✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......

ज
ज्योति अळवणी यांनी
Sat, 05/25/2019 - 20:42  ·  लेख
लेख
२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने....... एक शहरात राहणारी, मध्यम वयातील स्त्री; देशात होणाऱ्या सततच्या राजकीय घडामोडींमुळे जिच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही तिने २०१९ च्या देशाच्या निवडणुकीत मनापासून मतदान केलं. मोठी लाईन लागलेली होती मतदानासाठी. खूप उकडत होतं; प्रौढ मतदारांना पुढे जाण्याची परवानगी असल्याने असलेल्या रांगेमध्ये देखील अजून वेळ लागत होता... तरीही ही स्त्री उभी होती. 'मी माझा मतदानाचा हक्क.... किंबहुना जवाबदारी जर आज पूर्ण केली नाही आणि असंच एक-एक करत अनेकांनी मत दिलं नाही तर कदाचित काँग्रेस म्हणजेच पर्यायाने राहुल गांधी निवडून येईल.... नको रे बाबा! मोदीच बरे आहेत.' अशी भावना तिच्या मनात होती आणि रांगेत उभं राहून इतरांशी बोलताना तिच्या लक्षात येत होतं की इतरांच्या मानत देखील हेच भाव आहेत.... आणि मग 'मोदीच बरे आहेत'; असं आपल्याला का वाटतंय बरं याचा ती विचार करायला लागली. मोदी आल्यामुळे माझ्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही हे खरंय; पण....... अलीकडे कॉलेजमध्ये जाणारी माझी दोन्ही मुलं देशात होणाऱ्या घडामोडींवर बोलताना दिसतात. माझ्या तारुण्यात काहीतरी बफोर्स नावाचा भ्रष्टाचार झाला होता. जन्मले तेव्हा इमर्जन्सी का असंच काहीतरी होतं असं आई सांगायची. पण आपण कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं देशात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूक असणं....... मनाला समाधान देऊन जातं.  मोदींनी 'घर घर शौचालय' योजना सुरू केल्याचं वाचलं आणि घरी कामाला येणाऱ्या आशाताईंना त्याबद्दल सांगितलं. त्यांच्या सासूबाई तशा बऱ्याच वृद्ध आहेत त्यामुळे त्यांना सार्वजनिक शौचालयात जायला खूप त्रास व्हायचा. रात्री घरातच पॉट द्यावं लागायचं. घरात सासूबाई आणि आशाताईंव्यतिरिक्त त्यांच्या दोन वयात आलेल्या मुली आणि एक मुलगा आणि नवरा इतकी माणसं. त्यामुळे पॉट देताना देखील खूप अडचण असायची. त्यामुळे त्यांनी 'घर घर शौचालय' बद्दल लगेच चौकशी सुरू केली. जवळ जवळ तीन वर्षांनंतर त्यांच्या घरात त्यांनी शौचालय बांधून घेतलं. त्या म्हणाल्या खूप मागे लागावं लागलं हो; पण आता समाधान वाटतं. लेकी देखील मोठ्या झाल्यात. बाहेर जाण्यापेक्षा आता त्या घरातलंच शौचालय वापरतात. आशाताईंचं बोलणं.......... मनाला समाधान देऊन गेलं. एकदिवस नवरा ऑफिसमधून आला आणि म्हणाला आपण गॅसची सबसिडी सोडून देऊ. मी लगेच हिशोबाला बसले. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. मग गॅस कंपनीमध्ये जाऊन चौकशी करून सगळ्या formalities पूर्ण केल्या. अलीकडे अनेक जाहिराती बघते आहे की गावांमधल्या स्त्रियांना गॅस मिळायला लागला आहे. आता त्यांचा लाकडं जमवून चूल पेटवायचा त्रास बंद झाला आहे. एका स्त्रीचा सुखावलेला चेहेरा जाहिरातीत दिसतो. कदाचित ती खरी महिला नसेलही. कोणी कलाकार असेल. पण त्या जाहिरातीत सत्यता आहे; हे............ मनाला समाधान देऊन जातं. २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते झाडायला सुरवात केली तेव्हा मनात आलं होतं... काय पण स्टंटबाजी आहे. असं पंतप्रधानाने झाडल्याने स्वच्छता होते का? इतर महत्वाची कामं सोडून हे काय करायला लागले मोदी? पण अलीकडे घराच्या कोपऱ्यावरची कचरा पेटी वाहून जात नसते... आणि असलीच तर मी लेकाला त्याचा फोटो काढून फेसबुकवर टाकायला सांगते. लगेच सफाईला सुरवात होते. हा दिसणारा बदल........ मनाला समाधान देऊन जातो. मोदींच्या काळात समजायला लागलं की आपले जवान किती प्रतिकूल परिस्थितीत राहातात. पाकिस्तान सतत त्यांच्यावर छुपे हल्ले करतच असतो. आजवर आपल्या जवानांचे हात बांधलेले होते. त्यामुळे ते फक्त स्वतःचा बजाव करत होते. पण आता केंद्र सरकारने त्यांना free hand दिला आहे. त्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आपले जवान देखील जोरदार उत्तर द्यायला लागले आहेत. माझ्या देशाच्या सीमारेषा आता सुरक्षित हातात आहेत. गेली पाच वर्ष देशाचे पंतप्रधान दिवाळी त्या जवानांमध्ये जाऊन साजरी करतात. हा विचार........ मनाला समाधान देऊन जातो. नोट बंदीचा किती त्रास झाला. इतकी चिडचिड व्हायची माझी. मी एकटीच होते न रिकामटेकडी घरात. त्यामुळे सतत बँकेच्या रांगेत जाऊन उभं राहायला मीच होते. त्यात पै-पै जोडून नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये बँकेत जमा करायला लागले होते. इतका राग आला होता त्या मोदींचा. यांचं काय जात एका दिवसात सगळं बदलायला? याला ना घर ना दार.... ना बायको ना पोर.... आमचं कसं होणार? पण मग एक दिवस एक रिक्षावाला भेटला. म्हणाला भाभी घर मे बहुत पैसा पडा था. तो मैने बीबी का अकाऊंट खोला. मोदीने लेडीज को जादा फायदा दिया हें ना बँक मे. बहुत तकलीफ हुवा. लेकीन अपने को तो सिर्फ लाईन मे खडा रहना था. ये काला पैसा वालोको मोदीने अछा सबक सिखाया. त्याचं बोलणं ऐकलं आणि मनात आलं खरंच की; खोट्या नोटा आता बंद होतील. मला माझे दीड लाख नवऱ्याला सांगावे लागले. पण ते माझ्या अकाऊंट मध्ये जमाँ तर झाले. हे काळा पैसा वाले तर कर्माने गेले. मग लक्षात आलं; कितीतरी लोकांनी माझ्याप्रमाणे पैसे बँकेत ठेवायला सुरवात केलीय. त्यामुळे देशाची आथिर्क स्थिती सुधारते आहे. हे सगळंच...... मनाला समाधान देऊन जातं. तसं बरंच काही केलं की त्यांनी. अधून मधून नवरा आणि मुलांच्या चर्चमधून कळत असतं आपल्याला. ती अजूनही मतदानाच्या रांगेत उभी होती. अजूनही ती विचार करत होती. तरीही 'मोदीच बरे' अस का?  तिच्याच मनाने तिला विचारलं...... मग कोण राहुल गांधी? त्याचं ते बालिशपणे वागणं. मोदींना त्याने म्हणे भर संसदेत मिठी मारली होती आणि मग डोळा मारला होता. बघितला होता मी तो व्हिडियो. शोभतं का हे असलं वागणं त्याला? अरे लग्न नाही केलंस तू. पण म्हणून तू काही पंचवीशीतला नाहीस न. आमच्या देवेंद्र फडणविसाच्या वयाचा आहेस. त्याची प्रगल्भता बघ की जरा. राज्य चालवतो आहे तो. दिसायला कसा गोंडस बाळासारखा आहे. कायम हसतो. वाटतं आपलं सगळं म्हणणं एकूण घेईल. पण पक्का आहे हो निर्णय घेताना. 'मनात आलं तेच केलं; विकासाच्या मार्गाने राज्याला नेलं;' हे दाखवून दिलं की त्यानं. नाहीतर तू! माझे बाबा महान.... माझी आजी महान... मी.... माझी आई... माझी बहीण.... यातच अडकलास. तू जर झालास पंतप्रधान तर मलाच देश सोडून जावं लागेल. समजा मोदीही नाही आणि राहुल देखील नाही..... मग कोण ती ममता? की ते यादव? अरे देवा! मोदींनी काही सगळे प्रश्न सोडवले नाहीत. पण किमान त्यांच्या असण्याने प्रश्न सुटतील ही आशा आहे. अजून तास लागला तरी चालेल मत देऊनच बाहेर पडणार मी!!! एकदाचा तिचा नंबर लागला आणि मतदान करून आणि आपण केलेल्या मतदानाची खात्री करून ती समाधानाने बाहेर पडली. मात्र............. २३ मे ला घरातले सगळे बाहेर पडले आणि तिने टीव्ही चालू करून ठेवला. आपली कामं आवरताना अधून मधून ती अंदाज घेत होती. 'काय होतंय ग बाई? मोदीच आले पाहिजेत हो.' तिने आशाताईंना म्हंटलं. त्या देखील म्हणाल्या;"वहिनी, त्योच येणार हो. मला काय बी चिंता न्हाई." आशाताईंचा आत्मविश्वास बघून तिला देखील बरं वाटलं. दुपार पर्यंत तिला देशाचा कल समजायला लागला आणि समाधानाने तिने टीव्ही बंद केला. संध्याकाळी नवरा आला तोच सांगत की मोदींच भाषण आहे आता आणि परत एकदा तिने घाईघाईने टीव्ही लावला.  मोदी म्हणत होते....... तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नाही देणार. फक्त आणि फक्त देशाचाच विचार करिन. पुढच्या पाच वर्षात जितकी म्हणून प्रगती करणे शक्य आहे ती करेन. कदाचित चूक झाली तर ती सुधारेन.... पण चूक त्याचीच होते जो मार्गक्रमण करतो आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहात त्याने फुशारून जाणार नाही. चला कामाला लागुया! रात्रीच्या जेवणाची तयारी करताना तिच्या मानत येत होतं आईचे संस्कार चांगले हो! शहरातली असो किंवा गावातली. शिक्षित असो किंवा अशिक्षित..... संस्कार तर तेच असतात न!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
23556 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

सुंदर.

जानु
Sat, 05/25/2019 - 22:05 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय.

उगा काहितरीच
Sat, 05/25/2019 - 22:12 नवीन
छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख.

सतिश म्हेत्रे
Sat, 05/25/2019 - 23:13 नवीन
सुंदर लेख.
  • Log in or register to post comments

:-)

राघव
Sat, 05/25/2019 - 23:37 नवीन
:-) साधारण सर्वत्र सामान्य घरात असलेली भावना लिहिलीत. सुंदर !
  • Log in or register to post comments

>>> साधारण सर्वत्र सामान्य

मोदक
Sun, 05/26/2019 - 00:04 नवीन
>>> साधारण सर्वत्र सामान्य घरात असलेली भावना लिहिलीत. सुंदर ! हेच बोल्तो. सुंदर मनोगत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

मनापासून धन्यवाद

ज्योति अळवणी
Sun, 05/26/2019 - 03:03 नवीन
मनापासून धन्यवाद खरच जे मनात होतं तेच तसच लिहीत गेले
  • Log in or register to post comments

+1

जालिम लोशन
Sun, 05/26/2019 - 07:13 नवीन
ग्रेट
  • Log in or register to post comments

छान लिहिलेय !

प्रसाद_१९८२
Sun, 05/26/2019 - 10:59 नवीन
छान लिहिलेय !
  • Log in or register to post comments

सहमत

गोंधळी
Sun, 05/26/2019 - 11:10 नवीन
साधारण सर्वत्र सामान्य घरात असलेली भावना लिहिलीत. सहमत.अगदी हेच सेंटिमेंन्ट्स आहेत. पण आता यापुढे सामान्य जनतेने अल्पसंतुष्ट राहु नये. त्याच्या अपेक्षा वाढवाव्यात व जागरुक राहुन सेंटिमेंन्ट्सवर नाही तर रियालिटी वर सगळ्या गोष्टींकडे पहावे.
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यानंतर ६५ वर्ष

डँबिस००७
Sun, 05/26/2019 - 14:22 नवीन
स्वातंत्र्यानंतर ६५ वर्ष उलटली तरी सुद्मा जनतेला मुलभुत गरजांवरच लधाव लागत होत हे लाजिरवाण आहे ! तरी बर ह्या काळात राज्य केल महान कॉंग्रेस पक्षाने ज्या पक्षाने चळवळीतुन स्वातंत्र मिळवुन दिले अस सांगीतल जात. त्याच पक्षाला भ्रष्ट्राचारामुळे पाय उतार व्हाव लागल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

अभ्यास वाढवा..

प्रियाभि..
Tue, 05/28/2019 - 15:23 नवीन
स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या देश प्रगतीच्या शिखरावर पोहचायला हवा होता असे म्हणायचे आहे का आपणास? ब्रिटिशांनी सर्व लुटून नेल्यानंतर आणि भारताचे दोन तुकडे केल्यानंतर देश चालवणे सोपे असेल असे वाटते काय? पंडित नेहरू व त्यांच्यासारखे इतर दूरदृष्टीचे सदस्य आपल्या सभागृहांमध्ये होते (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) हे खरे भाग्य आहे देशाचे. Fundamental research, ISRO, Atomic Reaserch यासारख्या क्षेत्रात देश पुढे गेला हे त्यांच्यामुळेच. हे फक्त आपण साठ वर्षात मिळवलंय हे लक्षात घ्या. या तयार पार्श्वभूमीवर पुढे प्रगती करणे जास्त सोपे आहे. ता.क. : गांगुली आणि धोनीची सुरुवातीला तुलना करताना असं म्हटल जायचं की'Ganguli is best Captain of Indian team and Dhoni is captain of best Indian team'. तयार झालेल्या खेळपट्टीवर खेळणं जास्त सोप असत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

प्रियाभि

ज्योति अळवणी
Tue, 05/28/2019 - 17:31 नवीन
प्रियाभि मान्य आहे की तयार खेळपट्टीवर खेळणं जास्त सोपं असतं. नेहेरूनी खूप प्रगतीपथावर आणलं भारताला. इंदिराजींनी देखील राजकारणापेक्षा देशाचा विचार अगोदर केला. पण मग त्याच खेळपट्टीवर राजीव गांधी का आपटले? 'भारतीय' सोनिया गांधींना पपेट सरकार सोबत का नाही घोडदौड पुढे करता आली? प्रत्येक निवडणुकीनंतर सुट्टीवर जाणाऱ्या गांधी परिवरपेक्षा कधीच सुट्टी न घेणारे मोदी जास्त convenience होतात इतकंच. म्हणजे भासरतीय जनता पक्षाचे सर्वच नेते तसे आहेत असं मुळीच नाही. पण 'खात नाही; खाऊ देत नाही' म्हणणारा नेता स्वातंत्र्यापूर्व आणि नंतर जन्मलेल्या कोणत्याही पक्षात दिसला नाही हे दुर्दैव. अर्थात कोणीच महान नसतं. पण आजच्या मतदाराला किमान आशादायी नेता कोण हे कळलं आहे असं वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाभि..

ईतिहासाचा आपला अब्यास खुप

डँबिस००७
Wed, 05/29/2019 - 11:31 नवीन
ईतिहासाचा आपला अब्यास खुप सखोल आहे अस दिसतय , तरी पं नेहरुं बद्दल भरभरुन बोलत आहात. आम्हाला माफ करा जी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाभि..

नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये

mayu4u
Sun, 05/26/2019 - 12:38 नवीन
पुढे वाचू शकलो नाही राव!
  • Log in or register to post comments

:) खिक्क!

जॉनविक्क
Wed, 06/26/2019 - 21:27 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

मस्त लिहिले आहे ज्योती ताई,

उपेक्षित
Sun, 05/26/2019 - 17:16 नवीन
मस्त लिहिले आहे ज्योती ताई, नेहमीचे लांगुलचालनाचे लेख वाचून कंटाळा आला होता पण तुम्ही मात्र मनापासून लिहिले आहे ते जाणवले (तरीही थोडे दवणीय वाटले मला पण तो माझा दोष)
  • Log in or register to post comments

जबरा

नाखु
Sun, 05/26/2019 - 20:58 नवीन
डोळे बंदच करुन वाळूत तोंड खुपसून बसलेल्या विचारवंत शहामृगांना हे वाचून तरी सुबुद्धी येवो हीच सदिच्छा. मला पेट्रोल, कोथींबीर स्वस्त मिळाली आणि त्याच्या बदल्यात देशातील करोडो रुपये घोटाळे केले तरी चालेल अशी मानसिकता असणारे शहरी आणि कागदोपत्री फेरफार करून लायक नसतांनाही अनुदाने आणि सवलती लाटणारे ग्रामीण यात फारसा फरक नाही. मी माझी नागरिक म्हणून असलेली काही कर्तव्य पार पाडत असताना जवळच्या लोकांना सुजाण नागरिक बनविले तरी पुरेसे आहे. मोदींचा चुका जोपर्यंत विकास काम आणि सुशासन यांच्या आड येत नाहीत तोपर्यंत काही अडचण नाही. ज्या क्षणी ते गंभीरपणे चुकतील तेंव्हा जनताच त्यांना जागा दाखवून देईल हे नक्की. या विचारवंत आणि उच्चशिक्षित लोकांना चांगल्या कामासाठी दखल न घेण्याचा करंटेपणा करायचाच असेल तर सतत विरोधात तक्रारही करण्याचा अधिकार कसा काय?? अगदीच चिल्लर असलेला पण गेली पाच वर्षे भाजपा भक्त सर्टिफाईड ( प्रमाणपत्र मिपा विचारवंत, बुद्धीमंत,आणि किर्तीवंत यांजकडून प्राप्त) वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

छान लेख.

इरामयी
Wed, 06/26/2019 - 21:11 नवीन
छान लेख. https://youtu.be/hwnnn1M-T5U
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान

पुणेरी राघूमैना
Sun, 05/26/2019 - 22:38 नवीन
छान
  • Log in or register to post comments

इथे मिपावर बरेच तज्ञ आहेत असे

एमी
Mon, 05/27/2019 - 05:57 नवीन
इथे मिपावर बरेच तज्ञ आहेत असे वाटतेय त्यामुळे एक प्रामाणिक टेक्निकल प्रश्न: ती जी घरघर शौचालय योजना आहे, त्यातली पाण्याची सोय आणि ड्रेनेज व्यवस्था कशी इंप्लिमेंट केली आहे (२०-२५ दिवसातून एकदा पाणी येणाऱ्या ठिकाणी)?
  • Log in or register to post comments

मी तज्ज्ञ अजिबात नाही. तुमचा

यशोधरा
Mon, 05/27/2019 - 16:57 नवीन
मी तज्ज्ञ अजिबात नाही. तुमचा प्रश्न वाचून थोडी शोधाशोध केली असता खालील माहिती मिळाली - शौचालय बांधकाम करताना "वाँटरसिल, जलबंध" असते, ज्यात मैला पडतो व 5-10 लिटर पाणी फ्लश केल्याशिवाय पुढची व्यक्ती संडास वापरू शकत नाही. वाँटरसिल ऐवजी अँक्वाप्रिवी संडास रचनेत मैला पाणी फ्लश न करता , सेप्टिक टाकीत पडतो व 5-10 लिटर पाणी वाचते. तुमच्या प्रश्नाचे हे पूर्ण उत्तर नाही, ह्याची कल्पना आहे. ते शोधत आहे, तूर्तास ही माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

ती जी घरघर शौचालय योजना आहे,

ऋतुराज चित्रे
Mon, 05/27/2019 - 19:00 नवीन
ती जी घरघर शौचालय योजना आहे, त्यातली पाण्याची सोय आणि ड्रेनेज व्यवस्था कशी इंप्लिमेंट केली आहे (२०-२५ दिवसातून एकदा पाणी येणाऱ्या ठिकाणी)? स्व.भा. योजने अंतर्गत ग्रामीण भागातील शौचालये कमीतकमी दोन सोक पिटने (शोष खड्डे ) बांधणे अनिवार्य आहे. परंतु हा नियम पाळला जात नाही. शोष खड्ड्यासाठी विटांचा वापर केला जातो, मैल्यातील पाणी विटा शोषून घेतात,त्यामुळे मैला वाहून नेण्याकरिता पाइपलाइनचा खर्च वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

सुंदर!

समीरसूर
Mon, 05/27/2019 - 17:11 नवीन
सुरेख लिहिले आहे. पटले. २०२४ मध्ये पुन्हा हेच सरकार येण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारणे सोपी आहेत. पाच वर्षे काँग्रेसला काहीही करता येणार नाही. फक्त भाजपने नेटाने, कुठलाही गोंधळ न घालता, प्रामाणिकपणे देश चालवला पाहिजे. कदाचित जागा कमी होतील पण मोदीच पंतप्रधान होतील अशी दाट शक्यता आहे. त्यांच्या उंचीपर्यंत जाणारा नेता काही येत्या पाच वर्षात निर्माण होणे शक्य नाही. राहुल गांधी आत्ताच थकलेत. बाकी ममता, यादव, पवार, वगैरे आपापली खेळी खेळून दमून खाली बसलेले असतील. मग आहे कोण? कुणीच नाही.
  • Log in or register to post comments

मग आहे कोण? कुणीच नाही.

प्रसाद_१९८२
Mon, 05/27/2019 - 18:54 नवीन
मग आहे कोण? कुणीच नाही. -- योगी आदित्यनाथ आहेत ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

आजची ही स्थिती

चौकटराजा
Mon, 05/27/2019 - 18:33 नवीन
मला एक फ्रीझ मेकॅनिक ३८०० रुपयाला गंडवून गेला. ती कथा आता इथे लिहीत नाही. मी पोलिसांकडे तक्रात केली. एक मेहुणा वकील आहे त्याने सल्ला दिला पोलिसात जवळची ओळख आल्याखेरीज काही होणार नाही. गुन्हा एन सी ( अदखलपात्र ) असल्याने पोलीस अगदी कायद्याने आपला अर्ज फाईल मध्ये फेकू शकतात. मग सोसायटीतील एका इन्स्पेक्टर ला गाठले केस सांगितली. हे एक रॅकेट आहे हे पटविले. माझी चूक अशी झाली की मी ऑन लाईन तक्रार एका " गोदरेज फ्रीझ हेल्प सेंटर " कडे दिली. ती विकेत्याकडे समक्ष द्यायला हवी होती. आमच्या सोसायटीतील " साहेब" ने ती तक्रार एका पोलीस स्टेशन ला पाठवली. मला वाटले अरे इतक्या लवकर दखल ? क्या बात है देवेंद्र साहेब की ! पण कसचे काय ? एका जाधव नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने मला बोलावले व माझेच उदबोधन करायला सुरुवात केली. मी सदर गुन्हेगाराचा खरा फोन , खरा फोटो सोबत जोडला होता. पुन्हा त्या गुन्हेगाराचे फेसबुक वरचे तपशील दिले होते. पोलीस म्हणाला त्याचे पेज फेक असेल .मी त्याला म्हणालो अहो साहेब फेक अकाउंटवर २०३१ फ्रेंड असू शकतात का ? मला जर मोबाइल कंपनी ला पैसे त्याचे लोकेशन शोधता आले असते तर मी तुमच्याकडे तक्रार कशाला आणली असती ? तो म्हणाला " मला तो माणूस फोनवर दाद देत नाही. मी खिन्न होऊन परत आलो. मोदी काय किंवा फडणवीस काय यांना गव्हर्नन्स मध्ये किती अपयश आले आहे याचे आणखी दोन किस्से माझ्याकडे आहेत. संडास आले ,वीज आली पण विकृत खड्ड,, विकृत स्पीड ब्रेकर कुठे गेले ...? आम्ही हेल्मेट घातले नाही तर गुन्हेगार व वहातूक पोलीस एकमेकात तम्बाखू खात गप्पा मारत असतील तर ते मात्र गुन्हेगार नाहीत हा काँग्रेस च्य ६० वर्षातील वारसा अजून चालू आहे पोलीस मित्र, पोलीस नागरिक मंच हे सगळे ढोंग आहे. आता मला मॅजिस्ट्रेट कडे खाजगी तक्रार करून सादर प्रकरण इ पी ४१५ खाली दखलपात्र गुन्हा मानून पोलिसांना त्या माणसास अटक करण्यास मी भाग पाडू शकतो पण पण त्यास मला २०००० रुपये व वीस वर्षे लागतील तर मला या देशात राहावेसे का वाटावे ?
  • Log in or register to post comments

चौकतराजा,

ज्योति अळवणी
Mon, 05/27/2019 - 22:45 नवीन
चौकतराजा, अगदी खरं म्हणताय. या देशात राहावेसे वाटत नसेल तर जरूर आपण इतर कोणताही देश स्वीकारू शकता. फक्त एक प्रश्न विचारावासा वाटतो की FIR च्या संदर्भात पोलिसांनी action घेतली नाही म्हणजे देवेंद्र आणि नरेंद्र हे अयशस्वी आहेत. असा विचार करणे फारच टोकाचे नाही का? नरेंद्र आणि देवेंद्र यांचे सरकार गेली पाच वर्षे आहे. मात्र काँग्रेस चे सरकार स्वातंत्र्यापासून असल्याने त्यांनी अनेक प्रशासकीय अधिकारी हे स्वतःच्या मार्जितले ठेवलेले आहेत. हे अधिकारी भ्रष्ट असतात आणि काँग्रेसला प्रामाणिक असतात... अनेक उदाहरणे आहेत... अगदी ताजे उदाहरण ममता बॅनर्जी आणि कलकत्ता पोलीस आयुक्त केस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौकतराजा,

ज्योति अळवणी
Mon, 05/27/2019 - 22:45 नवीन
चौकतराजा, अगदी खरं म्हणताय. या देशात राहावेसे वाटत नसेल तर जरूर आपण इतर कोणताही देश स्वीकारू शकता. फक्त एक प्रश्न विचारावासा वाटतो की FIR च्या संदर्भात पोलिसांनी action घेतली नाही म्हणजे देवेंद्र आणि नरेंद्र हे अयशस्वी आहेत. असा विचार करणे फारच टोकाचे नाही का? नरेंद्र आणि देवेंद्र यांचे सरकार गेली पाच वर्षे आहे. मात्र काँग्रेस चे सरकार स्वातंत्र्यापासून असल्याने त्यांनी अनेक प्रशासकीय अधिकारी हे स्वतःच्या मार्जितले ठेवलेले आहेत. हे अधिकारी भ्रष्ट असतात आणि काँग्रेसला प्रामाणिक असतात... अनेक उदाहरणे आहेत... अगदी ताजे उदाहरण ममता बॅनर्जी आणि कलकत्ता पोलीस आयुक्त केस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

.

दादा कोंडके
Tue, 05/28/2019 - 00:36 नवीन
आपल्या रोजच्या अनुभवावरून चांगल्या गवर्नन्सबद्द्ल मत बनवायचं नाही तर मग जगातल्या बाकीच्या देशात भारताची उंचवलेली प्रतिमा, नोटाबंदीमूळे आतंकवादी-नक्षलवादी यांच्याकडे असणारे हजारो कोटी रुपये फक्त कागद होणे, गायींचे संगोपन करणार्‍यांना पद्मश्री मिळणे, परिपक्व जीएस्टीमूळे सगळीकडे असलेला आनंदी-आनंद इ. ने बनवायचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

अरे वा

ट्रेड मार्क
Tue, 05/28/2019 - 03:37 नवीन
फारच जागरूकता आलीये. एवढी जागरूकता जरा २-४ दशके आधी लोकांना आली असती तर देश बराच सुधारला असता. पण असो, तरी मिपा वा तत्सम फोरम्स वर कारवादून आपण युवराज निवडून यावे म्हणून कित्ती प्रयत्न केले. पण ही सध्याची जनताच मूर्ख... परत मोदींनाच निवडून दिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

मोदींचे फेल्युअर

ट्रेड मार्क
Tue, 05/28/2019 - 03:33 नवीन
अगदी बरोबर आहे. पोलिसच कशाला मेक्यानिकनी फसवलं हे पण मोदींचंच फेल्युअर आहे. तुम्ही तक्रार विकेत्याकडे समक्ष न देता एका " गोदरेज फ्रीझ हेल्प सेंटर " कडे दिली हा पण देवेंद्रचा का नरेंद्रचा दोष? पोलीस तंबाखू खात उभे रहातात हा पण देवेंद्रचा का नरेंद्रचा दोष? बाकी तुम्हाला भारतातच रहा म्हणून देवेंद्र वा नरेंद्र या दोघांपैकी कोणी आग्रह केला आहे का? अजून तरी भारतात रहाण्यास, न रहाण्यास, दुसऱ्या देशात निघून जाण्यास देवेंद्र व नरेंद्र यांनी अटकाव केला नाहीये (गोयल सोडून). पण आता मोदी परत निवडून आल्याने असं काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय तो निर्णय लवकरच घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

धागा नीट वाचा ..

चौकटराजा
Tue, 05/28/2019 - 09:15 नवीन
मेकॅनिकने फसविले हे मोदींचे फेल्युअर आहे हे न कळण्याइतका मी मूर्ख नाही याची दाखल घ्यावी. प्रशासनातं एक वर्क कल्चर निर्माण करणे हे राजकीय पुढार्याचे काम नसले तरी ते पी एम व सी एम यांचे काम नक्की आहे कारण ते पुढारी नव्हेत प्रशासक आहेत. बाकी मग पाकिस्तानला जा हा संदेश मला मिपावर येणार हे मी जाणून होतोच त्यात नवल काही नाही . वाऱ्याने रस्त्यावर माती आली तर त्याला प्रसासनाचा काहीच दोष नसतो पण आलेली माती बाजूला न करणे यात प्रशासनाचा दोष नाही तो वार्याचा आहे असे कसे म्हणावे ? पोलिसास नुसती तक्रार दिलेली नाही तर संशयिताचा फोटो व मोबाईल क्र दिलेला होता पोलीस त्याचशी बोलले तरी तो फोन बंद करीत असून आपल्याला तो दाद देत नाही असे म्हणणारे पोवीस तुमचे जवळचे नातेवाइक तर नाहीत ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

दुरुस्ती

चौकटराजा
Tue, 05/28/2019 - 09:19 नवीन
मेकॅनिकने फसविले हे मोदींचे फेल्युअर मुळीच नाही हे न कळण्याइतका मी मूर्ख नाही याची दाखल घ्यावी. असे वाचावे. डी एस कुलकणी यांनी हजारो लोकांना फसविले हे गुंतवणूक दारांचे चुकलेच मग आर्थिक गुन्हा शाखेने तुमच्यसारखी भूमिका घावी का=? डी एस कुलकर्णी आम्हाला दाद देत नाहीत असे म्हणावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

राजाजी

ट्रेड मार्क
गुरुवार, 05/30/2019 - 03:15 नवीन
धागा नीट वाचायचा काय संबंध? तुमचा प्रतिसाद नीट वाचून उत्तर दिलं की बास ना? प्रशासनातं एक वर्क कल्चर निर्माण करणे हे राजकीय पुढार्याचे काम नसले तरी ते पी एम व सी एम यांचे काम नक्की आहे कारण ते पुढारी नव्हेत प्रशासक आहेत. ठीक आहे. पण वर्क कल्चर वर्षानुवर्षे तयार होत असते ते काही एकदम बदलता येत नाही. इथे तुम्ही फक्त देवेंद्र आणि नरेन्दला दोष देण्याऐवजी एकूणच वर्क कल्चर दशकानुदशके कसे चालत आहे हे म्हणलं असतात तर संयुक्तिक झालं असतं. पाकिस्तानला जा हा संदेश मला मिपावर येणार हे मी जाणून होतोच त्यात नवल काही नाही पाकिस्तानला जा कोण म्हणलंय? जे ठिकाण आवडत नाही तिथे आपण रहात नाही, म्हणून जर तुम्हाला भारतात एवढे प्रॉब्लेम दिसत आहेत आणि सुधारणांचे चाललेले प्रयत्न जर दिसत नाहीयेत, तर तुमच्या पसंतीच्या ठिकाणी जाऊन राहू शकता एवढेच सांगणे आहे. पाकिस्तान तुमच्या मनात आहे ते आमच्यावर टाकू नका. तिकडे जायचे असेल तर तिकडे जा. पोलिसास नुसती तक्रार दिलेली नाही तर संशयिताचा फोटो व मोबाईल क्र दिलेला होता पोलीस त्याचशी बोलले तरी तो फोन बंद करीत असून आपल्याला तो दाद देत नाही असे म्हणणारे पोवीस तुमचे जवळचे नातेवाइक तर नाहीत ना ? फसवणारा मेकॅनिक तुमचा जवळचा नातेवाईक होता का, ज्याला तुम्ही असेच पैसे दिलेत? आणि आता मग उगाच पंप्र आणि मुम वर आरोप करत फिरत आहात? तुम्ही वैयक्तिक झाल्यामुळे दुर्दैवाने मला हे म्हणायला लागत आहे. डी एस कुलकर्णी केस बरोबर तुमच्या केसची तुलना म्हणजे..... या प्रतिसादात डँबिस००७ यांनी म्हणल्याप्रमाणे पोलिसांची अपुरी संख्या, अपुरा पगार, अपुऱ्या सुविधा, वेडेवाकडे कामाचे तास याचा पण विचार करा. पोलिसांच्या दृष्टीने बघता तुम्ही तुमच्या निष्काळजीपणामुळे पैसे स्वतःच्या हाताने देऊन बसलात आणि मग त्याचा फोटो, चेपू प्रोफाईल वगैरे दाखवून मी किती शहाणा हे दाखवत आहात असं वाटणं साहजिक आहे. बाकी पैसे दिल्याचं आणि त्याबदल्यात काय सेवा ठरली होती व तसेच कुठली सेवा मिळाली नाही हे तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करता येईल अशी आशा करतो. अर्थात, तुम्हीच म्हणलं आहे "गुन्हा एन सी ( अदखलपात्र ) असल्याने पोलीस अगदी कायद्याने आपला अर्ज फाईल मध्ये फेकू शकतात.". तरी पण पोलीस कायदा सोडून वागत आहेत असं तुम्हाला वाटतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

गेल्या ४०-५० वर्षांत

डँबिस००७
Tue, 05/28/2019 - 10:53 नवीन
गेल्या ४०-५० वर्षांत प्रशासनात वर्क कल्चरमध्ये कॉग्रेस राजकारण्यामुळे किती व कसे बदल घडलेले आहेत हे सर्व श्रृत आहे ! काम न करण्यासाठी बाबु लोक खुप कारण शोधत असतात, श्रद्धेने काम करणारे कमीच !! पण त्यातुन काम स्टाफ कडून करुन घेणारे व करुन दाखवणारे लोक खुपच कमी. कोणतेही काम न करण्यासाठी फाईलवर असा शेरा मारतात की पुढे ते काम कधीही होउ शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

श्रीकर परदेशी

चौकटराजा
Tue, 05/28/2019 - 12:52 नवीन
श्रीकर परदेशी हे " हे वर्क कल्चर चे उत्तम उदाहरण आहे. ते सध्या पी च्या ऑफिस मध्ये काम करतात .पण जो पर्यंत राजा हालत नाही तो पर्यंत जनता हालत नाही . उत्तम वर्क कल्चर चे उदाहरण पासपोर्ट ऑफिस दाखवता येते. पण त्यात ही पोलिसांची जोड आली की मामला गडबड होतो. उतत्सम वर्क कल्चर ची उदाहरणे जी दिली आहेत ती पोलीस या खात्याशी संबंधीत नाहीत. महाराष्ट्र पोलीस नालायक आहेत असा शेरा साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीही अनुभवाअंती मारलेला आहे. छोट्या गुन्ह्या मध्ये पोलिसांचीही भागीदारी असावी असा अनेकांना संशय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

उत्तम वर्क कल्चर चे उदाहरण

यशोधरा
Tue, 05/28/2019 - 13:03 नवीन
उत्तम वर्क कल्चर चे उदाहरण पासपोर्ट ऑफिस दाखवता येते. पण त्यात ही पोलिसांची जोड आली की मामला गडबड होतो
नेहमीच असे होते, असे नाही हे माझे मत आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही एकाच वेळी तीन पासपोर्टांचे नूतनीकरण (पुढे मागे काही दिवस) केले, पोलिसांनी उत्तम सहकार्य केले, कुठेही वेळाची खोटी झाली नाही, खेटे मारायला लागले नाहीत, चिरीमिरी प्रकार करावे लागले नाहीत - केलेही नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

महाराष्ट्र पोलीस नालायक आहेत

डँबिस००७
Tue, 05/28/2019 - 16:51 नवीन
प्रत्येक राज्यातले पोलिस नालायक का ? मुळातुन प्रत्येक पोलिस हा मनुष्य आहे हे गृहीत धरायला लोक विसरतात. जागतीक मानकापेक्षा लोक संख्येच्या मानाने किती पोलिस तैनात आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. २४ तास काम, बंदोबस्त अपुरा पगार, ना सरकारी आवास , ना सरकारी वहातुक व्यवस्था, ना मेडिकल बेनिफीट. त्यावर सदैव अपघात झालेल्या , खुन झालेल्या प्रेता बरोबर सामना, व्यसनाधीनता ह्या मुळे ग्रस्त झालेला पोलिस हा नालायक ? हे सर्व बदलायला पाहिजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

दुर्दैवाने मोदींच्या कामाची

अन्या बुद्धे
Mon, 05/27/2019 - 20:19 नवीन
दुर्दैवाने मोदींच्या कामाची वस्तुनिष्ठ तपासणी करता येत नाही. मीडिया अजिबात विश्वासार्ह नाही. मोदींवर टीका न करता द्वेष दिसतो आणि कुणीच बरा म्हणावा असा विरोधक नाही म्हणून मोदीच हवेत असं होतंय. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा याबाबत शंकेला जागा नाही तसं इतर सुधारणाबाबत खात्रीने सांगता येत नाही. या 5 वर्षात सगळ्यांना जाणवेल असा गुणात्मक बदल घडावा हीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments

स्म्रुती इराणीनी त्यांच्या

विजुभाऊ
Tue, 05/28/2019 - 13:53 नवीन
स्म्रुती इराणीनी त्यांच्या भाषणात त्यानी अमेठी मधे केलेले काम सांगीतले. गोमती नदीवरर्चे छोटे धरण आणि गावागावात घरघर शौचालय या योजने मुळे स्त्रीयांची रोज होणारी कुचंबणा संपवली. यामुळे त्याना स्त्रीयांची बरीच मते मिळाली. या भागात कोंग्रेस हे काम का करू शकली नाही कोण जाणे . ज्या स्त्रीयांना रोज उघड्यावर जावे लागते त्यांची कुचंबणा आणि असुरक्षितता काय असते हे आपल्याला समजणार नाही. ज्या दिवशी उत्तरप्रदेश आनि बीहार सारख्या प्रदेशात स्थानीक पातळीवर रोजगार निर्माण होईल त्या दिवशी देश विकासाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेला असेल
  • Log in or register to post comments

या भागात कोंग्रेस हे काम का

प्रसाद_१९८२
Tue, 05/28/2019 - 19:32 नवीन
या भागात कोंग्रेस हे काम का करू शकली नाही कोण जाणे . -- असे न करण्यामागे कॉंग्रेसचा 'गरिबी हटाव' सारखा उदात्त हेतू असावा. -- जसे एकदा का देशातून गरिबी हटली की कॉंग्रेसची सत्ता गेली अशी त्यांना भिती वाटत होती. अगदी तशीच भिती कॉंग्रेसच्या चार पिड्यांच्या नेत्यांना अमेठीबाबत वाटत असावी, एकदा का अमेठीतील जनतेला सर्व प्रकारच्या सुख-सोयी मिळाल्या की आपला पत्ता कट होईल हे जाणून त्यांनी तिथे तुम्ही म्हणताय त्या प्रथामिक सोयी देखील पुरवल्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे एकदम परफेक्ट बोललात.

आनन्दा
Tue, 05/28/2019 - 19:54 नवीन
हे एकदम परफेक्ट बोललात. कोंग्रेसचा पारंपारिक मतदार गरीब वर्गातून येतो. तर भाजपाचा मध्यमवर्गीय. त्यामुळे गरिबांची संख्या वाढवणे हे कोंग्रेसचे आणि मध्यमवर्गीयांची संख्या वाढवणे हे भाजपाचे ध्येय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

घर घर शौचालय !! ह्या योजने

डँबिस००७
Wed, 05/29/2019 - 11:52 नवीन
घर घर शौचालय !! ह्या योजने बद्दल लोकांना काय वाटत हे तिथे गेल्यावरच कळेल !! गावातल्या लोकांनी सरकार कडुन बनवल्या गेलेल्या शौचालयाला रंगवलय ! उत्तर प्रदेश, बिहार मध्ये ह्याच शौचालयाला " ईज्जत घर " अस संबोधतात !! गेल्या सरकारने शौचालय बांधायला सुरु केलेल आहेच पण हा प्रकल्प फार मोठा आहे आणी त्यासाठी जनतेने सुद्धा आपली मदत सरकारला देण्यासाठी तयार व्हायला पाहीजे. ईतक्या मोठ्या प्रमाणावर नुसती शौचालय बांधायची असतील तर किती रोजगार तयार होणार आहे. आताच्या शौचालय योजनेत सरकार काय देत आहे हे माहिती नाही पण जनरली नुस्त्या शौचालय बांधुन काम होणार नाही त्यासाठी सोक टँक, पाईप लाईन, हेड टँक , नळ, टाईल्सची वैगेलेची गरज असेल, ह्या शिवाय गावात सोलार पॉवरवर रस्त्यावरचे दिवे , घराघरात वीज वैगेरे पोहोचवता येईल. जन सहभागातुन बरच काही साधता येत हे आता चालु असलेल्या पाणी फाऊंडेशन, जल युक्त शिवार वैगेरे योजनातुन दिसत आहे. ह्या योजने मुळे दुष्काळ ग्रस्त म्हणुन कुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याला जिवदान मिळालेले आहे. नविन सरकाराच्या दिशेमुळे समाज बदलत आहे. गॅस सबसिडी सोडुन पायंडा पाडत आहे. बदल हा आतुन घडायला पाहिजे सरकारने बदल घडवला तर तो टिकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

छान

प्रियाभि..
Tue, 05/28/2019 - 15:04 नवीन
लेखन आवडले. काही मुद्यांशी असहमत आहे परंतु तुमची भावना ही सामान्य लोकांची भावना आहे हे मान्य. असहमत मुद्द्यांबाबत दुसरी प्रतिक्रिया देईनच. ही प्रतिक्रिया फक्त तुमच्या सुंदर लेखनासाठी आहे. एकंदरीत लेखनशैली छान वाटली
  • Log in or register to post comments

असहमत मुद्दे..

प्रियाभि..
Tue, 05/28/2019 - 15:29 नवीन
सर्वसामान्यांची भावना असं म्हणण्याचं कारण दुसरा पर्याय चांगला नाही म्हणून पहिला पर्याय असं आहे. बाकी मोदी सरकारने काही दूरगामी निर्णय घेतलेत आणि त्याची फळे उशिरा चाखायला मिळतील असच वाटत होत मला, परंतु या निर्णयांवर मत मागण्या ऐवजी ' अमक्यानी ६५ वर्षात काही केले नाही ' असा प्रचार का चालू होता हे कळले नाही.
  • Log in or register to post comments

छान लेख

धर्मराजमुटके
Tue, 05/28/2019 - 20:12 नवीन
माझ्या ह्या सरकार कडून फक्त दोनच अपेक्षा आहेत. १. राम मंदिर लवकरात लवकर बनवावे. २. काश्मीरच्या संदर्भातले कलम ३७० आणि ३५ ए लवकरात लवकर हटवावे. ही दोन कामे केली तर मी आयुष्यभर भाजपा ला मत देण्यास तयार आहे. पण एकंदरीत सरकारचे बोलणे पाहता राममंदिराचा मुद्दा केवळ कागदावरच राहिल. दुसरा मुद्दा कदाचित २०२३-२४ मधे उचलला जाऊ शकतो.
  • Log in or register to post comments

पण

प्रियाभि..
Tue, 05/28/2019 - 22:48 नवीन
दोन्हीही मुद्दे पूर्णत्वास जातील की नाही हे सांगता येणं कठीण आहे. सत्तेच्या बाहेर राहून काहीही घोषणा करता येतात पण सत्तेमध्ये गेल्यानंतर काही बंधने येतात. राम मंदीर सारख्या धार्मिक मुद्द्यावर भाजप काही राजकारण करेल असे वाटत नाही. आणि तसा तो पक्षही नाही. फक्त सर्वमान्य निर्णय घेवून सत्ता टिकवणे हे त्यांचं ध्येय असेल आता. कलम ३७० चा मुद्दा हाताळण्यासाठी मोठं धाडस करावं लागेल. इंदिराजींनी संस्थानिकांचे पेन्शन बंद करून किंवा बँकांचे राष्ट्रीयीकरण करून जे धाडस दाखवलं तसचं काहीतरी करावं लागेल. जम्मू काश्मीर मध्ये पक्षाची स्थिती बळकट होतेय त्यामुळे आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

धर्मराजमुटके साहेब ,

डँबिस००७
Wed, 05/29/2019 - 00:58 नवीन
धर्मराजमुटके साहेब , १. राम मंदिर लवकरात लवकर बनवावे. २. काश्मीरच्या संदर्भातले कलम ३७० आणि ३५ ए लवकरात लवकर हटवावे. ह्या दोन मुद्द्याशी आपली ईतकी जवळीक का आहे ? भाजपाने (पर्यायाने आता आलेल्या सरकारने ) ह्यावर जलद उपचार करावे असा तुमचा आग्रह आहे तेंव्हा ह्या प्रश्नावर ह्या दोन्ही मुद्यावर तुम्हाला सखोल माहिती असेल अस गृहीत धरुनच मी हे विचारयच धाडस करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

वाचा: कॉग्रेस हा ‘पक्ष’ नाही

चित्रगुप्त
Wed, 05/29/2019 - 05:00 नवीन
कॉग्रेस हा ‘पक्ष’ नाही' या लेखातील दोन उतारे: ..... सत्तर वर्षे कॉग्रेसने देशावर राज्य केले, ती लोकमताच्या बळावर वा लोकांचा विश्वास संपादन करून मिळवलेली सत्ता नव्हती. जनमत आपल्या मुठीत राखणार्‍या विविध क्षेत्रातील मठाधीशांचा आशीर्वाद ही कॉग्रेसची खरी ताकद होती आणि बदल्यात कॉग्रेसच्या नेतृत्वाने अशा मठाधीशांना अनुदाने द्यावी, त्यांचे पोषण करावे, अशी एकूण तडजोड होती. सहाजिकच त्या व्यवस्थेच्या मुळाला हात घातला गेल्यावर त्यावर पोसलेल्या बांडगुळांना बिळातून बाहेर पड्णे अपरिहार्य होते. मागल्या पाच वर्षात म्हणूनच अशा सर्वांनाच आपल्या सुरक्षित बिळातून मुखवट्यातून बाहेर यावे लागले, कलाकारांपासून विविध क्षेत्रातून मोदी विरोधात उमटलेला आवाज, त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा होता. तिथे कॉग्रेसने स्थापन केलेला तो गुळाचा गणपती होता, त्याचा आवाज होता. अशा हजारो लहानमोठ्या गणपतींच्या विसर्जनाचा चंग बांधलेला माणूस फ़क्त कॉग्रेसला हरवून थांबणार नाही, याची प्रत्येकाला शंका होती. पाच वर्षे कारभार चालवताना मोदींनी ती शंका खरी ठरवली. कारण हळुहळू मोदींनी आपल्या कामातून भ्रष्ट कॉग्रेस व्यवस्थेला नेस्तनाबुत करण्याची पावले उचलली होती. देशातला भ्रष्टाचार फ़क्त कायदे करून वा नुसते सरकार बदलून नष्ट होऊ शकत नाही. ज्या व्यवस्थेने त्याला सुरक्षा बहाल केलेली आहे. ती व्यवस्थाही उध्वस्त करणे भाग होते. ती व्यवस्था म्हणजे खरी कॉग्रेस आहे. तो पक्ष नाही, ती भ्रष्ट सडलेली व्यवस्था आहे..... .....पहिल्या पाच वर्षाच्या कारभारातून सामान्य जनतेला मोदींनी खुप दिलासा दिला. म्हणून तर त्यांना यावेळी भरघोस मते मिळू शकली. पण मोदींनी कोणता दिलासा गांजलेल्या जनतेला दिला, कुठे जनतेचे जीवन सुसह्य सुखकर झाले, त्याचा थांगपत्ता बुद्धीमंत, कलावंताना अजून लागलेला नाही. कारण सत्तर वर्षे फ़क्त शोषणावर पोसले गेलेल्या ह्या लोकांनी शोषण वा अन्याय म्हणजेच न्याय, अशा प्रचाराचा घोषा लावलेला होता. त्याच नशेत चुर असलेल्या जनतेला प्रथमच सुसह्य जीवन आणि न्यायाची चव चाखता आल्यावर समाजातले भोंदू विचारवंत, कलावंत किंवा भाष्यकार यांचा खोटेपणा लक्षात आला. तिथून मग अशा बदमाशांची खरी घुसमट सुरू झाली. त्यांनी अधिक आक्रमकपणे न्यायालाच अन्याय व शोषणालाच पोषण ठरवण्यासाठी मागल्या दोन वर्षात नको इतका धिंगाणा घातला होता. कारण त्यांनी उभारलेली कॉग्रेस नावाची भ्रष्ट शोषण व्यवस्था हळुहळू जमिनदोस्त होऊ लागलेली होती. मोदींना आणखी पा़च वर्षे मिळाली तर श्वास घ्यायलाही आपल्यात त्राण शिल्लक उरणार नसल्याच्या खात्रीने त्यांना भयभीत करून टाकलेले होते. त्यातून मग अविष्क्मार स्वातंत्र्य किंवा नानाविध तमाशे सुरू झाले. ते प्रत्यक्षात कॉग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी होते. तितकेच कॉग्रेस नावाच्या शोषण व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठीची केविलवाणी धडपड होती. आता आपली खरी लढाई कॉग्रेस पक्षाशी उरलेली नसून, कॉग्रेस नावाच्या शोषण व्यवस्थेशी अटीतटीची लढाई असल्याचे ओळखूनच मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत उतरलेले होते...... संपूर्ण लेख इथे वाचा: http://jagatapahara.blogspot.com/2019/05/blog-post_28.html
  • Log in or register to post comments

चित्रगुप्त जी

भंकस बाबा
Wed, 05/29/2019 - 09:14 नवीन
अचूक विश्लेषण. शिवाय शान्तिप्रिय धर्माच्या धर्मवेडाला राजकीय आश्रय देण्याचे काम देखील कोंग्रेसने केले.
  • Log in or register to post comments

काँग्रेसचे सरकार सदा सर्वकाळ

सुबोध खरे
Wed, 05/29/2019 - 12:59 नवीन
काँग्रेसचे सरकार सदा सर्वकाळ चांगलं होतं. १९९१ मध्ये उदारीकरण राबवून देशाला खोल गर्तेतून बाहेर काढण्याबद्दल डॉ मनमोहन सिंह आणि त्यांना पूर्ण आधार देणारे श्री नरसिम्ह राव यांचे कौतुक करताना आपला देश खोल गर्तेत का गेला याबद्दल कोणीही कधीच काहीच बोलताना दिसत नाही. डॉ मनमोहन सिंह आणि श्री नरसिम्ह राव यांनी देशाला खड्ड्यातून बाहेर काढलं यासाठी आपल्याला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं हि लाजिरवाणी स्थिती कोणी केली याबद्दल कोणीच कसं काही बोलत नाही? तेंव्हा दोष देण्या इतके हि भाजपचे खासदार निवडून आलेले नव्हते. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा