Skip to main content

" तु तेव्हा तसा ...! "

लेखक जेनी... यांनी शुक्रवार, 14/07/2017 या दिवशी प्रकाशित केले.
तुला मी फार मिस्स करते .. तुझ्या आठवणींनी भरलेली पानं अजुनही जपुन ठेवलियेत मी. रोज एकदा तरी त्यातल्या एकेका पानाची उजळणी करते. मला नाही माहित तु माझी किती आठवण काढतोस, पण तु विसरला नसशील हे मात्र नक्की. आज चार वर्ष होऊन गेली, तुझ्या माझ्यात म्हणावं असं काहीच उरलं नाही, तसं होतं तरी काय ?? पण तरीही काहीतरी होतं हे नक्की. नाहीतर बघना, मला अजुनही तुझी आठवण का यावी ? अजुनही तु कुठेतरी आहेस, असं साऱखं का वाटावं? जास्तं काही नाही पण तुझं ते सतत "कुठेयस??" ते मात्र नाही विसरता आलं मला, तु मला शोधत रहावसं आणि मी फुलपाखरासारखं अवतिभोवती असुनही क्षणात समोर तर क्षणात अद्रुश्य होत रहावं . तु माझी काळजी घ्यावीस आणि मी "ह्ह्या ! मला काय होतय" म्हणत तुझ्यापासुन दुर रहाण्याचे बहाणे करावेत. तु अगदी तेव्हा तसाच होतास, आता मला नाही सांगता येणार 'तु आत्ता कसा' आहेस ते ! तुझं जवळ असणं म्हणजे माझ्यासाठी माझं कुणीतरी सतत माझ्यासोबत आहे याची जाणीव. एकटेपणा माझ्या आजुबाजुलाही भटकु नये यासाठी तुझी सारी धडपड असायची. खुपदा आपण अक्खी रात्र रात्र गप्पात जागवायचो. खुपदा तु गप्पांच्या नादात जेवायचं सुद्धा विसरायचास, खुपदा माझी सोबत मिळावी म्हणुन तुझ्या पापण्यातल्या झोपेलाही तु थांबवुन ठेवायचास. तु तेव्हा अगदीच वेडा होतास. आता तु कसा आहेस हे विचारण्याचीही हिंमत होत नाही मला. तु छान चित्र काढायचास. चित्रातल्या रेषांचा अर्थ सांगायचास, चित्रातले भाव ओळख म्हणायचास. पूसट वाटणार्‍या त्या चित्रातल्या रेषांनाही इतके खोल अर्थ असतील असं कधीच वाटलं नव्हतं पण तु ते समजावलेस. तुझ्या मनातही तु माझं चित्र रेखाटलं असणार, त्यात तुला हवे ते, हवे तसे रंग भरले असणार पण मला ते समजलच नाही कधी. तुला एकदा मी तुझ्या मनातलं माझंही चित्र काढ म्हणाले होते , पण तु नाही म्हणालास. "नको ! ते माझ्या मनात तसंच राहुदे, ते कागदावर उतरलं कि माझ्या उगाच तुझ्याकडुन अपेक्षा वाढतील" असंच उत्तर मिळालं होतं. मला तेव्हा त्याचा अर्थ समजला नव्हता, पण आत्ता कळतंय, एखाद्या व्यक्तिचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व मग ते कोणत्या का रुपाने असेना, हे त्या त्या व्यक्तिसाठी किती महत्वाचं असु शकतं नै! हळुवार शब्दाचं जाळं तु माझ्याभोवती गुंफायचास, त्यात मी अडकुन रहायची. तासंतास त्या शब्दांच्या अर्थांसोबत खेळायची. त्यात कधी गोड तर कधी अर्थ नसणारे शब्दही असायचे , पण तु मला गुंतवुन ठेवायचास. त्या जाळ्यातुन बाहेर यायची माझीही इच्छा नसायची. आजही ते शब्द तसेच आहेत. आजही ती चित्रं तशीच आहेत. जशी तु मला देऊन गेलास. पण तेव्हाचा 'तु'मात्र आज माझ्याजवळ नाहीस. "गूडबाय" या शब्दाचं कानावर आदळणं, आणि काहीही प्रतिक्रिया न ऐकता तुझं निघुन जाणंही थोडं विचित्रच होतं, पण तुला "का?" असं उलटुन विचारण्याचं धाडस मी आजही करत नाहीय, याचंच मोठं आश्चर्य वाटतंय. "इथुन पूढे तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीय" ह्या वाक्याचीही भर होती "मी फक्त ऐकुन घेतलं, तुझ्या प्रत्येक शब्दाचा खोलवर अर्थ त्याहुनही खोल रुतला होता, पण मला तो दाखवताही आला नाही. अगदी कालपर्यंत ज्याची पहाट माझ्याशिवाय होत नव्हती, ज्याच्या चांदण्यात सुद्धा माझ्या हसण्याचं प्रतिबिंबं होतं, आज क्षणात माझ्याशी नातं तोडत होता. माझ्या हातातला हात सुटुन दूर होत होता, पण मला जाबही विचारता आला नाही. हरकत नाही. माझी कसलीही हरकत नाही, निदान आत्ता तरी नाही. कारण जितकं मी तुझं "तुझा माझा काहीएक संबंध नाही" हे जपुन ठेवलंय तितकंच मी तुझं "तुझी ना मला सवय लागलीय" हे सुद्धा जपलंय. तुझ्याकडे कारण होतं बहुतेक माझ्यापासुन दुर जाण्याचं पण माझ्याकडे तसं काहीही नव्हतं. आजही तु परत येशील अशी कुठेतरी एक आशा असते. क्षणिक असते पण असतेच. पांढर्‍या शुभ्र कागदावर हलक्याश्या चित्रात काल्पनिक रंग भरताना मन जसं हेलकावे खात असतं अगदी तसंच. तु तेव्हा तसेच रंग माझ्याही स्वप्नात भरलेस. तु तेव्हा तसाच माझ्या आयुष्यात आलास. तु तेव्हा दाखवलेली स्वप्न मी आजही बघते. आजही माझी नजर तुला गर्दीत शोधत असते. आजही तो चार वर्षांपूर्वीचा तु कधीही माझ्यासमोर येऊन उभा राहील अश्या व्यर्थ आशेवर मी जगते. तू निघुन गेलास पण तू तेव्हा जसा होतास अजुनही तसाच माझ्या आठवणीत घर करुन राहिलास. तुला मी फार फार मिस्स करते ....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8995
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत वियोगार्थ मीलन होते, नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पैजारबुवा,

वेलकम ........ वुई वेअर मिस्सिंग धिस जेनीबाय

सुंदर मनोगत ! खूप दिवसांनी हजेरी लावून लिहिलेले हे "तो आता काय करतो" आवडले !

वेलकम

मुक्तक आवडले ! भावना पोहचल्या :) "तुझा माझा काहीएक संबंध नाही" हे असं स्पष्ट होणं हे त्यामानानं फार सुखाचं असतं , 'गुडबाय' म्हणायचं राहुन गेलें कि ते मनाला जास्त खात रहातं असा अनुभव आहे !

वाचता वाचता हरवून गेले कुठेतरी...... प्रत्येकाने असे काहीसे आयुष्यात अनुभवलेले असते ...... खूपच तरल लिखाण