नक्षीची दुसरी बाजू.
महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात. खरंतर दोन्हीकडचा विचार व्हायची गरज आहे.
त्यानिमित्ताने, नक्षीची दुसरी.....फारशी न दिसणारी बाजू मांडायचा छोटासा प्रयत्न!!
आज फार दिवसांनी नीट पाहिला आरसा
होता तिशीतच तरी दिसे थोराड जरासा
आठ्या आल्या भाळावरी अन खुंट वाढलेले
काया रापली जराशी, जरा गाल आत गेले
मागे माघारीण उभी, होती उगा त्रासलेली
प्रेयसीच की पूर्वीची आता जरा सुटलेली
एक शाळेला गेलेले, एक घेई कडेवरी
हाती कामांची घे यादी, झाली कावरीबावरी
संपे भांड्यांचा रगाडा फोटोफ्रेम पुसू लागे
गप्पा सप्ताहभराच्या सांगे, फिरे मागे मागे
फ्रेम पाहुनिया एक जरा मनी थबकला
होता तोच की पूर्वीचा, आता पार हरवला
उभा संसार ओढता कसे नाकी नऊ आले
जरा स्थिर होतो तोच तीन दोनाचे की झाले
भूतकाळ आठवूनि खिन्न हसला मनाशी
घाव लपवून सारे, रेखे संसाराची नक्षी
प्रतिक्रिया
18 Mar 2015 - 11:09 am | सौंदाळा
अप्रतिम सुडराव
कविता भावली
तुझे प्रतिसाद आणि कविता पाहिल्या की तुझी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असे वाटते ;)
18 Mar 2015 - 12:04 pm | स्पा
येप, येईच बोलता हे
बाकी आता अनाहीतांचा मारा झेलायला तयार रहा
18 Mar 2015 - 5:21 pm | बॅटमॅन
दोन्हींशी सहमत.
19 Mar 2015 - 9:54 am | लॉरी टांगटूंगकर
मी पण सहमत.
18 Mar 2015 - 11:10 am | सस्नेह
तिशीतच एवढा घाईला आला ?
बाकी, 'नक्षी' मधे दिलेलाच प्रतिसाद इथेही द्यावासा वाटतो..चित्रण निगेटिव्ह वाटते आहे.
18 Mar 2015 - 11:20 am | स्पंदना
नक्षी मधला पुरुषसुद्धा दमलेला, अनिच्छेने उठणारा दाखवला आहे.
बाकी विषय अन कविता, दोन्ही आवडले.
18 Mar 2015 - 11:37 am | पैसा
कविता आवडली. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. पण एक सांगू का, नक्षी ही फक्त संसार ओढून दमलेल्या बाईची कथा नाही. वय वाढत गेलं तरी प्रत्येकाच्या मनात एक जगाकडे कुतुहलाने, आनंदाने बघणारं १६ वर्षांचं कुणीतरी लपलेलं असतं. कधीतरी आपल्याला त्याची जाणीव होते, कधीतरी आपण पुन्हा एकदा त्या वयात शिरून आजूबाजूचं जग बघायला लागतो. कधीतरी तेव्हा खरं काय आणि मनाने चितारलेली नक्षी कोणती कळेनासं होतं. हे सगळं 'नक्षी'मधे आहे. नक्षी ही प्रत्येकाचीच प्रातिनिधिक कथा म्हणता येईल.
18 Mar 2015 - 1:12 pm | प्यारे१
+१
कथा ....सापेक्ष वाचली नाही तर समजतं.
बाकी पुरुष दिनाला कुणी तरी 'नक्षा' अशी 'अशीच' कथा लिहू शकेल. ;)
18 Mar 2015 - 6:29 pm | पिलीयन रायडर
हेच्च..
नक्षी ही संसाराच्या रगाड्यामागे हरवुन गेलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे..
इनिच्या कथेतही स्त्री विरुद्ध पुरुष असा रोख नव्हताच.. एकाच माणसाच्या दोन रुपांबद्दल तिने लिहीलय..
ह्यात उगाच अनाहिता विरुद्ध इतर असा सुर कशाला...
18 Mar 2015 - 6:41 pm | सूड
एक मिनीट!! ह्यात कुठेही अनाहिता विरुद्ध इतर मांडण्याचा प्रयत्न नाहीये. एकूणच आपल्याकडे लग्नानंतर बाईला कसा सर्व त्याग करावा लागतो, तीच कसं सगळं सोडून येते असा जो काही सूर दिसतो त्यावर लिहीण्याचा छोटासा प्रयत्न आहे, आता हे सुचताना नक्षी निमित्तमात्र झाली हेही खरं.
वर पैसातैंनी म्हटल्याप्रमाणे कथा पुन्हा वाचली. माझा दृष्टिकोन चुकलाही असेल तो आधी लेख वाचताना!! आक्षेपार्ह वाटत असेल तर नक्षीची लिंक कृपया संपादक मंडळाने काढून टाकावी. मला नक्षी वाचल्यानंतर जे काही सुचलं ते उतरवलंय, माझंच बरोबर आहे हे मांडण्याचा अजिबात अट्टाहास नाही. आणि अनाहिता विरुद्ध इतर असं तर नाहीच नाही!!
इति लेखनसीमा
18 Mar 2015 - 7:07 pm | पिलीयन रायडर
अहो तुम्हाला नाही हो..
इथे लोक उगाच अनाहिता वर घसरत आहेत त्याबद्दल बोलतेय मी..
तुमची कविता चांगलीच आहे..
18 Mar 2015 - 7:58 pm | पैसा
चूक बरोबर असं काही नाही. एका कलाकृतीचे खूप वेगवेगळे अर्थ, कोपरे प्रत्येकाला दिसू शकतात. किंबहुना असे सर्वस्वी वेगळे विचार ज्या कलाकृतीमुळे वाचणार्यांना अनुभवाला येतील ती यशस्वी कलाकृती म्हटली पाहिजे. तू लावलास तो अर्थही चुकीचा नाहीच. संसाराचा गाडा ओढून थकलेले स्त्री आणि पुरुष या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त मी कथेतल्या 'नेली'कडे एक माणूस म्हणून पाहिले, आणि हा अनुभव कोणालाही येऊ शकतो असं मला वाटलं तर तुला नेली ही स्त्री आहे ही गोष्ट पटकन लक्षात आली. त्यात वाईट काही नाही. स्त्रियांच्या प्रश्नावर तुझं अतिशय संवेदनाशील लिखाण पूर्वी वाचलेलं आहे. त्यामुळे तुझ्या लिखाणाबद्दल कोणतेही गैरसमज नाहीत.
हे सगळं तिथे प्रतिक्रिया देतानाही मी उतरवू शकले नव्हते, मात्र तीच कथा वाचून तुला एवढी सुरेख कविता सुचली, याबद्दल कौतुकच वाटलं!
18 Mar 2015 - 6:43 pm | आनन्दिता
मलातरी कवीला "अनाहिताविरोध" अभिप्रेत आहे असं दिसत नाहीये, उलट या कवितेने पुरुषांच्या नजरेतुन 'नक्षी' अगदी व्यवस्थित मांडली आहे. ही पण एक बाजु नक्कीच असणार आहे.
पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत.
18 Mar 2015 - 7:09 pm | पिलीयन रायडर
.
ह्याच्याच बद्दल बोलतेय.. लेखकाबद्दल नाही..
18 Mar 2015 - 7:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत.
खरंय ! +D
18 Mar 2015 - 11:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी
वा वा सूडराव... संसाराचा शुन्य अनुभव असतांना सुद्धा इतकं सुंदर लिहू शकताय तुम्ही.
लिहीत जा नियमितपणे.
18 Mar 2015 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
मिकाशेठ,
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मधे वापरलेल्या उपमा आठवा, त्यांना पण संसाराचा काहीच अनुभव नव्हता.
(येथे सुडरावांची तुलना ज्ञानेश्वर माउलींशी करण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये याची समस्त वाचकांनी कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती)
पैजारबुवा,
18 Mar 2015 - 4:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हा हा हा :)
18 Mar 2015 - 12:10 pm | एक एकटा एकटाच
कविता आवडली
फार छान मांडलीय
18 Mar 2015 - 12:19 pm | आदूबाळ
या बात!
18 Mar 2015 - 4:25 pm | कवितानागेश
छान. :)
18 Mar 2015 - 5:16 pm | रेवती
कविता आवडली.
18 Mar 2015 - 5:21 pm | बॅटमॅन
हाण्ण तेजायला.
18 Mar 2015 - 5:35 pm | नगरीनिरंजन
कविता चांगली आहे.
18 Mar 2015 - 5:39 pm | वेल्लाभट
यात जिंकलंस मित्रा !
कड्डक!
एकांगी विचार होतो हे खरं आहेच बहुतांशी. दोनही बाजू बघायला हव्यात. ऑलवेज. असो वेगळा धागाच निघायचा खरा यावर. पण राहुदे.
कविता भनाट. फुल लाईक.
18 Mar 2015 - 7:25 pm | मितान
कविता आवडली.
19 Mar 2015 - 10:44 pm | स्वाती दिनेश
कविता आवडली.
स्वाती
18 Mar 2015 - 7:27 pm | मधुरा देशपांडे
कविता आवडली.
18 Mar 2015 - 8:12 pm | सुबोध खरे
केवळ सूड रावांची आहे म्हणून कविता वाचली. ( मला कविता कळत नाहीत आणि मी त्यांच्या वाटेसहि जात नाही) आणि मग नक्षी हि कथाही वाचली. दोन्ही तितक्याच आवडल्या. पण सूड रावांनी दुसरी बाजूपण तितकीच समर्थपणे मांडली आहे हे कौतुकाने नमूद करावेसे वाटते.
18 Mar 2015 - 8:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ह्याला कंपूबाजी म्हणावे कां डॉक? ;)
ह. घ्या. उगा थोडी गंमत केली.
19 Mar 2015 - 9:31 am | सुबोध खरे
सूड रावांकडे पहिले तर ते अशा संवेदनशील कविता करीत असावेत हे वाटत नाही. ते एखाद्या क्रांतिकारी संघटनेचे नेते असावेत असे वाटते. म्हणून त्यांची कविता वाचली. कंपूबाजी साठी कोणत्या कंपूत मला सामावून घेणार आहेत तेथे यायची माझी तयारी आहे.
19 Mar 2015 - 11:16 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हो खरय. ते क्रांती घडवून आणतील यावर माझा देखिल विश्वास आहे =))
19 Mar 2015 - 10:52 pm | खटपट्या
कोणती क्रांती ?? (रेडकरांची ?)
18 Mar 2015 - 8:13 pm | प्रीत-मोहर
कविता खूप आवडली सूड.
18 Mar 2015 - 8:22 pm | प्रसाद गोडबोले
छ्या: फारच शीरीयस !!
कविता आवडली पण टोन आवडला नाही ...
18 Mar 2015 - 8:49 pm | जेपी
जल्ला काय कल्ला नाय..
अवांतर -मुळ लेख वाचला आहे.
बहुतेक वशाडी आली
18 Mar 2015 - 11:54 pm | पॉइंट ब्लँक
एकदम क्वुल.
19 Mar 2015 - 1:47 am | खटपट्या
खूप छान कविथा !!मुळ लेख अजुन वाचला नाहीये.
19 Mar 2015 - 6:23 am | सांजसंध्या
संदर्भ दिला नसता तरी चालले असते. स्वतंत्र रित्या एक विचार म्हणून ही कविता आवडली.
20 Mar 2015 - 11:12 pm | प्रसाद गोडबोले
=))
19 Mar 2015 - 10:58 am | सविता००१
मस्त आहे कविता.
खूप आवडली
19 Mar 2015 - 11:05 am | पिशी अबोली
आवडली.
19 Mar 2015 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा
दुसर्या बाजुची नक्षी...हम्म्म्म, बरीच परिणामकारक झालीय.
19 Mar 2015 - 1:46 pm | मनीषा
नक्षी चांगली आहे .
नक्षी ही अनेक आकार आणि रंगांनी बनलेली असते.
त्या पैकी काही कमी जास्तं झाले, की अपूर्णता जाणवते.
19 Mar 2015 - 2:08 pm | इनिगोय
नक्षी या कथेला इतकी छान दाद दिल्याबद्दल आभार सूड.
वर उल्लेख आल्याप्रमाणे नेली स्त्री असणं आणि त्यामुळे तिचं आयुष्य असं होणं हे अभिप्रेत नाहीच. ती कोणत्याही व्यक्तीची गोष्ट असू शकतेय. आणि तुझ्या कवितेत तू ते नेमकं आणलंस.
फारच छान!
बाकी माझ्या या प्रतिसादात म्हटलं तसं बाई अाणि पुरुष यापलीकडे आपण सगळे माणूसही आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात राहिल तो सुदिन.
19 Mar 2015 - 8:29 pm | प्रसाद गोडबोले
त्या सुदिनी अनाहिताचे नामकरण "माणुस" असे करुयात काय ;)
माणुस दिन विशेषांक २११५ =))
19 Mar 2015 - 9:20 pm | आनन्दिता
ते अनाहिता च्या नावाबद्दल सोडा हो, पण लोकांची भिकार मानसिकता बदलायला अजुन १०० वर्ष तरी लागतील याची कबुली म्हणायची का ही??
19 Mar 2015 - 9:26 pm | स्रुजा
अगं हो, त्याचीच कबुली आहे. प्रामाणिकपणाचं कौतुक हो तुमच्या.
आणि अनाहिताचा अर्थ कसलाही डंख नसलेली, स्वछ्छ , नितळ. अनाहिता चं याहून चांगलं बारसं करायचं असेल तर निदान अर्थाला तरी चिकटून करा.
19 Mar 2015 - 9:52 pm | मितान
@ प्रगो,
अत्यंत हीन दर्जाचा प्रतिसाद !!!
यातून काय सिद्ध होतंय ते वेगळं सांगायला नको !
19 Mar 2015 - 9:55 pm | मधुरा देशपांडे
@ प्रगो, अत्यंत हीन दर्जाचा प्रतिसाद - अनुमोदन.
20 Mar 2015 - 9:07 am | प्रीत-मोहर
@ प्रगो, अत्यंत हीन दर्जाचा प्रतिसाद - अनुमोदन.
20 Mar 2015 - 11:03 am | सविता००१
@ प्रगो, अत्यंत हीन दर्जाचा प्रतिसाद - अनुमोदन.
20 Mar 2015 - 4:18 pm | गिरकी
काय झक्कास षटकार ठोकला आहेस गं :)
20 Mar 2015 - 12:43 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
एकाच पॅरामीटरने अख्खे एरर फंक्षन मिनिमाईझ केल्याबद्दल एक क्रॅमर-राव आणि एक अँडरसन-डार्लिंग देऊन प्रगोरावांचा सत्कार करण्यात येत आहे.
-सांख्यिकी आयोग कार्यकर्ते.
20 Mar 2015 - 1:57 pm | पिलीयन रायडर
का म्हणुन "माणुस" करुया? तुम्ही नीट वाचलेलं दिसत नाही..
आपण स्त्री आणि पुरुष आहोत हे "विसरुन" आपण माणुस आहोत हे लक्षात ठेवुया, असं म्हणालेली नाहीये इनि..
तुम्हाला अनाहिता बद्दल काही सांगितलं तर ते पूर्वग्रह बाजुला ठेवुन समजुन घेता येईल का ही शंकाच आहे. पण तरी काही गोष्टींना उत्तर देऊन ठेवणं आवशक असतं म्हणुन..
नक्षी ही गोष्ट प्रत्येक माणसाची असु शकते, त्याला स्त्री किंवा पुरुष ही मर्यादा नाहीचे. हेच पैसाताई आणि इनि म्हणत आहेत. त्याअर्थानी जेव्हा नक्षी आणि अनाहिता (पक्षी: स्त्रीया) असा संबंध लावला जाऊ लागला (आणि त्यात सुडने पुरुषांची बाजू म्हणुन कविता लिहीली तेव्हा नकळत तो रंग त्याला लागला..) तेव्हा त्यावर उत्तर म्हणुन आणि नक्षी ही सर्वांसाठीची कथा आहे ह्या कडे लक्ष वेधायचे म्हणुन इनिने हे विधान केले. "काहीवेळा" गोष्टी हाय लेव्हल वरुन बघाव्या लागतात, केवळ स्त्री-पुरुष म्हणुन नाही..
पण ह्याचा अर्थ असा होत नाही की "नेहमीच" स्त्री, पुरुष स्वत:च वेगळेपण सोडून केवळ माणुस ह्या एका पातळीवर असतील.
अनाहिता म्हणुनच अस्तित्वात आहे..
स्त्रियांना त्यांच्या काही कारणांसाठी अनाहिता सारखं दालन हवं होतं, त्यांनी तसं नीलकांत कडे मागितलं आणि आज २ वर्ष ते उत्साहात सुरु आहे. ह्या दालनाचा परिपाक म्हणजे मिपावर झळकत असलेला, केवळ महिलांनी काढलेला, मराठीतला कदाचित पहिलाच, आंतरजालीय महिलादिन विशेषांक! तुमच्याकडे तो वाचुन त्यावर टिपण्णी करण्याचा मनाचा मोठेपणा नसणारच.. ते वर दिसलंच.. अर्थात अपेक्षाही नाहीचेत..
पुरुषांना अनाहिता बद्दल काय वाटतं हा अगदीच गौण मुद्दा आहे कारण तुम्हाला एकंदरीत अनाहिताची, तिच्या कार्यपद्धतीची ०.००१% सुद्धा माहिती नाही. पण तरीही लोक असल्या सवंग आणि उथळ प्रतिक्रिया द्यायला कायम तयार असतात.. आताशा त्याचा राग, कंटाळा किंवा वैतागही येणं बंद होत चाललं आहे.
अनाहिता बद्दल अनेकवेळा, अनेक ठिकाणी, अनेकींनी लिहीलं आहे. तरीही २ वर्षांनी हे सगळं परत लिहीण्याची वेळ येणं दुर्दैवी आहे (आमच्यासाठी नाही.. तुमच्यासाठी.. तुमची लेव्हल अजुनही तीच आहे म्हणून...)
ह्याउप्पर काय टुकार कमेंट करायच्या असतील त्या करा.. त्यावर बार काढणारे लोक येतीलच..
प्रतिसाद अतिशय वैयक्तिक आहे.. पण त्याला पर्याय नाही.. आणि त्याबद्दल खेद तर त्याहुन नाही...
20 Mar 2015 - 2:20 pm | पिशी अबोली
प्रचंड अनुमोदन..
असे म्हणतात की आन्तर्जालीय ओळखीवरुन माणसाची खरी ओळख होत नाही. पण कोतेपणा आणि अहंकार या दोन पातळ्यांवर अशी ओळख होऊ शकते हे मागच्या काही दिवसांत दिसले.
बाकी खेद, राग वगैरे काही नाही अशा कुणाबद्दल. त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी असेच जगावे. शक्य तेवढा अजून द्वेष करावा. त्यासाठी प्रचंड शुभेच्छा.
20 Mar 2015 - 11:55 pm | मनुराणी
+1
20 Mar 2015 - 2:33 pm | विशाखा पाटील
मूळ कविता आणि त्यावर होणारी सुरुवातीची चर्चा चांगली चाललेली असताना, धाग्याने वेगळे वळण घेतले आहेच, तर पिराच्या प्रतिसादाला धरून पुढे लिहिते.
परवाच एका अनाहिताने एका धाग्यावर चर्चा करतांना 'मला मेन बोर्डावर लिहायला/प्रतिसाद द्यायला भिती वाटते. अनाहिताचा उल्लेख होईल, असं वाटतं' असं लिहिलं होतं. ते वाचून एक वाचक म्हणून वाईट वाटलं. दुसऱ्याच्या मताचा आदर न करणे, ही संस्कृती महाराष्ट्रात अलीकडे चांगलीच रुजली आहे, तिच इथे दिसतेय असं म्हणत सोडून द्यायचं का? की २११५ पर्यंत परिस्थिती बदलेल, याची वाट बघत बसायची?
20 Mar 2015 - 2:39 pm | अन्या दातार
म्हणजे आपण माणसं आहोत हे दरवेळी विसरायचं का? 'माणूस' म्हणून असणारी डिग्निटी मोठी की स्त्री/पुरुष म्हणून असणारी डिग्निटी मोठी?
"स्त्रियांना माणूस म्हणून वागवा" हे स्त्रीमुक्तीच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे हे वाक्य लिहून तुम्हीच खोटं ठरवताय असं वाटत नाही का? अनाहिताचे नाव बदलून माणूस असं केल्याने नक्की कशाला बाधा येते? उलट ती वेळ येणे हेच तर स्त्रीमुक्ती अभियान्/चळवळ इ. इ. च्या विजयाचे लक्षण मानायला हवे असे नाही वाटत?
20 Mar 2015 - 2:41 pm | बॅटमॅन
ज्या डिग्निटीमुळे त्या त्या वेळी जास्त फायदा होईल ती ती डिग्निटी मोठी, हाकानाका.
20 Mar 2015 - 3:13 pm | पिलीयन रायडर
अजुन दोन मिनिटं घ्या..
आपण अजुन चिकित्सा करुन बघत बसु शकतो... I don't mind..
माणुस असणं हेच सर्वात वरच्या लेव्हलला कायम असणार, नाही का? अगदी म्हणुनच "स्त्रियांना माणुस म्हणुन वागणुक मिळणे" (कसली बेसिक अपेक्षा आहे नाही! आणि आज २०१५ चालु आहे!! असो..) ही स्त्री "मुक्ती" (मी फार सहमत नाही ह्या शब्दावर.. पण ते ही असोच..) चळवळीचं ध्येयही हेच आहे.. आणि उद्या ते साध्य झालं तरी स्त्री म्हणुन असणार्या स्पेसिफिक गरजा संपणार आहेत का? स्त्री मुक्त झाली तर अनाहिताची गरज संपणारे का? मुळात अनाहिता स्त्री मुक्तीचं प्रतिक आहे हे कुणी ठरवलं? अनाहितातल्या अर्व स्त्रिया ऑलरेडी मुक्त (म्हणजे स्त्री मुक्ती चळवळीत जे अपेक्षित आहे तशा) आहेतच. त्यासाठी आम्हाला अनाहिता नकोच्चे.. (पण अनाहिता नकळत त्यासाठी मदत / काम करतं हे ही खरंय..)
अनाहिताला माणूस म्हणल्याने बाधा येते ती इथे.. ती स्त्रियांसाठीचीच स्पेसिफिक फोरम आहे. सर्वांसाठी नाहीच. त्यात माज / गर्व / फायदा / सवलत इ काही नाही.. कुणी हिणवुन अनाहिताचा सतत उल्लेख करत रहावा असंही काहीच नाही..
साधी गोष्ट आहे हो.. अमेरिकेत जाऊन महाराष्ट्र मंडळ का स्थापन करता? सगळेच "माणुस" लेव्हलला आहेत ना.. मग??
तुम्हाला "तुमच्या सारख्या" लोकांशी बोलावं वाटतं.. तुमचे विचार, प्रॉब्लेम्स, राहणीमान इ ज्यांना जास्त चांगल्या पद्धतीने "रिलेट" करता येईल... ते नसतं तर तुम्ही काय जगुच शकत नाही का? पण असल्याने व्हॅल्यु अॅडीशन होते ना आयुष्यात.. तसंच अनाहिता आहे.. त्यासाठीच अनाहिता आहे..
तस्मात .. अनाहिता दालनाची गरज संपणे किंवा तिचं नाव माणुस होणे वगैरे स्त्री मुक्तीच्या चळवळीच्या यशाची लक्षणे नाहीत...
21 Mar 2015 - 12:20 am | प्रसाद गोडबोले
सर्व अनाहितांना माझा सादर नमस्कार !
सर्वांना एकत्रितच उत्तर देत आहे . ह्याचाही तुम्ही प्रतिवाद करालच , रादर कराच . विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा आडोसा न घेता तसे करता येणे हे एक सामाजिक प्रगतिचे लक्षण आहे .
बाई आणि पुरुष या पलीकडे जाणे म्हनजे नक्की काय ? स्त्री पुरुष समानता म्हणजे नक्की काय ? स्त्री आणि पुरुषांना सर्वत्र समान वागणुक मिळणे आणि सर्वांन्नाच माणुस म्हणुन समान अधिकार मिळणे . हेच होय ना ? मग जेव्हा स्त्री आणि पुरुष दोन्ही समानच ठरतील तेव्हा अनाहिता सारख्या वेगळ्या दालनाची गरजच काय अनाहिताचे स्वतंत्र अस्तित्व असणे हेच स्त्रीयांच्या पुरुषांपेक्षा वेगळे ( मग ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ कोणत्याही अर्थाने असो पण वेगळे ) असण्याचे लक्षण नव्हे काय ? पुरुषांना स्वतंत्र दालनाची गरज भासत नाही , स्त्रीयांना ती का भासावी जर त्या स्त्री पुरुष समानता मानत असतील तर ?
पण हा मुद्दा कितीही केले तरी अनाहितांना पतणारा नाही असे दोन वर्षांच्या वादावादीत लक्षात आले आहे म्हणुनच २११५ म्हनले .
पण तेव्हाही स्त्रीया आपण पुरुषांपेक्षा कोणत्याही अर्थाने वेगळ्या नाहीतच , आपण सारे माणुसच आहोत सारेच समान असे म्हनतील की नाही हे ठाम पणे सांगता येत नाही .
भिकार मानसिकता म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला ? तुमच्या मते स्त्री पुरुष समानता म्हणजे नक्की काय ?
जर समानता असेल तर स्वतंत्र दालन किम्व्वा स्वतंत्र दिन साजरा करण्याची गरजच का पडते ? अशी गरज भासणे हे समानता नसण्याचेच लक्षण नव्हे काय ?
मी म्हणतोय की जेव्हा खर्या अर्थाने स्त्रीपुरुष समानता असेल तेव्हा अनाहिताची गरजच भासणार नाही . एकी कडे स्त्रीपुरुष समानता यावी असे म्हणणे आणि दुसरी कडे अशी समानता आली तरीही अनाहिता सारखे राखीव दालन स्त्रीयां साठी असलेच पाहिजे असे म्हणणे हा दुटप्पी पणा नव्हे काय ?
ह्यात हीन दर्जा म्हणजे काय हेच कलाले नाही . मी कोठे अश्लील बोललो नाही कोनाचा अनादर केला नाही कोनाला जीवे मारण्याची धमकी दिली नाही . उलट बाई अाणि पुरुष यापलीकडे आपण सगळे माणूसही आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात राहिल तो सुदिन ह्याला अनुमोदन दिली आहे . आणि त्या सुदिनी तरी अनाहिता सारख्या राखीव कुरणाची गरज भासणार नाही असा आशावाद व्यक्त केला आहे तेव्हा माणुस म्हणुन सर्वांनाच समान मानले जाईल असे म्हनले आहे .
अनुमोदन जरुर द्या . पण स्वतचा वेगळा विचार ही मांडा . घोळक्याने चालणे ही मेंढ्यांची मनोवृत्ती झाली .
सांगुन तर पहा . मी कसलेही पुर्वग्रह ठेवत नाही . शुन्यातुन सुरुवात करु . माझा इतकाच प्रश्न आहे की स्त्री पुरुष हे विसरुन आपण सारेच माणुस आहोत हे लक्षात येईल तेव्हा अनाहिताची गरजच काय ?
तुम्ही अनाहिता मधे काय बोलता ठावुक नाही , पण
दिवाळी अंक - २०१४
साहित्य
चर्चा
काव्य
पाककृती
कलादालन
भटकंती
नवे लेखन
मराठी दिन
ह्या पेक्षा वेगळे भिन्न असे काही बोलत असाल असे वाटत नाही . दोन वर्ष तुम्ही अनाहिता चालवताय (?) ह्या वर्षी विशेषांकही काढलात , आनंदच आहे , पण हे सारे मिपाच्या मुख्य प्रवाहात राहुन करणे शक्य नव्हते का ?
ह्याही उपर आता तुम्ही म्हणाल की आम्हाला नीलकांत ने स्वतंत्र विभाग दिला तर तुमची अजुन जलफळाट होत आहे तर मला हसु येईल . मला अतार्किक गोष्टींवर हसु येते . सर्वच जण समान असतील तर काही विषेष व्यक्तींना स्वतंत्र सवलत का द्यावी आणि अशी सवलत दिली जात असेल तर त्यांन्ना समान का मानावे हा माझा साधा सवाल आहे . शुध्द आणि खणखणीत तर्काच्या आधारे कोणीही मला हे पटवुन द्यावे , मी जाहीर पणे माझी चुक कबुल करेन . शुध्द आणि खणखणीत तर्क !!
हेच हेच म्हणतोय की हे विधान तर्काच्या आधारव्र पहायला गेल्यास सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे . एकीकडे तुम्ही अपेक्षा करता की स्त्री आणि पुरुष ह्याच्या पलीकडे जाऊन माणुस म्हणुन विचार करावा आणि दुसरी कडे म्हणताय की आम्ही नेहमीच असा विचार करणार नाही !! आता ह्याला काय म्हणावे ?
अहो मुख्य बोर्डावर नवीन लेखन मधे दिसलेच नाही ते लिखाण ही काय आमची चुक झाली काय ? शिवाय अनाहिता विषेषांक म्हणल्यावत अॅक्सेस रीस्ट्रीक्टेड असेल असे वाटल्याने साईडला क्लिक करावे असा विचारही मनात आला नाही हो ! ( हे असेच होते . म्हणुनच मुख्यप्रवाहात लेखन करावे हे अपेक्षित आहे ) तदुपरी सुड ने लोन्क दिल्याने नक्षी वाचली , सुडची कविताही वाचली , दोन्हीतील टोन निघेटीव्ह आहे असे माझे स्पष्ट मत आहे हे ही नोंदवले आहे . अजुन सविस्तर चर्चा हवी असल्यास तीही करु .
पुरुषांना काहीही वाटत नाही हो अनाहिता बद्दल . आमच्या कॉलेजात एक गार्डन खास मुलींसाठी आरक्षित होते , तेव्हा फार कुतुहल वाटायचे , काय करत असतील नक्की येथे ? काय असेल ह्यांची "कार्यपधती" वगैरे . पुढे कॉलेजचा जी एस झाले तेव्हा मुलींच्या रीप्रेस्नेटीव्ह सोबत तिथे जाण्याचा योग आला होता . श्यॅ . काहीच "खास" नसते हो . कार्यपध्दती वगैरे सगळे सेम टु सेम मुलांसारखेच , झुडपांआड बसुन डबाच खात बसतात फक्त ... श्यॅ ..फारच अपेक्षा भंग झाला होता .
हे हे प्रगतीचे लक्षण आहे . जेव्हा राग कंटाळा वैताग येणे पुर्ण बंद होईल तेव्हाच खर्या अर्थाने "खरेच राव , स्त्री आणि पुरुश नेहमीच अगदीच समान असतात काहीच फरक नाही " हे पटेल . २११५ हा माझा आशावाद आहे .
धन्यवाद ! माझी लेव्हल मी जाणतो . मी कटटर तार्किक माणुस आहे , वर म्हणल्या प्रमाणे एकीकडे स्त्रीपुरुष समानता व्हावी आणि सर्वांना माणुस म्हणुन ओळखले जावे असे म्हणणे आणि तरीही स्त्रीयांना स्वतंत्र दालन असावेच असे म्हनणे ही दोन विधाने तर्काच्या आधारावर स्वयं विरोधी नाहीत हे सिध्द करा असे माझे साधे सोपे म्हणणे आहे
हेच हेच ते सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन .
हे म्हणजे अनाहिता हा उघड उघड एक कंपु आहे हे तुम्ही मान्य करीत आहात ... तसे असेल तरीही त्याला हरकत नाही , फक्त हे क्लीयर नाहीये . (किमान अजुन तरी मला असे तुमच्या इतके कोणी स्पष्ट पणे म्हणलेले दिसले नाहीये )
आता माझे वैयक्तीक मत - मी सर्वांना वृत्तीच्या पातळीवर पहातो , स्त्री पुरुष असा भेदच नाही , शेवटी सर्व माणसेच . सारेच समान . कोणी तरी "स्त्री पुरुष ह्या पलीकडे जाऊन माणुस म्हणुन विचार करुयात " असे म्हनले म्हणुन कोणी तरी समविचारी भेटल्याचा आनंद झाला होता , पण सारेच "समान" माणुस झाले तरी "समान" नाहीत असे काही तरी विरोधाभासी विधान दिसले म्हणुन हसु आले .
असो.
हरकत नाही . चालायचेच .
21 Mar 2015 - 1:50 am | स्रुजा
चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही. आणि तो यसवायजींचा मौकावाला पण मस्त होता. आमची मजा उडवणारा होता पण मला मनापासून हसू आलं. दाद द्यावीशी वाटली. :D बरं ते असो. तुम्ही खुल्या दिलाने चर्चा करताय तर मोकळेपणाने सांगते काही गोष्टी.
मला स्त्रीपुरुष समानता याच्या तुमच्या व्याख्येत जरा वैचारिक घोळ वाटतोय. समानता ही त्यांना मिळणार्या वागणूकीत दिसायला हवी, त्यांनी एकमेकासमान वागावं हा थोडा विपर्यास होतोय. आता असं बघा दोन व्यक्ती एकाच जेंडर च्या असो वा नसो अगदी सक्खी जुळी भावंडं पण एकमेकांसारखी वागत नाहीत, वागूच शकत नाहीत. व्यक्ती तितक्या प्रवृती ! या व्यक्तींमध्ये स्त्रिया आल्या तसे पुरुष ही आले. आता स्त्री आणि पुरुष निसर्गतःच वेगवेगळी आहेत , एकसारखी नाहीच वागणार. हां एक सारखे नियम कुठे? परिक्षेत, ऑफिस मध्ये काम करताना. पण इतर वेळी एक व्यक्ती म्हणून वापरताना तुम्ही हे नियम नाही लावू शकत. कारण प्रत्येक व्यक्ती ही बालपण, घर, पालक, मित्र - मैत्रीणी, परिस्थिती, शिक्षण, आर्थिक स्थिती अशा अनेक गोष्टींचा परिपाक असते आणि त्यांच्या वागण्यात ते उमटत राहतं. आता स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या घरगुती जबाबदार्या, कधी शारीरिक क्षमता , कधी बाळंतपणासारख्या गोष्टी, कधी त्या निमित्ताने होणारे मानसिक बदल हे पण ग्रुहित धरायला हवेत. या गोष्टी त्यांच्या वागण्याला , स्वभावाला हात्भार लावतातच. पुरुषांच्या बाबतीत पण असतंच तसं. भारतीय पुरुष हे आपल्या कुटुंबासाठी प्रामुख्याने जबाबदार मानले जातात. तो ताण असतोच त्यांच्यावर. एखादा मुलगा बहिण आहे आईवडिलांचं बघायला म्हणून कदाचित स्वस्थ राहू शकणार नाही पण बहिण भाऊ नीट बघतोय या विचाराने बिनघोर पणे सासरच्यांची जबाबदारी उचलू शकते. आता किमान संवेदनशीलता असलेले लोकं यात ग्रुहित धरलेत हां, नाही तर पुन्हा नवीन वादाला तोंड फुटायला नको अजून १०० विरोधी उदाहणं सांगून. मी या प्रकाशात जेंव्हा माझा मामा बघते, भाऊ बघते तेंव्हा त्यांच्यावर नकळत असलेला ताण मला जाणवतो आणि मी त्यांना झुकतं माप देते. स्त्री आणि पुरुष खास करून भारतीय स्त्री पुरुष यांना हे झुकतं माप अधून मधून द्यायलाच हवं फक्त ज्याची त्याची ती परिस्थिती वेगळी. स्त्री ला तिच्या अशा खास समस्या असतात , पुरुषांना त्यांच्या. हा वेगळेपणा राहणार च ना? यात परस्पर विरोधी काही नाहीये हो.
आता याचा बाऊ करून एखादी स्त्री तुम्हाला म्हणायला लागली की मला परिक्षेत जास्त मार्क द्या, पगार जास्त द्या तर ते चुकीचं आहे. अशा पण बायका असतात, असे पुरुष पण असतात. पण इथे अनाहितात तसं कुणी करतंय का? तुम्हाला कुणी खास सवलत द्यायला सांगतंय का? नाही. आता अनाहिता हे दालन च खास सवलत आहे असा प्रतिवाद इथे अनेक जण करतायेत. पण मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. तुम्ही विभागांची यादी दिलीत आणि यापेक्षा काय वेगळं असणार असं विचारलंय. मी याचं तपशीलात उत्तर देऊ शकते पण ते योग्य होणार नाही. एवढंच सांगते की वेगळे विषय असतात. ते बोलायला मेन बोर्ड हे योग्य व्यासपीठ नाहीये. सुज्ञपणे हे तुम्ही मान्य कराल अशी आशा करते. आता जे डबे बाहेर उघडण्याजोगे असतात ते बाहेर मोकळेपणाने शेअर करतोच की. मधुरा, सानिका, पै ताई, आरोही अनेकजणी लिहीतात , त्याला सगळेजण प्रतिसाद देतात. कधी कधी काही जणी आतमध्ये या विभागांपैकी एकात छान बसेल असा लेख लिहीतात, त्यांना बाहेर पण द्या असं प्रोत्साहन आवर्जून दिलं जातं. म्हणजेच तुमच्याशी फटकून वेगळा विभाग काढण्याचा उद्देश नाहीचे मुळी. तुमची मतं , वेगवेगळे दृष्टीकोन जाणून घेण्यात रस आहेच, त्याचं महत्त्व ही आहे. स्वरा सारख्या कितीतरी जणी आपल्या विनोदबुद्धीने सगळ्यांची दाद मिळवतात. त्यात पुरुषांशी कशाला मोकळेपणाने असल्या विषयांवर बोलायचं असला काही शिष्ठपणा नाहीये. तसा तुम्हाला वाटत असेल तर खेदाची बाब आहे.
तुम्ही म्हणाताय की ही सरळ सरळ कंपूबाजी आहे, तसं नाहीये पण. आता असं बघा आपल्या घरात पण आई, बायको, जाऊ अशी अनेक बायकांची नाती असतात. लग्न, सणवार, छोटे- मोठे समारंभ यात बायकांची लगबग चालू असते. आपापसात कुजबुज होते. काही गोष्टी सुज्ञपणे परस्पर ठरवल्या जातात. भावाचं लग्न झालं की कधी कधी बहिणीला वहिनी जवळची वाटते काही गोष्टी हक्कने बोलायला. लग्नाआधी आईशी तणतण करणारी मुलगी तिच्या भूमिकेत गेली की एकदम मऊ वागायला लागते. या गोष्टी आपण घरातल्य बायकांबद्दल समजून घेतोच ना. आता कृपा करून याचा अर्थ आम्ही आतमध्ये कुजबुजतो आणि काही तरी तशाच विषयांवर बोलतो असा अर्थ काढू नका. दैनंदीन जीवनातलं उदाहरण अशासाठी दिलं की रीलेट करायला सोपं जावं. आम्हाला वेगळं व्यासपीठ हवं असलं तर त्यात दुटप्पीपणा कुठे आला काही कळत नाही बुवा.
राहता राहिला अनाहिताचा अंक. अनाहितामध्ये असं काय चालतं नाही तरी डबेच खातात ना असा थोडा जो हेटाळणीचा सूर तुमचा पण लागलाय त्याला आम्ही कृतीतून सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही तांत्रिक अडचणी सोडल्या तरी आणि त्या मिटल्यावर पण या सकारात्मक कृतीचा अनुल्लेखच केला गेला एक प्रकारे. हरकत नाही. तुम्ही मुद्दाम केलं नसेल ही पण अभिव्यक्तीला जर दाद मिळणार नसेल तर व्यक्त होणार्याला थोडं हिरमुसल्यासारखं होतं. ते समजून घेऊन जर तुम्ही वाचून दाद दिली असतीत तर तुमचाही सकारात्मक अॅटिट्युड दिसला असता पण तुम्ही मात्र मग काय तुमच्या अंकाचं नाव बदलायचं का अशा पुन्हा एकदा तोच शब्द वापरते हेटाळणणीच्या सुरात बोळवण केलीत. ती बोचली आणि त्यात चूक नाही वाटत मला काही. अनाहिताचा अंक काही आमचं कौतुक मिरवायला किंवा तुम्हाला काही तरी सिद्ध करायला काढला नव्हता. महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना आवडतील असे विषय घेऊन आम्ही काढलेला अंक होता तो. आणि विषय आपण्हून निवडलेले आहेत. इतकी प्रगल्भता सगळ्यांनीच दाखवलेली आहे.
इथे आपण जमतो वाचायला, नवीन काही शिकायला. जमलं तर सुख दु:खं वाटोन घ्यायला. सगळं मजेत चालू द्या. मला तरी तसंच जमतं नाही तर त्या मौका च्या प्रतिसादाची गंमत वाटली नसती. आता तुम्हाला हे तार्किक वाटेल की नाही माहिती नाही पण काही तर्क तुमचे चुकीच्या पायावर उभे आहेत असं वाटलं म्हणून आमची भूमिका स्पषट केली इतकेच.
21 Mar 2015 - 11:20 am | प्रसाद गोडबोले
आत्ता पर्यंत ३ प्रतिप्रतिसाद आलेत तेवढे वाचुन उत्तर देत आहे , मलाही जास्त विषय वाढवण्यात रस नाही .
ह्यातुन जे कळायचे ते कळाले.
एकुणच तुमचे सारे तर्क
All are equal, but some are more equal than others
ह्या धर्तीवरचे आहेत असा माझा तर्क झालेला आहे .
मी आधीच म्हणल्या प्रमाणे मी सारेच वृत्तींच्या लेव्हल वर पहातो , स्त्री पुरुष उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ मिसळ्पाव अनाहिता असा कोणताच भेद नाही .
तदुपरी स्त्रीयांचे वेगळे भावविष्व असते आणि ते प्रत्येक्वेळी पुरुषांपुढे मांडायची गरज नसते म्हणुन स्वतंत्र दालनाची गरज आहे हे एकदम तार्किक वाटले आणि पटले ही !( हाच सेम तर्क पुरुष विभाग काढण्या करता देता येवु शकतो , पण तसा तो दिला जात नाही आणि पुरुषांनाही स्वतंत्र विभागाची गरजही भासत नाही ह्यातुन काय बरे अनुमान निघते ? )
असो पण सारेच माणुस ह्या अभिव्यक्तीला पोहचल्यावरही , सर्वांचे भावविश्व समान झाल्यावरही , सर्वजण सारखेच संवेदनशील झाल्यावरही २११५ फॉर दॅट सेक ३११५ सालीही स्वतंत्र वेगळे अस्तित्व राहिलेच पाहिजे हे किमान माझ्या तरी आकलन शक्तीच्या बाहेर आहे . म्यॅट्रीक्स पिक्चर मधे कसे निऑला सारेच मॅट्रीक्स रुपात दिसायला लागते तसे काही मला सारेच समान भासत असल्यान्याने मला तुमचा तर्क पटत नाहीये ... असो .
असो. माझा कोठेही अनाहितांना हिणावण्याचा उद्देश नव्हता . मी फक्त " सगळेच समान पण वेगळे अस्तित्वही हवेच " ह्यामागील तर्क शोधत होतो/आहे . तदुपरी कोणी दुखावले गेल्यास क्षमाप्रार्थी आहे .
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥
21 Mar 2015 - 1:03 pm | कवितानागेश
:)
अवांतर प्रतिसाद: निओ सारखा गॉगल घातलेला मार्शल आर्ट्स वाला प्रगो, अंगावर येणाऱ्या प्रत्येक प्रतिसादाबरोबर दोन हात करताना डोळ्यासमोर आला, तेपण स्पेशल इफेक्ट्स वापरून!
21 Mar 2015 - 5:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय म्हणतोस प्रगो बाकी औरंगाबादला कधी येणार आहात ?
-दिलीप बिरुटे
21 Mar 2015 - 10:52 am | प्रसाद गोडबोले
आता जुन/जुलै मधे .... पहिला पाऊस पडुन गेल्यावर =)
21 Mar 2015 - 6:03 am | आनन्दिता
स्रुजा,अगदी हेच लिहायचं होतं मलाही..स्त्री-पुरुष समानतेची तुमची व्याख्या काय? हा प्रगोनी मला विचारलेला प्रश्न आहे असे ग्रुहित धरुन माझे दोन पैसे अॅड करतेय.
स्त्री -पुरुषांच्या इतिहासात भेदाची, भिन्नतेची खूप मोठी साखळी आहे. पण भिन्नता (difference ) आणि असमानता (inequality) दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्त्री आणि पुरुष माणूस म्हणून एक आहेतच कि पण त्यांच्या व्यक्तिमत्वामधल्या अनेक गोष्टी त्यांना एकमेकांपासून वेगळं, भिन्न बनवतात. तसं बघायला गेलं तर एक माणूस ही दुसर्या माणसासारखा नसतो.
पण या Difference ला Inequality मानायला लागलं की श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाचे चे राक्षस थैमान घालतात.
स्त्री-पुरुष समानता म्हणजे दोघांना माणूस म्हणून चांगलं आयुष्य जगण्याची समान संधी मिळणं, दोघांना समान दर्जा मिळणं एवढंच मला वाटत नाही. याचा आवाका कितीतरी मोठा आहे. स्त्री असणं म्हणजे नाजूकता, भावनिकता .... इ. गुण असणं आणि पुरुष असणं म्हणजे साहस, बुद्धिमत्ता, महत्त्वाकांक्षा वगैरे वगैरे... असं काहीसं ढोबळ मानलं जातं ...
पुरुषी आणि बायकी म्हणवले जाणारे हे दोन्ही प्रकारचे गुण एकूण समाज-स्वास्थ्याच्या दृष्टीनं आवश्यक आहेत. पण दुर्दैवानं या दोन्ही प्रकारच्या गुणांचा समतोल कुठेही दिसत नाही, पुरुषी म्हणजे काहीतरी अफाट, श्रेष्ठ आणि बायकी म्हणजे काहीतरी निरर्थक असं काहीसं बघायला मिळतं. मुळात बायकी हा शब्दच फारसा आदराने घेतला जात नाही.स्त्री-गुणांचा, स्त्री असण्याचा आदर करणारी मानसिकता खूपवेळा दिसून येत नाही.
पुरुषी गुणांना प्रतिष्ठा आणि बायकी गुणांना दुय्यमत्व, कमी महत्वाचे स्थान का मिळतं याला उत्तर मिळत नाही.
अनाहिता ची आमची गरज याच "भिन्नतेवर" आधारित आहे असं सांगायचा आटोकाट प्रयत्न आम्ही गेली दोन वर्ष करतोय. पण ते तसं तुमच्या पर्यंत पोहचत नाहीये. आता हे आमचं अपयश आहेच, पण तेच तुमच्यातल्या बऱ्याच लोकांचा आडमुठेपणा देखील आहे.
अनाहिता शब्दावर वर केलेले विनोद आम्ही बऱ्याचदा हलके घेतो, त्यात कुठे हिणवण्याची "Ineuality" दिसली कि मात्र डोकं उठतं.
अनाहिता अंकाबद्दल पण तेच, अर्थात कुठे प्रतिसाद द्यायचे, कुठे नाही हा ज्याच्या त्याच्या आवडीचा, निवडीचा, आणि सवडीचा ही प्रश्न आहे.
अंक काढताना आता आपल्याला नावे ठेवाणार्या मेल्यांना दाखवूनच देऊ आम्ही अनाहीतात काय करतो ते!! असा आमच्या पैकी कोणाचाही इरादा नव्हता. अंकाची संकल्पना जेव्हा मांडण्यात आली तेव्हा, काहीतरी वेगळं, सकारात्मक करूया, आणि आता पर्यंत लिहित्या न झालेल्यांना लिहितं व्हायला भाग पाडुया हे दोन महत्वाचे अजेंडे होते. आणि हा अंक त्याच सगळ्याचा परिपाक आहे.
अंक प्रकाशित झाल्यावर त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून अंकाकडे मुद्दाम दूर्लक्ष केलं जातंय हे लहान मुलाच्या ही लक्षात येईल अशी परिस्थिती होती. त्यामागे तुम्ही म्हणताय ती कारणे असतील ही पण, ती विश्वास बसण्यासारखी मला तरी वाटत नाहीयेत. जर तो अंक फक अनाहिता साठीच रिस्ट्रिक्टेड ठेवायचा असता तर तो "अनाहिता" मध्येच प्रकाशित झाला नसता का ?? तो होमपेज वर झळकवायची गरज नव्हतीच मग!! अंकाविषयी बऱ्याच संपादिका आणि पुरुष आयडी नी सुद्धा खरडफळ्यावर लिहीलं होतच, श्रीरंग जोशी ,स्वॅप्स, एक्का काका, आणि इतर बऱ्याच पुरुष सदस्यांनी खूप चांगले फीडब्याक दिले आहेतच. त्यामुळे access ची तुम्ही म्हणताय तितकी वाईट परिस्थिती असेल असं वाटत नाही.
पण आम्हाला मिपाकरांच हे वागणं धक्कादायक होतं. अनाहिता निर्माण होताना उडालेला धुरळा, प्रश्न, वादावादी,एरवी होणारी नोकझोक, हे सगळं तात्पुरतं आहे असा माझातरी समज होता. पण हे सगळं "अनाहिता अंक" फाट्यावर मारण्याइतपत सखोल आहे याचं भान आता येतंय.
अर्थात पुन्हा मुद्दा प्रत्येकाच्या choice चा येतोच त्यामुळे जास्त बोलण्यात अर्थ नाही. आणि त्या choice ला चुक बरोबर ठरवण्याचा ही कोणाला हक्क नाही.वाद घालणं तर खुप दुरची गोष्ट आहे.
21 Mar 2015 - 6:31 am | मधुरा देशपांडे
आजवर मिपावर अनेक वेळा लेख आणि प्रतिसादांच्या रुपात मी माझे विचार मांडले आहेत. जिथे तिथे पिंका टाकायच्या म्हणून, सतत स्वतःचे वेगळेपण दाखवून द्यायची काही गरज वाटत नाही म्हणून, मला जे वाटले ते आधीच एका प्रतिसादात आल्याने, त्यावर फक्त सहमती दर्शवली. तुमच्यापर्यंत जे पोचायला हवं होतं ते पोचलं. बाकी मग आम्ही घोळक्यात असल्याने आमच्या स्वतंत्र विचारसरणीवर काही मर्यादा येत नाहीत आणि जिथे सांघिक कामगिरी महत्वाची ठरते तिथे आम्ही याचा योग्य वापर करतो. त्याला कंपूबाजी असे नाव पडल्यास, ती मेंढरांची प्रवृत्ती वाटल्यास नाइलाज आहे आणि आम्हाला त्याचा शश्प फरक पडत नाही. हे मी अनुमोदन देणाऱ्या सर्वच अनाहीतांच्या वतीने बोलते आहे.
आता स्त्री पुरुष समानता आणि अनाहीताची गरज - वर्षानुवर्षे चघळला गेलेला विषय. सृजाने दिलेला प्रतिसाद योग्य आहेच. शिवाय ही खूप सापेक्ष टर्म आहे. प्रत्येक बाईचे प्रश्न वेगळे आहेत आणि पूर्वीपासून चालत आलेली ही स्त्री-पुरुष समानता चळवळ अशी लगेच संपणारी नाही. जिथे आजही जाहिररीत्या बहिणीला जाळून टाकेन अशी भाषा करणारे लोक आहेत, क्षणाक्षणाला पुरुषांचे नकोसे स्पर्श आहेत, बायकांना सर्रास मारहाण करणारे नवरे आहेत, बायकांवर होणारे अत्यंत नीच पातळीचे विनोद चवीने चघळले जात आहेत, तिथे सरळ सरळ स्त्री ला किती कमी पातळीचे लेखले जाते हे दिसून येतेच. आमच्या दृष्टीने अनाहिता च्या माध्यमातून जे काही होतंय, ज्या कुणा स्त्रियांना मोकळेपणाने तिथे व्यक्त होऊन हलके वाटते आहे, ज्यांना कुणाला इथे लेख टाकला की वाईट साईट प्रतिक्रिया येतील याची भीती वाटत होती आणि हळूहळू सांघिक भावनेतून ती भीती दूर होऊन मुख्य बोर्डावर लेख येत आहेत, एका बंदिस्त दालनातून आम्ही जर आमच्या अशाच छोट्या छोट्या प्रश्नांना (मग ते घरातल्या स्त्री मुळे उद्भवले असतील तरीही) उत्तरे शोधण्यात यशस्वी होत आहोत, तर आमच्यापुरतं स्त्री -पुरुष समानतेच्या लढ्यातला तो खारीचा वाटा असेल, आणि आम्ही आनंदी आहोत. अनाहिता असावे की नसावे यावर पूर्वीपासून दोन मतप्रवाह आहेत आणि ते बदलणार नाहीत हे माहित आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्याची इच्छा नाही. याचा अर्थ प्रतिवाद करायला जमला नाही, सो कॉल्ड शुध्द आणि खणखणीत तर्क देता आला नाही असा घेतल्यास हरकत नाही.
प्रतिसादात हीन काय होते?
आधी जरा हे बघु. ८ मार्च ला अनाहिता विशेषांक प्रकाशित झाला. मुख्य बोर्डावर जरी हे लेख दिसले नाही, तरीही 'अनाहिता महिला दिन विशेषांक वाचण्यासाठी इथे टिचकी मारा' आणि 'डाऊन लोड करण्यासाठी इथे टिचकी मारा' हे सर्वाना दिसत असताना अपवाद वगळता कुणालाही एक साधे क्लिक करावेसे वाटले नाही याबाबत कौतुक करावे वाटतेय हो. एवढेही कुतूहल वाटले नाही कुणालाच? एरवी इथे मिपावरच 'काय असतं बरं अनाहीतात' यावर चर्चा रंगतात, मागे अजून किती रंगत असतील माहिती नाही, पोरगी पटाव शास्त्रावर जिथे लेख लिहिले जातात, खरड वह्यांमधुन उचकापाचक केली जाते, आणि मिपाबाहेर देखील समाजात अजून बरेच काही आहे ज्यात स्त्रियांच्या प्रत्येक बाबतीत (दुर्दैवाने तिचे शरीर) नको तेवढे लक्ष घातले जाते. तिथे स्त्रियांच्या लेखात/अंकात कुठे लक्ष घाला असे वाटून त्याकडे न बघणे, तेही फक्त एक क्लिक दूर असताना हे जामच कौतुकास्पद आहे हां.
उपरोध बाजूला ठेवून, ठळक पणे समोर अंक दिसत असताना, तो अनेकांकडून फेसबुक वरही शेअर झाला असताना, व्हॉट्सअॅपवर आलेला असताना, कुणी त्याकडे ढुंकून पहिले नाही हे पटण्यासारखे मुळीच नाही. तर ते एक असो. बरे मुख्य बोर्डावर अनेक स्त्रिया देखील लिखाण करतात. गेल्या काही दिवसात हे प्रमाण देखील वाढले आहे. त्यावर तरी आपण प्रतिसाद देता का? अर्थात कुणी कुठल्या लेखावर काय प्रतिसाद द्यावेत, हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा प्रश्न आहे, पण केवळ मुख्य बोर्डावर आले नाही म्हणून पाहिले नाही हे काही समजले नाही.
आता आणि हे सगळे बघता, महिला दिनानिमित्त मिपावरील स्त्रियांच्या दालानातर्फे एक अंक प्रकाशित झाला, ज्यात स्त्रियांचे आरोग्य, प्रेरणादायी स्त्रिया आणि इतरही काही स्त्री केंद्रित विषयांशिवाय सर्वच पद्धतीचे उत्तम लेखन स्त्री लेखिकांनी केले. जर मुख्यप्रवाहात लेखन करावे हे अपेक्षित आहे असे तुम्ही म्हणता, तर मग या लेखनाबद्दल, वेगळ्या उपक्रमाबद्दल चकार शब्दही न बोलता, इनिच्या एका प्रतिसादाला फाटे फोडायला 'माणूस दिन विशेषांक' असे म्हणत लगेच प्रतिसाद दिले जातात, तेव्हा त्यात हिणवले गेल्यासारखे वाटते. आणि हेच खटकले, हीन वाटले. एखाद्या प्रतिसादाची पातळी हीन वाटण्यासाठी तो अश्लील, धमकी देणारा असावाच असे काही नाही. याहुन अधिक चर्चा करण्यात रस नाही.
19 Mar 2015 - 10:15 pm | अजया
खरंय.काय महान विनोद साधला प्रतिसादातुन?
प्रतिसादाचा निषेध
19 Mar 2015 - 10:50 pm | सानिकास्वप्निल
हेच म्हणतेय प्रतिसादाचा निषेध
@ सुड कविता आवडली.
20 Mar 2015 - 1:36 pm | अन्या दातार
निषेध करण्याइतका प्रच्चंSSSSSSSSSड वाईटपणा प्रगोंच्या प्रतिसादात नक्की कुठे आहे हे उमगलं नाही. असो.
@सूड, मस्त कविता.
20 Mar 2015 - 1:47 pm | स्पा
सूड सुटला , प्रगो अडकला
20 Mar 2015 - 2:13 pm | बॅटमॅन
अनाहिताज् जस्ट वॉना हॅव फन!
20 Mar 2015 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा
@ सूड सुटला , प्रगो अडकला>> पांडु-आला! :-D
उलाला उलाला उलाला! =))
19 Mar 2015 - 10:46 pm | स्रुजा
@ सूड कविता आवडली. स्तुत्य प्रयत्न.
20 Mar 2015 - 2:25 pm | सूड
मला काय म्हणायचंय हे समजून घेतल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!!
बाकी गिर्जाकाकाचा प्रतिसाद खोचक असेल, सार्क्यास्टिक असेल, पण हीन नाही. अर्थात हे माझं मत आहे, तुम्हाला हीन वाटू शकतं आणि तुमच्या या वाटण्याचा आदर आहे.
पिरातैंच्या या वाक्यामुळे हा प्रतिसाद वास्तववादी वाटला आणि प्रचंड आवडला.
पुन्हा सर्वांचे आभार!! :)
20 Mar 2015 - 2:27 pm | बॅटमॅन
एकूण प्रतिसादाशी तुलना करून पाहता हे वाक्य म्हणजे भांगेत तुळस आहे.
20 Mar 2015 - 2:35 pm | स्पा
ख्याक
किती तो सोज्वळ प्रतिसाद, खपलोच
20 Mar 2015 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा
=))
20 Mar 2015 - 4:26 pm | भिंगरी
कविता खुप छान
20 Mar 2015 - 4:47 pm | इशा१२३
कविता आवडली.
20 Mar 2015 - 10:00 pm | यसवायजी
मिळूनी साऱ्याजणी "मौक़ाss मौक़ा.. मौक़ाss मौक़ा" गाणे गात फेर धरून नाचताहेत ऎसे चित्र डोळ्यासमोर येऊन ड्वोळे पानावले
20 Mar 2015 - 10:09 pm | आजानुकर्ण
मस्त रे सूड. झकास कविता.
21 Mar 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्त्री पुरुष समानता म्हणुन कितीही जरी आरडाओरडा केला तरी ते निसर्गनियामाप्रमाणे कधीही शक्य नाही. शारिरिक आणि मानसिक पातळीवरच्या प्रो आणि कॉन्स ला एका समान पातळीवर आणणं कधीही शक्य नाही. वैचारिक पातळीवर एकमेकांना समसमान दर्जा देणं आणि एकमेकांचा एक माणुस म्हणुन आदर करणं हे सहजशक्य आहे किंबहुना तेच अपेक्षित आहे. तेवढं करायचा प्रयत्न केला तरी बरेच वाद मिटतील.
21 Mar 2015 - 9:14 am | स्पंदना
सल्युट कॅप्टन.
हेच सांगायच आहे सर्वांना, दुसरं काही नाही. मानसिक पातळीवर आपण एकमेकाला आदराने वागवु शकतो, आणि त्याचीच अपेक्षा आहे.
थँक्स अ टन चिमणराव!!
21 Mar 2015 - 11:57 am | सुबोध खरे
चिमणराव
एकदम खिळ्यावर डोकं हाणलं. आपलं ते डोक्यावर खिळा हाणला. आपला ते हातोड्याच्या डोक्यावर खिळा हाणला.
जाऊ द्या तुम्हाला समजलं ना? एकदम परफेक्ट
21 Mar 2015 - 3:44 pm | एस
तर्काचं एक वैशिष्ठ्य असं आहे की तर्काला जर विवेकबुद्धीची जोड नसेल तर तर्काचे रूपांतर कुतर्कात व्हायला वेळ लागत नाही. अजून काय बोलणे!
21 Mar 2015 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
23 Mar 2015 - 2:08 pm | सूड
यु सेड इट !! :)