुमच्या कुटूंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन. शेजार्‍यांचे आचरण चूकीचे आहे परंतु दुर्दैवाने यावर काही उपाय नाही. तपशीलवार अनुभवकथनासाठी धन्यवाद. हा लेख वाचून किमान काही लोक कोविड-१९चे इन्फेक्शन झालेल्यांबरोबर तुमच्या शेजार्‍यांसारखे वागणार नाहीत अशी आशा करुया.

कंजूस Sat, 09/12/2020 - 08:40
सोसायटीत लीव लायसनवरच्या भाडेकरूंचे प्रश्नं हासुद्धा एक मुद्दा पुढे आला. इतर डॉक्टर नसलेल्यांना सोसायटी कमिटीने किती हैराण केले असते याचा विचार आला.

In reply to by कंजूस

सुबोध खरे Sat, 09/12/2020 - 10:02
जेंव्हा मी सोसायटीला पत्र दिले. तेंव्हा कार्यकारी मंडळाला स्पष्ट शब्दात सांगितले कि भाडेकरूला मालकाचे बहुतांश हक्क प्राप्त झालेले असतात. तेंव्हा तुम्ही मला बाहेर काढण्याची धमकी वगैरे देऊ नका. मला कायदा व्यवस्थित समजतो आणि तुम्ही कायद्याविरुद्ध वागलात तर मी सहकारी आयुक्तांकडे तक्रार करून कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याची मागणी करेन.(भाडेकरूला मालकाचे बहुसंख्य अधिकार आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे) असा स्पष्ट शब्दात समज दिल्यावर त्या लोकांनी आम्ही तुमच्याशी बोलणार नाही तर मालकाशी च बोलू असा पवित्रा घेतला. आणि आमच्या आमदाराकडून त्यांना समजावणीचा फोन गेल्यावर सगळे लोक थंड झाले. बहुतेक वेळेस सामान्य माणसाला कायदा माहिती नसतो आणि सर्व सोसायट्यांमध्ये कार्यकारी मंडळात बोलबच्चन लोक असतात ते मोठा आवाज चढवून मनमानी करत असतात मग ती गोष्ट ठळकपणे बेकायदेशीर असली तरीही. घरगुती कर्मचाऱ्यांबाबत मुंबई पुण्यात बहुसंख्य सोसायटीत असेच दिसते आहे. मी माझे घर भाड्याने देऊन मी जास्त पैसे देऊन जवळच मोठ्या घरात राहत आहे. माझ्या मूळ घराच्या सोसायटीने मला ५०० रुपये नो ऑक्युपेशन चार्जेस लावले होते. मला समजले कि हा दर मूळ भाड्याच्या १० % पेक्षा जास्त असू शकत नाही आणि ज्याने आपले घर भाड्याने दिले आहे त्याच्याकडून सोसायटी अतिरिक्त फायदा कमावू शकत नाहीअसा कायदा आहे आणि तो सर्वोच न्यायालयाने वैध ठरवून स्पष्ट नियमावली दिलेली आहे. हे सोसायटीच्या लोकांना मी लिखित स्वरूपात दिले तरी त्यांची मनमानी चालू होती कि जनरल बॉडीने असा ठराव पास केलेला आहे. मी त्यांना स्वच्छपणे सांगितले कि एखादा ठराव प्रचलित कायद्याच्या विरुद्ध असेल तर तो आपोआप रद्दबातल ठरतो तेंव्हा तुमच्या ठरावाला काडीचीही किंमत नाही आणि यापुढे तुम्ही अशी मनमानी केलीत तर मी सहकारी आयुक्ताकडे तक्रार करून कार्यकारी मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याची मागणी करेन. त्यावर तुम्ही प्रकरण ताणू नका पैसे भरून टाका वगैरे सूचना आल्या. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि १५ हजार रुपये झाडाला लागत नाहीत. प्रशासकाने सोसायटीची वाट लावली तर त्याला मी नव्हे तर तुम्ही जबाबदार आहात.

In reply to by सुबोध खरे

मी त्यांना स्वच्छपणे सांगितले कि एखादा ठराव प्रचलित कायद्याच्या विरुद्ध असेल तर तो आपोआप रद्दबातल ठरतो तेंव्हा तुमच्या ठरावाला काडीचीही किंमत नाही आणि यापुढे तुम्ही अशी मनमानी केलीत तर मी सहकारी आयुक्ताकडे तक्रार करून कार्यकारी मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याची मागणी करेन.
या वर मटा मधे लेख होता. व तशी केस झालेला संदर्भ होता. नेमक मी ते कटिंग ठेवले नाही व ऑनलाईन आता ते सापडत नाही. कार्यकारी मंडळावर अधिकाराचा गैरवापर केल्याचा मुद्दा होता.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा Sat, 09/12/2020 - 11:30
इथेच सांगतो तुमच्यात खरोखरच चित्पावनाचे रक्त खेळते आहे. माझ्या आताच्या सोसायटीत तुम्हाला आलेले सर्व किन्वा त्यापेक्शाही कटू अनुभव मला आले आहेत. केवळ वय आड्वे आले नाही तर मी सचिवाला तुरूंगात पाठवू शकेन इतपत सोसायटी कायद्याचे मला ज्ञान आहे .सोसायटीत अनेक जण इन्जिनीअर आहेत डोक्टर आहेत पण अक्कल गुडघ्यात आहे त्यान्ची. कुणालाही संविधान, कायदा, जनरल बॉडी , एम सी व सदस्य ही उतरंडच मान्य नाही . वार्षिक सभेत तर मी त्याना " मी गेलो खड्ड्यात माझी सुपारी द्या पण कायद्याचा खून करू नका असे खुल्ला आव्हान दिले होते. भाडेकरू म्हणजे कुणीतरी पापी माणूस आहे. भाड्याने जागा देणारा कुणी गुन्डा माणूस आहे अशी सरसकट मान्डणी करून चालत नाही हे त्याना गजाआड गेल्या खेरीज कसे कळणार ? असे रजिस्ट्रार च म्हणतात की मुम्बईततील निम्या सोसायटीवर प्रशासक आहेत याचे कारण अज्ञान व अहंकार !

In reply to by चौकटराजा

एस गुरुवार, 09/17/2020 - 07:23
इथेच सांगतो तुमच्यात खरोखरच चित्पावनाचे रक्त खेळते आहे.
चौराशेठ, अतिशय अनावश्यक वाक्य. इथेही जातपात! अर्थात मला माहीत आहे तुमचा तसा उद्देश नसावा, म्हणूनच थोडंस खटकलं. डॉ. खरे, तुमचे कोविडमधून बरे झाल्याबद्दल अभिनंदन आणि तुमचे अनुभव इथे मांडण्यासाठी आभार. तुम्हांला व तुमच्या कुटुंबियांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो.

In reply to by एस

चौकटराजा Tue, 09/22/2020 - 18:25
जातीचे एक जनरलायझेशन असतेच . ते वास्तव आहे ! उदा . सिंधी माणूस ,गुजराथी माणूस हा उद्योजक व्यापारी असतो याचा अर्थ तो नोकरी करत नाही असा नाही .सदाशिव पेठी हे एक विशिष्ट केरेक्टर आहेच . बेफिकीर पुणेकर दुकानदार ही टर्म ही तशीच आहे .याचा अर्थ सर्व दुकानदार तसे आहेत असा नाही !

In reply to by एस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/08/2020 - 08:02
>>>>>अतिशय अनावश्यक वाक्य. इथेही जातपात! अर्थात मला माहीत आहे तुमचा तसा उद्देश नसावा, म्हणूनच थोडंस खटकलं. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

कंजूस Sat, 09/12/2020 - 12:39
मी जेव्हा सेक्रेट्री होतो तेव्हा हीच ती संधी शिकण्याची हे समजून कीस पाडला. प्रत्येक गोष्ट समजून घेतली. रजिस्ट्रारलाच भेटलो बरेचदा. बाईलॉ, सोसायटी act, आणि नागरिकांचे स्वातंत्र्य हक्क अशा एकापेक्षाएक वरचढ तीन स्तरांवर कोणताही खटला लढला जाऊ शकतो. यात फक्त वकिलांचेच भले होते कारण कित्येक वर्षे खटला चालतो.

In reply to by सुबोध खरे

pspotdar गुरुवार, 10/08/2020 - 00:35
जेंव्हा मी सोसायटीला पत्र दिले. तेंव्हा कार्यकारी मंडळाला स्पष्ट शब्दात सांगितले कि भाडेकरूला मालकाचे बहुतांश हक्क प्राप्त झालेले असतात. तेंव्हा तुम्ही मला बाहेर काढण्याची धमकी वगैरे देऊ नका. मला कायदा व्यवस्थित समजतो आणि तुम्ही कायद्याविरुद्ध वागलात तर मी सहकारी आयुक्तांकडे तक्रार करून कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याची मागणी करेन.(भाडेकरूला मालकाचे बहुसंख्य अधिकार आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे) या बद्द्ल link देऊ शकाल का, मी IT Eng. आहे, इतके कायद्याचे keywords माहीत नाही search करायला. अगाऊ धन्यवाद

Gk Sat, 09/12/2020 - 12:43
मी कोविड आणि आरोग्यसेतु मी आरोग्यसेतु डाउनलोड केला होता मला करोना लक्षण आले , तर त्यांना फोन केला , ते बोलले तुम्हीच डॉकटर आहे , तर आम्हाला कशाला फोन केला ?? म्हणून मी ऐप डिलीट केला. उपचार घेऊन बरा झालो , तर महिन्याने त्यांचा मोबाईलवर फोन आला , ते बोलले , लक्षण आहे , वगैरे फोन करून ज्यांनी ऐप डिलीट केलेत किंवा पुढे रिप्लाय ऐपवर दिला नाही , ते जिवन्त आहेत की मेलेत हे बघायला ते फोन करत आहेत. मी म्हटले हम अभी गया नही , जिंदा है. फोनवर चांगले बोलले, रिटायर्ड शिक्षिका होत्या, त्यांना सरकारने अशी यादी दिली आहे फॉलो अप करायला.

चौथा कोनाडा Sat, 09/12/2020 - 17:58
कोविड संकटाचा यशस्वीपणे सामना केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! आपण लेखात लिहिल्यासारखेच वातावरण आमच्याहि सोसायटीत होते पण सभासंदांनी सुज्ञपणा दाखवून पेशंट जनांना सहकार्य केले ! या तपशीलवार अनुभवकथनाचा सर्वांनाच फायदा होईल ! धन्यवाद !

चामुंडराय Sun, 09/13/2020 - 01:34
वूहानच्या ह्या चिनी विषाणू ला तुम्ही सर्वांनी पराभूत केले त्या बद्दल अभिनंदन. आता प्रतिकार शक्ती तयार झाल्याने इथून पुढे पेशन्ट्स ना तपासताना संसर्गाची भीती कमी वाटेल ना? अवांतर : पूर्वी दिल्ली येथील एका इस्पितळात सुपर बग सापडला होता तेव्हा त्याला "दिल्ली सुपर बग" नाव देऊन मोठा गाजावाजा केला होता आता मात्र ह्या विषाणूला वूहान चा विषाणू न म्हणता हे कोव्हीड नाव का दिले? काही षडयंत्र आहे का हू आणि चीन चे?

कंजूस Sun, 09/13/2020 - 05:55
उपकरणे. >>>पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही. मला कधीही श्वास घ्यायला त्रास झाला नाही.मला खोकला सर्दी हे सुद्धा झाले नाहीत. दोन वेळेस मी एक्स रे काढून घेतला तो व्यवस्थित होता. इतर चाचण्या सुद्धा ठीक होत्या( डी डायमर, सी रीएक्टिव्ह प्रोटीन, सी बी सी, क्रिऍटिनिन इ ). अशक्तपणा मात्र फार जाणवत असे म्हणजे घरात थोडेसे काम केले कि दमायला होत असे. असे झाल्यावर मी बऱ्याच वेळेस पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही.>>> दमायला होणे हे एक लक्षण आहे. छातीतल्या प्राणवायू रक्तात घेण्याच्या जागा सूज आल्याने कमी होतात आणि एका श्वासात जेवढे रक्त शुद्ध ( प्राणवायुने भरून )करून शरिरात पाठवायला हवे तेवढे जात नाही. म्हणून दमायला होते. खरं म्हणजे प्राणवायुची खूप गरज असणारे अवयव पोटात आणि मेंदू आहे तिथे हे उपकरण लावता येत नाही. हाताच्या बोटावरचे रक्त बरेच चांगले राहात असेल कारण तिकडे दंडात,हातात फारशी गरज नसते. ( हातांचा व्यायाम केला तर स्नायुंना गरज पडेल.)मीटर चे रीडींग चांगले ९५ पुढे असले तरीही शरीर थकते याचा अर्थ मीटर सुरुवातीला उपयोगाचा नाही. जेव्हा तिसऱ्या स्तराला रोग जाईल तेव्हा पेशंट आडवाच झालेला असणार.

In reply to by कंजूस

सुबोध खरे Sun, 09/13/2020 - 13:19
ऑक्सिजन ची टक्केवारी आणि ऑक्सिजनच्या वापराचे प्रत्यक्ष वस्तुमान यात आपली गल्लत होते आहे. 15 अम्पियर आणि 2 अम्पियर च्या प्लग मध्ये व्होल्टेज 220 च असते

धर्मराजमुटके Sun, 09/13/2020 - 08:19
खरे साहेब ! आजारावर यशस्वीपणे मात केल्याबद्द्ल अभिनंदन ! आपण हा आजार कधी ना कधी होणारच हे समजून त्याच्याशी लढण्याची मानसिक तयारी ठेवली तेथेच अर्थी लढाई जिंकल्यासारखी होती. हा लेख वाचून इतरांना देखील नक्कीच त्याचा उपयोग होईल. बाकी समाजाच्या वृत्तीवर काही बोलत नाही. जी गोष्ट आपण बदलू शकत नाही तिचा जास्त विचार न करणेच चांगले. अवांतर : व्यनि केला आहे, कृपया पाहून कळवा.

राघव Sun, 09/13/2020 - 11:34
डॉक, आपण आणि आपले कुटुंबीय सुखरूप बरे झालात ह्यापरती गोष्ट नाही. थकवा असणे ह्याशिवाय आणिक काही पोस्ट इफेक्ट्स आपल्याला जाणवले काय? बरेच जण हॉस्पिटलात जायला घाबरताहेत आणि ज्या तर्‍हेचे अनुभव लोकं सांगत असतात त्यावरून ते सहज समजण्यासारखेही आहे. खरेतर हॉस्पिटलात जागा नसतांना शक्यतो गंभीर होण्याची त्यातल्या त्यात शक्यता असणार्‍यांनाच दाखल करावे असे वाटते. असो. सोसायटीच्या अनुभवाबद्दल म्हणायचे तर आमच्या सोसायटीतला अनुभव तरी चांगला आहे. लोकं मदत करणारे आहेत. अगदी कोव्हीडचे रुग्ण सापडल्यावरही अतिशय समंजसपणे सगळ्यांनी परिस्थिती हाताळलीये. भाडेकरूंना होणार्‍या त्रासाबद्दल असं एक निरिक्षण आहे की शक्यतो बॅचलर्सना हा त्रास होतो. आपल्या इथे मात्र वेगळंच काम दिसतंय.

चौकस२१२ Mon, 09/14/2020 - 08:48
डॉ खरे , आपले आणि कुटुंबाचे रोगातून मुक्त झाल्याबद्दल अभिनंदन... - सहकारी सदनिका कार्यकारणी कशी चालते ( बरोबर आहे ना शब्द) हे कार्यकारिणीतील फार थोड्यानं कळते हा अनुभव मला भारताबाहेर हि आला आहे ( येथे नियम स्पष्ट असून सुद्धा) भारतात तर इतके अनेक मुद्दे आणि गुंतागुंत असतील कि अरे बापरे.. विचार ना केलेले बरा... अर्थात हे हि खरे अश्या वेळी कार्यकारणी ची जबाबदारी काय आणि एवढया गर्दीच्या देशात धोक्यापासून वाचायचे कसे आणि काय कार्याचे हे कार्यकारिणीला सुद्धा हाताळणे सोप्पे नाही ...परंतु आपण वर्णन केलेलं त्याचे वर्तन हे चुकीचेच..

"कोण रुग्ण कधी सायटोकाइन स्टॉर्म मध्ये जाईल हे कधीच सांगता येत नाही.यामुळे त्यावर आम्ही डोळ्यात तेल घालून नजर ठेवत होतो." >> मला वाटते की बरेच मृत्यू हे न कळल्यामुळे झाले आहेत की नक्की हॉस्पिटलमध्ये कधी जायचे. सायटोकाइन स्टॉर्म आहे की नाही हे अनुमान तुम्ही कसे लावत होतात. सामान्य माणूस कसा ठरवणार की कधी हॉस्पिटलमध्ये मध्ये जायला हवे आणि नाही ते

रविकिरण फडके Wed, 09/16/2020 - 21:41
डॉक्टर, आपण लिहिता, "कारण येणाऱ्या रुग्णांपैकी कोणी ना कोणी कोणतेही लक्षण नसणारा रोगवाहक (asymptomatic carrier) असणारच होता". माझी (बाळबोध) शंका अशी, की कोरोनाचे जंतू (virus) शरीरात प्रवेश करू शकतात ते फक्त तोंडावाटे आणि नाकाद्वारे. पेशंट आसपास असताना आपण योग्य तो मास्क वापरला असणारच. तरीही जर आपल्याला प्रादुर्भाव झाला तर त्याचा अर्थ मास्कचा काही उपयोगच नाही असा होतो का? धन्यवाद.

In reply to by रविकिरण फडके

गामा पैलवान गुरुवार, 09/17/2020 - 02:05
रविकिरण फडके, मुखवटा संरक्षण करतो की नाही, हे निश्चितपणे सिद्ध झालेलं नाही. असं जेनी हॅरीज या इंग्लंडच्या उपप्रमुख वैद्यकीय अधिकारिणीचं मत आहे. लेख : https://www.rt.com/uk/499429-evidence-masks-effective-not-strong/ आ.न., -गा.पै.

सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 09:19
An N 95 mask or N95 respirator is a particulate-filtering facepiece respirator that meets the U.S. National Institute for Occupational Safety and Health (NIOSH) N 95 classification of air filtration, meaning that it filters at least 95% of airborne particles. आपण कितीही चांगला रेनकोट घातला तरी रोज पडणाऱ्या मुसळधार ( मुम्बईचा) पावसात कधी तरी भिजणारच आणि सर्दी होणारच हे एकदा गृहीत धरले कि मानसिक तयारी होतेच. आमचे अनेक दिग्गज वरिष्ठ नागरिक डॉक्टर/ मित्र चार पाच महिने दवाखाना बंद ठेवून घरी बसून अक्षरशः कंटाळले आणि शेवटी आता त्यांनी दवाखाने उघडले आहेत आणि पूर्ण काळजीनिशी आता रुग्ण सेवा करीत आहेत.

खटपट्या गुरुवार, 09/17/2020 - 10:00
लेख आता वाचला, या सर्वातुन बाहेर निघाल्याबद्दल आपले अभिनंदन, सोसायटी चे लोक सगळीकडे असेच असतात, त्याना अरे ला कारे म्हणाल्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत. माझ्या शेजार्‍याने त्याला कोविड आहे हे लपवून ठेवल्याबद्दल सोसायटीने त्याला भरपूर सुनावले, पण एक कमीटी मेम्बर कोवीड पोझिटीव्ह झाल्यावर मात्र सोयिस्कर रित्या लपवून ठेवले.

नेत्रेश Tue, 09/22/2020 - 11:05
आजच एका सहकार्‍याशी बोलणे झाले. तो स्वःत आणी त्याची बायको दोघेही करोना+ नीघाले. त्याला कफ आहे आणी बायकोला पण घशात त्रास जाणवत आहे. पण डॉक्टरनी त्यांना गेले ८ दीवसांपासुन घरातच विलगिकरण करायला सांगितले आहे. काहीही गोळ्या दील्या नाहीत की औषधही दीले नाही. २ आठवड्यांनी बरे वाटेल असे फोनवरच सांगितले आहे. पेशंटच्या लक्षणांवरुन त्याला करोनाच्या औषधांची गरज आहे की नाही ते समजते काय?

In reply to by नेत्रेश

सुबोध खरे Tue, 09/22/2020 - 20:46
होय डॉक्टर असल्यामुळे मला एकंदर जास्त विषाणूंचा प्रादुर्भाव झाला असेल असे गृहीत धरावे लागेल. एक IL -६ हा रक्तातील घटक १६० पर्यंत गेला होता म्हणून मला औषधे दिली गेली.

अत्रन्गि पाउस Tue, 09/22/2020 - 17:18
डॉक, सुखरूप आहात हे परवा बोललो तेव्हा कळलेच. पण त्यामागे हे इतकं घडलं हे आजच वाचलं तेव्हा कळलं. सांभाळून राहा

कपिलमुनी गुरुवार, 09/24/2020 - 00:30
कोरोना झाल्यावर चाचणी पॉझिटिव्ह येते, कोरोना बरी झाल्याची चाचणी निगेटिव्ह येते का ? माझ्या काही फॅमिली मेम्बरना पॉझिटिव्ह नंतर 14 दिवस घरी सुरक्षित केले नंतर कोणतीही चाचणी ना करता बरे झालात म्हणून घोषित केले ( लक्षण नसलेले किंवा सौम्य लक्षण असलेले मेम्बर होते)

In reply to by कपिलमुनी

चिगो गुरुवार, 10/08/2020 - 15:14
कोरोना झाल्यावर चाचणी पॉझिटिव्ह येते, कोरोना बरी झाल्याची चाचणी निगेटिव्ह येते का ?
होय. माझ्या मुलीला (वय वर्षे आठ) लक्षणे आल्याने ३ सप्टेंबरला कोव्हिड टेस्ट केली. ती पॉजिटीव्ह आली. मग तिला 'नरो वा कुंजरो वा' स्टाईलमध्ये 'तुला आणि मला फक्त लक्षणे असल्याने आपल्या दोघांना' वेगळं रहायचं आहे', असं सांगून मी आणि ती वरच्या मजल्यावर विलगीकरणात राहीलो. (तिने टिव्हीवर कोरोनाच्या अर्धवट, अतिरंजित बातम्या ऐकल्या होत्या, त्यामुळे तिला कोरोनाची अनाठायी भिती होती. त्यामुळे हा 'अर्धसत्य प्रयोग' करावा लागला. मी पॉजिटीव्ह नव्हतो.) बायको आणि लहान मुलगा खालच्या मजल्यावर घरातल्या होते. तिला फक्त तीन दिवस 'लो ग्रेड' ताप होता, त्यावर पॅरासिटॅमॉल दिलं. बाकी घरगुती काढा, हळदीचे दुध, च्यवनप्राश, वाफ घेणे इत्यादि सुरु होतंच, ज्याचा ती कंटाळा करुन झाल्यावर गपगुमान वापर करायची. ;) मला डायबिटीस आणि रक्तदाबाची अनुवांशिकता आहे, तसेच रक्तदाबही आहेच. गर्म खुन वगैरे.. पण ह्याची चिंता फाट्यावर मारुन पोरीसोबत खेळणे, मजा करणे हे शिकलो ह्या दिवसांत. संध्याकाळी 'सोशल डिस्ट्न्सिंग'युक्त चहा असायचा. असो. १४ सप्टेंबरला केलेल्या चाचणीत ती पुन्हा पॉजिटीव्ह आली, ज्याची आम्हांला बर्‍यापैकी कल्पना होतीच. तोपर्यंत कोरोनाची भिती आणि कौतूक दोन्ही ओसरलं होतं. १८ सप्टेंबरला केलेल्या चाचणीत मुलीची टेस्ट निगेटीव्ह आली. मी, बायको, मुलगा, घरातच राहणार्‍या व काम करणार्‍या दोन मुली हे सगळे लोक ह्यादरम्यानच्या पुर्ण काळात निगेटीव्ह/ लक्षणरहीतच होते. आम्हालाही त्याचे आश्चर्य वाटले, पण कोरोनाने तेव्हातरी आम्हाला 'खो' दिला नाही. काळजी घ्याच कोरोनाची, पण बाऊ टाळा. कोरोना सगळ्यांनाच कधी ना कधी होणारच आहे. काहींना तो कळेल, बहुतेकांना तो जाणवणारच नाही. झाला तर काळजी घ्या, आणि बरे व्हा..

सुबोध खरे गुरुवार, 09/24/2020 - 13:27
आपल्या शरीरातून २८ दिवस पर्यंत विषाणूंची कलेवर बाहेर टाकली जात असतात यामुळे २८ दिवस पर्यंत( कधी कधी २ महिने पर्यंत) चाचणी पॉझिटिव्ह येत राहते. परंतु साधारण १० दिवसानंतर त्या रुग्णाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य टक्के असते आणि साधारण १२ दिवसानंतर सायटोकाईन स्टॉर्म सारखी गुंतागुंत होण्याची शक्यता नगण्य असते म्हणून १४ दिवस रुग्णाला विलग करून ठेवतात आणि त्यानंतर चाचणी न करता रुग्णाला बरे झालात म्हणून घोषित केले जाते. यात रुग्णाला काही लक्षणे असतील तरी ( काही लोकांना नाक चोंदलेले राहते, अशक्तपणा असतो, छातीत धड धड होणे इ) त्याच्या पासून इतरांना रोग होण्याची शक्यता नसते आणि रुग्णाला स्वतःला काही गुंतागुंत होण्याची शक्यता नगण्य असते. यामुळे या कालावधी नंतर आपण रोगातून बरे झाला आहात असे समजले जाते.

आपण सहीसलामत बाहेर आलात हे फारच चांगलं आहे .... समाजाची त्यातल्या त्यात एका भाडेकरूकडे बघण्याची समाजाची दृष्टी आमूलाग्र बदलणे गरजेचे आहे ....लोक फक्त फळं असलेल्या झाडालाच दगड मारतात आणि ऊन असेल तरच सावलीला बसतात ...एरवी झाड म्हणजे फक्त लाकूड !

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/11/2021 - 04:10
डाँ दांपत्य आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन. चार ओळी देवाच्या दुतां करता. डाँक्टर हर फुल जो खीलता है। पहले तू देखता है। हर फुल जो मिटता है। पहले तु समझता है। फुलों की परवरीश । तेरे हवाले करके। प्रभू क्षीरसागर मे आराम से सोता है। तुझे देखके तेज धडकन भी धीमी होती है। जीदंगी खुशगवांर होने की हमी मीलती है। मरते हुये, तुझमें भगवान नजर आता है। चलाने वाला कोई और ही है। उसकी हर गलती तेरे ही नाम होती है। अफसोस है कुछ एहसान फरामोश भी है। पता चलेगा उनको जब उनकी बारी आयेगी। वो भी गिडगीडायेगें। तेरे पैरोंमे लेटेंगें जब यमदूत उनके पैर खिचेगें। कलजुग है ,यहाँ। ना भगवान ना भगत है। भीड भरी दुनीया मे सही ज्यादा कुछ ही गलत है। गुजारीश करता हूँ। भगवान ना समझे। इन्सान तो समझो। एहसान नही तो कमस कम कर्जदार तो समझो। हर वो डाँक्टर, नर्स और वैद्यकीय व्यवसाय मे अपना हर पल मानवता के भलाई के लिये बिताने वाले को समर्पित । 28-12-2020