प्रस्थापितांचे सामाजिक भान
लेखनप्रकार
या लेखात प्रस्थापित म्हणजे ज्यांनी जीवनातील अनिश्चितता संपवून स्थैर्य प्राप्त केले आहे असे सर्व जण. आता यातील प्रत्येक जण जाणीव पूर्वक समाजाकरिता काही करेलच असे नाही. परंतु ज्या देशात पदोपदी तुम्हाला जीवनाशी झगडणारे लोक दिसतात तेथे प्रस्थापितांकडे आपसूकच 'टॉर्च बेअरर' या अर्थाने बघितले जाते. आणि म्हणून त्यांचे सामाजिक भान असणे किंवा नसणे हे देखील इतरांसाठी महत्वाचे असते.
तर हा असा प्रस्थापित एकूणच समाजासाठी आणि देशासाठी कळत नकळत महत्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाने जर पुरोगामी भूमिका पत्करली तर इतर समाज घटक देखील अशा गोष्टींचे अनुकरण करतात. असा हा प्रस्थापितांच्या गट आज आपल्याला पदोपदी प्रतिगामी, सनातनी भूमिका घेताना दिसतो. आषाढी एकादशीचेच उदाहरण घ्या. तीस वर्षांपूर्वी पुण्यात पालखी येण्याचा दिवस आणि आषाढीच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा विठ्ठलाची शासकीय पूजा करतानाच फोटो सोडला तर त्याची फारशी चर्चा नसायची. आज सलग तीन आठवडे सर्व आघाडीची वृत्तपत्रे, टेलिव्हिजन पालखीचा मागोवा घेतात. समाजधुरिणांना तर श्रावण भाद्रपदात जशी भटजींची चलती असते तशी चलती प्राप्त झालेली असते. वारीला नाही नाही ते गुणविशेष बहाल करून लेख पाडणे, त्यावर भाषणे देणे असा प्रकार चालतो. आज एकूणच आरोग्याची परिस्थिती बरी आहे नाही तर पूर्वी वारी म्हणजे पटकीची साथ पुढेपुढे घेऊन जाणारा माणसांचा जथा होता.
जुन्या वेडगळ चालीरीती पुन्हा एकदा घासून पुसून वर आणण्यात येत आहेत. एकदा एका प्रथितयश 'टीम बॉण्डिंग ' चा सोहळा पार पडणाऱ्या संस्थेत एक रात्र राहण्याचा योग्य आला. तेथील आय.आय.टी. प्रशिक्षित चालकांनी संध्याकाळी घंटीनाद करण्याच्या प्राचीन संस्कृतीचे आम्हाला वैज्ञानिक महत्व सांगितले ते असे कि देवघरात घंटीनाद केल्यामुळे डासांची अंडी फुटतात! अशाच प्रकारे 'पलंगतोड' ताकदीसाठी भिकबाळीला परत झळाळी प्राप्त झाली आहे.
व्रतवैकल्य, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान आणि त्या निमित्ताने वाढणारी सामाजिक दरी याचा जनू विसर पडल्यासारखी अवस्था झाली आहे. एवढा प्रचंड लोकसंख्येचा देश केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक सलोखा यांच्या बळावरच तगू शकतो पण समाज म्हणून आपली द्विधा मनःस्थिती आहे. मोठमोठे उत्सव साजरे करण्याआधीचे कवित्व आणि नंतरचा मनःस्ताप असे दोन परस्पर विरुद्ध अनुभव आपण आजकाल वारंवार घेत आहोत.
सध्या तरी, मी माझ्यापुरता हा विरोधाभास थांबविला आहे. घरात कोणत्याही प्रकारचे धार्मिक अवडंबर माजविले जाणार नाही याची मी काळजी घेतो. गणपतीला पत्री, दसऱ्याला आपटा, आंब्याच्या डहाळ्या यांना फाटा दिला आहे. संस्थळावरील अजून काही लोक यात सामील झाले तर नकळत एक चांगला बदल आपल्या आजूबाजूला होऊ शकतो एवढेच या लेखाचे प्रयोजन.
वाचन
7588
प्रतिक्रिया
0