
मे मध्ये तसेही लांब पल्ल्याच्या राईड्स उन्हामूळे करता येत नाहीं, त्यामुळे तसं फारसं बिघडत न्हवत. हात स्लिंग मध्ये ठेवुन आता हळूहळू ऑफिस ची कामे घरून करायला लागलो. चारचाकी/दुचाकी चालवता येत न्हवती त्यामुळे थोड्या आठवड्याने ऑफिसमध्ये शेर राईड ने जायला लागलो.
२० मे ला झालेल्या अपघातापूर्वी, १६ मे ला एकदा ऑफिसात सायकल वर जाऊन आलेलो, जाऊन येऊन ५२ किमी. ऑफिसमध्ये सायकल वर जायची कल्पना सुचली ती इतर देशात आणि अगदी आपल्याकडे सुद्धा लोकं हे करतात हे वाचून.
व्यायाम करायला वेळ मिळत नाही, वेळ द्यावा लागतो, मग वर्कआऊट ऑन युर वे टू वर्क! म्हणून मी आणि मित्र बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये सायकल वर जायचो. आता ह्यात वेगळीच आव्हाने असतात.
एक तर आपल्याकडे बेभान असणारी रहदारी, सायकलस्वारांना न जुमानणारे दुचाकी चारचाकी, ट्रक, बस व टेम्पो चालक. (आता जिथे रस्ताच मुळात छोटा त्यात तुम्हाला कोण देणार जागा सायकल चालवायला), त्यातून मग साहजिकच येणारी भीती, काळजी. (कशाला करताय हे? इस इट सेफ टू राईड बाईक्स ऑन इंडियन रोड्स?)
"बी ब्रेव्ह, टेक रिस्कस, नथिंग कॅन सबस्टिट्यूट एक्सपिरियन्स".
आपल्याकडे, किंवा इतर जगात कुठेही, सायकल चालवण्यात रिस्क (धोका) हा आहेच. पण तो किती घ्यावा आणि कसा कमी करावा हे आपल्या हातात आहे. सायकलिंग करताना काही बंधनं आणि काही नियम हे अनिवार्य आहेत. हेल्मेट घालणं, सायकलिंग साठी बनवलेले भडक रंगाचे कपडे (पोपटी किंवा तांबडे टी-शर्ट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स, सायकलिंग शॉर्टस) जेणेकरून तुम्ही लांबून सुद्धा अगदी स्पष्टपणे आणि ठळक ओळखु याल. रात्री सायकल चालवणे वर्ज्य, अर्थात अगदीच वेळ पडली तर पुढे आणि मागे मोठे दिवे हे देखील अनिवार्य. कायम रस्त्याच्या डाव्याबाजूला पांढऱ्या पट्टी वरून/जवळ चालवणे, ग्रुप मध्ये असाल तर एका मागे एक अश्या रचनेत.
पुन्हा ऑफिसमध्ये पोचल्यावर अंघोळीसाठी सोय हवी. मी माझ्या कंपनीच्या ज्या ज्या ऑफिसेस मधून काम केलंय, त्यात फक्त २ ठिकाणी अंघोळीची सोय होती. इतर ठिकाणी, वॉशरूम मध्ये जाऊन, टॉवेल ने अंग पुसून, मग सोबत नेलेले डिओड्रंट चे भरपूर फवारे मारून कपडे बदलून बसायचो. एका ऑफिसमध्ये ऍडमिन च्या मागे लागून बाथरूम मध्ये एक बॉयलर (गिझर) लावून घेतला, कारण थंडीच्या दिवसात त्रास व्हायचा गार पाण्याचा. अर्थात त्यांनी लावला तो अगडबंब २०/३० लिटर चा गिझर! तो सुरू करणार कधी, आणि ते पाणी तापणार कधी!
सायकलने ऑफिसमध्ये जाताना अजून एक प्रश्न म्हणजे सोबत न्यायचा लॅपटॉप, बदलायचे कपडे. ते मी लॅपटॉप च्या बॅगेत कसे बसे कोंबून मग ती बॅग पाठीवर घेऊन निघायचो.
कपडे बदलून झाली की ते आधीचे घामटं कपडे मग क्यूबिकल मध्ये खाली चक्क वाळायला टाकायचे!
त्या ऑफिस च्या राईड नंतर सायकल वर पुन्हा बसलो तेच अगदी सप्टेंबर मध्ये! पावसाळ्यात खरं तर राईड करायची मज्जाच काही
और असते, पण हात काही साथ देईना. त्यात उगाच रिस्क नको, म्हणून राईड्स केल्या नाहीत.
शेवटी आता दोनच महिने राहिले आहेत त्यामुळे सरावासाठी सप्टेंबर च्या शेवटच्या शनिवारी एक राईड केली, विंझाई मंदिर, ताह्मणी घाटाच्या अलीकडे, साधारण ५० किमी (जाऊन येऊन १००).
नुकत्याच संपलेल्या पावसामुळे, रस्ता अतिशय खराब झालेला, हाताला रस्त्यावरचे खड्डे चांगलेच जाणवत होते, जाताना तरी हळूहळू गेलो, परतीच्या वाटेला मात्र अगदीच वाट लागली! शेवटी हँडल धरवेना, पिरंगुट घाटाच्या अलीकडे बायकोला कॉल केला आणि तू ये, आता शक्य नाही म्हणून थांबलो...राईड अर्धवट सोडावी लागली, त्याला बरीच करणे होती, अर्थातच हात, प्रचंड उन्हामुळे होणारा त्रास आणि सँडल सोर ची चाहूल!
सँडल सोर, सायकलस्वारांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम! हा त्रास शब्दशः "मागे" लागला की धाब्बे दणाणतात!
मागे एकदा, एक तीन दिवसांची राईड केलेली, पुणे आरावी आणि परत. पहिल्या दिवशी ताह्मणी माणगाव मार्गे आम्ही १७० किमी कापत पोचलो मुक्कामी. नियोजनाप्रमाणे खरं तर दुसरा दिवस आराम करून मग तिसऱ्या दिवशी परत असा प्लॅन होता. पण एकंदरीत पहिल्या दिवशी पडलेल्या श्रमामुळे आणि रस्त्याच्या परिस्थितीमुळे आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी ६० किमी सायकल चालवून माणगाव ला मुक्काम केला, म्हणजे शेवटच्या दिवशी फक्त ११० किमी चा पल्ला गाठावा लागणार होता.
पुण्याच्या अलीकडे, साधारण ३० ते ४० किमी. राहिलेले असताना मला सँडल सोर चा त्रास सुरू झाला, ते शेवटचे अंतर अक्षरशः मी बुड सीट वर नं टेकवता चालवत आलेलो!
विंझाई राईड नंतर मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली! राईड नंतर पुढे आठवडाभर हात सारखा दुखत होता, हाताला सूज आली, आणि पहिल्यांदाच मला जाणीव झाली की बहुदा कन्याकुमारी पर्येंत पोचणे अवघड आहे.
त्यात ४ पैकी एकाने (सेथु), त्याला ऑफिस च्या कामामुळे माघार घ्यावी लागेल असे आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर कळवले!
मग मी सुद्धा, मी माघार घेतो असे सुचवले. पण आनंद आणि किरण मात्र मानायला तयार न्हवते. "तुला जमेल तशी चालवं, हात दुखला तर टेम्पो थांबवू" वैगेरे सूचना यायला लागल्या. खरंतर सायकल राईड ला आपण सायकल चालवावी हा माझा अट्टाहास असतो, पुणे कन्याकुमारी राईड करायची म्हणजे आपण सायकल चालवतच न्यायला पाहिजे. दुसरी मनात शंका म्हणजे सेथु (जो आहे खरं तर मल्लू, पण वाढलाय नागपूरात) गलपटला म्हणजे आमचा मुख्य भाषेचा आधार गेला. अनोळख्या राज्यात भाषा न समजता मी कसा टेम्पो अडवणार आणि काय सांगणार कोणाला? त्यात तिकडे सगळ्या पाट्यांवर जिलब्या आणि कडबोळी!
मग एक अजून सूचना म्हणजे आपण अर्धी करूयात राईड, थोडक्यात मधून कुठून तरी सुरू करू आणि मग कन्याकुमारी गाठू. हे देखील मला तितकेसे पटणारे न्हवते. एक तर मेहेनत घेऊन अख्खी राईड प्लॅन करायची आणि मग करायची ती अशी अर्धवट? बायकोच्या भाषेत माझी "खाईन तर तुपाशी" वृत्ती आड आली.
आपण अजून राईडस करू, त्यात तुला कसं झेपतंय ते बघ, असे इतर दोघे म्हणाले. मी अजून एक दोन छोट्या राईड केल्या आणि त्रास कायम होत गेला. १५०० किमी सायकल राईड करणे म्हणजे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टीने अतिशय तयार पाहिजे हे लक्षात आलं. मित्र अजूनही चल, आपण करू वैगेरे सांगत होते, पण कुठेतरी माझा आत्मविश्वास मात्र कमी झालेला आणि मी ठाम राहिलो. दोघेही प्रचंड नाराज झाले! प्लॅन फिस्कटला! सेथुने विमान तिकीटं रद्द केली!
मला खूप वाईट वाटलं! एवढे महिने नियोजन करून केलेला प्लॅन असा माझ्यामुळे फिस्कटला!
आता पुढे करायचे काय हा मोठा प्रश्न उभा राहिला. सुट्टी तर आधीच टाकलेली, मग ती कॅन्सल करावी असा एक विचार आला मनात, आणि अश्या वेळी माझा एंडयुरो मधला पार्टनर आणि कोकण वेडा अमित ने भुणभुण सुरू केली की आपण परत गोवा गाठू.
(आदल्या ट्रिप ला ह्याला काही कारणाने येतां आलं न्हवत, त्यामुळे त्याची ती ईच्छा आजही अपूर्णच होती).
मी आधी स्पष्ट नकार दिला. मला आता कोणीही विचारलं तर मी हेच सांगेन की पुणे ते कन्याकुमारी च्या १५०० किमी राईड पेक्षा आम्ही केलेली पुणे-कोंकण-गोवा ही राईड जास्ती खडतर वाटली मला. कोकणातले ते वर-खाली वळणा वळणाचे रस्ते, एक गाव सोडलं की डोंगर उतरून पुन्हा दुसरा डोंगर चढत जायचे, हे सत्र सदैव चालूच राहते कोकणात. त्यात काही ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली असते आणि अश्या वेळी चढावर अजिबात गती मिळत नाही.
माझ्या मानत अजून एक भीती होती. सायकल वर जेव्हा तुम्ही रस्त्याने जाता, तेव्हा तो रस्ता तुम्हीं अगदी जवळून अनुभवता, आणि तो बऱ्यापैकी लक्षात राहतो. आमची आधीची गोवा ट्रिप झाल्यानंतर आम्ही सहकिटुंब अशीच कोस्टल गोवा ट्रिप केली कार ने, त्याच रस्त्याने, आणि मला प्रत्येक चढ, उतार, कुठे पाणी प्यायला थांबलो, नाश्ता, जेवण कुठे कुठे हे अगदी डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहत होत, (बायको पोरं शेवटी वैतागली नाही हेच नवल!)
तर पुन्हा गोव्याला जायचे म्हणजे नाही म्हणायला थोडा अंगावर काटा आला, कारण ते रस्ते, चढ उतार हे पाढे पाठ झाल्यासारखे डोळ्यासमोरून पुन्हा फिरले. ह्यावर अमित ने तोडगा काढला. आपण रोज कमी अंतर कापू आणि ५ ऐवजी ९ दिवसात गोवा गाठू असा प्लॅन त्याने तयार केला.
मी शेवटी तयार झालो.(सुलेमानी किडा बहुदा ह्यालाच म्हणत असावे!). या दुसऱ्या गोवा ट्रिप चा अनुभव अजूनच सुंदर होता. अगदी कोकणातील छोट्या छोट्या गावात, कधी कोळ्यांच्या वस्तीत मुक्कामाला राहिलो. ह्या ट्रिप मध्ये आम्ही कुठल्याही हॉटेल चे आगाऊ बुकिंग केले नाही, जमेल तितके जायचे, आणि मग विचारपूस करत मुक्कामासाठी हॉटेल शोधायचे.
आमच्या ह्या सायकल ट्रिप चा आराखडा साधारण असा होता:
पुणे ते माणगाव - ११० किमी
माणगाव ते आरावी - ६० किमी
आरावी ते दापोली - ७५ किमी
दापोली ते गुहागर - ६० किमी
गुहागर ते रत्नागिरी - ७५ किमी
रत्नागिरी ते मिठगावणे - ५५ किमी
मिठगावणे ते आचरा - ७८ किमी
आचरा ते निवती - ६० किमी
निवती ते आरंबोल, गोवा - ५५ किमी
ह्या ट्रिप मधली काही निवडक क्षणचित्रं इथे देतोय

ह्या ट्रिप मध्ये त्रास झाला, हाताला सपोर्ट मिळावा म्हणून घातलेले आर्म वॉरमर ने दंडाला मोठे मोठे फोड आले, हात अधुन मधुन चांगलाच ठणकायला लागायचा, पण त्याकडे दुर्लक्ष करायचे.
मला बघून (एकंदर आकारमान) बऱ्याच लोकांना शंका येते, की हा माणूस एवढे लांब पल्ल्याच्या सायकल राईड खरंच करतो?
सायकलिंग इस ऑल अबाऊट माईंड ओव्हर बॉडी. वन्स यु साईन अंडर द डॉटेड लाईन, यु आर कमिटेड!
त्यामुळे एकदा तुम्ही मनाची समजूत काढली, की मग शरीर आपोआप साथ देतं. एंडयुरो च्या वेळी प्रॅक्टिस करताना एका मित्राने मोलाचा सल्ला दिलेला, कधीही तुम्हाला ही रेस सोडून द्यावीशी वाटली तर तो निर्णय एक तास पुढे ढकला. त्या एका तासात बरच काही बदलतं, कदाचित पुढे उतार येतो, रस्ता चांगला होतो, पण सर्वात महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे तुमचा निर्णय बदलतो!
इतक्या सायकल राईड केल्यावर मग फॅमिली सोबत ट्रिप करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळेच, २०१८ च्या डिसेंबर साठी मी एक फॅमिली रोड ट्रिप आखली. पुणे कोंकण, गोवा, आणि शेवटी सिंताकोर (कारवार जवळ समुद्रात एक बेट आहे, त्यावर हे नुकतेच सुरू झालेले हे एक अतिशय सुंदर रिसॉर्ट).
ह्याच दरम्यान किरणने आमच्या सायकल व्हाट्सअप्प ग्रुप वर पुणे कन्याकुमारी करण्याचे बोलून दाखवले. मी आधीच नकार कळवून टाकला, कारणं आता फॅमिली ट्रिप रद्द करणे शक्य न्हवते.
किरण आणि त्याच्यासोबत अजून ३ जणांनी पुणे कन्याकुमारी सायकल सफर यशस्वीरीत्या पार केली! माझ्या प्लॅन च्या आधारावर, मध्ये मध्ये वेगळ्या वाटा निवडत ते सुखरूप कन्याकुमारीला पोचले.
रोज त्यांचे व्हाट्सएपच्या ग्रुप वर आलेले पोस्ट/फोटो पाहून कुठेतरी थोडा हेवा वाटायचा. त्यांनी देखील कुठलेही हॉटेल बुकिंग केले नसल्यामुळे, अधूनमधून मला फोन वर किंवा व्हाट्सअप्प वर विचारायचे, मग मी त्यांना पाहिजे ती माहिती द्यायचो. थोडक्यात त्यांनी माझं, त्यांच्या ह्या मोहिमेचे बॅक ऑफिस करून टाकलेले!
त्यांची मोहीम संपली, आणि बऱ्याच वर्तमानपत्रांत त्यांचे फोटो व मजकूर झळकले! त्यात नियोजक म्हणून चक्क माझे नाव टाकून मोकळे हे पठ्ठे! ती बातमी घेऊन मग माझी खेचायला सुरवात झाली! मी देखील भरपूर हसून घेतलं. पण मनात मात्र निश्चय केला की आपण ही मोहीम करायचीच!

२०१९ च्या सुरवातीलाच मी पुन्हा आमच्या मावळ्यांना हाक दिली. सेथु आधी आढेवेढे घेत होता, पण त्याला सांगितलं, अरे जिंदगी ना मिलेंगी दोबारा! तो तयार झाला, आनंद सुद्धा हो म्हणाला पण १२ दिवस सुट्ट्या मिळणार नाहीत म्हणून त्याने आम्हाला नंतर पुढे जॉईन होऊन राईड करायचे कबुल केले. सर्वात कौतुक वाटले ते किरणचे, आदल्याच वर्षी जाऊन आल्यानंतर सुद्धा त्याने आमच्यासोबत येण्यासाठो होकार दिला! टीम पुन्हा उभी राहिली. दिवस आणि रूट ठरले. परतीची विमान तिकीटं पुन्हा बुक झाली!!
एकत्र सराव पावसानंतर करू, तो पर्येंत आपापले व्यायाम आणि सायकलिंग सुरू ठेवावे हे ठरले. पण २०१९ हेच मुळात पावसाचे वर्ष निघाले! अगदी नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस सुरूच होता!
सरावासाठी फार लांब पल्ल्याच्या राईड्स जमेना! मला पुन्हा टेन्शन यायला लागले. शेवटी प्रस्थान करायच्या साधारण १५ ते २० दिवस आधी थोडाफार सराव करता आला. तो देखील नेकलेस राईड, साधारण २०/२२ किमी रोज.
सामानाची बांधाबांध सुरू केली. राईड ला जाताना कमीतकमी वस्तू सोबत ठेवायच्या हे अनुभवातून आलेलं, त्यामुळे एक दोन टी-शर्ट, शॉर्टस आणि मुख्य म्हणजे पंक्चर किट, दोन बदलीच्या ट्युबा, हवा भरायचा पंप, बदलीचे ब्रेक पॅड, छोटा, सायकल साठी असणारा टूलकीट, वाटेत तोंडात टाकायला चिक्की, चॉकलेट वैगेरे...सायकली सर्व्हिसिंग करून आणल्या.
डिसेंबर ६, २०१९ च्या रात्री सायकल सज्ज झाली. उद्या सकाळी ६:०० ला नवले पुलाखाली भेटून, किरण, सेथु आणि मी प्रवासाची सुरवात करणार होतो!
क्रमशः
प्रतिक्रिया
मस्त
सुंदर लेख.
निनाद,
In reply to सुंदर लेख. by निनाद आचार्य
भारी लिखाण.. एक सलग भाग
थँक्स रे!
In reply to भारी लिखाण.. एक सलग भाग by मोदक
सकारात्मक भावना आणि दुर्दम्य आशावाद......
अतिशय सुंदर... भारी लिहिले
गणेशा.. फॉर्मल रिक्वेस्ट
In reply to अतिशय सुंदर... भारी लिहिले by गणेशा
हसतो आहे तुझ्या रिप्लाय मुळे.
In reply to गणेशा.. फॉर्मल रिक्वेस्ट by मोदक
लिही रे नक्की.. वाट बघतो आहे.
In reply to हसतो आहे तुझ्या रिप्लाय मुळे. by गणेशा
अरे लिही तर तू...तू म्हणालास
In reply to अतिशय सुंदर... भारी लिहिले by गणेशा
मुंबई ते श्रीनगर सायकल सफरनामा -
छान आहेत अनुभव, पुस्तक
In reply to मुंबई ते श्रीनगर सायकल सफरनामा - by शशिकांत ओक
पुस्तकाची लिंक
In reply to छान आहेत अनुभव, पुस्तक by केडी
मिसळपाव वरील पुर्वीची लेख माला...
In reply to छान आहेत अनुभव, पुस्तक by केडी
मुंबई ते श्रीनगर सायकल सफरनामा -
एकूण भयानक दूरचा खडतर सायकल
खूपच उत्तम लिहिलंय. प्रवास