मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

चित्रगुप्त · · जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं. त्यांच्या तब्येती ठणठणीत, त्यामुळे दीर्घायुषी. एकंदरीत आम्हाला तेंव्हा फारसं काम नसायचं. यमराज नेहमी रंभा-उर्वशीचे नाच बघत बसायचे. dance असं लाखो वर्षं चाललं. पण पुढे ते नाना धर्मांचं लचांड निर्माण झाल्यावर सगळाच ब्रम्हघोटाळा झाला...विचारूच नका. रात्रंदिवस राबूनही आमचं काम आटोपेनासं झालं.... म्हणजे असं बघा, पूर्वी ब्रम्हा, विष्णू, महेश, यमराज आणि इंद्रदेव सगळं नीट सांभाळून घ्यायचे. पण इंद्र महाराजाचं ते अहिल्या-प्रकरण उघडकीला आल्यानंतर तुम्ही मनुष्यप्राणी बिथरलात, आणि शिवलिंग तेवढं टिकवून ठेवून ब्रम्हा, विष्णू आणि इंद्राला बाद केलंत, आणि स्वत:च्या कल्पनेप्रमाणे गावोगाव खंडोबा, म्हसोबा, विठोबा, बहिरोबा, वेताळ, झोटिंग, बटुभैरव, व्यंकटेश, पांडुरंग, मुंजा, सटवाई, म्हाळसाई, यमाई, कळसाई, जाखणाई, कांकाळी, भद्रकाळी, चांडाळी अशी हजारो दैवतं स्थापन केलीत. याशिवाय गल्लो-गल्ली खुन्या मुरलीधर, तेल्यामारुती वगैरे बसवलेत, आणि आमच्या कामाचा बोझा फारच वाढला. ... म्हणजे कुणी जाखणाईला कोंबडं चढवलं, मांडा हिशेब; कुणी झोटिंगाला नवस बोलला, करा त्याची नोंद; कुणी बटु-भैरवाला कुजका नारळ चढवला, करा पाप-पुण्याची बेरीज-वजाबाकी. एक ना दोन, हजार कटकटी. हे सगळं म्हणे पुण्य-संपादनासाठी. अहो, तुमच्या त्या लबाड पंडे- पुरोहितांनी काहीही थापा मारल्या, तरी पाप-पुण्याचा हिशेब शेवटी मीच ठेवणार ना. मारे खंडोबाला कोंबडी चढवली, वाटलं की फार मोठं पुण्य केलं, स्वर्गात जागा रिझर्व केली. अहो, पण प्रत्यक्षात मी त्याच्या खात्यावर दुहेरी पाप चढवतो. एक तर हकनाक मुक्या प्राण्याचा जीव घेतला म्हणून, दुसरं म्हणजे आपलं काम करवून घेण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून. अगदी देवासाठी म्हणून तुम्ही झाडावरून फुले तोडता वा पिलांसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेले गायी-म्हशींचे दूध तुम्ही पिळून घेता, याचीही नोंद तुमच्या पापातच होते. एकंदरीत तुम्ही मनुष्यप्राणी जेवढे धार्मिक बनत जाता, तेवढी तुमच्या खात्यात पापाचीच भर पडत जाते. पुन्हा एक संधी म्हणून पुन्हा मनुष्य योनीत पाठवल्यावर परत नवीन पापे करत जाता. अहो, म्हणूनच तर पृथ्वीवर मनुष्य प्राण्याची संख्या एवढी वाढत चालली आहे. इतर पशुपक्षी बिचारे सृष्टिक्रमाप्रमाणे सुरळीत जीवन जागून मनुष्यजन्म घेत चाललेत, त्यामुळे त्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. ... आधी वनस्पती, मग जलचर, त्यानंतर पशुपक्षी अश्या ८४ लक्ष योनीत जन्म घेत घेत शेवटी मनुष्य-जन्माला येउन त्या जन्मात यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी अशा अष्टांगयोगाची साधना करून, कैवल्यपदाला पोहोचून जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून सुटका करून घ्यायची, अशी विराट सृष्टीरचना ब्रम्हदेवाने मुळात केलेली, पण हा योग-मार्ग आचरण्याऐवजी तुम्ही भलतीच काल्पनिक दैवतं निर्माण करून त्या जंजाळात अडकलात. बरं,एकीकडे हा हजारो दैवतांचा गोंधळ, तर तिकडे त्या कृस्ती धर्माचं नवीनच प्रकरण उद्भवलं. खरं म्हणजे 'ईशस-कृस्त' हा बिचारा साधा, सरळ निरुपद्रवी माणूस. छान प्रवचनं करायचा, पण त्याला दोषी ठरवून सुळावर चढवलं. jesus ... पुढे पोप-कार्डिनल-बिशप वगैरे धूर्त मंडळीनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेऊन पूर्वीचे सगळे देव मोडीत काढले, आणि गॉड हाच एकमेव, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वर, येशू त्याचा प्रेषित, बायबल हाच काय तो एकमेव खरा धर्मग्रंथ, असे सांगून मारून मुटकून लाखो लोकांच्या गळ्यात क्रूस लटकवले. सुरवातीला तिकडे त्या बायबलातील गप्पा चालून गेल्या, पण पुढे कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, डार्विन वगैरे हुशार लोकांनी बायबलातल्या थापांची बिंगं फोडायचा सपाटा लावला, तशी पाद्र्यांची मात्रा तिकडे चालेनाशी झाली. त्या फ्रेडरिक नित्शेने तर चक्क गॉड मरण पावल्याचंच जाहीर केलं. मग पाद्री मंडळींनी आपला मोर्चा भारत, आफ्रिका, वगैरे देशांकडे वळवून गावाच्या विहिरीत पावाचा वा गोमांसाचा तुकडा टाकणं, इस्पितळं, अनाथालयं चालवणं, अश्या क्लुप्त्या लढवून हजारो लोकांना आपल्या कळपात ओढलं... अहो, त्यांनी गोमांस टाकून विहीर बाटवली, तर तुम्ही लगेच गोमूत्र शिंपडून ती पवित्र नाही का करून घ्यायचीत? त्यांच्याच चर्च वर गंगाजल शिंपडून ती मंदिरं झाली, असं सांगून, त्यांच्या गळ्यातील क्रूस काढून त्या ऐवजी जानवी अडकवून त्यांनाच आपल्या कळपात ओढायचं होतं, पण तुम्ही पडलात अडाणी आणि भित्रट. ... पुढे ते 'ईश-लांब' हे आणखी एक प्रकरण उद्भवलं. त्यांनी तर लोकांना अगदी धारेवरच धरलं. गॉड आणि येशूला पण रद्द करून अल्ला हाच काय तो अगदी खराखुरा, सर्वशक्तिमान, परमदयाळू, सर्वज्ञ असा परमेश्वर, 'महा-मद' हा त्याचा अंतिम प्रेषित, कु-रान हाच एकमेव धर्म ग्रंथ, असं जाहीर करून सक्तीनं सगळ्यांची सुंता करण्याचा सपाटा लावला. अहो, आमची इकडं किती तारांबळ उडाली म्हणून सांगू ! त्या लाखो लोकांच्या जन्मो-जन्मीच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवण्याची मेहनत वाया गेली. तिकडे सुंता झाल्या झाल्या त्यांची इकडली खाती धडाधड बंद करून त्या सगळ्या फायलींचे गठ्ठे त्या अल्लाच्या दफ्तरात पाठवावे लागले. या सर्व गोंधळात कित्येकांचे कागदपत्र गहाळ झाले, त्याबद्दल यमराजांची बोलणी खावी लागली, ती वेगळीच. आता हे अल्ला प्रकरणही जरा मजेशीरच आहे बरंका. म्हणजे असं बघा, की त्या अल्लाबद्दलचा एकमेव पुरावा काय, तर कुराण. आणि हे कुराण कुठून आले, तर म्हणे अल्लाने पाठवले. अजब तर्क आहे बुवा. आणि खरोखरच अल्ला हाच एकमेव, सर्व शक्तिमान वगैरे असला, तर ते सूर्य-प्रकाशासारखं सर्वांना आपोआप कळेलच की, अगदी रोज सकाळ-संध्याकाळ लाऊड स्पीकर लावून घसा खरवडत ओरडून ते सांगण्याची काय गरज? ते गॉड प्रकरणही असलंच. त्या गॉडने म्हणे आधी आदम-ईव्ह ला बनवलं, पण पुढे त्यांनी त्याची आज्ञा मोडली. अहो, मग त्यांना बनवतानाच नाही का आज्ञाधारक बनवायचं ? adam शिवाय तिकडे कुणी सैतान म्हणून दुष्ट आहे म्हणे. आणि तो नेहमी त्या सर्वशक्तिमान, सर्वज्ञ गॉडच्या कामात मोडता घालतो. आता सर्वज्ञच म्हटल्यावर गॉडला आधीच का नकोत कळायला त्या दुष्टाचे बेत? आणि गंमत म्हणजे त्या सैतानाला सुद्धा कुणी बनवला, तर खुद्द गॉडनेच. आता बोला. अहो अश्या वस्तू मुळात बनवाव्यातच कश्याला? आहे ना मूर्खपणाची कमाल? बरं, समजा चुकून बनवला, तरी मग आपला सर्वशक्तिमानपणा वापरून मारून नाही का टाकायचं त्या दुष्टाला? एवढंही जमेना तर मग कसला हो डोंबलाचा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान ? पण त्या गॉड, अल्ला वगैरेंचं एक बरं आहे. एकदाच काय ते पाच-सात दिवस राबून सगळं निर्माण करून टाकलं, नंतर प्रेषीताकरवी धर्मग्रंथ पाठवून स्वत: झोपा काढायला मोकळे. संभवामि युगे युगे वगैरे काही भानगड नाही. शेवटी कधीतरी फ़ुरसतीनं महाप्रलय करून त्यानंतर निवाडा करणार म्हणे (ते महाप्रलयाचं टेंडर केंव्हा निघणार, याची यमराज, भस्मासुर वगैरे वाट बघत बसलेत केंव्हापासून). dooms आमच्यासारखी रोजच्यारोज प्रत्येक मनुष्याच्या पाप-पुण्याचा जमा-खर्च लिहिण्याची भानगड नाही. चर्चमध्ये गुप्तपणे पाप-कबुली करून पाद्री सांगेल, तेवढी रक्कम भरली की झालीच पापातून सुटका. शिवाय अवघा एकच जन्म. करून करून पापं तरी किती करणार माणूस एका जन्मात? जरा नारद मुनिंकडून माहिती काढून त्या गॉड वा अल्लाच्या पदरी एकादी नोकरी मिळाली, तर बघावी म्हणतो. कयामत नंतर जेंव्हा फैसला होणार, तेंव्हाच काय ते काम करावं लागणार. तोपर्यंत आरामशीरपणे पगार खात जन्नत मध्ये फिरदौसी हूरचे नाच बघायचे, आणि शराबे-तहूरचे तर चष्मेच आहेत म्हणे तिकडे. त्यातून हवी तेवढी पीत बसायचं. असो. ... मध्यंतरी आणखी तो एक गौतम बुद्ध होऊन गेला. भला माणूस. तपश्चर्या, ध्यान, विपश्यना वगैरे करून स्वत: आधी बुद्धत्वाला पहुचला, मग हजारो लोकांना ती विद्या शिकवू लागला. त्यानं पण ईश्वर वगैरे प्रकरण मोडीत काढलं, पण जुलूम -जबरदस्ती, सुंता असलं काही नाही. शांतपणे प्रवचन द्यायचं, अहिंसा, सत्य, ध्यान वगैरेंबद्दल सांगायचं, पुढे जायचं. आम्हाला वाटलं चला, आता खरा धर्मात्मा निपजला. हा करील जगाचं कल्याण. होतील सगळी माणसं आता चांगली. तो स्वत: जिवंत असेपर्यंत तसं झालंही, पण मग त्या धर्माला राज्याश्रय मिळाला, जगभर तो फोफावला, तेंव्हा मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या. भिक्षु लोकांना फुकट खायला-प्यायला मिळू लागलं, मान-सन्मान मिळू लागला, तसे सगळे संधिसाधू, पुंड, लबाड धडाधड भिक्षु बनून तिकडं घुसले. (हल्ली तुमच्या राजकारणी लोकांना मान-सन्मान, पैका मिळतो म्हणून सगळे गुंड राजकारणात घुसतात, तसेच झाले) त्यातून आणखी वारांगना, गणिका वगैरे देखील भिक्षुणी बनू लागल्या. मग कसली हो विपश्यना, आणि कसलं ध्यान! सगळा आनंदी आनंद गडे , जिकडे तिकडे चोहिकडे ! पण हा ध्यान, तपश्चर्यावाला धर्म फोफावला, म्हणून सनातनी लोकांच्या उरात धडकीच भरली. ईश्वरच नाही म्हटल्यावर त्याआधारे शेकडो वर्षांपासून रचत आणलेली कर्मकांडंच जर संपुष्टात आली, तर मग धंदा चालणार तरी कसा? प्रत्येकजण झाडाखाली शांतपणे ध्यानमग्न होऊन बसू लागला, तर मग लुबाडायचं कसं आणि कुणाला? मग कारस्थानं रचून शेकडो भिक्षुंना ठार मारलं, त्यांचे आश्रम, ग्रंथ वगैरे जाळून टाकले. मग त्या लोकांनी तिबेट, चीन वगैरेंमध्ये मठ स्थापून बुद्धाच्या शिकवणीचं 'ध्यान' हे सार टिकवून ठेवलं, तेच आता पुन्हा 'झेन' म्हणून जगभर पसरत चाललंय म्हणे. ... तर या सर्व जाळपोळी, कत्तली वगैरेंच्या नोंदी करत बसणं, हे आमचं काम या बुद्ध प्रकरणातूनही वाढलंच. मुळात ही ईशस, महामद, बुद्ध वगैरे मंडळी फार चांगली होती, पण पुढे त्यांच्या संधिसाधू, कपटी अनुयायांनी अर्थाचा अनर्थ करून पार विचाकाच करून टाकला. ... हा, तर काय सांगत होतो की ब्रम्हा-विष्णू-इंद्र यांना तुम्ही विसरलात तरी त्यांनी ते फ़ारसं मनावर घेतलं नाही. उलट बरी पीडा टाळली, असंच त्यांना वाटलं. पण लक्ष्मी-मांसाहेबांना मात्र हे रुचलं नाही. अहो, पृथ्वीवर गल्लो-गल्ली शंकर आणि त्यांच्या गजमुखी चिरंजिवांची देवळं. चक्क शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला बायकांची झुंबड. अभिषेक काय, आरत्या काय, उत्सव काय, विचारू नका (यातून त्या पार्वतीची पण वट स्वर्गलोकात केवढीतरी वाढली ) ... आणि एवढं जगाचं पालन करणाऱ्या विष्णुमहाराजांचं काहीच नाही? मग त्यांनी, म्हणजे लक्ष्मी-मांसाहेबांनी विष्णू महाराजांच्या मागे टुमणं लावून लावून त्यांना पृथ्वीवर अवतार घ्यायला लावले. अवतारांच्या मागचं खरं कारण हे आहे. दैत्यांचा संहार वगैरे उगीच सांगण्यासाठी. अहो, इकडून शेषनागावर पडल्या-पडल्याच सरळ सुदर्शन चक्र टाकून नसते का दैत्य संहारता आले? विष्णुमहाराजही अनंतकाळ पासून शेष- शैय्येवर लोळून लोळून पार कंटाळून गेलेले होते. त्यातून लक्ष्मीमांसाहेब रात्रंदिवस पाय चुरत तोंडाचा पट्टा अखंड चालू ठेवणार. तेंव्हा जरा बदल म्हणून त्यांनी दशावताराचं मान्य केलं. सुरुवातीला मत्स्य, कूर्म, वराह असले सोपे प्रयोग केले. पुढे कृष्णावतारात मात्र ते खूप रमून गेले. krisna1 k2 रासक्रीडा काय, गोपिकांची वस्त्रं लपवणं काय, सोळा हजार एकशे आठ स्त्रिया काय, काही विचारू नका. लक्ष्मीमांसाहेबांना तर कुठून आपण अवतारांसाठी हट्ट धरला असं झालं. त्यामुळे त्यांनी नंतर अगदी सोवळा, विरक्त असा बुद्धावतारच काय तो घेऊ दिला. त्या अवतारात एके रात्री वरून लक्ष्मीमांसाहेब क्रुद्ध नजरेने बघत असलेल्या बघून सुंदर पत्नी सुद्धा त्यांना सोडावी लागली, आणि रानावनात वणवण करावी लागली bu ... आणि मग तो दहावा कल्की अवतार तर राहूनच गेला. कृष्णावतारात त्यांनी अर्जुनाला गीतोपदेश केला. खरं तर अर्जुन हा त्यांचा प्रिय सखा. भक्त. म्हणून त्यांनी हे गुह्यतम ज्ञान फक्त तुलाच देतोय, असं गीतेतच सांगून ते दिलेलं. पण कशी कोण जाणे, या गोष्टीची कुणाला तरी कुणकुण लागली, आणि त्या बहाद्दरानं ते सगळं संभाषण गुप्तपणे टेप करून घेतलं. चला ठीक आहे, आमची काही हरकत नाही, पण पुढे लोक गीतापठण करू लागले, तेंव्हापासून आमची फारच पंचाईत झाली. कशी म्हणून विचारता? अहो, पद्म पुराण वाचा ना जरा, म्हणजे कळेल सगळं. पद्मपुराणाच्या उत्तर खंडातल्या अध्याय १७५ ते २९२ मध्ये गीता महात्म्य सांगितलंय. त्या हकिगती वाचल्यात, तर कळेल आमची कशी पंचाईत झालीय ते. उदाहरणार्थ, गीतेच्या पहिल्या अध्यायाचं महात्म्य सांगणारी ही हकीगत बघा: " सुशर्मा नामेकरून एक विषयासक्त, लंपट, मद्यपी, मांसाहारी, महापापी ब्राम्हण होता. मेल्यानंतर तो बैलाच्या जन्माला आला. पुन्हा मरतेवेळी या बैलाला एका वेश्येने आपले थोडेसे पुण्य दिल्याने त्याची पूर्व-जन्मांची सगळी पातके नष्ट होऊन तो मोक्षाचा अधिकारी झाला. आता त्या वेसवेकडे एवढं पुण्य कुठून आलं म्हणाल, तर तिच्या घरचा पोपट लहानपणी ब्राम्हणाच्या तोंडून गीतापठण ऐकत असे, ते त्याला पाठ झालेले असल्यानेते तो आपल्या पोपट पंचॆत म्हणत बसायचा. ते ऐकून ती वेश्या महापुण्यवान झालेली होती. तसंच गीतेच्या चौदाव्या अध्यायाचं पठण करणार्‍या वत्स नामक ब्राम्हणाच्या एक शिक्ष्यानं पाय धुतल्यामुळे जमीन ओली झालेली होती, त्या चिखलात एक ससा आणि त्याचा पाठलाग करणारी एक कुत्री लोळली (ती दोघे पूर्वजन्मात केशव आणि विलोभना नामक कपटी, दुष्ट, व्यभिचारी, पापी नवरा-बायको होती) आणि तात्काळ जन्मोजन्मीच्या पापातून मुक्त होऊन, दिव्य रूप धारण करून स्वर्गलोकात गेली. भावशर्मा नामक एक मांसाहारी, मद्यपी, व्यसनी, व्यभिचारी ब्राम्हण मेल्यानंतर एक ताड वृक्ष झाला. या वृक्षाखाली एकदा एक जोडपे गप्पा करत बसलेले असता बायकोने "किं तद्ब्रम्ह किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम? असा प्रश्न विचारला. योगायोगाने हा प्रश्न म्हणजे गीतेच्या आठव्या अध्यायातला अर्धा श्लोक असल्याने ताडवृक्ष बनलेला पापी भावशर्मा आणि ब्राम्हराक्षसाचे ते जोडपे यांना घ्यायला आकाशातून एक दिव्य विमान उतरले आणि त्यांना स्वर्गलोकात घेऊन गेले. आणखी एक पिंगल आणि अरुणा म्हणून पापी व्यभिचारी जोडपे मेल्यानंतर पक्षी झाले. हे पक्षी मरताना जंगलात पडलेल्या एका मानवी कवटीत साचलेल्या पाण्यात पडले. ही कवटी 'वट' नामक, गीतेच्या पाचव्या अध्यायाचं पठण करणार्या एका ब्राम्हणाची असल्याने त्या दुराचारी जोडप्याची सगळ्या पापातून तात्काळ मुक्तता झाली. वाचकहो, आता समजलात ना? म्हणजे बघा की वर्षानुवर्षे तपश्चर्या करून, अष्टांग-योगाची साधना करून, बद्ध-मुमुक्षु-साधक-सिद्ध अशा एकेक अवस्था पार करत, हळू हळू शुद्ध, पवित्र, सात्विक होत होत बिचारे तपस्वी मोठ्या सायासानं स्वर्गात येणार आणि तिकडं सगळी गुंड, व्यभिचारी, खुनी, व्यसनी, महापापी मंडळी पोपटाच्या तोंडून गीता ऐकून, चिखलात लोळून, कवटीतील पाणी पिऊन वा अर्धामुर्धा श्लोक ऐकून पापमुक्त होत्साती, स्पेशल विमानाने स्वर्गात येऊन त्या सात्विक तपस्व्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार. अहो, त्या वेश्येचे बघून मग सगळ्याच वेश्यांनी गीतापठणवाले पोपट बाळगायला सुरुवात केली, त्यामुळे त्या सगळ्या साळकाया-माळकाया पण स्पेशल दिव्य विमानातून स्वर्गात हजर झाल्या. ... या सर्वाच्या परिणामी हल्ली स्वर्गात सुद्धा तुमच्या मुंबईतील धारावी सारखी जारावी, फरास रोड, कामातिपुरा, फाकलंदरोड, वगैरे वस्त्या निर्माण झाल्यात. भयंकर गर्दी झालीय स्वर्गात. पापातून सुटका होऊन ही मंडळी स्वर्गात आली खरी, पण चिंतन, मनन, ध्यान, योग वगैरे काहीच केलेलं नसल्यानं मूळ सवयी काही बदलल्या नाहीत त्यांच्या. हे सगळे टारगट जथ्या-जथ्यांनी स्वर्गातल्या सती-सावित्रींच्या टवाळक्या करत फिरत असतात, सोमरस पिऊन शिविगाळ करत असतात, कल्पवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या तपस्व्यांना हुसकावून लावून तिथे नको नको ते चाळे करत धिंगाणा घालत बसतात. संध्याकाळी अंधार पडू लागल्यावर जरा हवा खायला बाहेर पडावे, तर हमखास कुणीतरी डोळे मोडीत, कुंडलं हालवीत शुक शुक करून साद घालणार... तुम्ही मारे तिकडे स्वर्ग स्वर्ग करून उसासे सोडत बसता, स्वर्गात जागा मिळावी, या आशेने व्रत-वैकल्ये, उपास-तापास, दान-धर्म, जप-जाप्य, तिर्थाटने वगैरे काहीबाही करत बसता, आणि प्रत्यक्षात स्वर्गाची अशी बजबजपुरी होऊन बसली आहे. विष्णूमहाराजांना तर कुठून आपल्याला ती गीतोपदेशाची अवदसा सुचली, असं झालं आहे. खरं म्हणजे श्रीकृष्णाने गीता सांगितली, ती त्यातल्या समत्ववृत्ती, योग, स्थितप्रज्ञता, वगैरेंचे आचरण करून अर्जुनाने युद्ध करावे आणि योग्य वेळी मोक्ष पावून स्वर्गात यावे म्हणून. पण तुम्ही तो गीतापठणाचा शॉर्टकट शोधून काढलात, त्यातून हे संकट निर्माण झालं. ....... युरेका! युरेका!! ... सापडला. माझ्या समस्येवर तोडगा सापडला. अहो, हे लिहिता लिहिताच 'गीतापठणाचा शॉर्टकट' या शब्दांवरून मार्ग सापडला... एकाद्याची एकदा पापातून सुटका झाली, की मग त्या व्यक्तीच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवण्याच्या कामातून आमची सुटका होते. तेंव्हा सरसकट सगळ्या मनुष्यांची एकदमच जर पापातून मुक्ती झाली, तर एका झटक्यात आमची सुटका होऊन आम्हाला रिटायरमेंट घेता येईल. पण एवढ्या करोडो लोकांसाठी वेश्यांकडले पोपट आणि गीता पाठकांच्या कवट्या कुठून आणायच्या? ... त्यापेक्षा आता तुम्ही असे करा, सगळीकडे लाऊडस्पीकर लावून त्यावर गीतेच्या सीडी वाजवायच्या. बहिरी मंडळी राहून जाऊ नयेत, म्हणून त्या गीता-सीडींचच चूर्ण करून नगर-पालिकेच्या नळाच्या पाण्यातून सगळीकडे पोहोचतं करायचं. श्रीमंत लोक साधं नळाचं पाणी पीत नाहीत, म्हणून अ‍ॅक्वागार्ड सारखं 'गीतागार्ड', 'अ‍ॅक्वागीता' बाटलीबंद पाणी वगैरे बनवायचं. तसंच ते चूर्ण घालून गीताकोला, गीतासोडा, गीतास्प्रे, गीतासोप, गीता उदबत्त्या, गीतापावडर, गीतेचे श्लोक छापलेले टीशर्ट, गीता रिंगटोन, गीता डायलटोन असं सगळं बनवून वातावरण गीतामय करून टाकायचं. त्या गीता-पाण्याची वाफ करून हवेत सोडून द्यायची. असं केलं, की एका झटक्यातच अखिल मानवजातीची पापं विलयाला जाऊन सगळे एकदम स्वर्ग गाठतील. तिकडे नरकात सुद्धा हाच उपाय करून तिकडे खितपत पडलेली मंडळी पण स्वर्गात आणायची. (फार पूर्वी एकदा नरकातले सगळे जीव असे स्वर्गात आले होते, तशी इच्छा धरून एका ब्राम्हणाने गीतेच्या तिसर्‍या अध्यायाचं पठण केलं होतं, म्हणून. अहो, वाचा ना जरा गीता महात्म्य!) सप्तपाताळात या सर्व लोकांसाठी नवीन स्वर्गलोक मयासुराकडून बनवून घेऊन, मग ते नरक वगैरे कायमचे बंद करून यमराज आणि आम्ही सुखानं नंदनवनात रहायला जाऊ. ... एवढा अमोघ उपाय मी तुम्हाला सुचवला खरा, पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तुमची मनुष्यजात महा बेरकी. हा उपाय वाचून तुमच्यातले श्रद्धाळू लोक लगेच लाऊड स्पीकर वाल्यांकडे आणि गीतेच्या सीडीज आणायला निघालेही असतील. पण तुमच्यातल्या अश्रद्ध, नास्तिक, चिकित्सक मंडळींचं काय? पद्म पुराणातील गीतामहात्म्य म्हणजे लबाड पुराणिकांनी रचलेल्या खोट्या-नाट्या गोष्टी आहेत, गीता-पठणाचा आपला धंदा पिढ्यान-पिढ्या चालत रहावा, म्हणून त्या रचल्यात, अशा कवटीतल्या पाण्यामुळे किंवा पोपटपंची ऐकल्याने पापातून कशी सुटका होईल, मुळात अमूक एक गोष्ट म्हणजे पाप, हे कुणी ठरवलं ? गीता ऐकून जर मोक्ष मिळतो, तर मग पूर्वीच श्रीकृष्णाने एकट्या अर्जुनाला ती सांगण्याऐवजी पृथ्वीवरील सर्व लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात का नाही सांगितली? एक ना दोन, अशा हजारो शंका-कुशंका ही नास्तिक, संशयी मंडळी उकरून काढतील. म्हणजे आमचं रिटायरमेंटचं पुन्हा लांबणीवर पडणार.... खरंच, तुम्ही लोक एकंदरित कपाळकरंटेच. पूर्वी तुम्हाला खुद्द ब्रम्हदेवाने वेद दिले, तर तुम्ही ते नुसते पाठच करत बसलात. घनपाठी काय, जटापाठी काय, विचारू नका. तुमच्याकडे एवढे विद्वान द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी असून तुम्हाला साधी आगपेटी, सायकल, बंदूक, आगगाडी असं काहीच बनवता आलं नाही आणि कुण्या टोपीकर, फिरंगी साहेबाने एकादा नवीन शोध लावला, की "हे वेदात आहे" म्हणून तुम्ही डांगोरा पिटणार. त्या जर्मन मोक्षमुल्लर साहेबाने वेद चोरून तिकडे नेले, आणि मग त्यातील पाककृती वाचून त्यांनी विमानं, रॉकेट, अणु-बोंब वगैरे बनवलं म्हणे. भले शाबास. अहो मग तुम्हाला कुणी नको म्हटलं होतं ? तुम्ही पुण्यातील सर्व विद्वान मंडळी एकदा एकत्र बसून वेदात काय काय आहे, याची संपूर्ण यादी करून द्या बघू, म्हणजे खरोखर नवे शोध कोणते, हे तरी आम्हाला कळेल, तशी नोंद इकडे करता येईल. त्या मोक्षमुल्लर साहेबाच्या फायलीचा घोळ देखील एकदाचा मिटेल. तसंच तुमच्या पुण्यातल्या त्या पु.ना. ओकांचं काय म्हणणं आहे, ते नीट समजून घेऊन काय ते नक्की ठरवा. चर्च म्हणजे चर्चा करण्याची जागा, ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनीति, ख्रिसमस म्हणजे कृष्णमास, व्हॅटिकन म्हणजे वाटिका, ट्रिनिटी म्हणजे त्रिनीति, वगैरे जर सगळं खरं असेल, तर आम्ही उगीचच सगळ्या फायली त्या गॉडकडे पाठवल्या म्हणायच्या. त्या परत मागवून घेऊ, आणि पुनांना इकडे मोठा महाल बांधून देऊ. अर्थात, तुम्ही सर्व पुणेकर विद्वान एकत्र बसून नीटपणे काही करणार, अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे टोणगा व्यायची वाट बघत बसण्यासारखंच निरर्थक. कारण प्रत्येकजण सर्वज्ञ. स्वयंभू शहाणा. मला कोण काय शिकवणार? अशी प्रत्येकाला घमेंड. त्यामुळे कुणाचं काय म्हणणं आहे, हे नीट खोलात जाऊन समजून न घेता एकदम निषेध, टवाळी तरी करणार, किंवा एकदम हारतुरे घालून पदव्या देत सुटणार. अहो, एवढा तो बुद्धपुरुष ओशो, तुमच्या पुण्यात एवढी वर्षे राहून शेवटी 'नेव्हर बॉर्न नेव्हर डाइड' म्हणूनच गेला. (पुणेरी चलाखी! म्हणजे पुढे काही बोभाटा झालाच, तर मुळात तो जन्मालाच आला नव्हता, म्हणून मोकळे) osho2 osho ओशोने आयुष्यभर कृष्णगीता, अष्टावक्रगीता, सगळी उपनिषदं, पतंजली-योगसूत्रापासून पार कबीर, मीरा, बुद्ध, महावीर, झरतृष्ट, नानक वगैरे सगळ्या थोर विभूतीतींचा खरा उपदेश काय आहे, हे नीट समजावून सांगितलं, अपार ग्रंथरचना केली. जगभरातले असंख्य लोक त्याच्याकडून शिकून गेले, पण तुम्हा पुणेकरांपैकी किती जणांनी तो काय सांगतोय, हे जाणून घेण्याची तसदी घेतलीत ? बरं, ते जाऊ द्या. ओशो म्हणजे खरा पुणेकर नव्हे, या सबबीवर तुम्ही दुर्लक्ष केलं असेल, पण तुमच्या पुण्यातले ते ब्रम्हर्षी? ते तर अगदी अस्सल, खास सदाशिवपेठी पुणेकर ना? अहो, पूर्वी त्या विश्वामित्राला केवढे सायास करावे लागले होते ब्रम्हर्षी पदासाठी? ब्रम्हर्षीपद म्हणजे काही तुमच्या 'पद्मश्री' सारखी खिरापत नाही दर वर्षी वाटली जाणारी. लाखो वर्षात एकादाच तपस्वी 'ब्रम्हर्षी' पदाला पहुचतो, तोही मुळात ब्रम्हर्षी असलेल्या कुणी थोर ऋषीने मान्यता दिली तरच. (पण तुम्हा पुणेकरांना कोण काय बोलणार? चार टाळकी जमून एकादी संस्था काढणार आणि कुणालाही हारतुरे घालून कसलीही पदवी देणार) ... हां तर काय सांगत होतो, की त्या अमेरिकेने अब्जावधी खर्चून, यान पाठवून चंद्रावरचे 'दगड-धोंडे' उचलून आणले, त्याचं तुम्ही कौतुक करता, आणि इथे खुद्द तुमच्या पुण्यातले ब्रम्हर्षी घरबसल्या लिंगदेहानं मंगळावर जाऊन आले, तिथली 'खडान-खडा' माहिती काढून आणली, तरी तुम्हाला त्याचं काहीच कौतुक नाही? शेवटी त्यांना बिचार्यांना स्वत:च 'ब्रम्हर्षीची जीवनगाथा' लिहून सगळं तपशीलवार सांगत बसावं लागलं. अरे, निदान दहा-वीस जणांनी त्यांच्याकडून ती विद्या शिकून तर घ्यायचीत, म्हणजे मग कारगिलचं आक्रमण, अतिरेकी हल्ले, असल्या संकटांबद्दल खबरदारी तरी घेता येईल, ते ब्रम्हर्षी आता या वयात एकटे कुठे कुठे जात बसणार? असो. आता आटोपते घेतो. आज नंदनवनात इंद्रमहाराजांनी कुमारगंधर्वांच्या गायनाची खास बैठक ठेवलीय, तिकडे जायचंय. आमचे इंद्रमहाराज खरे रसिक. त्यांनी नंदनवनात खास 'कलानगरी' वसवली आहे. त्यात तुमचे ते चित्रकार बेंद्रे, आबालाल, बाबूराव पेंटर, गायतोंडे, तसेच कुमार गंधर्व, भीमसेन, वसंतराव, रविशंकर, ओपी नय्यर, मुकेश, गीता दत्त, रविंद्रनाथ, जीए कुलकर्णी, पुलं, अश्या अनेक थोर कलावंतांसाठी खास महाल बांधून दिलेत. बरंय मंडळी. आमचं ते रिटायरमेंटचं तेवढं नक्की बघा. फार कंटाळलोय आता. यम यम. (तुम्ही तिकडे आम राम म्हणता, तसं आम्ही इकडे यम यम म्हणतो). तुमचा - चित्रगुप्त.

वाचने 52366 वाचनखूण प्रतिक्रिया 94

तर्री Sat, 01/19/2013 - 21:07
विनोद निर्मिती करताना कुणाच्या भावना दूखावाणार नाहित याची काळजी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आम्ही सहिष्णू आहोत म्हणून वाहायचीच नाही की काय ?

In reply to by तर्री

आनंदी गोपाळ Sat, 01/19/2013 - 21:46
आणि आम्ही सहिष्णू आहोत म्हणून
समजा तुम्ही सहिष्णू आहात. बरं, मग? >> तुमचा प्रतिसादच सांगतोय की तुम्ही मुळातूनच सहिष्णू नाहीत. अन्यथा त्यांच्या काळजी वहाण्याची तुम्हाला काळजी पडलीच नसती. फुक्कट डिंग्या मारू नका सहिष्णूतेच्या. त्यांनी विनोद म्हटलंय तर विनोदाच्या अंगानं घ्या. भावना दुखावल्याचं भारूड पाहून पाहून लै डोक्यात जाया लागलंय आजकाल. तुमची सहिष्णूता घेऊन रस्त्यावर याच! मज्जा येते मग.

In reply to by आनंदी गोपाळ

तर्री Sat, 01/19/2013 - 21:53
तुम्ही मुळातूनच सहिष्णू नाहीत - आपले मत मान्य करायला हरकत नाही. फुक्कट डिंग्या मारू नका सहिष्णूतेच्या - मत समजले. आभार. भावना दुखावल्याचं भारूड पाहून पाहून लै डोक्यात जाया लागलंय आजकाल - सहनशक्ती वाढवा ही नम्र विनंती. तुमची सहिष्णूता घेऊन रस्त्यावर याच ! मज्जा येते मग. - "सहिष्णूता घेऊन रस्त्यावर " विरोधाभास ...मज्जा! बर्र!!

In reply to by टवाळ कार्टा

टक्याशी पूर्ण शमत. सगळ्याच धर्मातल्या टनाटनींना हानलय. त्यामुळे "आम्हांला का मारता? " वाद्यांची बोंब झालीये. बाकी लेख अत्यंत फर्मास जमलाय. चिमटे, कोट्यांनी बहरलाय नुस्ता. लै मज्जा आली वाचायला.

पैसा Sat, 01/19/2013 - 21:12
_/\_ जाता जाता त्या पुणेकरांच्या खोड्या काहून काढल्या वं?

In reply to by अग्निकोल्हा

पैसा Sat, 01/19/2013 - 23:38
त्यांनी एका दगडात बरेच पक्षी मारायचा प्रयत्न केलाय. त्यापैकी अंगावर उलटू शकेल असा सर्वात डेंजर प्रकार म्हणजे पुणेकरांना चिडवणे.

चौकटराजा Sat, 01/19/2013 - 22:04
ओ चित्रगुप्त साह्येब , तुम्ही टंकिग बरपूर केलंय मग तुम्ही तुमच्या जॉबला कंटाळला आहे असं कसं म्हणता राव ? बरं ते जाउ द्या .तुम्ही पुण्यपत्तनी येउन विजय भटकर याना भेटावे. त्याना पटवून एक महासंगणक विकत घ्यावा. मग तुमास्नी काय बी काम उरणार नाही. हे पापपुण्याचे अकौंट काम्पूटर जनरेटेड असलेले सही ची आवश्यकता नाही अशी तळटीप ठोकली की सह्या मारण्याचा त्रास ही वाचला ! हे सगळं असं सोपं आहे पहा, त्यासाठी मंगळ रिटर्न ब्रह्मर्षि कशाला हवेत ! बाकी तिथं कुमार. ओपी, आबालाल , प्यीयेल यांचा सहवास तुम्हाला मिळण्यासाठी वेळ मिळावा म्हून तर आम्ही वरील संगणकाचे आयडेयेची कल्पना तुम्हाला चकट फू सांगितली आहे.

चित्रगुप्त साहेब कुठे फेडाल ही पापं? हापिस स्वतःचच आहे म्हणुन वशिला लाऊन घेणार स्वर्गात जायचा ;). लेखाचा विनोदी अंगानी विचार केला तर आवडला. पण दुसर्याच्या श्रद्धेचा असा अपमान करणं योग्य नाही :). पुणेकरांना चिमटा काढला तरचं लेख प्रसिद्ध होतो असा सर्वांचा समज आहे का?
तुम्ही सर्व पुणेकर विद्वान एकत्र बसून नीटपणे काही करणार, अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे टोणगा व्यायची वाट बघत बसण्यासारखंच निरर्थक.
बाकीच्या शहरातल्या किंवा गावातल्या लोकांना बंदी केलीये का कोणी नीट कामं करायची, का सगळ्याची जबाबदारी पुणेकरांनीच घ्यायची? जे पुणेकरांवर जळतात तेच टिका करतात....कारण एकच त्यांच गेल्या जन्मीचं पुण्य कमी पडलं असाव चित्र्गुप्त महाराजांच्या क्रुपेनी... :).
हे नीट खोलात जाऊन समजून न घेता एकदम निषेध, टवाळी तरी करणार, किंवा एकदम हारतुरे घालून पदव्या देत सुटणार.
लायकीप्रमाणे मान किंवा अपमान करायची जाज्वल्य परंपरा आहे आमची. शहाणा दिसला की शालजोडी देउन सत्कार आणि दिड-शहाणा दिसला की शालजोडी मधले देऊन सत्कार हिच रीत आम्हाला ठावं :).. __ राग मानुन घेउ नये...(आणि वर भेटलात तर पाप-पुण्यात ओळख ठेवा साहेब :) ;) )

मन१ Sun, 01/20/2013 - 00:36
भन्नाट.काही काही फटकारे विशेष आवडले. अगदि ग्राफिटी बनवावेत असे. उदा :- एकंदरीत तुम्ही मनुष्यप्राणी जेवढे धार्मिक बनत जाता, तेवढी तुमच्या खात्यात पापाचीच भर पडत जाते. . फक्त इतकं पचवण्याइतकं आपल्याकडचं वातावरण सध्या तयार आहे का, असं वाटून गेलं. नेपोलियनला फ्रान्स मध्ये वलय आहे. त्याला तिथे राष्ट्रनिर्माता, फ्रेंच जनतेसाठी अस्मितेचा लढा दिलेला शूर, सार्वकालिक श्रेष्ठ पुरुष गणलं जातं. तिथं त्याच्यावर फार्सिकल किंवा विनोदी चित्रपट निघालेला पब्लिकला चालतो, समजून घेतलं जातं. इथं तसं काही होइल का? दा विन्सी कोड हा चित्रपट "ख्रिश्चन देश" अशी मान्यता पावलेल्या कित्येक पाश्चात्त्य देशात व्यवस्थित चालला थेट्रात(खुद्द कॅथलिकांची पंढरी असलेल्या इटाली मध्येही!). आपल्या सहिष्णू लोकांनी मात्र त्याच चित्रपटाला थेट्रातून हद्दपार करायचा प्रयत्न केला.(बहुदा केलंही भारतातून ब्यान.) . तस्मात, काळाच्या फार पुढे न गेलेलेच इष्ट. अतिस्पष्ट बोलतो त्याचा फाशीवाला कोपर्निकस होतो. त्यापेक्षा स्वतःचे डोळे बंद करुन गॅलिलिओसारखं आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत चर्चच्या नजरेत "गुड बॉय" राहिलेलच व्यावहारिकदृष्ट्या इष्ट.

In reply to by मन१

तुषार काळभोर Sun, 01/20/2013 - 07:08
"त्यापेक्षा स्वतःचे डोळे बंद करुन गॅलिलिओसारखं आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत चर्चच्या नजरेत "गुड बॉय" राहिलेलच व्यावहारिकदृष्ट्या इष्ट." +१

राघव Sun, 01/20/2013 - 07:06
सर्व पंढरींची सडकून मारल्या गेलेली आहे. उगाच वाढलेल्या फाफटपसार्‍यावर खूप दिवसांत एवढी चांगली टिप्पणी वाचली नव्हती. लेखन खूप आवडले. धन्यवाद. राघव

बोलघेवडा Sun, 01/20/2013 - 10:16
चित्रगुप्त राव, लेख उत्तम आहे. पण नेहमीप्रमाणे लेखाचा रोख फक्त हिंदू धर्मावरच जास्त आहे. इतर धर्मांवर अगदीच वरवर टीका केलेली आहे. इतर धर्मांवर इतकी खोलवर टीका करून दाखवा मग आम्ही मानू.

In reply to by बोलघेवडा

चित्रगुप्त Wed, 10/02/2013 - 20:24
इतर धर्मांवर अगदीच वरवर टीका केलेली आहे.
अहो, इथे पापपुण्याच्या चोपड्या लिहिता लिहिता कंबरडं मोडतंय, आणखी दुसर्‍या धर्मांची लफडी तपासायला वेळ मिळेल, तर ना. म्हणून म्हणतो, रिटायर होता आले, तर देता येईल जरा लक्ष इकडे तिकडे.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Sun, 01/20/2013 - 13:27
इतिहासाशी संबंधित चुका कोणत्या म्हणता? सुधरवून घेऊ. या लेखात 'इतिहास'असा फारसा नाही, असे वाटते. पुराणे, इतिहास, इ. विषयी काटेकोर माहिती ऐवजी जनमानसातील याविषयीचे ढोबळ ठसे काय आहेत, याचा विचार केला आहे. उदा. 'मोक्षमुल्लर साहेबाने वेद चोरून नेले' तसेच बराचसा कल्पनाविलास आहे, उदा: "त्या अवतारात एके रात्री वरून लक्ष्मीमांसाहेब क्रुद्ध नजरेने बघत असलेल्या बघून सुंदर पत्नी सुद्धा त्यांना सोडावी लागली, आणि रानावनात वणवण करावी लागली..."

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Sun, 01/20/2013 - 14:08
लेखात इतिहास फारसा नाही हे मान्य.
पण हा ध्यान, तपश्चर्यावाला धर्म फोफावला, म्हणून सनातनी लोकांच्या उरात धडकीच भरली. ईश्वरच नाही म्हटल्यावर त्याआधारे शेकडो वर्षांपासून रचत आणलेली कर्मकांडंच जर संपुष्टात आली, तर मग धंदा चालणार तरी कसा?
मूळात ही कर्मकांडे त्याआधी नव्हती. वैदिक काळात असलेल्या यज्ञसंस्कृतीला कर्मकांडे म्हणणे योग्य नाही. चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्म स्वीकारला होता तर त्याचा पुत्र बिंदुसार हा वैदिक धर्माचे पालन करत असे तर बिंदुसाराचा पुत्र अशोक ह्याने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धार्मिक सहिष्णुतेसाठी हे उदाहरण पुरेसे ठरावे. कर्मकांडे प्रामुख्याने मूर्तीपूजा सुरु झाल्यानंतर चालू झाली. गुप्त राजवटीपासून.
कारस्थानं रचून शेकडो भिक्षुंना ठार मारलं, त्यांचे आश्रम, ग्रंथ वगैरे जाळून टाकले. मग त्या लोकांनी तिबेट, चीन वगैरेंमध्ये मठ स्थापून बुद्धाच्या शिकवणीचं 'ध्यान' हे सार टिकवून ठेवलं
अशोकाच्या काळातच बुद्ध धर्माचा प्रसार तिबेट मधे झाला होता. नंतर कुशाणवंशीय कनिष्काच्या काळात बौद्ध धर्म चीन, मंगोलियात पोचला. आश्रम, ग्रंथांचा विध्वंस झाला तो नंतरच्या काळात वायव्येकडून आलेल्या आक्रमकांकडून. अहिंसक असलेले हे धर्म त्या इस्लामी वावटळीपुढे टिकाव धरू शकले नाहीत तक्षशिलेसारखे विद्यापीठ उद्धवस्त झाले. उलट तत्पुर्वी नाशिक लेण्यांसारख्या बौद्ध स्थानांना सातवाहनांच्या वैदिक राजवटीकडून राजाश्रय मिळाला तर अजिंठासारख्या बौद्ध मठांचे उत्तमोत्तम विहार हिंदू वाकाटक राजांनी निर्माण केले होते. बाकी हा घ्या तो राहून गेलेला दहावा कल्की अवतार. :) a

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Sun, 01/20/2013 - 23:03
@वल्ली: तुम्ही दिलेल्या कल्की अवताराच्या मूर्तीत छत्रधारी घोडा दिसतो. खाली असलेली मनुष्याकृती मोतद्दार वाटते. बहुतेक चित्रे वा मूर्ती घोड्यावर बसलेल्या मानवाकृतीच्या असतात: kalki शिल्पशास्त्रात वगैरे याबद्दल काय माहिती मिळते?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Mon, 01/21/2013 - 10:29
कल्की घोड्यावर बसलेल्या आणि लगाम हाती धरलेल्या अशा दोन्ही प्रकारांमध्ये दाखवला जातो. कल्कीच्या वर्णनाप्रमाणे त्याचा देवदत्त नावाचा घोडा पांढरा आहे पण पाषाणी मूर्ती रंगवण्याची पद्धत जुन्या काळात नव्हतीच. घोडा सालंकृत असून त्यावर नेहमीच छत्र दाखवले जाते. सर्वसाधारणपणे शंख, चक्र, गदा, पद्म ही विष्णूमूर्तीची लक्षणे कल्कीच्या मूर्तीतही दिसतात. कमरेला खड़ग़ सुद्धा दाखवले जाते. कल्कीची सर्वात जुनी मूर्ती कधीची आहे हे मात्र मला माहीत नाही. पण मी टाकलेल्या फोटोतील कल्कीची मूर्ती पेशवेकालीन आहे. विकीपेडियावर असलेले हे कल्कीचे चित्र पहा जे मी काढलेल्या फोटोशी बरेचसे जुळतेय. a

In reply to by प्रचेतस

योगप्रभू Mon, 01/21/2013 - 16:14
वल्लीभाऊ, तुम्ही काढलेला हा कल्कीच्या शिल्पाचा फोटो मंदिराच्या ज्या शिल्पपट्टीतून घेतलाय ती दशावतारांची आहे का? की हे स्टँड आउट शिल्प आहे? कारण 'घोडा सालंकृत असून त्यावर नेहमीच छत्र दाखवले जाते', असे आपण नमूद केले आहे. पण माझ्या वाचनात आल्यानुसार छत्रचामरयुक्त सालंकृत घोडा केवळ अश्वमेघ यज्ञाचा असे आणि त्यावर कुणीही (अगदी राजाही) स्वार होत नसे.

In reply to by योगप्रभू

प्रचेतस Mon, 01/21/2013 - 16:32
दशावतारांचीच शिल्पपट्टी आहे. मत्स्यावतारापासून अगदी बुद्ध, कल्कीपर्यंत सर्व अवतार दाखवले आहेत. हे पहा a a

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Mon, 01/21/2013 - 16:36
'टोका' नावाचे लहानसे गाव आहे प्रवरासंगमाजवळ. पुणे औरंगाबाद रस्त्यानजीक. ब्याम्या तू मिसलास याला.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Mon, 01/21/2013 - 17:32
मिसलो बे मिसलो. गॉथम सोडले आणि इटालीत आर्नोकाठच्या कॅफेमध्ये गेलो, पण हे गाव कै पाहिले नाही. :)

In reply to by प्रचेतस

योगप्रभू Tue, 01/22/2013 - 11:19
वल्लीभाऊ, आता हे मंदिर साधारणतः कधी बांधले गेले असावे, हेही ठाऊक असेल तर कृपया सांगा. अर्वाचीन काळातील मंदिर असेल तर आपल्याला असे म्हणता येईल, की दशावतारांच्या कथेचा पगडा त्या काळापर्यंत समाजमनावर रुढ झाला होता. त्यामुळे बुद्ध, कल्की हे अवतारही समाविष्ट झाले असावेत. ही नवे अवतार समाविष्टीकरणाची प्रक्रिया हजारो वर्षांची असू शकेल. भारताबाहेरच्या देशांत काही ठिकाणी अत्यंत प्राचीन अवशेष सापडले आहेत. त्यात विष्णूच्या पहिल्या चार अवतारांचाच उल्लेख आहे (किमान तसा संबंध जोडता येऊ शकेल, अशी ती शिल्पे आहेत.) म्हणजे मग वामन, परशुराम, राम, कृष्ण हे ज्या काळात होऊन गेले त्या त्या टप्प्यात त्यांचे दैवतीकरण करुन त्यांना दशावतारात सामील करुन घेतलेले असू शकेल.

In reply to by योगप्रभू

प्रचेतस Tue, 01/22/2013 - 18:07
हे मंदिर पेशवेकाळातील म्हणजे अर्वाचीनच आहे. मंदिराच्या शिखराचे बांधकाम बरेचसे नाशिकच्या सुंदरनारायण, काळाराम आदी मंदिरांशी जुळणारे आहे. तसेच मूर्तींच्या एकंदर शैलीवरून त्या पेशवेकाळातीलच वाटतात. दशावतारांचा पगडा यादव व तदनंतरच्या काळात तर नक्कीच रूढ झाला होता. भागवत आणि इतर पुराणांमध्ये अवतारांचे उल्लेख आहेत. काही पुराणांमध्ये तर चक्क विष्णूचे १८ आणि २२ अवतार सुद्धा दाखवलेलेले आहेत. इ.स. पू २०० च्या सुमारासच्या नाणेघाटातल्या नागनिकेच्या प्रतिमालेखात दिक्पाल आणि संकर्षण (बलराम) आणि वासुदेव यांना वंदन केले आहे तर इ.स. १३० च्या सुमारास कोरल्या गेलेल्या गौतमी बलश्री हिच्या शिलालेखात गौतमीपुत्राचे वर्णन करताना 'त्याचा(गौतमीपुत्राचा) पराक्रम राम (भार्गव राम), कृष्ण, भीम, अर्जुन यांसारखा आहे व त्याचे तेज नाभाग, नहुष, ययाती, सगर, जनमेजय, राम (हा दाशरथी राम), अंबरीष यांसारखे आहे' असा उल्लेख आला आहे. ह्या दोन्ही प्राचीन शिलालेखांमध्ये मध्ये राम, कृष्ण, परशुराम ही नावे आढळून येतात पण विष्णूचे नाव पर्यायाने दशावतारांचा उल्लेख नाव कुठेही येत नाही. ही नावे केवळ प्राचीन ग्रंथांतील मानवी नायक याच संदर्भाने येतात. वेरूळच्या राष्ट्रकूटकालीन (साधारण इस. ७०० ते ९००) लेण्यांमध्ये बर्‍याच विष्णूमूर्ती कोरलेल्या आहेत. तिथे मात्र मत्यावतारापासून कृष्णावतारापर्यंत अवतार दिसून येतात अर्थात राम कृष्ण ह्या मूर्ती तिथे इतर अवतारांसकट कोरलेल्या मात्र नाहीत याचाच अर्थ राष्ट्रकूट काळात त्यांना विष्णू अवतार मानत नसावेत. भार्गवरामाची मूर्ती मात्र मला येथे दिसली नाही. कदाचित नजरेतून निसटलीही असावी. वराह, वामन आणि नृसिंहाच्या मूर्ती तर येथे कित्येक ठिकाणी आहेत. रामायण आणि महाभारतातील प्रसंग मात्र येथे भरपूर कोरलेले आहेत पण इतर अवतारांबरोबर मात्र ते येथे दिसत नाहीत. येथे बुद्ध आणि कल्कीच्या मूर्ती तर अजिबात दिसत नाहीत (इथल्या बौद्ध लेण्यांमध्ये महायानकालीन बुद्धप्रतिमा आहेत). याचा अर्थ बुद्ध आणि कल्कीचा दशावतारांमध्ये समावेश हा त्यानंतर झाला असावा. अर्थात वेरूळची सर्व लेणी ही शैव असल्याने विष्णूच्या इतर अवतारांचा अभाव येथे असेलही. दक्षिणेतल्या इतक्याच प्राचीन विष्णूमंदिरात असलेल्या दशावतारांबद्दल मात्र मला माहीत नाही. बुद्ध आणि कल्की यांचा दशावतारांमध्ये समावेश नक्की केव्हा झाला हे मात्र सांगता येणार नाही पण त्यांचा उल्लेख अग्नीपुराणात नक्की मिळतो (अग्नीपुराण गुप्त राजवटीतील त्यामुळे हे उल्लेख कदाचित प्रक्षिप्तही असू शकतील किंवा नसतीलही) पण यादवकाळात हे दोन्ही अवतार दशावतारांमध्ये आलेले ठामपणे सांगता येते. त्याआधीचे उल्लेख मात्र नक्की माहीत नाहीत. पण गुप्तकाळात (इ.स. ४०० पासून) हळूहळू वैदिक देवतांचे महत्व लयाला जाऊन शिव, विष्णू आणि त्याच्या अवतारांना प्रमुख दैवतात स्थान मिळायला लागले हे निश्चित.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Tue, 01/22/2013 - 21:23
वल्ली, तुमचा सखोल अभ्यास बघता तुम्ही दशावताराबद्दल सांगोपांग माहिती देणारा सचित्र लेख लिहावा अशी विनंती आहे.

In reply to by अर्धवट

चित्रगुप्त गुरुवार, 01/24/2013 - 02:58
मंडळी, अकराव्या अवताराबद्दल मिपाकरांनी मांडलेला ठराव बघून आम्ही लगेच विष्णुमहाराज आणि लक्ष्मीमांसाहेबांची भेट घेऊन त्यांचेशी याविषीं चर्चा केली. उभयतांना हा प्रस्ताव फारच आवडला असून त्यांनी संमती दिलेली आहे. हा अवतार जन्मापासून लागू न होता काहीसा 'अंगात येणे' प्रकाराशी साधर्म्य असलेला असेल. विष्णुमहाराज म्हणाले की 'कल्की' या अवताराविषयी मनुष्यप्राण्याने काहीही ठाऊक नसता उगाचच 'पांढरा घोडा' वा 'घोड्यावर बसलेला खड्गधारी पुरुष' अशी कल्पना प्रसृत केली. वस्तुतः त्यांचा असा काही बेत नव्हता, व मनुष्याच्या या कल्पनेप्रमाणे अवतार घेण्यात त्यांना स्वारस्थ्य नसल्याने त्यांनी तो घेतलेला नाही. नारदमुनी अधून मधून पृथ्वीतलावरून सिनेमा आणतात. विष्णुमहाराज विशेषतः रजनीकांतचे प्रशंसक असून त्यांची इच्छा अकराव्या अवतारात 'उस्से भी ज्यादा' असे 'हैरत अंगेज' कारनामे करण्याची आहे. यावेळी लक्ष्मीमांसाहेब देखील त्यांचेबरोबर अवतृत होणार असून त्यांना गॉगल घालून, छत्री घेऊन लंडन, पॅरिस वगैरेत गाणी म्हणत फिरण्याची इच्छा आहे. सदर अवताराचे विशेष चित्रीकरण करून ते स्वर्गलोकात दाखवावे, अशीही त्यांची इच्छा आहे. या गाण्यांचे वेळी मागे पाच-पन्नास तरूण-तरूणी कंबरा लचकवण्यासाठी असाव्यात, यासाठी इकडून यक्ष, किन्नर, अप्सरा इत्यादि पण अवतार घेतील. ही सर्व मंडळी पण 'अंगात येणे' या पद्धतीने तात्पुरता अवतार घेतील. त्यासाठी इच्छुक असलेल्या मिपाकरांनी नावे त्वरित नोंदवावीत, ही विनंती.

In reply to by अर्धवट

मालोजीराव गुरुवार, 01/24/2013 - 12:28
ठरावास प्रचंड अनुमोदन...११ व्या अवतारासाठी निवडणुका लागल्यास वल्लोबा ला निवडून देण्यासाठी काहीही करू...मतपेट्या पळवू इतर उमेदवारांचे अपहरण करू....स्वर्गात झेड पी चं वातावरण तयार करून वल्ली ला ११व्या अवतारासाठी निवडून आणू ! जय वल्लोबा,जय म्हाराष्ट्र !

In reply to by मालोजीराव

@मतपेट्या पळवू इतर उमेदवारांचे अपहरण करू....>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif दणकून अणुमोदन.... हे..... दे दणादण... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif @स्वर्गात झेड पी चं वातावरण तयार करून वल्ली ला ११व्या अवतारासाठी निवडून आणू ! >>> जबरदस्त सहमत. http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif जय अगोबा.......! जय महांकाळ..........!

In reply to by अत्रुप्त आत्मा

बाबा पाटील Sat, 01/26/2013 - 15:50
वल्ली आगे बढो....काळजी करु नका आपन आपला पाटीलकीचा सगळा अनुभव घेउन तुमच्या पाठीशी आहोत्, साला दुसर्‍या कुनाला फारमच नाय भरुन देत्,आक्शी बिन इरोध निवडुन आणु बगा....मग बसु वाड्यावर रातच्याला.....

In reply to by बाबा पाटील

भीडस्त Mon, 01/28/2013 - 01:01
झाली....... ???? कंतं गाव म्हंगाले पाटील?? "झाली" आमच्या शिरु(र)उळ लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात कॉपीराईट प्रोटेक्टेड ह्य्रे तव्हा परासलं. (आजच थापलिंग यात्रेला जाऊन आलेला शिरुर लोकसभा मतदार संघ स्थित)शिरुरी मावळा

In reply to by योगप्रभू

हे ज्या काळात होऊन गेले त्या त्या टप्प्यात त्यांचे दैवतीकरण करुन त्यांना दशावतारात सामील करुन घेतलेले असू शकेल. हा हा हा. अशी रोचक विधाने भरपूर मनोरंजन करून जातात हे मात्र खरे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

योगप्रभू Wed, 01/23/2013 - 10:25
हा हा हा. अशी रोचक विधाने भरपूर मनोरंजन करून जातात हे मात्र खरे.>> 'करेल मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' असे सानेगुरुजी म्हणत. माझाही तोच प्रयत्न असतो. :)

अर्धवट Sun, 01/20/2013 - 11:11
चित्रगुप्तसाहेब.. अत्यंत सुंदर लेख.. फारा दिवसात अशी सगळ्या धर्मांची आणी सगळ्या देवांची, अशी बिनपाण्याने केलेली पहायला मिळाली नव्हती, देव देव बोंबलणारे बोंबलूदेत

In reply to by अर्धवट

धन्या Sun, 01/20/2013 - 15:32
तुम्ही आणि अर्धवटराव हे दोन वेगळे आयडी आहात का? कारण अर्धवटराव या आयडीची मते तुमच्या मतांपेक्षा वेगळी आहेत.

तिमा Sun, 01/20/2013 - 13:42
लेखाला अपेक्षित उंची गाठता आली नाहीये. बर्‍याच ठिकाणी भरकटत गेला आहे. काही चित्रं 'चांदोबा' सारखी आहेत ह्या वरील निरीक्षणाशी सहमत. बाकी 'टीआरपी' १०० च्या वर जाईलच. पण तो तर हल्ली कुंकू न लावता सुद्धा जातो.

कारकुनही शेवटी कारकुनच असतो,तो स्वर्गातला असूदे किंवा इकडला,शेवटी गल्यावर बसलेले शेठ काय म्हणतात तेच फायनल,पण शेठकडेही वशिला नसल्या मुळे आम्ही नरकातच दोन गुंठे जागा घेउन ठेवली आहे. त्यामुळे पाप पुण्याचा हिशोब तुम्हाला लखलाभ असो. पैजारबुवा,

निश Mon, 01/21/2013 - 17:21
चित्रगुत्प साहेब, उगाच देवादिकांवर उलटसुलट लिहिण्यापेक्षा माणुस म्हणुन जगण्यावर भर देणारा लेख लिहिला असता तर जास्त चांगल झाल असत. माणुस म्हणुन जगायला जेव्हा शिकु तेव्हाच देवपणाची किंमत कळेल. उगाच फुटकळ विनोदी लेख लिहुन दुसर्‍यांना आदरणीय व श्रध्देचा विषय असलेल्यांची टिंगल करणे हे पण एक महापापच आहे. माफ करा पण जर हा लेख अतिशय खराब आहे.

चित्रगुप्त Mon, 01/21/2013 - 20:05
माणूस म्हणून जगताना झापडं न लावता उघड्या डोळ्यांनी जे दिसलं, तेच मांडलंय इथे. टिंगल करणे हा हेतु नाही. उदाहरणार्थ पद्मपुराणातील गीतामहात्म्याच्या कथा खर्‍या मानल्या, तर त्याचा परिणाम इथे लिहिला, तसा होणे अशक्य नाही. गीतेसारख्या महानतम ग्रंथाबद्दल अश्या कथा प्रसृत करणे, हाच उलट गीतेचा अपमान आहे. श्रद्धा डोळस असेल, तर ती आधी स्वतःलाच तपासेल. पूर्वग्रहरहित मोकळ्या मनाचा माणूस म्हणून सर्व गोष्टींकडे बघण्यातून आणखी विशाल, मजेशीर विश्व उलगडत जाते, हा अनुभव अवश्य घेऊन बघायला हवा. 'राजा नागडा आहे', हे जगाचे दडपण न बाळगणारे बालक म्हणू शकले, तसेच.

In reply to by चित्रगुप्त

निश Tue, 01/22/2013 - 11:13
चित्रगुप्त साहेब, तेच तर ते मी म्हणतो आहे. तुम्हाला जे दिसल अस म्हणता ते तुम्ही मांडल अस म्हणता मग मुळात हेच विसरता की देवाना जग तयार केलेलच नाही आहे ते मुळात देव ही मानव संकल्पना आहे ती मानवानेच तयार केलेली आहे. त्या शक्तिच्या नावावर जर मानवच धिंगाणा करत असेल तर मग ह्या असल्या लेखांनी नाही तर मानवाला सुजाण व चांगला नागरिक करणार्‍या लेखांची गरज आहे. तुमच्या लिखाणात माणसाला सुजाण करण्याची ताकद नक्कीच आहे मग चांगले लेख लिहा की ज्यातुन समाज प्रबोधन होईल. तुमच्या आता लिहिलेल्या लेखानी उलट आस्तिक व नास्तिक वाल्यात अजुनच वाद वाढतिल.

In reply to by निश

यसवायजी Fri, 02/01/2013 - 22:44
ह्या असल्या लेखांनी नाही तर मानवाला सुजाण व चांगला नागरिक करणार्‍या लेखांची गरज आहे
समाज प्रबोधन फक्त लेखातुनच घडते असे नाही. पोवडे, भारुडं, मजेशीर पथनाट्ये (कधी-कधी असे लेख :) ) यांची सुद्दा गरज पडते.. या विनोदी लेखातील (सगळीच नसली) तरी बरीच वाक्य अर्थपुर्ण आहेत.. आनी तेचं काय हाय म्हैत हाय काय? त्ये वेच्यारिक का काय म्हंत्यात त्ये अमच्या सारख्यांच्या डोसक्यावर्न जातय.. हे असलं ब्येस वाटलं बगा..

In reply to by चित्रगुप्त

मूकवाचक Tue, 01/22/2013 - 11:19
श्रद्धा डोळस असेल, तर ती आधी स्वतःलाच तपासेल हा निकष ओशोबापू आणि त्यांचे ब्रह्मघोटाळे यांनाही लावायला काय हरकत आहे?

In reply to by चित्रगुप्त

मूकवाचक गुरुवार, 01/24/2013 - 09:24
काही प्रश्नः १. ओशोंनी एका ब्रिटीश युवतीला तू माझी गेल्या जन्मीची प्रेमिका आहे असे सांगून पटवले होते. पुढे तिचे नाव 'मा योग विवेक' असे ठेवले. हे खरे आहे का? (प्राग्जन्मी ही जोडी मनुष्ययोनीतच होती, मोर-लांडोर होती की अन्य काही असा प्रश्न पडला. असो.) २. जो न जन्मला न मेला, फक्त पृथ्वीला भेट देउन गेला अशा निर्व्याज मनाच्या सरळ साध्या सत्पुरूषाला करोडोंची मालमत्ता आणि ती सांभाळण्यासाठी गुप्ततेत काम करणारे 'इनर सर्कल'का लागावे? परदेशात कम्युन उभे करून (जिथे नेमके काय धंदे चालायचे हे पुढे बाहेर आले, आणि ओशो मात्र नेमके त्याच काळात मौनात होते!) तिथे स्टेनगनधारी खाजगी सुरक्षाव्यवस्था उभी करण्याची गरज का पडावी? ३. साधी दाढदुखी झाली तर 'नायट्रस ऑक्साईड'चे सेवन करण्याची आणि तसे का केले याचे विनोदी स्पष्टीकरण देण्याची वेळ या 'एनलायटंड' गृहस्थावर का यावी? ४. ओशोंनी डंप केलेली गर्लफ्रेंड नैराश्याच्या व्याधीने ग्रासली होती. तिचा शेवट संशयास्पद परिस्थितीत हेरॉईन ओव्हरडोसमुळे झाला अशी नोंद आहे. खरं हाय का? ५. ओशो कम्युनमधे 'तंत्रा ग्रुप' नावाने चालणारा प्रकार नेमका काय होता/ आहे? त्यात भारतीयांना प्रवेश का नव्हता/ नाही? भारतीयांची कामवासना दमित असते, इतरेजन तिचा सहज स्वीकार करतात असे स्पष्टीकरण ओशो देत असत. हे कारण मासिक धर्म सुरू असता स्त्रियांना अपवित्र समजावे यासाठी दिल्या जाणार्‍या कारणांपेक्षाही हास्यास्पद नाही का? ६. जो माणूस मुळात मी कधीच जन्मलो नाही, मेलो नाही असे म्हणतो त्याचा निव्वळ देह चचल्यावर त्याचीच वातानुकुलीत संगमरवरी समाधी बांधणे आणि वर ती मेनटेन करण्यासाठी पैसा, उर्जा आणि मनुष्यबळ इ. चा अपव्यय करणे हास्यास्पद नाही का? ७. ओशो कम्युनमधे अमुक वेळी मरून रोब हवा, तमुक वेळी सफेद रोब हवा, त्यांच्या समाधीस्थानी जाताना सफेद सॉक्सच हवेत इ. कर्मकांडे कटाक्षाने पाळतात. या सगळ्या प्रकाराचे चक्रे, उर्जा, तरंग, स्पंदने असलेच स्पष्टीकरण ओशो स्वतः देत असत. ओशोप्रणित हा सगळा भाग हास्यास्पद नाही का? ८. ओशो कम्युनमधे एच. आय. व्ही. चाचणी करतात, ती तिथेच करावी लागते. इतरत्र केलेली चालत नाही. पण पुण्यात साथ असताना त्याच धर्तीवर स्वाईन फ्लूची चाचणी केल्याचे ऐकीवात नाही. ही गतानुगतिकता, 'ठस बुद्धी', 'बाबा वाक्यं प्रमाणं' वृत्ती नाही का? करोडोंची माया गोळा केलेल्या, ऐषोआरामात राहणार्‍या या माणसाने पुण्यपत्तनासाठी काय केले? तर एका नाल्याचा उद्धार केला! पुण्यपत्तनातल्या चाणाक्ष विद्वानांच्या नजरेतून हे कसे सुटेल? असो. टिंगल करणे असा माझाही हेतू नाही. फक्त राजा नागडा आहे हे सांगण्याचाच प्रयत्न केलेला आहे.

In reply to by मूकवाचक

योगप्रभू गुरुवार, 01/24/2013 - 11:08
मूकवाचक, समजून घ्या, की जिसकी चलती उसकी ** पे मोमबत्ती जलती धर्माचा बाजार आणि पंथांची दुकाने. 'गंदा है पर धंदा है ये'

In reply to by मूकवाचक

चित्रगुप्त Sat, 01/26/2013 - 15:22
या प्रश्नांची उत्तरे 'मरून रोब' धारीच देऊ जाणोत. बाकी चित्रगुप्ताच्या नोंदवहीतील नोंदी हुडकून लवकरच देऊ.

In reply to by मूकवाचक

रामपुरी Wed, 02/20/2013 - 03:50
प्रश्नावली आवडली. बाकी ओशो, मरून रोब इत्यादी बद्दल सखोल (आणि असंबद्ध) माहीती हवी असल्यास इथल्या एका स्वयंघोषित अध्यात्मिक व्यक्तीशी संपर्क साधावा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मोदक Wed, 05/29/2013 - 15:50
अध्यात्मिक व्यक्ती / शक्तीकडून उत्तरे मिळाली का हो..? एक निरीक्षण - जड जड शब्द आणि घुमलेल्या लॉजीकने वाद घालणारे / अकारण अवांतर करणारे स्वघोषीत एन्लाईटन्ड लोक लॉजीकल प्रश्नांपुढे कमालीचा पळपुटेपणा* दाखवतात, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे मिळतील याची अपेक्षा बाळगू नये. फक्त माझा अभ्यास मुदलातच कमी असल्याने याची उत्तरे मिळाली असतील तर मला कल्पना नाही! म्हणून हा प्रपंच! पळपुटेपणा दाखवणे याची माझी व्याख्या, १) एखाद्याचे प्रश्न अनुत्तरीत ठेवणे.... किंवा २) प्रश्न विचारलेल्या प्रतिसादाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे .... किंवा ३) संभाषण सुरू असताना (प्रश्नांची उत्तरे माहिती नसल्याने वा अन्य कारणाने) व्यक्तीगत संदेशामध्ये समोरच्याला ब्लॉक करणे. (हीच व्याख्या बरोबर आहे असा माझा दावा नाही - अन्य कोणाला काही अनुभव आला असल्यास भर घालावी ही विनंती!)

In reply to by चित्रगुप्त

अनिरुद्ध प Wed, 05/29/2013 - 17:06
गीतेसारख्या महानतम ग्रंथाबद्दल अश्या कथा प्रसृत करणे, हाच उलट गीतेचा अपमान आहे,मान्य आहे,परन्तु आपण गीतेच्या टीका ग्रन्थाचे भान ठेवाव्यास हवे होते,उदाहर्णाथ्,ज्ञानेश्वरि ग्रन्थ हा सुद्धा गीतेवरिल प्राक्रुत ग्रन्थ आहे,तसेच पुणेकरन्पैकी लो.टिळक यान्नी लिहिलेला गीतारहस्य हा ग्रन्थ तरि अभ्यासला असता तरि चालले असते असो पद्म पुराण वाचले नसल्याने,जास्त कही बोलु शकत नाही बाकी विडम्बन म्हणुन लेखात हास्य आणण्याचा प्रयत्न ओढुन्ताणुन आण्ल्या सारखा वाटतो.

In reply to by चित्रगुप्त

अनिरुद्ध प गुरुवार, 05/30/2013 - 16:33
गीतेसारख्या महानतम ग्रंथाबद्दल अश्या कथा प्रसृत करणे, हाच उलट गीतेचा अपमान आहे,मान्य आहे,परन्तु आपण गीतेच्या टीका ग्रन्थाचे भान ठेवाव्यास हवे होते,उदाहर्णाथ्,ज्ञानेश्वरि ग्रन्थ हा सुद्धा गीतेवरिल प्राक्रुत ग्रन्थ आहे,तसेच पुणेकरन्पैकी लो.टिळक यान्नी लिहिलेला गीतारहस्य हा ग्रन्थ तरि अभ्यासला असता तरि चालले असते असो पद्म पुराण वाचले नसल्याने,जास्त कही बोलु शकत नाही बाकी विडम्बन म्हणुन लेखात हास्य आणण्याचा प्रयत्न ओढुन्ताणुन आण्ल्या सारखा वाटतो.

शशिकांत ओक Mon, 01/21/2013 - 22:14
आता हे अल्ला प्रकरणही जरा मजेशीरच आहे बरंका. म्हणजे असं बघा, की त्या अल्लाबद्दलचा एकमेव पुरावा काय, तर कुराण. आणि हे कुराण कुठून आले, तर म्हणे अल्लाने पाठवले. अजब तर्क आहे बुवा. आणि खरोखरच अल्ला हाच एकमेव, सर्व शक्तिमान वगैरे असला, तर ते सूर्य-प्रकाशासारखं सर्वांना आपोआप कळेलच की, अगदी रोज सकाळ-संध्याकाळ लाऊड स्पीकर लावून घसा खरवडत ओरडून ते सांगण्याची काय गरज?
बा गुप्त चित्रा सावधान... उगीच असं काही बाही लिहून आफत ओढवून घेऊ नको बा... आजकाल लोकांच्या भावना कचकड्याच्या झाल्या आहेत. केंव्हा तडकतील काही सांगता येत नाही...तिकडे मुंबईत महिला पोलिस निरीक्षक सुजाता पाटील यांच्यावर काय आफत आली आहे माहित आहे ना?...

स्मिता. Tue, 01/22/2013 - 16:23
सर्व धर्मातल्या अनावश्यक कर्मकांडांचा आणि अंधविश्वासाचा चांगलाच समाचार घेतला आहे. पुराणातल्या अगम्य आणि अतर्क्य कथा तर हाय-पॉईंट आहे फक्त (पुणेकरांसहीत) एवढ्या सगळ्यांची वाजवली असताना एकट्या ओशोला का सोडलं ते कळलं नाही.

चित्रगुप्त Wed, 01/23/2013 - 10:15
एवढ्या सगळ्यांची वाजवली असताना एकट्या ओशोला का सोडलं ते कळलं नाही
अद्याप ओशो साहित्य वाचले नसेल, तर अवश्य वाचावे, त्यातून कळेल, एवढेच सुचवू शकतो.

काळा पहाड Sun, 01/27/2013 - 04:48
का.ळा.पहाड सहायक आयकर निरिक्षक कोथरूड शाखा, पुणे २९ विषयः आयकर संदर्भातील प्राथमिक मूल्यांकन संदर्भः आय/पुणे/२९/२०१३/०१/२७/१२१ प्रति, श्री. चित्रगुप्त वरिष्ठ मुनीम, लेखांकन विभाग, यमलोक महोदय, मिसळपाव या संकेतस्थळा शी संबंधीत काही सदस्यांच्या तक्रारी वरून आपल्याशी संपर्क साधण्यात येत आहे. या बाबतीत, प्राथमिक पाहणीवरून खालील गोष्टी लक्षात येत आहेत. १. आपण श्री. यमराज यांच्या "पाप-पुण्य गणना संघ" या प्रा.लि. कंपनी मध्ये वरिष्ठ मुनीम या पदावर गेली लाखो वर्षे कार्यरत आहात असे कळते. या बाबतीत अचूक माहिती आयकर विभागाकडे उपलब्ध नाही. तसेच, आपल्या या लाखो वर्षांच्या नोकरीतील उत्पन्नासंदर्भात कोणताही आयकर आपण भरल्याची शासनाकडे नोंद नाही. सबब आपणास आयकर थकबाकीदार का समजण्यात येऊ नये या विषयी आपल्याकडे विचारणा करण्यात येत आहे. या बाबतीत आपल्यावर गुन्हा नोंदवण्यात येऊ शकतो याची नोंद घ्यावी. २. आपल्याला जर या वर्षांची salary (उत्पन्न) देण्यात आले नसेल तर आपले सेवायोजक/व्यवस्थापक श्री. यमराज (रा. यमलोक) यांच्यावर न्युनतम वेतन अधिनियम २२१(अ) अंतर्गत खटला दाखल होऊ शकतो. तसेच, कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी अंतर्गत भरणा न केल्याबाबत भविष्य निर्वाह कायद्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. ३. आपण काही हिंदू खाती बंद करून त्या फायलीं त्या त्या संबंधित धार्मिक विभागीय लेखांकन विभागाकडे वर्ग केल्याचे कळते. पण या फायली न पोचल्याची तक्रार या विभागांनी भारत सरकारच्या गृहखात्याकडे केली आहे. या सर्व प्रकारात मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा गृह खात्याला संशय असून, अशा सर्व फायलींचे ऑडीट करण्याचा अधीकार सरकारने या विभागाला दिला आहे. तरी आपण आपल्या सर्व फायलीच्या प्रतिलिपी आयकर विभागाच्या कोथरूड शाखे कडे पुढील सात दिवसात वर्ग कराव्यात. ४. जी हिंदू खाती बंद करून त्या फायलीं त्या त्या संबंधित धार्मिक विभागीय लेखांकन विभागाकडे वर्ग केल्या आहेत, त्या खात्यांसंदर्भात हस्तांतरण शुल्क भरल्याची नोंद आयकर विभागाकडे नाही. ५. श्री. इंद्र यांनी नंदनवनात खास 'कलानगरी' वसवली आहे असे कळते. या बाबतीत विशेष नगर वस्ती (special township) ची परवानगी ची नोंद त्या विभागाकडे नाही. तसेच या बाबतीत परवानगी शुल्क व कर भरणा केल्याची नोंद अनुक्रमे महसूल व आयकर विभागाकडे नाही. ६. श्री. इंद्र यांनी चित्रकार बेंद्रे, आबालाल, बाबूराव पेंटर, गायतोंडे, तसेच कुमार गंधर्व, भीमसेन, वसंतराव, रविशंकर, ओपी नय्यर, मुकेश, गीता दत्त, रविंद्रनाथ, जीए कुलकर्णी, पुलं, इ. व्यक्तींसाठी वर्ग-३ प्रकारचे अपार्टमेंट बांधून त्यांना भेट दिल्याचे कळते. नक्की व्यक्तिंची संख्या आयकर विभागाकडे नसल्यामुळे या बाबत खातरजमा केली जात आहे. या व्यक्तींना हे अपार्टमेंट भेट देताना श्री. इंद्र यांनी भेट कर (gift tax) भरल्याची नोंद आयकर विभागाकडे नाही. वरील सर्व विषया संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आपण, आपले कंपनीचे व्यवस्थापक श्री. यमराज व आपल्या कंपनी चे संचालक श्री इंद्र यांनी आजपासून सात दिवसात आयकर विभागाच्या कोथरूड शाखेमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान उपस्थित रहावे. अन्यथा आपल्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. प्रतिलिपी: १. महसूल कार्यालय, हवेली विभाग, पुणे २. विशेष नगर वस्ती कार्यालय, हवेली विभाग, पुणे ३. श्री. इंद्र, कलानगर, स्वर्ग ४. श्री. यमराज, यमलोक

मेघनाद Sun, 01/27/2013 - 19:57
काय पण लेख झालाय....अतिशय मजेदार लेखन झाले आहे.. उ.दा "... या सर्वाच्या परिणामी" पासून ते " त्यातून हे संकट निर्माण झालं." पर्यंतच्या लेखात तर पोट धरून हसलोय. सर्व मि.पा. कारांनि दिलेले प्रतिसाद तर लेखाहून अधिक एंटरेस्टिंग आहेत. "वल्ली" यांना अकरावा अवतार म्हणून सामील करण्याची युक्ती आणि त्यावर मिळालेला पाठिंबा हे सर्व तर अप्रतिम.

शशिकांत ओक Fri, 02/01/2013 - 14:52
श्री. चित्रगुप्त वरिष्ठ मुनीम, लेखांकन विभाग, यमलोक
हे राम, आता हे नवे झेंगट ते काय ... १५ दिवसांची मुदत संपली. आता चित्र 'गुप्त' होऊन आपल्या वकिला समावेत कोर्टात उपटतील याची अनेकांनी व सदरहू अशीलाने नोंद घ्यावी...

अधिराज Fri, 02/01/2013 - 15:04
लेख आहे चांगला. आन् लई टेन्षन घ्यायाच नाही,घेऊन टाका कि व्ही आर एस, तेवढच एकाद्या इलीजीबल कॅंडिडेटला काम मिळल. तुम्ही पाहिजे तर या पुण्यात ट्रेनिंग साठी. हाय काय अन नाय काय.

चित्रगुप्त Mon, 02/18/2013 - 22:50
सर्व वाचक आणि प्रतिसाद-दात्यांचे आभार. लवकरच येत आहे.... "पाचशे वर्षांच्या रोजनिशीतून उलगडलेले मोनालिसाच्या गूढ-स्मिताचे विलक्षण रहस्य"