पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
19 Jan 2013 - 8:41 pm

नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त...
आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल.

अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय...
... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं. त्यांच्या तब्येती ठणठणीत, त्यामुळे दीर्घायुषी. एकंदरीत आम्हाला तेंव्हा फारसं काम नसायचं. यमराज नेहमी रंभा-उर्वशीचे नाच बघत बसायचे.
dance

असं लाखो वर्षं चाललं. पण पुढे ते नाना धर्मांचं लचांड निर्माण झाल्यावर सगळाच ब्रम्हघोटाळा झाला...विचारूच नका. रात्रंदिवस राबूनही आमचं काम आटोपेनासं झालं....

म्हणजे असं बघा, पूर्वी ब्रम्हा, विष्णू, महेश, यमराज आणि इंद्रदेव सगळं नीट सांभाळून घ्यायचे. पण इंद्र महाराजाचं ते अहिल्या-प्रकरण उघडकीला आल्यानंतर तुम्ही मनुष्यप्राणी बिथरलात, आणि शिवलिंग तेवढं टिकवून ठेवून ब्रम्हा, विष्णू आणि इंद्राला बाद केलंत, आणि स्वत:च्या कल्पनेप्रमाणे गावोगाव खंडोबा, म्हसोबा, विठोबा, बहिरोबा, वेताळ, झोटिंग, बटुभैरव, व्यंकटेश, पांडुरंग, मुंजा, सटवाई, म्हाळसाई, यमाई, कळसाई, जाखणाई, कांकाळी, भद्रकाळी, चांडाळी अशी हजारो दैवतं स्थापन केलीत. याशिवाय गल्लो-गल्ली खुन्या मुरलीधर, तेल्यामारुती वगैरे बसवलेत, आणि आमच्या कामाचा बोझा फारच वाढला.
... म्हणजे कुणी जाखणाईला कोंबडं चढवलं, मांडा हिशेब; कुणी झोटिंगाला नवस बोलला, करा त्याची नोंद; कुणी बटु-भैरवाला कुजका नारळ चढवला, करा पाप-पुण्याची बेरीज-वजाबाकी. एक ना दोन, हजार कटकटी. हे सगळं म्हणे पुण्य-संपादनासाठी. अहो, तुमच्या त्या लबाड पंडे- पुरोहितांनी काहीही थापा मारल्या, तरी पाप-पुण्याचा हिशेब शेवटी मीच ठेवणार ना. मारे खंडोबाला कोंबडी चढवली, वाटलं की फार मोठं पुण्य केलं, स्वर्गात जागा रिझर्व केली. अहो, पण प्रत्यक्षात मी त्याच्या खात्यावर दुहेरी पाप चढवतो. एक तर हकनाक मुक्या प्राण्याचा जीव घेतला म्हणून, दुसरं म्हणजे आपलं काम करवून घेण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून. अगदी देवासाठी म्हणून तुम्ही झाडावरून फुले तोडता वा पिलांसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेले गायी-म्हशींचे दूध तुम्ही पिळून घेता, याचीही नोंद तुमच्या पापातच होते.
एकंदरीत तुम्ही मनुष्यप्राणी जेवढे धार्मिक बनत जाता, तेवढी तुमच्या खात्यात पापाचीच भर पडत जाते. पुन्हा एक संधी म्हणून पुन्हा मनुष्य योनीत पाठवल्यावर परत नवीन पापे करत जाता. अहो, म्हणूनच तर पृथ्वीवर मनुष्य प्राण्याची संख्या एवढी वाढत चालली आहे. इतर पशुपक्षी बिचारे सृष्टिक्रमाप्रमाणे सुरळीत जीवन जागून मनुष्यजन्म घेत चाललेत, त्यामुळे त्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे.
... आधी वनस्पती, मग जलचर, त्यानंतर पशुपक्षी अश्या ८४ लक्ष योनीत जन्म घेत घेत शेवटी मनुष्य-जन्माला येउन त्या जन्मात यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी अशा अष्टांगयोगाची साधना करून, कैवल्यपदाला पोहोचून जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून सुटका करून घ्यायची, अशी विराट सृष्टीरचना ब्रम्हदेवाने मुळात केलेली, पण हा योग-मार्ग आचरण्याऐवजी तुम्ही भलतीच काल्पनिक दैवतं निर्माण करून त्या जंजाळात अडकलात.
बरं,एकीकडे हा हजारो दैवतांचा गोंधळ, तर तिकडे त्या कृस्ती धर्माचं नवीनच प्रकरण उद्भवलं. खरं म्हणजे 'ईशस-कृस्त' हा बिचारा साधा, सरळ निरुपद्रवी माणूस. छान प्रवचनं करायचा, पण त्याला दोषी ठरवून सुळावर चढवलं.
jesus
... पुढे पोप-कार्डिनल-बिशप वगैरे धूर्त मंडळीनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेऊन पूर्वीचे सगळे देव मोडीत काढले, आणि गॉड हाच एकमेव, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वर, येशू त्याचा प्रेषित, बायबल हाच काय तो एकमेव खरा धर्मग्रंथ, असे सांगून मारून मुटकून लाखो लोकांच्या गळ्यात क्रूस लटकवले. सुरवातीला तिकडे त्या बायबलातील गप्पा चालून गेल्या, पण पुढे कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, डार्विन वगैरे हुशार लोकांनी बायबलातल्या थापांची बिंगं फोडायचा सपाटा लावला, तशी पाद्र्यांची मात्रा तिकडे चालेनाशी झाली. त्या फ्रेडरिक नित्शेने तर चक्क गॉड मरण पावल्याचंच जाहीर केलं. मग पाद्री मंडळींनी आपला मोर्चा भारत, आफ्रिका, वगैरे देशांकडे वळवून गावाच्या विहिरीत पावाचा वा गोमांसाचा तुकडा टाकणं, इस्पितळं, अनाथालयं चालवणं, अश्या क्लुप्त्या लढवून हजारो लोकांना आपल्या कळपात ओढलं... अहो, त्यांनी गोमांस टाकून विहीर बाटवली, तर तुम्ही लगेच गोमूत्र शिंपडून ती पवित्र नाही का करून घ्यायचीत? त्यांच्याच चर्च वर गंगाजल शिंपडून ती मंदिरं झाली, असं सांगून, त्यांच्या गळ्यातील क्रूस काढून त्या ऐवजी जानवी अडकवून त्यांनाच आपल्या कळपात ओढायचं होतं, पण तुम्ही पडलात अडाणी आणि भित्रट.
... पुढे ते 'ईश-लांब' हे आणखी एक प्रकरण उद्भवलं. त्यांनी तर लोकांना अगदी धारेवरच धरलं. गॉड आणि येशूला पण रद्द करून अल्ला हाच काय तो अगदी खराखुरा, सर्वशक्तिमान, परमदयाळू, सर्वज्ञ असा परमेश्वर, 'महा-मद' हा त्याचा अंतिम प्रेषित, कु-रान हाच एकमेव धर्म ग्रंथ, असं जाहीर करून सक्तीनं सगळ्यांची सुंता करण्याचा सपाटा लावला. अहो, आमची इकडं किती तारांबळ उडाली म्हणून सांगू ! त्या लाखो लोकांच्या जन्मो-जन्मीच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवण्याची मेहनत वाया गेली. तिकडे सुंता झाल्या झाल्या त्यांची इकडली खाती धडाधड बंद करून त्या सगळ्या फायलींचे गठ्ठे त्या अल्लाच्या दफ्तरात पाठवावे लागले. या सर्व गोंधळात कित्येकांचे कागदपत्र गहाळ झाले, त्याबद्दल यमराजांची बोलणी खावी लागली, ती वेगळीच.
आता हे अल्ला प्रकरणही जरा मजेशीरच आहे बरंका. म्हणजे असं बघा, की त्या अल्लाबद्दलचा एकमेव पुरावा काय, तर कुराण. आणि हे कुराण कुठून आले, तर म्हणे अल्लाने पाठवले. अजब तर्क आहे बुवा. आणि खरोखरच अल्ला हाच एकमेव, सर्व शक्तिमान वगैरे असला, तर ते सूर्य-प्रकाशासारखं सर्वांना आपोआप कळेलच की, अगदी रोज सकाळ-संध्याकाळ लाऊड स्पीकर लावून घसा खरवडत ओरडून ते सांगण्याची काय गरज?
ते गॉड प्रकरणही असलंच. त्या गॉडने म्हणे आधी आदम-ईव्ह ला बनवलं, पण पुढे त्यांनी त्याची आज्ञा मोडली. अहो, मग त्यांना बनवतानाच नाही का आज्ञाधारक बनवायचं ?
adam
शिवाय तिकडे कुणी सैतान म्हणून दुष्ट आहे म्हणे. आणि तो नेहमी त्या सर्वशक्तिमान, सर्वज्ञ गॉडच्या कामात मोडता घालतो. आता सर्वज्ञच म्हटल्यावर गॉडला आधीच का नकोत कळायला त्या दुष्टाचे बेत? आणि गंमत म्हणजे त्या सैतानाला सुद्धा कुणी बनवला, तर खुद्द गॉडनेच. आता बोला. अहो अश्या वस्तू मुळात बनवाव्यातच कश्याला? आहे ना मूर्खपणाची कमाल? बरं, समजा चुकून बनवला, तरी मग आपला सर्वशक्तिमानपणा वापरून मारून नाही का टाकायचं त्या दुष्टाला? एवढंही जमेना तर मग कसला हो डोंबलाचा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान ?
पण त्या गॉड, अल्ला वगैरेंचं एक बरं आहे. एकदाच काय ते पाच-सात दिवस राबून सगळं निर्माण करून टाकलं, नंतर प्रेषीताकरवी धर्मग्रंथ पाठवून स्वत: झोपा काढायला मोकळे. संभवामि युगे युगे वगैरे काही भानगड नाही. शेवटी कधीतरी फ़ुरसतीनं महाप्रलय करून त्यानंतर निवाडा करणार म्हणे (ते महाप्रलयाचं टेंडर केंव्हा निघणार, याची यमराज, भस्मासुर वगैरे वाट बघत बसलेत केंव्हापासून).
dooms
आमच्यासारखी रोजच्यारोज प्रत्येक मनुष्याच्या पाप-पुण्याचा जमा-खर्च लिहिण्याची भानगड नाही. चर्चमध्ये गुप्तपणे पाप-कबुली करून पाद्री सांगेल, तेवढी रक्कम भरली की झालीच पापातून सुटका. शिवाय अवघा एकच जन्म. करून करून पापं तरी किती करणार माणूस एका जन्मात? जरा नारद मुनिंकडून माहिती काढून त्या गॉड वा अल्लाच्या पदरी एकादी नोकरी मिळाली, तर बघावी म्हणतो. कयामत नंतर जेंव्हा फैसला होणार, तेंव्हाच काय ते काम करावं लागणार. तोपर्यंत आरामशीरपणे पगार खात जन्नत मध्ये फिरदौसी हूरचे नाच बघायचे, आणि शराबे-तहूरचे तर चष्मेच आहेत म्हणे तिकडे. त्यातून हवी तेवढी पीत बसायचं. असो.
... मध्यंतरी आणखी तो एक गौतम बुद्ध होऊन गेला. भला माणूस. तपश्चर्या, ध्यान, विपश्यना वगैरे करून स्वत: आधी बुद्धत्वाला पहुचला, मग हजारो लोकांना ती विद्या शिकवू लागला. त्यानं पण ईश्वर वगैरे प्रकरण मोडीत काढलं, पण जुलूम -जबरदस्ती, सुंता असलं काही नाही. शांतपणे प्रवचन द्यायचं, अहिंसा, सत्य, ध्यान वगैरेंबद्दल सांगायचं, पुढे जायचं. आम्हाला वाटलं चला, आता खरा धर्मात्मा निपजला. हा करील जगाचं कल्याण. होतील सगळी माणसं आता चांगली. तो स्वत: जिवंत असेपर्यंत तसं झालंही, पण मग त्या धर्माला राज्याश्रय मिळाला, जगभर तो फोफावला, तेंव्हा मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या. भिक्षु लोकांना फुकट खायला-प्यायला मिळू लागलं, मान-सन्मान मिळू लागला, तसे सगळे संधिसाधू, पुंड, लबाड धडाधड भिक्षु बनून तिकडं घुसले. (हल्ली तुमच्या राजकारणी लोकांना मान-सन्मान, पैका मिळतो म्हणून सगळे गुंड राजकारणात घुसतात, तसेच झाले) त्यातून आणखी वारांगना, गणिका वगैरे देखील भिक्षुणी बनू लागल्या. मग कसली हो विपश्यना, आणि कसलं ध्यान! सगळा आनंदी आनंद गडे , जिकडे तिकडे चोहिकडे !
पण हा ध्यान, तपश्चर्यावाला धर्म फोफावला, म्हणून सनातनी लोकांच्या उरात धडकीच भरली. ईश्वरच नाही म्हटल्यावर त्याआधारे शेकडो वर्षांपासून रचत आणलेली कर्मकांडंच जर संपुष्टात आली, तर मग धंदा चालणार तरी कसा? प्रत्येकजण झाडाखाली शांतपणे ध्यानमग्न होऊन बसू लागला, तर मग लुबाडायचं कसं आणि कुणाला? मग कारस्थानं रचून शेकडो भिक्षुंना ठार मारलं, त्यांचे आश्रम, ग्रंथ वगैरे जाळून टाकले. मग त्या लोकांनी तिबेट, चीन वगैरेंमध्ये मठ स्थापून बुद्धाच्या शिकवणीचं 'ध्यान' हे सार टिकवून ठेवलं, तेच आता पुन्हा 'झेन' म्हणून जगभर पसरत चाललंय म्हणे.
... तर या सर्व जाळपोळी, कत्तली वगैरेंच्या नोंदी करत बसणं, हे आमचं काम या बुद्ध प्रकरणातूनही वाढलंच. मुळात ही ईशस, महामद, बुद्ध वगैरे मंडळी फार चांगली होती, पण पुढे त्यांच्या संधिसाधू, कपटी अनुयायांनी अर्थाचा अनर्थ करून पार विचाकाच करून टाकला.
... हा, तर काय सांगत होतो की ब्रम्हा-विष्णू-इंद्र यांना तुम्ही विसरलात तरी त्यांनी ते फ़ारसं मनावर घेतलं नाही. उलट बरी पीडा टाळली, असंच त्यांना वाटलं. पण लक्ष्मी-मांसाहेबांना मात्र हे रुचलं नाही. अहो, पृथ्वीवर गल्लो-गल्ली शंकर आणि त्यांच्या गजमुखी चिरंजिवांची देवळं. चक्क शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला बायकांची झुंबड. अभिषेक काय, आरत्या काय, उत्सव काय, विचारू नका (यातून त्या पार्वतीची पण वट स्वर्गलोकात केवढीतरी वाढली ) ... आणि एवढं जगाचं पालन करणाऱ्या विष्णुमहाराजांचं काहीच नाही? मग त्यांनी, म्हणजे लक्ष्मी-मांसाहेबांनी विष्णू महाराजांच्या मागे टुमणं लावून लावून त्यांना पृथ्वीवर अवतार घ्यायला लावले. अवतारांच्या मागचं खरं कारण हे आहे. दैत्यांचा संहार वगैरे उगीच सांगण्यासाठी. अहो, इकडून शेषनागावर पडल्या-पडल्याच सरळ सुदर्शन चक्र टाकून नसते का दैत्य संहारता आले? विष्णुमहाराजही अनंतकाळ पासून शेष- शैय्येवर लोळून लोळून पार कंटाळून गेलेले होते. त्यातून लक्ष्मीमांसाहेब रात्रंदिवस पाय चुरत तोंडाचा पट्टा अखंड चालू ठेवणार. तेंव्हा जरा बदल म्हणून त्यांनी दशावताराचं मान्य केलं. सुरुवातीला मत्स्य, कूर्म, वराह असले सोपे प्रयोग केले. पुढे कृष्णावतारात मात्र ते खूप रमून गेले.
krisna1

k2
रासक्रीडा काय, गोपिकांची वस्त्रं लपवणं काय, सोळा हजार एकशे आठ स्त्रिया काय, काही विचारू नका. लक्ष्मीमांसाहेबांना तर कुठून आपण अवतारांसाठी हट्ट धरला असं झालं. त्यामुळे त्यांनी नंतर अगदी सोवळा, विरक्त असा बुद्धावतारच काय तो घेऊ दिला. त्या अवतारात एके रात्री वरून लक्ष्मीमांसाहेब क्रुद्ध नजरेने बघत असलेल्या बघून सुंदर पत्नी सुद्धा त्यांना सोडावी लागली, आणि रानावनात वणवण करावी लागली
bu ... आणि मग तो दहावा कल्की अवतार तर राहूनच गेला.
कृष्णावतारात त्यांनी अर्जुनाला गीतोपदेश केला. खरं तर अर्जुन हा त्यांचा प्रिय सखा. भक्त. म्हणून त्यांनी हे गुह्यतम ज्ञान फक्त तुलाच देतोय, असं गीतेतच सांगून ते दिलेलं. पण कशी कोण जाणे, या गोष्टीची कुणाला तरी कुणकुण लागली, आणि त्या बहाद्दरानं ते सगळं संभाषण गुप्तपणे टेप करून घेतलं. चला ठीक आहे, आमची काही हरकत नाही, पण पुढे लोक गीतापठण करू लागले, तेंव्हापासून आमची फारच पंचाईत झाली. कशी म्हणून विचारता? अहो, पद्म पुराण वाचा ना जरा, म्हणजे कळेल सगळं. पद्मपुराणाच्या उत्तर खंडातल्या अध्याय १७५ ते २९२ मध्ये गीता महात्म्य सांगितलंय. त्या हकिगती वाचल्यात, तर कळेल आमची कशी पंचाईत झालीय ते.
उदाहरणार्थ, गीतेच्या पहिल्या अध्यायाचं महात्म्य सांगणारी ही हकीगत बघा: " सुशर्मा नामेकरून एक विषयासक्त, लंपट, मद्यपी, मांसाहारी, महापापी ब्राम्हण होता. मेल्यानंतर तो बैलाच्या जन्माला आला. पुन्हा मरतेवेळी या बैलाला एका वेश्येने आपले थोडेसे पुण्य दिल्याने त्याची पूर्व-जन्मांची सगळी पातके नष्ट होऊन तो मोक्षाचा अधिकारी झाला. आता त्या वेसवेकडे एवढं पुण्य कुठून आलं म्हणाल, तर तिच्या घरचा पोपट लहानपणी ब्राम्हणाच्या तोंडून गीतापठण ऐकत असे, ते त्याला पाठ झालेले असल्यानेते तो आपल्या पोपट पंचॆत म्हणत बसायचा. ते ऐकून ती वेश्या महापुण्यवान झालेली होती.
तसंच गीतेच्या चौदाव्या अध्यायाचं पठण करणार्‍या वत्स नामक ब्राम्हणाच्या एक शिक्ष्यानं पाय धुतल्यामुळे जमीन ओली झालेली होती, त्या चिखलात एक ससा आणि त्याचा पाठलाग करणारी एक कुत्री लोळली (ती दोघे पूर्वजन्मात केशव आणि विलोभना नामक कपटी, दुष्ट, व्यभिचारी, पापी नवरा-बायको होती) आणि तात्काळ जन्मोजन्मीच्या पापातून मुक्त होऊन, दिव्य रूप धारण करून स्वर्गलोकात गेली.
भावशर्मा नामक एक मांसाहारी, मद्यपी, व्यसनी, व्यभिचारी ब्राम्हण मेल्यानंतर एक ताड वृक्ष झाला. या वृक्षाखाली एकदा एक जोडपे गप्पा करत बसलेले असता बायकोने "किं तद्ब्रम्ह किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम? असा प्रश्न विचारला. योगायोगाने हा प्रश्न म्हणजे गीतेच्या आठव्या अध्यायातला अर्धा श्लोक असल्याने ताडवृक्ष बनलेला पापी भावशर्मा आणि ब्राम्हराक्षसाचे ते जोडपे यांना घ्यायला आकाशातून एक दिव्य विमान उतरले आणि त्यांना स्वर्गलोकात घेऊन गेले.
आणखी एक पिंगल आणि अरुणा म्हणून पापी व्यभिचारी जोडपे मेल्यानंतर पक्षी झाले. हे पक्षी मरताना जंगलात पडलेल्या एका मानवी कवटीत साचलेल्या पाण्यात पडले. ही कवटी 'वट' नामक, गीतेच्या पाचव्या अध्यायाचं पठण करणार्या एका ब्राम्हणाची असल्याने त्या दुराचारी जोडप्याची सगळ्या पापातून तात्काळ मुक्तता झाली.
वाचकहो, आता समजलात ना? म्हणजे बघा की वर्षानुवर्षे तपश्चर्या करून, अष्टांग-योगाची साधना करून, बद्ध-मुमुक्षु-साधक-सिद्ध अशा एकेक अवस्था पार करत, हळू हळू शुद्ध, पवित्र, सात्विक होत होत बिचारे तपस्वी मोठ्या सायासानं स्वर्गात येणार आणि तिकडं सगळी गुंड, व्यभिचारी, खुनी, व्यसनी, महापापी मंडळी पोपटाच्या तोंडून गीता ऐकून, चिखलात लोळून, कवटीतील पाणी पिऊन वा अर्धामुर्धा श्लोक ऐकून पापमुक्त होत्साती, स्पेशल विमानाने स्वर्गात येऊन त्या सात्विक तपस्व्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार. अहो, त्या वेश्येचे बघून मग सगळ्याच वेश्यांनी गीतापठणवाले पोपट बाळगायला सुरुवात केली, त्यामुळे त्या सगळ्या साळकाया-माळकाया पण स्पेशल दिव्य विमानातून स्वर्गात हजर झाल्या.
... या सर्वाच्या परिणामी हल्ली स्वर्गात सुद्धा तुमच्या मुंबईतील धारावी सारखी जारावी, फरास रोड, कामातिपुरा, फाकलंदरोड, वगैरे वस्त्या निर्माण झाल्यात. भयंकर गर्दी झालीय स्वर्गात. पापातून सुटका होऊन ही मंडळी स्वर्गात आली खरी, पण चिंतन, मनन, ध्यान, योग वगैरे काहीच केलेलं नसल्यानं मूळ सवयी काही बदलल्या नाहीत त्यांच्या. हे सगळे टारगट जथ्या-जथ्यांनी स्वर्गातल्या सती-सावित्रींच्या टवाळक्या करत फिरत असतात, सोमरस पिऊन शिविगाळ करत असतात, कल्पवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या तपस्व्यांना हुसकावून लावून तिथे नको नको ते चाळे करत धिंगाणा घालत बसतात. संध्याकाळी अंधार पडू लागल्यावर जरा हवा खायला बाहेर पडावे, तर हमखास कुणीतरी डोळे मोडीत, कुंडलं हालवीत शुक शुक करून साद घालणार...
तुम्ही मारे तिकडे स्वर्ग स्वर्ग करून उसासे सोडत बसता, स्वर्गात जागा मिळावी, या आशेने व्रत-वैकल्ये, उपास-तापास, दान-धर्म, जप-जाप्य, तिर्थाटने वगैरे काहीबाही करत बसता, आणि प्रत्यक्षात स्वर्गाची अशी बजबजपुरी होऊन बसली आहे. विष्णूमहाराजांना तर कुठून आपल्याला ती गीतोपदेशाची अवदसा सुचली, असं झालं आहे. खरं म्हणजे श्रीकृष्णाने गीता सांगितली, ती त्यातल्या समत्ववृत्ती, योग, स्थितप्रज्ञता, वगैरेंचे आचरण करून अर्जुनाने युद्ध करावे आणि योग्य वेळी मोक्ष पावून स्वर्गात यावे म्हणून. पण तुम्ही तो गीतापठणाचा शॉर्टकट शोधून काढलात, त्यातून हे संकट निर्माण झालं.
....... युरेका! युरेका!! ... सापडला. माझ्या समस्येवर तोडगा सापडला. अहो, हे लिहिता लिहिताच 'गीतापठणाचा शॉर्टकट' या शब्दांवरून मार्ग सापडला...
एकाद्याची एकदा पापातून सुटका झाली, की मग त्या व्यक्तीच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवण्याच्या कामातून आमची सुटका होते. तेंव्हा सरसकट सगळ्या मनुष्यांची एकदमच जर पापातून मुक्ती झाली, तर एका झटक्यात आमची सुटका होऊन आम्हाला रिटायरमेंट घेता येईल. पण एवढ्या करोडो लोकांसाठी वेश्यांकडले पोपट आणि गीता पाठकांच्या कवट्या कुठून आणायच्या? ... त्यापेक्षा आता तुम्ही असे करा, सगळीकडे लाऊडस्पीकर लावून त्यावर गीतेच्या सीडी वाजवायच्या. बहिरी मंडळी राहून जाऊ नयेत, म्हणून त्या गीता-सीडींचच चूर्ण करून नगर-पालिकेच्या नळाच्या पाण्यातून सगळीकडे पोहोचतं करायचं. श्रीमंत लोक साधं नळाचं पाणी पीत नाहीत, म्हणून अ‍ॅक्वागार्ड सारखं 'गीतागार्ड', 'अ‍ॅक्वागीता' बाटलीबंद पाणी वगैरे बनवायचं. तसंच ते चूर्ण घालून गीताकोला, गीतासोडा, गीतास्प्रे, गीतासोप, गीता उदबत्त्या, गीतापावडर, गीतेचे श्लोक छापलेले टीशर्ट, गीता रिंगटोन, गीता डायलटोन असं सगळं बनवून वातावरण गीतामय करून टाकायचं. त्या गीता-पाण्याची वाफ करून हवेत सोडून द्यायची. असं केलं, की एका झटक्यातच अखिल मानवजातीची पापं विलयाला जाऊन सगळे एकदम स्वर्ग गाठतील. तिकडे नरकात सुद्धा हाच उपाय करून तिकडे खितपत पडलेली मंडळी पण स्वर्गात आणायची. (फार पूर्वी एकदा नरकातले सगळे जीव असे स्वर्गात आले होते, तशी इच्छा धरून एका ब्राम्हणाने गीतेच्या तिसर्‍या अध्यायाचं पठण केलं होतं, म्हणून. अहो, वाचा ना जरा गीता महात्म्य!) सप्तपाताळात या सर्व लोकांसाठी नवीन स्वर्गलोक मयासुराकडून बनवून घेऊन, मग ते नरक वगैरे कायमचे बंद करून यमराज आणि आम्ही सुखानं नंदनवनात रहायला जाऊ.
... एवढा अमोघ उपाय मी तुम्हाला सुचवला खरा, पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तुमची मनुष्यजात महा बेरकी. हा उपाय वाचून तुमच्यातले श्रद्धाळू लोक लगेच लाऊड स्पीकर वाल्यांकडे आणि गीतेच्या सीडीज आणायला निघालेही असतील. पण तुमच्यातल्या अश्रद्ध, नास्तिक, चिकित्सक मंडळींचं काय? पद्म पुराणातील गीतामहात्म्य म्हणजे लबाड पुराणिकांनी रचलेल्या खोट्या-नाट्या गोष्टी आहेत, गीता-पठणाचा आपला धंदा पिढ्यान-पिढ्या चालत रहावा, म्हणून त्या रचल्यात, अशा कवटीतल्या पाण्यामुळे किंवा पोपटपंची ऐकल्याने पापातून कशी सुटका होईल, मुळात अमूक एक गोष्ट म्हणजे पाप, हे कुणी ठरवलं ? गीता ऐकून जर मोक्ष मिळतो, तर मग पूर्वीच श्रीकृष्णाने एकट्या अर्जुनाला ती सांगण्याऐवजी पृथ्वीवरील सर्व लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात का नाही सांगितली? एक ना दोन, अशा हजारो शंका-कुशंका ही नास्तिक, संशयी मंडळी उकरून काढतील. म्हणजे आमचं रिटायरमेंटचं पुन्हा लांबणीवर पडणार....
खरंच, तुम्ही लोक एकंदरित कपाळकरंटेच. पूर्वी तुम्हाला खुद्द ब्रम्हदेवाने वेद दिले, तर तुम्ही ते नुसते पाठच करत बसलात. घनपाठी काय, जटापाठी काय, विचारू नका. तुमच्याकडे एवढे विद्वान द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी असून तुम्हाला साधी आगपेटी, सायकल, बंदूक, आगगाडी असं काहीच बनवता आलं नाही आणि कुण्या टोपीकर, फिरंगी साहेबाने एकादा नवीन शोध लावला, की "हे वेदात आहे" म्हणून तुम्ही डांगोरा पिटणार. त्या जर्मन मोक्षमुल्लर साहेबाने वेद चोरून तिकडे नेले, आणि मग त्यातील पाककृती वाचून त्यांनी विमानं, रॉकेट, अणु-बोंब वगैरे बनवलं म्हणे. भले शाबास. अहो मग तुम्हाला कुणी नको म्हटलं होतं ?
तुम्ही पुण्यातील सर्व विद्वान मंडळी एकदा एकत्र बसून वेदात काय काय आहे, याची संपूर्ण यादी करून द्या बघू, म्हणजे खरोखर नवे शोध कोणते, हे तरी आम्हाला कळेल, तशी नोंद इकडे करता येईल. त्या मोक्षमुल्लर साहेबाच्या फायलीचा घोळ देखील एकदाचा मिटेल. तसंच तुमच्या पुण्यातल्या त्या पु.ना. ओकांचं काय म्हणणं आहे, ते नीट समजून घेऊन काय ते नक्की ठरवा. चर्च म्हणजे चर्चा करण्याची जागा, ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनीति, ख्रिसमस म्हणजे कृष्णमास, व्हॅटिकन म्हणजे वाटिका, ट्रिनिटी म्हणजे त्रिनीति, वगैरे जर सगळं खरं असेल, तर आम्ही उगीचच सगळ्या फायली त्या गॉडकडे पाठवल्या म्हणायच्या. त्या परत मागवून घेऊ, आणि पुनांना इकडे मोठा महाल बांधून देऊ.
अर्थात, तुम्ही सर्व पुणेकर विद्वान एकत्र बसून नीटपणे काही करणार, अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे टोणगा व्यायची वाट बघत बसण्यासारखंच निरर्थक. कारण प्रत्येकजण सर्वज्ञ. स्वयंभू शहाणा. मला कोण काय शिकवणार? अशी प्रत्येकाला घमेंड. त्यामुळे कुणाचं काय म्हणणं आहे, हे नीट खोलात जाऊन समजून न घेता एकदम निषेध, टवाळी तरी करणार, किंवा एकदम हारतुरे घालून पदव्या देत सुटणार. अहो, एवढा तो बुद्धपुरुष ओशो, तुमच्या पुण्यात एवढी वर्षे राहून शेवटी 'नेव्हर बॉर्न नेव्हर डाइड' म्हणूनच गेला. (पुणेरी चलाखी! म्हणजे पुढे काही बोभाटा झालाच, तर मुळात तो जन्मालाच आला नव्हता, म्हणून मोकळे)
osho2 osho

ओशोने आयुष्यभर कृष्णगीता, अष्टावक्रगीता, सगळी उपनिषदं, पतंजली-योगसूत्रापासून पार कबीर, मीरा, बुद्ध, महावीर, झरतृष्ट, नानक वगैरे सगळ्या थोर विभूतीतींचा खरा उपदेश काय आहे, हे नीट समजावून सांगितलं, अपार ग्रंथरचना केली. जगभरातले असंख्य लोक त्याच्याकडून शिकून गेले, पण तुम्हा पुणेकरांपैकी किती जणांनी तो काय सांगतोय, हे जाणून घेण्याची तसदी घेतलीत ? बरं, ते जाऊ द्या. ओशो म्हणजे खरा पुणेकर नव्हे, या सबबीवर तुम्ही दुर्लक्ष केलं असेल, पण तुमच्या पुण्यातले ते ब्रम्हर्षी? ते तर अगदी अस्सल, खास सदाशिवपेठी पुणेकर ना? अहो, पूर्वी त्या विश्वामित्राला केवढे सायास करावे लागले होते ब्रम्हर्षी पदासाठी? ब्रम्हर्षीपद म्हणजे काही तुमच्या 'पद्मश्री' सारखी खिरापत नाही दर वर्षी वाटली जाणारी. लाखो वर्षात एकादाच तपस्वी 'ब्रम्हर्षी' पदाला पहुचतो, तोही मुळात ब्रम्हर्षी असलेल्या कुणी थोर ऋषीने मान्यता दिली तरच. (पण तुम्हा पुणेकरांना कोण काय बोलणार? चार टाळकी जमून एकादी संस्था काढणार आणि कुणालाही हारतुरे घालून कसलीही पदवी देणार)
... हां तर काय सांगत होतो, की त्या अमेरिकेने अब्जावधी खर्चून, यान पाठवून चंद्रावरचे 'दगड-धोंडे' उचलून आणले, त्याचं तुम्ही कौतुक करता, आणि इथे खुद्द तुमच्या पुण्यातले ब्रम्हर्षी घरबसल्या लिंगदेहानं मंगळावर जाऊन आले, तिथली 'खडान-खडा' माहिती काढून आणली, तरी तुम्हाला त्याचं काहीच कौतुक नाही? शेवटी त्यांना बिचार्यांना स्वत:च 'ब्रम्हर्षीची जीवनगाथा' लिहून सगळं तपशीलवार सांगत बसावं लागलं. अरे, निदान दहा-वीस जणांनी त्यांच्याकडून ती विद्या शिकून तर घ्यायचीत, म्हणजे मग कारगिलचं आक्रमण, अतिरेकी हल्ले, असल्या संकटांबद्दल खबरदारी तरी घेता येईल, ते ब्रम्हर्षी आता या वयात एकटे कुठे कुठे जात बसणार?
असो. आता आटोपते घेतो. आज नंदनवनात इंद्रमहाराजांनी कुमारगंधर्वांच्या गायनाची खास बैठक ठेवलीय, तिकडे जायचंय. आमचे इंद्रमहाराज खरे रसिक. त्यांनी नंदनवनात खास 'कलानगरी' वसवली आहे. त्यात तुमचे ते चित्रकार बेंद्रे, आबालाल, बाबूराव पेंटर, गायतोंडे, तसेच कुमार गंधर्व, भीमसेन, वसंतराव, रविशंकर, ओपी नय्यर, मुकेश, गीता दत्त, रविंद्रनाथ, जीए कुलकर्णी, पुलं, अश्या अनेक थोर कलावंतांसाठी खास महाल बांधून दिलेत.
बरंय मंडळी. आमचं ते रिटायरमेंटचं तेवढं नक्की बघा. फार कंटाळलोय आता.
यम यम.
(तुम्ही तिकडे आम राम म्हणता, तसं आम्ही इकडे यम यम म्हणतो).
तुमचा - चित्रगुप्त.

संस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयविनोदसमाजमौजमजाप्रकटनआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

20 Feb 2013 - 3:54 am | रामपुरी

नकळत बर्‍याच लोकांच्या पंचाला हात लागलेला दिसतोय

राजा सोव्नी's picture

20 Mar 2013 - 10:53 pm | राजा सोव्नी

वाहवा.. खूपच छान. आवडले. मस्त.

गामा पैलवान's picture

29 Oct 2016 - 9:55 am | गामा पैलवान

चित्रगुप्त,

तुम्ही इथे दिलेल्या दुव्यावरून हा लेख वाचला.

अन्नात माती कालवली गेली आहे हे मान्य. ते टाळण्यासाठी काही उपाय असता तर तो सांगणं उचित ठरलं असतं. नुसतं चिवडंत बसल्याने अन्न आणि माती वेगळे होणार नाहीयेत! जरी यदाकदाचित वेगळे झाले तरी ते अन्न खाववणार नाहीये. बाकी आपापली मर्जी.

आ.न.,
-गा.पै.

ह्या लेखन प्रकाराला विंग्रजीत "dumbing down" म्हणतात.