Skip to main content

फलटण-राजगड-तोरणा-मढेघाट ट्रिप

लेखक डोके.डी.डी. यांनी गुरुवार, 19/07/2018 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
राजगड-तोरणा-मढेघाट ट्रिप येत्या 3 व 4 तारखेला दुचाकीवरून सदर ट्रिप करायची आहे . मागील महिन्यातच मी राजगड बघितला आहे आणि आता मित्रांसोबत वरील ट्रिपला जायचे आहे. तरी ट्रिप चा क्रम कसा असावा आणि एक दिवस राहायची सोय कोठे होईल. चांगले हॉटेल कोठे मिळेल. 3 ता.ला सकाळी लवकर निघून 4 ला रात्री परत यायचे असे नियोजन आहे.

वाचने 5431
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

डोके साहेब, तुमच्या धाग्याच्या शीर्षकावरुन आणि तुम्ही लिहीलेल्या धाग्यावरुन काहीही कळत नाही. तुम्ही राजगडाला गेलेले आहात याचा अर्थ राजगड पुन्हा पहाणार आहात कि नाही ? कि तिन्ही गोष्टी बघणार आहात ? जर राजगड-तोरणा-मढेघाट करणार असाल तर आधी मढेघाटला जा, त्यासाठी तुम्ही आधी वेल्हा गाठून केळद या गावी जा. इथे मढेघाटातील लक्ष्मी धबधबा पहाण्यासारखा आहे. त्प बघून पुन्हा वेल्ह्याला येउन तोरणा चढला पाहिजे. गड चढायला साधारण दोन तास आणि वर पोहचल्यानंतर गड पाहून गडावरच मुक्काम करायला लागेल. तोरण्यावर मुक्कामासाठी मेंगाई मंदिर आहे. जेवण तुम्हाला बनवावे लागेल किंवा खाली वेल्ह्यात कोणाला तरी सांगून गडावर पोहचवायची व्यवस्था करावी लागेल. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर गड सोडून मार्गासनीमार्गे वाजेघर गाठा. बहुतेकजण गुंजवणे मार्गे राजगडला जातात, पण ती वाट अवघडतर आहेच, पण पावसाळ्यात धोकादायकही आहे. त्यापेक्षा स्वताचे वाहन असेल तर वाजेघरमार्गे जाणे सोयीचे. गडाच्या एक तृतीयांश उंचीवर सपाटी आहे, इथे वाहन पार्क करुन पायर्‍यांच्या सोप्या वाटेने राजगडाचा पाली दरवाजा गाठता येइल. अर्थात इतक्या कमी वेळात राजगड पुर्णपणे बघणे अशक्य आहे, पण तुम्ही राजगड आधीच बघितला असल्याने जितका हवा तितका पाहून उतरु शकता. अर्थात हे सर्व तुमचे वाहन आहे असे गृहित धरुन सांगतो आहे. स्वताचे वाहन नसेल तर दोन दिवसात यातील फक्त एकच ठिकाण होणे शक्य आहे. अर्थात सध्याचा पावसाचा एकंदरीत जोर बघता सध्या न जाणे चांगले ईतकेच मी सुचवेन. एकतर पावसाने केळदचा रस्ता खराब झाला असण्याची शक्यता जास्त आहे. इथेच खुप वेळ जाईल. तसेच केळदला हल्ली भाउगर्दी असते असे एकून आहे. त्यात मढेघाट उतरुन उपांड्याच्या नाळेने वर येण्याचे नियोजन असेल तर हे शक्यच नाही. तोरणा आणि राजगडाचे माथे ढगात पुर्णपणे लपेटलेले असतात. फार काही बघता येत नाही. तरी तुमच्या या ट्रिपचा नियोजनाचा पुर्नविचार करावा.

In reply to by दुर्गविहारी

सर आपण अतिशय सविस्तर प्रतिसाद दिलात. खूप आभार, मी राजगड बघितला आहे , पण मित्रांसोबत परत बघायचा आहे, दोन माच्या बघायच्या राहिल्यात. सकाळी 8 पर्यंत पहिल्या ठिकाणी पोचणे शक्य आहे. आपण सांगितल्या प्रमाणे बराचसा गड ढगात असतो हे मी मागील वेळेसच अनुभवले आहे. आता मी एवढेच विचारीन की 1) हे गड बघण्याचा चांगला कालावधी कोणता (तोरणा आणि राजगड) मागील सेल्स पाली दरवाज्यानेच गेले होतो सपाटी पर्यंत गाड्या जात नाहीत थोडे पुढे जाऊन रस्त्यावर लावल्या होत्या. 2) तिन्ही ठिकाणांपैकी कुठले दोन योग्यरीत्या बघून होतील. परत एकदा धन्यवाद.

जर माझा सल्लाच विचारत असाल तर राजगड आणि तोरणा बघायचा सुयोग्य कालावधी ऑगस्ट, सप्टेंबर आहे. या काळात फुलांनी दोन्ही गड सजलेले असतात. आत्ता फार तर मढ्या घाट, उपांड्या नाळ पाहून आलात तर मस्त पावसाळी भटकंती होईल.

तुम्ही असं करा सितामाई,धुमाळवाडी ,मोगराळे,वारुगड ट्रिप मारुन या. फलटणवरुन एकाच दिवसात होईल. दुर्गविहारी म्हणतात तसे ऑगस्टच्या मध्यावर राजगड तोरणा आणि मढेघाट करुन या. काय म्हणता?

मागील रविवारी मी मित्रांसोबत दुचाकीवर केळदला जाऊन उपांड्या घाटाने कर्णवाडीत उतरून मढे घाटाने पुन्हा केळद ला आलो , ३ तासात ट्रेक पूर्ण केला उरलेल्या वेळेत दोन अडीच किमी अंतरावरील भोर्डी गावातील प्राचीन शिवमंदिराला(केळेश्वर ) भेट दिली . मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम स्थानिक गावकरी करत आहेत पण मंदिराच्या आवारातील वीरगळ आणि सतीशिळा पूर्णपने दुर्लक्षित आहेत , वेळेचे नियोजन व्यवस्थित केलेतर मढे उपांड्या घाट आणि भोर्डीचे केळेश्वर शिवमंदिर एका दिवसात पाहून होईल ,पासली पर्यंतचा रस्ता ठीक आहे तिथून पुढे केळद पर्यंतचा २-३ किमीचा रस्ता खराब आहे