Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चाणक्य on Sat, 09/24/2011 - 16:24
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
याआधीचा प्रसंगः (हा भाग बर्‍याच दिवसांपूर्वी टाकला होता, म्हणून जसाच्यातसा टंकवत आहे.)
तो मला अचानकच भेटला. साधारण वर्षभरापूर्वीची घटना असेल. खरतर तारीख मा़झ्या लक्षात रहायला हवी होती. कारण त्याची भेट हि मला बर्‍यापैकी बदलून टाकणारी घटना होती. थंडीचे दिवस होते. ऑफिस च्या कामाने वैतागलो होतो. फारच लोड आला होता. त्यातून सततच्या टूरिंगमुळे जरा होमसिक ही झालो होतो. अश्याच एका सोमवारी ऑफिसच्या कामासाठी सकाळी लवकर निघायच होत. रविवारी संध्याकाळी जाम कंटाळा...नव्हे सगळ्याचा अगदी उबग आला होता. रात्री डोळ्याला डोळा काहीलागेना. Mid-life Crisis आयुष्यात फारच लवकर व्हायला लागला होता बहुतेक. कारण आपण काय करतोय? आपल्या आयुष्याचा उद्देश काय वगैरे प्रश्न पडायला लागले होते. तर रात्री डोळ्याला डोळा लागेना. त्यामुळे सहजच बाहेर पडलो. म्हणलं जरा कॉलनीत चक्कर मारु. फिरता फिरता माझी नजर 'त्या'च्याकडे गेली. म्हणजे तेव्हा काही विषेश वाटलं नाही, सर्वसाधारण ईसमासारखा दिसत होता तो. जीन्सची पॅन्ट, शर्ट - बहुदा टी-शर्ट असावा, वर काळपट निळ्या रंगाच जॅकेट, पायात शूज असा पेहराव होता त्याचा. खान्द्यावर एक साधी सॅकही होती. जॅकेटच्या खिशात हात घालून अमिताभ बच्चन स्टाईल फिरत होता. असले सडाफटिंग लोक जनरली रात्री फिरत असतात, त्यामुळे मला काही विषेश लक्ष द्यावं असं वाटलं नाही. मी आपला माझ्या घरासमोर फिरत होतो. दोन तीनदा त्याच्या समोरून गेलो असेन. चौथ्या वेळेला मला त्याने विचारलं, "काय झोप येत नाही वाटत?" ''च्यायला, हा कोण आहे? आणि ईतकी सलगी काय करतोय?' मी मनात. "कोण तुम्ही? कोणाच घर शोधताय का?" मी त्याला विचारलं "नाही. असच फिरतोय" तो उत्तरला. मी म्हणलं कुणीतरी वेडा दिसतोय. सरळ दुर्लक्ष करून पुढे निघालो. "विचित्र वाटलं ना ऐकून?" त्याचा आवाज आला मागून. बोलण्यावरून तरी चांगल्या मरठी घरातला सुशिक्षित वाटत होता. मग असा रात्री अपरात्री का भटकतोय हा. (मी पण तस म्हणल तर रात्री अपरात्रीच भटकत होतो म्हणा) मी मागे वळून बघितलं. तो माझ्याकडे यायला लागला. खरं सांगायच तर जरा टरकली माझी. रात्री अडीच वाजता एक अनोळखी माणूस आणि रस्त्यात दुसरं कोणी नाही. पण का कुणास ठाऊक, जागेवर थांबलो. "हाय. माझ नाव _________. " त्याने हात पुढे करून विचारलं "कुठल्या बिल्डींग मधे राहता?" मी काही हात बित मिळवला नाही त्याच्याशी. "मी ईथला नाही. म्हणजे या कॉलनीत नाही रहात." "मग?" "मी मुळचा ________ चा. " "अच्छा, ईथे कोणा नातेवाईका कडे आलायत का?" "नाही नाही" तो हसत म्हणाला "????" (हा नक्कीच वेडा दिसतोय) "मी फिरत असतो असाच. ईकडे तिकडे" "म्हणजे" मला काही कळेना. "म्हणजे....मी अधून मधून पाय नेतील तिथे जात असतो. तुमचं काय नाव?" "अजय" मी सांगितले "अजयराव, तुम्ही जरा टेन्शन मधे दिसताय" "नाही, काही विशेष नाही" मला काही या अनोळखी इसमाजवळ मन मोकळं करायचं नव्हतं. त्यामुळे संभाषण आटोपतं घेण्याकडेच माझा कल होता. "मी खात्रीने सांगतो, की तुम्ही गेल्या अनेक दिवसात तुमच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढलेला नाहीये." खरं होतं म्हणा ते. चार वर्षापूर्वी लग्नासाठी सुट्टी घेतली होती, त्यानंतर नाही. "तुम्हाला कस कळलं?" मी चेहर्यावर आश्चर्य न दाखवता त्याला विचारलं "तुमच्या चेहर्यावरून दिसून येतय." "हा हा" तो हसला, "सॉरी, खर सांगायचं तर तुम्ही संध्याकाळी कुणाशी तरी फोन वर बोलत होता, तेव्हा कानावर आलं" च्यामारी...... हा काय मला ट्रॅक वगैरे करतोय की काय? "सॉरी, मी तुमच बोलणं ऐकलं", तो पुढे म्हणाला, "पण मी मुद्दामून नाही ऐकलं, तुम्ही रस्त्यावर जोरात बोलत होता, त्यामुळे कानावर आलं" 'आयला फोनवर बोलताना जरा हळू बोललं पाहिजे.' "पण तुम्ही संध्याकाळ पासून ईथे काय करताय?" "अॅलक्च्युअली माझी ट्रेन होती सकाळी ती चुकली, मग ईथेच गावात फिरत राहिलो." "कुठे निघाला होतात?" "जम्मीकुंटा" "जम्मीकुंटा????? कुठे आलं हे" "आन्ध्रात आहे, एकदा कामासाठी गेलो होतो. सुदर गाव आहे. तिथे नदीकाठी शंकराचं मंदीर आहे. तिथे जाऊन रहणार होतो २ दिवस. " "तिथे का?" "सहज, मी म्हणालो ना, पाय नेतील तिथे जातो" "म्हणजे?" "म्हणजे आपल्या मर्जीचा आपण मालक. मनात येईल तिथे जायच" "काय करता तुम्ही?" हा माणूस आयुष्यात काही प्रॉडक्टीव्ह करत असेल, यावर माझा (तेव्हा तरी) अजिबात विश्वास नव्हता "मी ____________ या कन्सल्टन्सी मध्ये ___________ या पोस्ट वर काम करतो" "कन्सल्टन्सी???" मी स्वतः एका कन्सल्टन्सी मध्ये काम करत असल्याने मला जरा कुतुहल निर्माण झालं, "कशाची आहे कन्सल्टन्सी? " मी विचारल "सप्लाय चेन, लॉजिस्टीक" "मग हे अस वेळीअवेळी भटकणं?" "तो माझा स्वतःसाठी काढलेला वेळ आहे... सिगरेट?" त्याने बोलता बोलता सिगरेट शिवगावली. मला कळालं नाही", मी म्हणलो "माहितिये, पहिल्या भेटीत कुणालाच झेपत नाही." त्याने एक कश मारला आणि आकाशाकडे बघत धूर सोडला. आपलं वागणं या माणसाला झेपत नाहीये, याचा त्याला जरा आनंद झाल्यासारखा वाटत होता "मी पण काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच टेन्स्ड असायचो. काम, काम आणि काम. वैताग यायचा, वाटायच पळून जावं कुठेतरी. एकदा म्हणलं, खरच पळून जाउयात. ऑफिस मध्ये सांगितल गावी काका वारलाय, घरी सांगितल की ऑफिसच काम आहे. घेतली बॅग अन निघालो आणि........ आणि माझं बोलण तुम्हाला ईतक बोअर होतय की तुम्हाला झोप आली आहे" "अं... नाही नाही" मी त्याच बोलण ऐकता ऐकता जांभई दिली होती. "तस काही नाही, रात्र बरीच झालीये ना म्हणून." "जा तुम्ही, झोपा. तुम्हाला उद्या सकाळी लवकर जायचय मुम्बईला" "??" "फोन वर ऐकल मघाशी", तो म्हणला. "सॉरी म्हणलं ना" आम्ही दोघही हसलो. "ओ.के. गुड नाईट" , मलाही काही विशेष ईंटरेस्ट नव्हता त्याची स्टोरी ऐकण्यात "गुड नाईट" तो चालू लागला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पुढे चालु: मी घरी आलो. अंथरुणावर पडलो. झोप तर आली होती पण 'त्या'चे विचार मनात येऊ लागले. अस्वस्थता वाढली. वरवर पाहता एका अनोळखी वाटणार्या व्यक्तीची भेट पण आता मात्र मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायची ईच्छा वाटू लागली. 'हा माणूस आपल्यासारखाच कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये मॅनेजर आहे, पण मग असा भणंग कसा? याला असं फिरण्यात रिस्क वाटत नाही का? याचे घरचे याच्या अश्या बेताल वागण्याला परवनगी देत असतील का? मुळात हे असं वेळीअवेळी कुठेही भटकणं याला वेडेपणाचं लक्षण वाटत नाही का? का हा वेडाच आहे अणि मला चुत्या बनवतोय? अनेक विचार मनात घोळू लागले. त्याला परत एकदा भेटायची जबर ईच्छा झाली आणि शेवटी उठलो आणि बाहेर आलो. जरा ईकडे तिकडे बघितलं. माझ्या घराजवळ एक गणपतीचं मंदिर आहे तिथे तो मला दिसला. मंदिराच्या बाहेर बसून आकाशाकडे बघत होता. मी तिकडे गेलो. माझी चाहूल लागताच त्याने वर बघितलं, "अरे, तुम्ही परत आलात?" "हो", मी म्हटल, "तुमच्या बद्दल अधिक जाणून घ्यायची ईच्छा झाली, त्यामुळे परत आलो" "माझ्याबद्दल? का ?" "नाही, तुम्ही असे हे वेळी अवेळी, रात्री अपरात्री कुठे ही भटकता आणि म्हणता की हा माझ्यासाठी म्हणून काढलेला वेळ आहे. जरा विचित्र नाही वाटत तुम्हाला?" "विचित्र तर आहेच" , तो म्हणाला. "मग?" "बसा. सांगतो..." आणि त्याने त्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. "मी मघाशी सांगत होतो ना की पूर्वी माझं वर्क- लाईफ बॅलेन्स पूर्ण गंडलेलं होतं. मग एक दिवस बॅग घेतली आणि घरातून निघालो........... घराबाहेर आलो. कुठे जायचं काय करायच, काहीही ठरवलेल नव्हतं. कसलीही घाई नव्हती. अचानक हलकं हलकं वाटायला लागलं. आता आपण काय करायचं? काहीच माहिती नाही. ईतकं हलक वाटायला लागलं की क्षणभर भिती वाटली की आपल्याला हार्ट अॅहटेक तर नाही ना येणार. कारण ईतकं स्ट्रेस्-फ्री रहायची सवयच नव्हती. स्वतःला कुठेही प्रूव्ह करायचं नव्हतं. कसली डेडलाईन नव्हती मानगुटीवर, कुठलही प्रेशर नव्हतं. मस्त वाटत होतं. काय करायचं, काय करायचं असा विचार करत करत चाललो होतो, ईतक्यात शाळेत जाणारी मुलं दिसली. पेप्सीकोला खात चालली होती. मला माझे शाळेतले दिवस आठवले. आम्ही शाळेत असताना शाळेबाहेर पेप्सीकोला, बर्फाचा गोळा वगैरे मिळायचं. सरळ डावीकडच्या दुकानात गेलो आणि पेप्सीकोला घेऊन खात खात निघालो. वीसेक वर्षांनी पेप्सीकोला खात होतो. भारी वाटलं एकदम. जरा किडिश वाटत होतं पण मनात आत कुठेतरी भारी वाटत होतं. रस्ता जाईल तिथे चालत होतो. दोनेक तास असाच चालत राहिलो. मग एका मंदिरात गेलो बसायला. आतलं वातावरण फार शांत होतं, सात्विक वाटत होतं. मला माझी आजी लहानपणी मंदिरात घेऊन जायची ते आठवलं. ईतक्या वर्षांनी आजीची आठवण आली. आयुष्य ईतकं गतिमान झालय की, रोज दिसणार्या, भेटणार्या माणसांबद्दलच आपण विचार करतो. स्वतःचीच लाज वाटली. थोड्या वेळाने मात्र मंदिरातली शांतता खायला ऊठली. सतत कसल्यातरी ताणात, विचारात जगायची सवय झाली होती ना, ईतकी शांतता कशी सहन होणार. शेवटी परत ऊठलो, अणि चालू लागलो- अक्षरश: डायरेक्शनलेस. नकळत पावलं रेल्वे स्टेशनकडे वळाली. रेल्वे स्टेशन वरचा गोंधळ ऐकून जरा माणसात आल्यासारखे वाटले. प्लॅटफॉर्मवर जयपुरला जाणारी रेल्वे होती. तिकीट काढलं २ ए.सी चं आणि बसलो आत." "च्यायला, अगदीच मनमानी चालला होता कि तुमचा कारभार." मी हसत म्हणलं "मग काय, पण त्यामुळे जाम मजा येत होती. हा आता अनोळखी शहरात चाललो आहे, रहायची सोय होईल का नाही याची जरा काळजी वाटत होती, पण शेवटी मी जयपूर सारख्या ठिकाणी जात होतो, त्यामुळे काही तरी सोय होईलच याची खात्री होती. शिवाय खिशात पैसे, कार्ड सगळं होतं. त्यामुळे विशेष काळजी करायची गरज नव्हती. किंबहुना कशाची काळजी करावी याचीच काळजी करत बसलो होतो. रेल्वे निघाली. खिडकीत बसून बाहेर बघत बसलो होतो. शहरी गजबजाट मागे पडला, ईमारती, पक्के रस्ते, रस्त्यावरची गाड्यांची गर्दी सगळं मागे पडू लागलं. हिरव्या शेताचे पट्टे सुरु झाले. दूर क्षितिजावर डोंगररांगा दिसु लागल्या. मला फार आवडतात त्या बघायला. रेल्वेच्या आवाजाने मस्त ताल धरला होता. मध्येच एखादं स्टेशन यायचं. मग ब्रेक चा कुचुकुचु आवाज करीत रेल्वे थांबायची. तुरळक लोकं चढा-उतरायची आणि प्रवास परत सुरू. प्रत्येकजण कुठेना कुठेतरी चालला होता, आणि एक मी सोडलो तर प्रत्येकाच्या प्रवासाला बहुदा काहि ना काहितरी कारण होतं. माझ्या मनात मध्येच ऑफीस चा विचार यायचा, मध्येच सध्या चालू असणार्‍या प्रोजेक्ट चा विचार यायचा, मध्येच घराबद्द्ल विचार यायचा, मध्येच कॉलेज आठवत होतं, मध्येच लहानपणीच्या काही गोष्टी आठवत होत्या. मी कशाचाच आपणहून विचार करत नव्हतो, बघत बसलो होतो बाहेर. वेगवेगळे विचार येत होते, जात होते. त्यातच एक स्टेशन आलं. बीना नावाचं. स्टेशन कसलं, नुसता फलाटच होता तो. तुरळक लोकं होती फलाटावर. आजुबाजुला छान झाडी होती, जरा दुरवर कुठली तरी नदी नागमोडी वळण घेऊन गेली होती. स्टेशन बाहेरचे रस्ते कच्चे असले तरी स्वच्छ दिसत होते. काय वाटलं कुणास ठाऊक पण गाडीतून उतरलो आणि समोरच्या बाकड्यावर जाऊन बसलो. २-३ मिनिटांनी रेल्वे निघाली....आणि मी ती जाऊ दिली" "जाऊ दिली????" "हो. तिथल एकंदरीत अॅडट्मॉसफिअर मला भुरळ घालून गेलं. मग थोड्यावेळ तिथेच बसलो. अजुन ३-४ गाड्या गेल्या. दुरून गाडी जोरात यायची, फलाटाजवळून जाताना, खडाक- खडाक, खडाक-खडाक असा आवाज करायची. शेवटच्या डब्याचा खडाक्-खडाक आवाज दुरवर घेत जायची. खर सांगतो तुम्हाला, आयपॉड वर गाणं ऐकण्यापेक्षा भारी वाटत होतं. संध्याकाळ व्हायच्या आत ऊठावं म्हणून मग ऊठलो आणि त्या गावात रहायची काही सोय होऊ शकेल का ते चॉकशी करायला स्टेशन बाहेर आलो. थोडी चौकशी केल्यावर एक 'गोपाल्-कॄष्ण' नावाचं हॉटेल मिळालं. रात्र काढली तिथे. मग त्या रात्री त्या गावात असाच भटकत होतो ऊशीरापर्यंत. तेव्हापासून ही अशी रात्री फिरायची सवय लागली. मग पुढचे २ दिवस तिथेच आजूबाजुच्या गावात भटकत काढले. एकदा तर एका मंदिरात झोपलो रात्री. पण रात्री डास आणि गारवा दोघांनी वैताग आणला. तेव्हापासुन मग कॅरीमॅट आणि स्लिपिंग बॅग घेऊन फिरतो." त्याने जवळच पडलेल्या त्याच्या बॅगकडे बोट दाखवले. "आयला अवलीच दिसताय तुम्ही. मग पुढे काय केलंत?" "३ दिवसांनी परत आलो घरी. का कुणास ठाऊक पण एकदम रेफ्रेशड् वाटत होतं. रात्री जेवण झाल्यावर बायकोला सगळं सांगितलं. ती अवाक होऊन माझ्याकडे बघतच राहिली. मला सायकॉलॉजिस्टची गरज वगैरे आहे का असं तिला वाटून गेलं असणार नक्कीच. पण मी मात्र खुप शांत झालो होतो आतून. मुसळधार पाऊस पडून गेल्यावर कसं शांत वाटतं ना तसं. थोड्या वेळाने बायको म्हणाली, "मग बर वाटलं ना ३ दिवस. माझी कटकट नव्हती." मी विचार केला आयला खरच.... बायको काय, कुणाचाच ईंटरफिअरन्स नव्हता आपल्या आयुष्यात गेले ३ दिवस. आपण आपल्या मर्जी चे मालक होतो. कटकट नाही म्हणता येणार पण गेले ३ दिवस आपण आपल्या साठी जगलो. आणि कदाचित हाच बदल आपल्याला रेफ्रेशड वाटण्याचं कारण आहे. त्या रात्री ठरवलं, वर्षातून किमान दोनदा तरी असा वेळ काढायचा...आपल्या स्वतःसाठी....फक्त स्वतःसाठी. त्यानंतर मला लाईफ मोनोटोनस कधी वाटलंच नाही. जेव्हा वाटायला लागेल तेव्हा मी सटकायचो बाहेर." "ईटरेस्टिंग. पण मग घरचे काही म्हणत नाहीत." "अहो वर्षातल्या ३६५ पैकी ३६० दिवस सगळ्यांच्या मनासारखंच करतो की आपण. ४-५ दिवस आपल्या मनासारखे जगलो तर काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगू का, आपल्या मेंदूला अधुन मधून चेंज हवा असतो. तो काम करायला कधीच थकत नसतो, त्याची विश्रांती म्हणजे चेंज. आपल्याला आपलं वाटत असतं की, आपण चुकीच्या प्रोफेशन मध्ये आहोत म्हणून काम एंजॉय करू शकत नाही, आपली खरी आवड वेगळीच आहे वगैरे वगैरे. पण आपल्याला खरतर हवा असतो चेंज. तो मिळाला की मग लाईफ मोनोटोनस वाटत नाही. आणि प्रत्येकाने माझ्यासारखं बाहेर दिशाहीन भटकायला पाहिजे असं काही नाही. बॉटमलाईन ईस, यू मस्ट स्पेंड सम टाईम ईन डूईंग व्हॉट यू लव्ह टू डू. अहो एकदा तर मी नैनिताल ला जाउन बसलो.... मला वाटयचं आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहिलो तर छान कविता वगैरे करू शकतो. ७ दिवस राहिलो. डझनभर कविता लिहिल्या. एकही मनाला भावली नाही. माझी स्वतःची स्वतःबद्दलची समजूत खोटी ठरली. पण तेव्हापासून परत तो विचार मनात आला नाही. नाही तर ईतकी वर्ष कुठेतरी आत सतत हा विचार येत रहायचा. एक लक्शात ठेवा - डू ईट अॅदन्ड गेट रीड ऑफ ईट. " " डू ईट अॅन्ड गेट रीड ऑफ ईट! साऊंड्स ईंटरेस्टींग....तुम्हाला खर सांगु का, मी पण जाम वैतागलोय रुटीन ला. म्हणजे मी कामाला वैतागलोय की अजुन काही तेच कळत नाही. पण..... आय डोन्ट लुक फॉरवर्ड टु गो टू ऑफिस एव्हरी मॉर्निंग्....ऑर रादर आय डोन्ट लुक फॉरवर्ड टु लिव्ह दीज डेज." "अगदी असंच झाल होत माझं पण. सारखी चिडचिड करायचो घरी. पण माझ्या अनुभवा वरून सांगतो, त्याला उपाय हाच आहे. स्वतः करता जरा वेळ काढा. यू नीड अ व्रेक्.....बट फॉर युअरसेल्फ, नॉट फॉर अदर्स. आपण आपल्या रोजच्या व्यापात ईतके गुंतलेले असतो की जरा थांबून विचार करायला जमतच नाही. पण अ‍ॅक्च्युअली ते फार जरूरी असतं. ईन फॅक्ट ते तुमच्या मेंदुला ईफे़टीव्हली विचार करण्यासाठी जरूरी असणारं ईंधन असतं. ते नाही दिलं तर मेंदू ईफेक्टेव्हली कसं काम करणार. हे म्हणजे असंच झालं ना की मला गाडीवर मैलोन्मैल जायचंय पण पेट्रोल भरायला वेळ नाही. असं कसं चालेल. तेव्हा फार विचार करून नका, ३-४ दिवस तुम्हाला जे आवडेल ते करा आणि बघा फरक पडतो की नाही ते." त्यानंतर अजुन थोड्यावेळ आम्ही गप्पा मारल्या. त्याने त्याचं नाव, गाव , पत्ता सगळं सांगितलं. पण मी ईथे सांगणार नाही. कारण त्याने त्या रात्री मला दिलेला विचार मला जास्त महत्त्वाचा वाटतो. शिवाय, 'त्या'ला मला जाति, धर्म, प्रांताच्या पठडी मध्येही बसवायचं नाहीये. एक मात्र नक्की, त्या दिवसापासून माझ्याही विचारसरणी त पुष्कळ फरक पडला. महत्त्वाचं म्हणजे माझे सो कॉल्ड मंडे ब्लूज कमी झाले. आता मधून च एखाद्या रात्री बाहेर चक्कर मारतो..... न जाणो तो परत माझ्या गावात आला असेल तर, निदान भेट तरी होईल्...या आशेने. अजुन पर्यंत तरी परत भेटला नाहीये.........
  • Log in or register to post comments
  • 5437 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Sat, 09/24/2011 - 20:04

Permalink

कथेतला विचार आवडला

सतत धावणार्‍या जगात मधेच थांबायचं हा एकदम वेगळाच विचार आहे खरा! पण अशी विश्रांती सगळ्यानाच आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Sat, 09/24/2011 - 21:17

Permalink

छान लेख - आवडला.

आधीचा भाग वाचलेला आणि तेव्हाही लिखाण आवडलेलं. हा पुढचा भाग काही अंशी अपेक्षित अशाच वळणाने गेला आहे. अर्थात यात व्यक्त झालेला विचार मात्र पटण्यासारखाच आहे. छान लेख - आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 09/24/2011 - 21:22

Permalink

असे विचार मनात येतात खरे..

असे विचार मनात येतात खरे.. करू किती जण शकतात , हे महत्त्वाचे...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Sat, 09/24/2011 - 21:37

In reply to असे विचार मनात येतात खरे.. by भडकमकर मास्तर

Permalink

मास्तर,

करू किती जण शकतात
लाख मोलाचा प्रश्न......
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Sun, 09/25/2011 - 01:14

Permalink

खरच.....

मास्तरांशी पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 09/25/2011 - 01:18

Permalink

अप्रतिम...

कथा खूप आवडली :) ........ सुरेख. वेगळाच अनुभव. परत वाचणार आहे ...... शांतपणे ..... एकटी.... गाणी न ऐकता, शांततेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 09/25/2011 - 01:47

Permalink

मस्त....

मस्त. वर्षातून काही दिवस असे मिळाले तर खरच मजा येईल. पण ही मुभा कुटुंबातील प्रत्येकाला (बायकोला-मुलाला-मुलीला) मिळाली पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sun, 09/25/2011 - 06:54

Permalink

छान मुक्तक आवडलं... पण

छान मुक्तक आवडलं... पण प्रासनं अधोरेखित केल्यासारखं किती जणांना जमु शकेल हा प्रश्न आहे, मला वाट्तं इथल्या सगळ्यांनी याचा प्रयत्न करावा आणि वर्षभरानं इथेच् येउन अनुभव् शेअर करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 09/25/2011 - 07:54

Permalink

लेख आवडला

प्रत्येकामध्येच ही सन्याशी वृत्ती असते. बस् हे सगळं सोडून द्यावं आणि निर्बंध असावं. जिथे आपल्या रोजच्या जीवनाशी ओळख देणाऱ्य खुणा नाहीत अशा कुठच्याही ठिकाणी जावं. किमान काही दिवसांपुरतं तरी. पाण्यात पोहताना क्षणभर बाहेर येऊन मोकळ्या हवेत श्वास घ्यावा. हे जमणं आपल्याला वाटतं तितकं कठीण नाही. कधीकधी त्यासाठी प्रत्यक्ष दूर गावी जाण्याचीदेखील गरज नसते. कुठचा तरी सिनेमा एकट्याने जाऊन बघणं, नुसतंच कॅफेमध्ये बसून आसपास फिरणारी वर्दळ पहात रहाणं, किंवा एखाद्या पुस्तकात गुंगून जाणं यातूनही हे करता येतं. इच्छित स्थानी पोचण्यासाठी आपण मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी हा मार्ग सोडणं, नुसतंच भरकटणं हे आपल्याला खऱ्या मार्गावर नेऊन सोडतं. हे झेन तत्वज्ञानाचं सार आहे. हा मोकळा वेळ मिळावा म्हणून आपण उमेदीची वर्षं कष्ट करतो. मग रिटायरमेंटनंतर चणे आहेत पण दात नाहीत अशी परिस्थिती होते. आणि मग चावता न येणाऱ्या चण्यांचं काय करायचं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यापेक्षा जोवर जोम आहे, इच्छा आहे तोवरच अशी स्वच्छंद भटकंती अधूनमधून करावी.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Sun, 09/25/2011 - 11:19

In reply to लेख आवडला by राजेश घासकडवी

Permalink

गुर्जी

तुमच झेन तत्वज्ञानाचं सार मला फार पुर्वीच पटल आहे आणि म्हणुनच मी ब्-याच वेळा कॅफेमध्ये बसून किंवा नाक्यावर उभा राहुन आसपास फिरणारी (प्रेक्षणिय) वर्दळ सन्याशी वृत्तीने पहात असतो. बॅटरी एकदम सॉलेड चार्ज होते राव लेख आवडला हे वेगळ सांगणे नलगे.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 09/25/2011 - 09:14

Permalink

कथा आवडली. आम्हीसुद्धा

कथा आवडली. आम्हीसुद्धा सहकुटुंब कुठे कुठे भटकुन येतो...तेवढंच छान वाटतं. प्रत्येकवेळी प्लॅन असतोच असं नाही. असो. एका पुरुषाने असं करुन पाहणं शक्य आहे पण एखादी स्त्री समजा...जाउदे..वेगळा विषय होईल. मुळ मुद्दा हा की स्वतःसाठी वेळ दिलाच पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sun, 09/25/2011 - 20:22

Permalink

वाह मजा आला लेख वाचून , बरेच

वाह मजा आला लेख वाचून , बरेच दिवसांनी इतका मिपा-वर इतका छान लेख वाचला गेला. (सर्व लेखकांची क्षमा मागून) सतत चकोरीच्या बाहेर पडायचा प्रयत्न करायचा आणि खूप वेळ चाकोरीबाहेर गेलो तर तिथे न करमुन परत चाकोरीत येण्याची भावनिक गरज छान शब्दात मांडली आहे :) वरती एका लेखिकेनी असा प्रकार स्त्रियांनी केला तर काय होईल असा प्रश्न उपस्थित केला आहे , पण ही भावनिक गरज नुसती भटकण्याची नसून स्वता:ची एक स्पेस अनुभवण्याची आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीला एक तरी चौथा खोली असावी (दिवाण-खाना, बेडरूम आणि स्वयंपाकघर सोडून) या बद्दल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 09/25/2011 - 21:54

Permalink

असं काही करायला मिळण्याच्या

असं काही करायला मिळण्याच्या विचारही आनंद देवून गेला. लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 09/26/2011 - 09:14

In reply to असं काही करायला मिळण्याच्या by रेवती

Permalink

+१

असं काही करायला मिळण्याच्या विचारही आनंद देवून गेला.
+१ असंच म्हणतो अर्थात या स्वच्छंदीपणाचा अतिरेकही कसा होमसिक बनवितो हे ऑनसाईट असाईनमेंटच्या वेळी अनेकांना जाणवत असेलच, निदान मलातरी जाणवलं होतं
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 09/26/2011 - 10:03

In reply to +१ by ऋषिकेश

Permalink

अर्थात या स्वच्छंदीपणाचा

अर्थात या स्वच्छंदीपणाचा अतिरेकही कसा होमसिक बनवितो हे ऑनसाईट असाईनमेंटच्या वेळी अनेकांना जाणवत असेलच त्याची दहशत वाटावी इतका जाणवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Sun, 09/25/2011 - 23:04

Permalink

भटकंती करुन निसर्गात रमणे हा

भटकंती करुन निसर्गात रमणे हा उत्तम उपाय आहे. रोजच्या रटाळ जिवनापासुन सुट्का आणी स्वतासाठी वेळ दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. पण जिवनक्रमातुन वेळ काढणे महत्वाचे!!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 09/26/2011 - 10:06

Permalink

मंडे ब्लूज "दिलकी बात छीनली

मंडे ब्लूज "दिलकी बात छीनली " असे काहीसे वाटले. आज ही सोमवार आहे. अक्षरशः नको वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 09/26/2011 - 10:50

Permalink

लेख / मुक्तक छान. आवडले.

लेख / मुक्तक छान. आवडले. पण प्रत्यक्षात जमू शकेलसे वाटत नाही. असे ४ दिवस कोणालाच न सांगता गायब झालो तर पाचव्या दिवशी मास्तर हापिसात पोकळ बांबुने मारहाण करेल ते वेगळेच शिवाय पाचव्या दिवशी गुलाबी पत्र मिळेल (पिंक स्लिप हो).
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 09/26/2011 - 11:13

In reply to लेख / मुक्तक छान. आवडले. by मृत्युन्जय

Permalink

हापिसातनं सुट्टी घेतली होती

हापिसातनं सुट्टी घेतली होती "त्या"ने असं लिहिलंय ना स्पष्ट!! आणि तुम्ही का न सांगता जाणार? आता घरी काय सांगायचं ते तुमचं तुम्ही पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 09/26/2011 - 11:20

Permalink

मला असं कुठं निघून जायचं फार

मला असं कुठं निघून जायचं फार आकर्षण आणि फार भीती वाटते. परत यावसंच वाटलं नाही तर?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 09/26/2011 - 11:34

Permalink

मला हे लेखन आणि अनुभव आवडले

मला हे लेखन आणि अनुभव आवडले आहे. पूर्वी मी काहीवेळा असा प्रयोग केला आहे. उपयोग होतोच. आता परत करावं का?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/26/2011 - 16:30

In reply to मला हे लेखन आणि अनुभव आवडले by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हो हो

तुम्ही आणि इतर बर्‍याच जणांनी आंतरजालाच्या बाबतीत हा प्रयोग केल्यास उपकार होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Mon, 09/26/2011 - 17:11

In reply to हो हो by परिकथेतील राजकुमार

Permalink

इतर मध्ये स्वतःला मोजलंत ना?

इतर मध्ये स्वतःला मोजलंत ना?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/26/2011 - 17:23

In reply to इतर मध्ये स्वतःला मोजलंत ना? by सविता

Permalink

नाही.

लवकरच आम्हाला हाकलूनच देणार असल्याने मुद्दामुन काही करण्याची गरजच नाही.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com