मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खनिज-खजिन्यातील रंगीत धातू

हेमंतकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(खजिन्यांचा खजिना : लेखांक ६ ) लेखमालेच्या या भागात आपण लोह, तांबे आणि जस्त या तीन रंगीत धातूंबद्दल जाणून घेऊ. लोह शरीरातील लोह हे मुख्यतः हिमोग्लोबिन या लालपेशीतील प्रथिनात साठवलेले असते. हिमोग्लोबिनवर स्वतंत्र लेख मी यापूर्वीच लिहिलेला आहे. तो इथे आहे : https://www.misalpav.com/node/41474. त्यात लोहाचे स्त्रोत वगैरे माहिती विस्ताराने आहे. त्याव्यतिरीक्त असलेली लोहाची माहिती आता देतो. लालपेशीचे आयुष्य साधारण १२० दिवस असते. शरीरात रोज २०० अब्ज लालपेशी मरतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. मृत पेशींतील लोह हे अजिबात वाया घालवले जात नाही. त्याचा नवीन पेशींतील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी पुनर्वापर केला जातो. अशा प्रकारे आपण लोहाच्या ‘खजिन्या’चे सतत जतन करतो. त्यामुळेच रोजच्या आहारातून लोहाचे शोषण हे अल्प प्रमाणात पुरेसे असते. प्रौढाची रोजची गरज आहे १५ mg आणि त्यातले प्रत्यक्ष शोषले जाते अवघे १.५ - २ mg. लोह हा मुळात धातू असून तो सुट्या स्वरुपात पेशींत साठणे घातक असते. म्हणूनच आतड्यातील त्याचे शोषण अत्यंत मर्यादित ठेवलेले आहे. आहारातून आपण जरी गरजेपेक्षा जास्त खात राहिलो तर अतिरिक्त प्रमाण सरळ शौचावाटे निघून जाते. हिमोग्लोबिन व्यतिरिक्त लोह हे इतर काही प्रथिने व एन्झाइम्समध्येही असते. त्यापिकी एक प्रथिन आहे मायोग्लोबिन. हे स्नायुमध्ये असते आणि तिथे ते ऑक्सिजन साठवून ठेवते. जेव्हा जोरदार व्यायाम केला जातो तेव्हाच त्यातला ऑक्सिजन स्नायुपेशींना सोडला जातो. लोहाची अतिरिक्त साठवणूक (overload): आतड्यांचे कार्य व्यवस्थित असताना आहारातून जरी अतिरीक्त लोह घेतले तरी ते शरीरात साठत नाही. पण एका अनुवांशिक आजारात शोषणाचे नियंत्रण बिघडते. मग नेहमीच्या २-३ पट लोह शोषले जाते व ते पेशींत साठते. रक्ताच्या काही आजारांत (उदा. थॅलसिमिया) रुग्णाला खूप प्रमाणात बाहेरून निरोगी रक्त द्यावे लागते(transfusion). अशांमध्ये मात्र कालांतराने लोहाची बरीच साठवणूक होते. त्याने हृदय, यकृत व इतर महत्वाच्या इंद्रियांना इजा पोहोचते. * * * तांबे आहारात सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असलेले हे धातूरुपी मूलद्रव्य. त्याचे महत्वाचे स्त्रोत म्हणजे कवच असलेले जलचर प्राणी, मांस, अख्खी धान्ये, बीन्स आणि कठीण कवचाची फळे. शरीरातील कार्य: ते यकृत आणि मूत्रपिंडात बऱ्यापैकी साठवले जाते. रक्तात ते प्रथिनांशी संयुगित असते. ते पेशींतील अनेक एन्झाइम्स च्या कामासाठी आवश्यक असते. त्याद्वारे ते खालील क्रियांत मदत करते: १. ऊर्जानिर्मिती २. लोहाचे आतड्यातून योग्य शोषण ३. त्वचेतील रंगद्रव्य (melanin) तयार करणे ४. मज्जासंस्थेतील संदेशवहन ५. शरीर सांगाड्याची बळकटी ६. Antioxidant कामात मदत. अभावाचे परिणाम : १. त्यामुळे लोहाचे शोषण कमी होऊन रक्तन्यूनता होते २. रक्तातील पांढऱ्या पेशींची न्यूनता ३. मज्जातंतूना इजा नेहमीच्या आहारातून ते अतिरिक्त खाल्ले जाण्याची शक्यता नसते. काही अनुवांशिक आजारात त्याचा शरीरात चयापचय नीट होत नाही आणि त्यामुळे ते धातूस्वरुपात महत्वाच्या इंद्रियांत साठते. त्यातून त्यांना इजा होते. तांबे आणि जलशुद्धीकरण पिण्याचे पाणी तांब्याच्या पात्रात साठवून ठेवण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. तांब्याचा जंतुनाशक गुणधर्म तपासण्यासाठी अलीकडे काही शास्त्रीय प्रयोग झाले आहेत. जर पिण्याचे पाणी तांब्याच्या पात्रात १६ तास ठेवले तर त्यामुळे त्यातील पचनसंस्था बिघडवणाऱ्या काही जंतूंचा नाश होतो असे दिसले आहे. *********** जस्त साधारण ज्या अन्नपदार्थांतून आपल्याला तांबे मिळते ते जस्तही पुरवतात. उच्च प्रथिनयुक्त आहारातून ते सहज मिळते. शरीरातील कार्य: जस्त हे पेशींतील जवळपास २०० प्रथिने व एन्झाइम्समध्ये असते. त्याद्वारे ते अनेक शरीरकार्यांत मदत करते. त्यातील काही प्रमुख अशी: १. पेशींची वाढ, विभाजन आणि मूलभूत कामकाज २. जखमा व्यवस्थित भरणे ३. वास व चव यांचे ज्ञान ४. प्रतिकारशक्तीचे संवर्धन अभावाचे परिणाम साधारण आर्थिक दुर्बल लोकांत याचा अभाव दिसून येतो. त्याची लक्षणे अशी: १. त्वचेवर पुरळ येणे आणि त्यावरील केसनाश २. जखमा लवकर न भरणे ३. वास व चव या संवेदनावर परिणाम ४. मुलांत वाढ खुंटणे आणि जननेन्द्रियांची अपुरी वाढ ******************

वाचने 39595 वाचनखूण प्रतिक्रिया 55
जस्ताचे शरीरातील प्रमाण वाढले तर काय काय परिणाम होतात ? ओळखीतल्या एक महिला शरीरातील जस्ताचे (झिंक) प्रमाण वाढल्याने कित्येक महिने आजारी होत्या. आयात केलेली अत्यंत महागडी औषधे घ्यावी लागली त्यांना उपचारा दरम्यान.

अनिंद्य 10/09/2018 - 11:33
खजिन्याचा हा वाटाही मौल्यवान ! एक प्रश्न :- सुंदर त्वचेसाठी 'झिंक रिच' सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट झालेला बघितला आहे. खरंच काही संबंध असतो का ? पु ले शु, अनिंद्य

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:02
सुंदर त्वचेसाठी 'झिंक रिच' सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट >>>> जस्त हे त्वचेचे अखंडत्व राखते तसेच जखम लवकर भरायला मदत करते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे ते “सौंदर्यास” मदत करते इतपत म्हणता येईल.

In reply to by हेमंतकुमार

अभ्या.. 10/09/2018 - 12:11
स्कीन डिसीझ, खाज वगैरेवर झिंक ऑक्साईड असलेली बरीचशी ऑइन्टमेंटस, लोशन्स असतात पण त्यांची खूप लोकांना (मला पण आहे) अ‍ॅलर्जी असते ना?

In reply to by अभ्या..

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:31
होय, काही लोकांना अशा मलमांची allergy असते. तिची तीव्रता व्यक्तीसापेक्ष आहे. काही वेळेस आशा मलमांतील इतर काही रसायनांमुळेही त्रास होऊ शकतो.

हेमंतकुमार 10/09/2018 - 11:39
वरील सर्व नियमित प्रतिसादकांचे आभार . जस्ताचे शरीरातील प्रमाण वाढले तर काय काय परिणाम होतात? >>> जस्ताची घातकता ही निव्वळ आहारातून होत नाही. जस्ताच्या वाफा श्वसनातून जाणे किंवा जस्तयुक्त क्षारांचे सेवन केल्यास विषबाधा होते. त्यामुळे रुग्णास ताप, उलट्या, पोटात मुरडा येणे व जुलाब हे त्रास होतात.

सुबोध खरे 10/09/2018 - 11:41
जर पिण्याचे पाणी तांब्याच्या पात्रात १६ तास ठेवले तर त्यामुळे त्यातील पचनसंस्था बिघडवणाऱ्या काही जंतूंचा नाश होतो असे दिसले आहे. पिण्याचे पाणी जर १२ तास तांब्याच्या पात्रात ठेवले तर त्यातील सर्व जंतू मरतात असे माझ्या सासर्यांनी दाखवुन दिलॆ आहे. यासाठी त्यांनी विविध ठिकाणी विहिरीतील पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवून सकाळी ते पाणी मेट्रोपोलीस या प्रयोगशालेत पृथक्करणासाठी दिले असता १००% पाण्यातील जाणूनच नाश होतो असे आढळले. हे निष्कर्ष त्यांनी दाखवून रोटरी क्लब इंटरनॅशनल कडून निधी मिळवून रायगड जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावात साध्या पाण्याचे फिल्टर बसवून दिले. या फिल्टर मध्ये खालच्या भांड्यात तांब्याचा पातळ पत्रा बसविला आहे जो एक वर्ष पर्यंत चालतो. सुरुवातीला काही तांब्याचे फिल्टर दान केले असता आदिवासी लोकांनी ते भंगारात विकून ते पैसे दारूत उडवले म्हणून असा पातळ पत्रा बसवावा लागला. आमचे सासरे हे CSMCRI (Central Salt & Marine Chemicals Research Institute)या भावनगर येथील COUNCIL OF SCIENTIFIC & INDUSTRIAL RESEARCH च्या अंतर्भूत शास्त्रीय प्रयोशाळेत शास्त्रज्ञ होते नि त्यांनी निरिंद्रिय रसायनशास्त्र(inorganic chemistry) मध्ये समुद्री रसायनशास्त्रात पी एच डी केली होती. तांब्यापेक्षा चांदीची जंतुनाशक शक्ती बरीच जास्त आहे. त्यामुळे तांब्यापेक्षा चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. हाच आधार घेऊन टाटा यांनी टाटा स्वच्छ हा वॉटर फिल्टर काढला आहे ज्यात सिल्व्हर नॅनो तंत्रज्ञान वापरलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

अरे वाह! छान कार्य केलंय तुमच्या सासऱ्यांनी. चांदी बद्दलची माहितीही आवडली.

In reply to by सुबोध खरे

सुचिता१ 14/09/2018 - 00:38
आमच्या घरी आजी च्या प्रथे नुसार , मातीच्या माठात , एक तांब्याचा गडु टाकुन ठेवतात. त्याचा कितपत उपयोग होत असेल. चांदी चा गडु पण टाकला तर उपयोग होइल का ?

In reply to by सुचिता१

हेमंतकुमार 14/09/2018 - 08:41
त्या दोन्हींचा उपयोग नक्की होईल. अर्थात चांदीबद्दल माझा अभ्यास नाही. तांबे व चांदी यांचा तुलनात्मक अभ्यास कोणी केला असल्यास जाणून घेण्यास उत्सुक.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/09/2018 - 20:46
तांब्यापेक्षा चांदीची जंतुनाशक शक्ती बरीच जास्त आहे. त्यामुळे तांब्यापेक्षा चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. असे मी पूर्वी वाचल्याचे आठवते परंतु परत जालावर खोदकाम केल्यावर हे चूक आहे असे आढळले.स्थिती उलट आहे. तांबे चांदीपेक्षा जास्त चांगले जंतुनाशक आहे. चुकीची माहिती दिल्याबद्दल क्षमस्व. http://blog.eoscu.com/blog/silver-vs-copper-which-is-the-better-biocide-0 http://blog.eoscu.com/blog/silver-vs-copper-which-is-the-better-biocide-1 तांबे हे चांदीपेक्षा जास्त चांगले जंतुनाशक आहे म्हणून रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी जेथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता आहे उदा. दरवाज्याच्या मुठी, रुग्णांनी वापरलेली भांडी, संडासमधील बार, हॅन्डलस इ.-- तेथे तांब्याचे किंवा पितळेच्या वस्तू वापरल्यास जंतुसंसर्ग कमी होतो हे आढळले आहे. पितळेच्या भांड्यात ठेवलेले पाणी काही तासात निर्जंतुक होते असे आढळले आहे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 09/08/2021 - 09:37
जलशुद्धीकरणचे नवे स्वदेशी तंत्रज्ञान पुण्यातील एनसीएलने विकसित केले आहे. स्वस्तिक असे त्याचे नाव असून या प्रक्रियेत सर्व नैसर्गिक वनस्पती आणि तेलांचा वापर केलेला आहे.

दुर्गविहारी 10/09/2018 - 11:55
माहिती थोडी अपुरी वाटली. लोहासारख्या महत्वपुर्ण खनिजाची अधिक माहिती अपेक्षित होती. विशेषतः ते मोठ्या प्रमाणात कशातून मिळेल ? तसेच शरिरातील जस्त कमी झाले तर हाडे विशेषतः पायाची दुखतात, त्यासाठी बदाम खाणे हा उत्तम मार्ग. बदामामधून बर्‍यापैकी जस्त मिळते. लोह या खनिजाबाबत चर्चा सुरु आहे तर एक वाचलेला किस्सा लिहीतो ( संदर्भ- धातुंच्या नवलकथा- ले. से. विनेत्स्की ) एका प्रेमिकाने आपल्या प्रेयसीला जगावेगळी भेट देण्यासाठी स्वताच्या शरीरातील रक्तापासून लोह वेगळे काढुन त्याची अंगठी बनविण्याचा प्रयत्न केला, पण अंगठी बनविण्याईतके मानवी शरीरात लोह नसल्याने त्याचा प्रयत्न अर्थातच फसला आणि अ‍ॅनिमियाशिवाय हाती काही आले नाही.

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:07
लोहासारख्या महत्वपुर्ण खनिजाची अधिक माहिती अपेक्षित होती. >>>>>> ती माझ्या यापूर्वी च्या हिमोग्लोबिन च्या लेखात आलेली आहे म्हणून इथे पुनरुक्ती केली नाही . त्या लेखाचा दुवा या लेखात दिलेला आहे. बाकी, किस्सा मस्तच. सुबोध, उपयुक्त माहिती.

अनिंद्य 10/09/2018 - 12:44
..... चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. .... चांदीच्या भांड्यातले पाणी / भोजन ह्याचा काहीतरी फायदा नक्कीच असावा. माझी आत्या स्वतःसाठी आयुष्यभर फक्त चांदीचा एक ग्लास आणि एक ताटली एवढीच भांडी वापरत असे. ९४ वर्षाचे स्वास्थ्यपूर्ण आयुष्य मिळाले तिला. अर्थात '‘Anecdotal evidence is poor evidence’ हे मान्य आहे.

In reply to by मराठी कथालेखक

अनिंद्य 10/09/2018 - 15:51
इथे तज्ञ सांगतीलच, पण फॉलीक ऍसिड + झिंकचे योग्य प्रमाणातले सप्लिमेंट पुरुषांचा 'स्पर्म काउंट' वाढवण्यासाठी देतात. (वंध्यत्वतज्ञ मित्राकडून मिळालेली माहिती)

हेमंतकुमार 10/09/2018 - 14:16
जननेंद्रियांच्या वाढ व विकासात जस्त मदत करते. तसेच संबंधित हॉर्मोन्सच्या कार्यातही मदत करते. अर्थात यासाठी आहारातून योग्य प्रमाणात मिळालेले जस्त पुरेसे आहे. लैंगिक आसक्तिशी थेट संबंध नाही. वर स्पष्ट केल्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे म्हणता येईल.

In reply to by हेमंतकुमार

मार्मिक गोडसे 10/09/2018 - 15:35
वीर्यात अनेक घटकांवरोबर झींकही असते. पुरुषाला आहारातून स्त्रीपेक्षा जास्त झींक मिळणे गरजेचे असते का?
माहितीपूर्ण लेख कुमार साहेब .. अभिप्राय नोंदवतो यासाठी कि आपल्याला अजून भविष्यात प्रेरणा मिळत राहावी . इथे या लेखात जे अभिप्राय आलेले आहेत तेही उपयुक्त आहेत . धन्यवाद त्यांनुषंगाने ज्ञानात भरच पडली म्हणायची .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

वकील साहेब 10/09/2018 - 16:00
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख, खरे सरांनी तांब्याच्या भांड्यातील पाण्याबद्दल दिलेली माहिती सुद्धा उपयोगी आहे. धन्यवाद. पु. ले. शु.

अथांग आकाश 10/09/2018 - 18:37
आधीचेही भाग वाचले आहेत पण तेव्हा मिसळपावचे सदस्यत्व घेतले नसल्याने प्रतिसाद देता नाही आले.

हेमंतकुमार 10/09/2018 - 20:20
मिपा परिवारात व इथल्या चर्चेत तुमचे स्वागत आहे ! सर्वांच्या सहभागाने चर्चा उपयुक्त होत आहे

ट्रम्प 10/09/2018 - 20:32
कुमार साहेब , लोहप्राप्ती साठी लोखंडी कढईत बनवलेल्या भाज्या खाणे चांगले असते असं म्हणतात कढई मूळे लोहप्राप्ती होते का ? आणि ते माहीत असून सुद्धा हल्ली सगळे (नेटकरी , नेटगुरु ) स्टेटस दाखवण्या साठी नॉनस्टिक भांडी वापरतात असं मला वाटतयं .

In reply to by ट्रम्प

सुबोध खरे 10/09/2018 - 21:22
नॉनस्टिक भांडी हि "केवळ" स्टाईल किंवा स्टेटस दाखवण्यासाठीच वापरली जातात असे वाटत नाही. लोखंडी भांडी रोजच्या वापरात नसतील तर त्यावर बारीक गंजाचा थर येतो. शिवाय काही भाज्या लोहामुळे काळ्या पडतात. या शिवाय धिरडे डोसा इ पदार्थ तव्याला चिकटले तर ते खरवडून काढण्याची कट कट काय आहे ते स्वयंपाक घरातील काम करणाऱ्या स्त्रीला माहिती असते. लोखंडी तव्याला एखादी गोष्ट चिकटू नये म्हणून तवा किती तापलेला असावा हे त्याच्या जाडीवर अवलंबून असते आणि त्याचा अंदाज यायला बराच अनुभव लागतो तेंव्हा नवशिक्या माणसाला नॉन स्टिक भांडी फार सोयीची पडतात. जालावर नॉनस्टिक भांड्यांमुळे कर्करोग होतो असे लेख मधून मधून वाचण्यात येतात. त्याला अजून तरी कोणताही पुरावा मिळालेला नाही. खालील दुवे मुळातून वाचून पहा. https://www.cancercouncil.com.au/86095/cancer-information/general-information-cancer-information/cancer-questions-myths/environmental-and-occupational-carcinogens/teflon-cookware-does-not-cause-cancer/ https://www.cancer.org/cancer/cancer-causes/teflon-and-perfluorooctanoic-acid-pfoa.html बाकी लोह मिळण्यासाठी बीडाच्या( लोखंडाच्या) भांड्यात भाज्या किंवा द्रव पदार्थ शिजवणे( ज्यात आम्ल पदार्थ आहे) आवश्यक आहे. भाकरी पोळी सारखे कोरडे पदार्थ शिजवले तर फारसे लोह मिळणार नाही. जिज्ञासूंनी खालील दुवा वाचून पाहावा. https://runnersconnect.net/cast-iron-pan-iron/ लोह मिळवण्याचा तो एक स्रोत असू शकतो परंतु आहारातून लोह मिळ्वण्याला पर्याय होऊ शकत नाही. Some groups of people need more iron than the other. ICMR recommends 9 mg of iron per day for children from 1 to 3 years of age, 13 mg for children from 4 to 6 years of age, 16 mg for 7-9 years of age. The increase in iron requirements with age in children is because of increased iron requirements for skeletal growth, lean body mass and blood expansion in the body. For adolescent boys from 10 to 17 years of age, 21-28 mg of iron per day and for adolescent girls for the same age group, 26-27 mg of iron is recommended. In adolescent age, additional iron is required for the growth spurt (blood volume expansion, increase in haemoglobin concentration and muscle mass) and in females, extra iron is also needed to account for menstrual losses. For adult males, 21 mg of iron and for adult females, 17 mg of iron is recommended. https://www.nestle.in/nhw/nutrition-basics/nutrients/minerals/iron-iodine-zinc

हेमंतकुमार 10/09/2018 - 20:49
होय, लोखंडी कढईमुळे ती काही प्रमाणात नक्की होते. तसेच लोखंडी खलबत्त्यात कुटून चटणी खाणेही उपयुक्त. बाकी, आधुनिक जीवनशैलीतील अनेक गोष्टी आरोग्याशी फारकत घेणाऱ्या आहेत खरे.

गामा पैलवान 10/09/2018 - 21:51
कुमार१, लोह शरीरात शोषलं जाण्याचा वेग किती असतो? मला हृद्विकारामुळे रक्तदाब व नाडीवेग कमी करणारी औषधं घ्यावी लागतात. त्यामुळे उभं राहिलं की चक्कर येते. यावर उपाय म्हणून रक्तचाचणी केली. त्यात लोह कमी आढळून आलं. म्हणून लोहाच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. तेव्हा चक्कर कमी झाल्यागत वाटली. पुढे रक्तचाचणीत लोह ठीक आल्यावर गोळ्या बंद केल्या. नंतर कधी गोळ्या खायला लागू नयेत म्हणून बीट खाणं सुरू केलं. आजही चक्कर आल्यासारखी वाटली की बीट खातो. एखाद दोन दिवसांत आटोक्यात येते. हा खरोखरीचा परिणाम म्हणावा की छद्मशमन (प्लासिबो) ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 11/09/2018 - 08:22
शोषणवेग च्या ऐवजी शोषण प्रमाण हा शब्द योग्य राहील. अहरातले लोह हे दोन प्रकारचे असते: १. शाकाहारातून मिळणारे लोह हे ‘फेरिक क्षारां ’ च्या रुपात असते. त्याचे शोषण होण्यासाठी मात्र ते ‘फेरस’ स्वरूपात करणे आवश्यक असते. याकामी ‘क’ जीवनसत्व हे मोलाची भूमिका बजावते. म्हणून जेवणामध्ये लिंबाचा समावेश नेहमी आवश्यक आहे. २. याउलट मांसाहारातून मिळणारे लोह हे हीम (फेरस) स्वरूपात असते. त्याचे शोषण हे सहजगत्या व अधिक प्रमाणात होते. समजा आपण १० मिलिग्रॅम इतके लोह आहारात घेतले आहे. तर शाकाहाराच्या बाबतीत त्यातले १ मिलिग्रॅम तर मांसाहाराच्या बाबतीत मात्र २ मिलिग्रॅम एवढे शोषले जाईल.

सुधीर कांदळकर 11/09/2018 - 06:43
तांबे, जस्त यावर जनसामान्यांसाठी फारसे लिहिले जात नाही. प्रथमच वाचले. मी जेवणाबरोबर तांबे खातो ही जाहिरात आठवली. एकदा औषधाच्या दुकानात जीवनसत्त्वांच्या नेहमीच्या गोळ्या जस्तासह होत्या म्हणून अडाणीपणाचे उपचार टाळण्यासाठी मी त्या घेतल्या नव्हत्या. तेव्हा ब्रॅन्ड बदलला. असो. अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद. तांब्याच्या भाड्याबद्दलच्या विश्वासार्ह माहितीबद्दल डॉ खरेंचे आभार. आमच्या घरात गेली अनेक वर्षे सौ तांब्याच्या भांड्यातले पाणी पिते आणि जेवणासाठी वापरते. मला मात्र माठातलेच आवडते. प्लॅस्टीकच्या बाटलीत प्लॅस्टीकचे रेणू घर्षणामुळे बाटली झिजून सुटे होऊन बाटलीतल्या पाण्यात शिरतात असे कुठेसे वाचले होते. त्यामुळे शक्यतो काचेच्याच बाटल्या फ्रीजमध्ये ठेवतो. आता तांब्याच्या भांड्यातले रात्रभर साठवलेले पाणी माठात आणि फ्रीजमधल्या बाटल्यांमध्ये भरीन.

हेमंतकुमार 11/09/2018 - 09:42
ती चालू ठेवा. आमच्याकडेही पिण्याच्या पाण्याच्या पिपात आम्ही 'तांब्याचा तांब्या' नेहमी बुडवून ठेवला आहे

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 11/09/2018 - 09:56
हा एक सर्वात सोपा उपाय आहे. कारण आजकाल चांदी किंवा तांबं महाग झालं असल्यामुळे उघड्यावर ठेवता येत नाही. यामुळे तांब्याचे किंवा चांदीचे भांडे पिंपात किंवा माठात बुडवून ठेवा. पिंप किंवा माठ रात्री भरून ठेवायचा आणि दिवसभर त्यातील पाणी नि:शंक पणे प्यायचे.

In reply to by दीपक११७७

सुबोध खरे 12/09/2018 - 12:10
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) हे महत्वाचे ठरते. कारण जितके क्षेत्रफळ जास्त तितके धातूचे आयन जास्त पाण्यात उतरतात आणि त्याप्रमाणे जंतूंचा नाश लवकर होतो. म्हणूनच वर दिलेल्या उदाहरणात( रायगड जिल्ह्यातील) तांब्याचा पातळ पत्रा वापरला आहे.आणि हा पातळ पत्रा साधारण एक वर्षे टिकेल एवढ्याच जाडीचा वापरला आहे जो भानगरात विकला तर फारसे पैसे मिळणार नाहीत. साधारण ८ तास पाण्यात ठेवल्यावर पाणी निर्जंतुक होईल इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) असेल असा पत्रा वापरला आहे. जितके जास्त जंतू असतील तितके जास्त आयन वापरले जातात आणि अधिक आयन पाण्यात उतरतात. एका विशिष्ट पातळी नंतर पाण्यात उतरणारे आयन आणि धातुकडे परत जाणारे आयन हे एका स्थिर स्थितीत(STEADY STATE) येतात. त्यामुळे पाण्यात अतिरिक्त आयन उतरून आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता फारच कमी असते. बाकी सोन्या चांदी चे नाणे बुडवून ठेवले तर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) कमी असल्याने पाणी निर्जंतुक होण्यासाठी लागणारा वेळ जास्त असू शकेल.

हेमंतकुमार 12/09/2018 - 08:19
काही मुद्दे: १. भांड्याच्या तुलनेत नाण्याचा परिणाम कमी असावा २. तांब्याचे भांडे हा सर्वांना परवडणारा उपाय. ३. सोन्याबद्दल कल्पना नाही. जाणकारांनी खुलासा करावा.

हेमंतकुमार 13/09/2018 - 08:45
त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना गणेशोत्सव शुभेच्छा !

निओ 14/09/2018 - 23:22
कुमारजी माहितीपूर्ण लेखमालेबद्दल आभार. एक शंका. पाण्यासाठीची तांब्याची भांडी धुतली नाही तर त्यावर हिरवट थर चढतो, तो अपायकारक असतो का? किती कालावधी नंतर पाण्याची भांडी धुणे क्रमप्राप्त आहे.

In reply to by निओ

सुबोध खरे 15/09/2018 - 10:32
तांब्याच्या भांड्यावर चढलेला हिरवट थर हा कॉपर हायड्रॉक्साइड आणि कॉपर कार्बोनेटचे मिश्रण असते.( हवेतील आर्द्रता, कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजन बरोबर झालेली क्रिया). कमी प्रमाणात याचा मानवी शरीरावर फारसा परिणाम होत नाही. परंतु काही लोकांमध्ये तांब्याची उत्सर्जन क्रिया अनुवांशिक आजारामुळे व्यवस्थित होत नाही अशा लोकं याचा परिणाम जाणवू शकतो. सर्व सामान्य माणसांना याचा फारसा त्रास होत नाही.

हेमंतकुमार 15/09/2018 - 07:09
धन्यवाद, निओ मी तो तांब्या दर १५ दिवसांनी धुतो व उन्हात वाळवतो.

palambar 26/09/2018 - 21:42
३. वास व चव या संवेदनावर परिणाम" ********************** मला कॅल्शिअम व b12, D व्हिटॅमिनची कमतरता डिसेंबर मधे कळली, पण मला पूर्वी इतका वास पटकन येत नाही हे मला जाणवले. यात जस्ताच्या कमतरते मुळे असे होत असेल का? त्याची काही वेगळी टेस्ट करता येते का?

हेमंतकुमार 26/09/2018 - 21:58
तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी करूनच द्यावे लागेल. हे मुद्दे बघा: १. पचनसंस्थेचा दीर्घकाळ आजार आहे का ? २. वय ६० चे पुढे ? ३. शुद्ध शाकाहारी ? जस्ता ची रक्तपातळी ही चाचणी फारशी निर्णायक व विश्वासार्ह नसते

हेमंतकुमार 11/04/2020 - 10:40
सध्या जस्त हा धातू एकदम प्रकाशझोतात आलेला आहे. अर्थातच त्याच्या विषाणूविरोधी गुणधर्मामुळे. गेली अनेक वर्षे त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्याचे २ विशेष गुणधर्म असे: १. पेशींतील विषाणूची वाढ रोखणे २. आपली विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती वाढवणे. कोविद१९ च्या रुग्णांवर त्याचे प्रयोग जगभरात सुरु आहेत. त्यांना लवकर यश येवो ही सदिच्छा !

हेमंतकुमार 16/04/2020 - 09:53
करोना २ हा विषाणू कोणत्या पृष्ठभागावर किती काळ टिकतो याबद्दलचे संशोधन सध्या जोरात आहे. एका अभ्यासात स्टील, प्लास्टिक आणि तांबे यांची तुलना केली गेली. त्याचा निष्कर्ष असा , की तांब्यावरून तो ४ तासात नाहीसा होतो. बाकीच्यांवर मात्र तो बराच अधिक काळ राहतो. https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMc2004973 यानिमित्ताने तांब्याचे भांड्यात पाणी ठेवायचे महत्व अधोरेखित झाले !