'तंबोरा' एक जीवलग - ६
कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण सोपे नसते. जे शास्त्र शिकायचे ती कला असेल तर ते आणखीन कठीण होते. त्यातही गाणे असेल तर महाकठीण. आईची तारेवरची कसरत पहात माझे असेच मत झाले होते. पुढे माझे गाण्याचे शिक्षण सुरू झाले तसे माझे हे मत दृढ होत गेले. आज तर त्यात काहीच संशय नाही.
गानकला शिकून तिचा व्यवसाय करण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे जन्मजात असाव्या लागतात, काही आपल्या नशिबात असाव्या लागतात तर काही कष्ट करून मिळवाव्या लागतात. पैकी कंठात सूर आणि विद्या ग्रहण करण्याइतपत बुद्धी हे भांडवल जन्मतः असावे लागते. गाणं ही गुरूमुखी विद्या असल्याने उत्तम गुरू नशिबात असावा लागतो त्या पुढे कष्ट करून मिळालेली विद्या वाढवणे, तिच्यावर हुकूमत बारकावे आणि ती टिकवून ठेवणे हे सर्व कष्टसाध्य आहे.
पहिल्या दोन नसतील तर कितीही कष्ट करून काही फायदा नाही. दुसरी नसेल तर मिळालेल्या विद्येचा व्यवसाय म्हणून वापर करणे दूरच रहाते. या कारणाने महाविद्यालयातील पदव्या मिळविण्याइतके काही गाणे सहज सोपे ठरत नाही. शिकून संपले ते कसले गाणे! म्हणूनच या शिक्षणाला 'साधना' असं म्हणातात. साधना कधीच संपत नाही. ती अखंड चालू रहाते.
माझे अगदी प्रारंभीचे शिक्षण आईकडे झाले तरी मी खरी तालीम घेतली ती आमच्या भेंडीबाजार घराण्याच्या प्रसिद्ध खां साहेबांच्याकडे. त्या नंतर काही तालिम पतियाळा घाराण्याचीसुद्धा मी घेतली. माझ्या गंडाबंधनाचा दिवस अजूनही स्पष्ट आठवतो. गंडाबंधन म्हणजे आजपासून तुम्ही माझे गुरू व मी शिष्य. असे गुरूजवळ कबूल करून त्यांच्याकडे विद्येची याचना करणे. त्या नंतर गुरू जे शिकवतील, जसे शिकवतील, जेंव्हा शिकवतील ते सर्व कबूल. ह्या 'जे', 'जसे' आणि 'जेंव्हा' याचा समतोल राखत सातत्य राखणे फार कठीण आहे. गुरूंबद्दल पूज्य भावना व्यक्त करायच्या म्हणून अशा गंडा बंधनाचा एक छोटासा समारंभ करण्याची पद्धत असायची. गुरुंची आणी तंबोर्याची पूजा करायची. गुरूंना वस्त्रे, फुले, फळे, दक्षिणा अर्पण करायची असे साधारणतः त्याचे स्वरूप. हल्ली काही असे नसते. गुरूशिष्य परंपरेने शिकवणारे गुरू आणि शिकणारे शिष्य आता कुठले असायला?
माझे गंडाबंधन ललितापंचमीच्या दिवशी झाले. खां साहेब आमच्याचकडे रहात होते. त्या दिवशी सायंकाळी त्यांचे काही शिष्य आणि मित्रगण आले. आईने सर्व तयारी केलेलीच होती. मी खां साहेबांची पाद्यपूजा केली, हार घातला, त्यांना वस्त्रे, फळे, मिठाई आणि दक्षिणा अर्पण केली. तंबोर्याचीही पूजा केली. खां साहेबांनी तो सुरात लावला आणि माझ्या हातात तो देत ते म्हणाले, "बेटा सूर लगाओ". मी षड्ज लावला. त्यांनी एक संध्याकाळचा एक राग शिकवायला सुरुवात केली. शिकविण्याआधी रागाचे नांव वगैरे सांगणे हे असे ते कधीच करत नसत. विचारायची हिम्मत कुठली असणार. साधारण अर्धा तास आलापी सांगून हा समारंभ संपला. तो रागही तेवढ्यापुरताच होता. कारण दुसरे दिवशी पहाटेला त्यांनी मला भैरव शिकवायला घेतला. त्या दिवशीची कोमल रिषभ असलेली ती रागिणी म्हणजे 'गौरी' होती हे मला फार नंतर त्यांनी जेंव्हा गौरी शिकवायला काढला तेंव्हा कळले.
दुसर्याच दिवशी पहाटे साडेचार वाजता माझे रीतसर शिक्षण सुरू झाले. पहाटे उठण्याची सवय तेंव्हापासून जी लागली ती आजतागायत. प्रातःविधी उरकून फक्त चहा घेऊन शिकायला बसायचे. खां साहेब आधीच उठलेले असत. बरोब्बर साडेचारला बाहेर येऊन बसायचे. मला थोडासा जरी उशिर झाला तरी "क्या कहने बडी अच्छी निंद लगी" बढिया है! बढिया है! चंगा है" असे स्वतःशीच म्हणायचे. काल शिकवलेले मी आधी सुरू करायचे. ते मी कसे गाते इकडे त्यांचे बारिक लक्ष असे. जर मी बरे म्हटले तर पुढचे आपणहून शिकवायचे. पुढचे म्हणजे एखादा पलटा वगैरे. इतकेच. फार नाही. नाहीतर मी आपली कालचेच ते घोकत बसे. बरोबर येईपर्यंत पुढचे काही शिकवत नसत. काल शिकवलेल्या सरगम पाठ व्हायलाच हव्या. त्या जर पाठ नसतील तर तालिम बंद करून ते सरळ उठून जायचे. पाठांतरावर फारच भर असे. अशा वेगाने माझी तालिम सुरू झाली. अर्थात पुढे पुढे चांगला वेग पकडला मी. पण सुरूवात अशीच. माझ्या तालमीच्या वेळेस आई तिथं आजिबात फिरकायची नाही.
सुरवातीची एक हकिकत सांगून हा भाग पुरा करते. एका रागात मध्यमावरून कोमल रिषभावर मिंड घ्यायची होती. मिंड म्हणजे एका सुरावरून दुसर्या सुरावर आस न तोडता येणे. अर्थात त्या दोन स्वरांच्या मधले सगळे स्वर आणि श्रूती लागणार. परंतू त्यांचे प्रमाण आणि वेळ हेच त्यात मुख्य असते. खां साहेबांनी ती मिंड अशी घेतली की माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. त्या स्वरांच्या करामतीमुळे मी दिपून गेले, विचलीत झाले. बापरे हे आपल्याला कसं जमणार? असं वाटून मला ते आजिबात जमेना. "यह तो बहुत मुश्किल है" इतकच मी म्हणाले. झालं. त्यांनी माझ्या अस्सं रोखून पाहिलं. त्या त्यांच्या पहाण्यानेच मला समजलं आपली चूक झाली आहे.
"मुश्किल है तो जरूर मगर आसान करते है. उठो. ते ओरडले. मी थरथर कापत उभी राहिले. तंबोरा माझ्या खांद्यावर एकतारीसारखा देऊन म्हणाले अब देखो आसान हो गया. असे म्हणून त्यांच्या खोलीकडे निघून गेले. खांद्यावर तंबोरा, मी अश्रू गाळत उभी, दोन तास झाल्यावर बाहेर येऊन म्हणाले. पटको अब. अब होगा गाना आसां. जबतक ये नही आता तबतक तालिम नही होगी." तंबोर्याचे ओझे मला खाली ठेवायला परवानगी देऊन पुन्हा निघून गेले. ते क्वचितच चिडायचे. असे जरी होते तरी ते फार प्रेमळ होते. माझ्या आयुष्यातल्या पित्याच्या प्रेमाची फार मोठी कमतरता त्यांनी भरून काढली. त्यांच्या प्रेमळपणाच्या गोष्टीसुद्धा येतीलच.
गौरीबाई गोवेकर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा भाग यातील किस्सेच असे आहेत की
शास्त्रीय संगीतातल्या गुरु
तुम्ही चांगला प्रश्न विचारलात.
याविषयी कुतुहूल होते.
छान लिहिलंय. खरा जोहरीच
+1
छान! ...
सुरेख चालली आहे लेखमाला
वाचत आहे.
छान ! पुभाप्र...
वा वा!!! एका अद्भुत विश्वाची
पु भा प्र