Skip to main content

भुतंखेतं

लेखक जिन्क्स यांनी रविवार, 26/07/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
महिन्यातून एकदा ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्याच टेरेस वर रात्री जमून भोजनाचा आनंद घेत उशिरा पर्यंत गप्पा मारणे हा आमचा त्या वेळचा प्रघात होता. आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा आणि त्याचा आस्वाद घेत आमच्या गप्पा रंगायच्या. एका रात्री असाच तो मित्र याखनी पुलाव घेऊन आला होता. टेरेस कडे जातच होतो तेवढ्यात मी पाहिले की आमच्याच ऑफिसचा एक सीनियर डेव्हलपर एकटाच काम करत बसला होता. मी त्याला आमच्या सोबत यायचा आग्रह केला. तो आधी तयार नव्हता पण नंतर तयार झाला. त्या रात्री गप्पा अचानक भुतांच्या विषयावर आल्या. अर्थातच आम्ही ऐकीव कथा मीठ मसाला लावून एकमेकांना सांगत होतो. आमचा तो सीनियर डेव्हलपर बाजूला शांत बसून आमच्या गप्पा ऐकत होता. रात्र जशी वाढली तसं आम्ही आवरायला घेतलं आणि खाली निघणार तेवढ्यात तो मित्र म्हणाला की त्याला एक अनुभव सांगायचं आहे. त्याच्या अनुभव कथनानंतर आम्ही परत कधीच टेरेसवर रात्री जेवण करायचं धाडस केलं नाही. अभयची (सीनियर डेव्हलपर) काम करायची पद्धत अजब होती. तो दुपारी 1 वाजता ऑफिसला यायचा आणि रात्री उशिरा पर्यंत काम करत बसायचा. तो एकलकोंडा होता आणि प्रोजेक्टवर एकटाच काम करणं पसंत करायचा. एका रात्री तो असाच उशिरा पर्यंत काम करत बसला होता. रात्री 1 वाजता तो घरी जाण्यास निघाला. तो एका अवघड प्रोजेक्ट वर काम करत होता आणि निघतानी पण एका क्लिष्ट लॉजिक बद्दल विचार करत होता. आमचं ऑफिस 8व्या मजल्यावर आहे. लिफ्ट मधून खाली येत होता तेवढ्यात लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला. समोरच्या पोर्च मध्ये अंधुक प्रकाश होता आणि एक लहान मुलगा फुटबॉल लाथेने भिंतीवर मारायचा खेळ खेळत होता. मुलगा पाठमोरा होता. थोड्यावेळाने लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्ट बेसमेंटच्या पार्किंग मध्ये आली. तो त्याच्या गाडीकडे निघालाच होता की त्याला अचानक धक्का बसला. त्याने थोड्यावेळ पूर्वी पाहिलेले दृश्य तो परत आठवू लागला. रात्रीच्या एक वाजता एक कमर्शियल बिल्डिंग मध्ये लहान मुलगा कसा असू शकतो. ते पण अशा मजल्यावर जो खूप वर्षे बंद आहे. होय, इमारतीतले बाकी मजले इतर कंपनीच्या ऑफिसेसनी व्यापले होते. एकच चौथा मजला रिकामा होता. बरीच वर्षे तो असाच रिकामा पडला होता. इमारतीची लिफ्ट मध्ये पण 4 आकडा डिझेबल केला होता. म्हणजे लिफ्ट कधीच चौथ्या मजल्यावर थांबत नसे. अभयला पार्किंग मध्येच दरदरून घाम फुटला. एवढ्या रात्री पूर्ण पार्किंग रिकामे होते आणि त्याची गाडी बरीच आत होती. तो घाबरला होता आणि गाडीकडे जाण्याची त्याची हिंमत नव्हती. तो गाडी कडे न जाता धावत बिल्डिंगच्या security gate कडे गेला. तिथे एक security guard कडे बघून त्याला जरा बरे वाटले. तिथे जाऊन तो थोडा वेळ बसला. गार्डला वाटले की त्याची तब्येत ठीक नाहीये. गार्डनी त्याची विचारपूस केली. तो काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने गार्ड कडे पिण्यास पाणी मागितले. त्याचा आणि गार्डचा संवाद पुढे देत आहे, गार्ड - ' सर आपकी तब्येत ठीक है ना? हॉस्पिटल जाना है क्या? मै लेके जा सकता हु' अभय - 'नही' मधला काही काळ शांत गेला. केवळ आजूबाजूला माणसाच अस्तित्वच त्याला समाधान देत होतं. गार्ड त्याच्या हालचाली न्याहाळत होता. त्याच्या अस्वस्थ हालचालीवरून गार्डला काही शंका आली. थोड्यावेळाने गार्डनी त्याला विचारले, गार्ड - 'सर आपने कुछ देखा क्या? ' ह्यावर अभय शांत बसला. त्याला सांगावे की नाही ह्या विचारात तो होता. गार्ड - ' चौथा माला? ' अभय आ वासून त्याला पाहताच राहिला. गार्डच्या लक्षात आले की ' चौथे माले' ची केस आहे. त्याने पुढे सांगायास सुरू केले की बिल्डिंग मध्ये काम करत असलेल्या हाउस किपिंग, security सगळ्यांना चौथ्या माजल्या बद्दल माहिती आहे आणि सगळे तिथून दूर राहतात. बिल्डिंग administration कडून त्यांना सक्त ताकीद होती की काम करत असलेल्या कामाचार्यांसोबत ह्या बाबतीत कोणी काही अफवा(? ) नाही पसरवणार. ह्या नंतर अभय गार्ड सोबत पार्किंग मध्ये गेला आणि नंतर घरी. त्या नंतर तो बरेच दिवस ऑफिसला नाही आला. ह्या घटने बद्दल तो कंपनीच्या काही सीनियर लोकांशी बोलला. त्याला काही दिवस घरून काम करायची सूट मिळाली. नंतर तो ऑफिसला येऊ लागला पण एकटं थांबणं टाळू लागला. सर्वात उशिरा ऑफिस मधून बाहेर पडणारा आमचाच ग्रुप असायचा म्हणून तो एवढ्यात थांबू लागला होता. त्याचा हा अनुभव ऐकून अर्थातच आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. त्या रात्री लिफ्ट मधून खाली जातांनी हृदयाची धडधड प्रमाणा बाहेर वाढली होती. चुकून जरी लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबली असती तर एक दोघांचे तरी हृदय बंद पडले असते. तुमचे पण असे काही अमानवीय अनुभव असतील तर इथे टाकावेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24481
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

आमच्या कंपनीत कामाच्या अती ताणानं हार्ट अॅटॅक येऊन शहिद झालेल्या एका जुन्या मॅनेजर च भुत फिरतं म्हणतात.

छान कथा...आवडली. खरोखर घडली असेल तर एकदम डेंजर कथा आहे. चांगल्या रितीने मांडली आहे.. एक सुचना : आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा . -- येथे मुस्लिम लिहीण्याची गरज वाटत नाही. कथेचा नंतर कोठल्याही धर्माशी संबंध येत नाही त्यामुळे ह्या शब्दाची गरज नव्हती.

कधी काळी चौथ्या मजल्यावरिल एखाद्या कुटुंबातील मूल दगावले असणार व त्याचे ते भूत असणार असा स्टोरीचा कयास आहे. आमचे गृहसंकुल नाल्याच्या कडेला आहे. तिथे नाल्यात काही उतारे ठेवले जायचे. अंगात आलेल्या बाया पण तिथे आलेल्या पाहिल्या. तिथे खूप पुर्वी मसनवटा होता असे ऐकले. कुणी म्हणायच लहान मुलांच कबरस्तान होते. कुणी म्हणत की इथे शर्ट पँट घातलेले भूत फिरते. अशा अनेक मनोरंजक कथा वास्तूशी जोडलेल्या असतात. प्रत्येक शहरात असतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शर्ट पँट घातलेले भुत
मग इतरांना भूत कसे दिसते? घाटपांडे काका. दिखाओ दिखाओ भुत दिखाओ. अब्राहम कोवूर साहेब येतील बरका :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुण्यातला, एक मस्त फ्लॅट गेला माझा! :-( सोसायटीच्या बाजुला जरा एक स्मशान होतं, ते तस दिसत नव्हतं, पण मॅप्स मध्ये अगदी बरोबर दिसायचं. सोडला मग तो फ्लॅट!!

आमचं जुन घर अगदी नदीला लागून होतं. खिडकीतून नदी दिसायची. समोर भलंमोठं जाडजूड सागाच झाड होत. भरीस भर एक पडकी विहीर होती. आमची खिडकी आणि हे सर्व यामध्ये फक्त एक तारेचा कुंपण होतं. आणि आमच्या बाजूला एक औदंबराच झाड होतं. दिवसा हे दृश्य जितका सुंदर दिसायचं तेवढंच रात्री हे सार भयाण होत जायचं. अमावस्येच्या रात्री हमखास या भागात उतारे ठेवले जायचे. सर्वात विलक्षण म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री पैंजण आणि बांगड्यांचा आवाज एका बाजूने दुसऱ्या बाजू पर्यंत फिरताना मी स्वतः ऐकलेले आहेत. एक मात्र होता की हे सर्व त्या कुंपणाच्या पलीकडील रानात चालायचं.

In reply to by बोलघेवडा

आम्ही त्यावेळी, वणी नावाच्या छोट्यागावी होतो! घर असंच, गावाच्या टोकाला. नंतर नाला अन मग सगळी शेती. त्या एका शेतात, एका बाईनी जीव दिला. काही उत्साही मंडळी जाउन बघुन वगैरे आलि आमच्या भागातली. अन काही दिवसांनीच रडण्याचा आवाज वगैरे ऐकायला यायला लागले. काहींना भासही झालेत. नंतर लोकांनी काय शांती की काय ती केली अन ते आवाज बंद झाले! आम्ही हार्डली, पाचवी सहावीत असल्याने मुलांना ह्याविषयी काहिच सांगित्ल गेलं नाहि, हे सगळ जरा मोठ्या दादांकडुन अन आजोबांच्या गोष्टींमधुन वगैरे सम्जल! आता तिकडे शेत वगैरे विकुन विहिर बुजवुन चांगली वस्ती झालेलि. असो, कालाय तस्मै नमः

भारी म्हणता येत नाही, पण थरारक किस्सा आहे. असे अनुभव असणारे दोन धागे मायबोलीवर आहेत. असे किस्से असणार्‍या एका व्हॉटस अ‍ॅप ग्रुपची लिंकही मला आली होती, पण अजून आत जायचे धाडस केले नाही. :-) अश्या हकीकतीवर मी आधी विश्वास ठेवायचो नाही.कित्येक किल्ले एकटाच फिरलो. वास्तविक गड हे मुळात लष्करी ठाणे, त्यामुळे ईथे युध्द झालेली असतात आणि मृत्युही झालेले असतात.मात्र कधी कोणत्या भुताचा अनुभव आला नाही.मात्र ट्रेकमध्ये असे अनुभव आलेले काही किस्से ब्लॉगवर वाचायला मिळतात. सवड मिळाली कि लिंक देतो.

आत्ता पर्यंत बरेच ट्रेक केले पण मला स्वतःला असा अनुभव कधी आला नाही.पण माझ्या एका जवळच्या मित्राला तोरण्यावरच्या मेंगाई देवी मंदिर परिसरात अनुभव आला आणि तो मी त्याच्याच तोंडून ऐकला होता.

In reply to by स्वतन्त्र

तोरणाचे बरेच किस्से आहेत, प्र.के. घाणेकर यांच्या साद सह्याद्रीची पुस्तकात काही उल्लेख आहेत. 'दिवेकर आडनावाच्या ब्राह्मणाचे ब्रह्मपिशाच्च आहे. पायथ्याला असलेल्या वेल्हा गावात तहसिल कार्यालयात म्हणे त्या पिशाच्चाला शांत करण्यासाठी काही भाग- नैवेद्य दाखवीला जातो. त्याच्या खर्चास राज्य शासनाकडुन मंजुरी देखील मिळाली आहे' असा तो उल्लेख आहे. बरीच वर्ष ट्रेकिंग मध्ये सक्रिय असताना तोरणा भेटी झाल्या. एकदा तोरणा नाइट ट्रेक वेळी रात्री २/३ च्या आसपास एका जागी आमचा ग्रुप अडकला, तेव्हा असं वाटलं आता तर नक्कीच पिशाच्चा सोबत गाठ पडेल :) पण नाही झाली. पण याबाबत एक अनुभव मात्र नक्की आहे. जमलं तर लिहील त्यावर.

In reply to by विखि

तोरण्याला अमावस्येच्या रात्री एकटा फिरलो आहे वर. घंटा काही दिसले नाही. च्यायला त्या घाणेकराच्या! पुस्तक खपवायला काहीही लिहून टाकतो. कसले आलेय ब्रह्मपिशाच्च!

असा अनुभव येणं लांब, असा अनुभव कुणी सांगितला तरी मी जॉब सोडेल!! चाकू, सुरी, बंदूक, तोफ... आपण नाही कशाला घाबरत!

ट्रेनमध्ये एक दारुडा चढलेला. अगदीच उच्चशिक्षित वैगेरे वाटत होता, कारण अगदीच काव्यात्मक बरळण चाललेलं. आणि तसा फारसा उपद्रवी जाणूनबुजून नव्हता पण एक दोन वेळा तोल जाऊन काही मुलींवर पडला. मग एक तगड्या दाढीवाल्या (बिअर्डोच्या ऍडवाला इमॅजिन करा) हंकने जाऊन त्याला धरून ठेवले, पुन्हा इथेतिथे पडू नये म्हणून. त्या दारुड्याला दाढीवाल्याने दाखवलेल्या काळजीचे इतके अप्रूप वाटले, की तो रडूच लागला. "आमचे राजे, शिवाजी, शिवाजी" असं काहीबाही बरळत होता. स्टेशन आल्यावर त्याच्या काय अंगात आलं काय माहित, बिअर्डोला कानाखाली लावून पळू लागला. दरवाज्यापर्यंत पोहोचताना दोन तीनदा धडपडला. बिअर्डो एकदम हक्काबक्का. ह्यात तसं भीतिदायक असं काही नाहीये, पण एकूणच दारुड्याच्या परिस्थितीचा आणि बिअर्डोच्या चांगुलपणाचा एकत्रित परिणाम होऊन हा प्रसंग कोणत्यातरी जुन्या मेलोड्रमॅटीक सिनेमातल्या सिनसारखा मनात घर करून बसला.

शेजारच्या बेडकीहाळ काकूंनी त्यांच्या पूर्वीच्या घरातला किस्सा सांगितला - काका सरकारी क्लार्क होते. बदलीमुळे काकूंना आधी पलूस की कुठल्या गावात एमआयडीसीच्या सरकारी क्वार्टर्स मध्ये राहावे लागलेले. त्यांच्या लग्नाला तीन-चार वर्षंच झाली होती आणि तेव्हा त्यांना अजून मूलबाळ नव्हते. तिथे नऊ पैकी तीनच फ्लॅट्समध्ये कुटुंबं राहायची. बाकीचे फ्लॅट पडीक, गळके असेच होते. समोर द्वितीय श्रेणीच्या अधिकार्‍यासाठी पडका बंगलाही बांधून ठेवला होता, पण त्यात कुणीच कधी राहिलं नाही. तर, काकू मसाल्याच्या डब्यात लागतील तशा लवंगा काढून ठेवत. त्यांच्या अंदाजाप्रमाणे महिन्याचा किराणा आणताना लवंगाही आणत. नव्या घरात लवंगा लवकर संपू लागल्या. काही दिवसांनी त्यांच्या असं लक्षात आलं की लवंगा गायब होत आहेत. त्या मोजून लवंगा ठेऊ लागल्या. दिवसाला तीन चार या गतीने लवंगा डब्यातून गायब व्हायच्या. त्यांनी काकांना ही घटना सांगितली तर काकांनी काकूंना एकदम उड्वून लावलं. नंतर काकू नाराज झाल्यावर काकांनी त्या रात्री गजरा वगैरे आणला आणि रात्र साजरी करू लागले. काकूंना सुखाच्या परमोच्च क्षणी बाजूच्या रिकाम्या घरातून कुणीतरी हसल्याचा आवाज आला. जणू काही त्यांच्या बरोबरीनेच दुसर्‍या एका बाईला ऑरगॅजम आला असेल. काका पुन्हा चिडतील म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. शेजार्‍यांशी अजून तितक्या घट्ट ओळखी झाल्या नव्हत्या. तरीही एका वयाने थोड्याश्या मोठ्या शेजारणीशी काकूंशी सलगी झाली. काकूंनी बोलता बोलता लवंगांचा विषय काढला. त्या शेजारणीने डोळे विस्फारत काकूंना ती घटना सांगितली आणि काकूंची पाचावर धारण बसली. काकूंच्या त्या शेजारच्या रिकाम्या घरात एक मध्यमवयीन जोडपं राहायला आलं होतं. त्यांच्यात नेहमी वाद होत. सतत खटके उडत. बाई तिच्या नवर्‍याला खूप शिव्या देई. ती भांडकुदळ म्हणून तिच्या नादाला फारसं कुणी लागत नसे. एकदा एका प्रसन्न दुपारी ती बाई काकूंच्या शेजारणीकडे आली. तिनं थोड्या लवंगा मागितल्या. शेजारणीने त्या दिल्यावर त्यातल्या दोन पटकन तोंडात टाकल्या. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर ती बाई शेजारणीला तिची व्यथा सांगू लागली - "नवरा बुळगा निघाला. अजिबात दम नाही बगा त्याच्यात. लग्नाला दहा वरीस उलटलं तरी कूस उजवली नाई. डोंगरावरच्या एका बाबानं गुण यील म्हणून रोज तीन चार लवंगा चघळ म्हणून सांगितलंय बगा" काही दिवस असेच गेले आणि त्या बाईने एकेदिवशी फास लावून घेतला. तिच्या घरात सगळीकडे लवंगाच लवंगा उधळल्या होत्या. तिचा बुळगा नवरा कुठे निघून गेला त्याचा पत्ता नाही लागला.

कृपया मार्गदर्शन करावे माझी मैत्रीण सध्या नवीन घरी शिफ्ट झाली आहे तिला नवीन घरात कोणीतरी असल्याचे भास होतात बाजूला माणसे असली तरी तिला मध्येच कोणीतरी असल्याचे जाणवते हे घर दक्षिणमुखी आहे दरवाजावर हनुमानाचे चित्र आहे घरात पाण्याची ठिकाणे गळकी आहेत (बाथरूम चा नळ थोडा गळतो,सिंकचा पाईप गळका आहे) घराच्या प्रवेश दरवाजाच्या मागे एक छोटी चप्पल टांगलेली आहे यापूर्वी एका वर्षांपूर्वी त्या जागेत working मुली (परगावच्या )राहत होत्या लग्न ठरल्यामुळे त्या जागा सोडून गेल्या त्यानंतर मालकीण बाई सहा महिने. मग लोकडाऊनमुळे मालकीणबाई मुलीकडे राहावयास गेल्या हि जागा ३-४ महिने रिकामीच होती घर actually ४ खोल्यांचे आहे पण एक खोली मालकीण बाईंनी स्वतःचे सामान ठेवण्यासाठी बंद करून ठेवली आहे मैत्रिणीला सुरवातीला बंद खोली खटकलीच होती पण बाकी घर चांगले वाटले म्हणून तिने भाड्याने घेतले आत्ता तिचे लक्ष बंद खोलीकडे जाते आणि तिला कोणीतरी असल्यासारखे वाटते रात्री आजूबाजूला पालक झोपलेले असताना देखील कोणीतरी असल्याचे भास होतात मनाचे खेळ म्हणावे तर दिवसा देखील मधूनच जाणवते रात्री देखील लाईट चालू असताना पण तर हि वस्तू बाधित आहे का तिला नुसतेच भास होतात? हनुमान चालीसा म्हणते किंवा ऐकते अधूनमधून तरी पण भास होत राहतात तसेच डोकेदुखीची तक्रार पण मधूनच सुरु झाली आहे दक्षिणमुखी वास्तू असल्यामुळे असे होत आहे का?(प्रवेश दरवाजा दक्षिणेकडे) ह्यावर काही उपाय आहे का ?कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद

In reply to by Prajakta२१

आपल्या मैत्रिणीची समस्या थोडी वास्तव आणि थोडी मानसिक आहे. दक्षिणमुखी प्रवेशद्वार असेल तर नैसर्गिक प्रकाश, वारा पुरेसा येत नसतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते. त्याचबरोबर करकरणारे दरवाजे, गळणारे नळ यांच्या अनावश्यक आवाजाने यामुळेही मन विचलित होत असण्याची शक्यता असते. पूर्वी कुणीतरी बंद दरवाजा बद्दल काहीतरी बोलले असल्यास ते ही मनात राहिले असेल. गळणारे नळ दुरुस्त करून किंवा शक्य असल्यास पूर्वेला व उत्तरेला मोठी खिडकी काढून भौतिक समस्या दूर होतील पण मनातील भिती काढून टाकणे थोडे कठीण जाईल. भाड्याचे घर असेल तर घर बदलणे उत्तम.

In reply to by Prajakta२१

खटकलेल्या बंद खोलीमुळे हे होतय. एकदा ती खोली उघडून पहा. मालकिणीकडून किल्ली मागून घ्या.

काही बाधित घरे राहणार्याला लाभतात असेही वाचले आहे. राजेश खन्नाचा आशिर्वाद बंगला हा हॉन्टेड होता असे वाचले आहे व तो जेव्हा ह्या बंगल्यात राहायला आला तेव्हा त्याने ओळीने काही पिक्चर्स सुपरहिट दिले. त्याआधी हा बंगला राजेंद्रकुमारच्या मालकिचा होता.त्याला ही त्याने जेव्हा हा बंगला खरेदी केला तेव्हा भरभरुन यश दिले असे म्हणतात.

आत्ता कुठे चांगला धागा आला. -------------- १) लेखकाचा अवघड प्रोजेक्टचा कामाचा उरक पाहून चौथ्या माळ्यावरच्या मुलास लेखकास बघुसे वाटले आणि - त्याने लिफ्ट थांबवली. म्हणजे जुना बॉस तुमच्यावर खुश आहे पण पगारवाढ देऊ शकणार नाही. २) रात्री पैंजणाचा आवाज करत कुणी फिरते. डोक्यातल्या भीतीमुळे ती बाई फक्त अमावस्या पौर्णिमेला नाचते असं वाटत असेल. - रातवा नावाचा पक्षी ( इंडिअन नाइटजार)अंधारात उडून किटक पकडतो. खूप रात्र झाली की किडे कुठेतरी स्थिरावतात, कमी उडतात. ते मिळाले की त्याला आनंद होतो. तो आवाज करतो तो पैंजण वाजल्यासारखा छुम,छुम किंवा चिंन चिंन असा असतो. पोट भरल्यावर दुसऱ्या रातव्यांना बोलावत असेल. - टॉर्च घेऊन तपासल्यास पैंजणवाली नर्तकी शोधू शकता. पाहुणे आल्यास त्यांना बरोबर न्या. हा आइटम त्यांना आवडेल. ३) "आमच्या घरात लवंगा नाहीत. मागायला येऊ नये." ही पाटी दारावर लावल्यास प्रश्न सुटतील.

आमच्या गल्लीत माझे आजोबा व त्यांचे पाच भाऊ यांची ओळीने पाच घरे होती. पहिले घर आमचे व शेवटचे घर सर्वात धाकट्या काकांचे होते. तर दर अमावस्या-पौर्णिमेला त्यांच्या घरातून एक ब्राह्मण बटू बाहेर पडायचा व तो एक घर सोडून अलीकडच्या घरात जायचा . त्याचा दुसऱ्या दिवशी त्या घरातील आई व मुलांमध्ये जोरदार भांडण व्हायचे. दुसरे भूत म्हणजे घराच्या मागे एक गल्ली सुरु व्हायची त्याच्या तोंडाशी रात्री २ वाजता एक हिरव्या लुगड्यातील बाई रस्ता झाडताना दिसायची. त्त्यायाकाळी टॉयलेट परसदारी बांधलेले असल्याने बरेच जण रात्री तीथे यायचे. माझ्या आईनेही पाहिले आहे. तीला पाहताना काही वाटले नाही. पण दुसरे दिवशी ही गोष्ट आजोबांना सांगितल्यावर सगळेच घाबरले. रात्री २ वाजता कोणी रस्ता झाडते का? हा प्रश्न आजीने विचारताच आईची भितीने बोबडी वळली. मी मात्र लहानपणी रात्री तिकडे जायचे झाल्यास कोणी न कोणी बाहेर सोबतीला का थांबत असे ते नंतर कळाले.

In reply to by श्वेता२४

अमावस्या-पौर्णिमेला त्यांच्या घरातून एक ब्राह्मण बटू बाहेर पडायचा
निदान भुतांना तरी सेक्युलर राहू द्या.

In reply to by mrcoolguynice

तुमच्या सेक्युलर च्या अंडरस्टँडींगमध्ये थोडा घोळ वाटतो आहे. ब्राह्मण बटू / मुस्लिम /ख्रिश्चन हे उल्लेख नॉन सेक्युलर नाहीत. आणी जर खरोखर मेलेल्या माणसाचे भूत होत असेल तर ब्राह्मण बटूचे भूत पण त्याच्यासारखेच दीसेल हे लॉजिकल वाटते.

In reply to by नेत्रेश

भुताला पण धर्म चिकटवला जातोय, हे पाहून मौज वाटतेय... समजा एखादया व्यक्तीने मरणासन्न अवस्थेत धर्म परिवर्तन केले, तर त्याचे भूत कोणत्या धर्माचे होईल ? म्हणजे ते भूत हनुमान चालीसाला घाबरेल , की क्रॉस व होलीवॉटर कॉम्बिनेशनला घाबरेल ?

In reply to by mrcoolguynice

म्हणजे पिच्चर बघून जे डोक्यात बसलंय ते असं की मरताना माणूस जसा असतो, तसं त्याचं भूत असतं. म्हणजे कपडे वगैरे. मरताना सूट असेल तर भूत पण सुटात वावरतं. मरताना साडी असेल तर भूत पण साडीतच असतं. इत्यादी म्हणजे मरतानाची दृष्यात्मक स्थिती आत्म्याला चिकटते. तशी धार्मिक स्थितीसुद्धा चिकटत असावी. त्यामुळे मरताना धर्मांतर केले (उदा हिंदू टू ख्रिश्चन) तर भूत क्रॉसला घाबरेल. दुसरी बाजू - मराठी हिंदू जनांना शक्यतो हनुमान चालीसा ऐवजी मारुती स्तोत्र (किंवा कोकणातील* लोकांना रामरक्षा ) माहिती असते. मग अशा हनुमान चालीसा माहिती नसलेल्या माणसाच्या भूताला हनुमान चालीसाची भिती केवळ तो जिवंतपणी हिंदू होता, म्हणून वाटेल का? त्याच चालीवर पुढे, जर मरताना तो हिंदू ख्रिश्चन झाला, आणि त्याला क्रॉस / होली वॉटर / लसूण या संकल्पना माहिती नसतील, तर तो त्या वस्तूंना घाबरेल का? * - रामरक्षाचे जे उल्लेख वाचलेत ते (बहुतेक ) कोकणाच्या पार्श्वभूमीवर वाचलेले आहेत. उदा श्यामची आई पश्चिम महाराष्ट्रातील (ग्रामीण) लेखनात मारुती स्तोत्राचे उल्लेख येतात. उदा शंकर पाटील, द मा मिरासदार यांचं लेखन. अवांतर - वपुंच्या बदली कथेतील भुताचा ड्वायलॉक - माणसावर आयुष्यभर जे संस्कार होतात, ते मेल्यावरदेखील पिच्छा सोडत नाहीत. टीप - या प्रतिसादातील विचार हे प्रतिसाद देणार्‍या 'आयडीचे' (त्यामागील मनुक्ष्याच्या आत्म्याचे नव्हेत!) आहेत. ते विचार वैयक्तिक असून, हा प्रतिसाद वाचून कोणीही मरताना धर्मांतर करणे, भुताची जात्/धर्म विचारून त्यानुसार त्याला घाबरवणे, अशा गोष्टी केल्यास व त्याचे अपेक्षित्/अनपेक्षित्/विपरीत परीणाम झाल्यास....

उत्तरदायित्त्वास नकार लागू!


In reply to by तुषार काळभोर

माहीतगार लोकांचे भूतपण उत्तरदायीत्वास नकार देतं का? किंवा कसे? उत्तरदायित्वास नकार असल्यास त्याची उत्तरक्रिया करतात किंवा कसे?

In reply to by अभ्या..

माहीतगार लोकांचे भूतपण उत्तरदायीत्वास नकार देतं का? किंवा कसे? उत्तरदायित्वास नकार असल्यास त्याची उत्तरक्रिया करतात किंवा कसे?
आपल्याला माहिती नाही. कारण आपण माहितगार नाही. माहितगार लोकांना सगळं माहिती असतं आणि सगळं कळतं. अवांतर : उत्तरक्रिया अन् दशक्रिया एकत्र करतात का? अशी एकत्र केल्यावर सामान्य आत्मा अतृप्त होऊन भुतात रूपांतरित होण्याची अथवा न होण्याची प्रोबेबिलीटी किती?

In reply to by तुषार काळभोर

बाकी "लसूण" ला घाबरणे हे, व्हामपायर या प्रकारच्या ट्रान्ससिल्व्हेनीया या प्रदेशातील भुता बद्दल आहे, ख्रिश्चन भूतांचा डायरेक्ट संबंध नसावा. हा आता हिंदू माणूस ट्रान्ससिल्व्हेनीयाला गेला त्याच्या नरडीचा चावा ख्रिश्चन व्हामपायरने घेतला, तर, परिणामस्वरूप तयार होणारे हिंदू भूत, होली वॉटर एवजी गोमूत्राला घाबरेल का ? जैन माणसाचे भूत लासूनला घाबरेल का ? बाकी जैन भुतांची भीती थोडी कमी वाटते, कारण ते अहिंसक असतील ना ?? त्यांना त्रास द्यायचा असेल समोरच्याला, तर फारफार ते रात्री तुमच्या जवळ येऊन लाऊड आवाजात गरबा खेळतील...

मिपावर सुध्दा उडवलेले आयडी परत दिसतात. काहि बोलत लिहित नाहीत फक्त हजर सभासदात त्यांचे अस्तित्व जाणवते. कित्येक आत्मे तर अदृष्य रुपाने पाहात असतात आपल्यामागे कसे चाललेय मिपा हे. फक्त ते दिसत नाहीत आपल्यांना. . चला नाहीतर यायचे आम्हाला पण बोलावणे. ;)

ज्यांना भुतंखेतं दिसतात त्यांनी जरा पाहणी करून सांगावे, की सध्या जे करोनामुळे लोक्स गचागच गचकत आहेत, त्यामुळे आजकाल भुतांच्या पॉप्युलेशनमध्ये वाढ झाली आहे का? नाय, ज्येन्युइन प्रश्ने...

In reply to by एस

कोरोना ने मेलेल्या माणसाचे भुत इतर भुतांना कोरोना बाधित करत असेल का? नाही म्हणजे, कोरोनाच्या विषाणूही माणसा सोबत मरतातना? त्यांचेही मेल्यावर भुत बनत असेलच ना? मग ते इतर माणूस भुतांना बाधित करत असतिलच ना? मग अशी कोरोनाने मेलेली भुते परत माणूस होत असतील का? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बरोबर आहे आपलं. कोरोनाचे ही भूत होते पण ते फक्त कोरोनाला पछाडाते अशी खात्रीलायक माहिती आहे. अशाप्रकारे पछाडलेला कोरोना फक्त पच्छाडलेल्या माणसाला बाधित करू शकतो.

In reply to by एस

एस, '९११ च्या हल्ल्यात जे तीनेक हजार लोकं मेले ते आमच्या सोबतच आहेत' असं एकीच्या तत्कालीन मृत आजोबांनी त्यांच्या मुलीच्या ( = लेखिकेच्या आईच्या ) स्वप्नात येऊन सांगितलं होतं. संदर्भ : https://www.maayboli.com/comment/1695091#comment-1695091 आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा. पै., प्रतिसाद पुन्हा एकदा टाकतो. ज्यांना भुतंखेतं दिसतात त्यांनी जरा पाहणी करून सांगावे, की सध्या जे करोनामुळे लोक्स गचागच गचकत आहेत, त्यामुळे आजकाल भुतांच्या पॉप्युलेशनमध्ये वाढ झाली आहे का? नाय, ज्येन्युइन प्रश्ने...

In reply to by एस

एस, तुमचं विधान फारंच सरसकट आहे. हे म्हणजे ज्यांना चंद्रसूर्य दिसतात त्यांना बाकीच्या ग्रहांची मोजदाद करायला सांगण्यासारखं आहे. आ.न., -गा.पै.

बाकी काय नाही माहित, पैंजणाच्या आवाजाचं कारण tinnitus हे पण असू शकतं (थोडा स्वानुभव). एरवी मुलांच्या आवाजात जाणवत नाही, पण घरात कोणी नसेल कि पैंजणाचे आवाज यायचे. मला हे पहिल्यांदी जाणवलं तेव्हा घरात एकटी होते. त्यामुळे वाट लागली भीतीने. नंतर मैत्रिणीशी बोलताना सांगितलं तर तिने tinnitus google करायला सांगितलं. लक्षणं बरीचशी मितीजूळती होती. माझ्या डॉक्टरने सांगितलं कि याला काय इलाज नाही म्हणून.

प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि माजी वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी एका लेखात असा किस्सा सांगितला आहे की ते वनविभागाच्या एका विश्रामगृही काही कामानिमित्त मुक्कामी गेले असता रात्री छतातून पैंजण वाजल्याचा आवाज येत असे. आधी ते घाबरले. पण नंतर बारकाईने ऐकल्यावर त्यांच्या लक्षात आले की पैंजणांचा आवाज मध्येच फार जलद चालल्यासारखा येई, तर मध्येच काही काळासाठी बंद होई. मग त्यांच्या लक्षात आले की हे पैंजण घातलेलं कुणा बाईचं भूत नसून एका मांजरीच्या पायाला बांधलेलं पैंजण होतं आणि ती मांजर तिथल्या खानसाम्याची होती. ते वनविभागाचे विश्रामगृह भुताटकीने झपाटलेले आहे असे तिथे येणाऱ्या साहेब लोकांना वाटावे आणि तिथे कोणी फिरकू नये, जेणेकरून त्याला काम करावे लागू नये ह्यासाठी तो हा प्रकार करत असे.

आत्ता रात्री हा धागा आणि प्रतिसाद वाचले. मजा आली. अजून कुणाचे अनुभव येऊद्या. सं - दी - प

ही माझ्या मामानी सांगितलेली गोष्ट आहे. अंदाजे १९५० सालची, माझा मामा त्यावेळी दहा-बारा वर्षांचा असावा, एके रात्री गावात एक मांत्रिक आला. आई ग ! बापरे, हे कोण आहे ? नको, नको नाही सांगत पुढे काय घडले ते, ...........