मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गूढ अंधारातील जग

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गूढ अंधारातील जग आपण कधी खिडकीच नसलेल्या कार्यालयात काम केलं आहे का? महिनोंमहिने सूर्यप्रकाश , चंद्रप्रकाश, उघडे आभाळ पाहिलेले नाही. तीन तीन महिने २४ तास त्याच त्याच माणसांचा चेहरा पहिला आहे का? तीन महिने सलग बिन अंघोळीचे राहिला आहात काय ? आणि वापरलॆले कपडे न धुता टाकून दिले आहेत का? डिस्पोझेबल डायपर नव्हे तीन महिन्यात केस कापता आले नाहीत म्हणून एखाद्या गोसाव्यासारखे वाढू दिले आहेत का? महिनोन्महिने डबाबंद अन्न खाल्लंय का? मला कितीही सुग्रास जेवलं तरी शेवटी आमटी भात लागतोच, मला रोज नॉनव्हेज लागतंच किंवा मी १०० टक्के नॉनव्हेज आहे, तोंडाला चवच राहिली नाही साला श्रावण केंव्हा एकदा संपतोय असं झालं आहे असे ना म्हणता केवळ टोमॅटो केचप आणि पोळी/ ब्रेड खायला लागते आहे म्हणून तक्रार न करता काम केलंय का? आणि हे सुद्धा आपण काही गुन्हा केल्यामुळे अंधारकोठडीत टाकलंय कि काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे म्हणून नव्हे तर आपण स्वतःच्या इच्छेने हे करायला तयार झाला आहात म्हणून. हे एक वेगळे आणि गूढ पण अंधारातील जग आहे हे जग आहे पाणबुडीचे आणि त्यात काम करणाऱ्या नौसैनिकांचे. हि माणसे तुमच्या आमच्यातीलच सामान्य माणसं असतात. पण त्यांना या जगासाठी तयार केलं जातं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या समानशीले व्यसनेषु सख्यम या नात्याने त्यांचे जग हे अतिशय घट्ट असे रेशमी मानसिक बंधाचे (क्लोज बॉन्डेड) तयार झालेले असते. पाणबुडीत काम करण्यासाठी सर्वानाच १ वर्षाचा खास पण अतिशय कठीण असा एक अभ्यासक्रम करावा लागतो मग तो डॉक्टर असो कि इंजिनियर. कारण पाणबुडी हि सीलबंद आणि अभेद्य असते आणि तिला कोठूनही चीर किंवा भोक पडले तर त्यात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो. आपण घरात कोंदट झाले तर पटकन खिडक्या उघडतो अशा खिडक्या मुळात पाणबुडीला नसतातच आणि पाणबुडी हि असंख्य कप्प्यांची बनलेली असते. त्यातील प्रत्येक कप्पा हा जलाभेद्य असतो. यामुळे पाणबुडीत च्या आत असलेल्या हवेच्या प्रमाणावर सारखे लक्ष ठेवावे लागते. त्यातून एखाद्या कप्प्यात आग लागली तर तेथे तयार होणारे कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉऑक्साईड आणि इतर धोकादायक वायू यावर ताबडतोब उपाय करावे लागतात. अशा असंख्य गोष्टीवर तेथे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाला पाणबुडीतील जीवन रक्षक कवायतीच्याबद्दल इत्यंभूत ज्ञान असणे आवश्यक असते. सिगरेट बिडी पिणे हे तर संपूर्ण निषिद्ध आहेच. दिवस कोणता आणि रात्र कोणती हे हि आतमध्ये समजत नाही. पूर्णवेळ कृत्रिम प्रकाशात राहायला लागते आणि वॉर पेट्रोल साठी गेल्यावर तीन महिने एका वेळेस बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो मग वृत्तपत्र दूरदर्शन दूरध्वनी भ्रमणध्वनी इ सर्व च्या सर्व बंद होऊन जाते. आज काही तास मोबाईल बंद झाला/ बॅटरी संपली म्हणून तर कासावीस होणारे कित्येक तरुण आपल्याला आसपास दिसतात. अशा परिस्थितीत सुशिक्षित तरुण यश खडतर आयुष्यासाठी आनंदाने का तयार होतात याचे मला आश्चर्य आणि कौतुक वाटत राहिले आहे. हा विषय अतिशय गहन, खोल आणि विस्तृत आहे. या विषयाला मी हात घालतो आहे पण किती भागात आणि कसे लिहिता येईल याबद्दल मला अजूनही काहीच संकल्पना नाही मी पाणबुडीत प्रत्यक्ष काम केलेलं नाही. केवळ पाणबुडीला भेट दिली आहे, अंडर वॉटर मेडिसिनचा प्राथमिक अभ्यासक्रम केला आहे आणि नौदलात नोकरी केल्यामुळे माझे असंख्य वरिष्ठ, कनिष्ठ आणि मित्र हे पाणबुडीत प्रत्यक्ष काम केलेले आहेत त्यांच्याशी मारलॆल्या गप्पा यावरून मी या विषयाला हात घालायचा प्रयत्न करतो आहे. या विषयावर मराठीत किती माहिती आहे हेही मला माहित नाही. या विषयाच्या प्रुष्ठभागाला स्पर्श करता आला तर मी स्वतःला धन्य समजेन. एखादे वेळेस माहिती विसंगत किंवा चुकीची असण्याची शक्यता आहे त्यात कुणी दुरुस्ती सांगितली तर मी प्रथमच माफी मागतो आहे आणि या चुका सुधारण्याचा माझा प्रयत्न राहील हे हि नमूद करू इच्छितो. क्रमशः

वाचने 43914 वाचनखूण प्रतिक्रिया 46

कानडाऊ योगेशु Mon, 11/13/2017 - 06:29
डॉ. साहेब तुम्ही आता किती खोलवर घेऊन जाता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुमच्या इतर मालिकांप्रमाणेच ही मालिकाही दणदणीत होणार हे नक्की. पु.भा.प्र.

एका रोचक आणि माहितीपूर्ण लेखमालेची सुंदर सुरुवात ! पियरला लावलेल्या अनेक पाणबुड्यांतून चक्कर मारली आहे. कादंबर्‍यांत वर्णने वाचली आहेत. पण, एका नौदल अधिकार्‍याच्या लेखणीतून उतलेले लेखन वाचण्यात वेगळीच मजा असेल.

नरेश माने Mon, 11/13/2017 - 14:57
पाणबुडीतील नौसेनिक कसे राहत असतील याविषयी नेहमीच कुतुहल वाटायचे. आता आपल्यामुळे एका चांगल्या विषयावरील लेखमालिका वाचायला मिळणार हे नक्की. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

विनिता००२ Mon, 11/13/2017 - 15:27
माझ्या मैत्रिणीचा मुलगा नुकताच नेव्हीत सिलेक्ट होऊन पाणबुडीवर गेला आहे. गाझी अटॅक मुळे बर्‍यापैकी माहीती झाली आहे. लिहावे आपण. वाचायला आवडेल.

वा मालिका चालू करताय डॉ. साहेब. एक विनंती सर्वात शेवटी अंतिम भागात आजवर झालेल्या पाणबुड्यांचे अपघात कशामुळे झाले ह्या वर सुध्दा लिहा.

In reply to by प्रमोद देर्देकर

सुबोध खरे Wed, 01/03/2018 - 12:59
पाणबुड्यातील अपघात याचा दुवा दिला तेंव्हा आपलय या प्रतिसादावर लिहायचे राहून गेले हे आठवले. ते आता शोधून काढले. सर्व अपघातांबद्दल लिहिणे शक्य नाही परंतु सिंधुरक्षक का बुडाली याचे अधिकारिक कारण जरी खालीलप्रमाणे असले https://www.ndtv.com/india-news/ins-sindhurakshak-submarine-explodes-18-sailors-feared-dead-531595 https://www.ndtv.com/india-news/blast-in-submarine-sindhurakshak-was-due-to-lapses-in-procedure-says-navy-670960 तरी प्रत्यक्ष कारण वेगळेच आहे असे माझ्या मित्रांकडून समजले. नौदल पाणबुडीच्या बॅटऱ्या गेली ४५-५० वर्षे स्टॅंडर्ड बॅटरीज (आता एक्साईड) या कंपनी कडून घेत असे आणि या बॅटऱ्या वर्षानुवर्षे व्यवस्थित चालत होत्या. (इराण कडेही अशाच किलो क्लास च्या तीन पाणबुड्या आहेत आणि ते हि आपल्याकडूनच एक्साईडच्या बॅटऱ्या आयात करून गेली ३० वर्षे पेक्षा जास्त वापरत आहेत. तेथेपण या (एक्साईड) बॅटऱ्यात कोणताही अपघात झालेला नाही. ) पण HILIFE BATTERIES या हैदराबादमधील एका बॅटरी उत्पादकाने त्यांच्या कडून बॅटऱ्या विकत न घेतल्या बद्दल (नौदल)संरक्षण मंत्रालयाविरुद्ध कोर्टात केस केली. या विरुद्ध ठाम भूमिका घेण्याऐवजी आपल्या बाबू लोकांनी बॅटरीच्या खरेदीवर प्रतिबंध लावला. म्हणजे प्रश्न सोडवायच्या ऐवजी आपल्यावर भ्रष्टाचाराचा काही कीटाळ येऊ नये म्हणून प्रश्न बासनात गुंडाळून ठेवला. बॅटऱ्या अति जुन्या झाल्या तरी त्या तशाच वापरात ठेवल्या होत्या http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2570530/Revealed-Delay-changing-submarine-batteries-caused-INS-Sindhuratna-tragedy.html इकडे जुन्या बॅटरीतून चार्ज करताना निघणाऱ्या अतिरिक्त हायड्रोजन वायू मुळे त्यातील दोन पाणतीरांचा स्फोट झाला. यात १८ (१५ नौसैनिक आणि ३ अधिकारी) जणांचे प्राण गेले. अशाच तर्हेचा अपघात सहाच महिन्यांनी सिंधुरत्न या त्याच क्लासच्या पाणबुडीत झाला ज्यात दोन अधिकारी मृत्युमुखी पडले. दोन्ही पाणबुड्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल झाले, नौदल प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पण संरक्षण मंत्रालयातील फायलींवर बसून राहणाऱ्या बाबूंच्या आणि तेंव्हाचे संरक्षण मंत्री(अँटनी) यांच्या मात्र केसालाही धक्का लागला नाही.

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर Wed, 01/03/2018 - 13:31
काय हरामखोर लोकं आहेत! एवढं ऐकल्यावर तर
आपल्यावर भ्रष्टाचाराचा काही कीटाळ येऊ नये म्हणून
हे सुद्धा वरवरचच वाटतं. कदाचित मुद्दामुनच घेतल्या नसतील.

हल्लीच एका अमेरिकन मित्राशी बराच वेळ बोल्लोय ह्या विषयावर त्यामुळे वाचन उत्सुक आहेच , आणि जर काही विसंगती आढळली तर दाखवून देईन (हे उगाच सांगतोय कृ ह घ्या :) )

sayali Tue, 11/14/2017 - 15:39
अभिनंदन... बरेच काही वाचण्यासारखे असेल अशी खात्री आहे.. त्यांचे कष्टप्रद जीवन बघून क्षुल्लक कारणांसाठी रडणार्यांना प्रेरणा मिळेल ह्यात शंका नाही.

In reply to by शरभ

सुबोध खरे गुरुवार, 11/16/2017 - 18:28
ड जीवनसत्त्व हे सूर्य प्रकाशातुन मिळते. साधी पाणबुडी ३०-४५ आणि अणुपाणबुडी ९० दिवसाच्या गस्तीवर जातात तेंव्हा त्यांना असा सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे त्यांना दर महिन्याला ६०, ००० IU ची गोळी महिन्याला एक या प्रमाणात दिली जाते. (अशा नौसैनिकांची गरज रोज १००० IU इतकी असते) पाणबुडीवरील नौसैनिकांच्या आहारात रोजच्या रेशन व्यतिरिक्त अतिरिक्त चीज बटर आणि इतर दुधाचे पदार्थ पण अंतर्भूत असतात.

Nitin Palkar Tue, 11/14/2017 - 19:50
मस्तच डॉक्टरसाहेब, सुरवात आवडली, उत्सुकता ताणली गेली आहे. पुढील भागाची वाट पाहात आहे. पुलेशु!

पिवळा डांबिस Tue, 11/14/2017 - 23:59
सुदैवाने एका पाणबुडीत जाऊन आतून पहाण्याचा (अर्थातच ती पृष्ठभागावर बंदरात पार्क केली असतांना!) अनुभव घेतलेला आहे. तिची एकंदर रचना, जागेची कमतरता याची जाणीव आहे. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे... रच्याकने: ज्यांना पाणबुडीतील आयुष्याची थोडीफार कल्पना हवी असेल त्यांनी 'द हंट फॉर रेड ऑक्टोबर' हा चित्रपट पहावा ही शिफारस...