मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

!! एक स्वप्नपूर्ती !! झिरो बजेट नैसर्गिक शेती

अजित पाटील · · कृषी
तिन वर्षापूर्वी शेतीमध्ये नवीन काहीतरी सुरू करायच्या उद्देशाने शोध घ्यायला सुरुवात केली. इंटरनेट वर बरीच काही नवीन प्रोजेक्ट्स उपल्बध होते त्याचा अभ्यास सूरु झाला पण कोणाचा प्रोजेक्ट सध्याच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीला अनकुल असा मला तरी वाटत नव्हता, कारण आपला शेतकरी बांधव कर्जाच्या अजगराच्या विळख्यात अडकला आहे तो जितका त्यातून सुटण्याचा प्रयन्त करेल तितका जास्त त्याच्या घट्ट अश्या विळख्यात अडकत आहे असे मला वाटते पण याला काहीतरी उत्तर असेल का म्हणून माझी शोध माहीम सुरूच ठेवाली. एक दिवस इंटरनेट वर शून्य खर्चाची नैसर्गिक शेती बदल माहिती मिळाली . पहिल्यादा वाचल्यावर थोडे मनाला पटलेच नाहीं करण आपण एकीकडे शेतकरी आत्महत्या बदल दररोज मीडिया न्यूज पेपर इंटरनेट वर वाचतो, की शेती खर्चिक असल्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. मला सुरवातीला हे थोडे जादूच्या गोष्टी सारखे वाटले. कारण जो तो नवीन काहीं शोधून शेतकरायला लुबाडण्याचे षड्यंत्रत विकत होते. अमुक एक आमच्या कढून विकत घ्या आणि भरगोस फायदा मिळवावा जो की शेतकऱ्याला कधीच मिळाला नाहीं, पण या सर्वाचे मात्र भरगोस फायदा झाला असो.... उचुकता म्हणून वाचन सुरू केले आणि आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजीनि शोधलेल्या या अनोख्या आशा शेती प्रणाली वाचून भारावून गेलो. पण पुस्तकात शेती ही नेहमी सोपी वाटते प्रत्यक्षात कुठे आणि हे सर्व कसे समजेल याचा शोध सुरु झाला. एक दिवस असेच माझा मित्र विनोद पाटील शी बोलताना त्याने त्याचा मित्र संतोष याच्याबद्दल माहिती दिली जो काही दिवसांपासून याचा अभ्यास आणि अवलंब सुरू केला आहे . मग काय लगेच फोन करून मी , विनोद पाटील आणि विजय भेटायला गेलो. आमची चर्चा सुरू झाली संतोष ने प्रथम त्याचा या प्रवासाबद्दल माहिती दिली आणि नंतर या शेती प्रणालीबद्धल माहिती द्यायला सुरुवात केली आम्ही सर्व काही ऐकत होतो एक एक गोष्टी जादू सारखी वाटत होती. संतोष भारावून सर्व काही सांगत होता आम्ही मध्ये मध्ये आमचे प्रश्न विचारत होतो व संतोष त्याला योग्य ते उत्तर देत होता . 2 ते 3 तास कसे गेले समजलेच नाही संतोष ने आम्हाला त्याच्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये सामील करून घेतले व युट्युब (Youtube) वरील मिलिंद काळे यांनी रेकॉर्ड केलेली गुरुजीच्या शिबिराच्या विडिओ चा लिंक दिल्या . हे विडिओ म्हणजे जणू अल्लीबाबाच्या गुहेचा दरवाजा उघडावा आणि आतील हिरे माणिक दिसावे असे झाले . मग काय वेळ मिळेल तसे विडिओ बघायला सुरवात झाली. मी शेतीमध्ये खुप काही काम केले नसल्यामुळे समजायला थोडे अवघड जात होते पण गुरुजी एक एक मुद्दे पूर्ण मुद्देशीर समजवत होते.ऑफिस मध्ये मी आणि सत्यजित आणि विश्वचेतन चहाच्या सुटीत आम्हाला न समजलेल्या गोष्टी बदल बोलू लागलो संतोष ला कॉल करू लागलो ग्रुप मध्ये विचारू लागलो ग्रुप मध्ये केशव जी आम्हाला मार्गदर्शन करू लागले आणि आमचा प्रवास सुरु झाला.

इथे पर्यंत सर्व काही सुरळीत सूर होते पुढील लढाई अवघड होती ज्याची कल्पना संतोष ने आधीच दिली होती, की आपल्या घरच्यांना हे सर्व समजून सांगणे आणि शेती मध्ये अवलंब करणे. पण जेव्हा तुमचो इच्छा शक्ती असते तेव्हा मार्ग मिळतो. लॅपटॉप वर सर्व विडिओ डाउनलोड केली आणि गावी गेल्यावर आमचे मोठे बंधू आनंद पाटील याला ते दाखवू लागलो. त्याचा शेती माधील अनुभव खुप आहे तो खुपच पद्धशिर रित्या शेती करतो पण रासायनिक तो गुंठ्याचा अडीच ते 3 टन उसाचे उत्पन्न घेतो. त्याला त्याबद्दल बक्षीसीज पण मिळाले आहे. गावातील आणि भागातील बरीच शेतकरी त्याचा शेतीसाठी मार्गदर्शन घेतात . त्याला माझ्या सारख्या सॉफ्टवेअर मध्ये काम करण्याने ज्याला शेती मध्ये कधीच आवड नव्हती त्याने शेती बदल सांगणे खुपच अवघड गोष्ट होती. प्रत्येक वेळी थोडे थोडे विडिओ दाखवू लागलो त्याचें प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयन्त करत होतो काही उत्तरे आमच्या ग्रुप मधून संतोष केशव देत होते. भाऊ मला बरेच उदाहरणे देत होता की अश्या सारख्या पद्धती कश्या गावातील लोकांनी अवलंबून त्याचा तोटा झाला आहे . आपल्या समाजात चांगली गोष्ट प्रसार व्हायला वेळ लागतो पण अपयशाची गोष्ट लवकर प्रसार होती . मी त्याला विचारले कि ज्याचा तोटा झाला त्याने सर्व पद्धतीचा अवलंब योग्य पद्धतीने केला होता का ? ही वरील लढाई सुरू असताण मी माझ्या फ्लॅट मधील गच्चीवर माझे प्रयोग सुरू झाले. सुरवातीला माझ्या मंडळींना तयार करणे अवघड होते तिला तशी आवड होती पण फुलाच्या बागेची पण मी त्याला विरोध केला होता करण ती झाडे फार काळ टिकत न्हवती. मग तिनेच आणलेल्या कडीपत्याच्या बियापासून सुरवात केली कारण दररोज नेहमी फोडणी देताना त्याची आवर्जुन आठवण यायची कारण तो एक तर सुकलेला असायच किंवा नसायचा. गावाकडून माती आणली होती बिया टाकल्या या अनोख्या प्रोयोगाची सुरवात झाली. आता जीवामृत कोठून कसे आणायचे हा मोठा प्रश्न होता पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा निसर्ग तुम्हाला आवश्यक गोष्टी चा पुरवठा करू लागतो. माझे सायकलिंग नुसतेच सुरू झाले होते आणि आम्ही घोरवडेश्वर ला जायला सुरवात केली होती तिथे तेथील एक रहिवाशी दररोज त्याच्या देशी गायी डोंगरावर चरायला सोडत होते. त्याची ओळख करून त्याच्या कडून शेन आणि गोमूत्र मिळाले ते घेऊन पहिल्यादा फ्लॅट मध्ये जिवामुर्त तयार झाले मला शेणाच्या वासाची सवय हाती पण सौ ना थोडा त्रास झाला. आमचा कडीपत्ता चे रोप तयार होते वांगी टॅमोटो भेंडी लावली होती सर्वाना जीवामृत दिले आणि काहीच दिवसात आम्हाला या पद्धतीची प्रचीती यायला सुरुवात झाली मुलांना पण खुप आनंद होत होता घरी असे काहीतरी पाहायला मिळत होते.

पहिली परीक्षा पास झालो होतो पुढील लढाई अवघड होती मागील वर्षी योगायोगाने एक 4 ते 5 गुंठाचा प्लॉट रिकामा होता संधी चालून आली होती मी भावाला बोललो आपण या प्लॉट मध्ये zbnf ने ऊस आणि भाजीपाला घेऊ. मी त्याला विचारले तुझा या शेतात रासायनिक शेतीत किती ऊस निघेल तो बोलला 5 ते 6 टन मी बोललो जर हा प्रयोग जर काही कारणामुळे यशस्वी झाला नाही तर मी त्याचे पैसे देईन कारण माझ्या मनात विश्वास होता कि आपला हा प्रयन्त यशस्वी होणार. मग काय झाली ना या अनोख्या अशा प्रवासाची सुरवात, सुरवातीला बऱ्याच अडचणी होत्या कारण कुंडीमध्ये झाडे लावने आणि मोठया शेतीमध्ये हा प्रोयोग करणे खुपच फरक होता आणि प्रथम ही पद्धत अवलंब होत होता त्यामुळे नेमके कसे आणि कधी हे प्रश्न होतेच. परंतु केशव आणि संतोष आणि इतर ग्रुप मेंबर्स चे अनुभव आणि मार्गदर्शन सुरूच होते एक एक गोष्टी स्वप्नासारखे घडत होत्या. सुरवातीला एक आश्चर्याचा धक्काच बसला माझ्या वर्ग मित्र मानशिंग कडे गावी घनामृत मिळाले त्याला प्रदशनात गुरुजींची पुस्तके मिळाली होती ती वाचून त्याचा प्रयत्न सुरू होता गोमूत्र पण त्याने गोळा करून ठेवले होते त्यामुळे जिवामुर्त चा प्रश्न सुटला होता.

जे काही उपलब्ध आहे आणि जसे जमेल तसे सुरवात झाली आढकळत सावरत प्रवास सुरु झाला आई बाबाची मदतीला आले. 7*2 उसाचे मॉडेल ठरले आणि मध्ये भाजीपाला घायचा ठरला . थोड्याच दिवसात आमचा प्लॉट सुंदर असे रूप घ्यायला लागला हे पाहून मनात आनंद होत होता पण हि नुसती सुरवात झाली होती. प्रथमच नैसर्गिक भाजी मिळणार होती, कधी नाही इतके भाजीचे उत्पादन झाले होतं 16 ते 18 प्रकारची भाजीपाला इतक्या छोट्या शेतातून मिळत होता हे सर्व करताना कष्ट तर होते कारण भाजीपाला नियोजन काढणी इत्यादी सुरू होतेच परंतु बाजारातून भाजी विकत आणणे पूर्ण बंद झाले होते. आता गुरुजींच्या शून्य खर्च च्या नैसर्गिग शेतीची प्रचिती येत होती.

भाजीपाला चांगला आला होता पण ऊस काही वाढ होत नव्हती बरोबरची रासायनिक उसाची वाढ झपाट्याने होत होती, त्यामुळे भावाकडून टोमणे मिळत होते मग केशव जी ना विचारणा केली त्यांनी सांगितले सुरवातीला यामध्ये उंची कमी वाढते करण मुळाची वाढ जास्त होते मग थोडे हायसे वाटले.

 

11 महिन्यांनी उसाची उंची चांगली वाढली त्यामुळे भाजीपाला बंद झाला. पुढील अव्वान होते ते चांगले गुळाळ शोधणे जो नैसर्गिक पद्धतेने गुळ तयार करेल जसे वरती बोललो तसे गावापासून जवळच गुळाळ असलेले समजले आणि आनंदाला पारावार उरला नाही. मग ठरले गुळ बनवायचा आव्हाने तर भरपूर होते ऊस तोडणे, घेऊन जाणे पण भावाने हे आव्हान खुबीने पेलून 20 जानेवारी 2018 शनिवार रात्री 11 वाजता ऊस गुळाळावर घेऊन गेला. दुपारी आईचा फोन आला पुण्यात भरपूर कामे होती पण सर्व बाजूला ठेऊन रात्रीच्या बस ने कोल्हापूर ला रवाना झालो आणि रविवारी सकाळी घरी पहाटे 5 वाजता हजर झालो.. दुपारी आमचा नंबर होता थोडी झोप घेऊन शेतात जाऊन आलो मग गुळाळावर जाऊन आलो. 3 वर्षाच्या प्रतिक्षेचे आज प्रत्येक्षात घडणार होते दुपारी 2 ला सगळे साहित्ये घेईन परत गेलो आणि सुरू झाली ती लागभग उसाचे वजन झाले 2750 किलो ऊस झाला थोडा ऊस 2 घाण्याला कमी पडत होता एकाला जास्त होता भाऊने गुळाळाच्या मालकाशी विचार करून 2 घाणे घ्यायचे ठरवले एक 1350 आणि एक 1400 किलो. शेतातून भेंडीची झाडे आणली होती ऊस फोडणी सूर झाली रस गोळा होऊ लागला होता आनंदाला पारावार च नव्हता सर्व गोष्टी डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये बंद करण्याचे सुरू होते रस कायली मध्ये आला आणि उखळू लागला चुना आणि भेंडी टाकली तशी उसाची मळी वरती येऊ लागली गुळवे काका आपले काम खुबीने सुरू होते मध्ये मध्ये रस उखळी देऊन रसाची अवस्था तपासून पाहत होते आणि टेस्ट करून सर्वाना इशारा देण्यासाठी तयार होते. जशी युद्धाला सैनिक नायकाचा इशाऱ्याची वाट पाहत असतात तशी सर्व जण आपापली आयुधे घेऊन तयार होती. इशारा झाला उखळती कायली रोलर वर उचलून वाफ्यामध्ये रस ओतला आणि कायली मागे सरकली, तसे सगळी मंडळी रस फवाड्याने घोटण्यामध्ये गुंग होती कोणी इकडे कुणी तिकडे रस ढकलत होते आणि गूळ भरायची सुरवात झाली काही मिनिटातच सर्व ऊस 1 किलो च्या भांड्यानमध्ये भरून झाला 161 किलो गूळ तयार झाला होता सर्व काही होत होते त्यावर विश्वास बसत न्हवता पण हो स्वप्न पूर्ण झाले होतं सर्वांच्या कष्टाचं चीज झाले होते दुसर्या घाण्यातून 187 किलो असा ऐकून 348 किलो गूळ तयार झाला होता.

 

 

या प्रवासमध्ये खुप काही शिकायला मिळाले सुरवात होती त्यामुळे चुका ही झाल्या त्या येत्या प्रवासात सुधारण्याचा प्रयत्न करेन माझे यामध्ये फारच कमी सहभाग होता माझा भाऊ आनंद पाटील आई बाबा वहिनी भावाची मुले यांचे कष्ट या मागे होत तसेच माझी बायको आणि मुले आणि या माझा वेडा ला समजून घेतले आणि साथ वेळ दिला. मी प्रथम आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजींचे आभार मानतो ज्यांनी सुंदर अशी शेती पद्धती शेतकऱ्यांना शोधून दिली आहे मला वाटते हीच पद्धत शेतकऱ्याला या आत्महत्येच्या अजगराच्या विळख्यातून सुटका करू शकेल तसेच संतोष केशशवजी याच्या अमूल्य अश्या मार्गदर्शन आणि कौतुकबद्दल मनपूर्वक आभार मानतो मिलिंद काळे यांचे खुप खुप आभार ज्यांनी zbnf ची विडिओ इंटरनेट वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत सत्येजीत पाटील आणि विश्वाचेतन याची या प्रवासमधील मोलाची साथ मिळाली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार तसेच प्रत्येक्ष वा अप्रत्येक्ष ज्यांनी या प्रवासात मदत कौतुक आणि साथ दिली त्याचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानून माझ्या या स्वप्न प्रवासाचे लेखन पूर्ण करतो

अजून खुप मोठा प्रवास आहे ही नुसती सुरवात आहे!! !! एक पाऊल पुढे !! अजित पाटील पोखले For more information about zbnf Please visit http://www.palekarzerobudgetspiritualfarming.org/zbnf.aspx

वाचन 221594 प्रतिक्रिया 112

खटपट्या गुरुवार, 02/01/2018 - 20:40
खूप छान, आणि स्फुर्तीदायक. आता तुम्हाला खर्च कीती आला आणि उत्पादन किती मिळाले त्याचा हिशोब दीलात तर बरे होइल. अगदी डिटेल नाही दीलात तरी चालेल. ढोबळ हिशोब सांगितला तरी चालेल...

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/01/2018 - 22:22
अत्यंत स्पृहणिय उपक्रम ! भारताला तुमच्या सारख्या धाडसी आणि उपक्रमी तरुणांची गरज आहे ! नोकरी एके नोकरी काय सगळेच करतात, पण अगदी विकसित देशांनाही असेच उपक्रमी लोक पुढे नेतात. तुमचे अनुभव आमच्यासाठी इथे लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार !

गवि गुरुवार, 02/01/2018 - 22:44
उत्तम उपक्रम .. असेच नवीन प्रयोग करत रहा. झीरो बजेट ही कन्सेप्ट नीट समजली नाही. बिन भांडवलाची शेती का? जीवामृत किंवा अन्य काही घटक कुठूनतरी मिळाले / मिळवले असा उल्लेख आहे. पण झीरो बजेट या संकल्पनेशी इतर वर्णनाची सांगड बसवल्यास रोचक वाटेल. या पद्धतीने आलेलं पीक , उत्पन्न नेहमीच्या (रासायनिक अथवा तत्सम) पद्धतीपेक्षा जास्त आलं किंवा कमी.. किती जास्त आलं, नेमका प्लस पॉइंट काय हे सर्व आणखी एका लेखात विस्तारित करावं ही विनंती.

In reply to by गवि

अजित पाटील गुरुवार, 02/01/2018 - 23:23
लेखाच्या सुरवातीला विडिओ लिंक दिली आहे एकाद्या पूर्ण बघा आणि तरीही काही शंका असेल तर मला कॉल करा.

रुपी Fri, 02/02/2018 - 00:15
अरे वा! कालच श्री सुभाष पालेकर यांच्या झिरो बजेट शेती प्रयोगांबद्दल वाचलं. फोटोतली वांगी काय दिसत आहेत! तुमचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आणि स्फूर्तीदायक आहेत.

शेखरमोघे Fri, 02/02/2018 - 01:31
अत्यंत स्पृहणिय, अभिनंदन ! अनुभव लिहिल्याबद्दल आभार! जर रासायनिक पद्धत वापरली असती तर उसाकरता आणि गुळाकरता काय काय वापरावे लागले असते?

In reply to by शेखरमोघे

अजित पाटील Fri, 02/02/2018 - 07:06
जर रासायनिक पद्धत वापरली असती तर उसासाठीं रासायनिक खते , तणासाठी रासायनिक फवारणी आणि गुळासाठी वेगवेगळी रासायनिक घटक.वापरतात

चाणक्य Fri, 02/02/2018 - 07:13
फार मस्त प्रयोग केलात. अॅग्रोवनला संपर्क करा, त्याद्वारे अजून शेतक-यांपर्यंत पोचवता येईल हा प्रयोग.

महेश हतोळकर Fri, 02/02/2018 - 09:30
असं काहीतरी सकारात्मक वाचायला बरं वाटतं. माझ्याकडेही तुमच्या फ्लॅटसारखी थोडी जागा आहे. मलाही गच्चीवरच्या बागेचा प्रयोग करायचा आहे. काही शंका आहेत.
  • जीवामृत किती वापरावे लागवे?
  • किडीच्या प्रादुर्भावावर काय उपाय केलात?
  • भाज्या काढल्यानंतर उरलेला ओला कचरा शेतातच जिरवलात का कसं?
  • रासायनीक शेतीच्या तुलनेत पाणी कमी लागतं का जास्त?
अजूनही आहेत. नंतर विचारेन.

In reply to by महेश हतोळकर

अजित पाटील Fri, 02/02/2018 - 11:39
कृपया वरती दिलेले विडोये किंवा गुरुजींचे शिबीर करा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील चला पुन्हा निसर्गाकडे – भाग 2 - "चला पुन्हा निसर्गाकडे", खास करून फक्त शहरातील लोकांसाठी एक दिवसीय संवाद शिबिर: 1. https://www.youtube.com/watch?v=75wkk1mdHIE 2. https://www.youtube.com/watch?v=M0KCfhx5H2M Terrace Garden 3. https://www.youtube.com/watch?v=2vT5vqXcKeM https://www.youtube.com/watch?v=xwe5T-N3wU0 शेती साठी 1. https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU

जागु Fri, 02/02/2018 - 11:37
तुमची चिकाटी, जिद्द आणि धाडसाला सलाम. तुमच्या संपूर्ण टिमचेच कौतुक. मी रोज वाचत असते सुभाष पाळेकरांच्या कार्यक्रमांबाबत. त्यांचेच एक कार्यकर्ते जोडपे श्री तुषार देसाई आणि सौ. विद्या देसाई हे आमच्या खास मित्रपरीवारातील आहेत. त्यांनी zbnf धान्य भाजांचा व्यवसाय चालू केला आहे लोकांपर्यंत विषमुक्त अन्न पोहोचावे म्हणून. मी त्यांच्याकडून नेहमी गहू घेते. तुमच्या पुढच्या शेतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुमचे लेखन प्रेरणादायी आहे.

In reply to by अजित पाटील

जागु Fri, 02/02/2018 - 12:03
मी पण घरी लागवड केलेल्या झाडांना, भाज्यांना रासायनिक खत बंद केले आहे. आता जमेल तेव्हा जीवामृत आणि शेणखताचाच वापर करते.

In reply to by अजित पाटील

जागु Fri, 02/02/2018 - 12:03
मी पण घरी लागवड केलेल्या झाडांना, भाज्यांना रासायनिक खत बंद केले आहे. आता जमेल तेव्हा जीवामृत आणि शेणखताचाच वापर करते.

विशुमित Fri, 02/02/2018 - 13:06

सर्व प्रथम तुमचे मी अभिनंदन करू इच्छितो.
त्याला कारण हे आहे की-
१. नोकरी सांभाळून तुम्ही शेतीमध्ये पथदर्शक प्रयोग (छोट्या क्षेत्रात का असेना) करून यश मिळवलेत. विशेष म्हणजे ३७ हजाराचा faydya sakat.
२. स्थानिक मित्रांचे सहकार्य आणि त्याच बरोबर तुमच्या जवळ असलेल्या ज्ञानाचे आदानप्रदान.
सर्वात महत्वाचे-
३. बॅलन्स शीट/ प्रॉफिट लॉस मांडण्याचा प्रयत्न. (अजून डिटेलिंग असणारा बनवण्याचा प्रयत्न करा)
शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या यशाची हीच खरी गुरु किल्ली आहे.

पण मोठ्या क्षेत्रासाठी (३ एकर च्या पुढे) झिरो बजेट/सेंद्रिय शेती व्यवहार्य नाही, हा माझा अनुभव आहे. मुळात झिरो बजेट असे काही नसते.
बाकी ऊस जोरदार आला आहे.
आणि फोटो एकदम लाजवाब. (एस्पेसिअल्ली मिरची आणि वांग्याची )

In reply to by विशुमित

काजुकतली Sat, 02/10/2018 - 14:50
तुम्ही यु ट्युबवरचे विडिओ पहा, लोक कित्येक एकरावर झिरो बजेट करताहेत, रासायनिक पेक्षा जास्त उत्पन्न मिळवताहेत. गुरुजींचे अलिबागेत शिबिर आहे एप्रिल मध्ये. त्यात सहभागी व्हा व सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.

In reply to by काजुकतली

विशुमित Sat, 02/10/2018 - 17:30

सगळे करून झाले आहे.
रासायनिक आणि सेंद्रिय शेतीचा मिलाप च व्यवहार्य आहे, हे माझ्या स्वानुभवातून सांगतो आहे. इतरांना फायदा झाला असेल तर स्तुत्य आहे.
यु ट्युबवरचे विडिओ मधील यशस्वी शेतकरी नेटवर्किंग कंपनीचे प्रचारक/सदस्यांसारखे बऱ्याच गोष्टी फुऊन सांगत असतात. ग्राउंड लेव्हलवर चित्र काही वेगळे असते.

In reply to by विशुमित

मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 18:41
ग्राउंड लेव्हलवर चित्र काही वेगळे असते. सेंद्रीय शेतीबद्दल crop care federation of india काय म्हणते http://www.misalpav.com/comment/701330#comment-701330

In reply to by मार्मिक गोडसे

काजुकतली Sun, 02/11/2018 - 09:37
बरोबर आहे. शेतीच्या नावावर काहीही चाललेले असते. यात ऑर्गनिक पद्धतीचा दोष नाही तर ती राबवणारा माणूस आपला शॉर्ट टर्म फायदा व्हावा म्हणून ही चोरी करतोय. त्याला वाटतेय तो पैसे कमावतोय व लॉंग टर्ममध्ये तो ते गमावतो. ऑर्गनिक शेती काशी करतात मला माहित नाही पण त्यात खर्च खूप असणार म्हणून अशी चोरी करायला माणसे उद्युक्त होतात. पाळेकर गुरुजी प्रणित नैसर्गिक शेतीत खर्च कमी होत जातो. पण सुरवातीला खूप मेहनत आहे. तुमची जमीन जंगलातल्या नैसर्गिक जमिनीसारखी निरोगी व्हावि म्हणून जिवामृताचा विरजणाचे वेळापत्रक पाळावे लागते. काहीच रसायने वापरत नसल्यामुळे सुरवातीला येणारे किडी व रोग रोखण्यासाठी सांगितलेले नैसर्गिक उपाय नियमित करावे लागतात. यांच्यात चालढकल केलीत तर पीक हातचे जाणार आणि तुम्ही नैसर्गिक शेती खोटी म्हणणार. एकदा तुमची शेती नीट इस्टेब्लिश झाली की हे सगळे कमी होते. पण आपल्याला पीक ईल्ड जास्तीत जास्त हवेच असल्याने संरक्षण हे करावेच लागते. बऱ्याच लोकांनी असेच अर्धवट तंत्र वापरून गुरुजींवर फेक म्हणत आरोप केलेत. पण गुरुजींनी जे तंत्र सांगितले ते डोळे झाकून जसेच्या तसे निदान एकदातरी करा. अर्धवट करून अपयश मिळणारच.

In reply to by विशुमित

काजुकतली Sat, 02/10/2018 - 14:51
तुम्ही यु ट्युबवरचे विडिओ पहा, लोक कित्येक एकरावर झिरो बजेट करताहेत, रासायनिक पेक्षा जास्त उत्पन्न मिळवताहेत. गुरुजींचे अलिबागेत शिबिर आहे एप्रिल मध्ये. त्यात सहभागी व्हा व सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.

कपिलमुनी Fri, 02/02/2018 - 13:40
नोकरी संभाळून हा उपक्रम केल्याबद्दल अभिनंदन ! बागेतील शेती करणार्‍यांनी आवर्जुन करावा असा प्रयत्न आहे. डिटेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

पैसा Fri, 02/02/2018 - 17:36
प्रयोग आवडला! रिकाम्या चर्चांपेक्षा असे काही केलेले उत्तम!

रंगीला रतन Fri, 02/02/2018 - 23:06
खुप छान प्रयोग...पण वर विशुमित ह्यंनि म्हंट्ल्या प्रमाणे मोठ्या क्षेत्रा साठी कितपत फायदेशीर ठरेल सांगता येणे कठिण आहे.

नाखु Sun, 02/04/2018 - 15:31
मान्यवरांच्या प्रतिक्रिया झाल्यावर मी काय सांगणार? वा खु साठवली आहे नक्की भेट द्यावी म्हणतोय. शहरातील अनभिज्ञ नाखु ता क गेली तीन वर्षे ओला कचरा घरच्या घरी जिरवायचा प्रयोग यशस्वीपणे​ राबविण्यात येत आहे

In reply to by नाखु

तेजस आठवले Sun, 02/04/2018 - 17:11
मी गेली २ वर्षे. एकही हरित कचऱ्याची काडी घराबाहेर जाऊ दिली नाहीये.सध्या माझ्या गॅलरीत साधारण ४ कुंड्यात लावलेल्या रोपांना, नवजात धरून १४ टोमॅटो लागले आहेत. अवांतर, मक्याचे कणीस दाणा खाऊन झाल्या नंतर कुंडीत टाकले होते, साधारण आज ८ महिन्यांनी ते आतून पूर्णपणे कुजले आहे परंतु बाहेरून त्याचा कडकपणा शाबूत आहे. माझ्या मते पूर्णपणे विघटन होण्यास अजून सहा महिने जातील. त्यामुळे गुरे ही सेल्युलोज आधारित खाद्य पचवू शकतात हे आपल्यावर खरंच उपकार आहेत.

In reply to by तेजस आठवले

जागु Wed, 02/07/2018 - 14:10
मी पण ओल्या कचर्‍यातल एकही साल कचर्‍यात टाकत नाही. थेट एखाद्या कुंडीत किंवा खत करण्याच्या जागेत टाकते.

कंजूस Sun, 02/04/2018 - 16:51
सत्तरच्या काळात ट्रॅक्टरचा प्रसार वाढू लागला तेव्हा त्यातील संभाव्य धोकेही लोकांना सांगायला हवे होते. १) डिझेलचा वापर २) ओटो उद्योगांवर अवलंबून राहाणे ३) गुरे नाहीशी झाल्याचा परिणाम.

मनिमौ Sun, 02/04/2018 - 19:51
ठरला हे वाचून खूप आनंद झाला. भाज्या अगदी रसरशीत दिसत आहेत. रंगाची चमकच भाजी चवदार असेल हे सांगतेय. जीवामृत कसे आणी किती दिलेत हे सविस्तर लिहिले तर बरे होईल

नूतन सावंत Sun, 02/04/2018 - 22:30
झकास!तुमचे आणि या तुमच्या पयोगाला पाठिंबा देणाऱ्या तुंव्ह्या परिवाराचे अभिनंदन.आंब्याच्या बागेत रासायनिक खते न वापरता अमृतवण्याचा उपयोग करून उत्पन्न घेतले होते आताही बाल्कनी बागेत घरच्या कचऱ्यावर भाज्या पिकवत असते,

अरविंद कोल्हटकर गुरुवार, 02/08/2018 - 00:50
हा प्रयोग करून अनुभवाचे बोल सांगितल्याबाबत अभिनंदन आबि धन्यवाद. ह्याचा पुरेसा प्रसार व्हायला हवा आणि शेतकर्‍यांना नवी दिशा मिळायला हवी. मला शेतीचा कसलाच अनुभव नाही हे आधीच मान्य करतो. हे लिहिल्यावर माझा प्रश्न असा आहे की ह्या तन्त्रामध्ये ईश्वर, अध्यात्म अशा गोष्टींवर का भर दिला गेला आहे? वरच्या विडीओमध्ये असेहि सांगितले आहे की अध्यात्मावर आणि ईश्वरावर विश्वास नसेल तर ह्या मार्गाला शेतीचा नैसर्गिक मार्ग असे माना आणि काम सुरू करा. इतकेच पुरेसे नाही का? ईश्वर, अध्यात्म अशा गोष्टी चर्चेत आल्या की त्याचा परिणाम काय होईल ते सांगता येत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शेणमूत गायीचेच असण्यावर इतका भार का दिला आहे? अन्य प्राण्याचे शेणमूत चालणार नाही काय? गायींच्या आणि अन्य प्राण्यांच्या शेणमुतामध्ये qualitative असा काही फरक आहे का? गाय ह्या प्राण्याचे हे अवास्तव दैवतीकरण आवश्यक आहे काय?

In reply to by अरविंद कोल्हटकर

कलंत्री गुरुवार, 02/08/2018 - 06:40
गाईचेच शेण अथवा मूत्र असावे अशी गरज नाही. मानवी मल आणि मूत्र वापरुनही कचरा कुजण्याच्या प्रक्रियेला गती देता येतेच. अर्थात आपल्या स्वच्छतेच्या कल्पना आणि ग्रामिण भागातील असलेली गाईंची उपलब्धता यात जीवामृताचा वापर करावयास हरकत नाही. काही माहिती हवी असल्यास मला संपर्क साधता येईल

In reply to by कलंत्री

काजुकतली Sat, 02/10/2018 - 15:48
मानवी मल आणि मूत्र वापरुनही कचरा कुजण्याच्या प्रक्रियेला गती देता येतेच>>>> यात कचरा कुजवला जात नाही हो. जीवामृत हे विरजण आहे जे रासायनिक शेतीमुळे नष्ट झालेले जीवजंतू जमिनीला परत देते. मुळात हे जीवजंतू शेणात आहेत हे प्रयोगांनी लक्षात आले व वेगवेगळ्या प्राण्यांच्या शेणावर प्रयोग केल्यानंतर देशी गायीच्या शेणात ते सर्वाधिक आढळले. जर्सी किंवा इतर वाणात अजिबात आढळले नाही. म्हणून गुरुजी देशी गायचं वापरा म्हणून सांगतात. केवळ तर्क न लावता प्रयोग करून खात्री करा.

In reply to by अरविंद कोल्हटकर

अजित पाटील Fri, 02/09/2018 - 13:07
हेच सर्व प्रश्न मला सुरवातीला पडले होते. पण जेव्हा गुरुजींचे विडिओ विस्तारित पहिले तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली श्यक्य असल्यास वरील विडिओ एकदा पहा.

कलंत्री गुरुवार, 02/08/2018 - 06:36
नैसर्गिक शेती तंत्रावर विश्वास आणि आवड असणार्या नी निश्चितच एका काडातून क्रांती हे पुस्तक वाचावेच. त्यांच्या प्रयत्नाला अजून योग्य दिशा मिळेल. जपानमधील फुकुओका यांच्ग्या one straw revolution या पुस्तकावर आधारित आहे. माझे अत्यंत आवडीचे असे पुस्तक आहे. पालेकरांची प्रयोग सुध्दा याच्याच आधारीत असे आहेत.

नाखु Fri, 02/09/2018 - 19:40
धाग्याला वाखु कशी साठवून ठेवता येईल? शंकायनी नाखु अज्ञ

काजुकतली Sat, 02/10/2018 - 14:39
शून्य बजेट कसे? - तर मुख्य पिकाच्या आंतरपिक व सहपिकापासून जे उत्पन्न मिळते त्यातून मुख्य पिकाचा सर्व खर्च भागवला जातो व ते पीक एकही पैसा खर्च न करता आपल्याला मिळते. वरच्या उदाहरणात मुख्य पीक ऊस वाढायला 11 महिने लागले, त्यानंतर ऊसतोडणीपर्यंत आंतरपीक घेणे शक्य झाले नसणार. पण 11 महिने जी आंतरपिके घेतली ती बाजारात विकली असती तर उसावर झालेला खर्च त्या पैशातून झाला चुकता करता आला असता. म्हणजेच ऊसासाठी लेखकाच्या खिशातून वेगळे पैसे गेले नसते.. मी वर दिलेला जमाखर्च पाहिला नाही त्यामुळे लेखकाने काय केले ते माहीत नाही. शिबिराला जाण्याआधी माझ्या डोक्यात भरपूर शंका होत्या, झेरो बजेट फक्त बोलायचे, प्रत्यक्ष तसे घडणे शक्य नाही असे वाटत होते. ओळखीचे शेतकरी मित्र व ते ज्यांचा सल्ला घ्यायचे ते कृषी विद्यापीठाचे लोकही पाळेकर गुरुजी फेक आहेत म्हणून सांगायचे. पण शिबीराला गेल्यावर अनेक लोक भेटले ज्यांनी स्वतः ही पद्धती वापरली, रिझल्ट पाहिले. भारताला या शेतीवाचून पर्याय नाही. हे का हे गुरुजी व्यवस्थित समजावून सांगतात. त्यांना ह्यात कसलाही फायदा नाही. तुम्हाला त्यांना रॉयल्टी द्यावी लागत नाही. शिबिराची फीसुद्धा शक्य तितकी कमी असते कारण गरीब शेतकऱ्यालाही येता यावे म्हणून. ज्यांना रस आहे त्यांनी एप्रिल मध्ये अलिबागेत होणारे 5 दिवसाचे शिबिर करावे.

In reply to by काजुकतली

विशुमित Sat, 02/10/2018 - 18:25

आंतरपीक सर्वमान्य कन्सेप्ट आहे. लोक आंतरपीक घेत असतात. पण त्यामधून उसाचा सगळा खर्च निघू शकतो हे थोडे अवघड आहे.
सध्य घडीला मजुरांची उपलब्धता आणि खर्च बघता, उसासाठी लोक आंतरपीक न घेता सरळ तणनाशक वापरतात.
आंतरपिकांचे देखील बरेच फायदे तोटे आहेत.
पाळेकर फेक वगैरे आहेत हे माझे म्हणणे नाही आहे पण सगळ्याच गोष्टी फायदेशीर आणि व्यवहार्य आहेत याबद्दल जरूर शंका आहे.

In reply to by विशुमित

कारण आंतरपीक म्हणून घेतलेली तरकारी ही योग्य बाजारपेठेत जास्त भावाने विकता येते. पुण्यात झिरो बजेट शेतमालासाठी नव्या बाजारपेठा व्हाट्सएप वरती तयार झालेल्या आहेत. खूपसे शेतकरी याचा फायदा घेऊन आपला विषमुक्त माल विकत आहेत. विकत घेणारे या मालाला प्रीमियम द्यायला सहज तयार होतात. (मी स्वतः हे अनुभवलं आहे) उदा. झिरोबजेट द्राक्षे २१० रुपये प्रति २ किलो दराने विकली जात आहेत. आणि माल अपुरा पडतोय इतकी मागणी आहे.

काजुकतली Sat, 02/10/2018 - 14:45
शून्य बजेट कसे? - तर मुख्य पिकाच्या आंतरपिक व सहपिकापासून जे उत्पन्न मिळते त्यातून मुख्य पिकाचा सर्व खर्च भागवला जातो व ते पीक एकही पैसा खर्च न करता आपल्याला मिळते. वरच्या उदाहरणात मुख्य पीक ऊस वाढायला 11 महिने लागले, त्यानंतर ऊसतोडणीपर्यंत आंतरपीक घेणे शक्य झाले नसणार. पण 11 महिने जी आंतरपिके घेतली ती बाजारात विकली असती तर उसावर झालेला खर्च त्या पैशातून झाला चुकता करता आला असता. म्हणजेच ऊसासाठी लेखकाच्या खिशातून वेगळे पैसे गेले नसते.. मी वर दिलेला जमाखर्च पाहिला नाही त्यामुळे लेखकाने काय केले ते माहीत नाही. शिबिराला जाण्याआधी माझ्या डोक्यात भरपूर शंका होत्या, झेरो बजेट फक्त बोलायचे, प्रत्यक्ष तसे घडणे शक्य नाही असे वाटत होते. ओळखीचे शेतकरी मित्र व ते ज्यांचा सल्ला घ्यायचे ते कृषी विद्यापीठाचे लोकही पाळेकर गुरुजी फेक आहेत म्हणून सांगायचे. पण शिबीराला गेल्यावर अनेक लोक भेटले ज्यांनी स्वतः ही पद्धती वापरली, रिझल्ट पाहिले. भारताला या शेतीवाचून पर्याय नाही. हे का हे गुरुजी व्यवस्थित समजावून सांगतात. त्यांना ह्यात कसलाही फायदा नाही. तुम्हाला त्यांना रॉयल्टी द्यावी लागत नाही. शिबिराची फीसुद्धा शक्य तितकी कमी असते कारण गरीब शेतकऱ्यालाही येता यावे म्हणून. ज्यांना रस आहे त्यांनी एप्रिल मध्ये अलिबागेत होणारे 5 दिवसाचे शिबिर करावे.

In reply to by काजुकतली

पिंगू Sat, 02/10/2018 - 22:00
>>> ज्यांना रस आहे त्यांनी एप्रिल मध्ये अलिबागेत होणारे 5 दिवसाचे शिबिर करावे. कृपया जास्त माहिती द्यावी. मला त्यांच्या शिबिरात जायचे आहे.

काजुकतली Sat, 02/10/2018 - 15:36
वर देशी गायच का वगैरे प्रश्न आलेत. गुरुजी याला अध्यात्मिक शेती म्हणतात ते का वगैरे थोडक्यात सांगायचा एक प्रयत्न - गुरुजी स्वतः शेतकीशास्त्रात बीएस्सी झालेले आहेत. त्या दरम्यान वेगवेगळे प्रोजेक्त करताना त्यांच्या लक्षात आले की जंगलात किंवा शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला भरपूर झाडे असतात. ती फळेही भरपूर देतात. दुष्काळ पडला तरी ही झाडे तगून राहतात. असे का होते याबद्दल निरीक्षण व प्रयोग त्यांनी सुरू केले. त्यात लक्षात आले की झाडे जमीन व हवेतून जगण्यासाठी आवश्यक घटक व पाणी घेतात. हे घटक झाडांना मिळण्यासाठी जमिनित कोट्यवधी सूक्ष्म जीवजंतू व बुरशी मदत करते. आपापसात देवणघेवाणीची, जिवो जीवस्य जीवनम ची अखंडित साखळी निसर्गात सुरू असते. माणसाने हस्तक्षेप करून ही साखळी तोडली. हरितक्रांतीच्या नावाने जमिनीत रसायने ओतून सूक्ष्म जीवजंतू मारले. बुरशी संपवली. याच्या परिणामे जमिनीत पोटॅश, फॉस्फेट, सल्फेट आहे पण पिकांनी वापरण्याच्या स्वरूपात नाही ही परिस्थिती उद्भवली. तुम्ही जमिनीचा पीएच तपासला तर बहुतेक वेळा हा रिझल्ट येतो. गुरुजी नेमके हे बदलू पाहतात. त्यांनी जिवामृताचा जो फॉर्म्युला बनवलाय त्यात जमीनीतले जीवजंतू व बुरशी परत कशी निर्माण होईल, खोलवर जाऊन निद्रावस्थेत गेलेली गांडूळे (हिबेर्नेशन) परत जमिनीच्या पृष्ठभागावर कशी येतील याची व्यवस्था केलेली आहे. जमिनीत आवश्यक असलेले जीवजंतू परत कसे मिळतील यावर ते संशोधन करत असताना त्यांच्या लक्षात आले की फक्त देशी गायीच्या शेणात हे जीवजंतू सापडतात. देशी गायीच्या शेणापासून जीवामृत बनवले तर त्यात हे जीवजंतू प्रचंड संख्येने वाढलेले दिसतात. देशी गायच वापरायची असे ठरवून त्यांनी पुढचे संशोधन केले नाही तर वेगवेगळ्या प्राण्यांच्या शेणावर प्रयोग करून ते देशी गायिवर स्थिरावले. जीवामृताच्या फॉरमूल्यात माणसाचे मूत्रही वापरता येते. शेण मात्र देशी गायीचेच हवे. गाय बैल मिळून घेतले तरी चालते. जीवामृत हे खत नाही तर विरजण आहे जे जमिनीतील जीवजंतू वाढवते, जमिनीतील गांडूळे वाढवते. ही गांडूळे वर येताना आवश्यक घटक खात येतात व त्यांच्या विष्ठेद्वारे ते घटक जमिनीच्या पृष्ठभागी पसरून पिकांना मिळतात. जमीन सुपीक होते, सुपीक जमिनीत मिश्र पिके घेतल्यावर निरोगी पिके येतात जी किडी व रोगांच्या हल्ल्याला तोंड देऊ शकतात. कीड निवारणासाठी ते झेंडू वगैरे पिके आंतरपीक म्हणून घ्यायचा सल्ला देतात, पक्षीथांबे म्हणून अधून मधून मका, तूर लावली जाते. जेणेकरून पक्षी तुमचे मुख्य पीक उध्वस्त करत नाहीत. तरीही किडी, रोग आलेच तर कडुनिंब, औषधी झाडांची पाने, मिरच्या इत्यादींपासून कीडनाशके बनवून ती फवारायचं सल्ला देतात ज्यायोगे जमिनीचे नुकसान होणार नाही. एकूण गुरुजींच्या झिरो बजेट शेतीत तुम्ही कुणाचेही नुकसान करत नाही, मित्रकिडीना वाढायला भरपूर वाव देता, ज्यायोगे शत्रूकिडी नियंत्रणात राहतात, पक्षांची सोय लावून देता, म्हणजे मुख्य पिकाचे नुकसान होत नाही. या पद्धतीत रसायने अजिबात वापरत नाही, त्यामुळे पाणी खराब होत नाही, जमीन खराब होत नाही. रसायने वापरून मारण्याची क्रिया होते, इथे जगवण्याची क्रिया होते जी गुरुजींना अध्यात्माला जवळची वाटते. म्हणून ते अध्यात्मिक शेती म्हणतात. तुम्हीही अध्यात्मिक म्हणा असा त्यांचा अजिबात आग्रह नाही. तुम्ही काहीही म्हणा पण स्वतः हे तंत्र वापरा, स्वतःचा फायदा करून घ्या हे त्यांचे म्हणणे आहे. देशी गाय वापरून गुरुजी भलतेच काहीतरी साध्य करायच्या मागे आहेत असे ज्यांना वाटते त्यांनी स्वतः प्रयोग करावेत. गुरुजी अशा सगळ्या मंडळींना व कृषी विद्यापिठाना आपले खुले चॅलेंज आहे असे नेहमी म्हणतात. गुरुजींचे हजारो शेतकरी आज आपापल्या शेतांवर गुरुजींची शेतीची मॉडेल्स उभी करून फायदा घेताहेत. शंका घेणाऱ्यांनी आपली मॉडेल्स उभी करून दाखवावीत हे चॅलेंज गुरुजी देतात.

In reply to by काजुकतली

विशुमित Sat, 02/10/2018 - 18:34

पृथ्वीवर झालेल्या प्रचंड हवामान बदलापुढे पाळेकरांनी सांगितलेले उपाय शेतीसाठी खूप तोकडे पडत आहेत.
म्हणून मिश्र शेती च योग्य वाटते.

In reply to by विशुमित

काजुकतली Sun, 02/11/2018 - 09:17
हवामान बदल ह्याच कारणामुळे तर नैसर्गिक शेती करा हा सल्ला गुरुजी देतात. तुम्हीसगळे करून पाहिलंय तर एक शीबिरही करून पाहा. 500 पर्यंत खर्च होईल पण फायदा नक्कीच होईल ही माझी खात्री. यु ट्यूबवर जे विडिओ पाहता त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी द्यायच्या असतील तर मी त्यांचे फोन नंबर मिळवून देते. वाढत्या लोकसंख्येचे पोट भरायचे असेल तर रासायनिक शेतीला पर्याय नाही हे माझे हल्ली हल्ली पर्यंतचे मत होते. पण रासायनिक शेतीचा ईल्ड कमी कमी होत जातो हे आता गुपित राहिले नाही. अजून खते ओता म्हणजे अजून ईल्ड हे समीकरण आहे रासायनिक शेतीचे. ही रसायने खाऊन आपले काय झालंय हेही गुपित राहिलेले नाही. बीटी धान्य सुद्धा रसायनांवरच जगते. आणि काय झाले त्याचे? यंदा बीटी कापूसही बोन्डअळीने खाल्ला. त्याच जागी गुरुजींच्या तत्वावर केलेला कापूस मात्र तसाच उभा होता. तात्पर्य हेच की पाळेकर गुरुजी प्रणित नैसर्गिक शेतीला पर्याय नाही. विश्वास वाटत नसेल तर शिवारफेऱ्यांना हजेरी लावा. तेही वेळापत्रक पाहिजे तर देते.

मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 18:16
जमिनीत आवश्यक असलेले जीवजंतू परत कसे मिळतील यावर ते संशोधन करत असताना त्यांच्या लक्षात आले की फक्त देशी गायीच्या शेणात हे जीवजंतू सापडतात. मी ह्या गुरुजींचे अनेक व्हिडिओ बघितले आहेत, परंतू मला एकाही व्हिडिओमध्ये जीवजंतूंची नावे आढळली नाहीत. तुम्हाला माहीत असल्यास फक्त देशी गाईच्या शेणात आढळणाऱ्या जिवाणूंची माहिती येथे द्याल का?

In reply to by कंजूस

अजित पाटील Sat, 02/10/2018 - 22:35
३० एकरासाठी १ गाय पुरेशी आहे आम्ही आत्ताच एक देशी गाय घेतली. आहे आठवड्याला २५० ग्राम तूप मिळते त्याशिवाय दूध दही ताक वेगळेच गोमूत्र शेतीसाठी शेण दुपसाठी शेणी

In reply to by कंजूस

काजुकतली Sun, 02/11/2018 - 08:52
देशी गायी दूध कमी देतात हा गैरसमज आहे. सगळ्याच गायी सारखेच दूध देत नाहीत. तुम्हाला दुधच हवे तर गीर गाय घ्या, पण हिचा शेतीला फारसा उपयोग नाही. गुरूजी भाकड गायी वापरा हा सल्ला देतात. तिचे शेण भरपूर मिळते व तिच्यावर जास्त खर्च करावा लागत नाही. रासायनिक खते विकत घ्यायला जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा खूपकमी खर्च भाकड गायिवर होतो.

In reply to by मार्मिक गोडसे

काजुकतली Sun, 02/11/2018 - 21:24
गीर गाय दूध भरपूर देते. पण शेतीच्या कामाला जे बैल लागतात त्यांची तेवढी क्षमता असणे आवश्यक असते, जे या वाणात नाही. कोकणात आढळणारी कपिला गाय भरपूर दूध देत नाही पण शेतात काम करण्यासाठी लागणारा काटकपणा त्या वाणात आहे. गुरुजींचे संशोधन सांगते की दूध देणाऱ्या गायीच्या शेणात जिवामृतासाठी आवश्यक घटक तितके आढळत नाही. तेच ती गाय भाकड झाली की जिवामृताला लागते तसे चांगले शेण मिळते. गुरुजी म्हणून भाकड गाय सांभाळा म्हणून सांगतात.

In reply to by डँबिस००७

मार्मिक गोडसे Sun, 02/11/2018 - 12:04
जीवजंतूंची नावे कश्याला पाहीजे ? इतक्या शास्त्रीय पद्धतीने जीवामृत करतात व चॅलेंज देतात तर देशी गायीत नेमके कोणते जीवजंतू आढळतात हे उघड करायला काय हरकत आहे?

In reply to by मार्मिक गोडसे

काजुकतली Sun, 02/11/2018 - 21:19
काहीही हरकत नाही. मी सध्या घरी नाही, त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे लगेच उत्तर देऊ शकत नाही. 2-3 दिवसात नक्की उत्तर देते. मला पुस्तक पाहावे लागणार.

In reply to by काजुकतली

मार्मिक गोडसे Sun, 02/11/2018 - 21:47
धन्यवाद. देशी गायीच्या मुद्यावरून मूळ विषय भरकटू नये म्हणून व्यनितून कळवा. मीही व्यनितूनच संपर्क साधतो.

डँबिस००७ Sun, 02/11/2018 - 11:40
देशी गाय वापरून गुरुजी भलतेच काहीतरी साध्य करायच्या मागे आहेत असे ज्यांना वाटते त्यांनी स्वतः प्रयोग करावेत. गुरुजी अशा सगळ्या मंडळींना व कृषी विद्यापिठाना आपले खुले चॅलेंज आहे असे नेहमी म्हणतात. गुरुजींचे हजारो शेतकरी आज आपापल्या शेतांवर गुरुजींची शेतीची मॉडेल्स उभी करून फायदा घेताहेत. शंका घेणाऱ्यांनी आपली मॉडेल्स उभी करून दाखवावीत हे चॅलेंज गुरुजी देतात. १००००००००००००% सहमत ! विदर्भात गुरुजींच्या देखरेखी खाली तयार झालेल्या मोसंबी बागेच्या शेजारच्या मोसंबी बागेला डींक अळीने जेंव्हा नेस्तनाबुत केल पण गुरुजींची बाग मात्र निरोगीच राहीली. ही बातमी जेंव्हा कृषी विद्यापिठा ला कळाली तेंव्हा कृषी विद्यापिठाने तज्ञांना पाठवीण्याचा निर्णय घेतला. गुरुजींच्या मोसंबी बागेत एकही अळी कृषी विद्यापिठामधुन आलेल्या तज्ञ्यांना दिसली नाही. ह्या तज्ञांनी अगदी बागेतीन पान अन पान उलटवुन बघितल !! कृषी विद्यापिठामधुन आलेल्या तज्ञ्यांना ह्या घटने बद्द्ल कोणतेही समर्पक उत्तर देता आले नाही.

In reply to by डँबिस००७

नाखु Sun, 02/11/2018 - 18:21
देशी गाय मुद्दा पुन्हा ऐरणीवर घेऊन घेऊ नका, इथले "विदेशी गाईज" मूळ शेती बाजूला ठेवून या बांधावर कुस्ती सुरू करण्यात धन्यता मानतात भले शेतीची (धाग्याची) नासाडी झाली तरी बेहत्तर!!! कृषी धाग्याची खुरपणी निगुतीने व्हावी यासाठी खुरपे घेऊन तत्पर नाखु पांढरपेशा अर्थात शहरी

डँबिस००७ Sun, 02/11/2018 - 18:35
मानवी मल आणि मूत्र वापरुनही कचरा कुजण्याच्या प्रक्रियेला गती देता येतेच. हा अतिशय हास्यास्पद प्रतिसाद , फोको ओरल मर्फत बरेच रोग पसरण्यास मदत होत असते. त्यामुळे पुर्वीच्या काळीही मानवी मल आणि मूत्र घ रापा सुन दुर करण्याची पद्धत होती.

डँबिस००७ Sun, 02/11/2018 - 22:29
इतक्या शास्त्रीय पद्धतीने जीवामृत करतात !! शास्त्रीय पद्धतीने जीवामृत बनवल जात हे मान्य आहे का ? जर नसेल तर " जीवामृत " कस बनवल जात ते अभ्यासल तर लक्षात येईल !! ताज शेण खत, ताज जुन कसलही गो मुत्र बेसन , गुळ ! केक , पाव बनवताना , फरमेंटेशन करण्यासाठी कोमट पाण्यातुन यीस्ट वापरल जात व त्याचबरोबर साखर वापरली जाते. ही साखर ही ह्या यीस्टच खाद्य असत, त्याच प्रमाणे जीवामृत बनवताना फरमेंटेशन करण्यासाठी बेसन व गुळ वापरला जातो.

मनो Sun, 02/11/2018 - 23:20
नक्की आठवत नाही पण मागे कुणीतरी संशोधन करून हे सिद्ध केले होते की फक्त साखरेचे पाणी आवश्यक आहे जिवाणूंची वाढ होण्यासाठी, बाकी घटक आवश्यक नाहीत. मिसळपाव वरच बहुदा वाचले होते.

In reply to by मनो

काजुकतली Mon, 02/12/2018 - 00:09
बरोबर आहे. झाडांच्या मुळातून गोड रस पाझरतात जे जीवजंतूना मिळतात, त्या बदल्यात जीवजंतू झाडांना आवश्यक घटक मुळाना शोषण्यालायक बनवतात. Dr आनंद कर्व्यांनी हे सिद्ध केले. जमिनीत साखरेचे पाणी जरी घातले तरी जीवजंतू ते पिउन त्यांचे नियोजित काम करतील. पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा जमिनीत जीवजंतू असतात. एनड्रीन सारखी जी कीटकनाशके माणसाच्या मृत्यूला कारणीभूत होतात ती जमीNआतील जीवजंतू शिल्लक ठेवणार का? जर जीवजंतुच नसतील तर कितीही साखर ओतली तरी काय उपयोग? जीवामृत हे विरजण आहे, जीवजंतू परत आणायचे.

काजुकतली Sat, 02/17/2018 - 20:16
शिबिर स्थळ : अलिबाग प्रति व्यक्ती खर्च : रु ८००/- (चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण व निवास व्यवस्था) ज्याना करायचे आहे त्यानी क्रुपया उन्मेश बागवे ७०४५७९३४१६ व तुषार देसाइ ९३२४००२३११ वर संपर्क करा. प्रशिक्षणा तिल विषय : १. शुन्य खर्च आध्यत्मिक शेती - तत्वद्यान व आण्दोलन २. विविध कृषी तन्त्रज्ञान ३. निसर्गातिल पोषण शास्त्र ४. देशि गांडूलाचे कार्य. ५. रासायनिक व सेन्द्रिय शेतीचे पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे परिणाम. ६. देशि गाय व तिचे महत्व. ७. तिस एकराचे गणीत ८. बिजाम्रुत, घनजिवामृत, वाफसा, जिवामृत, आच्छादन व पाणीव्यवस्थापन ९. किटक नाश, तण, बुरशी व किडनियण्त्रण १०. ऱोपवाटिका, फळभाज्या व भाजिपाला ११. भात शेती व हंगामि पिके १२. मसाला पिके व घरगुती प्रक्रिया १३. आंबा पोफळीच्या बागा व त्यातिल अंतर्गत पिके १४. शिवारतिल भाजिपाला व गच्चिवरिल बाग १५. कातळावरिल ब्लास्तिंग न घेता फळबागा फुलविण्याचे तण्त्र १६. कृशि उत्पादनाचि दलाल विरहित शेतकरी व ग्राहक यांछ्यात विक्रि व्यवस्था.