करोनाचा हा रोग, त्यावर अनेक प्रयोग!
काय भोग आहेत भाळी, याच काळी, काही कळेना !
हरेक समजतो इथं मीच अाहे बरोबर!
सैनिक तरी कोविडचे आहेत का सुरक्षित खरोखर ?
रेड आणि कंटेनमेंट झोनमधून
बाहेर जायलाही नाही परवानगी..
पण सरकारच्या चातुर्यामुळे
कोंकणात मात्र होऊ शकते रवानगी..
बाटलीतील राक्षसाला प्लीज सोडू नका बेलगाम..
कोविड बियाणं नाही संपवलं तर होतील गंभीर परिणाम..
राजधानीत नाही झेपलं, मग ही असुरक्षित घिसाडघाई इथे कशाला?
कोरोनाचा भस्मासूर कोकणच्या का उशाला?
प्रतिक्रिया
26 May 2020 - 3:03 pm | प्रचेतस
नकारात्मक सुर खटकला.
आता सगळीकडेच लोकं निघालीत, आख्ख्या महाराष्ट्रात, आख्ख्या भारतभरात.
हेच दुसर्या अर्थाने म्हणायचं तर असंही म्हणता येउ शकेल. चाकरमान्यांच्या जीवावर कोकणवासीयांनी इतकी वर्ष ऐश केली आता मात्र त्यांना थारा द्यायची वेळ येताच ते नकोसे वाटताहेत.
26 May 2020 - 3:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत...!!!
-दिलीप बिरुटे
1 Jun 2020 - 7:13 pm | अभिबाबा
या कवितेच्या निमित्ताने आलेल्या एक दोन प्रतिक्रियाचा विचार करता थोडी तपशीलवार माहिती देणे आवश्यक वाटते.
कोकणातील गावकरी व मुंबईतील चाकरमानी मिळून कोकण बनते. दोघेही परस्परावलंबी तितकेच परस्पर पूरक असतात. अशा दोनही प्रकारच्या
कोकणवासियांची वेदना एकत्रितपणे या कवितेत व्यक्त केली आहे.
कोकणवासियांच्या सुदैवाने आणि कोविड योध्यांच्या कामगिरीमुळे जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे ग्रीन व ऑरेंज झोनचे सीमारेषेवर आणले होते.
जिल्हा प्रशासनाने बाधितांच्या संख्येचा अंदाज घेऊन शुश्रुषा व संरक्षण करण्याचे नियोजन केले होते. जिल्ह्याच्या अशा क्षमतेची व नियोजनाची कल्पनाही मुंबईतील वरिष्ठांना होती.
असे असताना काही दिवसांपूर्वी अचानक जिल्ह्याच्या वैद्यकीय व सुरक्षा क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त लोकांना मुंबईहून परस्पर पासेस दिले गेले.
त्यामुळे, व तसेच बसेसमधुन आलेल्या प्रवाशांमुळे जिल्हा प्रशासन व सुरक्षा व्यवस्थेवर कमालीचे दडपण आले आणि पूर्ण वैद्यकीय तपासणी करून मगच जिल्हा प्रवेश देण्याचे प्रशासनाचे नियोजन विस्कटले.
यातूनच कोकणात करोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.आज पर्यंतच्या १५ दिवसात केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या २८० चा आकडा पार करून गेली आहे, आणि ही संख्या वाढतेच आहे दिवसेंदिवस!
राज्य सरकार व मुंबईतील राज्य प्रशासनाच्या या अनाकलनीय घिसाडघाईमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि सर्व कोकणवासियांची वेदना मी या थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कवितेचा विषय "वेदना" हाचअसल्यामुळे कवितेचा सूरही तसाच राहिला आहे. मात्र आलेल्या कोविडच्या संकटाला तोंड देण्याची कोकणवासियांची जिगर व त्यातून कोविड सैनिकांच्या मदतीने करोनावर मिळवले जाणारे नियंत्रण हा एका वेगळ्या आनंददायी कवितेचा विषय असेल व त्याचा सूरही वेगळा असेल.
परखड प्रतिक्रिया देऊन माझं म्हणणं अधिक स्पष्ट करण्याची संधी दिल्याबद्दल आभार !