भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in काथ्याकूट
6 Jan 2018 - 11:23 am
गाभा: 

"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय"
अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे.

(१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.

(१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?
ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का?

(२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.

(३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?

बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना?

(४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.

(५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? )

(६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)

(७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का?

[२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला
(२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला
(३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं
इतके किमान पर्याय संभवतात
तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती
(२) नव्ह्ती
इतके किमान पर्याय संभवतात
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]

एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?

हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?

अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे
(१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

10 Jan 2018 - 5:45 pm | मराठी कथालेखक

आता अजून किती दगडफेक होणार आहे या धाग्यावर.. २०० होतील बहूधा !!
मित्रांनो , कृपया झाल्या घटनेवरुन आपापसात त्वेषाने वाद नको घालूयात.
हीच वेळ आहे सर्वांनीच एकमेकांना समजून घेण्याची. काही जखमा, वेदना असतील तर त्या कधीतरी व्यक्त होणे ठीक आहे..पण मनाने एकमेकांपासून दूर जाण्याचे टाळा. सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल मनात ममत्व असावे.

मित्रांनो , कृपया झाल्या घटनेवरुन आपापसात त्वेषाने वाद नको घालूयात.
हीच वेळ आहे सर्वांनीच एकमेकांना समजून घेण्याची. काही जखमा, वेदना असतील तर त्या कधीतरी व्यक्त होणे ठीक आहे..पण मनाने एकमेकांपासून दूर जाण्याचे टाळा.

असं कोणी केलेलं दिसत नाही.

सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल मनात ममत्व असावे.

सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल माझं ममत्व जास्त का तुझं जास्त अशी हमरीतुमरी लागलेली आहे. किमान इथल्या सदस्यांबद्दल हेच म्हणता येईल.

पगला गजोधर's picture

18 Jan 2018 - 12:30 pm | पगला गजोधर

सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल माझं ममत्व जास्त का तुझं जास्त अशी हमरीतुमरी लागलेली आहे. किमान इथल्या सदस्यांबद्दल हेच म्हणता येईल.

१+

बरोबर आहे सहमत.
आम्ही इथे (मिपावर) फक्त व्हर्च्युअल हमरीतुमरीवर वाद घालतो.
प्रत्यक्ष कट्ट्यावर एक चाय, वन बाय टू करून, कुठे जेवायला जायचं हेचं ठरवत असतो.

चिगो's picture

10 Jan 2018 - 5:59 pm | चिगो

अत्यंत सकस लेख.. आवडला आणि बव्हांशी पटलादेखील..

यनावाला's picture

10 Jan 2018 - 8:25 pm | यनावाला

श्री.अंतरा आनंद यांचा हा लेख उत्कृष्ट आहे. समाजाची मानसिकता , समुदायाच्या विचारशक्तीच्या मर्यादा यांचे भान ठेवून भीमा-कोरेगाव घटनेचे समंजसपणे विश्लेषण केले आहे. या लेखनातून वैचारिक प्रगल्भता तसेच काही चांगले घडावे याची आंतरिक तळमळ या गोष्टी दिसून येतात.
....यनावाला

अंतरा आनंद's picture

10 Jan 2018 - 11:52 pm | अंतरा आनंद

काहींना जानव्याच्या उल्लेखामुळे मी ब्राम्हण समाजाला दोष देतेय असं म्हटलय. सव्यापसव्य करणे हा प्रचलित शब्द्प्रयोग आहे. "भीमा कोरेगावला काय घडलं?" या लेखात जो उहापोह चालला होता त्याचा मूळ गोष्टीशी काहिही संबंध नव्हता. या लेखाखालील प्रतिक्रियेत कोणी तरी आम्हालाही ब्राम्हण म्हणून चिडवत होतेच हे म्हटलेलं त्याचा उल्लेख दुसर्‍या ठिकाणी आहे. लेखातले मूळ मुद्दे टाळून अनावश्यक गोष्टींवर भार देणार्‍यांना मला कोणतीही उत्तरे दयायची नाहीत. फक्त आपल्याला एका कालबाह्य रूढीबद्द्ल बोललेलं एवढं लागतं तर दुसर्‍यांच्या अभिमानविषयाबद्द्ल आपणही न बोलण्याचं पथ्य पाळावं.

(१)दलित लोकांनी ब्रिटिशांची गुलामी एवढी अभिमानाने सांगावी ह्या इतका मूर्खपणा दुसरा काहीही नाही. (ते ब्रिटीशांची गुलामीबद्द्लचा अभिमान नाही तर पूर्वजांच्या लढवय्येपणाचा अभिमान सांगतात एवढं भान या लिहीणारीला नक्की आहे पण आपल्याला हवं तेच तोडून मोडून सांगायचं)
(२) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच
(३) ज्या प्रकारे एकूणच दलित समाजाची वाटचाल आहे त्यावरून ते असेच मूर्ख बनत राहणार असे वाटते. (रामंमंदिराच्या मागे लागून किती दश्कं मूर्खपणात घालवली ते मोजा ते झालं की गोमाता, लव्हजिहाद, राष्ट्रगीत ही न संपणारी यादी आहे . बसा मोजत.)
(४) ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे.
(५) दलितांनी आंबेडकरांचे पुतळे आणि स्मारक इत्यादींचा नाद सोडून त्यांच्या प्रमाणे चांगले शिक्षण घेतले आणि उद्योग धंदे केले तरच त्यांना काही भवितव्य आहे नाही.
(६) काही दिवस थांबा कुणी दलिताने युरोप मध्ये जाऊन वास्को द गामा ला भारतांत समतेची गुढी उभारायला बोलावले होते असे ऐकू येईल.
(६)या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.
(७) द्यायला लोकां पासून आधी चोरून घ्यायला पाहिज. फुकटचंबू लोक म्हणजे समाजाचा कॅंसर आहेत
बंद, तोड्फोड करुन तो हक्क " अर्न" करतात त्यांच्या पुढार्‍यांकडुन.
अशी वाक्ये असलेले प्रतिसाद निव्वळ दलित समाजाबद्द्लच्या कळकळीतून आलेत की त्यांना काही जास्त मिळतय या मळमळीतून आलेत हे कळत नाही का?
महार वतन चार जणांना मिळाली म्हणून महारांची स्थिती चांगली होती अस नाही पण ते उगाळून उगाळून त्याचे वळसे देत बसायचं.
असो, माझा मुद्दा अतिशय थेट आहे. कळत नसेल तर पुन्हा एकदा, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल.
आपले नेते जसे पूज्य असतात तसे दुसर्‍याचे नेतेही काही त्यांना पूज्य असतात. त्यांना थेट "नक्ष्यलांचे हस्तक" वैगेरे म्हणणं अति होतं.
आरक्षणाचा मुद्दा कुठेही नसताना तो आणला गेलाच.

क्रमशः

अशी वाक्ये असलेले प्रतिसाद निव्वळ दलित समाजाबद्द्लच्या कळकळीतून आलेत की त्यांना काही जास्त मिळतय या मळमळीतून आलेत हे कळत नाही का? >> केवळ मळमळ! आणि ती नेहमीच चालू असते वेगवेगळ्या रुपात :-(

प्रसाद_१९८२'s picture

11 Jan 2018 - 10:26 am | प्रसाद_१९८२

केवळ मळमळ! आणि ती नेहमीच चालू असते वेगवेगळ्या रुपात

===

इतरांनी लिहिले कि मळमळ ? मग तुम्ही ब्राम्हणांबद्दल जे लिहिताय त्याला ओकार्‍या म्हणावे काय?

इरसाल's picture

11 Jan 2018 - 12:06 pm | इरसाल

बंद, तोड्फोड करुन तो हक्क " अर्न" करतात त्यांच्या पुढार्‍यांकडुन.

हे वाक्य मीच लिहीलय. आणी ते फक्त आणी फक्त दलितांसाठीच लिहीलय असा समज करुन घेतलाय. असे तोडफोड करणारे कोणत्याही समाजाचे, पक्षाचे, पार्टीचे असु शकतात. (पुढारी फक्त दलितांचेच असत नाहीत)
हा मुद्दा अंगावर ओढुन घेवुन तुम्ही माझ्या, मी दलितांबद्दल न बोललेल्या म्हणण्याला दुजोरा देत आहात अस नाही वाटत तुम्हाला.

(ज्याय्ला काय वेळ आलीय, ज्यात काही विचीत्र अर्थ नाही अश्या वाक्याला सुद्धा लोक आपल्याला सोयीस्कर अर्थ लावुन घेतात आणी इकडे जस्टीफिकेशन द्यावे लागतय)

ते ब्रिटीशांची गुलामीबद्द्लचा अभिमान नाही तर ...

कशावरून?
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं आहे?
डॉ. आंबेडकरांनी भीमा कोरगावचा उत्सव चालू केला.
त्यांनी जेव्हा चालू केला तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते.
स्वातंत्र्यानंतर हा उत्सव त्यांनी बंद केला नाही. करा म्हणून लोकांना सांगीतलं नाही.
================
तर इथे अनेकांनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे महार सैनिक होते, त्यांनी देखील अनेक लढाया लढल्या, जिंकल्या, त्यात मर्दुमकी गाजवली, मग शिवाजींनी लढलेली लढाई का नाही निवडली उत्सव साजरा करायला? पूर्वजांचा लढवय्येपणा नेमका भारताचे लोकल सेकंड लास्ट मोठे सार्वभौम राज्य बुडतानाच कसा आठवला?
=====================
भारतात केवळ आदिवासींनी ब्रिटीशांविरोधात २५ उठाव केलेले आहेत. यातला कोणताही आंबेडकरांना निवडता आला असता.
https://en.wikipedia.org/wiki/Tribal_revolts_in_India_before_Indian_inde...
============================
आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या काळात पूर्वाश्रमीचा क्षत्रीय वा ब्राह्मण जातीशी संबंध नसलेल्या लोकांनी राज्य केले आहे.
https://www.quora.com/Was-there-ever-a-Dalit-King-in-India
थेट सत्ताधारी बनलेल्या या लोकांचा उत्सव करणं जास्त लॉजिकल असलं असतं.

आनंदयात्री's picture

11 Jan 2018 - 7:35 pm | आनंदयात्री

जिज्ञासूंसाठी: I'm Right, You're Wrong

पगला गजोधर's picture

11 Jan 2018 - 9:39 pm | पगला गजोधर

मुंबई : 'ऍक्शन हिरो' म्हणून बॉलिवूड मध्ये नामांकित असलेला अक्षय कुमार 'पॅड मॅन' नंतर आता 'केसरी' या चित्रपटाची तयारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा 'फर्स्ट लुक' आज प्रदर्शित झाला. यात अक्षय कुमार शूरवीर "शीख" लढवैय्याच्या भूमिकेत दिसला आहे. अक्षयने चित्रपटाचे पहिले चित्र ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की "चित्रपटाच्या पहिल्या चित्राच्या माध्यातून तुमच्या पर्यंत पोहोचताना मला खूप अभिमान वाटतोय. २०१८ वर्षाची सुरुवात मी केसरीने करत आहे. मी आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट अतिशय महत्वाकांक्षी असून यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर १८९७ साली, अफगाण ओराक्झाई आणि ब्रिटिश भारतीय सेना (शीख रेजिमेंट)यांच्यात झालेल्या 'सारगढी' युद्धावर आधारित आहे.

.
.
Celebrating Bhima Koregaon is unpatriotic? So why not other British victories in India too?
The Battle of Saragarhi is commemorated with a holiday in Punjab and the British Indian Army’s role in World War I is widely celebrated.

ट्रेड मार्क's picture

12 Jan 2018 - 12:18 am | ट्रेड मार्क

या दोन्हीत तुम्हाला काहीच फरक वाटत नाही? मला समजावता येतंय का ते बघतो.

पेशव्याच्या काळात:

जनता - मराठा, महार आणि समस्त इतर जाती

राज्यकर्ते - पेशवे

बाहेरचे - ब्रिटिश

लढाई - ब्रिटिश विरुद्ध पेशवे

काय झालं - अंतर्गत भांडणामुळे महार ब्रिटिशांना जाऊन मिळाले आणि पेशव्यानां हरवलं.

पर्यवसान: ब्रिटिशांचा भारतावर कब्जा सुकर झाला

सरगढीच्या लढाईत:

जनता - समस्त हिंदुस्थानी (ब्राम्हण, क्षत्रिय, मराठा, महार आणि इतर सर्व जाती)

राज्यकर्ते - ब्रिटिश

बाहेरचे - अफगाण सैन्य

लढाई - ब्रिटिश

काय झालं - ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेले शीख सैनिकांनी अफगाणी सैन्याला जोरदार प्रतिकार केला.

पर्यवसान - २१ विरुद्ध १०००० असा रेशिओ असल्याने २१ शीख सैनिक मारले गेले आणि अफगाणी सैन्याने त्या पोस्टवर कब्जा मिळवला. दोन दिवसांनी ब्रिटिश हिंदुस्थानी सैनिकांनी तो पोस्ट परत मिळवला.

तुम्हाला फरक समजला असेल अशी आशा करतो.

पगला गजोधर's picture

12 Jan 2018 - 9:57 am | पगला गजोधर

व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय !

ब्रिटिश "बाहेरचे" असं होण्यासाठी, "भारत देश" ही संकल्पना होती का ?
मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...

मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,

पगला गजोधर*,
तुमचं अक्षय कुमारच्या चित्रपटाचं नि त्या लढाईचं लॉजिक क्षणभर मान्य करू. महार नि शीखांच्या उत्सवांत भेद करू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे नि ते योग्य आहे.
==========
वरील कोटच्या संदर्भात आपली नक्की काय भूमिका आहे? आज देखील ब्राह्मणवादी, मनुवादी संघ/बीजेपी यांचं राज्य आहे नि ते तितक्याच दुष्टपणे आपला जातीयवादी, मनुवादी, मध्ययुगीन अजेंडा राबवतच आहेत. आज एखाद्या चीन, ब्रिटन वा अमेरिका सारख्या देशाने भारतावर आक्रमण केले तर तुम्ही/दलितांनी/महारांनी/पुरोगामी शक्तींनी/या उत्सवास समर्थन देणारांनी अशा आक्रमणकर्त्यास जाऊन मिळावे काय? अर्थातच इतकी प्रबल झालेली हि जातीयवादी ताकद उदा. चीनचे राज्य आले तर पुरती नेस्तनाबूत होणारच, कायमची पिछाडिला जाणार आहे आणि यात दलितांचे कल्याण समावलेले आहे.
मग काय करावे?

===================
* तुम्ही काहीतरी छानपैकी नाव धारण करा राव, असं कोणाला पगला म्हणून संबोधायला नको वाटतं.

मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...

मी तर म्हणतो जगात जिथे जिथे युरोपियन गेले तिथे तिथे त्यांनी अख्खे खंडच्या खंड कापून काढले. उत्तर अमेरिकेत युरोपीय लोकांनी कत्तली केल्या नसत्या तर आज रेड इंडियन लोकांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपेक्षा जास्त राहीली असती. द. अमेरिकेत संपूर्ण स्थानिक कापले गेले. ऑस्ट्रेलियामद्धे पण तेच झाले. द. आफ्रिकेत पण मिलियन्स लोकांच्या कत्तली केल्या.
जिथे मारणं त्यांना नको होतं तिथे गुलाम बनवलं आणि त्यांचा व्यापार केला. या गुलामांचा एकदा इतिहास वाचा. ज्यांच्या बाबतीत ते शक्य नव्हतं त्यांना मजूर म्हणून नेलं. ज्यांच्याबाबतीत ते शक्य नव्हतं त्यांना युद्धात तोफेचे बळी बनवलं.
=================
भारतात मात्र ते असलं काही करू शकले नाहीत. याचं श्रेय इथल्या जातीयवादाला जातं. युरोपीय लोक अवर्ण लोकांना आधुनिक वैद्नानिक आधारे अमनुष्य वा कमी मनुष्यत्व असलेले मनुष्य मानायचे.
============================
थोडक्यात, भारतात ब्राह्मण नसते तर युरोपीय लोकांनी सर्व स्थानिकांना संपवून टाकलं असतं नि हा एक गोर्‍या लोकांचा देश असला असता.

सुबोध खरे's picture

12 Jan 2018 - 11:30 am | सुबोध खरे

एक बहुत घनघोर वामपंथी थे सोमनाथ चटर्जी। जो 2004-09 तक लोकसभा अध्यक्ष थे।

तो हुआ यूं कि सुषमा स्वराज और सोमनाथ चटर्जी किसी डिबेट में हिस्सा ले रहे थे। सोमनाथ साहब बड़े जोश में बोल गए कि भारत कभी एक राष्ट्र था ही नही!

सुषमाजी मुस्कुराते हुए बड़ी शान्ति से बोली, 'अगर भारत एक राष्ट्र ना होता ना सोमनाथ दा, तो बंगाल की एक माँ गुजरात के सोमनाथ के नाम पर अपने पुत्र का नामकरण कभी ना करती!'

सोमनाथ बाबू पूरी बहस में बस हकलाते ही रह गए।

सुंदर!

निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...

काय दुर्दम्य निराशावाद आहे!

सुबोध खरे's picture

12 Jan 2018 - 11:50 am | सुबोध खरे

मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला

पंचतंत्रातील एक कथा आठवली.
एकदा एका विहिरीत बेडकांचा राजा त्यांच्यावर जुलूम करीत होता. त्याला कंटाळून एका बेडकाने त्याचा काटा काढण्यासाठी एका सापाला आमंत्रण दिले.
सापाने येऊन त्या बेडकांच्या राजाला खाल्लेच पण हळूहळू एक एक करीत सर्व बेडूक हि खाल्ले आणि त्या विहिरीत एकही बेडूक उरला नाही.

.

ट्रेड मार्क's picture

12 Jan 2018 - 8:00 pm | ट्रेड मार्क

आपलं बोलणं मराठा एम्पायर बद्दल चाललं आहे, जे त्यावेळेला पेशवे सांभाळत होते. यात ब्रिटिशांचा काही सहभाग होता का? असता तर ब्रिटिशांनी पेशव्यांवर आक्रमण कशाला केलं असतं? हे महार लोक ब्रिटिश होते का? माझ्या मते ते मराठा एम्पायर मधेच राहणारे होते पण त्यांना त्यांच्यावर अन्याय होतोय असं वाटत होतं. त्यामुळे ते बाहेरून आक्रमण करणाऱ्या ब्रिटिश लोकांना जाऊन मिळाले आणि स्वतः रहात होते त्याच राजाविरोधात लढले.

एक सोप्प उदाहरण देतो - कदाचित समजायला मदत होईल.

एका जुन्या बिल्डिंगमध्ये सर्व जातीचे लोक रहात होते. यातल्या काही लोकांना वाटायचं की बाकीचे लोक आपल्यावर अन्याय करत आहेत. म्हणून त्यांनी एका बिल्डरशी संधान बांधलं आणि त्याला बिल्डिंग पाडायचा प्रस्ताव ठेवला. त्या बिल्डरचा या जागेवर डोळा होताच आणि आता तर आयतीच संधी चालून आली. बिल्डरने या फुटीचा फायदा घेतला आणि स्वतःचा स्वार्थ साधला.

मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...

म्हणजे 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' ब्रिटिशांमुळे सुटला असं तुमचं म्हणणं आहे? काय बोलणार यावर!

माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही, अॅमी किंवा अंतरा आनंद यापैकी कोणीच दिलं नाही. प्रश्न असा -

महार जर एवढे शूर होते तर त्यांनी स्वतःच पेशवाई का उलथवून टाकली नाही? ब्रिटिशांच्या कुबड्या घ्यायची काय गरज होती?

अर्धवटराव's picture

13 Jan 2018 - 11:37 am | अर्धवटराव

जातीभेदाचा वादावादीत तुम्ही थेट भारत देशाच्या संकल्पनेवर प्रश्न उपस्थीत करावा प.ग. ??? सॉरी टु से, पण अत्यंत हीन पातळीचं प्रदर्शन झालं हे. मिपावरच्या एखाद्या ग्रेटथिंकर टाईप आयडीने असं काहि टंकलं असतं तर एक वेळ समजु शकलो असतो. पण तुमच्यासारख्याने असले तारे तोडावे ??

फारएन्ड's picture

11 Jan 2018 - 10:20 pm | फारएन्ड

बरेच मुद्दे वादग्रस्त असले तरी लेख चांगला आहे. कारण दलितांच्या दृष्टीकोनातून अत्यंत योग्य लिहीलेले आहे. अनेक मुद्द्यांत काही वाद नाही.

पण याबद्दल दोष देताना टीकेचा सगळा रोख ब्राह्मणावरच जाणवला.

फारएन्ड's picture

11 Jan 2018 - 10:36 pm | फारएन्ड

हे असे जे लिहीले आहे, त्याच्याशी पूर्ण सहमत आहे.

अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते.

पण या अशा वाक्यांची गरज नव्हती. मूळ प्रॉब्लेम तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडला आहे पण ते करता करता खवचट जातीवाचक शेरे कंट्रोल केले असतेत तर जास्त आवडले असते.

कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.

अंतरा आनंद's picture

12 Jan 2018 - 7:29 pm | अंतरा आनंद

(१) दुसर्‍या धाग्यावर समाजाच्या एका वर्गाला चोर म्हटलं गेलं.
(२) st, बेस्ट ,रेल्वे यांनी आपल्या ताफ्यातील २५ टक्के गाड्या या फक्त दलित आंदोलकांना तोडफोड करण्यासाठी स्वखुशीने उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी वेगळ्या बजेट ची योजना करावी.
अशी सर्रास विधानं केली गेली तेव्हा नाही का निषेध नोंदवावा वाटला? ही वाक्य माझ्या वाक्यांपेक्षा जास्त लागट होती. पण हा टिकेचा रोख थेट एका वर्गावर का? असं विचारलंत? त्या धाग्यावर कोणीही हे चुकीचं बोललं जातय असं म्हणताना दिसलं नाही. सगळेजणं जानवं कानावर ठेवून गेला होतात का?

जर, मूळ प्रॉब्लेम वेगळा मांडलेला दिसतोय तर त्यावर बोला ना?

(१) दगडफेक करणारे कोण असतील ते त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. ( म्हणजे त्याचा निषेधही कोणी कराय्चा नाह)? करणारे थेट नक्षल्यांचे हस्तक? )
असं म्हणणारे भिडे समाजसेवा करत असल्याची सर्टीफिकेटं का वाटत सुटलेत? सरकार बघेल काय ते? प्रकाश आंबेडकरांनी कायद्याच्या चौकटीत मागणी केलीय. गौरक्षकांसारखं हातात कायदा तर घेतलेला नाहीय ना?

हा सरळसरळ दुटप्पीपणा दिसत नाहीय का?

आनंदयात्री's picture

12 Jan 2018 - 7:45 pm | आनंदयात्री

>> धाग्यावर कोणीही हे चुकीचं बोललं जातय असं म्हणताना दिसलं नाही. सगळेजणं जानवं कानावर ठेवून गेला होतात का?

अजून किती द्वेष शिल्लक आहे? अजून किती खालची पातळी गाठायची आहे? ५-७ वर्षापूर्वीचे बीग्रेडी ब्लॉग्ज असे चिप लिखाण करायचे (ब्राह्मणांच्या बायका वैगेरे), तेही काही मनात असेल तर लिहून टाका.

बाकी इतरांनी काय भंपक लिहीले आहे त्यावरून तुमचे जानव्याचे उल्ल्केख जस्टिफाय होत नाहीत. ते आणखी दोन धाग्यांवर आणि आणखी पन्नास संस्थळांवर कोण काय म्हणत आहे याबद्दल गावागावात जकात दिल्यासारखा निषेध नोंदवत नोंदवत येत तुमचा लेख वाचून मगच तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात काय?

लेखातील टोन वरून तुम्हाला सेन्सिबल समजून विचारले होते. तुमच्या उत्तरातून तुम्हाला हा वाद काय लेव्हलला घालायचा आहे ते लक्षात आले. विचारणार्‍याच्या मुद्द्यापेक्षा त्याचे जानवे काढायची तुम्हाला गरज दिसते म्हणजे यापुढे वाद घालण्यात अर्थ नाही.

अंतरा आनंद's picture

12 Jan 2018 - 10:15 pm | अंतरा आनंद

हो, माझं ते वाक्य निखालस चुकीचं आहे. पण मुद्दाम घातलं मी ते. खोडून पुन्हा घातलं . मलाही या लेव्हलला जायचं नव्हतं मी कधीही गेले नाहीय. पण हेच दाखवायचं होतं की तुमच्या एका कालबाह्य रुढीबद्द्ल नुसतं साधं विधान सहन होत नाही तर तुम्ही दुसर्^यांच्या रुढी किती कालबाह्य आहेत किंवा चुकीच्या आहेत हे कोणत्या अधिकारात बोलता? (तुम्ही म्हणजे व्यक्तिशः तुम्ही नाही). अजून दिसतीलच किता जणांना लागेल ते.

तुम्ही माझ्या एकाच उल्लेखाला दोनदोनदा कोट करताय तो उल्लेख म्हणजे मुळ मुद्दा कुठेही नसताना.
त्यातून "ब्राम्हणांनीच दगडफेक केली" असं मला म्हणायचं आहे असाही अर्थ काहीजणं काढत आहेत.
पण आम्ही एका समाजगटाला 'चोर' म्हणतोय हे चुकलं असं कोणी म्हणतय का? मी जो मुद्द ठळक केलाय त्याबद्द्लही काही बोलं जात नाहीय. आणि जे जस्टीफाय होतय त्याबद्दलच बोला. काहीच जस्टीफाय नसेल होत तर तसं बोला.

मलाही या क्षुल्लक मुद्द्यावर वाद घालायचा नव्हता आणि घालणारही नाही.

फारएन्ड's picture

12 Jan 2018 - 10:33 pm | फारएन्ड

कसली रूढी? जानव्याच्या रूढीबद्दल नाहीये ते. जानव्याच्या उल्लेखाने तुम्ही दलितांविरूद्ध बोलणार्‍यांपैकी फक्त ब्राह्मणांनाच टार्गेट केले आहे म्हणून लिहीले आहे ते.

आणि काय दोन दोन दा कोट केले? प्रतिक्रियेवर उत्तरे देताना तोच विषय परत येणारच. तुम्ही प्रतिक्रियेत जानवे कानाला लावले का विचारले नसते तर पुन्हा लिहायची वेळ आली नसती.

जे जस्टिफाय होते त्याबद्दल बोला? मग माझ्या आधीच्या प्रतिक्रियेमधे तेच लिहीले आहे की. जे पटले त्याचा स्वतंत्र उल्लेखही केलेला आहे. माझा आधीचा पहिला प्रतिसाद बघा. मग न पटलेली वाक्ये काही विशिष्ठ हेतूने लिहीलेली होती इतके सांगून भागले असते, रोख फक्त ब्राह्मणांवर असण्याचा हेतू नव्हता इतका खुलासा पुरला असता. पण तुम्हाला इतरत्र दिसलेल्या व इतरांनी लिहीलेल्या वाक्यांबद्दल मला जाब विचारायची हुक्की आली. इतरांनी जे काय लिहीले आहे त्याच्याशी माझा काय संबंध?

चुकीच्या आहेत हे कोणत्या अधिकारात बोलता? (तुम्ही म्हणजे व्यक्तिशः तुम्ही नाही) >>> मग ते ज्यांना आक्षेप आहे त्यांना सांगा. मला उत्तर देताना माझ्या प्रतिक्रियेबद्दल बोला. तुम्हाला हे लक्षात आलेले नाही की दलितेतरांनी केलेल्या घाउक व सवंग टीकेचा रास्त समाचार घेताना तुम्ही ब्राह्मण या एकाच वर्गावर तशीच टीका करायचा मोह आवरलेला नाही.

अंतरा आनंद's picture

12 Jan 2018 - 11:42 pm | अंतरा आनंद

मी ते लिहीण्याआधी दोनदा. ओके. मलाही जो मुद्दा नाही त्यावर चर्चाच करायची नाही.

मग न पटलेली वाक्ये काही विशिष्ठ हेतूने लिहीलेली होती इतके सांगून भागले असते, >> खुलासा मी आधी दिलेला असताना पुन्हा पुन्हपु तेच उगाळलं जातय याचा संताप येऊन मी ते लिहीलं. माझ्या डोक्यात मी लिहीलेला लेख आणि त्याला आलेला प्रतिसाद ह्या दोन गोष्टी असतात, तर तुमच्याकडे लेख आणि तुमचा प्रतिसाद, त्यातून एकाचा राग दुसर्^यावर काढला जाऊ शकतो. भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

तुम्हाला हे लक्षात आलेले नाही की दलितेतरांनी केलेल्या घाउक व सवंग टीकेचा रास्त समाचार घेताना >> ओके.

फारएन्ड's picture

13 Jan 2018 - 12:51 am | फारएन्ड

आता वादाचे मुद्दे बाजूला ठेवून पुन्हा लिहीतो - बाकी ८०% लेख पटलेलाच आहे. खेडेगावात सर्वसामान्य दलित व्यक्तीला पुढे येताना कशाकशाचा सामना करावा लाग्तो याची कल्पना आहे. त्या स्मारकाला भेट द्यायला जाणार्‍या सर्वसामान्य लोकांबद्दल कसलाही आकस नाही.

खेडेगावात सर्वसामान्य दलित व्यक्तीला पुढे येताना कशाकशाचा सामना करावा लाग्तो याची कल्पना आहे. त्या स्मारकाला भेट द्यायला जाणार्या सर्वसामान्य लोकांबद्दल कसलाही आकस नाही. >> हे एवढेच अपेक्षीत आहे. ते लिहणार कोणीच नव्हत (अजूनदेखील नाही) म्हणून हा लेख आला...

पगला गजोधर's picture

12 Jan 2018 - 12:09 pm | पगला गजोधर

आजच्या प्रासत्ताक लोकशाही भारताची, आणि पेशवाई भूभागाची, स्थळ काळ विपरीत अशी तुलना मनुवादी तुलना करून, असे भासवू इच्छितात....
इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता....की जे चुक आहे...
आजचा प्रजासत्ताक लोकशाही देश हा घटनेच्या आधारावर चालतोय,
"बरे झाले पेशवाई बुडाली", असे म्हणणे, आजच्या भारतावर आक्रमण झाल्यावर परकीय शक्तीला जाऊन मिळणे, ह्या अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी आहेत....
सॅम्युअल जॉन्सनचा कोट इथं परत द्यायचा मोह मी टाळतोय...
असो युरोपियन जिथे गेले तिथे त्यांनी स्थानिकांना हटवून स्वतः ताबा घेतला हे तुमचे म्हणणे मान्य, मात्र कालावधी हा प्राचीन आहे, कारण कोकेशस पर्वतराजीतून आलेले आर्य, ग्रीस तटा वरून आलेले आर्य, यांनी स्थानिक लोकांना हटवूनच ही ऑफशोर युरोपियन वसाहत आणली...
अजून उदा हवे तर, कोल्हटकर यांचा कंबोडिया लेख १ वाचा,
या भूमीला नंतर आर्यप्रदेश असे नावं दिले होते, व मनु धर्माचे पालन कर्ते होते, त्यांनी भारतात स्थानिक पराजीतं नागवंशियाना दलित/गुलाम/शुद्र बनवून ठेवले, पुढे ते समुद्र मार्गे कंबोडियाला गेले, तिथे सुद्धा स्थानिकांना गुलाम केले व आपल्या हिशोबाने मंदिरे बांधली....

प्रचेतस's picture

12 Jan 2018 - 1:33 pm | प्रचेतस

कैच्याकै
आर्यन इन्व्हेजन थियरी हे एक मिथ आहे. सुरकोटलाचा अश्व माहीत नाही काय? झालंच तर राखीगढी, धौलविरा, हडप्पा येथील उत्खननं.

सुखीमाणूस's picture

12 Jan 2018 - 2:40 pm | सुखीमाणूस

नुसत तुम्ही प्रतिसाद देऊन आम्ही का मानू?
पण खर सांगायचे तर ह्यावर अधिक वाचावयास आवडेल.

बामसेफ आणि ब्रिगेडी लोकांचा तो मोठा मुद्दा आहे लोकांना स्वताकडे ओढून घ्यायचा.

मी बर्‍यापैकी आळशी असल्यामुळे स्वता सन्दर्भ शोधायचा कंटाळा करते आहे. आयता सन्दर्भ मिळाला तर पुराव्यासकट
दाखवता येईल.

ह्याविषयावर लिहायचं म्हणजे एक मोठा लेख लिहायला लागेल, अर्थात सध्या तितकी सवड नाही आणि बी-ग्रेडी घाणीत उतरायची इच्छा पण नाही.

पगला गजोधर's picture

12 Jan 2018 - 6:03 pm | पगला गजोधर

लेखक: आनंद मोरे

http://www.misalpav.com/node/35013

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।

म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे. आणि मग महाभारताच्या युगांतकारी युद्धानंतर तर छोटी छोटी राज्ये किंवा गणराज्ये किंवा स्वत:च्या सीमेत तुष्ट रहाणारे नंदांचे मगध साम्राज्य, हाच या भूमीच्या लोकांचा स्थायीभाव झाला होता.

या स्थायीभावाला प्रवाही केले ते कुठल्या हिंदूने नव्हे तर एक यवन राजा अलक्स्येन्द्र किंवा अलेक्झांडरने. आणि त्यानंतर मोडक्या राज्य, गणराज्यांतून एकसंध राष्ट्र बनवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला चंद्रगुप्त - चाणक्य या जोडीने. पण जर अनुक्रमे मौर्य, चेरा - चोला - पंड्या, सातवाहन, शुंग, महामेघवाहन, गुप्त, वाकाटक, कदंब, हूण, चालुक्य, राष्ट्रकूट, पल, चोल, गुर्जर - परिहार, चालुक्य, घोरी, दिल्ली, मुघल, मराठा आणि अगदी शेवटच्या ब्रिटीश साम्राज्यांच्या वेळच्या भारतीय नकाशांवर नजर टाकली तर आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते. आपण ज्याला भारत देश म्हणतो आणि ज्याच्या राष्ट्रवादाच्या्ा हाका आपल्या कानातून घुमू शकतात किंवा ज्या तश्या घुमताहेत म्हणून काही जणांना त्रास होऊ शकतो त्या भारताचा इतिहास खरा सुरु होतो तो १९४७ पासूनच. त्या आधीचा इतिहास हा "आर्यावर्ते, रेवाखंडे, जम्बुद्वीपेच्या" भूमीचा इतिहास आहे. हिंदुस्थान नामक काल्पनिक राष्ट्राचा नाही. भारत नामक देशाचा तर अजिबातच नाही.

arunjoshi123's picture

12 Jan 2018 - 6:28 pm | arunjoshi123

पगसाहेब,
भारताच्या आताच्या सीमांना वा संकल्पनेला तुम्ही म्हणता तसा ऐतिहासिक अर्थ नाही हे क्षणभर मान्य करू.
=========================
जगात कुठे म्हणे "अखंड स्थिर सीमांचे सातत्यशील" राष्ट्र होते जे आताही आहे? म्हणून आताच्या सर्वच राष्ट्रांची कल्पना मूर्खपणाची आहे?
मागे चीन कुठे दिसायचा आभिंतहिम? वा ते महान मानवतावाद्यांचे प्रसूतीग्रह युनायटेड किंगडम ? ते तरी असे दिसले आहे का?
---------------
अगदी सतत २००० वर्षे एकाच खानदानाची एकाच राजधानीतून सत्ता असलेले मणिपूर, त्रिपूरा यांना पण तुमचा महान क्रायटेरिया बसत नाही. दया करा राव, तुमच्या आजच्या निष्ठा भारताशी आहेत कि नाहीत? जर आहेत तर आज ज्यांच्याकडून भारताने स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा इतका पुळका का?
--------------
ब्रिटिश आपले शत्रू होते. आपण त्यांची सत्ता उलथावली. तुम्हाला त्यांचा, त्यांनी आपल्या केलेल्या पराभवाचा आनंद असेल तर तो राष्ट्रद्रोह का मानू नये? आणि राष्ट्रनिष्ठा पातळ असल्या, स्वार्थासाठी मोडित घालायच्या असल्या तरी ते लाजेकाजेनं करावं (किमान संभ्रमानं करावं.), पण थेट देशाच्या शत्रूचं समर्थन करायचं नि वर ते सद्गुण म्हणून मिरवायचं? त्याचं रेटून समर्थन करायचं?
---------------
पेशव्यांनी अन्याय केला, जातीयवाद केला (आणि तसेही ब्राह्मण ५००० वर्षे तेच करत आलेत) तर एखाद्या महाराने शनिवाड्यात घूसून स्वतःच्या हिमतीवर पेशव्यांना त्या मुद्द्यावर बडवून काढून यायला पाहिजे होते. ही कृती फार सन्माननीय राहीली असती. याच्या स्मृतीदिनाच्या उत्सवात यायला मलाही आवडलं असतं. पण हे ब्रिटिश कुठून आले मधे? भाऊ आवडत नाही म्हणून घर सावकाराला फुकट देणार?
संख्येने इतके जास्त असलेल्या दलितांना ब्राह्मणांनी बलःपूर्वक दाबून ठेवलं नव्हतं. होती सामाजिक मानसिकता. ही पांगळी करणारी सामाजिक मानसिकता गळून पडली नि ब्राह्मणांना धडा शिकवणं गरजेचं वाटलं इतकं कळलं तर ब्रिटिश हे भारताचे शत्रू आहेत हे का नाही कळलं?

पगला गजोधर's picture

12 Jan 2018 - 6:32 pm | पगला गजोधर

Around 1940, Dr. Ambedkar quotes as

“There are many who look upon this conduct of the Untouchables in joining the British as an act of gross treason. Treason or no treason, this act of the Untouchables was quite natural. History abounds with illustrations showing how one section of people in a Country have shown sympathy with an invader, in the hope that the new comer will release them from the oppressions of their countrymen.”

अहो भाऊ, त्यांचं तत्त्व तेव्हा लागू होतं नि म्हणून १९४० ते १९४७ मधे अस्पृश्य लोक ब्रिटिश सेनेत गेले. पण तो हिशेब तिथेच संपला. आज कोण्या अन्यायासाठी कोण्या इन्व्हेडरचं स्वागत करायचं आहे? का ते ब्रितिश होते तेव्हापर्यंत ठिक होते नि आता पुन्हा ब्राह्मणी चालू झालेत आणा त्यांना परत असाच समर्थनाचा अर्थ होत नाही का?
-----------------
कि ब्राह्मणांना "नियंत्रित" ठेवणार्‍या ब्रिटिशांचे गेले ते गोड दिवस असं रुदन चालू आहे?

ट्रेड मार्क's picture

13 Jan 2018 - 4:05 am | ट्रेड मार्क

इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता....की जे चुक आहे...

इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता असं कोण म्हणालं? त्या काळात विविध राजे त्यांच्या राज्यात राज्य करत होते. जरी राज्य वेगळी असली तरी धर्म आणि संस्कृती एक होती आणि त्यांनी हा खंड बांधला गेला होता. अगदी एखाद्या सम्राटाचा एकछत्री अंमल जरी असता तरी त्याला प्रजासत्ताक लोकशाही देश म्हणता येत नाही. पण भरतखंड हा मुख्यतः हिंदू राजांच्या अमलाखाली होता त्यामुळे एकत्र मानला जायचा.

arunjoshi123's picture

12 Jan 2018 - 2:42 pm | arunjoshi123

लेखाचं मूळ गृहितक असं आहे कि कोरेगाव भीमाला जे लोक उत्सव साजरा करतात त्यांचे विरोधक हे दलितविरोधी आहेत. उत्सवविरोधकांना सर्व प्रकारचा दलितद्वेष आहे. त्या उत्सवाचा विरोध हा वैचारिक नि तात्विक असू शकत नाही का? विरोधकांचा विरोध हा वैचारिक नि तात्विक पण असू शकतो नि त्याच्या विरोधाचं निरसन प्रेमानं करू इच्छिणार्‍या उत्सव समर्थकाचा आवाज ऐकू यावा इतकं तांडवाचं डेसिबल खाली ठेवावं हे लेखिकेला कळलेलं नाही.
==================
१८१८ ला पेशवाई संपली. १८५७ ला पहिले बंड झाले. त्यात शिख आणि गोरखा पलटणी ब्रिटीशांच्या बाजूने लढले नि देशाचे स्वातंत्र्याचे स्वप्न भंगले. "तेव्हाच्या" शीख आणि गोरखा पलटणी "आता" जर १८५७ च्या भारताच्या (पहिले "भारतीय" स्वातंत्र्ययुद्ध असे आम्हाला शिकवले आहे.) पराजयाचे गुणगान गाऊ लागले तर अवघड आहे. आम्हाला शाळेत १८५७ च्या "बाजूने" शिकवले गेले.
गांधी, नेहरू, पटेल, बोस, भगत सिंग, इ लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढले. त्यांना त्यांच्या या लढ्यासाठी पूज्य मानायला आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे. आम्हाला कोणत्याही शिक्षकाने असं शिकवलं नाही ब्रिटिशांच्या सत्तेअगोदरचे, ब्रिटिशांची सता आणणारे सगळे लढे हे एत्तदेशीय सामाजिक अन्याय मिटवायला कारणीभूत झाले, म्हणून आम्ही ते ब्रिटिशांच्या "बाजूने" बघावेत. आम्हाला सारी कुशाण, इस्लामी नि विदेशी आक्रमणं ही आमच्या बाजूनं बघायचं शिकवलं आहे. पोरसच्या दरबारातले ब्राह्मण देखील जातीयवादी असतीलच. आणि अलेक्झांडरच्या राज्यात जन्माधारित जात नव्हती. पण तरीही अंभीने जातीयवादी राज्य संपवण्यासाठी त्याची मदत केली अशी मांडणी केली जात नाही. सर्व विद्यार्थ्यांची सहानुभूती पोरसलाच असे.
=====================
काही लोकांना ब्रिटिश बाहेरचे कि आतले याने फरक पडत नसेल. ते चांगले का वाईट असा प्रश्न पडत असेल. पण ब्रिटिशांचे जागतिक पातळीवरील वर्तन पाहिले तर त्यांचा नि मानवतेचा काही संबंध नव्हता असे सिद्ध होते. म्हणून १८१८ च्या लढाईचा आणि मानवतेच्या विजयाचा काही संबंध नाही. उलट तो पाशवी लोकांचा विजय होता. यासाठी लोकांनी ब्रिटिशांनी जगभर केलेल्या अनेक वंशांच्या कत्तली नि गुलामगीर्‍या अभ्यासल्या पाहिजेत.
==================
भारतीय सेनांना हरवून ब्रिटिश विजयी झाले. नंतर हीच ब्रिटिश सेना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे भारतीय सेना झाली. मग स्वतंत्र भारताच्या सेनेच्या निष्ठा भारताशीच असायला हव्यात ना? समजा स्वातंत्र्यापूर्वी या रेजिमेंट्सच्या काही प्रथा असतील तर स्वातंत्र्यानंतर (जे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून मिळाले) त्या ब्रिटिशांशी निष्ठा दाखवणार्‍या नि एत्तद्देशीयांशी वैर दाखवणार्‍या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. आताही राणीला सलाम कसा करता येईल? आणि समजा रेजिमेंटची प्रथा विशुद्ध शौर्याच्या कौतुकासाठी असेल तर ती सैनिकांपर्यंत, अधिकार्‍यांपर्यंत सिमित असायला पाहिजे. तो सामाजिक उत्सव कसा काय असू शकतो?
==============
डॉ. आंबेडकरांना दलितांना हवं तितकं सबल करायचं होतं. त्यांनी महार रेजिमेंटसाठी प्रयत्न केले नि ती स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात आली. त्या राज्यात तो उत्सव होणं, आणि स्वराज्य हे प्राधान्य नसलेल्या आबेंडकरांनी तो चालू करणं समजलं जाऊ शकतं. कदाचित त्या उत्सवामुळं तेव्हा त्या रेजिमेंटचा गौरव वाढत असेल नि त्याचा दलित समाजाला फायदा होत असेल. पण स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी ही प्रथा बंद का केली नाही? ती त्यांनी बंद करायला पाहिजे होती नि स्थानिकांच्या विजयाची दुसरी लढाई निवडायला पाहिजे होती.
======================
थोडक्यात, स्वतंत्र भारतात, जिथे पावलापावलाला आम्हाला ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारांचे कौतुक करत मोठे केलेले आहे तिथे अचानक एके दिवशी एका ब्रिटिशांच्या विजयाचे समर्थन उचित आहे असे शिकवले जात आहे. एक समूह याला शुद्ध शौर्याच्या कौतुकाची प्रथा म्हणत आहे. दुसरा याला सामाजिक अन्यायाचा बदला घ्यायच्या भावनेचा स्फोट म्हणत आहे. या लॉजिकने भारताचा इतिहासला प्रत्येक पराभव हा एक उत्सवाचा दिन होइल. कारण आपण इतिहासात जितके मागे जाऊ, तितके पराजय जास्त साजरा करायच्या पात्रतेचे असतील.
==================
हेच लॉजिक मुस्लिम देखील लावतील. हल्दी घाटीचा राणा प्रतापाचा पराजय भारतातील सामाजिक अन्याय कमी होण्यास कारणीभूत ठरला म्हणून तो एक उत्सवदिन होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
==========================
अशा अनेक कारणांनी हे उत्सव प्रकरण मला सत्कृतदर्शनी आवडलेलं नाही.
======================
मला तरी व्यक्तिशः यात भयंकर संभ्रम झाला आहे. राजकीय स्वार्थ वा जातीय द्वेष नसलेले पण उत्सवाला हो आणि नाही म्हणणारे लोक नक्की कसा संवाद करत असतील? यात आपण, परके, तेव्हाचे, आताचे, देश, निष्ठा, लष्कराची प्रथा, लष्कराचे निष्ठांतर, इ इ संकल्पनांची चर्चा कशी होईल? इथे कोणी या उत्सवाचं समर्थन सयंतपणे मांडेल काय?

बांवरे's picture

12 Jan 2018 - 10:56 pm | बांवरे

धन्यवाद !
लेख सुरुवातीला जिव्हारी लागला म्हणून प्रतिक्रीया देण्याचे टाळले. थोड्या काळाने प्रतिसाद लिहू म्हणून बाजूला ठेवले, तुमचा प्रतिसाद पाहून त्यात मला अभिप्रेत असलेल्या बर्‍याच गोष्टी आल्याने इथेच +१ देतो.

बाकी अ‍ॅमी किंवा प.ग यांच्या इतस्ततः पसरलेल्या विचार मौक्तिकांवर काहीच प्रतिसाद देववत नाही.
नुस्तेच भोंगळ शब्दचळ.

भंकस बाबा's picture

14 Jan 2018 - 9:37 am | भंकस बाबा

पानीपतच्या मराठा राजवटीच्या पराभवाचे समर्थन असे कोणी केले तर त्या धारातिर्थि पडलेल्या सैनिकाच्या आत्माला फार क्लेश होतील,
पेशवा नाही मराठा हरले होते त्या लढाईत!

प्रचेतस's picture

12 Jan 2018 - 2:54 pm | प्रचेतस

लेख संतुलित असूनही काहीसा एकांगी वाटला, बाकी ते गाव भीमा कोरेगाव नसून कोरेगाव भीमा हे आहे.

पैसा's picture

12 Jan 2018 - 10:20 pm | पैसा

आताचे निकष २०० वर्षापूर्वीच्या इतिहासाला लावून अनेक चुकीचे निष्कर्ष काढले गेले आहेत. इतिहासाची मोडतोड याबद्दल बोलून तर काही उपयोग नाहीच. फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, २०० वर्षापूर्वी महार काय कोणतीच जात एकजीव संघटित समूह म्हणून वावरत नव्हती त्यामुळे "अन्यायाचा बदला घेण्यासाठी महार इंग्रजांबरोबर गेले" हे गृहीतकच साफ चुकीचे आहे. पगार देईल त्याची चाकरी हे तेव्हाचे तत्त्व होते. अगदी राजालोकांचे जवळचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या शत्रुकडे चाकरीत असत. त्यात काही वावगे नाही. आताही दलित पेटून उठले वगैरे असे सहज होत नसते. आपण किंवा आपल्या ओळखीतले लोक असे अचानक कोणाच्या गाड्या-दुकाने यांची मोडतोड करत सुटत नाहीत. ते काम भाडोत्री गुंडांचे असते. डोके ठिकाणावर असलेला कोणीही माणूस या प्रकाराचा निषेधच करील. एकूणच सगळेच कै च्या कै चालू आहे. असो.

पगला गजोधर,

ब्रिटिश "बाहेरचे" असं होण्यासाठी, "भारत देश" ही संकल्पना होती का ?
मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...

बापरे, काय भयंकर लिहिलंय हो तुम्ही. दलितांची स्थिती वाईट होती यावर दुमत नाही. पण 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' ही सरळ थापेबाजी आहे. बाकी, इंग्रजी राज्यात महारांची काय थोर प्रगती झाली?

भारत एक राष्ट्र होता का यावर पूर्वी मायबोलीवर उत्तर दिलं होतं. तेच परत देतो.

अगदी इजिप्तपासून थेट दक्षिण अफ्रिकेपर्यंत सलग पट्टा ब्रिटीश साम्राज्याचा भाग होता. मग त्यातून का एक राष्ट्र उभं राहिलं नाही? इजिप्त ते कुवेत हाही पट्टा ब्रिटीश साम्र्याज्यात मोडत असे. त्याचं का झालं नाही एकराष्ट्र? अगदी भारतीय उपखंडाचं उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंका का वेगळी आहे?

सांगण्याचा मुद्दा काये की भारत हे ब्रिटीश येण्याच्या आगोदरपासून एक राष्ट्र होतं.

आ.न.,
-गा.पै.

झोपेत असता तुम्ही. अहो, ते येमेन, ओमान, यु ए ई, म्यानमार हे सगळे ब्रिटिश इंडीयात होते नि ते आजही सार्वभौम भारताचा भाग आहेत. पाकिस्तान देखील फक्त २० वर्षे वेगळं असणार आहे असं जस्टिस कटजू म्हणालेत.
-------------------
आता बघा ना, डॉ. आंबेडकरांना जिथे जिथे ब्रिटिशांचे राज्य होते तिथे तिथे सर्वत्र पददलितांचे नेते मानतातच ना. दॅट इज कॉल्ड द युनायटिंग इफेक्ट ऑफ द ब्रिटीश! त्यांचं जगभर राज्य होण्यापूर्वी उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या भ्रमणकक्षा वेगवेगळ्या होत्या!!!

गामा पैलवान's picture

12 Jan 2018 - 8:08 pm | गामा पैलवान

आचरटपणांत मलाही मागे टाकू पाहताय की काय? वेगवेगळ्या भ्रमणकक्षा! :-D
-गा.पै.

थॉर माणूस's picture

13 Jan 2018 - 6:09 am | थॉर माणूस

>>>अगदी भारतीय उपखंडाचं उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंका का वेगळी आहे?

ब्रिटीश साम्राज्य असले तरी वसाहती वेगवेगळ्या होत्या आणि त्या वसाहतींना स्वातंत्र्य दिले गेले. ब्रिटीशांनी भारतीय वसाहतीला स्वातंत्र्य दिले तेव्हा श्रीलंका किंवा बर्मा इत्यादी भाग या ब्रिटीश इंडीया वसाहतीच्या भाग नव्हत्या, वेगळ्या क्राऊन्ड कॉलनीज होत्या. त्यामुळे भारतीय वसाहत स्वतंत्र करताना इथल्या नेत्यांना फक्त ब्रिटीश इंडीयामधील भूभागावर हक्क सांगण्याची आणि इथल्या प्रिंस्ली स्टेटस ना सामावून घेण्याची परवानगी मिळाली.

धाग्याच्या विषयाशी या प्रतिसादाचा देखील संबंध नाही त्याबद्दल क्षमस्व.

ब्रिटिश राज्य चांगले होते असे ज्यांना वाटते त्यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केलेले भाषण पाहावे.
https://www.youtube.com/watch?v=hwhtDXSN0XM

एक उदाहरण - दुसऱ्या महायुद्धात बंगालमध्ये पडलेला दुष्काळ. ४० लाख लोक या एका दुष्काळात मरण पावले. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी धान्य बंगाल ऐवजी ग्रीसमध्ये 'राखीव' साठ्यात पाठवले. अर्धपोटी भुकेल्या बंगाली जनतेपेक्षा धडधाकट ग्रीक लोकांची भूक ब्रिटिश सरकारसाठी महत्वाची आहे असा खुद्द चर्चिल यांचा शेरा आहे. जेंव्हा भारतातल्या अधिकाऱ्यांनी चर्चिल याना या निर्णयामुळे अनेक लोक मरण पावले आहेत, पुनर्विचार व्हावा अशी विनंती केली तेंव्हा चर्चिल यांनी स्वतः मारलेला शेरा - 'मग अजून गांधी जिवंत कसे आहेत?'

पगला गजोधर's picture

13 Jan 2018 - 12:18 am | पगला गजोधर

''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती ठरली'', अश्या अर्थाच्या वाक्याचा विपर्यास, ''ब्रिटिशांचेचं राज्य हवं होतं कॅन्टीन्यू'' असा होत नाही, असो.
परंतु ब्रिटिश विरोध दाखवायला भक्तांना काँग्रेसच्या व्यक्तीच्या भाषणाचा रेफ द्यावा लागला, अरेरे....
जाता जाता
भारतीयत्वांचा तिरस्कार करणाऱ्या चर्चिलच्या डोळ्यातही जिवंत महात्मा गांधीच खुपावे, आणि हेगडेवार सावरकर वैगरे नाही, यांतच काय ते आलं.....

सुबोध खरे's picture

13 Jan 2018 - 12:26 am | सुबोध खरे

काय आलं?

काँग्रेसच्या भक्तांना काँग्रेसच्याच माणसाचा रेफरन्स द्यावा लागतो

मार्शल रेसेस चा शोध/वापर करणारे तत्कालीन ब्रिटिश जातीसंस्थेच्या निर्मूलनासाठी इष्टापत्ती ठरले - वाहवा

महापुरुष व नेते वाटून घेतले पाहिजेत हा आग्रह लक्षात येतोय. थोडक्यात तुमच्या "वाट्यातल्या" महापुरुष/नेत्यांनी काही बरी गोष्ट केली तरी काही तुम्ही ती अपरिशिएट / मान्य करणार नाही तर - आनंद आहे

(जाता जाता : ब्रिटीश आले असते वा नसते - आंबेडकर, फुले आणि बाकी सुधारक जन्मणार होतेच)

पगला गजोधर's picture

13 Jan 2018 - 3:24 pm | पगला गजोधर

ब्रिटिश नसते व हे सुधारक जन्मले असते तर पेशवाईत कदाचित त्यांना हत्तीच्या पायी देऊन मारून टाकलं असतं...

एके ठिकाणी डॉ आंबेडकर लिहितात (महाड येथे सार्वजनिक रित्या मनुस्मृतीचे दहन कार्यक्रमा दरम्यान हल्ला झाला होता)
(जसं वर्तमानात कोरेगावभीमा च्या कार्यक्रमा दरम्यान हल्ला झाला आहे, on same lines....)

" In June 1927, after five orthodox Hindus, who were part of a mob that attacked the dalits at Mahad, were sentenced by the (colonial) district magistrate to four months’ rigorous imprisonment, he(Dr. Ambedkar) said: “Had the chief officers in the district been Hindus, justice would have been denied. Under Brahmin Peshwa rule I would have been trampled to death by an elephant.” "

तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीतील दलित चळवळीचे उर्ध्वयु,
थास (१८४५-१९१४) , जेव्हा ब्रिटिश नेटिव्ह लोकांना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पद द्यावे का ? याबाबतीत जनमत चाचपून पाहत होते तेव्हा थास लिहितात..
"“The self-styled Brahmins migrated to this country from alien lands… If we give the power of District Magistrate to these people, they will employ the people of their caste and cheat common Hindus. There will be endless troubles if high positions are given to those who call themselves ‘higher caste’ .… They regard even the British as inferior to them. They don’t have intellectual, physical, economic or even numerical strength. They have only the strength that comes from calling themselves people of high caste.”

प्रचेतस's picture

13 Jan 2018 - 3:30 pm | प्रचेतस

तुमचा ब्राह्मणांवर खूपच विखारी द्वेष दिसतोय. त्यांनी नक्कीच तुमचे काहीतरी बिघडवलेले असावे :)

प्रसाद_१९८२'s picture

13 Jan 2018 - 3:42 pm | प्रसाद_१९८२

सहमत !

पगला गजोधर's picture

13 Jan 2018 - 5:02 pm | पगला गजोधर

:)
प्रचेतस सर स्मायली टाकली म्हणून प्रत्युत्तर देतोय...
माझा कोणावरही द्वेष नाही.
व्हर्चुअल पर्सोना व रिअल, यांत फरक असतो. माझे वैयक्तीक निरीक्षणाप्रमाणे
मिपावर एकांगी मते खुप आहेत, नेहमी तेच झुंडीने येऊन डोमीनेट/बुलीयिंग करतात(तुमची आयडी तशी नाहीये) , व मला तर नेहमी विक टीमकडुन खेळायला आवडते.
.

असो, सर अवांतर करतोय क्षमस्व..
कधी भेटू एक कप चहा वन बाय टू करून पियुया...

प्रचेतस's picture

14 Jan 2018 - 9:52 am | प्रचेतस

तुमच्या अलीकडच्या बऱ्याच प्रतिसादामधून ब्राह्मणविद्वेषी सुर सतत जाणवतोय म्हणून प्रतिसादप्रपंच.

बाकी १ बाय २ चहाच कशाला, जेवायलाच भेटूयात की :)

पगला गजोधर's picture

14 Jan 2018 - 11:29 am | पगला गजोधर

काय सर ! तुम्ही पण नं, निरागस व भोळ्याभाबड्या आयडीच्या मागे लागता....
बाकी जेवणाच्या प्रस्तावास अनुमोदन...

काय संबंध? पगो दुसर्‍या लोकांचे कोट देत आहेत. कोट ज्यांनी दिले त्यांच्यावर टिका करा.
---------------
मला वाटतं आंबेडकरांनी ओवरड्राइव मधे अशा अनेक रिअ‍ॅक्शन दिलेल्या असणार. मंजे तत्कालीन समाजाला धक्का द्यायला.

माहितगार's picture

13 Jan 2018 - 4:17 pm | माहितगार

कदाचित हे कदाचिता एवढेच मर्यादीतही असावे. कुणा राजाला सिद्धार्थ गौतम जन्मू शकतो, सम्राट अकबर बदलू शकतो तर कदाचित होय डॉ. आंबेडकर म्हणतात तसे झाले असते आणि कदाचित एखाद्या पेशव्याला उपरतीही झाली असती. पुरोगामी लोकांना नेहमीच सद्य काळा विरुद्ध लढावे लागते, सॉक्रेटीस ते संत मीरा बाई वीषाचे प्याले पचवावेही लागतात एवढया सगळ्यातून संत चोखा मेळ्याचे साहित्यही तगत असते. असो.

जयंत कुलकर्णी यांनी दिलेली लिंक वाचलीत का? त्यात अनेक उदाहरणे आहेत माधवराव पेशवे यांच्या बद्दल आणि महार ब्राह्मण वादात पेशव्यांनी महारांची बाजू कशी घेतली होती वगैरे. पण सध्या इतिहास मोडून तोडून वापरायची फॅशन आहे.

सध्या ममता दीदी जानवे घालणाऱ्यांना गायी आणि गीतेची पुस्तके भेट देत आहेत. कधीतरी महाराष्ट्रात तो दिवस आला तर इतिहास काय होता हे शोधायचे कष्ट कोणी घेतील. तोपर्यंत जे जे होईल ते ते पहावे. जगात गाढवाची कमी नाही. शक्य असल्यास कुंभार व्हावे नाहीतर गाढवांच्या लाथा कशा चुकवता येतील एवढेच बघावे.

माहितगार's picture

13 Jan 2018 - 6:41 pm | माहितगार

ज्याचे माप त्याच्या पदरात घालण्यास हरकत नाही. छ. शिवजी महाराजांनी पर मुलखातही सामान्य माणूस लुटला जाणार नाही आणि रयत केंद्रीभूत राहील हे पाहीले. असा ध्यास कमीच राज्यकर्यांना जमला असावा आणि त्या दृष्टीने पेशवे जिथे चुकले तिथे त्यांचे माप त्यांच्या पदरात जरुर घालावे. काही योग्य केले असल्यास क्रेडीटही द्यावे.

ईष्टापत्ती आणि परिस्थितीचा सुयोग्य उपयोग अर्ग्युमेंटही समजता येते. पण ब्रिटीशांचे मापही त्यांच्या पदरात टाकावयास हवे. त्याच वेळी काही भारतीय शेड्ञुल्ड ट्राईब्सवर ब्रिटीश अन्याय ते आफ्रीकन आणि नेटीव्ह आमेरीकनांसोबतचा वंशवादही माणूसकीला काळीमा फासणाराच होता. ब्रिटीश त्यांच्यासाठी आपत्ती होते हे विस्मरणात जाऊ नये. परिस्थितीनुसार काही जात्यात, काही सुपात होते.

ब्रिटीशांवर कुणी राज्य केले नाही म्हणून ब्रिटन मध्ये सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत असे नसावे. महायुद्धे तेथेही इष्टापत्ती ठरली असतील कदाचित पण म्हणुन महायुद्धांचे समर्थन मर्यादीत प्रमाणातच करता येते. महायुद्धे झाली नाहीत म्हणुन सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत सुधारक जन्मले नाही असे होत नसावे हेही लक्षात घेतले पाहीजे.

देशहीताचे वहन करणारी राष्ट्र आणि राष्ट्रप्रेम ही संकल्पना आपल्या ठिकाणी महत्वाची आहे आणि राष्ट्रप्रेमाशी तडजोड न करता सुधारणावादी भूमिका घेता येऊ शकतात. असो.

पगला गजोधर's picture

13 Jan 2018 - 7:24 pm | पगला गजोधर

"कदाचित" तुम्ही म्हणता तसं एखादया पेशव्याचे मन परिवर्तन झालंही असतं, अगदी शक्य आहे, ज्याप्रमाणे राजकुमार गौतम बुद्ध यांचं झालं..
उदा. थोरल्या बाजीरावाने धर्म/जात पलीकडे जाऊन, प्रेम व पुढे विवाह केला, काय झालं बिचाऱ्याचे ...किती हाल अपेष्टा उभय जोड्याच्या नशिबी ??? त्यामुळे एखादा रण धुरंधर पेशव्याचे मनपरिवर्तन झालेही असते (तुम्ही कल्पिता तसे) तरी आजूबाजूची सिस्टिम ने त्याचा काटा काढला असता,
त्यामुळें ब्रिटिश आगमनामुळे संपूर्ण सिस्टीम उलथून पडली व दलितांना शिक्षण गरिमा नोकरी ची द्वारे किंचितशी किलकिली झाली....

माहितगार's picture

13 Jan 2018 - 7:45 pm | माहितगार

हम्म, पेशव्यांचे प्रत्यक्ष निर्णय पश्चिम महाराष्ट्र कोकणात नक्कीच प्रत्यक्षपणे लागू पडले असतील पण मराठवाडा आणि विदर्भात पेशव्यांचा प्रभाव अप्रत्यक्ष स्वरुपाचा होता, अर्थात पेशव्यांनी रमण्यातून वाटलेल्या दक्षिणा घेतलेल्यांकडून त्यांचा प्रभाव बाहेर किती गेला असेल हा वेगळ्या अभ्यासाचा विषय नक्कीच असेल

दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या मापात या विषयावर बरेच पाप जमा असेल अए दिसते तरीही दोन स्त्री विषयक बाबीत त्याला क्रेडीटही पोहोचते किमान एका बाबतीत ब्राह्मणांनी त्यांच्या मुलींना पैसे घेऊन विकु / देऊ नेये अशा स्वरुपाचा एक निर्णय वाचनात आला होता. दुसरे त्याच्या एका पत्नीस संस्कृत शिक्षणाची परवानगी मिळालेली होती त्यावरून अप्रत्यक्ष प्रेरणा घेऊन अनंतशास्त्री डोंगरे या पंडिता ने स्त्रीयांच्या संस्कृत आणि वेद शिक्षणासाठी थेट शंकराचार्यांशी शास्त्रार्थ केला वरून आपल्या मुलीस संस्कृतात्त पारंगत केले. अनंतशास्त्री डोंगर्‍यांची ती मुलगी पुढे पंडिता रमाबाई
म्हणून सुपरिचीत झाली. तिने समाज विरोध पत्करून परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्य केले . तत्पुर्वी पंडिता रमाबाईने ब्राह्मणेतर विवाह करण्याचे धाडसही केले ह्याची नोंदही घेण्याची गरज असावी तेही संस्कृतातील पंडिता असून चुकीच्या रुढींना विरोध केला.

पगला गजोधर's picture

13 Jan 2018 - 8:29 pm | पगला गजोधर

होय indeed...
But please remind me again...
रमाबाईंना सामाजिक कार्य करायला, कुठयल्या राजवटीत
स्कोप मिळाला ? ब्रिटिश ??

ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव इ. संतांनी कर्मकांडाचा निषेध करत भक्ती मार्ग सांगितला. आणि बहुतांश महाराष्ट्र त्या मार्गे जातो. ही धर्म सुधारणाच होती ना? ती इंग्रजांच्या काळात झाली का?

स्कोप मिळाला ? होय indeed...

पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ? डॉ. आंबेडकर असोत वा पंडिता रमाबाई मर्यादे बाहेर विमुक्त जमातींच्या प्रश्नात नाक खुपसले असते अथवा गोर्‍या वंशवादा विरुद्ध कृष्णवर्णीय क्रांतीकार्‍यांना प्रोत्साहन संरक्षण दिले असते तर ब्रिटीशांनी स्विकारले असते का ? स्कोप उपलब्ध झाला असता का ?

पगला गजोधर's picture

14 Jan 2018 - 9:42 am | पगला गजोधर

पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ?

कितीही अत्यल्प चान्स का असेना, त्यामागे ब्रिटिशांचे काहीही मोटिवेशन का असेना...
पण तत्कालीन दलित समाजाला, जिथं माणूसपण नाकारलं जात होतं, तिथं ही अत्यल्प सामाजिक संधी, जणु काही, ज्यावर
वॉटरबोर्डिंग होत असेल (ज्याचे हातपाय बांधून , मुंडी पाण्याखाली बळजबरीने 2 मिनिटे धरणारे हात, एका क्षणासाठी थोडं ढिले व्हावें, व पाण्यातून आपली मुंडी बाहेर काढण्यासाठी अत्यल्प चान्स मिळून पहिला श्वास घ्यायला मिळावा)
त्याच्या पहिल्या श्वासासारखी, ही अत्यल्प संधी होती.
.
असो पेशवाईतल्या स्त्रिया वाचूलिहूशकत होत्या नं ?
त्या शिवाय का, ध चा मा झाला ?
.
अश्यात दुसऱ्या बाजीरावाने आपल्या स्त्रीला शिक्षणाची संधी देऊन काय मोठे ते तिर मारले ? Too Late Too Less,
आणि हे सुद्धा त्याने नक्कीच स्वतःच्या सोईने, स्वतः झेपेल रुचेल असेंच असावे असं कोणी म्हटलं तर त्यात काय वावगे ?
त्यासाठी काय त्याला बळच समाज सुधारकांच्या पंक्तीत घुसवण्याचा घाट घातलाय ??
ब्रिटिशांनी जगभरात काय काशी केली, करून ठेवली, याचा इथल्या दलितांना देशद्रोही म्हणून बघण्यामागे काय संबंध ?
.
इथं दलित लोकांना आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा चान्स मिळाला, तुटपुंज्या पगाराची का होईना पण सैन्यात नोकरी पेन्शन मिळाले, आणि हे त्यांना डोंगरएव्हढे मोठे वाटावे, यातच त्यांची पेशवाईत व त्या आधी होणारी विटंबना अवहेलना गळचेपी आजच्या लोकांना लक्षात यावी.
बाय द वे, "तुझी सावलीही आमच्यावर पडू देऊ नको", (सावली पडू न देणे)अशाप्रकारचा शब्दसंमुच्चय मराठीत कधी पासून रूढ झाला हो ?
मागच्या शतकातील महाराष्ट्रातील एक दलित शाहीर (ते इंग्रज अधिकाऱ्याकडे नोकर होते)काय म्हणतात ?
इंग्रज सायेब बरा. का ? तर ..इथले लोक आमच्या सावलीपासून विटाळ मानतात, पण साहेब आमच्याशी हँडशेक करतो, त्याच्या बरोबर चहा पाजतो...
.

आय अँम शुअर, तुम्ही म्हणाल इंग्रज धूर्त (एच आर मॅनेमेंट, स्वतःची सोय स्वार्थ ब्लाह ब्लाह....)
.
पण लक्षात घ्या, ज्या समाजातील लोकांना एक हँडशेक अर्धा कप चहा, सुद्धा तो माणुस आहे याचे कन्फेर्मेशन द्यायला पुरेसा ठरतो, तिथे आधी त्यांना किती हीन नीच ट्रीटमेंट किती हजारो वर्षे मिळाली असेल ???

माहितगार's picture

14 Jan 2018 - 3:06 pm | माहितगार

चर्चेत काही गोष्टी स्पष्ट करावयाच्या राहून जाऊ नयेत म्हणून ; पहिली गोष्ट धागा चर्चा ज्या कारणाने चर्चा चालू झाल्या त्याची स्थिती आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणी प्रमाणे झाली आहे. वढू बुद्रूक बाजूस राहून चर्चा हकनाक कोरेगाव भीमावर घसरल्या. पैसा ताईंनी म्हटल्या प्रमाणे दंगलींचा भाग भाडोत्री दंगल खोरांना वापरून झाल्याची शक्यतेचा भाग मोठा असावा आणि सामाजिक राजकीय आणि दंगल खोरीय भूमिका सरळ करण्यात का आणि कुठे अपयश आले हा स्वतंत्र अभ्यासाचा महत्वाचा मुद्दा असावा.

कोरेगाव भीमा वर चर्चा आलीच आहे तर स्मारकावर जाऊन एवढी शतके अन्याय करणार्‍यांवरच्या अन्यायाचे उट्टे काढण्याचे समाधान प्राप्त करुन घेण्यात -स्वतः दुसर्‍या बाजीरावाने ब्रिटीशांशी तडजोड केली म्हटल्यावर अन्यायग्रस्त समुहानेही त्यांच्याशी तडजोड केली त्तर
- फार नुकसानकारकही काही नसावे. मला वाटते स्वा. सावरकरांनीही अशी काहीशी भूमिका घेतल्याचा संदर्भ मागे विकिपीडियावर वाचल्याचे आठवते. (चुभूदेघे)

पण इथे नाजूक तर्कांच्या आधारांवर अधिक बळ दिल्यास आधार कोसळण्यासारखी स्थिती होते किंवा काय अशी साशंकता वाटते. अधिक अभ्यास आणि संशोधनाची गरज स्वतः प्रकाश आंबेडकरांच्या अलिकडील लेखातून व्यक्त झाल्याचे दिसून येते. अशीच बाब दुसर्‍या बाजीरावाच्या सामाजिक दृष्टीकोण आणि निर्णयांवर अधिक संशोधन आणि अभ्यासाची गरज असावी आणि सर्वच महाराष्ट्रीय इतिहासाची प्रॉपर प्रमाण ऐतिहासिक साधने आंतरजालावर विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध व्हावयास हवीत.

पगला गजोधर's picture

14 Jan 2018 - 3:24 pm | पगला गजोधर

सहमत, कोरेगावास भेट देणारे दलित बांधव, वढुस भेट देणारे मराठा बांधव, व या महाराष्ट्रात राहणारे तमाम ब्राम्हण, मराठा, ओ बी सी सर्व लोक हे शांतिप्रिय व आधुनिक विचारसरणी असलेले आहे, त्यात वाद नाही.
धागा कोरेगाव भीमाशीच संबंधित आहे अगदी टायटलपासून, वढूशी नाही. कोरेगाव भीमा दंगल ही भाडोत्री गुंडांकडूनच घडली आहे याबाबतही दुमत नाही,
.
फक्त ते भाडोत्री गुंड फॅसिस्ट अतिउजव्या अतिवादी शक्तीकडून कडून सुपारी घेऊन आले होते का नव्हते, जर नव्हतें तर नक्की कोण मागे आहे, याचीच सखोल निष्पक्ष चौकशी व्हावी...

माहितगार's picture

13 Jan 2018 - 9:48 pm | माहितगार

प.ग. अमेरीकनांना तथाकथित न्युट्रल इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या फर्स्ट नेशन्सना सामावून घेण्यासाठी केलेली माझी टिका रुचत नाही. तिथला एकही पुरोगामी भारतीय पुढे सरसावत नाही. सांस्कृतीक दमन त्याचे इंग्रजी भाषांतर जे असेल ते त्या लेखाच्या चर्चा पानावर मी नुसता डोकावलो तरी ते लेख पान मी विकसीत करेन या भितीने इंग्रजी विकिपीडियातून वगळले जाते. ते एकविसाव्या शतकातील मागच्या वर्ष दिडवर्षातील गोष्ट - अनुभव आणि पुराव्यांसहीतच बोलतोय - या पुर्वीचे युरोमेरीकन अधिक उदार होते असे म्हणावयाचे आहे का ?

माहितगार's picture

13 Jan 2018 - 10:00 pm | माहितगार

अगेन आपण दुसर्‍या बाजीरावास गृहीत का धरतोय ? -त्याची पापे जी असतील ती आहेतच पण तरीही - त्याच्या बायकोचे संस्कृत शिक्षण चालु होते तर त्याने इतर स्त्रीयांच्या शिक्षणास विरोध करण्याची शक्यता कमी होत नाही का ? झाशीच्या राणीचे सैनिकी शिक्षण नेमके कुठे झाले - नेमके माहित नाही पण दुसर्‍या बाजीरावाच्या आशिर्वाद या मागे होता की नाही हा अभ्यासाचा विषय असावा .

इतर सामाजिक सुधारणांना विरोध झाला असता कदाचित तसा तो ब्रिटिश कालावधीतही झालाच. आणि सर्व काळात समाज सुधारकां समोर हे आवाहन असतेच

sagarpdy's picture

13 Jan 2018 - 7:59 pm | sagarpdy

Criminal Tribes Act 1871 ब्रिटिशांनीच आणला ना? त्यांचेच नंतर विमुक्त जाती असे नामकरण झाले ना?

उलट ब्रिटिशांनी इथली कास्ट सिस्टीम डॉक्युमेंट केली. त्यावर आधारित कायदे-सोई केल्या. आणि जातीच्या भिंती बळकट केल्या.
https://en.m.wikipedia.org/wiki/Census_of_India_prior_to_independence
पूर्वी (म्हणजे मध्ययुगात) जाती व त्याचे व्यवसाय बदलत होते ना?(उदा कुणबी->मराठा शेतमजूर ते शासक). ब्रिटिशांनी कागदोपत्री नोंद करायच्या सिस्टीम मूळे विसरायची सोय संपली.

भारतात ज्या सुधारणा झाल्या त्या इथल्या समाजसुधारकांमुळे, जर ब्रिटिश नसून अन्य कोणाचं राज्य असत तर सुधारणेचा वेगळा मार्ग त्यांना घ्यावा लागला असता एवढंच.
बाकी स्वतःच्या सोयीसाठी इंग्रजांनी बऱ्याच ठिकाणी बरीच वाट लावली. मध्यपूर्वेत तर कायच्या काय वाट लावून ठेवलीय - ती अजून खराब होत चाललीये.

तेजस आठवले's picture

13 Jan 2018 - 8:49 pm | तेजस आठवले

देशहीताचे वहन करणारी राष्ट्र आणि राष्ट्रप्रेम ही संकल्पना आपल्या ठिकाणी महत्वाची आहे आणि राष्ट्रप्रेमाशी तडजोड न करता सुधारणावादी भूमिका घेता येऊ शकतात. असो.

फार छान वाक्य लिहिले आहे हे तुम्ही.आवडले.

महाराष्ट्रात किमान एका रायनाकाचे मंदिर आणि टाक पुजेत आहेत म्हणे. संदर्भ

arunjoshi123's picture

13 Jan 2018 - 6:54 pm | arunjoshi123

http://www.tribuneindia.com/news/punjab/community/ambedkar-s-1931-editor...
भगत सिंगाने स्वातंत्र्यासाठी जे प्राणदान दिले त्याच्या उचिततेबद्दल कौतुक असोच, पण उचित/अनुचित बाबतीत शांत राहून ब्रिटिशांना हे केवळ घरच्या दबावाने करायला लागले म्हणणे म्हणजे ब्रिटिश सरकार छान, ब्रिटिश जनता चिडलेली असं म्हटल्यासारखं आहे.
=================
ब्रिटिश काळे गोरे हा भेदभाव करत त्याच्या कितीतरी स्टोर्‍या वाचलेल्या आहेत. ते ब्राह्मणी अस्पृश्यतेपेक्षा आंबेडकरांना कसं समर्थनीय वाटलं देव जाणो.

गामा पैलवान's picture

13 Jan 2018 - 12:10 am | गामा पैलवान

अंतरा आनंद,

आणि बाबरी पाडल्यावर कित्येक वर्षे देश धुमसत राहिला ते कृत्य करणारे लोकशाही विरोधी नव्हते का?

बाबरी नावाची कोणतीही मशीद तिथे नव्हती. जे होतं ते जुनं राममंदिर होतं. हिंदूंनी हिंदूंचं देऊळ पाडलं तर कोणालाही आक्षेप घ्यायचं कारण नाही.

आ.न.,
-गा.पै.

arunjoshi123's picture

13 Jan 2018 - 12:08 pm | arunjoshi123

गामाजी,
अंतरा आनंद सारखे पुरोगामी, काँग्रेसी, डावे ही एक भित्री जमात आहे. अन्यायाच्या छत्राखाली शांतता त्यांना अत्यंत प्रिय आहे. बाबरी मशीद आहे का राम मंदिर आहे नि त्याबद्दल समाजभावना काय आहे, सत्य काय आहे, न्याय्य काय आहे याच्याशी त्यांना मतलब नाही. त्यांना हवी शांतता. मला ती बाबरी मस्जिद आहे असं प्रामाणिकपणे म्हणणारे लोक तो मुद्दा महत्त्वाचा नाही म्हणणारांपेक्षा पूजनीय वाटायला लागलेत.
-------------
१९९२ मधे या पुरोगाम्यांनी मुस्लिमांना भडकावले नसते तर देश अजिबात धुमसला नसता. २०१० मधे कि आसपास जेव्हा अलाहाबाद हाय कोर्टानं १/३ मुस्लिम २/३ हिंदू असला निकाल दिला त्यादिवशी ... तसं नीट पाहीलं तर ... कट्टर मुस्लिमाच्या नजरेत २/३ बाबरी हिंदूंना मिळाली. या निकालाच्या दिवशी सरकार जाम टेन्स होतं. पण देशात एक मच्छर मेला नाही.
-------------------
आणि ही भित्रट मंडळी जेव्हा "धुमसणे" शब्द वापरतात तेव्हा त्यांना मुस्लिमांच्या दंगलखोर वृत्तीचं निर्ल्लज्ज समर्थन करायचं असतं. समजा हिंदू मूर्खासारखे वागले तरी अन्य कोणीही शेवटपर्यंत घटनेच्या व्यवस्थेच्या चौकटीतच वागावे हे दटावायला यांची जीभ रेटत नाही. यांची मानसिकताच अशी आहे कि मुस्लिमांवर हिंदूंकडून अन्याय झाला तर त्यांना देश धुमसावत ठेवायचा अधिकार आहे.
-------------------
शिवाय पुरोगाम्यांच्या आरंभबिंदूचं चयन म्हणजे एक जोक असतो. तसं ओरिजनल धुमसावायला उचकावलं बाबरानं आणि त्यानंतर अनेक तिथे पाडापाडी करणार्‍या राजांनी, लोकांनी. पण पुरोविनोदबुद्धीप्रमाणे, १९४७ ला देशाचे सगळे वाद मिटले म्हणून १९४७ नंतर काडी करणारा तो दोषी!!!!!!!!!!!! अरे काय लॉजिक आहे?????? स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्याशी संबंध नसलेल्या भांडणांचा संबंध काय?
-----------------------
मी खालील विधाने समत्वबुद्धीने लिहित नाहीय, पण
१. जे लोक समत्वबुद्धीने तत्त्वे ठरवून मग चर्चा करतात ते मागास, धार्मिक.
२. आम्ही जे म्हणतो तेच खरे, त्यातून निघेल ते तत्त्व तेच खरे असं म्हणणारे पुरोगामी.

गामा पैलवान's picture

13 Jan 2018 - 2:55 am | गामा पैलवान

प.ग.,

आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते.

राष्ट्र म्हणजे काय याची सुस्पष्ट व्याख्या नाही. एका राज्यात अनेक राष्ट्रिके नांदू शकतात. याउलट एकाच राष्ट्रात अनेक राज्येही असू शकतात.

स्वित्झर्लंड नामे चिमुकल्या राज्यात डॉईश, फ्रांका व इतालियानो ( = जर्मन, फ्रेंच व इटालियन ) अशी तीन राष्ट्रिके सुखेनैव नांदू शकतात तर भारत नामे खंडप्राय राष्ट्रात अनेक राज्ये असणे अत्यंत स्वाभाविक आहे.

आ.न.,
-गा.पै.

सर्व धागे आणि सर्व प्रतिसाद वाचले. आता एकच प्रश्न पडला आहे. इथून पुढे, आपण आपापसातील मतभेद व भांडणे विसरून एकत्र येऊ अशी परिस्थिती निर्माण व्हायला सर्वांनीच काय प्रयत्न केले पाहिजेत? अत्यंत कळकळीने विचारतो आहे. पुढे काय?

इथून पुढे, आपण आपापसातील मतभेद व भांडणे विसरून एकत्र येऊ अशी परिस्थिती निर्माण व्हायला सर्वांनीच काय प्रयत्न केले पाहिजेत? अत्यंत कळकळीने विचारतो आहे. पुढे काय?

तसा ब्राह्मण/संघ/भाजप्/सवर्ण/हिंदू इ इ प्रणित शक्तींपासून देशाला, लोकशाहिला वा कोणत्याही अन्य समाजाला, धर्माला इ इ व्यवस्थेला अजिबात धोका नाही. पण असा धोका असल्याचं भय काही प्रामाणिक* आत्म्यांना इतकं घेरून राहिलं आहे, आणि आपल्या परीनं आपण काहीतरी करावं म्हणून ते इतकी तडफड करत आहेत कि त्या तडफडितूनच एक भयप्रद सामाजिक फट निर्माण झाली आहे.
हे सगळं सुरळीत व्हायला २०१९ मधे मोदीचं सरकार हरवणं आवश्यक आहे.
----------------------------------------
* अप्रामाणिक आत्मे चार दिवसात उघडे पडतात. त्यांच्या नाटकांचा, घातपाती कारवायांचा इतका काही धोका नाही.

राही's picture

13 Jan 2018 - 4:46 pm | राही

चला. अजो आखाड्यात उतरले. वॉशिंग्टनची कुऱ्हाडच ती. सपासप हाणामारी करता करता कोवळ्या पालवीचा अंशसुद्धा उरणार नाही इतका आवेश. असो.
नाहीतरी जीव जायचा पुरोगामीपणानिशी आणि जीव घेणारा म्हणणार भित्रे!

arunjoshi123's picture

13 Jan 2018 - 6:37 pm | arunjoshi123

नाहीतरी जीव जायचा पुरोगामीपणानिशी आणि जीव घेणारा म्हणणार भित्रे!

पुरोगाम्यांचा माज मोदी सरकार आल्यापासून उच्चतम बिंदूला पोहोचला आहे. त्यांच्या अस्तित्वाला (त्यांच्या मते) खरा अर्थ लाभला आहे. ही वेळ त्यांना सर्वस्व वाहून प्राणांतिक विरोध करायची नि आपल्या जन्माचं सार्थक करायची असं वाटत आहे. अर्थात अशावेळी आपला जीव ऑफर करणे त्यांना आपल्या कम्यूनिटीमधे गौरव प्राप्त करून देणार आहे.
---------------
ज्या पुरोगाम्यांना डाव्या लोकांचं फंडींग आहे, त्यांचं मी समजू शकतो. पण जे लोक असे कोणते लाभार्थी नाहीत त्यांची कीव वाटते. घटनेच्या चौकटीत राजकीय विरोध करायचं सोडून ही मंडळी असा विखार पसरावत आहेत कि त्यांना आपण राष्ट्राचे नुकसान करत आहोत हे समजत नाहीय. चांगल्या, वैचारिक, तात्विक, नि:स्वार्थी लोकांकडून भावनेच्या भरात देशाचं नुकसान होत असलेलं पाहून वाईट वाटतं. विषवल्लीशी कशी दोन हात करायचे याचं कौशल्य अनेकांना आहे नि कट्टर लोक पटकन बुंधा, खोड, फांद्या, मूळं यांच्यावर घाव घालतात. माझं स्पेशालायझेशन कोवळ्या पानांमधेच आहे.
-----------------
ज्या सत्तेचा आपण पराजय केला, ज्यांना आपण दुष्ट मानलं, ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा राजकीय युद्धातला विजय स्वातंत्र्यानंतर का सामाजिक स्तरावर का साजरा व्हावा हे विचारायची सोय राहिलेली नाही. या परकीयांनी जगातले किती मानववंश नष्ट करून टाकले हे क्षणभर विसरलं नि त्यांच्या आपल्या संस्कृतीला झालेल्या स्पर्शाला आपल्या बर्‍याच समाज सुधारणांचं श्रेय देणे योग्य मानलं तरी राजकीय युद्धातला विजय का साजरा करायचा हा प्रश्न उरतोच. उदा. पोर्तुगिजांनी भारतात पाव आणला नि भारतीय आहार समृद्ध केला असलं काहीतरी श्रेय त्यांना द्यायचं मान्य केलं तरी त्यांच्याशी झालेल्या युद्धात भारताच्या पराभवाचा उत्सव बनवणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न दलितद्वेष्टाच विचारू शकतो असं गृहित लगेच हाणामार्‍या करणारा हा लेख आहे. हा प्रश्न कोणीही विचारू शकतं. सामाजिक न्याय मिळवायच्या लढ्याला परकियांच्या जयाची झालर कशाला? मग स्वातंत्र्य मिळाल्यामुळे नि हा सामाजिक न्याय प्राप्त करून देणारे परकीय गेल्याने आत्ता सामाजिक अन्याय पुन्हा उद्भवला आहे नि तो घालवायला पुन्हा चांगले परकीय लागतील असं ऑटोमॅटिकली अभिप्रेत होत नाही का? आणि १८१८ मधे जे काही झालं त्याला सामाजिक सुधाराचा किनारा देणं म्हणजे सामाजिक सुधारासाठी न सुधारणार्‍या जातीच्या लोकांना मारून टाकणं हा एक उपाय आहे असं काहीतरी विचित्र आणि अघोरी अर्थ यातून निघतो.
त्यामुळं एक प्रथा म्हणून काही अधिकार्‍यांनी आपल्या रेजिमेटच्या पूर्वजांची स्म्रुती करणं हे समजलं जाऊ शकतं पण पुरोगाम्यांनी याचा देशव्यापी स्तरावरच्चा जो बाऊ करून ठेवला आहे तो कळत नाही.
-------------------
धाग्यावर ज्यांनी कोणी जे काय विचार मांडलेत त्याच्या प्रामाणिकपणावर बेभरोसा दाखवून टिवल्या बावल्या करण्यात मला रस नाही. मला फार नीट मांडता आला नाही तरी एक प्रश्न मांडायचा आहे. लेखिकेनं जे काही स्वतःकडे बघायला सांगीतलं ते मी नीट बघून घेतलं. मला काही माझ्या प्रश्नात खोट आहे वा माझ्या नियतीत खोट आहे असं आढळलं नाही. आणि दलित, डॉ. आंबेडकर (समर्थक) यांना मी हक्कानं प्रश्न विचारू शकतो कोणत्याही भूमिकेबाबत. नको रे बाबा "त्यांना" विचारायला, मॅटर संवेदनशील आहे, असला दुरावा अजून तरी मनात नाही. पण प्रत्येक प्रश्नाच्या वेळी उत्तर न देता फक्त दलितद्वेषाचा आरोप झाला तर भविष्यात दुरावा होणं संभव आहे.

सुबोध खरे's picture

13 Jan 2018 - 7:40 pm | सुबोध खरे

परखड आणि निर्भीड विवेचन
ज्या सत्तेचा आपण पराजय केला, ज्यांना आपण दुष्ट मानलं, ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा राजकीय युद्धातला विजय स्वातंत्र्यानंतर का सामाजिक स्तरावर का साजरा व्हावा हे विचारायची सोय राहिलेली नाही.
सामाजिक न्याय मिळवायच्या लढ्याला परकियांच्या जयाची झालर कशाला?
त्यामुळं एक प्रथा म्हणून काही अधिकार्‍यांनी आपल्या रेजिमेटच्या पूर्वजांची स्म्रुती करणं हे समजलं जाऊ शकतं पण पुरोगाम्यांनी याचा देशव्यापी स्तरावरच्चा जो बाऊ करून ठेवला आहे तो कळत नाही.
एक लष्करी अधिकारी म्हणून काही रेजिमेंटच्या शौर्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या महायुध्दातील गाथा साजऱ्या केल्या जातात ते एका मर्यादेपर्यंतच पटत असे/ पटते. कारण हे युद्ध "परकीय सत्तेच्या विजयासाठी" केलेले होते. मग ते शौर्य अतुलनीय असले तरीही. यावर लष्करात माझे मतभेदही होत असत.
प्रत्येक लष्करी परंपरा "तशीच्या तशी" साजरी केली पाहिजे हेच चूक आहे. पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्याच्या खांद्यावरील बिल्ल्यातील राजमुकुट जाऊन अशोक चिन्ह आले तसेच.
स्वातंत्र्यानंतरच्या सर्व युद्धातील पराक्रमाच्या गाथांबद्दल अभिमानच वाटतो. कारण हे युद्ध स्वराष्ट्रासाठी केलेले होते.
महार रेजिमेंटच्या सैनिकांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली तर समजू शकतो पण सर्वसामान्य लोकांनी तेथे जाऊन उत्सव साजरा करणे पटत नाही. मग अगदी डॉ बाबासाहेबानी तेथे श्रद्धांजली वाहिली असली तरीही. मी त्यांना "महामानव" मानतो, "देव" नाही.
उद्या राजपूत लोकांनी शिवाजी महाराजांवर मिर्झा राजे जयसिंह यांनी मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा केला तर तो आपल्याला पटेल का?
निदान मला तरी पटणार नाही.

तेजस आठवले's picture

13 Jan 2018 - 9:04 pm | तेजस आठवले

अजो ,
हा प्रतिसाद अतिशय समर्पक आहे. अगदी योग्य विचार तुम्ही मांडले आहेत ह्यात.

राही's picture

13 Jan 2018 - 10:31 pm | राही

"
ज्या पुरोगाम्यांना डाव्या लोकांचं फंडींग आहे, त्यांचं मी समजू शकतो. पण जे लोक असे कोणते लाभार्थी नाहीत त्यांची कीव वाटते. "

कीव करणे म्हणजे स्वतःकडे ज्ञातेपणा घेऊन एका पेडेस्टलवर उभे राहून 'अरेरे काय हे जग, यांना समजतच नाही', अशी उच्च भूमिका घेणे. बौद्धांमध्ये अवलोकितेश्वर या नावाची देवता असते ती या मर्त्य जगताच्या लीलांकडे खाली पाहात असते. पण एक फरक आहे. अवलोकितेश्वराच्या डोळ्यांत करुणा असते. सहकंप असतो.
आणि केवळ पैशातून किंवा कोणत्याही स्वलाभाच्या इच्छेतूनच केवळ पुरोगामी विचार जन्माला येतात हा फार मोठा भ्रम आहे. फंडिंग नसतानाही, किंबहुना बरेच वेळा ते नसतेच;अनेकांनी आपली आयुष्ये पणाला लावलेली आहेत, संपूर्ण आयुष्य (कोणत्याही लाभाविना) वेचलेले आहे. कीव करणे सोपे. पण या प्रयत्नांची, माणसांची माहितीही नसणे, केवळ समानधर्मी विचारांच्या माणसांनी केलेला तोच आणि तेव्हढाच त्याग अशी भूमिका असणे, शिवाय त्यांची कीव करणे या कोतेपणाला काय म्हणावे?

विशुमित's picture

13 Jan 2018 - 10:39 pm | विशुमित

+1

काय +१? काय बुड शेंडा हाय का त्या उत्तराला? मी कुठं म्हणलं कि पुरोगामीपणी प्रेरणा केवळ स्वार्थ असते? मी कुठं त्यांनी चार चांगल्या गोष्टी केल्या नाहीत? किंवा फक्त उजवेच निक्के निक्के नि बरोबर असतात? असं काही न वाचताच सह्या करत असता का ऑफिसात?

तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे याची टोटल मला तरी काय लागली नाही. नाहीतर तुमच्या प्रतिसादाखाली सही केली असती.
पुरोगामीच्या तुमच्या खतरनाक व्याख्या वाचुन मौज वाटली.
आता सही मी केली म्हणजे जबाबदारी माझी आहे.
सह्या का केल्या हे विचारायला एकतर तुम्ही माझे बाॅस असले पाहिजे किंवा आॅडिटर...!

तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे याची टोटल मला तरी काय लागली नाही.

अहो म्हणूनच विचारलं "+१ काय?"
माझा प्रश्न तुम्हाला कळला नाही, तरी तुम्ही त्याच्या उत्तराला +१ लिहावं हे विचित्र आहे.
=============================================

सह्या का केल्या हे विचारायला एकतर तुम्ही माझे बाॅस असले पाहिजे किंवा आॅडिटर...!

का म्हणे? मी तुमचा दोस्त आहे (असू शकतो ही वाक्यरच्चना टाळली आहे). फक्त कायदेशीर अधिकार गाजवायचे का? समाजात इतरही महत्त्वाची नाती असतात.

हे सगळे स्वतःच्या पैशातून सो कोल्ड प्रतिगामी देखील करतातच, पण एखादी चळवळ चालवायला, वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करायला पैसे लागतात, आणि ते फंडिंगशिवाय शक्य नाही यात दुमत नसावे.
आणि फंडिंग काही फुकट दानधर्म म्हणून येत नाही हे पण लक्ष्यात असू द्यावे म्हणजे झाले.

इरसाल's picture

13 Jan 2018 - 10:48 pm | इरसाल

चला तर मग ठरल आता मोदींच सरकार घालवलं की वरचे सगळे उल्लेखलेले संकट नाहीसे होतील.

२०१९ की आंधी.....हर बार हमेशा राहुलजी गांधी.

गामा पैलवान's picture

14 Jan 2018 - 4:57 am | गामा पैलवान

अंतरा आनंद,

तुम्ही स्वत:कडे बघायला सांगताय हे ठीक आहे. मात्र यात महारांचा स्वाभाविक उद्रेक तुम्ही गृहीत धरलेला आहे. मात्र वस्तुस्थिती पार वेगळी आहे. इथे संशय व्यक्त केल्याप्रमाणे नक्षल्यांनी दंगल पेटवल्याची माहिती अवगत होते आहे. त्यामुळे स्वत:कडे बघायची गरज खरंच आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. मी तरी स्वत:कडे न बघता नक्षल्यांकडे बघा म्हणून सुचवेन. कोरेगाव भीमा इथल्या व उर्वरित महाराष्ट्रातल्या दंगलींचा महारांशी व नवबौद्धांशी काडीमात्र संबंध नाही. नक्षल्यांशी मात्र घनिष्ट संबंध आहे.

अधिक माहिती : मुंबई - कल्याण पट्ट्यातून नक्षल्यांना अटक

आ.न.,
-गा.पै.

अंतरा आनंद's picture

14 Jan 2018 - 9:06 am | अंतरा आनंद

अरे वा, एवढं तुम्हाला कळतय तर "दलित समाजाला जाळण्यासाठी खास गाड्या उपलब्ध करून द्या" अश्या विधानाचा निषेध करायला हवा होता तुम्ही. त्या, या धाग्यावर पानपान भर प्रतिक्रिया लिहील्यात त्यात "हे कारस्थान नक्षल्यांच आहे तेव्हा दलित समाजाला नावं ठेवू नका" असं कुठे लिहीलं नाहीत ते.

गामा पैलवान's picture

14 Jan 2018 - 3:50 pm | गामा पैलवान

हात्तिच्या, एव्हढंच ना, मग गाड्या जाळायच्या वाक्यात दलिताचं नाव काढून नक्षल्यांचं नाव टाका. हाय काय नाय काय!

-गा.पै.

प्रत्येक वेळी प्रत्येकाला चिखलात उतरावं असे वाटलंच असे नाही ना.. शक्यतो वादापासून लांब राहायचा प्रयत्न असतो.

आता तुम्ही आख्खी चिखलाची बालदीच डोक्यावर उपडी केली म्हटल्यावर यावं लागलं इतकंच..

एक लक्षात ठेवा, एका सरसकटीकरणाचे उत्तर दुसरे सरसकटीकरण असू शकत नाही.

तुम्ही प्रामाणिक विचार करताय असं समजून बोलतोय. अजेंडा असेल तर मग काय प्रश्नच नाही.

अंतरा आनंद's picture

14 Jan 2018 - 9:15 am | अंतरा आनंद

ज्या प्रतिक्रियांमुळे मला लिहावसं वाटलं त्या मी प्रतिसादात पुन्हा उद्धृत केल्या. त्या कोणाच्याही असल्या तरी चुकीच्या होत्या, असं म्हणण्याची हिंमत इथे कोणीही दाखवलेली नाही अणि नाही नाही ते मुद्दे काढून चर्चा भरकटवण्यात मात्र एकापेक्षा एक पुढे येत आहेत. माझा मुद्दा अजूनही तोच आहे. दलित समाजाने काय करावे हे सांगणं सोपं आहे. एकदा जा दलित वस्तीत. त्या अजूनही आहेत अगदी शहरांमध्येही. ते किती गैरसोयीत जगत असतात ते बघा. तिथे सामान्यत: तुमच्याविषयी तिरस्कार नसतो तर कौतुक असतं. तुम्हाला आवर्जून चांगल्या कपातून चांगला चहा दिला जातो, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर "आज ***वार आहे, तिखट आहे, चालेल ना?" अशी काळजी घेतली जाते. तुम्हाला तिखट सहन न होऊन पाण्याची धार लागली तर हसतात पण ताटात वाढ्लेला गूळ दाखवतात. हे इथल्या प्रतिक्रियावाद्यांनी अनुभवलेलं नसेल.
त्यांची मागणी जास्त नस्ते हो. आम्हालापण मान द्या एवढीच. आरक्षण हा आपल्याला पुढे जाण्यासाठी दिलेला हात आहे याची जाण त्यांनाही असते. ’दलित असेच वागतात’ असं म्हणून आपण ह्या आपलेपणाला, आपल्याला दिल्या जाणार्‍या मानाला नख लावत असतो. इतर समाजाप्रमाणेच दलित समाजही विद्ध्वंसक नसतो तर चार माणसं असतात. त्या चार माणसांची चारशे होऊ नयेत असं वाटत असेल तर चारांच्या चुकीच्या वागण्यासाठी समाजाबद्दल अनुद्गार काढणं थांबलं पाहिजे. आणि हे सरसकट काढले जातात. आपल्याला सवर्ण समाजाने स्वीकारलं आहे असं त्यांना वाटावं एवढा बंधूभाव आपण दाखवतो आहोत का हे तपासावं. उलट आपण त्यांच्यातल्या कुसळाला मुसळ म्हणून दाखवत बसतो. आपण अश्याप्रकारे बोलत-लिहीत असताना या गोष्टीची एकच बाजू समोर रहाते आणि तीच बरोबर आहे असं फारसा विचार न करणार्‍यांना वाटत रहातं तेव्हा त्याची दुसरी प्रामाणिक बाजू असेल तर ती मांडली जायला हवीच या भूमिकेतून मी हे लिहीलं. त्यात कोणत्याही समाजाला दोष द्यायचा नव्हता पण चर्चेचा मूळ मुद्दाच गैरसोयीचा असल्यानं तो मी तीनतीनदा लिहूनही दृष्टीआड केला गेला. प्रत्येकाचा नीरक्षीरविवेक यातून दिसलाच.

आंदोलन, त्यातलं नुकसान मी कुठेही जस्टीफाय केलेलं नाही पण अशी आंदोलनं यशस्वी होत असतील, आंदोलन पुकारणार्‍याची राजकीय ताकद नसतानाही ती यशस्वी होत असतील तर एकूणच समाजाबद्द्ल त्यांची तक्रार आहे हे समजून घ्यावं. आपल्या पातळीवर तरी सरसकट एका समाजाला नाव ठेवणं टाळावं. आरक्षणासारखे राजकीय व्यवस्थेने दिलेले हक्क जरूर असतील पण आपल्या नातीगोती, कुटूंब, जात आधी मानणार्‍या समाजात या राजकीय व्यवस्थेला समांतर अशी व्यवस्था अस्तित्वात असते. आणि ती प्रस्थापितांच्याच (केवळ सवर्णांच्या नाही, मह्णून प्रत्येकाला प्रस्थापित गटाचा भाग व्हायची आस असते) बाजूने असते याचं भान ठेवून मग आरक्षणाबद्दल बोललं जावं. अशी समांतर व्यवस्था असू नये यासाठी आपण आग्रही नसू, काही करत नसू तर जिथे तिथे आरक्षणाकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही.

विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी, हे आपल्यातल्याच संतांने म्हटलय पण अर्थातच ती "भित्री पुरोगामी" असणार. त्यामुळे आपण आपल्या तलवारी उपसून राहूया. आपल्या एका डोळ्यासाठी दुसर्‍याचे दोन डोळे काढूया आणि मग झालेल्या अंधारात चाचपडत राहूया.

असो, बाकी आपल्या मुद्द्यांवर न बोलता आपल्या बोलण्याला गाढवांच्या लाथा वैगेरे म्हटलं जात असेल तर आपण मनुष्यराज्यात नाही हे उमगायला हवंच. त्यामुळे आपल्या राज्यात परतावं हे उत्तम. समाज एक असावा असं वाटणारे लोकं भित्रे असतील तर शूरवीरांमुळे जे होतय ते दिसतं आहेच. सो चालू द्या. मी बाहेर पडते.

जिस समय काँप रही है यह पृथ्वी
मनुष्यो की संख्या के भार से
गायब हो रहे हैं
मनुष्यता के मोर्चे पर लड़ते हुए लोग ।
-राजेन्द्र राजन

पैसा's picture

14 Jan 2018 - 2:48 pm | पैसा


गाढवांच्या लाथा

होय, हे मीच लिहिलंय. या धाग्यावर मी मोजून दोन प्रतिसाद लिहिलेत. ते जर का तुम्ही थंडपणे वाचले असतेत तर त्याचा संदर्भ आणी अर्थ कळायला त्रास झाला नसता. पु. ल देशपाण्डे नावाचे एक "ब्राह्मण" लेखक होउन गेले. त्यांच्या लिखाणाचा संदर्भ तुम्हाला माहित असावा अशी आशा बाळगते. मी राजकारणी लोक समाजाला कसे गाढव बनवतात याबद्दल लिहिले आणि पुढे असे गाढव होउ नये असे लिहिले. हे इतके उलगडून सांगावे लागेल असे डॉक्यातच आले नाही बघा! तुम्ही प्रत्येक गोष्ट विनाकारण स्वतःवर ओढवून घेत आहात. फारएंड यांचा आणि प्रचेतस, आनंदयात्री यांचे प्रतिसाद आणि त्यावर तुमची टिप्पणी वाचताना मूळ लेखापेक्षाही आक्रस्ताळे प्रतिसाद लिहिता आहात असे वाटून गेले.

लेख अत्यंत चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे असे वाटल्याने त्यावर काही प्रतिक्रिया देणे बराच वेळ मी टाळले होते. कारण ज्यातून काही निष्पन्न होणारे नाही असे वाद घालत बसायला आणि लोकांना त्यांच्या चुका दाखवत बसायला माझ्याकडे सध्या वेळ नाही. पण लेख खटकला त्याहून जास्त तुमची ही प्रतिक्रिया खटकली आहे. का ते सांगू? पुन्हा वाकडा अर्थ घेउ नका पण माझ्यासाठी "बौद्धवाडी" हा माझ्या एका मैत्रिणीचा फक्त पोस्टल पत्ता असतो. मी तिच्याकडे दयेने बघायची काही गरज नसते कारण ती माझ्यालेखी माझ्यासारखीच असते. तिच्याबाबत 'ते' 'त्यांची वस्ती' असा विचार कोणी करत असेल तर ते मला प्रचंड विचित्र वाटते. तुम्ही कोण आहात, तुमची जात काय हे मला माहीत नाही. पण जर कायद्याने व्याख्या केलेल्या मागसवर्गीयांपैकी असलात तर 'आम्ही', 'आमच्या वस्त्या' असे उल्लेख केले असतेत. त्या परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीला असे का वाटावे? म्हणून मी काही संवाद साधायचा प्रयत्न कदाचित केला असता. सांगायची गोष्ट म्हणजे मी शंभरात एक नाही तर शंभरापैकीच एक आहे. पण तुम्ही जर उच्च वर्णीय असून 'ते' 'त्यांच्या वस्त्या' असे लिहीत असाल तर तुम्हाला स्वतःकडे बघायची अत्यंत जरूर आहे असे मी म्हणेन.

पैसा's picture

14 Jan 2018 - 4:37 pm | पैसा

तीळगूळ घ्या आणि गोड बोला. तुम्ही लिहिलं म्हणून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. चलता है.

तिथे सामान्यत: तुमच्याविषयी तिरस्कार नसतो तर कौतुक असतं. तुम्हाला आवर्जून चांगल्या कपातून चांगला चहा दिला जातो, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर "आज ***वार आहे, तिखट आहे, चालेल ना?" अशी काळजी घेतली जाते. तुम्हाला तिखट सहन न होऊन पाण्याची धार लागली तर हसतात पण ताटात वाढ्लेला गूळ दाखवतात. हे इथल्या प्रतिक्रियावाद्यांनी अनुभवलेलं नसेल.

तसा याचा नि विषयाचा काय संबंध आहे देव जाणो, पण इथले प्रतिक्रियावादी स्वतः दलित नाहीत, दलितांपैकी कोणाचा या उत्सवाला विरोध नसूच शकतो, प्रतिक्रियावाद्यांना दलितांचे विश्व माहित नाही इ इ गृहितके उगाच बनवत आहात. (तसा माझ्याकडेपण डेटा नाही, पण विचारून घेतलेलं बरं.). मी तुमच्या दलितवस्तीतील पुरोगामी फेरफटक्याला कमी लेखू इच्छित नाही, पण एक गोष्ट...
मी लहानपणी कैकाडी, लमाणी, पारधी, महार, मांग यांच्या घरी राहिलो आहे. प्रतिक्रियावाद्यांनी कदाचित दलित साहित्यात जी भयानक बाजू पाहिली आहे त्याची एक दुसरी अत्यंत सुंदर बाजू मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. मी ३० वर्षाचा होईपर्यंत माझी आई माझ्या बर्‍याच वागण्या बोलण्याला "महार मांगी लक्षणं" म्हणे इतकी माझ्यावर या पार्श्वभूमीची छाप होती.
आता याचा देखील विषयाशी संबंध नाही. पण या उत्सवाला विरोध म्हणजे दलितांना विरोध या मानसिकतेतून तुम्ही बाहेर येत नाहियेत. त्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे.
-------------------
फाटे न फोडता बघा सांगता येतं का कि ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का?

एमी's picture

15 Jan 2018 - 7:50 am | एमी

ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का? >>

भीमा-कोरेगावला 'त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय' झाला हे तुम्हाला मान्य आहे का?

arunjoshi123's picture

15 Jan 2018 - 10:14 am | arunjoshi123

अर्थातच. तिथे जाऊन विजयस्तंभाला नमन करतात लोक.
---------------------------
आणि प्रत्यक्ष कोरेगावला काय झालं हे महत्त्वाचं नाही. तिथे इंग्रजांनी मार खाल्लेला असू शकतो वा दिलेला असू शकतो. दुसर्‍या जागतिक महायुद्धात कोण्या विशिष्ट जागी इंग्रजांनी पराभव झेललेला असू शकतो. पण ओव्हरऑल विजय झाला. १८१८ मधे पेशवाई संपली हे सत्य आहे.
------------------------------
त्या स्तंभाला व्हिक्टरी ओबेलिस्क का म्हणतात? बाकी काही असलं तरी (असल्यास) मानणारे लोक तिथे पराजयची स्मृती करायला नक्कीच जात नाहीत.

आणि प्रत्यक्ष कोरेगावला काय झालं हे महत्त्वाचं नाही. तिथे इंग्रजांनी मार खाल्लेला असू शकतो वा दिलेला असू शकतो. दुसर्या जागतिक महायुद्धात कोण्या विशिष्ट जागी इंग्रजांनी पराभव झेललेला असू शकतो. पण ओव्हरऑल विजय झाला. १८१८ मधे पेशवाई संपली हे सत्य आहे. >> अगदी बरोबर!

===
त्या स्तंभाला व्हिक्टरी ओबेलिस्क का म्हणतात? >> नक्की का? कारण मी जेवढं वाचलय त्याततरी त्याला स्मृतिस्तंभ म्हणत होते, विजयस्तंभ नाही.

बाकी काही असलं तरी (असल्यास) मानणारे लोक तिथे पराजयची स्मृती करायला नक्कीच जात नाहीत. >> बरोबर. पराजयची स्मृती म्हणून कोणी २०० वर्षांपूर्वी ३५०००₹ खर्च करणार नाही आणि १०० वर्षांपासून लोक तिथे दरवर्षी जाणारपण नाहीत. पण मला वाटतं 'आपले पूर्वज शूर, लढवय्ये होते' याची स्मृती म्हणून लोक तिथे जातात; कोणाचाही जय/पराजय साजरा करायला नाही.

===
आता परत तुमच्या मूळ प्रश्नाकडे:

ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का? >> इथे तुम्ही ब्रिटिश = परके आणि पेशवे = आपले म्हणताय. जर प्रत्यक्ष लढणारे महार आणि अरब पाहिले तर कोणाला आपले आणि कोणाला परके म्हणणार?

किंवा केवळ दोन लढणारे गट असा विचार केला तर कोण शूर, लढवय्ये वाटतंय?

मी माझ्या आयुष्यातली साधारण 2 वर्षे संघाच्या अगदी जवळ काढली. 2 वर्षात मला एकदाही संघाच्या माणसामध्ये दलित द्वेष दिसला नाही, किंबहुना आमच्या पंगतीला सर्व जातींचे लोक कायमच होते..

सगळ्याच उजव्या संघटना बऱ्यापैकी मुस्लिम द्वेष्ट्या आहेत, तात्विक लेव्हलला नसल्या तरी कार्यकारी लेव्हलला आहेत हे मान्य करायला हरकत नसावी. पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही

गामा पैलवान's picture

15 Jan 2018 - 3:58 am | गामा पैलवान

आनन्दा,

पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही

हेच तर खरं दुखणं आहे तथाकथित दलित पुढाऱ्यांचं.

आ.न.,
-गा.पै.

पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही >> उजव्या संघटनेचं माहित नाही पण 'इथे' बरीच उजवी लोकं सतत आरक्षण, RTE, त्याचा उपयोग करून घेणारे यांच्याबद्दल द्वेषाने बोलत असतात. इतर काहीना सतत जिथेतिथे ब्रिगेडीच दिसत असतात....

विशुमित's picture

15 Jan 2018 - 8:31 am | विशुमित

+11111

विशुमित's picture

15 Jan 2018 - 8:32 am | विशुमित

+१११११

पुरोगामी राहिले.

पगला गजोधर's picture

15 Jan 2018 - 12:20 pm | पगला गजोधर

पुरोगामी राहिले.

अजुन धर्माबाहेर प्रेम /लग्न करणाऱ्या, तथाकथित "मूर्ख" स्त्रिया राहिल्या ...

राही's picture

15 Jan 2018 - 9:02 am | राही

इथे काही लोकांकडून सततच उजवे, दलित आणि पुरोगामी यांच्या विरोधात द्वेषाने, त्वेषाने आणि आवेशाने तलवारी उपसल्या जात असतात असे दिसते. धार थोडी बोथट असती तरी चालण्याजोगे होते.

प्रचेतस's picture

15 Jan 2018 - 9:08 am | प्रचेतस

काहीसा असहमत.
उलट इथल्या काही लोकांना ब्राह्मणांबद्दल अंमळ अधिकच द्वेष दिसतोय असे वाटते, सतत पेशवाईचे उल्लेख निघतात, अरे बाबांनो, तुम्ही ह्यावर काही वाचलंत काय? उगाच ब्रिगेडी लेखन वाचून हवेत गोळ्या माराव्यात.

मी असल्या चर्चांत कधीच भाग घेत नाही पण हल्ली हे खूपच जाणवते म्हणून लिहावेसे वाटले.

उलट इथल्या काही लोकांना ब्राह्मणांबद्दल अंमळ अधिकच द्वेष दिसतोय असे वाटते >> ब्राह्मणेतर आहेतच कितीजण येथे? आणि त्यातले ब्राह्मणांबद्दल अधिक द्वेष उघडपणे+सतत व्यक्त करणारे किती? फारच नगण्य. त्याकडे दुर्लक्ष करता येणे फार अवघड नसावे.

ऐतिहासिक काळात पेडस्टलाचा १००% एरीया व्यापायची असल्याने पुरोगाम्यांना आता सगळीकडेच त्वेष नि आवेश दिसतो. अन्य विचारसरणींसाठी तुम्ही लोकांनी जी टोमणेखोरगीरी केली नि जितक्या निर्लज्जपणे केली ती उलट ऐकून घ्ययची सवय मात्र नव्हती. अचानक ऐकूनही घ्यावं लागत आहे इतकाच फरक आहे. त्यात फार त्वेष इ नाही. तशास तशी भाषा आहे.

सुबोध खरे's picture

15 Jan 2018 - 9:41 am | सुबोध खरे

आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या जातींना क्रिमी लेयर लावा म्हणताना आढळत नाही.
इतकेच नव्हे तर माझ्यासारखे जे आरक्षण असावे पण ते खरोखर गरजवंत ( मागासवर्गातिलच ) यानाच असावे असे म्हणतात त्यांनाही दुजोरा देताना आढळत नाहीत.
(म्हणजे जर १० जागा मागासवर्गाला असतील तर त्यातील क्रिमी लेयरला वगळले तर मागासवर्गातीलच खऱ्या १० गरजवंतांना त्या जागा मिळून त्यांचा अंत्योदय होईल)
आम्ही आता वर आलो आणि सरकारी जावई झालो तरी आम्हाला फायदे मिळालेच पाहिजेत मग आमच्या (मागास) वर्गातील खरे मागास लोक मागे राहिले तरी चालतील. हा शुद्ध दांभिकपणा मी गेली काही वर्षे इथल्या पुरोगामी किंवा तत्सम लोकांमध्ये पाहतो आहे.
वाममार्गी लोकांना देश हि संकल्पनाच मान्य नाही त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल बोलायची गरजच नाही.

पगला गजोधर's picture

15 Jan 2018 - 12:17 pm | पगला गजोधर

सर,

माझ्यामते सामाजिक मागासलेपणा साठी देण्यात येणारे आरक्षण व उत्पन्न आधारित क्रिमी लेयर याचा काही संबंध नाही.
तुमच्या मताचा आदर आहे, पण मला मान्य नाही.

मी तर तर म्हणतोय व बी सी साठी असणारी क्रिमी लेयर ची अट तर अनाकलनीय आहे. व ती तात्काळ रद्द व्हावी.

arunjoshi123's picture

15 Jan 2018 - 1:12 pm | arunjoshi123

का, का म्हणे?

सुबोध खरे's picture

15 Jan 2018 - 1:22 pm | सुबोध खरे

म्हणजे डॉ देवयानी खोब्रागडे ज्यांचे वडील आय ए एस अधिकारी आहेत (आणि त्यांनी बेस्ट मध्ये भरपूर माया केली अशी वदंता आहे) याना एम बी बी एस साठी आरक्षित सीट मिळाली आणि नंतर आय एफ एस साठी सुद्धा आरक्षण मिळाले हे तुम्हाला मान्य आहे म्हणा कि.
जिचे वडील आय ए एस अधिकारी आहेत ती मागासलेली कशी?
बरं मी असा अजिबात म्हणत नाही कि ती सीट खुली करा ती सीट मागासवर्गीयालाच द्या म्हणजे त्याच वर्गातील जो उमेदवार खरंच पीडित आहे त्याचा अंत्योदय होईल.
मी जो दांभिकपणा म्हणतो तो हाच आहे. आता आम्ही सगळ्या सोयी घेऊन सरकारी जावई झालो तरी आमच्याच मुलाबाळांना आरक्षण उपलब्ध झालेच पाहिजे मग आमच्याच जातीतील खितपत पडलेले लोक खड्यात गेले तरी चालतील.
मुखवटे काढले कि आतले खरे रूप बाहेर पडते ते असे.

सुबोध खरे's picture

15 Jan 2018 - 1:27 pm | सुबोध खरे

जाता जाता -- क्रिमी लेयर फक्त इतर मागासवर्गीयांना आहे. (OBC) मागासवर्गीय (BC) ना नाही. तो सुद्धा ८ लाखापॆक्षा जास्त उत्पन्न असेल तर म्हणजेच महिना फक्त ६६ हजार म्हणजे फारच गरीब

पगला गजोधर's picture

15 Jan 2018 - 1:47 pm | पगला गजोधर

"सामाजिक मागासलेपणासाठी देण्यात येणारे आरक्षण" व "अर्थउत्पन्न आधारित क्रिमीलेयर" याचा काही संबंध नाही.

व बी सी साठी असणारी क्रिमी लेयर ची अट तर अनाकलनीय आहे. व ती तात्काळ रद्द व्हावी.

टंकनचुक झाली,

obc असेच म्हणायचे होते मला..

सुबोध खरे's picture

15 Jan 2018 - 3:39 pm | सुबोध खरे

मग या खोब्रागडे ताई ना आरक्षण सामाजिक मागासलेपणासाठी दिलं होतं की कशासाठी?
एक सोडून तीन वेळेस-- MBBS MD &IFS.
बाकी त्यांनी आपल्या जातीच्याच एका लायक उमेदवार डॉक्टरला नेत्रतज्ञ होण्यापासून वंचित केलं याबद्दल काय म्हणणं आहे?
म्हणजे प्रवेश तर घेतला आणि मध्येच सोडून विदेश सेवेत गेल्या आणि जागा फुकट गेली.
वा रे सामाजिक मागासलेपण?
नीच स्वार्थीपणा आणि दांभिकपणा आहे

सरसकट सगळ्या जातींना क्रिमी लेयर लावा म्हणताना आढळत नाही. >> हे मला मान्य आहे. पण सरसकट म्हणजे सरसकटच ie ओपन/खुल्या गटालापण क्रिमी लेयर हवी

===
मी माबोवर एक पर्याय सुचवला होता:

• सगळ्यात आधी लिंग आधारित वाटा करा (स्त्रीयाना ५० आणि पुरुषांना ५०%), मग जात आधारित (ज्याची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे) आणि मग त्यात परत आर्थिकवर्गानुसार वाटे करा ( ५ लाखपेक्षा कमी उत्पन्न असेलतर ५० आणि त्यापेक्षा जास्त असेलतर ५०%).
• याखेरीज प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत. ह्या खाजगीपणाची किंमत म्हणून सरकारने त्यांच्याकडून दरवर्षी ठराविक रक्कम घ्यावी आणि त्या पैशातून केवळ दलितसाठी शाळा कॉलेज काढाव्यात.

===
हा शुद्ध दांभिकपणा मी गेली काही वर्षे इथल्या पुरोगामी किंवा तत्सम लोकांमध्ये पाहतो आहे.
वाममार्गी लोकांना देश हि संकल्पनाच मान्य नाही त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल बोलायची गरजच नाही. >> इथे नक्की कोणकोण पुरोगामी, वाममार्गी वगैरे आहे याची यादी कुठे मिळेल का? मलातर एकही दिसत नाही :-P

सुबोध खरे's picture

16 Jan 2018 - 11:35 am | सुबोध खरे

आपल्याला क्रिमी लेयरची संकल्पनाच समजलेली नाही आणि आपल्याला समानतेचीही संकल्पना समजलेली नाही.
क्रिमी लेयर म्हणजे ज्यांना पगार ६६६६६/- रुपये महिना मिळतो अशा लोकांना मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या सवलती मिळणार नाहीत. याचा अर्थ असा नव्हे कि त्यांना खुल्या वर्गात प्रवेश घेता येणार नाही.
खुल्या वर्गाला क्रिमी लेयर लावायचा म्हणजे काय करायचं?
सगळ्यात आधी लिंग आधारित वाटा करा (स्त्रीयाना ५० आणि पुरुषांना ५०%)
बाकी मुंबईच्या लोकल मध्ये महिलांना ६ डबे आणि पुरुषांना ६ डबे द्यायचे का?
मग जर ४८ लाख पुरुष प्रवास करतात आणि १२ लाख महिला तर आपले हे "आरक्षण" मूर्खपणाचे आहेत एवढेच मी सांगू इच्छितो. या १२ लाख स्त्रियांना पुरुषांच्या डब्यात प्रवास करण्याची मुभा आहे शिवाय लेडीज स्पेशल गाड्या चालवतात.
उद्या तुम्ही असेही म्हणाल कि आहे त्या पुरुषांना राजीनामा द्यायला लावा आणि त्यांच्या जागास्त्रीयानी भराव्या
मग जात आधारित (ज्याची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे) आणि मग त्यात परत आर्थिकवर्गानुसार वाटे करा ( ५ लाखपेक्षा कमी उत्पन्न असेलतर ५० आणि त्यापेक्षा जास्त असेलतर ५०%).
• याखेरीज प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत. ह्या खाजगीपणाची किंमत म्हणून सरकारने त्यांच्याकडून दरवर्षी ठराविक रक्कम घ्यावी आणि त्या पैशातून केवळ दलितसाठी शाळा कॉलेज काढाव्यात

हे म्हणणारे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या मूलभूत विचाराच्या विरुद्ध असून सर्व जाती धर्मात भारत विभागून तुकडे करणाऱ्या "भारत तेरे टूकडे हो" वाल्यांची विचारसरणी दिसत आहे.
आपल्या भंपक विचारसरणी बद्दल आपल्याला कोपरापासून नमस्कार.

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 12:32 pm | पगला गजोधर

क्रिमी लेअरची कन्सेप्ट लोकांना समजावून सांगण्याआधी ,
घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट जाणून घेण्याची तसदी घ्या.

आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा संबंध लावणे, उचित नाही.
या दोन भिन्न बाबी आहेत. जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे.

नरसिंहा राव सरकारने आर्थिक दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला पण
न्यायालयाने, आर्थिक सद्य स्थितीवर दिलेले आरक्षण हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला.

सुबोध खरे's picture

16 Jan 2018 - 12:43 pm | सुबोध खरे

आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा संबंध लावणे, उचित नाही.
वड्याचा तेल वांग्यावर काढू नका
आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्यायचे मी अजिबात म्हणत नाहीये.
मागासवर्गीयातीलच मलाई खाणाऱ्या सरकारी जावयांना आरक्षणातून वगळून मागास्वर्गीयातीलच खऱ्या पददलितांना न्याय द्यायचं म्हणतोय मी .
बाकी आपल्याही विचारसरणीतील "दांभिक"पणा "तरंगून वर" आलेला स्पष्ट दिसतोय

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 1:36 pm | पगला गजोधर

मागासवर्गीयातीलच मलाई खाणाऱ्या सरकारी जावयांना आरक्षणातून वगळून मागास्वर्गीयातीलच खऱ्या पददलितांना न्याय द्यायचं म्हणतोय मी .

And do you propose to measure
"मलई खाणे" ? What is the basis to identify "खरे पददलित" ?

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 1:38 pm | पगला गजोधर

टंकन दुरुस्ती

1. And how do you propose to measure
"मलई खाणे" ?

2. What is the basis to identify "खरे पददलित" ?

मलई खाणे वैगेरे म्हणणे चूक आहे. पण पददलित खालील पैकी सर्व अटी पूर्ण करत असावा.
१. तो लिस्ट केलेल्या जाती नि उपजातीचाच असावा.
२. तो ग्रामीण वा वनवासी असावा. (आरक्षणामुळे वा बिना आरक्षण शहरी क्षेत्रात गेलेल्या लोकांना आरक्षण देऊ नये.)
३. त्याकडे दरडोई क्ष हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावे. (जमीनीचे मूल्य, उपजाउता आणि सध्या लागत करून असलेली उपजाऊता यांचे नियम लिहायला लागतील.)
४. त्याचे कोणत्याही साधनाने य प्रति वर्ष पेक्षा जास्त उत्पन्न नसावे.
५. त्याचे कोणतेही एक पालक क्लास १ वा क्लास २ अधिकारी नसावेत.
६. त्याची एकूण नेटवर्थ झ पेक्षा जास्त नसावी.
७. कोणतेही पालक विदेशात शिकलेले वा डॉक्टरेट नसावेत.
======================
याला खूप इलॅबोरेट करावं लागेल. बरेच उपनियम इ करावे लागतील. पण सर्वसाधारण पणे इतकं पुरेसं आहे. व्यक्तिगत नि कौटुंबिक स्तरावर कोणते किकष मोजायचे हे ठरवायला हवं.

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 4:29 pm | पगला गजोधर

मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, म्हणूनच मी वर लिहिलंय , पण परत एकदा देतो

"आरक्षण" व "आर्थिक -उत्पन्न" याचा संबंध लावणे, उचित नाही. कारण या दोन भिन्न बाबी आहेत.
घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे.

नरसिंहा राव सरकारने "आर्थिक" दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला, पण
सर्वोच्च न्यायालयाने, "आर्थिक स्थितीवर" बेतलेले आरक्षण, हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला.

३. त्याकडे दरडोई क्ष हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावे. (जमीनीचे मूल्य, उपजाउता आणि सध्या लागत करून असलेली उपजाऊता यांचे नियम लिहायला लागतील.)
४. त्याचे कोणत्याही साधनाने य प्रति वर्ष पेक्षा जास्त उत्पन्न नसावे.
५. त्याचे कोणतेही एक पालक क्लास १ वा क्लास २ अधिकारी नसावेत.
६. त्याची एकूण नेटवर्थ झ पेक्षा जास्त नसावी.
७. कोणतेही पालक विदेशात शिकलेले वा डॉक्टरेट नसावेत.

या मुद्द्यांचा व "सामाजिक मागासलेलेपणाचा: (सोशली बॅकवर्डपणा) काय संबंध आहे ?
सामाजिक मागासलेलेपणा या पॅरामीटरवर मोजत नाही.

घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे.

हेच आणि हेच आहेत आणि अन्य काही असूच शकत नाहीत?
असं कुटं लिवलंय?
===========================
मग ते आर्मिवाले आणि अपंग लोक एका विशिष्ट जात/धर्म नि लिंगाचेच असतात का?
======================
घटना बदलायची गोष्ट आहे ना?
==========================
आरक्षणाच्या फॉर्मॅटचे अनिष्ट परिणाम आहे तरी तोच फॉर्मॅट कवटाळणार का?
=====================
सामाजिक मागासलेपणा कसा मोजतात म्हणे? त्याचे पॅरामिटर काय? संबंध लावायची तुमची पद्धत शिकून घ्यावी म्हणतो.
उदा. स्त्रीलिंग असले कि मागासले पणा सिद्ध होतो बाकी काय बगायची गरज नाही असं असतं का? "फक्त" याच आधारावर पाटलाची बायको पुरुष तीनचाकी मानवी रिक्षावाल्यापेक्षा मागास?

arunjoshi123's picture

16 Jan 2018 - 5:40 pm | arunjoshi123

पगले, असल में तुझे इस प्रतिसाद पर उपप्रतिसाद देना है।
===================
(ऑफेंन्स वाटल्यास क्षमस्व, पण तुमचा आयडी बघून असली वाक्यं सुचतात.)

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 6:10 pm | पगला गजोधर

आणि हो अजून एक पुरवणी माझ्याकडून वर राहून गेली.
- "आरक्षण" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य शब्द "प्रतिनिधीत्व" आहे.
- "वरची / खालची जात" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य टर्मिनॉलॉजी "पुढारलेल्या / मागासलेल्या जाती" अशी आहे.

स्त्रियांच्या प्रतिनिधित्वास कारण की
"ढोल, पशु, शूद्र, नारी हैं ये सभी ताडन के अधिकारी " अशी अनेक शतकांची मेन्टयालीटी ...
.
स्त्रियांनाहि प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे (सर्व समाजातील स्त्रिया )
कोटा अंतर्गत कोटा मध्ये (समाजा स्त्रियांना ३३ % एकूण प्रतिनिधित्व असेल तर
उदा २७ % ऑफ ३३ % ओ बी सी स्त्रियांना, या प्रमाणे विभागणी असावी, स्त्रियांच्या कोट्यातील मागास वर्गाच्या स्त्रियांच्या जागा भरल्या तर
उरलेल्या जागी सक्षम स्त्रिया मग त्या ब्राम्हण किंवा पुढारलेल्या जातीतील असतील तरिसुद्धा , भरून काढाव्यात )

स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळाले तर
स्त्रीभ्रूण हत्या वैगरे कमी होतील असा आशावाद माझ्यासारख्याला आहे .....

कोटा अंतर्गत कोटा मध्ये (समाजा स्त्रियांना ३३ % एकूण प्रतिनिधित्व असेल तर उदा २७ % ऑफ ३३ % ओ बी सी स्त्रियांना, या प्रमाणे विभागणी असावी >> असंच आहे सध्या.

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 6:17 pm | पगला गजोधर

आणि हो "स्त्री" ही "स्त्री" आहे, म्हणुन सामाजिकदृष्ट्या मागास आहे, आणी म्हणून तिला प्रतिनिधीत्व मिळावे. ...
उगाच काही लोकं , "त्यांचा बँक बॅलन्स बघा , आम्ही तर आमचा सर्व पगार त्यांच्या ताब्यात देतो, मग प्रतिनिधीत्वाची गरज काय ?" अश्या कोमेंटी पास करतील व पुढे जाऊन , झाशीची राणी इंदिरा गांधी अशी उदाहरणे देऊन एक्सेप्शनला जनरलाईज करतील आपल्या विरोधासाठी .

आणि हो "स्त्री" ही "स्त्री" आहे, म्हणुन सामाजिकदृष्ट्या मागास आहे, आणी म्हणून तिला प्रतिनिधीत्व मिळावे. ...

त्या ताडन के अधिकारी मधे ढोर का पशू पण आहे ना? त्यानं काय घोडं मारलंय?
======================================================
स्त्री ही स्त्री आहे इतकाच निकष असला आणि अन्य काहीच भेद करायचा नसेल तर एकतर ३.५ बिलियन किंवा शून्य इतक्या नोकर्‍या/अ‍ॅडमिशनं इ इ द्यायला लागतील.
=======================
त्यांच्यात एक थोर झाला म्हणून आरक्षण काढू नये असं तुम्ही लिहित आहात. पण एक थोर झाल्यावर आरक्षण काढा असा मुद्दा मी मांडलाय का?
==============
बाकी तुम्ही सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित होतं. असो.

arunjoshi123's picture

16 Jan 2018 - 4:52 pm | arunjoshi123

बाय द वे,
१. आरक्षणाचे निकष जातीपासून दूर नेण्यात ते उच्च जातींनी पुढे हॅ़क करण्याचा धोका आहे हे मान्य.
२. पण तुमचा प्रतिसाद अत्यंत क्रूर आहे. मी दुर्दैवी हा शब्द देखील टाळत आहे. तो बुद्ध्या क्रूर नाही, नकळत आहे, पण आहे.

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 5:28 pm | पगला गजोधर

आणि हो अजून एक पुरवणी माझ्याकडून वर राहून गेली.
- "आरक्षण" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य शब्द "प्रतिनिधीत्व" आहे.
- "वरची / खालची जात" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य टर्मिनॉलॉजी "पुढारलेल्या / मागासलेल्या जाती" अशी आहे.

सुबोध खरे's picture

16 Jan 2018 - 6:25 pm | सुबोध खरे

गजोधर बुवा
एक तर तुम्ही वेड पांघरून पेडगावला जात आहेत
किंवा
मोगा सारखी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करायला शिकला आहात
(अजोंच्या मेगाबायटी प्रतिसादामुळे उगाच या वादाला फाटे फुटत आहेत जे फुटले नसते तर बरे झाले असते)

1. And how do you propose to measure
"मलई खाणे" ?

2. What is the basis to identify "खरे पददलित" ?

क्रीम चा शुद्ध मराठीत अर्थ मलई असाच होतो.
शब्दशः अर्थ न घेताही ज्यांनी आरक्षणात सरकारी नोकऱ्या आणि बढत्या मिळवल्या आहेत आणि ज्यांना ६६,६६६/- रुपये महिना पेक्षा जास्त पगार मिळतो आहे अशा म्हणजेच सरकारी नोकरीत प्रथम आणि द्वितीय श्रेणी (क्लास वन आणि क्लास टू) मध्ये आहेत अशा मागासवर्गीयांच्या मुलांना आरक्षणातून वगळून तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा समकक्ष मागासवर्गीयांच्या मुलांनाच आरक्षण मिळाले पाहिजे.
आय ए एस अधिकाऱ्याला सातव्या वेतन आयोगांनंतर पगार अडीच लाख रुपये महिना (वर्षाचा नव्हे) मिळतो आणि इतर सोयी सवलती वेगळ्याच. ( म्हणजे २००० रुपये घरभाड्यात बंगला मिळतो. स्वीय सहाय्यक आणि वैयक्तिक नोकर सरकारी वाहन इ. ( मी वरकड/ अनैतिक उत्पन्नाबद्दल तर बोलतच नाही.)
अशा लोकांना सुद्धा स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी स्वतःच्याच जातिबांधवांच्या डोक्यावर उभे राहू नये असे वाटत नाही.
आरक्षणाने आमचे कोटकल्याण झाले आता आमच्याच मुलाबाळांचे पण होवो मग आमचे इतर ज्ञातिबांधव गावाबाहेर झोपडीत राहिले तरी चालतील या वृत्तीचे हे सरकारी जावई झालेले आहेत. बाकी दलितांवर अत्याचार, मनुवाद्यांचे सरकार इ घोषणा आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी उत्तम आहेत.हि वृत्ती आहे.
या सर्व गोष्टींमध्ये मी घटनेत असलेली कोणतीही गोष्ट बदलण्याचे सुचवत नाही हे हि लक्षात घ्या. केवळ आपले ज्ञात उत्पन्न हाच एकमेव निकष आहे.
यात हा अधिकारी २५ व्य वर्षी आय ए एस झाला आणि लगेच त्याला मूल झाले हे गृहीत धरून १८ वर्षे नोकरी होऊन हा अधिकारी सह आयुक्त(जॉईंट कमिशनर) पदाला पोहोचला हे गृहीत आहे.
इतके असूनही आपल्याला क्रिमी लेयर लावावा वाटत नाही हा एकतर स्वार्थीपणाचा किंवा दांभिकपणाचा कळस आहे. बाकी मनुवादी वगैरे शिव्या देणे पुरोगामीपणाचे लक्षण असेल पुरोगामी म्हणून दिखाऊ पणा पुष्कळ झाला.
डॉ देवयानी खोब्रागडे यांचा आदर्श मध्ये पण फ्लॅट आहे ( ओशिवऱ्या ला एक फ्लॅट आहे हे श्री उत्तम खोब्रागडे याना माहीतच नव्हते असा त्यांनी दावा केला आहे). आदर्शमध्ये फ्लॅट हा कारगिल युद्धात विधवा झालेल्या स्त्रियांसाठी म्हणून मंजूर झाला होता. माउंट कार्मेलसारख्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले आहे.
त्यांचे पती अमेरिकन नागरिक आहेत.
त्यांना आपल्या मोलकरणीला किमान वेतन न दिल्याबद्दल अमेरिकेत अटक झाली आणि त्यांनी आपल्या राजनैतिक इम्यूनिटीमुळे सरकारने आपल्याला या खटल्यातून बाहेर काढावे अशी विनंती केली होती. हे सामाजिक मागासलेपण नसून मानसिक मागासलेपण आहे
या सर्व सामाजिक मागासलेपणामुले आपण "त्यांच्या" मुलांना सुद्धा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी शिफारस करीत आहात हा तुमच्या दांभिकपणाचा कळस झाला.
आपले खरे रूप उघडे पडले. असो.
यापुढे आपल्याशी कोणताही प्रतिवाद करण्याची इच्छा नाही.
इति लेखनसीमा

पगला गजोधर's picture

16 Jan 2018 - 7:19 pm | पगला गजोधर

मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, म्हणूनच मी वर लिहिलंय , पण परत एकदा देतो

"आरक्षण" व "आर्थिक -उत्पन्न" याचा संबंध लावणे, उचित नाही. कारण या दोन भिन्न बाबी आहेत.
घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे.

नरसिंहा राव सरकारने "आर्थिक" दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला, पण
सर्वोच्च न्यायालयाने, "आर्थिक स्थितीवर" बेतलेले आरक्षण, हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला.

तुम्ही मांडलेल्या मलई-मुद्द्यांचा व "सामाजिक मागासलेलेपणाचा: (सोशली बॅकवर्डपणा) काय संबंध आहे ?
सामाजिक मागासलेलेपणा या पॅरामीटरवर मोजत नाही.
असो त्यामुळे कोणी कीतीही कांगावा करत, त्यांचा तिळपापड झाला तरी सद्यस्थिती बदलत नाही, त्रागा करून घेण्याचा फायदा काहीच नसतो.

सुबोध खरे's picture

17 Jan 2018 - 9:40 am | सुबोध खरे

आपले खरे रूप उघडे पडले.

पगला गजोधर's picture

17 Jan 2018 - 9:55 am | पगला गजोधर

फक्त नावापुरता खरेपणा आम्ही ठेवत नाही.

सुबोध खरे's picture

17 Jan 2018 - 9:56 am | सुबोध खरे

ब्वॉर्र

समता आंदोलन समिती या अनुसूचित जाती आणि जमातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समितीने इतर नऊ मागासवर्गीयांबरोबर अनुसूचित जाती आणि जमातींना पण क्रिमी लेयर लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हिताची याचिका (PIL) दाखल केली आहे.
त्यावर मलई खाणाऱ्यांचे(आपल्याच जातिबांधवांना वंचित ठेवून आपल्या पोळीवर तूप ओढणार्यांचे) काय म्हणणे आहे?
http://www.livemint.com/Politics/yWnkJBYApSTkPygM4Zc98J/SC-to-hear-plea-...
http://www.livelaw.in/sc-seeks-centres-view-plea-exclude-creamy-layer-am...

घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट जाणून घेण्याची तसदी घ्या.
ही गंडवा गंडवी आहे. घटनेत आरक्षण दलित आणि आदिवासीयांच्यासाठीच होतं. ओबीसी आरक्षणापासून आरक्षणाचं राजकारण सुरू झालं. ओबीसी आरक्षण घटनेत नाही. आणि क्रीमी लेयरचा नियम फक्त ओबीसी आरक्षणासाठी आहे. माझ्यामते ओबीसी आरक्षण हे केवळ राजकीय फायद्यासाठी आणलं गेलं आणि मेन प्राब्लेम तो आहे.

मी बऱ्याचदा तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत असते पण नेहमी दंडवत आणि नमस्कार वगैरे वाचून कंटाळा आला... असो.

sagarpdy's picture

16 Jan 2018 - 11:46 am | sagarpdy

ओपन/खुल्या गटालापण क्रिमी लेयर हवी

हे थोडं समजावून सांगा

===

अजून थोडं
- अप्रेजल सिस्टीम बंद करा / जातीनिहाय अप्रेजल ठेवा. [थोडक्यात फक्त आपल्या जाती+लिंग यात स्पर्धा ठेवा, क्रॉस स्पर्धा करायची गरज नाही : वासरात लंगडी गाय...]

प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत

उत्तम उपाय. म्हणजे ग्राउंड लेव्हल ला वेगवेगळ्या जातीधर्माच्या मुलांना एकमेकांशी संबंधच येऊ द्यायचा नाही. हल्ली अस्मितांच्या कारणांवर मुलामुलांत भांडणे होऊ लागलीत. त्यावर बेस्ट उपाय.

--
गांधीजींचा स्वतंत्र मतदारसंघाना विरोध का होता ते जरा वाचून घ्या

मी तुम्हाला RTE धाग्यांवर बघितलंय का कधी आठवायचा प्रयत्न करतेय :O

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2018 - 2:41 pm | पिलीयन रायडर

तुमचा पर्याय बराच गंडलेला आहे.
--–-----------------------
लेखाबद्दल,

लेख तळमळीने लिहिला आहे पण जानवे वगैरे आणून सगळी माती केली. तरी हेतू प्रामाणिक वाटला म्हणून पुढे वाचत गेले तर प्रतिसदातला आक्रस्ताळेपणा लेखाशी बराच विसंगत वाटला. तुम्ही जय भीम वाले म्हणून दलितांना टोचून बोलू नका म्हणताना आपण सुद्धा इतर जातींचा अकारण अपमान करतोय हे लक्षात आले नसेल असे वाटत नाही. मग मी ते विशिष्ट हेतू ने केले वगैरे ला अर्थ नाही. दुसऱ्याने केलेली चूक दाखवताना तुम्हाला तीच चूक करण्याची परवानगी मिळत नसते.

कोरेगाव भीमाला नक्की काय झालं ह्याबद्दल माझ्या तरी मनात बराच संभ्रम आहे. माझ्यामते तरी हेतू राजकीय होते म्हणून दंगल घडवून आणली. सामान्य लोकांमध्ये काही असंतोष खदखदत होता आणि म्हणून हे घडले असे मला वाटत नाही. ही मुद्दाम लावून दिलेली भांडणं आहेत.

ह्यात ब्राह्मण कसे ओढले गेले ते सुद्धा कळलं नाही. पेशव्यांना हरवलं,पेशवाई संपवली वगैरे तर आधी सुद्धा बोलल्या गेलं आहे. मी स्वतः 2 वर्षापूर्वी 1 जानेवारीला हे पाहिलं आहे. मग ब्राह्मण आज दगडफेक का करतील? जर त्यांनी केलीच नसेल तर ह्या वादात ब्राह्मण आले कसे? वगैरे प्रश्नामुळे मी कोणत्याही चर्चेत सहभाग घेतला नाही. मिपावर 100 लोकांनी 100 चूक बरोबर, चांगल्या वाईट गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचा मी निषेध वगैरे केला नाही. मुदलात ते सगळं मी वाचलच नाही. पण तरीही मला ह्या धाग्यावर मला हवं ते मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. "जाओ पहले उस आदमीसे..." टाईप प्रकाराला फाट्यावर मारण्यात येईल.

प्रत्येकाला जातीचा माज नसला तरी ममत्व असतेच. दलितांना वाईट वाटतं तसं ब्राह्मणांना सुद्धा वाटतं. मला माझ्या पूर्वजनीं केलेल्या भेदभावाबद्दल लाज वाटते. पण म्हणून कुणीही यावं आणि समस्त ब्राह्मणांना बोल लावावे आणि स्वतः च moral high ground घ्यावं हे जमणार नाही. जसे सगळे दलित हे आजमितीला मागासलेले नाहीत तसंच सगळे ब्राह्मण जातीयवादी मनुवादी वगैरे नाहीत. आणि हे नेमकं कसं ते सिद्ध करत बसणार नाही. दहा उदाहरणं तोंडावर मारता येतील पण कुणाच्या सर्टिफिकेटची गरजच नाहीये.

ब्राह्मणांच्या चालीरीती, बोलणे, खाणे पिणे ह्याची खिल्ली उडवताना आणी त्यांच्या बायकांविषयी काहीही लिहिले जात असताना लोक निषेध करायला आले होते का? बघावे लागेल.

बादवे, चाली रितीवरून आठवलं, आपल्या जातीच्या सवयी असणं ही काही गिल्ट घ्यायची गोष्ट नाही. घेणारही नाही.

लोक बाबासाहेब ह्यांचे नावही घ्यायला टाळतात असे कुठेतरी वाचले. कमाल वाटली. आम्ही घेतो बुवा. पण ह्याच चालीवर अस्पृश्यते विरुद्ध काम करणारे सावरकर काय दलितांना प्रत:स्मरणीय आहेत का? असे विचारावे वाटते.साध्या कायप्पा वरच्या मेसेज मध्ये रामदास, ज्ञानेश्वर, टिळक, आगरकर, सावरकर वगैरे नावं टाळलेली पहिली आहेत.

जात सगळेच मानतात. झोडपायला ब्राह्मण दिसतात फक्त. ह्या बाबतीत समस्त भारतीय मूर्ख आहेत हेच सत्य आहे. कुणीच कुणाकडे बोट दाखवू नये.

गेले 15 दिवस विषय पेटता ठेवेल असा धागा काढल्याबद्दल अभिनंदन. सध्याच्या वातावरणात हेच हवं होतं. तुम्ही जयभीम वाले आणि आम्ही जानव्यावाले. कुणाला काही विसरू देऊ नका. ( केवळ लेख वाचून हे बोलले नसते, प्रतिसादात जबरदस्त निराशा झाली)

लेखिकेच्या प्रतिसादांचे उद्देश ब्राह्मणांना झाडणे होते असं वाटलं नाही. जानव्याचा वा तत्सम उल्लेख आला मंजे फार डिफेंसिव व्हायची गरज नाही. आणि कायप्पावाले वा संकुचित दलित ब्राह्मणांशी कसे वाईट वागतात त्याचे लेखिकेने समर्थन केलेले नाही. तिचा काय संबंध? लेखिकेचा सिमित उद्देश झालेला उत्सव योग्य आहे नि त्यावर सर्व प्रकारची टिका होत आहे ती अयोग्य आहे असं म्हणणं आहे. उत्सवाच्या औचित्याबद्दल फारच कमी चर्चा होत आहे, तुमच्या प्रतिसादात देखील विरोध वा समर्थन वा मत काही नाही.
================
लेखिका वा उत्सवसमर्थक गँग चांगले स्पष्टीकरण देण्यात फोल ठरली आहे. वारंवार नि अनेक प्रकारे विचारून. केवळ विरोध करणारांचे विरोधाचे प्रकार नि पद्धती कशा चूक आहेत हेच तिने सांगीतले आहे. पण तरी वरची तुमची सगळी टिका नि तिचा संबंध काय? मंजे ४-५% असेल, पण तो मुद्दा नाही.
===================
अर्थात परंपरेनुसार आपण हा प्रतिसाद वाचणार नाही आहात, पण दुसरं कोणी हा आशय कॉपी पेस्ट करू शकतं.