मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"संस्कृति" म्हणजे काय रे भाऊ ? ( भाग1)

शरद · · काथ्याकूट
"संस्कृति" म्हणजे काय रे भाऊ ? ( भाग1) आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भानगड कुठून आली ? आपल्या कथेकरी शरदबुवांना हे काय सुचले ? सांगतो. निफाडकर विद्यावाचस्पतींनी एक लेख लिहला "संस्कृती व समाज "त्या एका लेखात इतकी चुकीची, संशयास्पद व हास्यास्पद विधाने आहेत की मला वाटू लागले की आपण ज्याला "संस्कृति" म्हणतो ती त्यांच्या "संस्कृती" पेक्षा निराळी असावी. मग मी औरंगाबादकर प्रा.विद्यावाचस्पतींना विचारले "संस्कृति" म्हणजे काय हो ? ते म्हणाले "गुरुजी, एकदम शिंपल, संस्कृति म्हणजे civiliazation" नाही कळले ? मग culture तरी समजते ना ? . लागला आमचा निकाल ! मग म्हटले आता निफाडकर बघू. त्यांनी माझ्याकडे एखाद्या सिनियर लेखकाने नवोदित लेखकाकडे बघावे तसे पाहिले व एक चाळिस मिनिटांचे लेक्चर दिले. मला काहीच कळले नाही पण नंतर लक्षात आले ते अहिराणी बोलीत बोलत आहेत. आपले मराठीचे तोकडे ज्ञान नडतय. द्या सोडून. आपल्या मिपावरच्या मित्रानाच विचारू हा प्रश्न.. तर मित्र हो, तुम्हाला "संस्कृति" म्हणजे काय वाटते ते सांगा. मी वाचलेले मी भाग (2) मध्ये सांगणार आहेच.विस्तार जरा जास्त असल्याने निराळा भाग केला आहे. आता डॉ. देवरे यांच्या लेखातील मला खटकलेले काही मुद्दे देत आहे. (1) . भारतातील जातककथांवर आधारलेली वेगवेगळी शिल्पे पाहिलीत की त्या कशा उत्तम दर्जाच्या कलाकृती आहेत हे स्पष्ट होते. उदा. घारापूरी, अजिंठा, वेरूळ, कार्ले, अओरिसातील सूर्यमंदिर, जगन्नाथ मंदिर, मध्यप्रदेशातील खजुराहो, दक्षिण भारतातील अनेक हेमाडपंथी मंदिरे ही उत्तम कलाकृतीची उदाहरणे आहेत. जातककथा म्हणजे बुद्धाच्या पूर्वायुष्यातील गोष्टी. आता डॉ..देवरे याना घारापुरी, खजुराहो,(हिंदू + जैन) कोनार्कचे सूर्यमंदिर, पूरीचे जगन्नाथ मन्दिर येथील हिन्दु शिल्पात बुद्धाच्या पूर्वायुष्यातील कोणती शिल्पे दिसली बरे ? काय होते, तुम्ही असली चुकीची उदाहरणे देऊ लागलात की तुम्ही ही मंदिरे पाहिली आहेत की नाही याचीच शंका येऊ लागते. (2) सेच गीता, कुराण, त्रिपिटीक, बायबल, झेंद, अवेस्ता (पारशी), झेन, ताओ, अरण्यके, पिटके, जैन आगमे (जैन), गुरू ग्रंथसाहेब हे ग्रंथही केवळ काव्य नाहीत झेन म्हणजे बौद्ध धर्मातील.माहायान पंथाची चीनमधील एक शाखा. ताओ म्हणजे मार्ग. Within the context of traditional Chinese philosophy and religion, the Tao is the intuitive knowing of "life" that cannot be grasped full-heartedly as just a concept but is known nonetheless through actual living experience of one's everyday being. The Tao reverses the typical [cultural] order of values: it emphasizes the weak over the strong, the feminine over the masculine, the water that wears down the rock, the space between things rather than the things themselves.{विकिपेडिआ} डॉक्टरसाहेब ही काव्ये नव्हेत हो. (3)जगात सर्वत्र कलावंत आणि राजकारणी यांच्यात नेहमी वैचारिक युध्दे होत असतात. संगीत, चित्र, नृत्य, शिल्प इत्यादी कला घ्या. यातील कलाकार विचारवंत म्हणून कोठेच प्रसिद्ध दिसत नाहीत. मग त्यांनी राजकारणी लोकांशी वैचारिक युद्ध करणे ही एक हास्यास्पद कवीकल्पना दिसते. जगातील, गेल्या हजारो वर्षातील 5-10 कलावंतांची नावे द्याना. (4) राजकारणी लोकांना कलावंतांशिवाय पुढे जाता येत नाही इतिहासातील राजकारणी म्हणजे राजे-सुलतान. यांतील बर्‍याच जणांनी कलाकारांना आसरा दिला याची साक्ष इतिहासात मिळते. पण कोणीही कलाकारांशिवाय नेस्तनाबुत झाला याचे उदाहरण मला माहीत नाही. जरा मदत करा. उलट औरंगजेब हा कलाकारांचा द्वेष्टा दीर्घकाळ भारताचा सम्राट होता. (5) कुराण-बायबल बद्दल श्री. गामा पैलवान यांनी प्रतिक्रिया दिली आहेच त्याचावर डॉक्टरसाहेबांनी धन्यवाद देऊन त्यांना गुंडाळले आहे. मीही कुराणाचे मराठी भाषांतर वाचले आहे. मला तरी त्यात कोठेही विशाल मानवी संवेदनशीलता दिसली नाही. दुरुस्त केल्यास आनंदच होईल. (6) सहा सुविख्यात आरण्यकांपैकी ("अरण्यके" ही टंकलेखनातील चूक समजून चालू ) काव्य म्हणावयास कोणती गद्य आहेत, कोणती पद्य आहेत व कोणती गद्य-पद्य आहेत हेही सांगा. शेवटी घरात आलेल्या वयोवृद्ध माणसाला नमस्कार करावयाचे हे माझ्या वडीलधार्‍यांकडून मी शिकलो. माझी मुले माझ्याकडून व त्यांची मुले त्यांच्यापासून. ही झाली.सनातन परंपरा किंवा संस्कृति. आता याचा संबंध मी मोटर चालवतो किंवा नात मोबाईल वापरते याच्याशी काय येतो ? आम्ही ढोंगी आहोत कां ? मीही श्री. गा.पै. सारखे विचारतो की तुम्हाला नक्की काय सांगावयाचे आहे ? संस्कृति म्हणजे काय़ ? समाज म्हणजे काय? या वरचे तुमचे मत व त्यांचा कोणता संबंध तुम्हाला अभिप्रेत आहे हे स्पष्ट करा आमचे मित्र श्री. माहीतगार आता विचारतील की हा निराळा धागा का ? तेथेच प्रतिसाद म्हणून द्यावयास पाहिजे होते. याचे उत्तर असे की डॉ. देवरे "धन्यवाद" म्हणून गुंडाळून टाकण्याची शक्यता व मला पाहिजे आहे संस्कृति बद्दल.मिपाकर मित्रांना असलेली माहिती किंवा त्यांच्या कल्पना. . शरद

वाचने 9123 वाचनखूण प्रतिक्रिया 26

संस्कृति" म्हणजे काय रे भाऊ ? अस न्हव मालकानु संस्कृति" म्हणजे कोण रे भाऊ ? सोप्पय..... हे.ला. काका पोहायला शिकवायचे जी ला ति संस्कृति.

माहितगार Wed, 12/27/2017 - 09:45
...आमचे मित्र श्री. माहीतगार आता विचारतील की हा निराळा धागा का ?
:) धागा लेखात आठवणीने आमचे नाव वाचून आणि सरांचा मनकवडेपणा पाहून डोळे प्वाणावले. :)

माहितगार Wed, 12/27/2017 - 10:20
डॉ. सुधीर देवरे सरांच्या आदीवासी लोकसंस्कृती आणि अहिराणी बोलीभाषेच्या संबंधाने अभ्यास दखल घेण्या जोगा आहे. त्यांच्या ब्लॉग पोस्ट पाठवल्या जाणार्‍यात असलो तरी हल्ली वाचनास वेळ देणे होत नाही आणि दुसरे तर डॉ. देवरे सर आणि इतरही काही अभ्यासक मंडळी आताशा मुख्यत्वे लेटेस्ट बातम्यांनी प्रभावित होऊन मग व्यक्त होत असतात (व्यक्त होणे हा अधिकारा बद्दल आदरच) - बातम्या वाचन बर्‍याचदा आधीच होऊन गेलेले असते, वृत्त माध्यमांचे विशीष्ट कललेले दृष्टीकोण आधीच माहिती असतात या धागा लेखात विशीष्ट निर्देश झाल्या शिवाय वाचन करावे असे होत नाही. वर शरद सरांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्याने वाकुन नमस्कार केला की दुसराही वाकून नमस्कार करतो आधीचा चष्मा आपण पण स्विकारत आहोत ही सहज लक्षात येणारी गोष्ट नसते. बातम्यांचे क्रम आणि दृष्टीकोण मांडणी वृत्तमाध्यमांच्या हितसंबंधांनी बाधीत असू शकते याकडे बर्‍याच अभ्यासकांचे / लेखकांचे दुर्ल़क्ष तर होत नाही ना अशी शंका वाटत रहाते. असो. शरद सरांच्या या धागा लेखात मांडलेल्या मुद्दा ३,४, ५ आणि ७ (म्हणजे तो नमस्कार करणे वाला मुद्दा) याची चिकित्सा करण्यास हरकत नसावी. मुद्दा क्रमांक १ प्रचेतस अधिक सांगू शकतील २ आणि ६ शरद सरांच्या अभ्यासाचे विषय असल्याने त्यांनी केलेल्या छिद्रान्वेषणाचे पुन्हा छिद्रान्वेषण करण्यात खूप मोठा पॉईंट वाटत नाही. ३,४, ५ साठी संस्कृती शब्दाच्या व्याख्येची गरज तत्काळ तरी नसावी ७ च्यावेळी लागेल तसे पाहू.

आनन्दा Wed, 12/27/2017 - 10:32
संस्कृती आणि परंपरा या वेगळ्या गोष्टी आहेत का? हा एक विषय या निमित्ताने चर्चेला यावा. वारसा, परंपरा, भाषा, कर्मकांड, ईश्वरकल्पना, व्यवहार यातला कोणता प्रकार संस्क्रुतीमध्ये बसतो हा विचार करण्याचा विषय आहे.तुम्ही पुढच्या भागात हे मांडाल अशी अपेक्षा कर्तो. अति अवांतर --- हल्ली महाराष्ट्राची संस्कृती "मराठी असे आमुची मायबोली", "जय भवानी जय शिवराय "आणि "मंगळागौर" यात अडकून पडलीय की काय अशी शंका येऊन राहिली.

माहितगार Wed, 12/27/2017 - 10:43
(4) राजकारणी लोकांना कलावंतांशिवाय पुढे जाता येत नाही इतिहासातील राजकारणी म्हणजे राजे-सुलतान. यांतील बर्‍याच जणांनी कलाकारांना आसरा दिला याची साक्ष इतिहासात मिळते. पण कोणीही कलाकारांशिवाय नेस्तनाबुत झाला याचे उदाहरण मला माहीत नाही. जरा मदत करा. उलट औरंगजेब हा कलाकारांचा द्वेष्टा दीर्घकाळ भारताचा सम्राट होता. कोणत्याही राज्य व्यवस्थेच्या देशाची सुरक्षा आणि कायदा, सुव्यवस्था न्याय व्यवस्था सुरळीत चालू ठेवणे या प्राथमीक जबाबदार्‍या असतात. आणि ते पार पाडल्या नंतर प्रजेच्या कल्याण आणि विकासात हातभार लावणे हे दुसर्‍या क्रमांकावर येत असावे, कला, क्रिडा आणि रंजन यांना उदार आश्रय त्या राज्य व्यवस्थेची उदारता दाखवत असले आणि नक्कीच सकारात्मक बाजू असले तरी त्यास पहिला अथवा दुसरा क्रमांक देणे शक्य नसावे उलटपक्षी सुरक्षा आणि कायदा, सुव्यवस्था न्याय व्यवस्था कल्याण आणि विकासा कडे दुर्लक्ष करुन राज्यकर्त्यांनी रंजनात व्यस्त होणे अभिप्रेत नसावे. सत्यजीत रेंनी 'शतरंज के खिलाडी' नावाचा चित्रपट काढला होता तो आठवला, सिमेवर तिकडे युद्ध चालू आहे अथवा प्रजा गांजली आहे आणि राज्यकर्ता तिकडे दुर्लक्ष करून स्वरंजनात रमला आहे हे प्रशस्त होत नाही . ताजमहालचे कलाकृती म्हणून मोठेपण स्विकारुनही कालवा काढावा की ताजमहाल बांधावा ? ताजमहाल सारख्या कलाकृतींची निर्मिती होऊच नये का ? अवश्य व्हावी पण जन कल्याणाकडे दुर्लक्ष करुन नव्हे. या वर चाणक्याचे कदाचित जरासे वेगळे मत असावे राजकीय स्थिरतेचे चित्र निर्माण करण्यासाठी प्रसंगी उत्सव करावेत कारण स्थिरता असेल तर बाकी शक्य होते असावी एक दृष्टीकोण दिसतो. बाकी औरंगजेबाचा पुर्वार्ध कलेच्या द्वेष्ठेपणाचा नसावा उत्तरार्धात मात्र त्याने कडव्या धर्मगुरुंच्या प्रभावा खाली कलेचा आश्रय कमी केला असावा. कलाही नाही आणि सर्व जनतेचे एक समान कल्याण ही पाहीले नाही तरी सम्राट म्हणून टिकला या शरद सरांच्या मताशी सहमत आहे.

In reply to by माहितगार

आनन्दा Wed, 12/27/2017 - 11:30
एखादा सम्राट म्हणून ठीक आहे. पण बहुजनांचा विरोध असेल तर असे साम्राज्य टिकत नाही एव्हढेच नमूद करू इच्छितो.

In reply to by आनन्दा

माहितगार Wed, 12/27/2017 - 16:03
अशक्य नाही पण अवघड असते, किमान दोन टक्के जनतेचे पाठबळ असेल तरी राज्य शकट धकवता येतो असे काही से गणित (बहुधा ब्रिटीशांच्या भारतातल्या सैन्य संख्येवरून) कुरुंदकरांनी मांडल्याचे आठवते. त्या त्या प्रदेश आणि संस्कृतीवरही अवलंबून असावे. इथियोपीया सारखे काही देश कोलोनायझेशन पासून वाचवू शकले. भारतात कोलोनायझेशनला विरोध बराच उशीरा झाला तेही अफगाणिस्तानच्या लेव्हलचा नाही. असो.

माहितगार Wed, 12/27/2017 - 18:19
(3)जगात सर्वत्र कलावंत आणि राजकारणी यांच्यात नेहमी वैचारिक युध्दे होत असतात. संगीत, चित्र, नृत्य, शिल्प इत्यादी कला घ्या. यातील कलाकार विचारवंत म्हणून कोठेच प्रसिद्ध दिसत नाहीत. मग त्यांनी राजकारणी लोकांशी वैचारिक युद्ध करणे ही एक हास्यास्पद कवीकल्पना दिसते. जगातील, गेल्या हजारो वर्षातील 5-10 कलावंतांची नावे द्याना.
इथे कलावंत च्या जागी विचारवंत राजकारणीच्या जागी राज्यकर्ते युद्धच्या जागी संघर्ष असे शब्द ठेवूनही पहाता येईल. अगदीच बंद सामाजिक-राजकीय व्यवस्थेत कलावंतांना कलात्मक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो नाही असे नाही - विचारवंतांना सरळ विचार न मांडता येण्याच्या स्थितीत कलावंतांची कला व्यक्त होण्यासाठी वापरली जाते पण अशा कलां च्या प्रभावाचे वर्तुळ बरेच मर्यादीत असते -कलावंताचे असते त्याला फरतर संघर्ष म्हणता येऊ शकते वैचारीक युद्ध म्हणावे एवढे महत्व समाजात कलावंतांना सहसा मिळत नाही, असे संघर्ष झाल्यास सहसा राजकारणी / सत्ताकारणी तात्कालिक काळात जिंकल्यासारखे दिसले तरी काळाच्या ओघात कलावंतांच्या कलेची वाट मोकळी होत जाते. १) विचारवंतांची राजकारण्यांशी / सत्ताधीशांशी वैचारीक संघर्ष वैचारीक युद्ध नाही तर युद्ध म्हणावे एवढाही पेटू शकतो नाही असे नाही. काही मुलतत्ववादी नेते तसेच धार्मिक नेते, नक्षलवादी नेते , फुटीरतावादी नेते सुद्धा स्वतःस विचारवंतच समजत असतात किंवा समाजापुढे तशी प्रतिमा उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. साहित्यात देखील मुलतत्ववाद आणि दहशतवादाचे समर्थन असू शकतो ह्या बाजूचा डॉ. सुधीर देवरे यांचे लेखनाच्या वेळी कदाचित लक्ष गेले नसावे. २) लोककल्याण कारी राज्याच्या व्यवस्थेत राजा असो वा राजकारणी तो अंतीमतः लोकांप्रती समाजा प्रती उत्तरदायी असतो , साहित्यिक कलावंत विचारवंतांची बाजू ऐकुन घेणे वेगळे पण लोकांच्या प्रती उत्तरदायीत्व संपवून विचारवंतांच्या कलाने चालणे राजकारण्यांकडून अभिप्रेत नसावे या कडेही डॉ. सुधीर देवरे सरांचे लक्ष गेले नसावे किंवा हि बाजू विचारात घेण्याचे राहीले असावे. विचारवंत म्हणतात तामिळनाडूतील म्हशीच्या लढती किंवा इंग्लंडात कोल्ह्यांच्या शिकारी होऊ नयेत पण तेथिक जनते साठी ती परंपरा महत्वाची वाटते. आणि एक नेता म्हणून त्याला जनतेची मर्जी राखणे आणि काळाच्या ओघात स्वतःच्च्या समर्थकांना योग्य काय अयोग्य काय या बद्दल पटवावेही लागते. विचारवंतांना कितीही वाटले तरी कोणत्याही राजकारण्याकडे या समस्येचे नेमके एक उत्तर नसते. असे निर्णय त्याला त्याच्या त्या त्या परिस्थितीत त्याच्या त्याच्या समजुती आणि मकदुरा प्रमाणे घ्यावे लागता घेतले जातात. ३) राजकारण्याच्या स्वतःच्या पदाची नव्हे पण सत्तेच्या व्यवस्थेच्या स्थिरतेची आणि देशाच्या सुरक्षेची कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी लागते. अराजकतेचे समर्थन करणारे देशाच्या एकतेशी सुरक्षेशी तडजोड करणार्‍या तथाकथित विचारवंतांनाही त्यांचे अकांडतांडव बाजूल ठेवून अशांना राज्यकर्त्यांना दूर ठेवावे लागते ती राज्यकर्त्यांच्या पदांची नैतीक जबाबदारी असते.

माहितगार Wed, 12/27/2017 - 19:00
७) शेवटी घरात आलेल्या वयोवृद्ध माणसाला नमस्कार करावयाचे हे माझ्या वडीलधार्‍यांकडून मी शिकलो. माझी मुले माझ्याकडून व त्यांची मुले त्यांच्यापासून. ही झाली.सनातन परंपरा किंवा संस्कृति. आता याचा संबंध मी मोटर चालवतो किंवा नात मोबाईल वापरते याच्याशी काय येतो ? आम्ही ढोंगी आहोत कां ? इथे मात्र शरदसरांचा युक्तीवाद जराशी दिशाभूल करतो आहे का असे वाटते. डॉ. सुधीर देवरे सरांचा त्यांच्या ब्लॉग लेखातील विरोध उदात्त आणि आजही काल सुसंगत असू शकतील अशा सांस्कृतीक परंपरांना नसावा आपल्या परंपरा जपताना इतर चांगल्या सांस्कृतीक परंपरांचे स्वागत करावे असे त्यांना वाटते, सांस्कृतीक देवाण घेवाण व्हावी यात अयोग्य काही नाही याबाबत नैतिक सुभेदारी बर्‍याचदा अनावश्यक असू शकते . पण दुसर्‍या बाजूस कोणतीही सांस्कृतीक प्रभाव स्विकारताना एतदेशीय संस्कृतीचे दमन होणार नाही किंवा त्या मागे काही छुपे हेतु नाहीत तसेच आपल्या परंपराही जतन व्हाव्यात असे परंपरा वाद्यांना वाटण्यातही गैर नाही. भूतान मधील राज्यकर्त्यांना आपल्या संस्कृतीतील पोषाख पद्धतीचे वेगळे पण जोपासले जाण्यासाठी स्थलांतर करून आलेल्यांवर पोषाखा ची सक्ती करावी वाटते ते त्यांचे सांस्कृतीक वैविध्य जोपासले जाण्यासाठी गरजेचे असते. महाराष्ट्रात किंवा जगातल्या कोणत्याही भागात स्थलांतरीतांनी स्वतःच्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी जोपासताना स्थानिक संस्कृती आणि भाषाही स्विकारणे गरजेचे असते आणि त्यासाठी सक्ती अंशतः योग्य असू शकते. सांस्कृतीक हितांना बाधा न येऊ देता अर्थातच सांस्कृतीक उदात्तता शक्यतोवर अधिकतम असावी , आणि त्यात ढोंग नसावे. स्वतः शर्ट पँट घालणार आणि स्त्रीयांनी पाश्चात्य पोशाख केला की भूवया करणार हा आणि असे विरोधाभास तर्कसुसंगत ठरत नाहीत. स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल महात्मा गांधींनी दिलेले उदाहरण प्रस्तुत असावे. इतर जगाशी संवाद साधण्यासाठी आमच्या घराची खिडक्या दारे उघडी असतील पण आमच्या घरांना स्वतःच्या भिंती हव्यात. वसुधैव कुटूंबकम हा काव्यात्मक आदर्श झाला. राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाचे उत्तरदायीत्व आपापल्या जनतेचे समाजाचे हित संबंध जोपासणे असतेच योग्य पद्धतीन योग्य हितसंबंध जोपासून वसुधैव कुटूंबकम मधील सहभाग ठिक आहे, जनतेच्या हिताशी तडजोड करून केलेले वसुधैव कुतूंबकम तार्किक दृष्ट्या फायद्याचे ठरत नसावे किंवा कसे.

माहितगार Fri, 12/29/2017 - 09:56
(5) कुराण-बायबल बद्दल श्री. गामा पैलवान यांनी प्रतिक्रिया दिली आहेच त्याचावर डॉक्टरसाहेबांनी धन्यवाद देऊन त्यांना गुंडाळले आहे. मीही कुराणाचे मराठी भाषांतर वाचले आहे. मला तरी त्यात कोठेही विशाल मानवी संवेदनशीलता दिसली नाही. दुरुस्त केल्यास आनंदच होईल.
beauty lies in the eyes of the beholder ;) हे लिहिताना कुठे अडखळलो ते दुवा उघडल्यावर कळेल, जेवण्याच्या ताटात खारट होणार नाही एवढे शंका आणि टिकेचे मिठ हवेच मीठ घेताना पंच महाभुतांपेक्षा काही वेळा त्या त्या सुभेदारांचे उत्पात मूल्य धास्ती देणारे असू शकते . याला दुसरा मार्ग असा कि आपल्या ताटात काय घ्यायचे याचा विचार करणे अधिक सुकर असू शकते त्या साठी वेगळा चर्चा धागा काढूया म्हणजे त्याच वेळी काळ्या कुट्ट ढगातही चंदेरी किनार किंबहुना काळ्या रंगातील सौंदर्य शोधण्यची सवय आपली आपल्याला लाभदायक होईल शिवाय त्यातील त्याज्य काय याचा नीर क्षीर विवेक विनासायास होऊ शकतो. गा पैंनी "वास्तव जीवनाच्या तत्वज्ञानाने ते ओतप्रोत भरलेले आढळतात." या अधिक नेमक्या शब्दांवर शंका व्यक्त केली आहे. वास्तव जीवनाच्या तत्वज्ञानाने म्हणजे काय ? न्याय करताना स्त्रियांच्या साक्षीला पुरुषांच्या साक्षी पेक्षा कमी मूल्य असावे हा वास्तव वाद डॉ. सुधीर देवरे सरांना अभिप्रेत आहे . ? कि ईश्वर आणि भक्त यातील गुलामीच्या नात्या सोबत मानवी गुलामगिरीच्या समर्थानात डॉक्टर सरांना वास्तववाद स्पृहणीय वाटतो ? डॉक्टर सरांचे अजून एका वाक्य रोचक आहे “जगातील आद्य वाड्‍मय कुठल्यातरी मताच्या प्रचारासाठी लिहिले गेले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्‍‍त होणार नाही. पण या प्रचारात उदारमतवादी दृष्टीकोन होता.” आम्ही ज्ञानदेवांच्या पसायदानात उदारमतवाद पहातो पण ज्ञानदेव माउली सुद्धा उदार अंतःकरणाने प्रसाद वाटण्या पूर्वी ‘खळांची व्यंकटी सांडो ‘ हे आवर्जून सांगतात . डॉ. देवरे सरांना संत काव्यात देव पाहण्यास , आदिवासींच्या डोंगर्या देवाची अनुभूती आवडते ; पण ज्यांना ‘ विसंवादी वास्तववादाची आणि नसलेल्या उदारमतवादाची प्रमाणपत्रे ते जेव्हढ्या सहज वाटू इच्छितात तेव्हा इतरांचे सोडून द्या, स्वतः:च्या विचारांशी विश्वासांशी प्रामाणिकपणे विरोधाभास रहित उरतात का या बद्दल साशंकता वाटते. ज्ञानेश्वर माउलीही ईश्वर निष्ठांचा आग्रह धरतत, सर्वांही सदा सज्जन वागण्याचे सांगताना पण असे मार्तंड तापहीन असले पाहीजेत हे सांगायचे ते विसरत नाहीत . ईश्वराशी प्रत्येकाला आपाल्या परीने नाते न जोडू देता त्यांच्या विरूद्ध मार्तण्डण्ना हकनाक हिंसाचारासाठी तापवणार्‍या एखाद्या ग्रंथात धागा लेखक शरद सर तथाकथित संवेदनेतील आपापराभावाने अडखळत असतील आणि विशाल आणि मानवी या विशेषणांबद्दल साशंकित होत असतील तर नवल नसावे. असो. चर्चा धागा काढून लक्ष वेधून माता व्यक्त करण्याची संधी दिल्या बद्दल शरद सरांचे आभार . अर्थात प्रतिसाद देताना मला संस्कृती शब्दाची व्याख्या करावी लागली नाही . एवढी एक उणीव माझ्या प्रतिसादातून शरद सरांना जाणवू शकते त्या बद्दल क्षमस्व.

In reply to by माहितगार

पुंबा Fri, 12/29/2017 - 13:26
याला दुसरा मार्ग असा कि आपल्या ताटात काय घ्यायचे याचा विचार करणे अधिक सुकर असू शकते त्या साठी वेगळा चर्चा धागा काढूया म्हणजे त्याच वेळी काळ्या कुट्ट ढगातही चंदेरी किनार किंबहुना काळ्या रंगातील सौंदर्य शोधण्यची सवय आपली आपल्याला लाभदायक होईल शिवाय त्यातील त्याज्य काय याचा नीर क्षीर विवेक विनासायास होऊ शकतो.
किती कठीण ते वाक्य? जरा तोडून, विरामचिन्हे लावून जरा डागडूजी होऊ शकते काय? शिवाय धाग्याचे धमकी!

In reply to by पुंबा

माहितगार Fri, 12/29/2017 - 19:51
आम्ही धाग्यांची बरसात करतो आहो :) आमच्या नव्या चर्चा धाग्यात सहभागी व्हा . वाक्यात काय म्हटले आहे ते सवडीने उमगेल, आणि नाही उमगले तरी मनावर घेऊ नका कारण काही वेळा कोड्यात बोलणेच हिताचे असते. * कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?

In reply to by माहितगार

शरद Fri, 12/29/2017 - 19:32
हा धागा लिहला तेव्हा ठरवले होते की मिपावरील मित्रांचे संस्कृति " यावरील विचार काय हे आपण विचारले आहेच. पण तरीही आपल्या काही मित्रांना व्य.नि. पाठवून त्यांना लिहण्याचा आग्रह करावा. यादीत पहिले नाव होते श्री. माहीतगार यांचे. मग म्हटले "गड्या, कशास त्यांना आपण होऊन भरीस पाडा. तुझे लेखन वाचले की त्यांना लिहावेसे वाटले तर लिहतीलच की. आता ही संधी त्यांनी स्वत:च दिली आहे इथेच ती विनंती करावी. नक्की लिहा." शरद

In reply to by माहितगार

शरद Fri, 12/29/2017 - 19:34
व29 Dec 2017 - 7:32 pm | शरद हा धागा लिहला तेव्हा ठरवले होते की मिपावरील मित्रांचे संस्कृति " यावरील विचार काय हे आपण विचारले आहेच. पण तरीही आपल्या काही मित्रांना व्य.नि. पाठवून त्यांना लिहण्याचा आग्रह करावा. यादीत पहिले नाव होते श्री. माहीतगार यांचे. मग म्हटले "गड्या, कशास त्यांना आपण होऊन भरीस पाडा. तुझे लेखन वाचले की त्यांना लिहावेसे वाटले तर लिहतीलच की. आता ही संधी त्यांनी स्वत:च दिली आहे इथेच ती विनंती करावी. नक्की लिहा." शरद

शरद Fri, 12/29/2017 - 19:37
कृपया लिहा हो हा प्रतिसाद श्री. माहीतगार यांच्या प्रतिसादाखाली खाले वाचावा. शरद

राही Fri, 12/29/2017 - 22:12
लेखाच्या शीर्षकाचा आवाका फारच मोठा आहे पण जमेल तितक्या थोडक्यात पाहू. संस्कृती म्हणजे ढोबळमानाने एखाद्या मानवसमूहाची जगण्याची, लोकव्यवहाराची पद्धत. संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती देशकालसापेक्ष असते आणि म्हणून सतत बदलत असते. संस्कृतीसाठी वर्तमानकाळ महत्त्वाचाअसतो. वर्तमानावरून ठरते की ती संस्कृती सांप्रत जिवंत आहे की मृतप्राय आहे, र्‍हासाकडे चालली आहे की वर्धिष्णु आहे. अर्थात संस्कृतीला भूतकाळ असतोच. ते त्या संस्कृतीचे संचित असते. पण संस्कृती भूतकाळात वाढत नाही. ती वर्तमानकालात वाढते आणि हा वर्तमानकाळच पुढे दैदीप्यमान भूतकाळ बनतो. उत्कर्षाच्या शिखरावर पोचलेली संस्कृती निसर्गनियमाप्रमाणे र्‍हासाकडे वळते, तेव्हा ती संस्कृती जगणारा मानवसमूह भूतकाळाचा अवाजवी गौरव करू लागतो, स्मरणरंजनात रमतो आणि ती रम्य संस्कृती पुन्हा अवतरण्याची अपेक्षा धरतो, तशी स्वप्ने बघतो. तो गेलेला काळ पुन्हा येणार नसतो. लोक पुन्हा रथातून दौडणार नसतात. तिळाचे तेल आणि चरबी यावर सार्वजनिक दिवे पेटणार नसतात. लोहखनिजाच्या स्मेल्टिंगची जुनी पद्धत सांप्रत वापरली जाणार नसते. जेवण चुलीवर शिजणार नसते. कारण या सर्व त्रिमितीतल्या जीवनव्यवहारात काळ ही मिती बदललेली असते. त्रिमिती आलेखातला कोणताही गतबिंदू पुन्हा संस्कृतीच्या वाटचालीच्या आलेखावर मांडता येणे शक्य नसते. पण म्हणून; त्याच वेळी, त्या मानवसमूहाचे लोकव्यवहार, जीवन थांबले का? तर ते थांबत नाही. तो समूह एका नव्या, कालसुसंगत पद्धतीने जगू लागतो. म्हणजे त्याच्या संस्कृतीत बदल घडत असतो. एक नवी संस्कृती जन्माला येत असते. ग्रीसमध्ये ग्रीक, इटलीमध्ये रोमन, इराणमध्ये पर्शियन, अफ्घानिस्तानात गांधार संस्कृती आता नाही. आपल्याकडे वैदिक संस्कृती आता नाही. म्हणून ग्रीस, इटली अथवा आपण संस्कृतीहीन झालो आहोत का? तर तसेही होत नाही कारण या मानवसमूहांनी एक नवी संस्कृती घडवलेली असते, अंगीकारलेली असते. आणि जितक्या लवकर, जितक्या सुलभपणे एखादा मानवसमूह या बदलांना सामोरा जाऊन काळाचे हे आव्हान स्वीकारतो तितक्या जोमाने त्याची संस्कृती नवी झेप घेत असते. एक प्रकारे हा काळावर मिळवलेला विजय असतो. नव्या संस्कृतीत मूल्यबदल अपेक्षितच असतो. उदाहरणार्थ, 'बाबा वाक्यं प्रमाणम्' जाऊन वडीलधार्‍यांना प्रश्न विचारण्याची, आपले मत खुलेपणाने मांडण्याची आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची वृत्ती वाढत असेल तर ते स्वागतार्ह मानायला हवे. कारण यात व्यक्तीच्या विवेक आणि निर्णयक्षमतेचे उन्नयन आहे, क्षमतावर्धन आहे. सक्षम व्यक्ती समाजाला सक्षम बनवते. थोडे अवांतर होईल, पण भाषेचेही तसेच आहे. भाषा सदैव बदलत असते आणि नवे कालसुसंगत रूप धारण करीत असते. खरे तर भाषा हेही त्या त्या संस्कृतीचे एक अंग आणि प्रतीक असते. जी संस्कृती अधिक सर्वसमावेशक ती अधिक जोमदार आणि बदल पचवून तरारणारी असते असे म्हणता येईल.

In reply to by राही

माहितगार Fri, 12/29/2017 - 22:23
उत्कर्षाच्या शिखरावर पोचलेली संस्कृती निसर्गनियमाप्रमाणे र्‍हासाकडे वळते, तेव्हा ती संस्कृती जगणारा मानवसमूह भूतकाळाचा अवाजवी गौरव करू लागतो, स्मरणरंजनात रमतो आणि ती रम्य संस्कृती पुन्हा अवतरण्याची अपेक्षा धरतो, तशी स्वप्ने बघतो.
अंशतः मान्य पण या मुद्याला आणखी बाजू असू शकतात ?

In reply to by शरद

माहितगार Sat, 12/30/2017 - 10:59
मिपा करांच्या भाषेत रुमाल टाकून ठेवला आहे सावकाश प्रतिक्रीया देण्यासाठी. :) राहींनी आत्ता कुठे सुरवात केली आहे. माझ्या शिवाय इतरांनाही व्यक्त होण्याची संधी मिळू देत जरा , आम्ही दुसरी कडचे राउंड मारुन येतो ह्या विषयावरील चर्चा जशी पुढे जाईल तसे.