कौरव १०० आणि पांडव ५ हे आपण सर्वजण जाणतो. ह्या सन्दर्भामध्ये युधिष्ठिराच्या तोंडचा हा श्लोक प्रसिद्ध आहे:
आपत्सु विग्रहे प्राप्ते वयं पञ्च च ते शतम् ।
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ॥
(आमच्याआमच्यात संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाच आणि ते शंभर. पण कोणा परक्याशी संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाचासह शंभर.)
अशा शंभर कौरवांपैकी दुर्योधन आणि दु:शासन सर्वांच्या परिचयाचे असतात. युद्धाच्या प्रारम्भीच कौरवांची बाजू सोडून पांडवांना येऊन मिळालेला युयुत्सु हा कौरवहि काहींच्या ऐकण्यात असतो, तसेच कौरवांची एकुलती एक बहीण दु:शला हीसुद्धा ऐकून माहीत असते पण अन्य कौरव कोण होते? ह्या प्रश्नाचे उत्तर ह्यापुढे आहे. (अर्थात् ”कितीहि नावे असली तर काय फरक पडतो’ असे म्हणून प्रश्न option लाहि टाकता येतो. मात्र अतिचिकित्सक आणि शंकेखोर मनांचे त्यामुळे समाधान होत नाही हे उरतेच!)
१०० कौरव बंधूंची नावे महाभारत आदिपर्वाच्या १०८व्या अध्यायात श्लोक २-१४ येथे दिली आहेत ती अशी आहेत. उतारा BORI च्या महाभारताच्या संशोधित आवृत्तीमधून घेतला आहे. (प्रत्येक श्लोकाअखेर मी त्यातील नावे सुटी करून मराठीमध्ये दिली आहेत आणि त्या नावांची गणती दाखविली आहे.)
दुर्योधनो युयुत्सुश्च राजन्दुःशासनस्तथा ।
दुःसहो दुःशलश्चैव जलसन्धः समः सहः ॥ २॥
दुर्योधन, युयुत्सु, दु:शासन, दु:सह, दु:शल, जलसन्ध, सम, सह (१-८)
विन्दानुविन्दौ दुर्धर्षः सुबाहुर्दुष्प्रधर्षणः ।
दुर्मर्षणो दुर्मुखश्च दुष्कर्णः कर्ण एव च ॥ ३॥
विन्द, अनुविन्द, दुर्धर्ष, सुबाहु, दुष्प्रधर्षण, दुर्मर्षण, दुर्मुख, दुष्कर्ण, कर्ण (९-१७)
विविंशतिर्विकर्णश्च जलसन्धः सुलोचनः ।
चित्रोपचित्रौ चित्राक्षश्चारुचित्रः शरासनः ॥ ४॥
विविंशति, विकर्ण, जलसन्ध, सुलोचन. चित्र, उपचित्र, चित्राक्ष, चारुचित्र, शरासन (१८-२६)
दुर्मदो दुष्प्रगाहश्च विवित्सुर्विकटानन: ।
ऊर्णनाभः सुनाभश्च तथा नन्दोपनन्दकौ ॥ ५॥
दुर्मद, दुष्प्रगाह, विवित्सु, विकटानन, ऊर्णनाभ, सुनाभ, नन्द, उपनन्दक (२७-३४)
सेनापतिः सुषेणश्च कुण्डोदरमहोदरौ ।
चित्रबाणश्चित्रवर्मा सुवर्मा दुर्विमोचनः ॥ ६॥
सेनापति, सुषेण, कुण्डोदर, महोदर, चित्रबाण, चित्रवर्मा, सुवर्मा, दुर्विमोचन, (३५-४२)
अयोबाहुर्महाबाहुश्चित्राङ्गश्चित्रकुण्डलः ।
भीमवेगो भीमबलो बलाकी बलवर्धनः ॥ ७॥
अयोबाहु, महाबाहु, चित्राङ्ग, चित्रकुण्डल, भीमवेग, भीमबल, बलाकी, बलवर्धन, (४३-५०)
उग्रायुधो भीमकर्मा कनकायुर्दृढायुधः ।
दृढवर्मा दृढक्षत्रः सोमकीर्तिरनूदरः ॥ ८॥
उग्रयुध, भीमकर्मा, कनकायु, दृढायुध, दृढवर्मा, दृढक्षत्र, सोमकीर्ति, अनूदर, (५१-५८)
दृढसन्धो जरासन्धः सत्यसन्धः सदःसुवाक् ।
उग्रश्रवा अश्वसेनः सेनानीर्दुष्पराजयः ॥ ९॥
दृढसन्ध, जरासन्ध, सत्यसन्ध, सद:सुवाक्, उग्रश्रवा, अश्वसेन, सेनानी, दुष्पराजय, (५९-६६)
अपराजितः पण्डितको विशालाक्षो दुरावरः ।
दृढहस्तः सुहस्तश्च वातवेगसुवर्चसौ ॥ १०॥
अपराजित, पण्डितक, विशालाक्ष, दुरावर, दृढहस्त, सुहस्त, वातवेग, सुवर्चस, (६७-७४)
आदित्यकेतुर्बह्वाशी नागदन्तोग्रयायिनौ ।
कवची निषङ्गी पाशी च दण्डधारो धनुर्ग्रहः ॥ ११॥
आदित्यकेतु, बह्वाशी, नागदन्त, अग्रयायिन्, कवची, निषङ्गी, पाशी, दण्डधार, धनुर्ग्रह, (७५-८३)
उग्रो भीमरथो वीरो वीरबाहुरलोलुपः ।
अभयो रौद्रकर्मा च तथा दृढरथस्त्रयः ॥ १२॥
उग्र, भीमरथ, वीर, वीरबाहु, अलोलुप, अभय, रौद्रकर्मन्, दृढरथ, (८४-९१)
अनाधृष्यः कुण्डभेदी विरावी दीर्घलोचनः ।
दीर्घबाहुर्महाबाहुर्व्यूढोरुः कनकध्वजः ॥ १३॥
अनाधृष्य, कुण्डभेदी, विरावी, दीर्घलोचन, दीर्घबाहु, महाबाहु, व्यूढोरु, कनकध्वज, (९२-९९)
कुण्डाशी विरजाश्चैव दुःशला च शताधिका ।
एतदेकशतं राजन्कन्या चैका प्रकीर्तिता ॥ १४॥
कुण्डाशी, विरजस् (१००-१०१) आणि राजकन्या दु:शला. भावांची ही नावे शंभर नसून १०१ आहेत
गांगुली भाषान्तरामध्ये हीच यादी अध्याय ११७ मध्ये सापडते. ती अशी आहे.
Duryodhana, Yuyutsu, Duhsasana, Duhsaha, Duhsala, Jalasandha, Sama, Saha, Vinda and Anuvinda, Durdharsha, Suvahu, Dushpradharshana, Durmarshana and Durmukha, Dushkarna, and Karna; Vivinsati and Vikarna, Sala, Satwa, Sulochana, Chitra and Upachitra, Chitraksha, Charuchitra, Sarasana, Durmada and Durvigaha, Vivitsu, Vikatanana; Urnanabha and Sunabha, then Nandaka and Upanandaka; Chitravana, Chitravarman, Suvarman, Durvimochana; Ayovahu, Mahavahu, Chitranga, Chitrakundala, Bhimavega, Bhimavala, Balaki, Balavardhana, Ugrayudha; Bhima, Karna, Kanakaya, Dridhayudha, Dridhavarman, Dridhakshatra, Somakitri, Anudara; Dridhasandha, Jarasandha, Satyasandha, Sada, Suvak, Ugrasravas, Ugrasena, Senani, Dushparajaya, Aparajita, Kundasayin, Visalaksha, Duradhara; Dridhahasta, Suhasta, Vatavega, and Suvarchas; Adityaketu, Vahvashin, Nagadatta, Agrayayin; Kavachin, Krathana, Kunda, Kundadhara, Dhanurdhara; the heroes, Ugra and Bhimaratha, Viravahu, Alolupa; Abhaya, and Raudrakarman, and Dridharatha; Anadhrishya, Kundabhedin, Viravi, Dhirghalochana Pramatha, and Pramathi and the powerful Dhirgharoma; Dirghavahu, Mahavahu, Vyudhoru, Kanakadhvaja; Kundasi and Virajas. (102)
BORI यादीहून ही यादी काही बाबीत वेगळी आहे. BORI यादीतील काही नावे येथे वगळली आहेत तर काही नावे येथे नव्याने दिसतात.
हीच नावे आदिपर्वाचे मराठी भाषान्तर देणार्या एका स्थानी आणखीनच वेगळी आहे.
१०० हून अधिक नावे असण्याचा हा प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग म्हणजे काही काही जागी शेजारच्या दोन शब्दांमध्ये एक विशेषण आणि दुसरा त्याचे विशेष्य मानून दोन नावांच्या जागी एकच नाव ठेवणे. पण असे निश्चित कोठे करायचे ह्याबाबत काहीच मार्गदर्शक तत्त्व नसल्यामुळे ह्या मार्गाचा वापर करता येत नाही.
प्रतिक्रिया
21 Jun 2018 - 7:17 am | विशुमित
रोचक माहिती..!!
21 Jun 2018 - 8:58 am | प्रचेतस
ह्यातील युयुत्सु हा धृतराष्ट्राचा दासीपुत्र होता.
आदिपर्वातील उल्लेखाव्यतिरिक्त कौरवांची नावे भीष्मपर्व, द्रोणपर्व, कर्णपर्व व शल्यपर्वात देखील आलेली आहेत पण ती तुटक आहेत आणि त्यांचा नामोल्लेख भीमाने केलेया धार्तराष्ट्रांच्या वधप्रसंगी होत राहतो त्यामुळे ह्या पद्धतीने ही नावे शोधणे थोडे जिकिरीचे आहे.
21 Jun 2018 - 9:18 am | शाली
रोचक माहिती.
21 Jun 2018 - 9:34 am | जेम्स वांड
दुर्योधन, दुःशासन वगैरे दु कौरव मूलतः, सुयोधन, सु:शासन वगैरे होते म्हणे? ह्यात किती तथ्य आहे? म्हणजे खरोखर जेत्यांनी जितांची नावे बदलली आहेत का?
21 Jun 2018 - 12:18 pm | आनन्दा
त्यातल्या दु: या उपसर्गाचा चुकीचा अर्थ काढू नका. त्या नावांचा अर्थ चांगलाच आहे.
युद्ध करण्यास कठीण आणि शासन करण्यास कठीण. युधिष्ठिर उपहासाने दुर्योधनाला सुयोधन म्हणायचा असेही ऐकून अहे. खखोदेजा.
21 Jun 2018 - 12:41 pm | जेम्स वांड
मला काही भाषा विषयात त्यातही संस्कृतमध्ये विशेष गती नाही. पण मग एक प्रश्न पडतो की जसे लोक पोरांची नावे अर्जुन, धर्मराज, कर्ण, नकुल वगैरे ठेवतात तशी दुर्योधन, दुःशासन का ठेवत नसावेत? अर्थात ते महाभारतात नकारात्मक बाजूला होते तरी नावाचा अर्थ तर चांगलाच होता न?
21 Jun 2018 - 6:20 pm | आनन्दा
आपण आपल्या आदर्शांची नावे मुलांना ठेवतो. नुस्ता अर्थ बघुन नव्हे. नाहीतत कैकयी, रावण ही नावे पण थेवली अस्ती
21 Jun 2018 - 7:44 pm | प्राची अश्विनी
तैमूर नाव आठवलं.
21 Jun 2018 - 8:38 pm | कानडाऊ योगेशु
सहमत.
अगदी अलिकडच्या काळातील किस्सा म्हणजे प्राण हे नाव प्राण हा खलनायक म्हणुन प्रसिध्द झाल्यानंतर कोणीही आपल्या मुलाला ठेवले नाही.
22 Jun 2018 - 4:13 pm | मनिम्याऊ
22 Jun 2018 - 4:15 pm | मनिम्याऊ
22 Jun 2018 - 9:32 am | विप्लव
हो ठेवतात अशी नावे. आमच्या गल्लीत एका व्यक्तीच नाव दुर्योधन आहे
22 Jun 2018 - 11:50 am | कोण
https://en.wikipedia.org/wiki/Duryodhan_Mahalingappa_Aihole आमदार दुर्योधन ऐहोळे
22 Jun 2018 - 12:18 pm | विशुमित
रावण आणि दुर्योधन नाव असणारे माझ्या ओळखीचे २ व्यक्ती आहेत.
रावण सडपातळ आहे पण दुर्योधन मात्र खरंच गदाधारी आडदांड व्यक्तिमत्व आहे.
23 Jun 2018 - 4:18 pm | पंतश्री
महाभारत कि एक सांझ नावाचा धडा ११ वी ला असताना CBSC बोर्डात होता अभ्यासाला.
त्यात महाभारत संपल्यानंतर दुर्योधन तळ्यात लपून बसतो जीव वाचवण्यासाठी. कृष्ण पांडवांना ती जागा दाखवतो. त्यावेळी दुर्योधन भीमाला म्हणतो कि माझे नाव सुयोधन असताना दुर्योधन म्हणून का मला हिणवत आहेस.
आता हा धडा खरा कि खोटा ते माहित नाही. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी
21 Jun 2018 - 12:19 pm | प्रसाद_१९८२
रोचक माहिती.
दुर्योधनच्या एका भावाचे नाव देखील "कर्ण" होते तर..
21 Jun 2018 - 10:05 pm | अरविंद कोल्हटकर
मला नेहमीच असे वाटत आलेले आहे की आपणासमोर आ़ज असलेली महाभारतकथा जेत्यांनी तिच्यावर संस्कार करून त्यांना हवी तशी लिहून घेतली असावी. तसे पाहू गेल्यास पांडवांचा राज्याचा अर्धा वाटा मागण्याचा दावा कितपत योग्य होता? आपली एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे राज्याचे हस्तान्तरण करण्याचा मार्ग 'थोरल्या मुलाला राज्य' असा primogeniture स्वरूपाचा होता. उपलब्ध साहित्यामध्ये कोठेहि बापानंतर सर्व मुलांमध्ये राज्य वाटण्याची रीत अवलंबिलेली दिसत नाही कारण राज्य ही राजाची वैयक्तिक मिळकत नसते तर तो प्रजाहितासाठी सोपविलेला ठेवा असतो. कोणत्याहि राजवंशाकडे पाहिले तरी हेच दिसते. राज्य जोपर्यंत स्थिर असते तोपर्यंत बापाकडून थोरल्या मुलाकडे असेच संक्रमण झालेले दिसते. रामाला युवराज्यपदाचा अभिषेक करण्याचे दशरथाने ठरविले तेव्हा इतर तीन भावांना छोटे तुकडे दिले नाहीत. कुरुवंशामध्ये विचित्रवीर्याचे राज्य थोरला मुलगा म्हणून धृतराष्ट्राकडे आले, तेव्हा दुसरा मुलगा पण्डु ह्याला वाटा दिलेला नव्हता. धृतराष्ट्र जन्मान्ध आणि म्हणून स्वतः राज्य करण्यास असमर्थ म्हणून पण्डूने agent म्हणून त्याच्या नावाने राज्य सांभाळले. असे अनेक वेळा इतिहासात ज्गाले आहे. नवा राजा वयात आलेला नसेल, बालक असेल आणि म्हणून त्याच्या वतीने कोणी दुसरा - त्याची आई किंवा विश्वासातील अमात्य - कारभार पाहतो पण राज्याचा स्वामी तो बालकच राहतो. ते राज्य अमात्याच्या घराण्यात जात नाही. पण्डु आपले कार्य सोडून वानप्रस्थाकडे सपत्नीक गेल्यावर वयात आलेला मुलगा दुर्योधन धृतराष्ट्राचा agent बनतो, यद्यपि राजा अजूनहि धृतराष्ट्रच आहे. येर्घे पाण्डवांनी वाटा मागणे हे सर्वथा नियमबाह्य होते. तरीहि त्यांनी तो मागितला आणि अखेर युद्ध आणि प्रचंड नरसंहार करून तो मिळविला. हे सर्व होत असतांना भीष्म, द्रोण, कृप असे जुनेजाणते धर्मवेत्ते कौरवांच्या बाजूनेच होते कारण तीच बाजू न्यायाची होती.
युद्ध जिंकल्यावर त्याचा इतिहास लिहिण्याची वेळ आली आणि स्तुतिपाठकांनी पांडवांचे उदात्तीकरण आणि कौरवांना काळ्या रंगात रंगविणे ह्या मार्गाने तो लिहिला. कौरवांना काळ्या रंगात रंगविणे इतक्या टोकाला गेले की त्यांची मूळची नावे - जी काय असतील ती - बदलून त्यांना दुर्योधन, दु:शासन अशी 'दुर' अशा वाईट अर्थाच्या प्रत्ययाची नावे चिकटविली, भले त्याचा अर्थ खोल विचारान्ती चांगलाच आहे. असा विचार येतो की शेकडो अन्य शुभदर्शक नावे उपलब्ध असतांना कोणता बाप आपल्या मुलांना 'दुर' अशा वाईट अर्थाच्या प्रत्ययाने प्रारम्भ होणारी नावे देईल?
21 Jun 2018 - 10:27 pm | गामा पैलवान
अरविंद कोल्हटकर,
छान रोचक माहिती आहे. जलसन्ध (श्लोक २,४) व महाबाहु (श्लोक ७,१३) दोनदा आलेली दिसतात.
आ.न.,
-गा.पै.
23 Jun 2018 - 1:21 am | प्रसाद गोडबोले
ते दोघे सेम टू सेम दिसणारे जुळे होते. आधीच ९६ -९७ नावे लक्शात ठेवायचे अवघड , त्यातनं ह्या जुळ्यांची वेगवेगळी नावे कोण लक्षात ठेवणार ? असा विचार करुन गांधारी मॅडम ने सेम नावे ठवली होती !
22 Jun 2018 - 12:01 am | गामा पैलवान
अरविंद कोल्हटकर,
माझ्या मते पांडवांचं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होतं. जर पांडवांचा दावा नियमबाह्य असेल तर दुर्योधनास पांडवांना लाक्षागृहात जाळून टाकणं आवश्यक नव्हतं. ज्याअर्थी पांडव कुंतीसह हस्तिनापुरात येताहेत त्याअर्थी ते राज्याचा विहित वाटा मागणारंच आणि तो द्यावा लागेलंच हे त्याला कळलं.
बाकी, धृतराष्ट्राचं म्हणाल तर तो कुटुंबप्रमुख होता, राजप्रमुख नव्हे. त्यानं राज्य यत्किंचितही वाढवलं नाही. तो पराक्रम पंडूचा होता. साहजिकंच पंडुपुत्रांना वडिलांच्या सत्तासंपत्तीतला वाटा मिळणं यथोचित आहे. हस्तिनापुराचं राज्य कौरवांकडे व पंडूने जिंकलेलं राज्य पांडवांकडे ही यथायोग्य वाटणी आहे.
आ.न.,
-गा.पै.
22 Jun 2018 - 9:56 am | कपिलमुनी
हे वाचून चिमाजीअप्पा आठवले
22 Jun 2018 - 12:39 pm | आनन्दा
एक सूक्ष्म फरक आहे. पेशवे पेशवे होते, राजे छत्रपती होते.
बाकी चालू द्या.
23 Jun 2018 - 1:31 am | प्रसाद गोडबोले
मुळ महाभारत वाचल्यास आणि तत्कालीन वारसा हक्क विचारात घेतल्यास संपुर्ण राज्य पांडवांकडेच असणे न्याय्य होते , दुर्योधनाचा कौरवांचा संबंधच येत नाही !
आपण फार ऐकीव माहीतेवरुन (आणि त्याही पेक्षा वाईट म्हणजे टीव्ही सीरीयल्स पाहुन ) मते बनवतो महाभारताविषयी (आणि रामायणाविषयी देखील !) . मुळ महाभारत पाहिल्यास , एक नरो वा कुंजरो वा प्रकरण सोडले तर , युधिष्ठिरात दोष काढायला जागाच नाहीये ! राज्य स्वतःच्या हक्काचे नसते , न्याय्य नसतं तर त्याने स्वतःच झिडकारले असते !
युधिष्ठिर इज अ प्युअर जेम क्लासिक कॅरॅक्टर !
23 Jun 2018 - 10:25 am | अरविंद कोल्हटकर
तुम्ही मूळ महाभारत वाचले आहे काय आणि तसे असेल तत्कालीन वारसा हक्कांबाबत तुमची ठोस आणि साधार माहिती काय आहे?
मला जे दिसते ते असे. कलियुग प्रारंभापासून ते आन्ध्रभृत्यांपर्यंत होऊन गेलेल्या सत्व राजवंशांच्या आणि त्यातील राजांच्या याद्या अनेक पुराणांमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या बहुतांशी एकमेकांशी जुळतात. त्या सर्वांमध्ये पित्यापासून पुत्राकडे असेच सत्तान्तर दिसते. रघुवंशामध्ये कालिदासाने रघुकुलाचा अनुक्रम दिला आहे आणि तो तेथे दिलीप-रघु-अज-दशरथ इ.इ. पित्याकडून पुत्राकडे असा दाखविलेला आहे, मौर्य वंशातील चन्द्रगुप्त-बिंदुसार-अशोक हा क्रमहि पित्याकडून पुत्राकडे हाच क्रम दाखवितो. तीच गोष्ट गुप्त वंशाची. तेथे चन्द्रगुप्त पहिला-समुद्रगुप्त-चन्द्रगुप्त दुसरा(विक्रमादित्य) असा पिता-पुत्र क्रम दिसतो.
ह्या सन्दर्भामध्ये म.म.काणॆ ह्यांच्या History of Dharmashastra ह्या ग्रन्थाच्या तिसर्या खंडामध्ये पान ४१ वर पुढील उतारा आहे जो ह्याचीच पुष्टि करतो.
तेव्हा ’तत्कालीन वारसा हक्क विचारात घेतल्यास संपुर्ण राज्य पांडवांकडेच असणे न्याय्य होते’ असे जे विधान आपण केले आहे त्यातील ’न्याय’ आम्हाला दाखवून द्यावा.
23 Jun 2018 - 1:40 pm | प्रचेतस
महाभारत मोठे गहन आहे.
मूळात धृतराष्ट्र हा जन्मांध असल्याने राजा होण्यास अपात्र होता त्यामुळे पांडु हा अभिषिक्त राजा झाला. शापामुळे पुढे पांडु वनवासास गेला तेव्हा धृतराष्ट्राने राज्य सांभाळले. मात्र धृतराष्ट्र हा अभिषिक्त राजा झाला का काही हे महाभारतात सापडत नाही, निदान मला तरी तसे आढळले नाही. अभिषिक्त राजाचा पुत्र ह्याच न्यायाने युधिष्ठिर हा खरा राज्याचा वारस ठरतो.
ह्यावरुन देवगिरीच्या यादवांसंबंधित एक घटना आठवते. कृष्णदेवयादवाच्या मृत्युनंतर रामचंद्रदेव यादव लहान असल्याने कृष्णाचा धाकटा भाऊ महादेव देवगिरीच्या सिंहासनावर आला. महादेवाच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र आमणदेव राजा झाला मात्र रामचंद्रदेवाने त्याला पदच्युत करुन (डोळे काढून) त्याचे राज्य बळकावून घेतले. ह्यातही न्याय्य बाजू नेमकी कुणाची हे अनुमानणे तसे गहनच आहे.
23 Jun 2018 - 6:56 pm | प्रसाद गोडबोले
येस हेच म्हणणार होतो. धृतराष्ट्र केवळ केअर टेकर होता ! पॉवर ऑफ अॅटर्नी टाईप ! पांडव मोठ्ठे आल्यावर रीतसर हँड ऑव्हर केले पाहिजे होते राज्य त्याने !
आणि यादवांचे उदाहरण आहे तसेच अगदी जवळचे महाराजांचेही उदाहरण आहे ! संभाजी राजांच्या मृत्युनंतर न्याय्य राजे जे शाहुमहाराजच होते , ते केवळ औरंगजेबाच्या कैदेत असल्याने राजाराम महाराज परिस्थेतीमुळे छत्रपती झाले ! आणि त्यानंतर ताराराणी ! शाहुमहाराज परत आल्यावर छत्रपती होणे अगदीच स्वाभाविक आणि धर्मशास्त्राला धरुन होते ( आणि कदाचित म्हणुनच बाळाजी विश्वनाथांना त्यांची बाजु मराठी रयतेला पटवणे सोपे गेले असावे :) )
24 Jun 2018 - 10:05 am | manguu@mail.com
आंधळा असूनही जनतेत राहिला , राज्यावर राहिला , तो न्यायय वारस नाही आणि संभोगसुख घेता येत नाही हे समजल्यावर प्रजा , राज्य सोडून जो जंगलात गेला , तो व त्याचे वारस मात्र खरे वारसदार ! गम्मतच की .
24 Jun 2018 - 5:23 am | अर्धवटराव
युधिष्ठिर माझंही सर्वात आवडतं कॅरेक्टर आहे.
24 Jun 2018 - 8:32 am | प्रसाद गोडबोले
माझे आवडते कॅरॅक्टर म्हणजे भीम !
सगळ्या कौरवांना टिप्पुन टिप्पुन मारले ! पण त्याही पेक्षा भारी म्हणजे ज्या प्रकारे कीचकाला मारले ते ! तो कीचकवधाचा प्रसंग वाचत असताना ईमॅजिन केला तेव्हा अंगावर काटा आलेला !
24 Jun 2018 - 12:40 pm | गामा पैलवान
मार्कस ऑरेलियस,
अहाहा, काय आठवण काढलीत. कीचकवध जबरीच आहे. भीमानं कीचकाचं पोट फाडून त्यात हात, पाय व डोकं तोडून चेचलं. दुसऱ्या दिवशी शंभरेक चमच्यांना ( = अनुकीचकांना ) तसंच ठार मारलं. नंतर लोकांना पत्ता लागला की द्रौपदीमुळे हा राडा झाला, म्हणून तिला सुरक्षितरीत्या नगराबाहेरही काढलं. हे सगळं अज्ञातवासात असतांना. याला म्हणतात मस्ती.
आ.न.,
-गा.पै.
22 Jun 2018 - 9:33 pm | Ram ram
सत्य घटनेला तथाकथित लेखक यांना इतिहासकार म्हणता येणार नाही यांनी मनोरंजक बनवण्यासाठी कल्पनाशक्तीचा वापर केला. स्वतःचे विद्वत्व ठसवण्यासाठी हवे तसे वळण दिलं. साधं शिवराय व संभाजीराजे यांच्या चरित्रात कितीतरी कल्पित घटना जडवल्या गेल्या केवळ तीन शतकांनी. मी कौरवांचा हितचिंतक आहे, कृष्णाने कपटाने युद्ध घडवलं हे माझं मत आहे.
23 Jun 2018 - 10:37 am | विशुमित
मी दोघांचा ही हितचिंतक नाही पण कृष्णाने देशो देशीचे राजे या युद्धात लढवून त्यांची राज्यं खालसा केली आणि स्वतः मात्र नामनिराळा राहिला, असे काही वाटते.
( कृपया कोणी तपशील विचारू नका. रात्री कीर्तनसेवेकरीता घेतलेला अभंग मला सकाळी उठल्यावर आठवत नाही. त्यामुळे आपला पास)
22 Jun 2018 - 10:09 pm | यशोधरा
उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यामधील मोरी तालुक्यात ओसला नावाचे खेडे आहे. तेथे दुर्योधनाचे मंदिर असून तो तेथे लोकांना पूजनीय आहे.
तसंच, सहज आठवलं म्हणून - उत्तराखंड राज्यामध्ये जोशीमठ - जुम्मा - रुईंग ह्या गावांनंतर द्रोणगिरी हे खेडे लागते. इथूनच हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उपटला - अशी इथल्या लोकांची खात्री आहे - पर्वताचा हात उपटून नेला व पर्वताला जायबंदी केले अशी लोक मान्यता वा समजूत आहे व त्यामुळे इथे हनुमान प्रार्थनीय नाही. त्याचे नाव सुद्धा ह्या गावात घेत नाहीत.
23 Jun 2018 - 12:21 am | जेम्स वांड
तुफान!!!
इतिहासातल्या ह्या इंटरप्रिटेशन अन आल्टरनेटिव्ह व्युज वर एक फर्मास लेख लिहा ताई!. मी रोज मारुती स्तोत्र (श्री समर्थ रामदासस्वामी विरचित) पाठ केल्याशिवाय पाणी न पिणारा माणूस. हे काहीतरी नवीनच मला!
23 Jun 2018 - 1:00 pm | यशोधरा
कल्पना उत्तम आहे.
23 Jun 2018 - 1:51 pm | भीमराव
विचित्रवीर्याला स्वतः ची पोरं नवती, शेवटचा कुरू भिष्म. त्यामुळे राज्य अधिकारी कौरव अथवा पांडव दोन्ही नव्हते. मग लढुन जे जिंकतील ते राजे हा नैसर्गिक न्याय वाटतो. व्यासाला स्वतः चा वंश विलयाला जाताना स्वतः ला काय वाटलं असेल?
23 Jun 2018 - 10:18 pm | गामा पैलवान
मार्कस ऑरेलियस,
दुर्योधनाचा आक्षेप वेगळा आहे. तो म्हणतो की हे स्वत:ला पांडव म्हणवणारे पाच जण आले कुठून? त्यांचा आगापिछा काय? पंडुस वनात मुले झाली म्हणतात. कोणी बघितलीत? पंडुची तरी साक्ष उपलब्ध आहे का? यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?
पण भीष्मांनी दुर्योधनाचा आक्षेप फेटाळून लावला. कोणत्या कारणान्वये ते माहित नाही. त्यांनी पांडवांना पंडुचे वंशज मानलं. वडिलोपार्जित रीत्या पंडुस प्राप्त झालेलं हस्तिनापुर कौरवांकडे ठेवलं. त्याने स्वकर्तृत्वाने जोडलेलं खांडवप्रस्थ पांडवांना दिलं. बाकी, पंडुचा चक्रवर्ती अधिकार (सामन्तांकरवी करवसुलीचा अधिकार) त्याच्या मृत्यूसोबत संपुष्टात आला होता. तो चालू राहणार नसल्याने त्यासंबंधी भांडण संभव नव्हतं.
खांडवप्रस्थ फक्त जंगल होतं. त्यामुळे दुर्योधनाने फारशी खळखळ केली नाही. अशी एकंदरीत दोन्ही पक्षांना समाधानकारक वाटणी झाली. मात्र नंतर कृष्णार्जुनांनी खांडवप्रस्थातलं खांडववन जाळून तिथे इंद्रप्रस्थ नावाचं नगर वसवलं. तीच आजची जुनी दिल्ली. हल्ली इंद्रप्रस्थास पुराना किल्ला म्हणतात.
आ.न.,
-गा.पै.
24 Jun 2018 - 3:12 am | अरविंद कोल्हटकर
ह्या प्रकरणामध्ये थोडे खोलात जाऊन मी संशोधन केले आणि मला क्र.५ च्या उद्योगपर्वामध्ये १४७व्या अध्यायामध्ये खालील श्लोक आढळले आणि मलाच हे नवे ज्ञान लाभले. ते श्लोक पुढे दाखवीत आहे.
त्यांचा सन्दर्भ असा आहे की युधिष्ठिर हाच राज्याचा योग्य वारस आहे असे धृतराष्ट्र दुर्योधनाला समजावून सांगत आहे. त्यासाठी तो कुरुवंशाचा त्याच्यामागील तिसर्या पिढीचा इतिहास सांगत आहे. तो म्हणतो:
(०५ म्हणजे ५ वे पर्व उद्योगपर्व, १४७ हा त्यातील अध्याय, ०१४ म्हणजे त्या अध्यायातील क्र. १४वा श्लोक ह्या a,b,c,d हे त्यातील चार पाद. प्रत्यक्षात a,b आणि c,d हे पाद एकेक ओळीत आहेत. ह्या पद्धतीने हे सर्व श्लोक वाचावे. श्लोकांचा केलेला अर्थ शब्दश: नसून मथितार्थच काय तो लिहिला आहे.)
05147014a तथैव सर्वधर्मज्ञः पितुर्मम पितामहः
05147014c प्रतीपः पृथिवीपालस्त्रिषु लोकेषु विश्रुतः
05147015a तस्य पार्थिवसिंहस्य राज्यं धर्मेण शासतः
05147015c त्रयः प्रजज्ञिरे पुत्रा देवकल्पा यशस्विनः
05147016a देवापिरभवज्ज्येष्ठो बाह्लीकस्तदनन्तरम्
05147016c तृतीयः शंतनुस्तात धृतिमान्मे पितामहः
05147017a देवापिस्तु महातेजास्त्वग्दोषी राजसत्तमः
05147017c धार्मिकः सत्यवादी च पितुः शुश्रूषणे रतः
05147018a पौरजानपदानां च संमतः साधुसत्कृतः
05147018c सर्वेषां बालवृद्धानां देवापिर्हृदयंगमः
05147019a प्राज्ञश्च सत्यसंधश्च सर्वभूतहिते रतः
05147019c वर्तमानः पितुः शास्त्रे ब्राह्मणानां तथैव च
05147020a बाह्लीकस्य प्रियो भ्राता शंतनोश्च महात्मनः
05147020c सौभ्रात्रं च परं तेषां सहितानां महात्मनाम्
05147021a अथ कालस्य पर्याये वृद्धो नृपतिसत्तमः
05147021c संभारानभिषेकार्थं कारयामास शास्त्रतः
05147021e मङ्गलानि च सर्वाणि कारयामास चाभिभूः
05147022a तं ब्राह्मणाश्च वृद्धाश्च पौरजानपदैः सह
05147022c सर्वे निवारयामासुर्देवापेरभिषेचनम्
05147023a स तच्छ्रुत्वा तु नृपतिरभिषेकनिवारणम्
05147023c अश्रुकण्ठोऽभवद्राजा पर्यशोचत चात्मजम्
05147024a एवं वदान्यो धर्मज्ञः सत्यसंधश्च सोऽभवत्
05147024c प्रियः प्रजानामपि संस्त्वग्दोषेण प्रदूषितः
05147025a हीनाङ्गं पृथिवीपालं नाभिनन्दन्ति देवताः
05147025c इति कृत्वा नृपश्रेष्ठं प्रत्यषेधन्द्विजर्षभाः
05147026a ततः प्रव्यथितात्मासौ पुत्रशोकसमन्वितः
05147026c ममार तं मृतं दृष्ट्वा देवापिः संश्रितो वनम्
05147027a बाह्लीको मातुलकुले त्यक्त्वा राज्यं व्यवस्थितः
05147027c पितृभ्रातॄन्परित्यज्य प्राप्तवान्पुरमृद्धिमत्
05147028a बाह्लीकेन त्वनुज्ञातः शंतनुर्लोकविश्रुतः
05147028c पितर्युपरते राजन्राजा राज्यमकारयत्
05147029a तथैवाहं मतिमता परिचिन्त्येह पाण्डुना
05147029c ज्येष्ठः प्रभ्रंशितो राज्याद्धीनाङ्ग इति भारत
05147030a पाण्डुस्तु राज्यं संप्राप्तः कनीयानपि सन्नृपः
05147030c विनाशे तस्य पुत्राणामिदं राज्यमरिंदम
05147030e मय्यभागिनि राज्याय कथं त्वं राज्यमिच्छसि
(धृतराष्ट्र दुर्योधनाला सांगतो)
(कुरुवंशामध्ये) प्रतीप नावाचा राजा होऊन गेला, त्याला ज्येष्ठ पुत्र देवापि, मधला बाह्लीक आणि धाकटा शंतनु असे तीन पुत्र होते. त्यापैकी शंतनु हा माझा पितामह. थोरला देवापि हा अनेक गुण असलेला आणि तरीहि त्वचारोगी होता. कालान्तराने प्रतीप राजा वृद्ध झाल्याने त्याने आपल्या वारसाच्या राज्याभिषेकाची तयारी केली. तेव्हा बाह्मण, वृद्ध आणि पौरजन त्याच्याकडे आले आणि देवापीच्या अभिषेकापासून त्याला परावृत्त करते झाले कारण तो त्वचारोगाने दूषित होता आणि शरीराने अधू (हीनाङ्ग) राजा देवतांना आवडत नाही. ब्राह्मणांकडून परावृत्त केला गेलेला प्रतीप राजा परलोकी गेला आणि ते पाहून देवापीने वनाचा आश्रय केला. राज्य सोडून बाह्लीक आजोळी गेला आणि पित्याच्या मृत्यूनंतर शन्तनु राज्यावर बसला. त्याच विचाराने हीनाङ्ग असलेला मी थोरला असूनहि राज्यापासून दूर ठेवला गेलो आणि पाण्डु धाकटा असूनहि राज्य करता झाला. त्याच्या मृत्यूनंतर हे राज्य त्याच्या मुलांचे आहे. राज्य माझ्या भाग्यात नसतांना तू राज्याची इच्छा कशी करू शकतोस?
24 Jun 2018 - 5:30 am | अर्धवटराव
मिपावर अत्यंत दुर्मीळ असं हे वाक्य बघुन डोळे पाणावले.... कुठेतरी खरच अच्छे दिन आले आहेत कि काय...
24 Jun 2018 - 8:27 am | प्रसाद गोडबोले
अरविंदजी ,
अत्यंत माहीतीपुर्ण आणि श्लोकांच्या संदर्भासहित बदललेले मत मांडल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार !
मिपावर यनावालाटाईप "मी म्हणेन तेच खरे बाकी सारे अज्ञानमुलक स्वात्मरंजन " अशी विचारसरणी मानणार्यांची भाऊ गर्दी वाढत चाललेली असताना , काहीतरी सकारात्मक चर्चा होते , आणि कोणताही अभिनिवेष न बाळगता अभ्यासाअंती मते बदलली जातात हे पाहुन आनंद वाटला !
आपणाकडुन महाभारतावर अजुन लेखन यावे अशी विनंती करीत आहे :)
आपला विनम्र ,
मार्कस ऑरेलियस
24 Jun 2018 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>मिपावर यनावालाटाईप "मी म्हणेन तेच खरे बाकी सारे अज्ञानमुलक स्वात्मरंजन " अशी विचारसरणी मानणार्यांची भाऊ गर्दी वाढत चाललेली असताना....!
आवरा....!
-दिलीप बिरुटे
24 Jun 2018 - 1:42 pm | माहितगार
राजा न्याय्य असावा, दुर्योधन न्याय्य होता की नाही हा भाग वेगळा. भीष्म जसा स्वतःहून स्वतःचा अधिकार सोडतो तसे वाक्य धृतराष्त्राच्या तोंडी दिल्यामुळे समस्या आहे. अन्यथा सत्तारीवर्तनाचा मुख्य संकेत थोरल्याचा थोरला असा असावा, भीष्माने नकार दिल्यावर धृतराष्ट्राकडे (तो अंध असल्यास पंडूने मदत करावी धृतराष्ट अंध आहे हे त्याची सत्ता आधिकार नाकारण्याचे कारण रामायणातील पादुका ठेऊन राज्य चालवण्याचा भरताचा आदर्श पाहिल्या नंतर पटत नाही धृतराष्ट्र मोठा असेल तर धृतराष्ट्राच्या केवळ अंधत्वावरुन पाण्डूला सत्ता हे पटत नाही) आणि मग थोरल्याचा थोरला या न्यायाने दुर्योधनाचा अधिकार होतो. अर्थात राजाची न्याय्यता सुयोग्यता हे निकष लावल्यानंतर उत्तरे बदलतात. पण राजाची न्याय्यता सुयोग्यता हे निकष बर्याचदा सब्जेक्टीव्ह राहू शकतात. सहसा इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो असे म्हणतात. कुणाला हिरो रंगवायचे आणि कुणाला व्हीलन यात बरेच काही खालीवर होऊ शकते. - या सर्वाचा अर्थ मी दुर्योधनाचा समर्थक आहे असा काढू नये.
25 Jun 2018 - 8:52 am | अर्धवटराव
यात तथ्य आहेच. शिवाय इतीहास जर जिंकलेला राजाच्या हुकुमाने/मर्जीने लिहीला जात असेल तर तसं होणं स्वाभावीक देखील आहे.
पण व्यासांसारखा दर्दी जेंव्हा इतिहास लिहीतो तेंव्हा संदर्भ वेगळे असतात. व्यासाला इतीहासाचा आत्मा वर्तमानातल्या आरशात दाखवायचा असतो. तिथे जीत-पराजीतांची कहाणी गौण ठरते.
25 Jun 2018 - 9:03 am | प्रचेतस
सहमत आहे.
व्यासांनी महाभारताचं सार शांतिपर्वात दिलंय. युद्धानं कुणाचंच भलं झालं नाही. दोन्ही पक्षांची अपरिमित हानी झाली. युधिष्ठिराला मिळालं ते फक्त स्त्रिया आणि वृद्धच शिल्लक राहिलेलं राज्य.