मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कां रक्त साचलेले पदरात लाल होते? गर्भात कोंडलेले मौनी सवाल होते जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते तुम्ही परंपरांची मिरवाल कौतुकेही उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते रस्त्यात सांडल्या अन मातीस प्राप्त झाल्या भाळावरी कळ्यांच्या कुठले गुलाल होते? येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे हतबुद्ध शायराचे फसले खयाल होते © विशाल कुलकर्णी

वाचने 8290 वाचनखूण प्रतिक्रिया 28

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/11/2018 - 12:02
जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते
साले हे कळाते पण वळत नाही.. पुन्हा एकदा त्याची आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद... पैजारबुवा,

सूड गुरुवार, 01/11/2018 - 12:40
भारीय. "उरणार ना उद्या जे सत्य काल होते" ह्या ओळीला अडखळलो. "उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते" अशी वाचली तेव्हा बरोबर वाटली.

In reply to by सूड

विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/11/2018 - 16:10
धन्यवाद देवा ! इथे मला बदल करणे शक्य नाही. संपादक मंडळी मनावर घेतील तर बरे. पण माझ्याकडील मुळ प्रतीत बदल करुन घेइन.