✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शाप की आशीर्वाद?

य
युयुत्सु यांनी
Mon, 08/04/2025 - 10:02  ·  लेख
लेख
शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले. मग ते मला कै० इंदिराबाई गुर्जरांचा (वि०सी० गुर्जरांच्या पत्नी) पत्त्ता शोधून त्यांच्याकडे घेऊन इंदिराबाई गुर्जरांनी त्यांच्याकडचे सर्व साहित्य मला दिले. गुर्जरांचे उपलब्ध साहित्य अगोदरच वाचून संपवले होते. आमच्या शाळेचे ग्रंथालय खुप भारी होते. मग मी २-३ महिने खपून एक दीर्घ लेख लिहीला आणि उत्साहाने तो मांडकेसरांना (ते ’नूमविय’चे संपादक होते) नेऊन दिला आणि विसरून गेलो. मग एक दिवस अचानक वर्गावर आले आणि "राजीव उपाध्ये कोण आहे?" अशी विचारणा केली. मी हात वर केल्यावर मला म्हणाले, "जरा बाहेर ये बघू" लेखाचे विसरून गेल्यामुळे मी घाबरतच बाहेर गेलो. मांडकेसर माझा लेख फाईलमधून बाहेर काढत म्हणाले, "हा लेख तू लिहीला नाहीयेस. तुझ्या घरात कुणी (आई-बहीण-भाऊ) मराठीत एम०ए० करत आहे का? हा लेख एम०ए० च्या विज्ञार्थाने लिहीलेला वाटतोय. खरं खरं सांग..." नंतर बराच वेळ मी सरांना माझ्या क्षमतेनुसार लेख मीच लिहीला आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. सरांनी मला उलटे-सुलटे प्रश्न विचारले आणि मग तो मला काटछाट करून आणायला सांगितले. मी (नाराजीने) काटछाट केली आणि त्यांनी तो अंकासाठी स्वीकारल्याचे सांगितले आणि मी खुषीत घरी येऊन सर्वाना सांगितले. मग नववीचे वर्ष संपले, निकाल लागला आणि नूमवीयचे सगळ्या वर्गात वाटप झाले तेव्हा माझा लेख छापून आला होता. तेव्हा मी आणि एक दोन मित्र उन्हाळ्याच्या सुटीत कवठेकरसरांच्या घरी पडीक असू. कवठेकर सरांचे वडील म्ह० दत्त रघुनाथ कवठेकर! तेव्हाचे मराठीतले नामवंत आणि वजनदार कादंबरीकार. त्यांना पण विठ्ठल सीताराम गुर्जरांबद्दल भयानक आदर होता. साहजिक कवठेकरसरांनी माझा लेख वडिलांना कौतूकाने वाचायला दिला. त्या दिवशी नेमका योगायोग असा की कवठेकरसरांच्या वडीलांना भेटायला प्रा० म० ना० अदवंत आले होते. कवठेकरसरांनी माझी प्रा० अदवंतांशी हा "गुर्जरांचा पणतू" अशी ओळख करून दिली आणि मी लिहीलेला लेख त्यांना वाचायला दिला. प्रा० म० ना० अदवंतांनी मी लिहीलेला लेख बारकाईने सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचला आणि म्हणाले, "छान अभ्यास करून लिहीला आहेस, एम०ए०चे विज्ञार्थी पण असं लिखाण करत नाहीत." त्या शब्दांनी एकदम उडालोच. नंतर हा अनुभव आयुष्यात अनेक महत्त्वाच्या टप्प्यावर परत-परत आला. पुण्याच्या ’सकाळ’ने मला सदर लिहायची संधी दिली तेव्हा एक श्रेयलंपट गुरुवर्य अतिशय नाराज होते. असे अनुभव आज ६२ व्यावर्षी पण येत आहेत. आज मागे वळून बघतांना एक लक्षात येते आपल्या क्षमता ओळखून दु;खी न होता त्या क्षमतांना न्याय देणारे भेटणे प्रगतीसाठी आवश्यक ठरते. भारतासारख्या देशात समाजाकडून व्यक्तीच्या आयुष्या्मध्ये समाज अनावश्यक लुडबूड खुप करतो. कुणी काय करायचे आणि काय करायचे नाही, याच्या प्रतिगामी आणि साचेबद्ध कल्पना त्या व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचे नुकसान खुप करतात. खरं तर जेव्हा आर्थिक आणि जिवाला धोका नसेल तर कुणीही काहीही करायला मुक्त असतो... पण हे कोण कुणाला समजावणार?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
2450 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

कौतुकास्पद. इतक्या लहानपणी

गवि
Mon, 08/04/2025 - 13:11 नवीन
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.
  • Log in or register to post comments

फारच....

अभ्या..
Mon, 08/04/2025 - 14:11 नवीन
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे मी तर केस कापायला नेले

गवि
Mon, 08/04/2025 - 16:41 नवीन
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्रमेयांची चवड

अनन्त्_यात्री
Mon, 08/04/2025 - 17:01 नवीन
आणि त्यावर व्यत्यासांची चळत. कठिण आहे एकंदरीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

श्री० गवि आणि श्री ० अभ्या

युयुत्सु
Mon, 08/04/2025 - 14:47 नवीन
श्री० गवि आणि श्री ० अभ्या मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यवीर सावरकर

चंद्रसूर्यकुमार
Mon, 08/04/2025 - 17:29 नवीन
स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.
  • Log in or register to post comments

बर्र्र

अभ्या..
Mon, 08/04/2025 - 18:27 नवीन
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हेच म्हणतो. तो न्युनगंड

कानडाऊ योगेशु
Mon, 08/04/2025 - 18:43 नवीन
हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गटणे

अस्वस्थामा
Mon, 08/04/2025 - 18:58 नवीन
अणि अश गोष्टी वाचून मग सखाराम गटणे तयार झाले की त्यांची टर उडवायला असतातच.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अं...

असंका
Wed, 08/06/2025 - 05:00 नवीन
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

काही फरक नाही

चंद्रसूर्यकुमार
Wed, 08/06/2025 - 09:43 नवीन
मग फरक काय आहे?
तसा फरक काही नाही. शेवटी सगळे थोर लोक एकाच मुशीत घडलेले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

श्री० चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु
Mon, 08/04/2025 - 18:15 नवीन
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः हे वचन माहित असेलच...
  • Log in or register to post comments

मला वर दाखवलेला लादीपाव

nutanm
Mon, 08/04/2025 - 20:38 नवीन
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा