मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जुहू चौपाटी, सोबत मै शायर बदनाम चे स्वर आणि मी एकटाच..!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज बर्‍याच दिवसांनी संध्याकाळची सवड भेटली.. पोटापाण्याच्या व्यवसायाचं एक महत्वाचं काम होतं अंधेरीला. ते थोडं लौकरच उरकलं. किती वाजले होते माहीत नाही, परंतु आठ वाजून गेले होते. थोडी सवड होती.. डोक्यात 'मै शयर बदनाम..'चे स्वर रुंजी घालू लागले.. तसाच तडक निघालो आणि जुहू चौपाटीवर पोहोचलो. त्या आधी त्याच्या बंगल्याभोवती खुळ्यासारखा थोडा वेळ घुटमळलो.. आणि समोरच असलेल्या चौपाटीच्या पुळणीवर जाऊन बसलो..चौपाटी नेहमीप्रमाणेच गजबजली होती.. पाणीपुरी, भेळपुरी, अन् काय काय! मी मात्र तिथे एकटाच बसलो होतो. वेड्यासारखा, खुळ्यासारखा..! वर्षातनं दोनतीनदा तरी मला असा वेडाचा झटका येतो.. 'मै शायर बदनाम...' च्या जीवघेण्या आर्त स्वरांनी आता माझा संपूर्ण ताबा घेतला होता..! नकळत अश्रू ओघळले आणि खूप मोकळं वाटलं! पंधरा-वीस मिनिटंच तिथे बसलो होतो..जुहू चौपाटी, मुबै, सारी दुनिया, नेहमीप्रमाणेच गजबजली होती, आपापल्या कामात व्यस्त होती..! मी मात्र माझ्या आयुष्याची पंधरा-वीस मिनिटं तिथे घालवली होती..उगाचंच.. त्याचं माझ्यावर कधीही न फिटणारं बरंच कर्ज आहे हे त्याला सांगण्याकरता.. थोडी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता..! -- तात्या अभ्यंकर.

वाचने 8926 वाचनखूण प्रतिक्रिया 31

मुक्तसुनीत Sat, 03/07/2009 - 02:27
तात्या , तुम्ही ज्या अनुभवाचे वर्णन केले आहे त्याचे वर्णन आरती प्रभुंनीच केलेले आहे : "गेले द्यायचे राहुनि , तुझे नक्षत्रांचे देणे ". तुमच्या या अनुभवाचे याहून चपखल वर्णन दुसरे करता येणार नाही. चौपाटीला अचानक जावेसे का वाटले ? इतक्या गर्दीत या बंगाली माणसाच्या आर्त सुरांची सोबत का वाटली ? अश्रू का वाहिले ? याला उत्तर नाही. न जानामि. न जानसि. कोऽपि न जानति. "आज अचानक गाठ पडे. भलत्या वेळी, भलत्या मेळी , असता मन भलतीचकडे ! " कुणी म्हण्टल्याप्रमाणे , या ऋणानुबंधांच्या गाठी आहेत. अशा अचानक ऊर भरून येण्यातल्या अनामिकतेला मानवी संबंधांच्या डिक्शनरीत शब्द नाही. मात्र कधीतरी अशा व्याकूळ होण्याला एक जिवंतपणाची खूण मानायला हवे ! शेवटी आरती प्रभुंचेच शब्द आठवतात : सायंकालीन वेळ अशी ही , कुण्या कविच्या असेलसुद्धा मृत्यूच्याही गीतामधली ! तुमच्या "मैं शायर बदनाम..."च्या आठवणीत बुडून गेलेल्या या संध्याकाळीचे वर्णन असेच करावे लागेल, नाही का ?

In reply to by आनंदयात्री

प्रकटन आणि प्रतिसाद.... उत्कट, अप्रतिम.... हा इफेक्ट जाईपर्यंत आता काही सुचणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Sat, 03/07/2009 - 12:24
अतिशय सुंदर !! प्रकटण आणि सुणित सरांचा प्रतिसादही !!! आवडले तात्याच्या संगितातल्या डेडिकेशनला आणि किशोरदा बद्दलच्या भावणेला सलाम आहे ! त्ये " मै शायर बदनाम " ऐकलं की आमचं बी आसंच काय तरी होतं बा :( (किशोरदा पंखा) टार्‍या

In reply to by टारझन

धमाल मुलगा Sat, 03/07/2009 - 13:42
नेमकं हेच म्हणायचं होतं. बाकी तो एक वेडा फकीर आपल्याच धुंदीत आपल्याच मस्तीत जगत जगत तसाच निघून गेला.... जाताना मात्र हजारो काळीजं तडफडवत गेला. :( ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Sat, 03/07/2009 - 02:46
कलंदर तात्यांची एक मनस्वी आठवण आणि त्यावरचा तितकाच उत्स्फूर्त असा मुक्तरावांचा सुंदर प्रतिसाद! जगाच्या एका टोकाला मुंबईतली चौपाटी आणि दुसर्‍या टोकाला अमेरिकेतला किनारा हे अंतर भौगोलिक आहे भावविश्वातलं नाही. तुमच्या चौपाटीवरल्या त्या आर्त संध्याकाळची वेदना एका क्षणात आंतरजालातून पोचली माझ्यापर्यंत आणि मैं शायर बदनाम ऐकता ऐकता कधी डोळ्यातून पाणी आलं समजलंच नाही! असा एकेक क्षण आयुष्य समृद्ध करुन जातो!! धन्यवाद तात्या आणि धन्यवाद मुक्तराव!!! चतुरंग

In reply to by चतुरंग

हेच म्हणतो ! तात्या बिल वाढवणार आज तुम्ही माझे. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by मुक्तसुनीत

मानस Sat, 03/07/2009 - 02:56
आज तात्यांच्या या अनुभवावरून अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वो भी कुछ ऐसेही दिन थे| ... तात्या ..... क्या बात है? फारच सुरेख आठवण. मला का कुणास ठाऊक शांताबाईंच्या या ओळी सारख्या आठवत आहेत ...... कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ? निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Sat, 03/07/2009 - 09:32
अशा अचानक ऊर भरून येण्यातल्या अनामिकतेला मानवी संबंधांच्या डिक्शनरीत शब्द नाही. मात्र कधीतरी अशा व्याकूळ होण्याला एक जिवंतपणाची खूण मानायला हवे ! मुक्तराव, अतिशय सुरेख प्रतिसाद...! जियो... पंधरा-वीस मिनिटांनंतर तसाच उठलो, थोडा पुढे गेलो. समोर काहीच दिसत नव्हतं. समोर होता तो फक्त अंधारलेला समुद्र! अजून थोडा पुढे गेलो आणि पायाला पाण्याचा स्पर्श झाला..समुद्रही शांतच होता, लाटा त्रासदायक नव्हत्या. त्या हळूच माझ्या पायासोबत खेळल्या आणि मन शांत झालं! तात्या.

अवलिया Sat, 03/07/2009 - 09:16
तात्या आणि मुक्तसुनीत... क्या बात है!!! --अवलिया

प्राजु Sat, 03/07/2009 - 09:57
ही गाणी अशीच असतात. आज मला तसंच अचानक ये नयन डरे डरे.. ऐकावं वाटलं.. हेमंत कुमार यांनी जीव ओतून गायलेलं हे गाणं.. त्यात सुद्धा नयन या शब्दाचं उच्चारणं जीवघेणं आहे... गाणं ऐकताना डोळे कधी आपण मिटतो ते समजत नाही.. आणि गाणं संपलं की, एका वेगळ्याच धुंदीतून अलगद बाहेर येतो आपण. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

रामदास Sat, 03/07/2009 - 10:03
सांगता येणं कठीण आहे. तात्या, तुम्हाला मै शायर तो नही आठवलं आणि मला गँबलरचं एक गाणं आठवलं.नीरजनी लिहीलेलं हे सुंदर गाणं किशोरकुमारनी जीव ओतून गायलं आहे. हम तो मुसाफीर है कोई सफर हो हम तो गुजर जाएंगे ही लेकिन लगाया है जो दाव हमने वो जीत कर आयेंगे ही.. प्रत्येक सुंदर ओळ आग लावते. दुनीया से जीते और तुझसे हारे यू खेल अपना हुआ.

विसोबा खेचर Sat, 03/07/2009 - 10:53
क्या बात है रामदासभाऊ! जियो..! ही चित्रफीत पाहा. काही लोकं त्याच्यासोबत गायली आहेत, नाचली आहेत! कोण आहेत ही मंडळी? अगदी सर्वसामान्य पब्लिक. पण त्याच्यावर, त्याच्या गाण्यावर प्रेम करणारी! :) आपला, (बनारसी पानाचा प्रेमी) तात्या.

बोका Sat, 03/07/2009 - 11:47
शोलों पे चलना था, कांटों पे सोना था और भी जी भरके, किस्मत पे रोना था जाने ऐसे कितने, बाकी छोडके काम , मैं चला .. या ओळी किशोरदांच्या तोंडून ऐकल्यावर आणी काय होणार ..

मृदुला Sun, 03/08/2009 - 03:33
लेख वाचला; गाणे ऐकले; लेख पुन्हा वाचला. मग काय ते कळले. मुक्तसुनीत यांच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत.

गणपा Sun, 03/08/2009 - 21:33
तात्या खुप छान लिहिलय. किशोर सारखा कलावंत परत होणे नाही. त्याच्यी सर्वच विरह गीत काळजाचा ठाव घेणारी. आवांतर : महाविद्यालयात असताना या विरह गीतांनी इतक वेड लावल होत की, मी एका डायरित सगळी गाणी उतरवुन घेतली होती. एकांतात मी ती गाणी गुणगुणत बसायचो. एकदा माझ्या आई आणि बहिणीच्या हाती ती डायरी लागली. त्याना वाटल की पोरग गेल हातातुन, प्रेमभंग..वगैरे झाला की काय.

In reply to by गणपा

विसोबा खेचर Mon, 03/09/2009 - 00:28
मी एका डायरित सगळी गाणी उतरवुन घेतली होती. एकांतात मी ती गाणी गुणगुणत बसायचो. सुरेख..! तात्या.

मॅन्ड्रेक Mon, 03/09/2009 - 13:31
इतका सुरेख प्रतिसाद असताना वेगळं काय लिहिणार.... सहमत असेच म्हणतो at and post : janadu.