रिक्त प्याल्याच्या तळाशी...

लेखनविषय:
काव्यरस
ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते! ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते! तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते! तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते! केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते! नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते! —सत्यजित

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

लेखनविषय:
काव्यरस
मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे पणती जपून ठेवा अंधार होत आहे! वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला माझ्याच सावलीचा मज भार होत आहे! झाली नवीन ओळख,माझी मला अशी की ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे! हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! —सत्यजित

'नाते' म्हणून आहे!

लेखनविषय:
काव्यरस
तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे! निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे! जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे! गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे या काळजात फिरते पाते म्हणून आहे! या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे! —सत्यजित

तो खुला बाजार होता!

लेखनविषय:
चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता! चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! देह विझलेले जगाची वासना जाळीत होते चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता! हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! —सत्यजित

पेटुनी आरक्त संध्या...

लेखनविषय:
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे... केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे! मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे... वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे! काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे... सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे! एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी... त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! —सत्यजित

नकळत

लेखनविषय:
काव्यरस
प्रीतीत तुझ्या मज, तू बरेच शिकवून गेलीस निरक्षर होतो मी, मला पुस्तक करून गेलीस लावले होते वृक्ष मी आपल्या अंगणी बहरले ते अन सावली तू घेऊन गेलीस विश्वास करत गेलो, तू जे सांगत गेलीस फसत राहिलो मी, अन तू फसवत गेलीस निजलो मी, वचन पहाटेचे तू देत गेलीस नकळत मला, पहाट तू माझी घेऊन गेलीस -निनाव २१.०३.२०१७

तू नभीचा चंद्रमा हो...

लेखनविषय:
लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा... तू मला भेटायला ये..एकदा येवून जा! शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे... तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा! तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा... पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा! वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे... या नदीला सागराची वा दिशा देवून जा! सूर्य विझता रातही चालून येते नेमकी... तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा! —सत्यजित

घे भरारी..मन म्हणाले...

लेखनविषय:
घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो... सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो! जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती... वाटले की..वाट चुकले कोकरु झालो! राजरस्त्याची तमा ना आडवाटेची... मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो! गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले... धन्य झाला जन्म की मी वासरु झालो! बासरीचा सूर होणे मज कुठे जमले? राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो! हुंदके दाबून सारे स्वागता गेलो... अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो! घेतली हाती कलम बहुधा बरे झाले... मी मुक्या संवेदनांची आबरु झालो! —सत्यजित

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

काव्यरस
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो डॉ. सुनील अहिरराव

शांत अता या गाजा होणे नाही ..

लेखनविषय:
काव्यरस
रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव
Subscribe to gajhal