मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अप्रिय आठवणींपासून सुटका

शाम भागवत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो. मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या. मी ही अचंबित झालो. असा विचार करणे बरोबर नाही असे एकीकडे वाटत होते. जपाचा जोरही अचानक वाढला होता. पण त्याच बरोबर सूडाचे मानसिक समाधानही मिळत होते. विशेष म्हणजे जप चालू असल्याने ह्या सगळ्याकडे त्रयस्थ नजरेने पाहणेही चालू होते. खरे तर आदला सगळा दिवस चांगला गेला होता. झोप पण चांगली लागली होती. त्रास देणाऱ्या माणसाची सावलीसुद्धा बरेच दिवस शिवली नव्हती. पण आज पहाटे त्या माणसाच्या विचाराने माझा कब्जा घेतला होता. मी सोडून आजूबाजूचे जग शांतपणे झोपले होते. मनात असा विचार आला की, तो माणूसही आता स्वस्थ झोपला असेल आणि मी मात्र इकडे तळमळतोय. रागाने तडफडतोय. सद्गुरू पैंच्या तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामुळे, सकारात्मक विचाराचे महत्त्व माझ्या लक्षात आलेले होते. तसेच नकारात्मक विचारांनी नुकसान होते हेही लक्षात आले होते. तसेच यासगळ्यासाठी मनात येणाऱ्या विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवायची आवश्यकता नव्याने कळली होती. अप्रिय घटना किंवा आठवणी नव्याने मनात साठणार नाहीत याची काळजी घेणे हा फक्त निम्माच भाग समजला पाहिजे. कारण भूतकाळातील आठवणी अजून त्रास देऊ शकतात हे आज लक्षात आले होते. त्या आठवणींचा बीमोड हा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे याची आज खात्रीच पटली होती. कारण ह्या आठवणींवर माझा काहीही ताबा नाही, उलट त्याच माझा ताबा घेताहेत याचा नुकताच अनुभव आला होता. त्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे होता. विचार चालू झाला. आणि वर उल्लेखलेल्या ग्रंथातील एका वाक्याची आठवण झाली. जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील. अंघोळ व पूजा झाल्यावर शांतपणे बसलो. वर दिलेल्या वाक्याच्या आधारे उपाययोजना करायचे निश्चित केले आणि तो माणूस समोर आहे असे समजून, त्याचे भले व्हावे, कल्याण व्हावे वगैरे कल्पना करायला लागलो. पण अजिबातच जमेना. उलट संताप वाढायला लागला. तरीही प्रयत्न वाढवत राहिलो. तरीही मला ते जमत नव्हते. एकवेळ अशी आली की, माझ्या मुठी घट्ट वळल्या गेल्या, सर्वांगाला घाम फुटला. तरीही मला त्या माणसाचे शुभचिंतन करता येईना. भले किंवा कल्याण हे शब्द सुद्धा आठवेनात. तरीही जे शब्द सुचतील ते वापरून मी पुढची पाच मिनिटे प्रयत्न करत राहिलो. गंजीफ्रॉक घामाने ओला झाला होता. शरीरपण थोडेसे थरथरत होते. पण शेवटी कसेबसे शुभचिंतन करायला जमले होते. त्यावेळी एक लक्षात आले की, मनावरचा ताण हलका झाला आहे. मोकळे मोकळे वाटत आहे. शांतपणे डोळे मिटून बसलो. तर थोड्या वेळाने आणखी एका अप्रिय माणसाची आठवण आली. ही जरा जुन्या काळातील आठवण होती. परत वरील प्रमाणे त्याच्यासाठीही शुभचिंतन केले. त्रास झाला पण फारसा झाला नाही. विचार करता असे लक्षात आले की, ही आठवण पहिल्या आठवणी इतकी त्रासदायक नव्हती त्यामुळे शुभचिंतन करणे त्यामानाने सोपे झाले. पुढचे अनेक तास थांबून थांबून अशाच जुन्या जुन्या आठवणी एकामागोमाग येत होत्या व मी शुभचिंतन करायचा प्रयत्न करत होतो. मात्र शुभचिंतन करायला त्रास फारसा होत नव्हता, कारण या आठवणींत तेवढा कडवटपणा भरलेला नव्हता. एव्हाना भावासहित शुभचिंतन करण्यासाठी विश्वप्रार्थना ही खूप उपयोगी पडते आहे हे लक्षात आल्याने तिचाच वापर करू लागलो होतो. यासगळ्या प्रकारात शब्द महत्त्वाचे नसतात तर भाव महत्त्वाचा असतो. अन्यथा मनापासून शुभचिंतन करणे शक्य होत नाही. शुभचिंतनामध्ये आपल्याला जे हवेहवेसे वाटते तेच समोरच्या व्यक्तीला मिळते आहे ही भावना धरायची असते. त्या दृष्टीनेही विश्वप्रार्थना उत्कृष्ट आहे. या जुन्या जुन्या आठवणी मनांत येत असताना, मधूनच पहिल्या माणसाची परत आठवण यायची. पण ती प्रत्येक वेळेस आणखीनच सौम्य झालेली जाणवत असे. त्यामुळे शुभचिंतन करण्यांस सहज जमत असे. दातओठ खाऊन किंवा मुठी वळायची कधीच आवश्यकता भासत नव्हती. मलाच माझे आश्चर्य वाटत होते. असे हळूहळू सगळ्याच अप्रिय आठवणींबद्दल व्हायला लागले होते. माझा हा प्रयत्न ३ दिवस चालू होता. आता कुठलीच आठवण त्रासदायक वाटत नव्हती. एकदाच शुभचिंतन करूनही किंवा शुभचिंतन करायच्या नुसत्या विचारासरशी त्या आठवणीतून आरामात मुक्त होतो येत होते! काही दिवसांनी मला त्रास देणारा त्या माणसाला मी लांबून पाहिले. पूर्वी माझ्या मनांत या माणसाच्या फक्त दर्शनाने तात्काळ तिडीक उठत असे. पण यावेळी असे काही झाले नाही. मी शांतपणे माझ्या मनातल्या प्रतिक्रियांकडे पाहत होतो. मन खूपच शांत होते. अगदी त्रयस्थपणे त्या माणसाकडे पाहत होते. आपल्याला कोणत्याही प्रकारचे अशुभ चिंतन करायचे नाहीये हे मन स्वत:लाच शांतपणे समजावत होते!!. मी त्या माणसाच्या त्रासातून मुक्त झालो होतो. खूप हायसे वाटत होते. यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता. असेच अनुभव इतर बऱ्याच जणांबद्दल आल्याने हा योगायोग नाही हे स्पष्ट झाले. वर दिलेले व ठळक केलेल्या वाक्याने त्याची सत्यता पटवली होती. त्यानंतर नकोशा वाटणाऱ्या आठवणींवर हाच उपाय मी वापरू लागलो व आजपर्यंत निर्भेळ यश मिळाले आहे. ज्यांना ज्यांना मी हा उपाय सुचवला व ज्यांनी ज्यांनी तो वापरला त्यांना फायदा झाला. अर्थात ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनाच मी हे सांगितले आहे. त्यामुळे "शंकाविरहित वापराचा परिणाम", हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. याबाबतीत माझ्या मनांत जे विचार वेळोवेळी आले ते, मी मांडतोय. मी आजपर्यंत कोणतेही मानसशास्त्राचे पुस्तक वाचलेले नसल्याने मी शास्त्रीय पद्धतीने या सगळ्याचे विवेचन करू शकणार नाही. हे जे मी लिहितोय ते सर्व अप्रिय, त्रासदायक अथवा नकारात्मक गोष्टींबद्दलच्या आपल्यातल्या साठवणीबाबत लिहीत आहे. त्याला फक्त स्वानुभवाचा आधार आहे.
१. आपल्या आयुष्यात जे काही घडत असते त्या सर्वांची नोंद होत असते. घडलेली घटना, काळ, वेळ त्यावेळच्या भाव व भावना, याचबरोबर या सगळ्याची तीव्रता पण नोंदवली जात असते. त्यामुळे ती आठवण होताच आपले मन परत सर्वार्थाने ती घटना जशीच्या तशी परत अनुभवू शकते. साधारणत: आपण कसे बरोबर व दुसरा कसा चुकीचा हाच उहापोह आपले मन यावेळी करते. तसेच काही जमलेली नवीन माहिती किंवा मुद्दे यांचा उहापोह होऊन, ही नवीन माहिती पण मग जुन्या माहितीच्या शेजारी साठवली जाते. मूळ माहितीत भर घातले जाणारे हे नवीन मुद्दे साधारणत: रिव्हर्स इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असण्याची शक्यताच जास्त असते. थोडक्यांत जुन्या आठवणींवर आणखीन एक घट्ट व भक्कम वीण घातली जाते. ती आठवण आणखीन धष्टपुष्ट होते. २. घडलेल्या घटनेची कोणतीही नोंद पुसली जाऊ नये किंवा ती आमूलाग्र बदलली जाऊ नये यासाठी काही एक यंत्रणा काम करत असते. याच कारणामुळे आठवणीतला कडवटपणा निघून जाईल असे (शुभचिंतन) जर आपण काही करायला लागलो तर त्याला सुरवातीला विरोध होतो. मात्र हा विरोध मावळेपर्यंत जर आपण प्रयत्न चालू ठेवले तर मात्र हे शुभचिंतनही स्वीकारले जाते व या आठवणींच्या जवळ साठवले जाते. पुन्हा जेव्हा ही आठवण होते, तेव्हा त्या आठवणीतील कडवटपणा बरोबरच हे शुभचिंतनही अंतर्भूत असल्याने ही आठवण सौम्य झालेली असते. तसेच नव्याने शुभचिंतन केले गेल्यास त्याला फारसा विरोध होत नाही. ते कुठे साठवायचे हा प्रश्न मागच्या वेळेसच निकालात निघालेला असतो. ३. सर्व नोंदींची प्रतवारी केलेली असते व सर्वात जास्त वेटेज असलेली आठवण सर्वात वर व त्याचपध्दतीने बाकीच्या आठवणी त्याखाली साठवलेल्या असतात. याच कारणामुळे एखादी सर्वोच्च अप्रिय घटना त्यात मिसळलेल्या शुभचिंतनाने जेव्हा सौम्य होते तेव्हा तिची प्रतवारी तात्काळ घसरते. थोड्यावेळाने त्या खाली असलेली दुसऱ्या क्रमांकाची अप्रिय घटना आपोआप वर येते. अशा रीतीने आपण आणखी आणखी भूतकाळात शिरायला लागतो. अशा रितीने भूतकाळातील जुन्या जुन्या आठवणी हळूहळू वर यायला लागतात. ४. वर सांगितलेला क्रम सदैव अद्ययावत केला जात असतो. एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर तिचा वापर वारंवार होणे साहजिकच असते. पण ; एखाद्या अप्रिय घटनेची जर बराच काळ उजळणी झाली नाही तर त्याची फेरप्रतवारी करण्याची गरज भासायला लागते. त्यामुळे ती आठवण परत स्मृतीतून किंवा जिथे कुठे साठवलेली असेल तिथून मनांत प्रक्षेपित केली जाते. या आठवणीबाबत, मनाच्या मिळालेल्या नवीन प्रतिक्रियेवरून मग तिचे फेरमुल्यांकन केले जाते व त्याप्रमाणे ती योग्य क्रमाने परत साठवली जाते. ५. या फेरप्रतवारी करण्याच्या अंतर्गत आवश्यकतेमुळे, एखादी जुनी आठवण अचानक आठवते व काही कारण नसताना आपल्याला हे मध्येच कसं काय आठवतंय? याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते. प्रत्यक्षात हीच वेळ असते या अप्रिय आठवणीवर हल्ला करण्याची. ६. कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते. त्यासाठी जिथे ही आठवण साठवलेली आहे तिथेच शुभचिंतन साठवले जावे हा आपला हेतू असायला लागतो. पण कोणती अप्रिय गोष्ट नक्की कुठे साठवलेली असते हेच आपल्याला नीट माहीत नसते. ७. त्यामुळेच अचानकपणे मनांत येणारी ही आठवण, म्हणजे जणू आपला एखादा लपलेला शत्रू बिळातून अचानक बाहेर आलेला असतो व तो परत बिळात लपायच्या आत त्याच्यावर हल्ला करायची संधी असते. इथे आपले शस्त्र असते शुभचिंतनाचे. आपल्या या शस्त्राचा वार झाल्यावर, हा शत्रू गोंधळून जातो व हा घाव अंगावर वागवत, जखमी होऊन परत मूळ जागी परततो. काही काळाने हा शत्रू आपली ओली जखम घेऊन परत मनात अवतीर्ण होतो. त्याची अपेक्षा असते, अशुभ चिंतनाच्या औषधाने आपण बरे होऊ. गमावलेली ताकद परत मिळवू. पण परत शुभचिंतनाचा हल्ला झाल्यास तो आणखीनच नाउमेद होतो. त्यांचा क्रमांक आणखीनच घसरतो व अप्रिय आठवणींच्या साठ्यामध्ये गलितगात्र व क्षीण होऊन आणखीनच तळाशी जातो. ८. या सर्व नोंदी आपल्यातच होत असतात. मग त्याला अंतर्मन म्हणा किंवा चित्त म्हणा किंवा अंतरंग म्हणा किंवा स्मृती म्हणा. कोणी त्याला मेंदू म्हणेल. साठवणीच्या जागेचे नाव काहीही असले तरी, ती जागा आपल्या शरीरातच कुढेतरी असते. थोडक्यांत कोणत्यातरी पेशींद्वारेच सगळे कार्य चालू असते. आपल्या शरीरातील पेशी म्हटल्यावर, त्या पेशींची भरणपोषणाची जबाबदारी आपण उचलत असतो हे मान्यच करायला लागते. त्यामुळे आपलेच नुकसान करणाऱ्या अशा अप्रिय गोष्टी व त्यांचा कडवटपणा टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रसंगी तो कडवटपणा वाढवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करणे हा किती आतबट्ट्याचा व्यवहार आहे याची कल्पना येईल. ९. पण जर या अप्रिय गोष्टींमधील कडवटपणा आपण सौम्य करू शकलो तर या साठ्याची वाढ होण्याचे ताबडतोब थांबते. अप्रिय व्यक्तींची मनातल्या मनात उजळणी करणे, त्यांना शिव्याशाप देणे, म्हणजे आपल्याच शरीरातील काही पेशी त्या अप्रिय व्यक्तीला आंदण देणे होय. इतकेच नव्हे तर त्यांची पालनपोषणाची जबाबदारी उचलणे व भविष्यांत त्यांना जागा पुरेनाशी झाली तर आणखी जागा उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यासारखे आहे. १०. जर घटना एकदा घडली व नोंदही एकदाच झाली तर सगळं ठीक चालले आहे असे म्हणता येईल. जी घटना प्रिय अथवा अप्रिय नाही अशा गोष्टीच्या बाबतीत असेच घडते. मात्र प्रिय व अप्रिय गोष्टी याला अपवाद असतात. ११. असे म्हटले जाते की, आपला केला गेलेला मान, सन्मान फार काळ लक्षात राहत नाही, पण आपला झालेला छोटासा अपमान शेवट पर्यंत लक्षात राहतो. आपली झालेली फसवणूक आपल्याला कायम त्रास देते. विशेष करून ज्याच्यावर आपण उपकार केलेले आहेत, त्याने जर त्या उपकाराची परतफेड अपकाराने केली असेल तर मात्र अशा घटना फार खोलवर घर करून राहतात. साधारणत: अशा घटना सात्त्विक संताप निर्माण करतात. तिथे फार फार जपायला लागते. अशा प्रसंगात या कडवट आठवणी किंवा त्यातील अप्रिय व्यक्ती अत्यंत वेगाने आपल्या शरीरातील जागा बळकावत असतात. स्मृती साठवणाऱ्या पेशी या खूप महत्त्वाच्या व दुर्मिळ समजल्या पाहिजेत. नेमक्या त्याच पेशी आपल्या शत्रूला देणे हा आपणच आपल्यासाठी केलेला घोर अपराध समजला पाहिजे. १२. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अप्रिय घटनेतील अप्रिय व्यक्ती आपल्याशी अयोग्य रितीने वागून आपल्या अंतर्मनात प्रथम जागा व्यापते. त्यानंतर मात्र त्या घटनेच्या प्रत्येक उजळणी बरोबर ह्या व्यापलेल्या जागेवर ही अप्रिय व्यक्ती इमारत बांधायला लागते. आपण जितक्या वेळेस उजळणी करू तितकी ही इमारत आणखी भक्कम व मोठी व्हायला लागते. साधारणत: प्रत्येक उजळणीत, आपण कसे बरोबर होतो व ती व्यक्ती कशी चूक होती हेच आपण आपल्यालाच समजावून सांगत असतो व वाढत्या श्रेणीत त्या व्यक्तीला शिव्याशाप देत असतो. आपल्याला असे वाटत असते की आपण देत असलेले हे सर्व शिव्याशाप कोठेतरी बाहेर जात आहेत. वास्तविक हे सर्व शिव्याशाप आपण आपल्याच शक्तीने आपल्यातच नोंदवून ठेवत असतो व आपले चित्त दूषित करत असतो. १३. आपण आपल्या जीवनात जे काही निर्णय घेत असतो, ते नेहमी आपण आपल्यात साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून घेत असतो. त्यामुळे आपण आपल्यात साठवत असलेली माहिती ही नेहमी सकारात्मक राहील याची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. १४. अप्रिय घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतच असतात. त्याची नोंद होणे अपरिहार्य असते. पण या नव्याने घडणाऱ्या अप्रिय घटनांची काही कारण नसताना उजळणी केली जाऊन या नोंदीची वाढ होणार नाही एवढेच आपल्या हातात असते. ते जर जमू शकले तर आपले चित्त नव्याने मलिन होऊ शकणार नाही. तसेच शुभचिंतनाचे हत्यार वापरून भूतकाळातील नकोशा किंवा नकारात्मक आठवणी सौम्य करून, तीही साफसफाई आपण करू शकतो. १५. नामस्मरणासारख्या किंवा इतर कोणत्याही अंतरंग शुद्ध करणाऱ्या पद्धतींमुळे मनाला सूक्ष्मता येते. त्यामुळे मन खूप संवेदनशील बनते. पण म्हणून विकार संपलेले नसतात. त्यामुळे त्यांचे उद्दीपन लवकर होते. त्यामुळे या जुन्या आठवणी जेव्हा जागृत होतात तेव्हा त्या मनाला पूर्वीपेक्षा खूपच जास्त ताकदीने व्यापतात. यामुळे बऱ्याच दिवसांची साधना खर्ची पडते. यासाठी साधनी माणसाने नेहमी या जुन्या आठवणींच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे. १६. प्रत्येक माणसात गुण व दोष दोन्हीही असतात. पण अप्रिय माणसांत फक्त दोषच आहेत अशी आपली भावना असते. ह्या अप्रिय माणसांबद्दल कलुषित झालेले आपले मन त्या माणसातील चांगले गुण टिपायलाही नकार देते. कोणी दाखवायचा प्रयत्न केला तरी त्यातही आपण नकळत खुसपटच काढत बसतो. पण हा नकारात्मक भाव गेल्यावर मात्र त्या माणसातले गुणही हळूहळू दिसायला लागतात. १७. माणूस जितका सज्जन असेल त्याप्रमाणात त्याने याबाबतीत सावध राहायला लागते. आपण सज्जन असल्याचा त्याने अभिमान बाळगला तर मात्र त्याच्या हातून नकोश्या घटनांची उजळणी फार मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता बळावते. त्यामुळे सज्जन माणसाला सर्वात जास्त दु:ख भोगायला लागते असे दिसून येते. यास्तव सज्जन माणसाने अशा आठवणीतून मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणावेसे वाटते.

वाचने 76187 वाचनखूण प्रतिक्रिया 145

शाम भागवत Mon, 07/06/2020 - 11:06
जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील.
लेखामधील हे वाक्य ठळक करायचे राहिलेय. ते कृपया ठळक करावे ही प्रशासकांना विनंती

लिहिण्यामागची तळमळही पोचली, तुमचा धागा वाचताना मनात काही ओळी उमटल्या पण कदाचित ते या धाग्यावर विषयांतर होईल असे वाटले म्हणुन वेगळा धागा काढला आहे https://www.misalpav.com/node/47151 पैजारबुवा,

सोत्रि Mon, 07/06/2020 - 12:06
मन आणि शरीर (Mind and matter) ह्यावरचं हे मिपावरचं सर्वोत्तम विवेचन आहे! जे काही #३ आणि ४ मधे सांगितले आहे ते ‘कर्मसंस्कार’ क्रियामाण कर्म. तेच पुढे जाऊन संचित होते.
कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते
. अप्रिय / प्रिय साठवणी (कर्मसंस्कार) नष्ट करता येतात. त्यांचं समूळ उच्चाटन म्हणजेच मुक्ती किंवा निर्मूलन म्हणजेच निर्वाण (निब्बान). किंबहूना ते करण्याचं मुक्त स्वातंत्र्य (फ्री वील) हेच आपल्या आयुष्याचं खरं उद्दीष्ट! अतिशय सशक्त लेखन!! - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत Mon, 07/06/2020 - 14:38
अप्रिय अथवा प्रिय आठवणी म्हणजे घडलेल्या घटना + त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार. त्यामुळे एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते. म्हणूनच प्रत्येकाचे जग वेगळे आहे असे म्हटले जाते. माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात. मात्र त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार कमी जास्त करता येतात. हे संस्कार प्रत्येक उजळणीत कसे वाढत जातात हे स्पष्ट करून मग ते संस्कार कमी कसे करता येतात ते सांगितले आहे. त्यानंतर “मी व माझे“ चे, हे संस्कार कमी करणे कसे साधायचे ते लिहिलेले आहे. मात्र वरील लेखात क्लिष्टता येऊ नये यासाठी “मी व माझे“ याचा बिलकूल उल्लेख झालेला नाही. मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय. असे होणे म्हणजेच त्या घटनांना साक्षीरूपाने आकळणे होय. तरीही आपल्या मतांचा आदर आहे. कारण मीही अजून शिकतोच आहे. _/\_

In reply to by शाम भागवत

कोहंसोहं१० Tue, 07/07/2020 - 00:23
"माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात" >>>>>>>>>>नाही येत. तसे झाल्यास मिपा वरच्या सर्वज्ञ व्यक्तीने मांडलेले मेमरी स्ट्रिंग्स बद्दलचे मत/संशोधन चुकीचे ठरेल (जे होणे शक्य नाही :)). या स्मृती नष्ट होत नाहीत म्हणूनच कधी कधी चुकून त्या अंतराळात रिलीज होतात आणि नवजात अभ्रकाच्या मेंदूमध्ये पेस्ट होतात आणि त्याला स्मृतींचे ज्ञान होते. आता हे अंतराळात रिलीज आणि पेस्टींग व्यक्तीच्या जीवनकाळात पण शक्य आहे कि केवळ गेल्यावरच शक्य आहे ते मिपावरचे आपले वस्तुनिष्ठ, निभ्रांत, आणि सर्वज्ञ शात्रज्ञच सांगू शकतील.

In reply to by शाम भागवत

सोत्रि Tue, 07/07/2020 - 04:48
मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय
भागवतजी, एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते हे तुम्ही म्हणालात ते एकदम चपखल आहे. कारण मी व माझेचे संस्कार त्या घटनेत अडकवून ठेवतात, त्या घटनेशी संलग्न करतात. मी व माझेचे संस्कार नाहीसे होणे हा अनात्म बोध आहे. ही पहिली पायरी आहे मुक्त होण्याची. पण अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय मनावरील प्रिय व अप्रिय संस्कारांचे पूर्ण निर्मूलन. मी व माझे ह्या अहंभावनेमुळेच सगळे विकार शांतता अनुभवू देत नाहीत. एकदा का अहंभाव गळून पडला की विकार गळून पडतात कारण त्यांना धरून ठेवणारा ‘मी’ गळून पडलेला असतो. माझ्या आकलनानुसार, आधि मी गळून पडणे तद्नंतर त्याच्याशी संलग्न असलेले समस्त विकार (संचित) गळून पडणे, हे दोन्ही झाल्यास मुक्ती किंवा निर्वाण! - (साधक) सोकाजी

आधारित हा निष्फळ प्रयोग आहे. अर्थात, मानसशास्त्राचा तुमचा अभास नाही हे तुम्ही लेखात कबूल केलं आहेच. तरीही या निमित्तानं अप्रिय स्मृतींशी कसं डील करायला हवं ते लिहितो. १. क्षमेच्या मेथडनं प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण होत नाही. नाईलाजामुळे वरुन मलम लावून अप्रिय आठवणींची धार काही काळ बोथट करण्याचा तो प्रकार आहे. २. ही मेथड व्यक्तीला भेकड करते. ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते. ३. तस्मात, प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन, नक्की काय आणि कोणाचं चुकलं हे पाहून, खालीले पैकी एक गोष्ट करणं श्रेयस आहे : अ) आपली चूक असेल तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून चूक कबूल करणं आणि पुन्हा ती होणार नाही याची खबरदारी घेणं ब) आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. (लेखात लिहिल्याप्रमाणे पिस्तुल वगैरे भावनिक प्रकार करुन नाही) अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत Mon, 07/06/2020 - 14:14
माझ्या अनुभवाशी जुळत नसल्याने असहमत. मात्र दुसऱ्यांचा अनुभव वेगळा असू शकतो याचेशी सहमत.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Mon, 07/06/2020 - 14:27
वस्तुनिष्ठ विश्लेषण
वस्तुनिष्ठतेत अडकणं म्हणजे मोह (अविद्या). त्यापलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
अप्रिय स्मृतींशी कसं डील करायचं
डील करणं म्हणजे परत मोह (अविद्या). अप्रिय स्मृतींच्या पलीकडे जाणं म्हणजे उलगडा!
भेकड, कोणाचं चुकलं
हे सापेक्ष आहे आणि पारिप्रेक्षानुसार असणं आहे त्यामुळे त्यांच्या पलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
३ अ आणि ब
लोकल गुंड (राजकिय सामर्थ्य असलेला) जेव्हा आपली जागा हडपतो तेव्हा अ आणि ब किती तकलादू असतात हे लक्षात घेऊन त्याला क्षमा करून मानसिक शांती आणि जीव टिकवणं हे कळणं हा उलगडा!
अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही
डील करणं हे निर्मूलन नाही हे कळणं म्हणजे उलगडा! - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

गवि Mon, 07/06/2020 - 14:30
संक्षी, मुद्दे पटण्यासारखे आहेतच, पण श्री भागवत यांना मिळालेला मार्ग, कसाही असला तरी, it has worked, हे लक्षात घेतल्यास त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही.
ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते.
हा मुद्दा सर्वाधिक चपखल आहे. मला वाटतं या केसमध्ये सध्या नव्याने त्रास देणं चालू नसू शकेल (म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे). अशा वेळी वाईट चिंतणे, तळतळाट होणे या प्रकारापेक्षा तुलनेत शांत वाटेल असा उपाय स्वतःपुरता सापडला असेल तर तो योग्य म्हणावा लागेल. पुन्हा पुन्हा नव्याने त्रास देणाऱ्या कोणाबाबत मधल्या काळात हा उपाय योग्य नव्हे हे तुमचं म्हणणं मान्य. तिथे विशिष्ट सहनशक्ती पार होताच कायदेशीर उपाय बरा. किंवा दुर्लक्ष.

In reply to by गवि

शाम भागवत Mon, 07/06/2020 - 15:29
(म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे).
गवि, तुम्हाला माझा मुद्दा बरोबर कळलाय. सगळं काही फार पूर्वीच संपलंय. तरीही आठवण येताच त्रास होतोय, अशाच स्मृतिंबद्दल बोलतोय. त्या अप्रिय घटनेतील अप्रिय माणसाशी मुकाबला झालेला असू शकतो. प्रसंगी विजयही मिळालेला असतो. पण तरीही वेळ, पैसा गेलेला असतो. किंवा विनाकारण मनस्तापही झालेला असतो. त्यामुळे विजय मिळवूनही, जेव्हां ती घटना आठवते तेव्हां तेव्हां शिव्याशापच तोंडात येतात. यावरही हा उत्तम उपाय आहे. पण नामस्मरण करणारा माणूस भेकडच असतो अशी समजूत असणऱ्यांशी...... ओ शामराव, वाहवत चाललाय हं तुम्ही. तुमचं म्हणणं मांडून झालंय तेव्हां थांबायला काही हरकत नाही. काय? कळलं का? (मोठ्ठा) हो. :)

In reply to by शाम भागवत

आनन्दा Mon, 07/06/2020 - 15:44
तुम्ही अजूनही सर्वज्ञानींशी वाद घालताय? आधी क्षमा मागून मोकळे व्हा बघु, नाहीतर पुन्हा कोणत्यातरी पहाटे आठवेल! :)

In reply to by आनन्दा

शाम भागवत Mon, 07/06/2020 - 15:58
आनंदा, :))) नाही, आता नाही तसं होतं. संक्षींबद्दल अजिबात राग वगैरे नाहीये. शिव्या शाप तर फारच लांब. ते त्यांच्या विचाराने वागतात बोलतात. बस्स् एवढेच फक्त मनात शिल्लक राहते. तरीपण मी अजून परिपूर्ण नसल्याने सावधगिरी बाळगायलाच लागते. माझ्याकडून नकळत ती कशी बाळगली जाते, त्याचा फक्त नमुना पेश केला. :) हा सर्व लेख क्षमा करण्याबाबतचा नाहीये. मी कोणालाही क्षमा वगैरे काहीही केलेली नाही. मी फक्त माझा स्वार्थ पाहिलाय. माझ्याच स्मृतींच्या पेशी कोणितरी बळकावल्या होत्या, त्या मी परत मिळवतोय इतकेच. ज्यांचे भले चिंतीतोय त्यांचे खरोखरच काय होतंय ह्याच्याशी माझा खरोखरच संबंध नाहीये. हे सगळे शब्दांत सांगणे अवघड आहे. पण तरीही प्रयत्न केलाय.

In reply to by शाम भागवत

राघव Tue, 07/07/2020 - 10:49
एक सुभाषित आठवले हा प्रतिसाद वाचून - क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । क्षमा वशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥ अर्थात् क्षमा करणं म्हणजे कर्तव्य न करणं होऊ शकत नाही. आपल्या घरावर चाल करून आलेल्या शत्रूला फोडून काढणं, हे कर्तव्य. आणि त्यातून झालेल्या हानीतून स्वतःचं मन मोकळं करणं, ही क्षमा. दोन्ही मनापासून झालं तर ती श्रीकृष्णांची वृत्ती ठरते! :-)

In reply to by गवि

> त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही. हा तात्विक बेसिस नाही ! हे प्युअर मानसशास्र आहे. it has worked ? असंभव ! मॅटर अजून तसाच आहे आणि परत केंव्हा उसळी मारेल, (या बाजूनं किंवा त्या बाजूनं), काही नेम नाही. पाहा : यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता. > थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे. अशाप्रकारे क्षमा ही ज्याची काही चूक नाही आणि अपराध केलेला, तो उमजून माफी मागायला आला, तर (बदल्याचा चान्स असूनही) मॅटर संपवण्याच्या दृष्टीनं केलेला समंजसपणा असेल, तर त्याला काही तरी अर्थ आहे. अन्यथा हा सगळा बोगस प्रकार आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

केवळ आपला मुद्दा व्यवस्थित समजावा म्हणून प्रतिसाद लिहीत आहे. आपंण म्हणता की :- आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. समजा मी फुटपाथ वरुन चालत चाललो आहे, आणि समोरुन एक भरधाव बाईकस्वार येउन मला धडक मारुन गेला. मला बाजुला व्हायची संधीच मिळाली नाही. मी जखमी झालो आणि बाजुला पडलो. रात्रीचा अंधार असल्याने त्या बाईक चा नंबर कोणी पाहिला नाही आणि तो मनुष्य पळून गेला. (यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत) माझा मीच धडपडत उठलो, डॉक्टर कडे गेलो आणि उपचार घेउन घरी गेलो. यात माझी कुठे काही चुक झाली असावी आहे असे मला वाटत नाही. तर अशा परिस्थितीत मी कोणता वैध मार्ग निवडुन माझ्या मनाला होणारे क्लेश दूर करु? मी प्रत्येक वेळी त्या फुटपाथ वरुन चालू लागलो की मला ती घटना आठवतेच. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आणि लेखनाचा विषय पूर्णतः वेगळे आहेत. ज्या प्रसंगात समोर व्यक्तीच नाही (किंवा आयडेंटीफाय होणार नाही) तिथे नशीबाला दोष देणं हा सुद्धा वेडगळपणा आहे. १. अ‍ॅक्सिडेंटच्या केसमधे पोलिस कंप्लेंट लॉज करणं (मेडी-क्लेमसाठी) गरजेचं आहे आणि प्रसंगाचा अजिबात अ‍ॅनॅलिससस न करता उपचार घेऊन बरं होणं श्रेयस आहे. २. थोडा विचार केलात तर अगदी सेम केस करोना बाधितांच्याबाबतीत होईल

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शाम भागवत Mon, 07/06/2020 - 18:08
यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत
ज्ञानोबाचे पैजार, अरे बापरे, खरे की काय? जगदंब. माझ्या अनुभवावरून सांगतो. चिडचीड होतेच. खरतर जेव्हां कधी अशा प्रकारची आठवण येते तेव्हा त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला काहीतरी होऊन शिक्षा व्हावी अशाच प्रकारचा विचार माझ्या मनात यायचा. कित्येकवेळेस तर मी मनातल्या मनात तो प्रसंग परत घडवून त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे. :))) पण शुभ चिंतनाच्या साहाय्याने मी अशा अनोळखी व्यक्तिंवरही मात करू शकलो आहे. “होतं असं कधीकधी“ अशा प्रकारचा काहीसा भाव मनात येऊन मन शांत होते. अर्ध्या एक सेकंदात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात मन मोकळं झालेलं असतं. म्हणजे एकाबाजूने आठवण येते, तर दुसऱ्या बाजूने प्रतिक्षिप्त क्रियेसारखी ती झटकूनही टाकली जाते. पूर्वी अशा प्रकारच्या आठवणी मनात आल्यावर त्या शमायला बराच वेळ लागायचा. कोणाला पटो अथवा न पटो. मला फायदा झाला म्हणून इथे मांडलं. ज्याला पाहिजे तो घेईल, अन्यथा इथेच राहील. :)

In reply to by शाम भागवत

त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे ? असल्या सॅडिस्ट प्रकारामुळेच, त्यावर उतारा म्हणून क्षमापनेसारखा दुसरा बाष्कळ उपाय करावा लागतो !

मी आधीच सांगितल्या प्रमाणे - अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा ! आपण उगाचच आयुष्याला अनावष्यक गांभीर्याने हाताळत आहोत, विनाकारण कॉम्प्लिकेटेड करुन टाकलं आहे सगळं . येवढं सीरीयसली घेऊ नका , झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे ! जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! हे सगळं बोलायला सोप्पे अन करायला अवघड , अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! तिकडे अमेरिकेत लोकांना अक्कल यायला लागलीय, अख्ख्या कॅनडाने लिगलाईझ केलाय , तसेच अमेर्तिकेतील अनेक राज्यांनीही केलाय ! आपल्याला कधी अक्कल येणार देव जाणे ! असो. शिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीला होतो तेव्हा आमचे हॉस्टेल मेसचे शेफ पांडेजी, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वहस्ते पाट्यावरवंट्यावर गांजा वाटुन , अन मस्त काजु बेदाणे ड्रायफ्रुट्र्स घालुन घट्ट दुधात भांग उर्फ विजया बनवली होती ते आठवले. दुसर्‍या दिवशी जी अवस्था होती ती अक्षरशः अवर्णानीय होती !! लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Mon, 07/06/2020 - 15:46
नको रे बाबा. सध्या विजय द्रव्य प्यालेले एक सद्ग्रुहस्थ पाहत आहे.. त्यांचे चाळे पाहिल्यानंतर गांजाच नव्हे, तर एकूण नशा या विषयाबद्दल जरा भीतीच वाटायला लागली आहे.

In reply to by आनन्दा

हीच चुक अनेक लोकं करताहेत . एखाददुसरे टोकाचे उदाहरण पाहुन वाईट मत बनवणे . अहो गांजा चे सोडा , आपली साधी साखर अतिप्रमाणात खल्ली तरी दुष्परिणाम होणारच की ! डायबेटीस झालेल्या एका व्यक्तीचे हाल अतिषय जवळुन पाहिले आहेत मी पण मग म्हणुन काय आपण साखर बॅन करतो का ? मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Mon, 07/06/2020 - 16:13
तुम्हाला माझ्या प्रतिसादाचा रोख कळला नाही.. असो. तुमच्या बोलण्याशी संबंधित नव्हता. काही विशिष्ट सद्गृहस्थांना उद्देशून होते ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वतःच्या बुद्धीमत्तेवर आणि तर्कसंगत विचारसरणीवर भरोसा नसणं आणि मानसशास्त्राची अजिबात जाण नसणं या दोन गोष्टी व्यक्तीला व्यसनाकडे वळवतात. तुम्ही मागे मला विचारलं होतं की मी कुठली ती दारु घेतलीये का ? आता स्वतःला विचारुन पाहा : स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?

In reply to by संजय क्षीरसागर

अहो भाग्यम !! अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना की तुमच्या लेखी माझा मताला काडीची किंमत नाही , मग कशाला किंमत देताय माझ्या प्रतिसादांना =)))) बाकी ते आयाहुअस्च्का आहे हो आयाहुअस्च्का , दारु म्हणुन अपमान करु नका =)))) ही मीही पिली नाहीये अजुन, आणि पिण्याचा काही योगही दिसत नाही, ती केवळ उपमा म्हणुन वापरलेली . त्याचा रोख असा होता की " ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?"
स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?
मी स्वच्छंदपणे जगतो, ते निर्भ्रांत की की म्हणतात तसे मन अन त्याच्गी सजगता वाढवणे अन त्याला कह्यात आणणे असले सव्यापसव्य करायचे दिवस संपले कधीच ! तुम्हीच तुमच्याच कुठल्यातरी लेखात लिहिलं होतं की - समोर जे जसं आहे ते तसं स्विकारणे हा ह्या सगळ्यातुन बाहेर पडण्याचा सोप्पा मार्ग आहे ! ( तुम्ही म्हणाला नसलात तर लगेच मी कॉपीराईट घेऊन टाकतो ;) ) सो हे आहे हे इतकं सोप्पं आहे . Just accept it as it is and you are done. ! पण म्हणुन मी खंडनमंडन करुन इतरांची मते खोडीत काढत बसणे असे उपद्व्यापही करत नाही , आहे हे असं आहे, जो तो आपापल्या मार्गाने चालला आहे आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! बरं बाकी ते व्यसन व्यसन म्हणताय म्हणुन एक प्रश्न विचारतो : तुम्ही कधीतरी भांग पिलि आहे का ? काही स्वानुभव आहे की नुसतेच आपले इतर लोकं व्यसन व्यसन म्हणुन बोंबलतात म्हणुन तुम्हीही तेच करताय ? =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

> काडीची किंमत नाही अर्थात, कारण गांजा मारणं हा त्रासदायक स्मृतींपासून सुटकेचा मार्ग नाही. १. > ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ? गांजा मारणार्‍यांची मनोदशा बघितली की सूज्ञ व्यक्तीला परिणाम कळतात. अनुभव घेण्याची गरजच नाही. २. > आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

तिकडे कॅनडात , कॅलिफोर्नियात , इन जनरल वेस्ट कोस्ट वर संपुर्ण लीगल झालाय , तिकडे सगळे यझ लोकं आहेत आणि मीच एकटा सुज्ञ असे तुमचे मत आहे की काय ? तुम्हाला सीबीडी ऑइल आणि टी एच सी आणि अन्य कित्येक कॅनाबनॉईड्स वर चाललेल्या संशोधनाचे दुवे देऊ शकतो पण तुमची वृत्ती " जे मला माहीत नाही ते सगळंच खोटं " अशी असल्याने काहीही उपयोग होणार नाही =)))) "आपल्या मर्यादित अनुभवविश्वाच्या पलीकडे आणि आकलन क्षमतेच्या परेही जग असु शकते" हा एकदा तरी विचार करुन पहा राव , थोडी तरी झिंग उतरेल, सारखंच काय हाय रहायचं स्वमतांधतेच्या नशेत =))))
मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?
मला टायपिंग करायला आवडतं म्हणुन =)))) तुम्ही किंवा अन्य कोणीही गांजा स्विकारला काय किंव्वा धिक्करला काय मला शष्प फरक पडत नाही. लोल्स =)))) तुम्ही आहात हे असेच आहात , कायम मीच कसा योग्य असे प्रतिसाद टाकत रहाणारे ही फॅक्टय आणि मी त्याची बेशर्त स्वीकृती केली असल्याने मी ह्या सगळ्यातुन बाहेर पडलो आहे ! आता माझा संपुर्ण मिपावावर केवळ मजेसाठी आहे ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे Wed, 07/08/2020 - 19:42
@मार्कस ऑरेलियस ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?" हे म्हणजे पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच नये. गांजा मध्ये तसे पाहिले तर फार वाईट आहे असे नाही. परंतु बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो. स्वतःवर पूर्ण ताबा असण्याबद्दल फाजील आत्मविश्वास असणाऱ्या अनेक व्यक्ती नंतर व्यसनांना ( यात दारू, चरस कोकेन हेरॉईन सर्व येतं) का बळी पडतात याचा वैद्यकीय कार्यकारण भाव जोवर समजत नाही तोवर समंजस व्यक्तींनी त्यापासून दूर राहावे असाच वैद्यकीय तज्ज्ञ सल्ला देतात. माझा पूर्ण ताबा आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीत आणि उंच इमारतीच्या छ्ज्यावर उभे राहून सेल्फी घेणाऱया व्यक्ती यात फारसा फरक नाही. बाकी चरस किंवा गांजावर( त्याचे तेवढे ADDICTION POTENTIAL नाही म्हणून) बंदी असावी कि नाही हा विषय साफ वेगळा आहे.

In reply to by सुबोध खरे

सर्वप्रथम तर्कशुध्द खंडन केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद. ह्याविशयावर आपली आधीही चर्चा झाल्याचे स्मरते पण नक्की काय बोललेलो ते आठवत नाही म्हणुन काही प्रश्न परत विचारत आहे :
पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच न
>>> स्त्रीरोग असे काही नसतेच , नसती बायकांची नाटकं , किंव्वा एड्स ही एक काल्पनिक बिमारी आहे अशा अर्थाची विधाने चालतील का? मी अमेरिकेत / न्युयॉर्क मध्ये होतो तेव्हा गांज्याच्या लीगलायझेशन आणि आणि बॅन्निंग बाबतच्या चर्चेत दोन्ही बाजुंनी व्यवस्थित लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स ऐकली आहेत. त्याला ना कधीच नाही ! ़कअ‍ॅलिफोर्निया आणि कॅनडात रीतसर लोकशाही मार्गाने चर्चा वादविवाद होऊन गांजा रीतसर लीगल झालेला आहे तसाच तो आपल्या देशातही व्हावा हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही माझ्या मताचे खंडन करायला स्वतंत्र आहात , पण मी मतच व्यक्त करु नये असे म्हणायला तुम्ही स्वतंत्र नाही.
बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो.
ह्या विधानाला आपण सबळ सांख्यकीय पुरावा द्या किंव्वा कोणत्याही प्रसिध्द विद्यापीठात प्रकाशित झालेल्या संशोधनाचा पुरावा द्या . आणि हो ते प्रेसिडेंट निक्सनच्या काळातील नसावे ही अट आहे ! शक्य तितके आधुनिक संशोधन असावे. आपले विधान पुराव्याने शाबित झाल्यास मी माझे विधान बदलुन हे असे "गांजा हे स्टेप अप ड्रग आहे आणि मेडीकल प्रिस्क्रिप्शन्शिवाय घेऊ नये" विधान करत जाईन. आणि पुराव्याने शाबित न झाल्यास - तुम्हीही तुमचे विधान रीफ्रेज कराल अशी आशा आहे. बाकी सीबीडी ह्या मुख्य कॅनाबनॉईड्चे मेडीकल उपयोग डॉक्टर असल्याने तुम्हाला माहीत असतीलच. पण केवळ फार्मासुटीकल कंपन्या तुम्हाला सीबीडी ऑईल चे प्रिस्क्रिप्शन लिहायला "बेनिफिट्स" देत नाहीत तोवर प्रिस्क्रिप्शन लिहिणार नाही असा तुमचा दृष्टीकोन नसेल अशी भाबडी आशा आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे गुरुवार, 07/09/2020 - 11:12
Conclusion: A large proportion of individuals who use cannabis go on to use other illegal drugs. The increased risk of progression from cannabis use to other illicit drugs use among individuals with mental disorders underscores the importance of considering the benefits and adverse effects of changes in cannabis regulations and of developing prevention and treatment strategies directed at curtailing cannabis use in these populations. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/25168081/ .Lifetime cumulative probability estimates indicated that 44.7% of individuals with lifetime cannabis use progressed to other illicit drug use at some time in their lives. Several sociodemographic characteristics, internalizing and externalizing psychiatric disorders and indicators of substance use severity predicted progression from cannabis use to other illicit drugs use. https://europepmc.org/article/pmc/pmc4291295 marijuana use during pregnancy is linked to lower birth weight and increased risk of both brain and behavioral problems in babies. If a pregnant woman uses marijuana, the drug may affect certain developing parts of the fetus's brain. Children exposed to marijuana in the womb have an increased risk of problems with attention, memory, and problem solving compared to unexposed children. Some research also suggests that moderate amounts of THC are excreted into the breast milk of nursing mothers. With regular use, THC can reach amounts in breast milk that could affect the baby's developing brain https://d14rmgtrwzf5a.cloudfront.net/sites/default/files/drugfacts-marijuana.pdf बाकी भांग हि भारतात काही राज्यात कायदेशीर आहे आणि काही नाही. जर दारू सिगरेट (बिडी किंवा तंबाखू) कायदेशीर आहेत तर भांग चरस गांजा कायदेशीर का नसावे हा प्रश्न वेगळा आहे. मी दारू तंबाखू किंवा चरस यातील कशाचेच समर्थन करीत नाही

In reply to by सुबोध खरे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/09/2020 - 11:27
पहिल्या दोन लिंक महत्वाच्या वाटतात त्या तपासुन पहातो. आमच्या कॅलिफोर्नियातील मित्राला विचारुन पहातो की कॅलिफोर्नियाने ह्या मुद्द्यांवर काय मते मांडली आहेत ते! बाकी तीसर्‍या लिंक बाबत मतभेद नाहीच. त्याला पास. धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण Mon, 07/06/2020 - 18:09
अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! संस्कृतप्रभुंच्या टंकन सामर्थ्यातुन गांजा महात्म्य लिहले गेल्यामुळे मला खालील व्हिडियो आठवला ! P1 बाकी अजुन काही ओळी याच गांजा महात्म्यामु़ळे आठवणीस आल्या... अकाल मृत्यु वह मरे जो काम करे चांडाल का काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi

In reply to by मदनबाण

मदनबाण राव , तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण Tue, 07/07/2020 - 12:50
तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? हो. गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;) खी खी खी ;) उत्तराखंड मध्ये कायदेशिर रित्या शेती करण्यास परवानगी आहे, मला वाटतं काही इतरही राज्यात याची परवानगी आहे. कोरोनावर या वनस्पतीतुन काही औषध मिळते का ? ते सरकार ने आणि इतर संस्था ज्या करोनावर औषध बनवण्याच्या प्रयत्नात आहे त्यांनी संशोधन करुन पहायला हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 07/07/2020 - 12:57
वरील प्रतिसाद लिहल्यावर सहज जालावर शोध घेण्याची लहर आली आणि काही बातम्या दिसल्या ! Jamaican scientist waits approval for ganja-based coronavirus drug Cannabis May Reduce Deadly COVID-19 Lung Inflammation: Researchers Explain Why

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 07/07/2020 - 13:15
झाडाची नर प्रजाती म्हणजे भांग आणि मादा प्रजाती म्हणजे गांजा. गांजात THC [ tetrahydrocannabinol ] चे प्रमाण भांगे पेक्षा जास्त असते. भांग म्हणजे फक्त पानांचा चुरा तर गांजा म्हणजे झाडाची फुले,पाने आणि मुळ यांचे संमिश्रण.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही गांजावर निबंध लिहीलाय कि लेखकांना त्रासदायक आठवणींपासून सुटका होण्यासाठी आयडिया देताय ते क्लिअर करा. एकीकडे म्हणताय गांजा लीगल नाही आणि दुसरीकडे तेच काम करायचा फ्रेंडली सल्ला देताय. तुम्ही गांजा बाळगता का ? आणि आल्या आठवणी तर गांजा मारता का ? वरचं सगळं फक्त आधीच्या गांजाच्या आठवणीतुन लिहिलेलं दिसतंय. आणि तुम्ही जर असं वागताय, >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! - ही समबुद्धी गांजा हे औषध म्हणून वापरल्याने डेवलप होते का तेवढं स्पष्ट करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

म्हणण्यापेक्षा मी ठाम आहे, कि गांजा ही सुटका होउ शकत नाही (मी मारुन बघितलाय, कॅलिफोर्नियातच) तुमच्या, आणि माझ्याही आवडीचा एकच विषय अध्यात्म हेच एकमेव सोल्युशन आहे आणि ते व्यसन नाही. मार्कस ऑरेलियस किंवा अ‍ॅरिस्टॉटल गांजा मारा असं म्हणणार नाहीत. फक्त सांयटीफिक दृष्टिकोन ,शोधवृत्ती किंवा वृत्तीचा शोध महत्वाचा आहे. सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास !

In reply to by उन्मेष दिक्षीत

छन छन तुम्ही ठाम आहात हे उत्तम , बरं आता माझे प्रतिसाद नीट वाचा आणि सांगा त्यात कुठेतरी असे मी तुमच्या मानगुटीवर बसलोय अन "घे घे मारच कश गांजाचा पी पी" असे म्हणतोय असे दिसत आहे का ? किमान मला तरी दिसत नाही. मी तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर करतो , तुम्हाला नाही प्यायचा गांजा नका पिऊ ना भाऊ कोणी सक्ती केली आहे का ? आमचा काही हट्ट नाही ! तुम्हाला दुसर्‍यांच्या मतभिन्नतेचा स्विकार का करता येत नाही? कारण शोधायचं आहे? , खरेच उत्स्तुकता आहे ? तर तुमचा प्रतिसाद नीट वाचा आणि त्यातील ह्या शब्दांवर लक्ष द्या - एकमेव ... अंतीम हे दोन्ही शब्द मध्यपुर्वेतील वाळवंटी धर्मांचे प्रतीक आहेत , आम्ही म्हणतो तोच एक देव अन अमुक तमुकच एक त्याचा शेवटचा मेसेंजर ही वृत्ती तुम्हाला हिंदु तत्वज्ञानात तरी कुठेच दिसणार नाही ! अगदी नासदीय सुक्तातही - "एक विश्वनिर्माताच ह्या जगाचे खरे रहस्य जाणतो" अशा अर्थाच्या श्लोकानंतर लगेच "किंव्व कदाचित तोही जाणत नाही" अशा अर्थाचा श्लोक आहे ! इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न। यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अंग वेद यदि वा न वेद ॥७॥ एकं सत विप्रा बहुधा वदन्ति . सत्य एक आहे पण त्यात कुठेही मी म्हणतो च एकमेव किंव्वा अंतीम असा अर्थ नाही, त्याला भिन्न लोकं भिन्न नावाने ओळखतात. पण एक मान्य की ह्या "मी म्हणतो तेच एकमेव सत्य अन हाच अंतीम मार्ग " ह्या विचाराची नशा जालीम असते , नुसता जगभर हैदोस घातलाय ह्या वृत्तीच्या लोकांनी . आजही चालु आहे ! मिपाही काही त्याला अफवाद नाही . असो. चालायंचेच . मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचे नाहीये , तुम्ही ठाम आहात ना की गांजा उत्तर होऊ शकत नाही , मग झालं तर की ! नका पिऊ गांजा,. तुमच्यावर सक्ती करायला माझ्याकडे वेळ, हौस आणि पैसाही नाही ! मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मनसोक्त आस्वाद घेत अत्यंत मोकळे पणाने माझी मते मांडतो , त्याला काहीही "ग्रेटर परपज" वगैरे नाही !
सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस !
तुमचं माहीत नाही पण मी तरी आता काहीही शोधत नाहीये . कारण मुळातच काहीतरी शोधायचे आहे हा विचारच भ्रांती आहे , जे आहे हे असं आहे, इथे आहे अत्त्ता आहे, काहीही शोधाशोध ही व्यर्थ आहे ! आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ :) शुभं भवतु !

In reply to by प्रसाद गोडबोले

वगैरे राहु दे. >>अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा हे तुम्हीच लिहिलंय, प्रश्न गांजा कुणी मारावा की नाही हा नाही. तो उपाय कसा होउ शकतो, म्हणजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा. आणि तो अमलात आणण्यासाठी आणि अंमलाखाली येण्यासाठी रोज ( म्हणजे Daily, Flavor नव्हे ) Marijuana ही ट्रिटमेंट आहे का ते सांगा कारण अशा आठवणी केव्हाही अचानक जागृत होतात. शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ? (त्यासाठी त्यांनी काय केले ते लिहिले आहेच) तुमच्या पूर्वग्रह या प्रश्नांला मी माझं उत्तर दिलेलं आहे, आता माझ्या वरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची कि नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि मत-स्वातंत्र्याचा विषय, तर मी समजा मत मांडले कि इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल कामे हा त्यावर उपाय आहे, बिन्धास्त करा, तर ते मतस्वातंत्र्य किंवा त्यात मतभिन्नता वगैरे होऊ शकत नाही.

In reply to by उन्मेष दिक्षीत

ते वाळवंटी धर्म वगैरे राहु दे.
अहो राहु दे कसं , तीच तर तुमची मुळ वृत्ती आहे, मी म्हणतो तेच एकमेव सत्य बाकीचे सगळं जहीयत ! होय की नै ?
णजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा.
हे म्हणजे साखर खल्ल्याने तोंडात गोड चव कशी निर्माण होते सांगा असला टाईपचा प्रश्न आहे . सर्वात पहिलं म्हणजे मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये. समजा मी दिलेच तुम्हाला पटवुन तर तुम्ही सुरु करणार आहात का गांजा ? नाही ना , मग कशाला आल्यात नसत्या चौकशा . मी फुकट सल्ला दिलाय की गांजा प्या , हवा अस्ल्यास घ्या नाही तर सोडा. ( सोडा म्हणजे लीव्ह बरं का, कार्बोनेटेड वॉटर नव्हे ) . तुम्हाला खरेच मनापासुन अगदीच उत्सुकता आहे तर सरळ गुगल वर सर्च करुन पहा ना सीबीडी चे उपयोग ! मी काही आयुर्वेदीक पुतकांचे आणि कॅनाबनॉईड्स्च्या वरील सायंटिफिक संशोधनाचे पुरावे देऊ शकतो, अर्थात सारे नेट वर आहेच !
शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ?
तुम्हाला लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का संक्षी सरांनी ? मी केवळ एक उपाय सुचवला आहे , आता तो श्यामजींना पटला तर ते पहाटे चार काय तर केव्हाही गांजा आणतील शोधुन किंव्वा सरळ मलाना मध्ये जाऊन रहातील किंव्वा कॅनडा मध्ये जाऊन सरळ घरातच शेती करतील गांजाची . त्यांचे ते बघतील ना ? तुम्ही का येवढा लोड घेताय ? आणि त्यांना घ्यायचाच नसेल तर ?? परत तेच . मी आधीच लिहिलंय की मी कोणावरही सक्ती केली आहे का ? ज्याला घ्यायचाय तो घेईल , नाही घ्यायचा तो नाही घेणार !
नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर
नाही हे अवांतर मुळीच नाही . एकदा स्वतःच्या एककल्ली " मी म्हणतो तेच खरे" ह्या वृत्तीचे वृत्तीची चिकित्सा करुन पहा . ते अध्यात्म अध्यात्म म्हणाता ना ते सगळं नंतर येते. आधी बालवाडी पास करा , पी.एच. डी चे नंतर बघु. कारण कसं आहे की एकदा "मी म्हणतो तेच खरे" ही टोकाची वृत्ती स्विकारली तर वाळवंटी धर्म तुम्हाला नक्कीच सोयीचे पडतील निराकार की काय व्हायला . कारण सोप्पं आहे, डोकं वापरायचंच नाही , अन गुगलही नाही अभ्यास करायचा नाही अन चिकित्साही नाही ! नुसतं मी म्हणतो तेच खरे हा हेका धरत रहायचा सतत ! की झालीच सर्वज्ञता प्राप्त. हाकानाका =)))) (आम्हीही निराकार गुर्देवांच्याकडुनच शिकलो आहे ही डॉक्टराईन . ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अन त्याच गावाचा गांजा ;) )
इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल
अभ्यास वाढवा हो अभ्यास वाढवा ! कॅनडा अमेरिका सोडा भारतातील हिमाचल उत्तराखंड , पंजाब , गुजरात मध्यप्रदेश वगैरे भागात अगदी लीगल आहे सगळं. नॉर्थ ईस्ट मधील सेव्हन सिस्टर्स, बंगाल पंजाब मध्ये पोलिसही दुर्लक्ष करतात . उज्जैन मध्ये महाकालमंदिरासमोर अप्रतिम भांगेचे दुकान आहे. सगळं लीगल ! गोव्यामध्ये मेन्युकार्ड सोबत वेटर आमच्यापुढे गांजाचे पाकिटही घेऊन आलेला की साहेब काय हवे का वगैरे! बाकीच्या राज्यातही ही बंदी अन इन्फोर्स्ड आहे . ( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) इच्छा तिथे मार्ग हे लक्षात ठेवा ... जमलं तर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Tue, 07/07/2020 - 19:01
ॐ शां ती ॐ धागा खूपच उजवीकडे गेला तर कसं दिसेल ते तपासत होतो. चांगलं दिसतंय की. :) देव्यपराधक्षमापन स्तोत्राच्या धाग्याप्रमाणे ह्या धाग्याची पण प्रशासकांना स्वच्छता करायला लागणार असं दिसायला लागलंय. म्हणून हा प्रयोग करून पाहिला. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही गांजा हा मेडिकली घ्यायला सांगताय का ? >>लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;) >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! -- याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय. कारण समबुद्धी आपणच आणली कि झालं असं तुम्हीच म्हटलंय, म्हणून तर मी पहिल्याच प्रतिसादात सरळ विचारलं होतं कि गांजा मारल्याने किंवा मेडिकली वापरल्याने ही समबुद्धी डेवलप होते का ? त्याचं हो किंवा नाही असं उत्तर नाहीच. >> मी केवळ एक उपाय सुचवला आहे >>मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. -- याचा अर्थ तुमच्या ऑनलाइन स्टडीतून तुम्हाला कळलेलं आहे कि गांजामुळे असे अचानक होणारे त्रास कमी होतात आणि माणुस स्टेबल आणि स्टेडी बनतो. पहिल्या प्रतिसादात किंवा शोध निबंधात तर असं एकही वाक्य दिसलं नाही हो कि कसा उपयोगी आहे, किती प्रमाणात किती वेळा सेवन करावा. तो फक्त बॅन कसा आहे आणि भांग कशी बनवली होती एवढच काय ते आहे. >>( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) ज्यांना तुम्ही सल्ला देताय ते महराष्ट्रात राहतात आणि ते गांजा पीत नाहीत असं मी गृहीत धरतो, त्यांच्यासाठी ते इम्प्रॅक्टिकल नाही का ? आणि नसेलही तरी मग तुमचा आता सल्ला ऐकुन गांजा सुरु करतील का ते विचारा त्यांनाच, नाहीतर शुभचिंतन वगैरे कशाला केलं असतं त्यांनी ? ज्याचा त्यांना ऑलरेडी फायदा झालाय आणि त्यांनी आता मी काय करु असं विचारलेलं नसतानाही तुम्ही फक्त आणि फक्त गांजाला कुठून तरी असंबद्ध पणे मधे आणलेलं आहे एवढंच. पोलिस चिरिमिरी घेउन दुर्लक्ष करतात असं एक बेजबाबदार वाक्य सार्वजनीक ठिकाणी लिहिलंय आणि इतकीही समज नाही कि म्हणून बॅन्ड गोष्ट लिगल होत नाही ते? कधीतरी पोलिसांसमोर ट्राय करा गांजा जिथे बॅन आहे तिथे आणि मग मारू आपण प्रॅक्टीकॅलिटीच्या गफ्फा. >>लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का जसे तुम्ही माझ्या मानगुटीवर बसला नाहीत ना कि गांजा पी मार कश, तसे ते ही म्हणाले नाहीत कि माझ्याकडून धडे घे. जिथून घ्यायचे तिथून ते मी घेतोच. याचा अर्थ तुम्ही मान्य केलंय कि संक्षी कायम लॉजिकली एकदम करेक्ट बोलतात आणि जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय !

In reply to by उन्मेष दिक्षीत

जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय
>>> खतरनाक ! मग काय आता , जितं मया जितं मया का ? =)))) माझेच काय , अहो अख्ख्या दुनियेने जिथे जिथे संक्षी सरांशी अर्ग्युमेन्ट्स केलीत तिथे तिथे अख्खी दुनियेचे लॉजिक गंडले आहे , कुठल्या जगात जगताय ? =)))) मी अप्रिय आठवणी घालवण्यासाठी/ शमवण्यासाठी गांजा सुचवला होता, ह्याचाच अर्थ तो मेडीकल युज साठी होती .
याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय.
हा तर्क तुम्ही कसा काढला ? तुमचे तर्कशास्त्र फार अगाध आहे हो !! शिवाय गांजा वापरल्याने समबुध्धी निर्माण होते असा तर्क जो तुम्ही काढताय तोही अनाकलनीय आहे . आता नीट शांत चित्ताने वाचा खाली काय लिहितोय ते : जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, >>> सो त्या आठवणी बोथट करायला गांजा चा वापर करता येतो. जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! >>> ही समबुध्धी आणायला अनेक उपाय आहेत, गांजा हा समबुध्दी आणायचा उपाय आहे असे मी कोठेही म्हणलेले नाहीये. समबुध्दी आणण्यासाठी तुम्ही आणि संक्षी धि:कारता तो नामस्मरण हा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे ! ( एकमेव आणि अंतीम नव्हे बरं का!) आणि त्यातही एक विशिष्ठ पातळी आली की काहीच करावयाची आवष्यकता रहात नाही . एकदम सारेच सहजस्थिती होऊन जाते ! संगत्याग आणी निवेदन | विदेहस्थिती अलिप्तपण | सहजस्थिती उन्मनी विज्ञान | हे सप्तही येकरूप ||८|| त्यानंतर नामस्मरण थांबवले तरीही फरक पडत नाही !! तुम्ही तुमचा एककल्ली मेंदुची कवाडे बंद करुन घेतली आहेत म्हणुन तुम्हाला हे नामस्मरण कळत नाही , शिवाय ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्यातही "मला ह्याचा अनुभव नाही" असे प्रांजळपणे म्हणायचे सोडुन माझीच लाल असा कायम हेकेखोरपणा असल्याने तुम्ही जिथे तिथे वितंडवाद करत रहाता. ही वस्तुस्थीती आहे ह्याची बेशर्त स्वीकृती करा =)))) बाकी जिथे नामस्मरणासारखी सोप्पी गोष्ट तुम्हाला कळत नाही तिथे गांजाचा अन त्यावरील बंदीचा इतिहास, त्यातील अर्थकारण , त्याचे मेदीसिनल आणि रिक्रियेशनल उपयोग वगैरे तुमच्या बंदिस्त विचारसरणीच्या आवाक्यात येईल का ह्याबद्दल शंकाच आहे ! गांजाचे मेडीकल आणि रिकरियेशनल दोन्हीही उपयोग कॅनडा , अमेरिका , युरोपातील अनेक देशात लोकांना कळुन चुकले आहेत. गांजा हळु हळु एकेक स्टेट मध्ये लीगल होतोय . एकेदिवशी युनाईटेड नेशन्स त्याला शेडुल्ड १ लिस्ट मधुन काढेल अन अख्ख्या जगात लीगल होईल . तोवर गुलामगिरीच्या मानसिकतेतुन बाहेर न पडल्यामुळे तुम्ही इल्लीगल इल्लीगल असे म्हणत वाट पहात रहा ! सॉरी सॉरी , जितं मया जितं मया असे म्हणत वाट पहात रहा ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

मी नामस्मरण धिक्कारले वगैरे निष्कर्ष तुम्ही कुठून काढला ? गांजा एखादा मारत नसेल तर त्याने तो धिक्कारला असं होतं का ? वन सिंपली युजेस इट ऑर नॉट. असो, गुलामगिरी मानसिकता वगैरेला पास. आता थांबतो.

In reply to by उन्मेष दिक्षीत

वन सिंपली युजेस इट ऑर नॉट.
परफेक्ट ! मला हेच म्हणायचे होते. ज्याचा त्याचा चॉईस आहे ! आपण संक्षींचे विद्यार्थी असुनही इतरांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करताय हे पाहुन धक्कच बसलाय जरासा पण ते असो. आता थांबतो मीही. बम बम भोले !

In reply to by उन्मेष दिक्षीत

सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास ! _______________________________ जबरदस्त कन्क्लुजन आहे. यू हॅव मेड माय डे. जिओ !

आनन्दा Mon, 07/06/2020 - 16:11
शाम काका, मी वापरलेला साधा उपाय सांगतो.. एक तर मला दीर्घ द्वेष करता येत नाही, मी पटकन विसरून जातो. तरीदेखील काहीतरी आठवणी विसरता येत नाहीत. अश्या वेळेस मी खालील गोष्टी करतो १. समोरच्या स्वभावाची आऊटलाइन आखून घेतो, आणि त्याने त्याची स्वभावतः असलेली मर्यादा सोडली आहे का हे ठरवतो.. सामान्यपणे माणसाचे संस्कार आणि जडणघडण या मर्यादा ठरवते.. जसे की, विंचु म्हटले की चावणारच. मग विंचू जर चावणारच असेल तर तो चावला म्हणून आपण राग करून काय उपयोग? आपण बेसावध राहिलो ही आपली चुकी आहे. त्यामुळे यापुढी काय सावधगिरी घ्याअयची हे ठरवले की मी त्या ओझयातून मोकळा होतो. २. माणूस हा स्वभावतः स्वार्थी आहे. लहान मुले बघा - त्यांच्याकडे निरागसपणा असतो, पण स्वार्थ म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर लहान मुलांचा अभ्यास करावा. त्यामुळे एखादा स्वार्थी वागला म्हणून आपण त्रास करून घ्यायचे काहीच कारण नाहे. तो त्याचा हक्क आहे असे मी समजतो.,. आपण कसे वागावे हे आपल्या हातात आहे, पण समोरच्याने कसे वागावे हे आपल्या हातात नाही. ३. समोर जी परिस्थिती आलेली आहे ती प्रथम 'accept` करावी, ती मान्य केली की आपले मन शांत होते, आणि मग आपण उपाय शोधू शकतो, ज्याने आपले कमीत कमी नुकसान होइल. ४. अतिशय महत्वाचे, कोणालाही शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :)

In reply to by आनन्दा

शाम भागवत Mon, 07/06/2020 - 16:30
येऊ देत की. तेही महत्वाचे आहे. कोणाला तरी नक्की उपयोग होऊ शकतो. माणसांत इतकी विविधता आहे. त्यानुसार धेय्य गाठायचे विविध मार्ग असणाारच.

In reply to by आनन्दा

> तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. मग पोलिस आणि न्यायालंय कशासाठी आहेत ? का तुमच्या दृष्टीनं ती व्यवस्थाच बोगस आहे ? > एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :) काय भारी विचारसरणी आहे ! अशा नेभळट वृतीच्या लोकांनी बनलेल्या समाजातली व्यक्तीच नेता होते, इतकी समज सुजाण मतदाराला असायला हवी. जितका नागरिक आपल्या हक्कांप्रती सजग आणि सक्षम तितका नेता श्रेष्ठ हे लोकशाहीचं मूलतत्त्व आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा Mon, 07/06/2020 - 18:14
तुमच्याशी वाद घालण्याइतकी पात्रता नसल्यामुळे या बाबतीत तुमचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे मान्य करत आहे.. रत्नगिरीच्या भाषेत सांगायचे तर, तुमचा मोठा. (आवाका म्हणायचे आहे मला)

अर्धवटराव Mon, 07/06/2020 - 19:04
संरक्षण हि सजीवाची आदीम, आणि कदाचीत सर्वात तगडी प्रेरणा आहे. कदाचीत त्यामुळेच या कडवट आठवणी जास्त स्मृतीपेशी व्यापुन असतात. स्मृती आणि कल्पनेच्या सहाय्याने मानवी मन/मेन्दु तसंही सतत सिम्युलेशन करत असतं. हा देखील त्या संरक्षण प्रणालीचाच एक भाग आहे. त्यामुळे, लेखात म्हटलय तसं, या दु:खदायक स्मृतींची उजळणी होत असते, ति आणखी मजबुत होत असते. अनावष्यक स्मृतींनी व्यापलेलं हे हार्डड्राइइव्ह क्लीअर करणं हा आपलीच सिस्टीम रिफॉर्म करण्याचा, जास्त एफीशियण्ट करण्याचा उत्तम मार्ग इथे मांडला आहे. धन्यवाद शामराव. हे एखाद्या प्रसंगाला सामोरे कसं जावं याचं विवेचन नसुन सीस्टीम क्लीअर कशी करावी याचा उहापोह आहे. हे भान ठेवायलाच हवं. बर्‍या-वाईट प्रसंगांना आपण तसंही शक्ती, बुद्धी, प्रेरणा, विवेक वगैरे वापरुन हॅण्डल करत असतो. तो वेगळा विषय आहे.

कानडाऊ योगेशु Mon, 07/06/2020 - 22:43
हा लेख सर्वांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल भागवतसरांचे अनेकानेक आभार. भागवतसरांच्या सल्याचा मला उपयोग होतो आहे. सरांबद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनीही मान्य केले कि ते ही ह्या समस्येतुन गेले आहेत. त्यामुळे एकसारखी समस्या अनुभवलेली असल्याने आणि त्यांनी जर त्यातुन यशस्वी मार्ग काढला असेल तर ते मांडत असलेला उपाय नक्कीच अनुकरणीय ठरतो. एखाद्या चेनस्मोकर ने एखाद्या कधीही सिगारेट न पिलेल्याकडे सिगारेट कशी सोडावी ह्याचा सल्ला मागायला जावा आणि त्या निर्व्यसनी मनुष्याने " तु हा विचार पहिली सिगारेट हातात धरली तेव्हाच करायला हवा होतास कि रे शिंच्या?" असे काहीसे म्हणुन त्याची बोळवण करावी ह्यापेक्षा भागवतसरांचे मार्गदर्शन खूप वेगळे ठरते. त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाबद्दल मला प्रचंड आदर आहे.
> थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे.
@संक्षीसर We should forgive but not forget हे वाक्य तुम्ही वाचले असेल. सद्गुरुंनी एका मुलाखतीत ह्याचा पुनुरुच्चार केला. इंग्रजांविषयी आपली काय मते आहेत असे विचारले असता. इंग्रजांना आपण माफ करायला हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत. कारण मग इतिहास पुन्हा एकदा रिपिट होईल. वर अर्धवटरावांनीही योग्य लिहिले आहे. असे अनुभव डिफेन्स यंत्रणेसारखे काम करतात. माझ्या त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? ह्या धाग्यात लिहिण्याप्रमाणे एकदा गोड बोलुन नंतर स्वतःचा फायदा उपटणार्या घरमालकाचा अनुभव घेतल्यानंतर गोड बोलणार्या अनोळखी/ओळखीच्या लोकांशी बोलताना आता जरा सावधच असतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

> हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत ? प्रश्र विचारणारे विनोदी आणि जग्गी त्यांच्यापेक्षा विनोदी ! इंग्रजांची राजवट विचारणाऱ्यानी पाहिली तरी आहे का ? स्वतः जग्गीला इंग्रजांनी किती छळलंय ? ज्याच्या स्मृतीच व्यक्तीगत जीवनात नाहीत त्यांचा काय त्रास होणारे ? जग्गीचं इंग्रजी बरं आहे आणि थोडा फार श्लेष जमतो यापलिकडे असल्या प्रश्नोत्तरांचा काही उपयोग नाही. ____________________ पूर्वग्रह करुन जगणं आणि सजगता यात कमालीचा फरक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या पोस्टवर दिलं आहे _______________________ चेनस्मोकरनी पहिल्यांदा आत्ता हातात असलेली सिग्रेट खाली ठेवली तर त्याला शुद्ध हवा आणि धूर यांच्या आनंदातला फरक कळण्याची शक्यता आहे. तो पूर्वस्मृतींशी डील करत बसला तर नामस्मरणानंतर मिळालेल्या फुर्सतीत पुन्हा नवी सिग्रेट पेटवेल !

In reply to by शाम भागवत

mrcoolguynice Tue, 07/07/2020 - 13:32
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती

In reply to by सतिश गावडे

mrcoolguynice Tue, 07/07/2020 - 13:30
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती

In reply to by mrcoolguynice

शाम भागवत Tue, 07/07/2020 - 14:43
छान. पण यावरून प्रश्नांची मालिका सुरू होणार असेल तर मात्र मी भाग घेणार नाहीये ;) मला जे सांगायचं ते सांगून झालंय. विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा हे ठरवण्या इतपत वाचक सूज्ञ आहेत. ;) १. मला अनुभव आले म्हणून मी जे काही सागतोय ते मला सगळं खर वाटतंय. इतकच नव्हे तर माझ्या जवळच्या काही लोकांना फायदा झालाय. म्हणजे हे फक्त वैयक्तिक अनुभव आहेत असंही म्हणता येत नाहिये. माझं अगोदरच मन व नंतरचे मन यातला फरक मला जाणवतोय. नविन कोणतीही अप्रिय आठवण निर्माण होता कामा नये, हे सहज जमायला लागलंय. ही एक नवीच उपलब्धी आहे. अन्यथा जुनं निस्तरत बसायचं व दुसरीकडे नवीन अप्रिय आठवणी निर्माण करत बसायचं, याला काही अर्थच राहिला नसता. थोडक्यात मी जे काही लिहीलंय ते ऐकीव नाहीये. २. यात कुणाचा राग,द्वेष, नकारात्मक भावना नसल्याने, स्वत:च्या भल्यासाठी कुणालाही दु:ख द्यायला लागत नसल्याने, तसेच कोणाकडून काही ओरबाडून घ्यायला लागत नसल्याने तसेच या उपायात, जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, प्रांत, वय, शरिरस्वाथ्य वगैरे कशाचाच अडथळा येत नसल्याने तसेच हे कोणाचे काहीतरी चांगले करायच्या बाबतीत असल्याने, हे चांगले आहे असेच मला वाटतेय. ३. ह्याचा उपयोग लोकांना होऊ शकतो अशी माझी धारणा बनली आहे कारण; जगी सर्वसुखी असा कोण आहे? खरे तर मला काही काळ निवांत जगायच असल्याने काहीकाळ सगळ्या संकेतस्थळापासून लांब राहायचं आहे. पण रमण महर्षी लेखमाला, चीनशी युध्द होतय की काय? अशी एक धाकधूक व त्या अनुषंगाने होणारी चर्चा व योगश यांचा अप्रिय आठवणींच्या धाग्यामुळे २००७ च्या अनुभवाबद्दल लिहावेसे वाटू लागल्याने अडकतच गेलो. असो. सर्व प्रतिसादकांना नमस्कार, धन्यवाद व शुभेच्छा.

In reply to by शाम भागवत

आनन्दा Tue, 07/07/2020 - 16:41
नाही, त्यांना असे म्हणायचे नाहीये. त्यांचा हेतू या वेळेस सरळ आहे, जेव्हढे मला समजतेय तितके.. त्यांना असे म्हणायचे आहे, की या तुमच्या अनुभवावरून तुम्हाला अशी एखादी प्रश्नमालिका तयार करता येईल का जी माणसाला त्या कटू अनुभवाच्या मुळापर्यंत जायला मदत करेल.. उदा - तुम्हाला त्या माणसाचा राग का येत आहे? ------ त्या माणसाने जी क्रुती केली ती जाणीवपूर्वक केली असे तुम्हाला वाटते का? ----- त्या कृतीमधून त्याने जाणीवपूर्वक स्वतःचा स्वार्थ आणि तुमचे नुकसान पाहिले का? ------ तुमचे नुकसान नेमके किती झाले? ------ त्याची आजची किंमत किती? ----- तुमच्या झालेल्या नुकसानाचे दीर्घकालीन फायदे कोणते झाले का? झाले असतील तर कोणते? ----- आणि ही यादी कितीही वाढू शकते, पण साधारण असे काहीतरी यांना अपेक्षित असावे.

In reply to by आनन्दा

शाम भागवत Tue, 07/07/2020 - 17:04
दोनच प्रश्न विचारायचे आहेत. १.येणारी आठवण अप्रिय आहे का? उत्तर "नाही" असेल तर पुढे जायची गरजच नाही. २. त्या आठवणीमुळे एखाद्या व्यक्तिचा (भले मत ती बिनचेहर्‍याची असेल) राग येतो आहे का? उत्तर "हो" येतय? मग त्या माणसासाठी शुभ चिंतन करायचे.

In reply to by शाम भागवत

एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा, समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही. खेळ खलास ! लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.

आजी Tue, 07/07/2020 - 17:17
शाम भागवत-तुमचे लिखाण आवडले.पटले.मी पण हा 'शुभचिंतनाचा' प्रयोग करुन बघेन. मला वामनराव पैंचं तत्त्वज्ञान पटतं. मी त्यांची काही पुस्तकं वाचली आहेत.

In reply to by आजी

शाम भागवत Tue, 07/07/2020 - 17:37
व्वा!!! मग तर तुम्हाला खूपच फायदा होईल. मुख्य म्हणजे त्यांची मराठीतील विश्वप्रार्थना उत्कृष्ट व शास्त्रीय आहे. विश्वप्रार्थनेचे महत्व मी त्यांच्या फोरमवर मांडले होते. ते तिथल्या सगळ्यांना आवडले होते. तसेच हा प्रयोगही मी तिथे लिहिला होता. नंतरचे विवेचन (१ ते १७) मात्र केले नव्हते. तेही तिथल्या बुजुर्गांना आवडले व पटले होते. तिथल्या काहींनी मग स्वत:वर प्रयोग करून फायदा होत असल्याचे कळवले होते. सर्वात गमतीशीर प्रयोग म्हणजे सुनेला सासूचा सतत राग यायचा. सासूबाई तशा चांगल्या आहेत असंही एकीकडे म्हणायच्या. सूनेने प्रयोग सुरू केले आणि त्यांचे संबंध सुधारले असं कळवलं होतं. जीवनविद्याची ती फोरम सध्या बंद आहे. पण तो सगळा विदा तिथे नक्की असेल. २००७ च्या गोष्टी आहेत सगळ्या.