विद्यार्थ्यांनो...
लेखनविषय:
काव्यरस
देव, गुरू आणि पालक चिकित्सेच्या पलिकडले आहेत,
त्यांना कुठलेही प्रश्न विचारू नयेत, जसे असतील तसे स्विकारावेत.
त्यांच्यात दोष असू शकत नाहीत हे मुकाट्याने मान्य करा.
जे जे हे सांगतील ते ते नैतिक, महान, अंतिम सत्य,
तुमच्या शंका, तुमचे आक्षेप म्यानबंद करून त्यांच्या वाटेने चालू पडा.
तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच सत्याची छोटी शलाका,
आम्ही त्याचा बंदोबस्त करू व्यवस्थीत, तुम्ही फक्त ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा.
देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जरी तरी तेच पुनःपुन्हा पुजा.
तुम्ही सगळे असे प्रश्न न विचारणारे, गुणवान, कधीही बंड करण्याची शक्यता नसणारे व्हाल,
कणा मोडलेल्या मेंढरांना हाकणे आम्हाला देखिल सोपे पडेल.
एकसाची, एकजीनसी, आज्ञाधारक गुणी बालक आम्ही म्हणेल त्याचा खात्मा करू शकेल.
लक्षात ठेवा, चिकित्सा, टीका आदी चार्वाक- तुकारामाचे फालतू लाड तुमच्याकरीता नाहीत.
आम्ही वर्षानुवर्षे जपलेली असत्ये, पडलीच उघडी चुकुनमाकुन तर व्यवस्थाच बुडेल आमच्यासहित.
चला, प्रश्नचिन्हांची छाटणी चालूये, एका हाताचे अंतर घ्या, रांग धरा,
एकही प्रश्न विचारू नका, आयती उत्तरे मिळतील ती पाठ करा.
संदर्भः
http://www.thehindu.com/news/national/dont-question-god-guru-and-parents-minister/article19626164.ece
वाचने
7636
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
आवडली.
In reply to समयोचित ! by अनन्त्_यात्री
अनंतयात्री, धन्यवाद!!
अप्रतिमच
जगातली कोणतीच गोष्ट अखंड चिकित्सेच्या पलिकडली नाही,
कोणाबद्दलही कोणताही प्रश्न विचारावा, आपल्याला सगळं कळतं असं समजून प्रत्येकाला आपल्यासारखं बदलून घ्यावं
तुमच्यात दोष असूच शकत नाहीत हे मान्य करायला लावा सगळ्यांना.
पालक, गुरु सांगतील ते अनैतिक, नीच, खोटारडं असणारच हा विचार सोडू नका,
त्यांच्या शंका, त्यांचे आक्षेप धुडकावून करून आपल्या वाटेने चाआपल्या, कारण कळतं सगळं तुम्हालाच.
तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच व्यसनांची छोटी शलाका,
आम्ही का करू त्याचा बंदोबस्त व्यवस्थीत, तुम्ही फक्त आणि फक्त लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा.
देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जर तर तेवढंच त्यांना निर्भत्सण्यासाठी, सोडण्यासाठी पुरे माना.
मग तुम्ही सगळे असे सगळे टिवीवर डिबेट करणारांसारखे, शहाणे , शिक्षित, सिविलाइज्ड, आधुनिक व्हाल,
तुमच्या दिशाहिनतेला दिशाहिनता कोण म्हटतं आम्ही पाहून घेऊ.
रँडमली ओरीयेंटेड, निर्णयक्षम, ज्ञानी , अभ्यासू आणि आधुनिक म्हणून इतके अम असालच कि जो चूक मानाल त्याचा खात्मा कराल.
लक्षात ठेवा, मनःशांती, प्रेम आदी ग्यानोबा- तुकारामाचे फालतू लाड तुमच्याकरीता नाहीत.
आम्ही वर्षानुवर्षे चालवलेली चिकित्सा बंद झाली तर आमच्या बिनकाम्यांना पोसणार्या व्यवस्था बुडतील आमच्यासहित.
चला, प्रश्नचिन्हांची उभारणी चालूये, एका हाताचे अंतर घ्या, रांग धरा,
एकही गोष्ट चिकित्सेवाचून सोडू नका, त्या मायबापाची चिकित्सा करायला सांगणार्याला सोडून बरं का.
In reply to आमची एक अर्धी पायरेटेड कविता by arunjoshi123
अजो, एवढ्या भलत्याच टोकाला का नेत आहात गोष्टी? चिकित्सा म्हणजे अवमान असे तुम्ही मानता का? चिकित्सा, चुका दिसणे, शंका/प्रश्न विचारणे केवळ अहंकारातूनच येऊ शकते का? निखळ जिज्ञासा हे विद्यार्थ्याचे कल्याण करणारी व्हर्च्यु आहे की नाही? मन:शांती, प्रेम हे चिकित्सा ह्या मुल्याच्या विरोधी कसे?
माझ्या मते, आई- वडिल, गुरू, देव(मंत्र्यांच्या शब्दात भगवान, अल्ला, गॉड) हे प्रश्नातीत आहेत असे सांगणे चुकीचे आहे. उलट प्रश्न बिनधास्त विचारा, त्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा हा सल्ला अधिक श्रेयस्कर आहे. प्रश्न विचारले की डोळे वटारणार्या आईबापांची पिढी नष्ट होतेय अश्या वेळी घड्याळाचे काटे मागे फिरवण्याचा यत्न कशासाठी? प्रश्न विचारता न आल्याने उत्तर शोधण्याचे स्किल देखिल डेव्हलप होत नाही असे मला वाटते. त्या दृष्टीने हे चुकीचे आहे.
अर्थात, चिकित्सा आणी व्यक्तिचा सन्मान करणे ह्या व्यस्त गोष्टी नाहीत हे रूजवणेदेखिल गरजेचे आहेच.
In reply to अजो, एवढ्या भलत्याच टोकाला का by पुंबा
मला टोकाचा वा साधाही विरोध करायचा नाही. प्रत्येक गोष्टिला मर्यादा असावी. त्यात चिकित्सा देखिल येते. बालपणी कशाची चिकित्सा करावी याला अजूनच जास्त मर्यादा असाव्यात. कारण चिकित्सा कशी करायची याचं कोणतं फ्रेमवर्क त्या वयात नसतं म्हणून मुले कुठेही वाहवत जाऊ शकतात. पालक, शिक्षक, देश, धर्म यांची चिकित्सा करावी इतकी बुद्धी लहानपणी नसते. शिवाय यांची चिकित्सा केलीच तर कोणकोणत्या बाबींची करावी, काय अर्थ काढावा, कसे वागावे याची उत्तरे काहीही निघू शकतात.
================
मंत्र्यांना अभिप्रेत नसू शकतील असे बरेच उद्देश आणि परिणाम आपण आपल्या कवितेत घातले आहेत. त्याच्या विरुद्ध बाजूचे मी माझ्या पायरसीमधे घातले आहेत. अर्थात दोहोंचं संतुलन असावं हे स्पष्टच आहे.
=================
जे लोक स्वतः अत्यंत उत्तम संस्कारात वाढतात त्यांना सार्वजनिक आत्मनिर्णयनाची रिस्क कळत नाही. त्याचे एक उदाहरण आपण असाव्यात. मात्र भारतातल्या सामान्य मुलाला मात्र पालक, गुरुजन, ईश्वरप्रणित मूल्ये आदर्श मानून मोठे होणे आवश्यक आहे. विवेक, संस्कार जास्त महत्त्वाचे. चिकित्सा म्हणजे चांगुलपण नव्हे. शिवाय आवश्यक देखिल नाही कंपल्सरिली. अगोदर चांगले व्हा, चिकित्सा कशी करायची, कशाची करायची ते शिका , मग करा.
====================
विद्यार्थ्यांचा मूळ कल बिघडण्याकडे असतो, आणि पालक, गुरु आणि समाजाच्या त्रिमितिय प्रेशरमधे ते जागेवर राहातात (किमान हळू बिघडतात) असं माझं व्यक्तिगत निरिक्षण आहे म्हणून प्रतिसाद लिहिला.
================================
अपवादात्मक ठिकाणी मुलांनी चिकित्साच काय, यांना सरळ धाब्यावर बसवावे. पण जनरल आव्हान काय असावं?
In reply to मला टोकाचा वा साधाही विरोध by arunjoshi123
चिकित्सा मरू द्या. तिथे स्वतःहून विचार करणे अभिप्रेत आहे. अगदी लहान मुले ते करू शकतील असे नाही. पण प्रश्न विचारण्यात काय प्रॉब्लेम आहे? प्रश्न विचारून उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणे याची पुढली पायरी स्वयंबुद्धीने चिकित्सा असेल. प्रश्न विचारण्याला मनाई असेल तर पुढचे होणार नाही. शिवाय किती वयानंतर चिकित्सा करण्याची मुभा हे कसे ठरवणार?
पण जनरल आव्हान काय असावं?बिनधास्त प्रश्न विचारा..
कविता आवडली. समर्पक आणि समयोचित आहे.
वकिलसाहेब, एस, अजो धन्यवाद!
दोन्ही बाजू आवडल्या, व काहिशा पटल्याही. पण ही दोन्ही टोके सांधायची कशी?
प्रत्येकाच्या घडवणूकीमधे आई वडिल किंवा गुरु यांचे एक निश्चित योगदान असते. अर्थात हे सर्वजण सर्वज्ञ किंवा परिपूर्ण नसतात. (किंबहूना या जगात कोणीच परिपूर्ण नाही. ) पण त्यांना आपल्या पाल्ल्या बद्दल किंवा विद्यार्थ्या बद्दल आपुलकी आणि तळमळ असते. ते लोक जे काही देतात किंवा शिकवतात ते या तळमळीपोटीच.
त्यांनी दिलेल्या योगदानाची आणि त्याच बरोबरीने त्यांच्या मर्यादांची जाणीव ठेवत त्यांच्याशी संवाद साधला तर दोन्ही बाजूंचा समन्वय साधता येईल.
पैजारबुवा,
In reply to दोन्ही बाजू आवडल्या by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
अगदी बरोबर. माझं मत देखील हेच
कविता फार आवडली.
सौरा,
एक अध्याहृत गोष्ट म्हणजे ज्याला सत्य शोधायचंय अशानेच या तिघांची चिकित्सा टाळावी. ज्यांना सत्य शोधायची खाज नाही त्यांनी खुशाल कोणाचीही हवी तेव्हढी चिकित्सा करावी.
असो.
सत्य शोधायची इच्छा असूनही विवेकानंद त्यांच्या गुरूंची म्हणजे रामकृष्ण परमहंसांची सदैव परीक्षा घ्यायचे. अगदी गुरु मृत्युशय्येवर असतांना देखील त्यांची परीक्षा घेतली. मात्र त्यासाठी विवेकानंदांसारखी कुशाग्र मेधा हवी. इथे मी बुद्धीच्या ऐवजी मेधा हा शब्द मुद्दाम वापरला आहे.
सर्वसामान्य लोकं सत्याच्या शोधात असले तरी ते विवेकानंदांइतके मेधावान नसतात. म्हणून अशांनी देव,गुरू व पालकांची चिकित्सा करू नये.
आ.न.,
-गा.पै.
छान कविता आवडली १+
Don't respect Parents / Elderly / Teachers.....
.
.
.
.
Respect their behavior and ideas.
समयोचित !