Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 17/07/2019 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुना किस्सा आठवतो. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले १) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे २) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही. ३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय? ४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर? परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते. कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात. अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."

वाचने 57238
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत.
वा. यातील मनोव्यापाराचा भाग हा शब्दप्रयोग अतिशय वास्तव वाटला. बाकी घाटेंनी दिलेले स्पष्टीकरणं मला पटलेले हे त्रिवार सत्य. पण ठिक आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मला अनादरही अजिबात नाही. फक्त एका बाजूने पक्के विज्ञाननिष्ठ असा शिक्का असताना ते स्वतःच्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत हि कृती खटकली. म्हणून माझ्यापुरतं मला ते स्पष्टीकरणं पटलं नाही असे मी मानतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पाहिले तर प्रश्न पडतो...
तुमचे वेगळे मत मान्डु शकता ना!
दुल्हे राजा सिनेमात हॉटेल मॅनेजर जॉनी लिव्हरला पाहून हॉटेल मालक कादर खान वारंवार विचारतो? तू त्या टपरीवाल्या गोविंदाच्या बाजूने आहेस का माझ्या? बोट गोविंदाकडे करून तोंड वेंगाडून म्हणतो, मैने आपका नमक खाया है मी तुमच्या बाजूचा! ... तुमचे मत काय पडते?

In reply to by शशिकांत ओक

बघितला पाहिजे. आजच्या लोकसत्ताच्या काळ्या पांढर्‍याच्या मर्यादा या अग्रलेखात कुबेर म्हणतात,"आपल्या सर्व समस्या या चांगल्या-वाईटाच्या द्वंद्वात गोंधळल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. वरकरणी काळे नाही ते सर्व पांढरे आणि पांढरेपण न मिरवणारे सर्व ते काळेच ही आपली बालिश विभागणीची सवय. ती सोडायची वेळ आता येऊन ठेपली आहे. चांगल्यातही बरेच काही वाईट असू शकते आणि वाईट भासणारे सर्व काही वाईट असतेच असे नाही. चांगल्यातील वाईटास विरोध आणि वाईटातील चांगल्यास उत्तेजन म्हणजे प्रौढपण. ते मिळवण्याआधी काळ्यापांढऱ्याच्या मर्यादा आपण ओळखायला हव्यात."

In reply to by प्रकाश घाटपांडे

वाईटात चांगले शोधले पाहिजे... हे कुबेर महाशयांना आत्ता समजले असे मानायचे काय? संपादकीयातून बोधांमृत पाजायला देताना आपल्या स्वतःच्या सारासार विचार शक्ती ला आतापर्यंत सोडचिठ्ठी दिली होती अशी कबुली मानायची काय?

In reply to by शशिकांत ओक

दुल्हे राजा सहज पहायला मिळाले. पका काकांकडे पाठवावी वाटले कारण त्यांनी पाहिले पाहिजे अशी म्हटले होते...

In reply to by शशिकांत ओक

मै वही कहता हु मै आपकी तरफ हू श्रद्धा का कार्बन डेटिंग टेस्ट होनी ही चाहिये! :)

In reply to by जॉनविक्क

बाकी घाटेंनी दिलेले स्पष्टीकरणं मला पटलेले नाही हे त्रिवार सत्य. पण ठिक आहे. असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचत सुटलो त्याची गोष्ट यातील परिच्छेद पटले नाहीत की ते शनि प्रकरणावर त्यांचे मत पटले नाही.

अंध श्रद्धा निर्मूलन हे झालाच पाहिजे . पण हा तसा नाजूक आणि संवेदन शिल विषय आहे . श्रद्धा आणि अंध श्रद्धा ह्यात अस्पष्ट सीमा रेषा आहे त्याची जाणीव नसेल तर उलट परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे . लोकांना जर जाणवलं की श्रद्धा स्थानावर टीका केली जात आहे तर ते अजुन जास्त कडवे होतात .

अंनिसच्या कार्याचा आदर आहेच. बुवाबाजीला आळा बसण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. घाटेंचे वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबतचे मत मला पटले. अर्थात् एक बाजू पूर्णपणे चूक आहे असे मानणे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही, पण असो. अवांतरः मला श्रद्धा या शब्दाचे आणि भावनेचेच जास्त कौतुक आहे. त्यामुळे अंधश्रद्धा हा शब्दच मुळात चुकीचा वाटतो. श्रद्धा डोळस कशी असते ते मला अजूनही समजत नाही. श्रद्धा ही अंधच असणार. डोळस म्हटले की अनुभव आला, अनुभव आला की त्याबाबतीत तरी श्रद्धा असण्याची गरज संपली. मग अनुभव पारखून त्यात पुन्हा डुंबावे किंवा नाही हा विचार अन् त्यानुसार आचार आला. शब्दांची गंमत असते! :-)

In reply to by राघव

श्रद्धा ही भावनिक गरज आहे आणि विज्ञान ही भौतिक गरज आहे . मला मुंबई पडून पुण्यापर्यंत बस ची गरज आहे ती विज्ञान पुरवत . पण ह्या प्रवासात माझी प्रेयसी बरोबर असावी अस वाटत आणि ती असेल तर प्रवास सुख कारक होईल ही माझी भावनिक गरज आहे . विज्ञान आणि श्रद्धा आस्तिक पना ह्यांचा संबंध जबरदस्तीने जोडू नका

माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संकट, अस्थिरता, अशाश्वतता, असाध्य आजार येतो, तेंव्हा त्याची मती गुंग होते. तेंव्हा माणूस दुसऱ्या कुणाला तरी शरण जातो. अशा वेळेस बुद्धिप्रामाण्य वाद कामास येत नाही. या वेळेस बुडत्याला काडीचा का होईना कोणीही आधार दिला तरी त्या माणसाला त्या अस्थिर स्थिती किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याची फार मोठी मदत होते. मग अशा वेळेस कोणीही गुरु किंवा देव किंवा गंडा दोरा राशीचा खडा अशी कोणतीही वस्तू सुद्धा माणसास मानसिक आधार देऊ शकते. मग संकटातून बाहेर पडल्यावर हा माणूस अशा गोष्टी वर विश्वास ठेवू लागतो. ही जरी अन्धश्रद्द्धा असली तरी त्याने माणसाला मानसिक बळ मिळते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जर अंनिस या मानसिक बळाची किंमत शून्य म्हणणार असेल तर त्यांचे आंदोलन कधीही यशस्वी होणार नाही हि वस्तुस्थिती आहे. माणसाची सामाजिक स्थिती जितकी निम्न किंवा जीवनात जितकी जास्त अस्थिरता तितकी त्याला मानसिक आधाराची गरज जास्त असते. यामुळेच स्त्रिया किंवा व्यवसाय करणारी माणसे जास्त श्रद्धाळू असतात हेच माणूस स्थिर नोकरीत असेल तर त्याला अशा मानसिक आधाराची किंमत कमी असते. त्यातून उच्च पदस्थ सरकारी नोकरीत असेल तर हि गरज अजूनच कमी होते. कारण महिन्याच्या महिन्याला पगार खात्यात पडणार याचिका १०० % खात्री असते. यामुळेच समाजातील बहुसंख्य लोकांना टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद न झेपणारा असतो. शास्त्रज्ञसुद्धा चांद्रयान विधिवत पूजा करून चंद्रावर पाठवताना दिसतात. कारण एक अब्जांश इतकी क्षुल्लक चूक सुद्धा काही शे कोटी रुपयाचा हा प्रकल्प खड्ड्यात टाकू शकतो आणि हि अशाश्वतता शास्त्रज्ञांना अस्वस्थ करीत असते. या अस्वस्थतेत माणूस अमानवी शक्तीस शरण जातो. मग तुम्ही त्याला श्रद्धा म्हणा कि अंधश्रद्धा या स्थितीत टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद कामास येत नाही. टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिक, साम्यवादी सुद्धा स्वतःच्या गंभीर आजारात प्रार्थना करताना मी पाहिले आहेत.

In reply to by सुबोध खरे

माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संकट, अस्थिरता, अशाश्वतता, असाध्य आजार येतो, तेंव्हा त्याची मती गुंग होते. तेंव्हा माणूस दुसऱ्या कुणाला तरी शरण जातो. अशा वेळेस बुद्धिप्रामाण्य वाद कामास येत नाही.
१००% सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

अगदी सहमत आहे. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद च्या दुसर्‍या आवृत्ती चे वेळी मी मनोगतात ते म्हटले आहे http://mr.upakram.org/node/777#comment-12763

जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे, "मला पटते-वाटते तेच अंतिम सत्य आहे" असे मत असणे... मग ते मत आस्तिक-नास्तिकत्वाचे असो, एखाद्या विचारधारेसंबंधी असो, की अजून कोणत्या गोष्टीसंबंधी असो. ही अंधश्रद्धा बाळगणारी माणसे कळत-नकळत हेकट व उद्धट बनतात आणि आपल्या मताला "थोडासा विरोध होतो आहे" अश्या संशयानेही अविचारी, आक्रमक आणि हिंसक बनतात. जगातल्या बहुतेक सर्व मोठ्या हिंसा आणि नरसंहार याच प्रकारच्या अंधश्रद्धेने झाले आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे, "मला पटते-वाटते तेच अंतिम सत्य आहे" असे मत असणे... मग ते मत आस्तिक-नास्तिकत्वाचे असो, एखाद्या विचारधारेसंबंधी असो, की अजून कोणत्या गोष्टीसंबंधी असो.
डॉक्टर साहेब अंधश्रद्धेची हि व्याख्या प्रचंड आवडली.

मुळात "मी विज्ञानवादी" किंवा "मी अंधश्रद्धाळू" हा वादच चुकीचा वाटतो. शंभर वर्षांपूर्वी हवेत उडता येईल अशी समज किंवा "श्रद्धा " असणाऱ्या लोकांना वेडसर ठरविण्यात आले होत. पण आज आपण बघतच आहोत. आपल्या जाणिवेच्या दृष्टीच्या पलीकडे कितीतरी गोष्टी आहेत. केवळ आपल्याला त्याचा माग लागत नाही म्ह्णून त्याला अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे डोळ्यांवर पट्टी लावून सगळीकडे अंधारच आहे म्हणण्यासारखा आहे.

In reply to by बोलघेवडा

नक्कीच. आजच्या ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत ज्या गोष्टी बसतात त्या बद्दल आपण विचार करतो. उद्या या कक्षा रुंदावत जाणार आहेत. आज अ वैज्ञानिक वाटणारी गोष्ट उद्या वैज्ञानिक बनू शकते.

खूप चांगला लेख अाणि प्रतिक्रीया सुध्दा. पैकी श्रध्दा - अंधश्रध्दा असा काही भेद नसतो, तसेच मानसिक अाधाराची माणसाला गरज असते अाणि त्याची किंमत शून्य नसते, हे विचार पटले. या निमित्ताने, अंधश्रध्दा ‘निर्मूलन’ या शब्दाविषयी बोलायचे, तर अंधश्रध्देचे कधीही निर्मूलन होऊ शकणार नाही असे वाटते. त्याचे साधे कारण म्हणजे मानवी जीवनात किती विष्लेशण करू शकतो, किती वेळ अाहे, निर्णय घेण्याची प्रक्रीया किती जटील अाहे, हे पाहिले, तर माणसाला प्रचंड मर्यादा असतात. त्यातल्या त्यात तो विवेकवादी, कार्यकारणभावाला अनुसरून विचार करू शकतो, पण सर्व वेळी, सर्व गोष्टीत नाही. त्याला कधी ना कधी ‘लीप अॉफ फेथ’ घ्यावीच लागते. म्हणून श्रध्दा ही राहणारच. त्यामुळे ‘निर्मूलन’ असे न म्हणता, श्रध्दा मर्यादेत ठेवणे, असे फार तर म्हणता येईल. निर्मूलन या शब्दाऐवजी राजीव साने, amelioration असा शब्द सुचवतात. खालील दुव्यात amelioration संबंधी अनेक गोष्टींचा उहापोह ऐकायला मिळेल. https://www.youtube.com/watch?v=0enQUEUdKk4&t=1081s

In reply to by स्वधर्म

आपले म्हणणे पटणारे आहे. निर्मूलन म्हणजे समूळ उच्चाटन जी गोष्ट भावना नावाचा फॅक्टर असल्याने अशक्य आहे. एकदा निवारण हा शब्द राजीव साने यांनी सुचवला होता. अंनिस हे अंधश्रद्धा निवारण समिती असेही होउ शकेल. पण जेव्हा तुम्ही निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवाल तेव्हा कुठे निवारण होण्याकडे वाटचाल होईल.

फक्त एकाच धर्माच्या मागे लागले ते पटत नाही. आणी अंधश्रध्देची व्याख्या काय आहे?

In reply to by जालिम लोशन

"फक्त एकाच धर्माच्या मागे लागले..." हा आरोप वारंवार केला जातो, त्यात तथ्य नाही हे मला जाणवत होते. एका मित्राने, ज्याला मी सेन्सिबल समजतो, त्यानेही हे विधान केले तेव्हा खरे-खोटे काय त्याचा तपास करावा ह्या इच्छेने आमच्या शेजारी अंनिसचे एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोललो, तर त्यांनी अंनिसची अनेक मासिके, प्रसिद्धीपत्रके, दाभोलकरांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक, आणि अन्य साहित्य मला वाचायला दिले. त्यानंतर मी अशा निष्कर्षाला आलो आहे की हा खोटा आरोप तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून (राजीव सानेंच्या शब्दात, ज्यांना भगवा इस्लाम स्थापन करायचा आहे असे लोक) केला जातो, आणि त्याला सोशल मीडियाद्वारे वारेमाप प्रसिद्धी मिळते. प्रचाराला आपण बळी पडायचे की नाही, हे ज्याने त्याने ठरवायचे. टीप: मी अंनिसशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हतो व नाही, असण्याची शक्यता नाही. अंधश्रद्धा ही देशापुढील क्रमांक एकची समस्या आहे असे मला वाटत नाही, आणि माझा पिंडही कार्यकर्त्याचा वगैरे नाही. धन्यवाद.

In reply to by रविकिरण फडके

अंधश्रद्धा ही देशापुढील क्रमांक एकची समस्या आहे असे मला वाटत नाही,
अगदी सहमत आहे. देशासमोरील समस्यांची वर्गवारी करून प्राधान्यक्रम ठरवले तर अंधश्रद्धा खालच्या क्रमांकाला येईल.

अवांतर : प्रकाश घाटपांडे, तुमचं हे विधान वाचून आश्चर्य वाटलं :
पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, ....
दाभोलकरांनी अवैध मार्गाने संपत्ती जमवली होती. तुम्ही पोलिसांत असूनही तुम्हांस माहित नाही याचं आश्चर्य वाटलं. माझा एक जुना संदेश इथे आहे : http://www.misalpav.com/comment/811847#comment-811847 दाभोलकरांचे काही गुन्हे इथे आहेत (इंग्रजी दुवा) : https://www.hindujagruti.org/news/20475_dabholkar-s-scam-of-parivartan-… तसंच अनिसच्या काही सदस्यांची नक्षलवाद्यांत उठबस होती. कशावरनं नक्षल्यांनी दाभोलकरांचा काटा काढला नसेल? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही सनातनचे साधक का ? रे कर्मा ... वाटलं नव्हतं .. बोलण्यावरून तर अगदी समजूतदार आणि विचारी वाटत होतात ... तो सनातनचा पेपर इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा माझ्या वाचनात आला - आणि हा पेपर काढणारे इतके मूर्ख लोक कोण आहेत असा प्रश्न पडला होता , पुढे हे लोक मूर्ख नसून पक्के शहाणे इतर श्रद्धाळूंंना मामा बनवणारे आणि महास्वार्थी आहेत , वेळप्रसंगी खूनही पाडणारे आहेत हे समजत गेलं .... त्यांचे पुरावा विशेषांकही असतात , आपल्यावरील आरोपांची खंडना करण्यासाठी प्रसिध्द केलेले .... आणि वाचक / साधक बहुधा डोळे मिटून विश्वास ठेवतात ..... इतरांनीही त्यावर विश्वास ठेवावा अशी साधकांनी अपेक्षा करणं म्हणजे अतिच आहे .... मुळातच एखादी संघटना संपूर्ण खोटी आणि स्वार्थी आहे , हे सगळ्या डोळे उघडून बघणाऱ्या लोकांना माहीत असताना त्या संघटनेने गोळा केलेले पुरावे सादर करून काय सिद्ध होणार आहे .....

In reply to by nishapari

म्हणजे त्यामध्ये मनःशांती+समाजऊध्दार+स्वऊन्नती जमलेच तर देशोध्दार करण्यासाठी सामील होता येईल फक्त सिमी, कम्युनिस्ट (माओवादी) ईसिस, हिजबुल मुजाहिदीन सारख्या outlawed संघटना नकोत.

In reply to by जालिम लोशन

मनःशांती आणि स्वउन्नतीसाठी - विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी , इगतपुरी . इशा योगा सेंटर , कोईम्बतोर परमार्थ निकेतन , हृषीकेश बिहार योगा सेंटर . देशोद्धार आणि समाजसेवेसाठी - भूमी ऑर्गनायझेशन , टीच फॉर इंडिया , गुंज , लोक बिरादरी प्रकल्प , पंख ऑर्गनायझेशन , हृषीकेश ... आणखी अक्षरशः शेकडो प्रामाणिकपणे समाजउन्नती करण्यासाठी धडपडणाऱ्या संस्था आहेत . सनातन प्रभात पहिल्यांदा वाचला होता तेव्हाही तो मूर्खपणा वाटला होता आणि आजही तेच मत आहे ... फक्त आता त्यात जातीयतेला पद्धतशीर खतपाणी घालून , भारतीयांमध्ये तेढ आणखी वाढवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो ... व्यक्तिपूजा ( परात्पर गुरू वगैरे - परात्पर गुरूंना स्वतःभोवती आरती ओवाळून घेताना काहीच कसं वाटत नाही ? ) , कर्मकांड ह्या सगळ्यामुळे अध्यात्मिक उन्नती होते अशी साधकांची समजूत करून देणं - साठ टक्के पातळी नि 80 टक्के पातळी .... ह्या देवाला इतक्या प्रदक्षिणा आणि त्या देवाला तितक्या प्रदक्षिणा .... ह्याला ह्या बोटाने गंध लावायचं , दुसऱ्याला त्या बोटाने ... अमुक केल्याने काळी - दुष्ट ऊर्जा तुम्हाला हानी पोहोचवत नाही ... आदी असंख्य निरर्थक गोष्टींनी समाजातील एका गटाची जीवनपद्धती बदलून आपण समाजातील इतर घटकांपेक्षा वेगळे / श्रेष्ठ आहोत असा आभास त्यांच्या मनात निर्माण करायचा आणि मग त्याचा उपयोग इतर गटांविषयी द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी करायचा हे सनातनचं तंत्र आहे ... मी आस्तिक आणि हिंदू असूनसुद्धा हे माझं मत आहे ... सनातन या संस्थेला स्वार्थी राजकारण्यांचा अंतर्गत सपोर्ट आहे किंबहुना राजकारणी हेतूंमधूनच तिची निर्मिती झाली आहे .... देशात एकता निर्माण न होऊ देण्यासाठी ही संस्था अथक कार्यरत असते ...

In reply to by nishapari

निशापरी, सनातनचा साधक असणे वा नसणे हा काही गुन्हा नाहीये अजूनही. सनातन प्रभात हा पेपर साधना करणाऱ्यांसाठी काढला आहे. तुम्हांस साधना करण्यात रस नसेल तर तो मूर्खासारखा वाटणार. त्याला इलाज नाही. बाकी, ते खूनबिन न्यायालयात सिद्ध झालेलं नाही. ३१ डिसेंबर २०१३ रोजी सनातन संस्थेच्या ६ साधकांची न्यायालयाने पूर्ण चौकशीअंती निर्दोष मुक्तता केली आहे. त्यातूनही तुम्हांस अधिक माहिती मिळवायची असेल तर सरकार सकट बरेच बुबुडाविपुमाधवि इवल्याश्या सनातन संस्थेमागे का हात धुऊन लागलेत, याचा जरा शोध घ्या म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दाभोलकरांनी केलेल्या स्कॅमबद्दल तुम्ही लिंक दिलेली साईट सोडून अख्ख्या गुगल आणि युट्युबवर एक अक्षरही सापडलं नाही . साधक असणं गुन्हा आहे असं मी म्हटलंच नाही आहे ... पण त्यामुळे तुमच्या मतांची वॅलिडीटी एकदम कमी झाली , निदान माझ्या दृष्टीत तरी ... म्हणजे एखाद्याशी अगदी गंभीरपणे तात्विक / आध्यात्मिक चर्चा करत असताना त्याने मधेच "आमच्या आसाराम बापूंनी असं असं सांगितलं आहे " असं विधान केलं तर आपलं बोलणंच खुंटेल की नाही ... की ह्या माणसाला आपण विचारी समजत होतो , आता काय बोलणार याच्याशी .. तसं काहीसं झालं .... असो , कदाचित तुमचंही असंच मत असेल , कुणाला समजावतोय मी असं ... सरकार मागे लागलेलं नाही , नुसता दिखावा ... सरकारचा आतून पाठिंबा आहे म्हणूनच गुन्हे सिद्ध होऊ दिलेले नाहीत... काय चाव्या फिरल्या असतील आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो .... मोठ्या मोठ्या लोकांचे हात अडकले आहेत , ते कशी अटक होऊ देतील गुन्हेगारांना ? त्यांची नावं नाही का समोर येणार .... दाभोलकरांची हत्या झाली त्यानंतर एक - दोन दिवसातच सनातनच्या मुख्य कार्यकर्त्यांची बैठक टीव्हीवर दाखवली होती , अतिशय प्रसन्न होऊन हास्यविनोद करत होते , अजून आठवत आहे स्पष्ट ... कसा काटा बाजूला केला - खूप मचमच करत होता असा भाव उघड दिसत होता .

In reply to by nishapari

निशापरी, तुमच्या भावना समजल्या. जिथे विचार थांबतो, तिथे बहुसंख्य लोकांची श्रध्दा सुरू होते. हे नैसर्गिक अाहे कारण मी वर म्हटल्याप्रमाणे माणूस अमर्याद वेळ व प्रत्येक गोष्टीचा विचार/ विश्लेषण करू शकत नाही. पण काही लोकांच्या बाबतीत श्रध्दा अाधी येते अाणि मगच विचार (जर काही केला तर…) सुरू होतात. मी व्यक्तीश: या लोकांना काही सांगणं अाणि त्यांचं मत बदलणं अशक्य मानतो. याचा अाणि शिक्षणाचा, भाषेवरील प्रभुत्वाचा इ. काहीही संबंध नसतो, असा अनुभव अाहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे, चूक दाखवून दिल्याबद्दल आभार. दाभोलकरांबद्दल समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीही अंधारात आहेत असं दिसून येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माझ्या मते चळवळ, संस्था, आणि ती सुद्धा एखाद्या मोठ्या सामाजिक विषयाला हात घालणारी असली तर ते एखादा व्यवसाय चालवण्यासारळेच असते. त्यात अठरापगड माणसे देखील येतात आणि गुंडपंडापासून राजकारणी मीडिया वगैरे सगळ्यांना खुश ठेवणे देखील येते. याखेरीज स्वतःच्या अन्य स्वार्थी हेतूने पैसा देणारे अनेक लोक देखील येतात. या सगळ्याला सांभाळून घ्यायला बेहिशोबी पैसा लागतो. तो नसेल तर सनातन होते. व्यक्तिशः मला सनातन चे विचार जरी पटत नसले तरी त्यांची साधनाशुचिता वादातीत आहे माझ्यालेखी. त्यामुळे एखादी संस्था जर राजकारणी स्थानिक गुंड आणि मीडिया जर manaje करत नसेल तर असे होते. दाभोलकरांनी अवैध संपत्ती जमवली होती का या पेक्षा टी नेमकी कशासाठी जमवली होती हे देखील या बाबतीत महत्वाचे ठरावे. त्यांनी या संपत्तीतून कोणते वैयक्तिक लाभ घेतले होते का, असल्यास कोणते, इत्यादी माहिती दाभोलकर माणूस म्हणून उच्च होते की नीच होते याची चर्चा करताना आवश्यक आहे. केवळ दाभोळकरांवर अंधविश्वास असणे वाईट तसेच केवळ घोटाळा दिसला म्हणून त्यांना धोपटणे देखील वाईट. एका संस्थेने कार्याचा भाग म्हणून त्यांच्यावर खटले टाकणे हे सर्वथा समर्थनीयच आहे, पण मी स्वतः एक माणूस म्हणून दाभोलकरांना समजून घेताना या गोष्टींचा देखील विचार करतो.

In reply to by आनन्दा

अवांतर दाभोलकरांचा खून त्या खुनाने ज्याचा सर्वाधिक फायदा होईल अश्या माणसाने केला आहे, आणि सनातन ला दाभोलकर मेल्याने काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे निशापरी याना विनंती आहे की या बहुपदरी राजकारण असणाऱ्या घटनेतून कोणतेही एकांगी निष्कर्ष काढू नयेत..

In reply to by आनन्दा

सहमत नाही. सनातन संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या विचार मार्गाच्या आड येणारी चळवळ म्हणजे अंनिस. व अंनिसच्या म्होरक्यालाच संपवले तर चळवळ भरकटेल. प्रत्येक गोष्ट ही आर्थिक फायद्यासाठी करत नाहीत. आपल्या विचारांच्या प्रसाराला दाभोळकरांच्या चळवळीने क्षति पोचते. मग त्यांना संपवा. हा विचार विरोधी लोकांनी केला असण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता व्यक्त करणे म्हणजे निष्कर्ष नव्हेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गांधींच्या अनुभवानंतर माझ्या मते विचार संपवण्यासाठी माणूस मारण्याचा मूर्खपणा कोणी करेल असे वाटत नाही. जर तसा तो सनातन ने केला असेल तर ते समजून घेणे माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. पण माझे अनेक मित्रा सनातन चे साधक आहेत, आणि ते मुंगी सुद्धा मारत नाहीत. त्यांचा लढा सूक्ष्म पातळीवर आहे, त्यांना व्यक्ती मारण्यात रस नाही. व्यक्तिमागील प्रेरणा आणि ऊर्जा मारण्यात रस आहे. माणूस मेला तर त्याला सहानुभूती मिळते हे ते पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळे मी या बाबतीत सनातनला पूर्णपणे निर्दोषत्व देतो, किमान माझ्यापुरते तरी.

In reply to by आनन्दा

व्यक्तिशः मला सनातन चे विचार जरी पटत नसले तरी त्यांची साधनाशुचिता वादातीत आहे माझ्यालेखी.
जमलं तर निसर्गदत्त महाराजांचे "I am that" हे पुस्तक किंवा रमण महर्षी यांच्या आश्रमाने प्रकाशित केले त्यांचे संवाद वाचा. कदाचित, साधना काय असते हे तुम्हाला नव्याने कळेल.

काही लोक वयपरत्वे म्हणजे जस्ं जस्ं वय वाढत चालतं तसं तसं श्रद्धाळु होत जातात, स्पष्टच सांगायचंच तर जगरहाटीतल्या अनुभवांनी पिचल्यावर लोक देवधर्माकडे वळतात असे वाटते. अर्थात त्या बाजूला वळतात म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला असे वाटत नाही. हा ज्याच्या त्याच्या आनंदाचा भाग आहे. पण,आयुष्याच्या मध्यावर देवाशी भांडण असणारे, त्यांच्याशी टक्कर घेणारे हळूहळू हरिभजन, स्मरण, नामस्मरण, याकडे वळतात असे वाटते. -दिलीप बिरुटे (मध्यातून उत्तरार्धाकडे दृष्टिक्षेप टाकणारा) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे बदल मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रियेमुळे होत असतात. मेंदुतला माणूस पुस्तकात या विषयी अधिक माहिती आहे. मे.पु रेग्यांचे विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा हे ही पुस्तक जरुर वाचा

In reply to by प्रकाश घाटपांडे

"देव अस्तित्वात नाही आणि देवाने हे विश्व निर्माण केलेलं नाही," असं म्हणना-या स्टीफन हॉकिंगच्या मेंदूत असे बदल का झाले नसतील असे मला राहुन राहुन वाटते. आपण सुचवलेलं पुस्तक सवडीने वाचेन. मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. >> हीच मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रिया आहे अस मी वर म्हटलय. गॊड डिल्युजन हे डॊकिन्सच पुस्तक मुग्धा कर्णीक यांनी मराठीत अनुवादित केल आहे. ते ही जरुर वाचा. अस्तिक नास्तिक असे बाउंडरी लाईन वाले कंपार्टमेंट नसतात. ते स्केलवर घेतल आहे त्यांनी. काळी पांढरी विभागणी ही खूपच बाळबोध असते.पण आकलनाच्या प्राथमिक टप्प्यावर त्याचा उपयोग होतो.

शनिला तेल वाहणे आणि अंधश्रद्धा याचा काय संबंध? ----------------- अनिसला किंवा दुसऱ्या कुणाला नकोशी वाटणारी अंधश्रद्धा कोणती? ---------------------------- निरंथन घाटे ज्या अंधश्रद्धेवर टीका करत होते ते कोणते मुद्दे? -----------------------

हे जग देवाने निर्माण केले आहे आणि त्याचे नियंत्रण सुधा तोच करतो अशी माणसाला वाटत कारण अजुन सुद्धा जगातील खूप गोष्टी कशा घडतात ह्याचे कोडे मानव सोडवू शकला नाही . जगाचा कोणीतरी निर्माता आहे हे समजणे श्रद्धा आहे की अंध श्रद्धा . विज्ञान सुद्धा जग कसे निर्माण झाले हे शोधत आहे ते आणि जे प्रमेय मांडले आहेत त्यात सुद्धा तर्काचाच भाग आहे . जीव कसा निर्माण झाला हे विज्ञान सांगते . पण प्रतकाशात प्रयोग शाळेत जिवनिर्मितच्या काळातील वातावरण निर्माण करून मुंगी एवढं सुद्धा जीव निर्माण केलेल्या च उदाहरण नाही . विज्ञान आणि आस्तिक असणे हे परस्पर विरोधी वर्तन नाही दोन्ही समांतर विचार आहेत . पण विज्ञान वादी असण्याच सिद्ध करण्यासाठी नास्तिक असणे हे बिलकुल गरजेचं नाही . धर्मात म्हणजे हिंदू धर्मात पर धर्मावर मी बोलू इच्छित नाही तो अधिकार सुद्धा नाही . कर्म करा असेच सांगितले आहे कर्म करू नका देव तुम्हाला देईल असे हिंदू धर्म सांगत नाही . चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल वाईट कर्म केले तर शिक्षा . आणि हा विचार समाज विघातक नक्कीच नाही आणि ह्या विचाराचा पगडा असल्या मुळे बरीच लोकं वाईट काम करायला धजवत नसतं . विरोध हवा पण धर्माला आणि देवाला नको (जो पर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत देव ही कल्पना नष्ट होवू शकत नाही ),तर कर्मकांडाला विरोध हवा . विज्ञान म्हणजे काही वेगळं नसतं अनुभव मधून शिकणे हा सर्व सजीवांची उपजत वृत्ती असते . माणूस असाच अनुभवातून शिकून ,प्रयोग करून आताच्या आधुनिक स्थितीत पोचला आहे त्याच्या ह्या प्रगतीत धर्म आणि देव कधीच अडसर ठरली नाहीत . पण आत्ताच का काही लोकांना त्याची अडसर वाटू लागली आहे .ह्यात फक्त समाजसुधारणा हा हेतू आहे हे काही पटत नाही . संस्कृती हे प्रकरण अजुन वेगळं आहे . पाणी नास्तिक किंवा हिंदू धर्म विरोधी लोक श्रद्धा,आणि संस्कृती ची मिसळ बनवून तिसराच पदार्थ निर्माण करतात जो त्यांना टेस्टी लागतो . पण ती चव आस्तिक लोकांना कडवट लागते

माणसाच्या मेंदूत जी अधभुत ताकत आहे ती निसर्गाने दिली आहे . ह्यात विज्ञान चा काहीच हातभार नाही . बाकी प्राण्यांचा मेंदू विकसित झाला नाही फक्त माणसाचा झाला ह्यात आपले काहीच योगदान नाही ती देणगी आहे .

कर्मकांडाला विरोध हवा कर्मकांडाला टोकाचा विरोध असू नये. जोवर कर्मकांड तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणत नाही तोवर त्याला विरोध नसावा. कर्मकांड हे सुद्धा मानवी मनाला आधार देते. जपाची माळ हातात घेऊन जर एखाद्या भयभीत माणसाला मानसिक आधार मिळत असेल किंवा भूमीपूजा ग्रहशांती केल्याने एखाद्या मनाला दिलासा मिळत असेल तर त्याला टोकाचा विरोध असू नये. जागेचे भूमिपूजन किंवा ग्रहशांती इ कोणतेही कर्मकांड न करता गृह प्रवेश करणारे लोक मिपावर १ % सुद्धा नसतील याची मला १०० % खात्री आहे. आणि यातील बरेच लोक बायकोला/ आईला हवं म्हणून ते( कर्मकांड) करतो असे समर्थनही करताना आढळतील. ( त्यात त्यांनाही ५ % किंवा १० % का होईना समाधान वाटत असतंच). महा नास्तिक लोक सुद्धा व्हिस्की गोल कटग्लासात, वाईन हि उंच अशा वारुणी चषकात आणि रम गोल ग्लासातुन पितात. , त्याच बरोबर व्हिस्की बरोबर सोडा घेतला पाहिजे आणि खायला व्होडका बरोबर निळे चीज स्कॉच बरोबर गौडा किंवा चेदार चीजच खाल्ले पाहिजे. साखरपुड्याला वाग्दत्त वधूला हिऱ्याची अंगठीच दिली पाहिजे. वाढदिवसाला केक कापलाच पाहिजे. हे सर्व कर्मकांडच आहे. शेवटी काय तर अतिसर्वत्र वर्जयेत

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे. पुरोगाम्यांची कर्मकांड थोडी वेग्ळी असतात. दीपप्रज्वलन करुन उद्धाटन व हम होंगे काम याब ने सांगता. काही ठिकाणी कालबाह्य कर्मकांडाला कालसुसंगत पर्याय देउन आपलेसे केले असते.मनुष्य हा शेवटी होमो सेपीयन च ना! होमो डेअस कडे वाटचाल चालू आहे संथगतीने

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुमच्या कडून ह्या प्रतिसाद मध्ये शब्द खेळ केलेला जाणवतो . कर्मकांड हे कर्मकांड च असते ते काळानुसार बदलत असलं तरी त्याचा अर्थ बदलत नाही . .

In reply to by Rajesh188

कर्मकांड म्हणजे ते वाईटच वा अंधश्रद्धच असे नाहीये. कर्मकांड हे कर्मकांडच त्याला कृष्णछटा ही शोषण व त्रासदायक बाबी असलेल्या कर्मकांडामुळे मिळाली.

In reply to by सुबोध खरे

कर्मकांड मला अपेक्षित नरबळी देणे कोंबड्या किंवा बकरे कापणे धर्मा च्या नावावर . करणी निवारण म्हणून विधी करणे. आणि अशा पद्धतीची कर्मकांड नष्टच झाली पाहिजेत. सती ची प्रथा त्या काळी योग्य असेल (जेव्हा यवन हिंदू स्त्रियांची इज्जत लुटायचे )पण आता काळ बदलला आहे ती नष्ट झालीच आहे. आणि हा बदल हिंदू धर्म विज्ञान वादी आणि लवचिक असल्या मुळे झाला आहे . अशा प्रकारच्या रुढीला मी कर्मकांड संबोधलं आहे .. गणेश पूजन वास्तू पूजन सरस्वती पूजन वट पौर्णिमा झाडाचे पूजन.. सर्प पूजन ह्याला माझा विरोध नाही कारण ह्या सर्वात गहन अर्थ आहे

In reply to by Rajesh188

कर्मकांड का करायचं? हेतू काय? कर्मकांडात आणि जवळपास सगळ्याच बाबतीत हा हेतूच महत्वाचा असतो. अपाय होत नसेल पण उपयोगही होत नसेल, तर ते कर्मकांड करण्यात वेळ घालवायचाच का बरे? पूजा करणं हे कर्मकांड झालं? की पूजा अशीच झाली पाहिजे हे कर्मकांड झालं? त्याचं उत्तर पूजा का करायची यात आहे. हेतू जर भगवंताचं स्मरण करणे, कृतज्ञ असणे, प्रेम असणे या सारख्या काही कारणांसाठी असेल, तर मनापासून केवळ हात जोडून नमस्कारही पुरेसा आणि ते देखील कर्मकांडच की. आता यात जर दृढ श्रद्धा असेल की मी भगवंताला त्याच्याविषयीचं प्रेम मनापासून मागितलं तर ते नक्की मिळेल, तर ती श्रद्धा योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याची आपल्यासारख्यांना गरजच काय? श्रद्धेची कसोटी कसोटीच्याच क्षणी होते. त्यावेळेस ती दृढ राहण्यासाठी आचराची फार मोठी पूंजी लागते. असो. अवांतरः सती जाणं आणि सती देणं ह्या दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. एकात त्या व्यक्तीशिवाय जिवंत राहण्यात देखील काही अर्थ नाही अशी टोकाची सर्वसंगपरित्यागाची भावना आहे आणि दुसर्‍यात सदोष मनुष्यवध आहे. यवनांपासून वाचण्यासाठी जोहार करणे आणि सती जाणे ह्या देखील भिन्न गोष्टी आहेत. तेवढ्याच उत्कट आहेत आणि अत्यंत हेलावणार्‍या आहेत. यातल्या कोणाचंही समर्थन कोणीच करणार नाही. फक्त त्या कृतींमधील फरक मांडावासा वाटला.

In reply to by सुबोध खरे

खरे बुवांनी ( हे बुवा एकदम सपष्ट ) सुखी व निर्धोक आयुष्याचा मार्गच सांगितला आहे ! श्रद्धा ही कंट्रोल प्लस की आहे ( मॅक्रोस ? ) पण तिच्यात स्वअनुभवांचे घटक वापरले तर तो अधिक निरदोष मॅक्रॉस सिद्ध होतो .इथे श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक पडतो .घाईघाईने निश्कर्श काढणे यात अंधश्रद्धा पूढे असते कारण असा निष्कर्ष काढणे सोपे असते व माणसाला सोपेपणा भावतो .

अतिप्राचीन काळी बनलेली थडगी (pyramid) Kashi बनली असतील . मानवी शरीर ( मृत्यू नंतर)खूप दिवस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काय करावे लागत हे तेव्हा अतिप्राचीन काळी कसे माहीत होते . ह्या वर प्रकाश टाकण्याची तसदी नास्तिक लोक घेत नाहीत . प्राचीन मंदिरांची शिल्पकला ही अत्यंत सुंदर आहे जेव्हा काहीच आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नव्हती तेव्हा अशा वास्तू निर्माण कशा झाल्या होत्या. हा प्रश्न नास्तिक लोकांना कधीच पडत नाही .

निशापरी,
दाभोलकरांनी केलेल्या स्कॅमबद्दल तुम्ही लिंक दिलेली साईट सोडून अख्ख्या गुगल आणि युट्युबवर एक अक्षरही सापडलं नाही .
तुम्ही धर्मादाय आयुक्तांच्या नोंदी प्रत्यक्ष पाहून खात्री करू शकता. इथे एक पन्नास एमबी व चाळीस पानांची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financia… हिच्यातल्या नोंदी या प्रत्यक्ष शासकीय खात्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष प्रती आहेत. वाचून समजून घ्या व खात्री करवून घ्या. आ.न., -गा.पै.