मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

डॉ सुहास म्हात्रे · · काथ्याकूट
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

वाचने 133846 वाचनखूण प्रतिक्रिया 637

पहाटवारा Tue, 11/15/2016 - 02:03
एकूण परीस्थीती पहाता सामान्य माणसे किर्कोळ नोटांच्या उपलब्धतेमुळे जास्त त्रस्त आहेत. यावर ऊपाय म्हणून जर पोस्टल स्टैंप थोडे दिवस मोठ्या प्रमणात उपलब्ध करुन दिले , १०-२०-१०० च्या डिनोमिनेषन मधे तर किर्कोळ व्यवहारासाथि लोक वापर करु शकतात.

निनाद Tue, 11/15/2016 - 03:12
कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस ----------- एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्‍यक नसते. युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे) याचे फायदे:
  • सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
  • अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
  • पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.

In reply to by निनाद

संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 03:19
चांगली माहिती,याचे नीट माहितीपत्रक बनवून स्वखर्चाने छापून प्रचाराला सुरुवात करतो, कुणाला आपल्या भागात वितरण करायचे असल्यास इथे प्रिंटेबल पीडीएफ टाकतो.

In reply to by निनाद

संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 03:26
याबद्दल सविस्तर व योग्य माहिती कुठे मिळेल? विशेष धागा काढाल काय कोणी जाणकार? हि माहिती तातडीने पसरवूया...

In reply to by निनाद

निनाद Tue, 11/15/2016 - 03:58
एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) हे बॅकबोन आहे. यावर आधारीत अ‍ॅपस बनवली आहेत बँकांनी. युपिआय वापरणारे कोणतेही अ‍ॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा. स्टेट बँकेचे आहे तसेच फ्लिप्कार्ट चे पे मिळते आहे... खालील ब्यांकांनी हे उपलब्ध करून दिले आहे: Banks live as PSP and Issuer: 1 Andhra Bank 2 Axis Bank 3 Bank of Maharashtra 4 Canara Bank 5 Catholic Syrian Bank 6 DCB Bank 7 Karnataka Bank 8 Union Bank of India 9 United Bank of India 10 Vijaya Bank 11 Punjab National Bank 12 Oriental Bank of Commerce 13 TJSB 14 Federal Bank 15 ICICI Bank 16 UCO Bank 17 South Indian Bank 18 HDFC

बंड्याभाय Tue, 11/15/2016 - 04:48
सुंदर आणि सकारात्मक विश्लेषण! ज्या पद्धतीने मोदी सरकारने हे execute केलय ते खरचं प्रशंसनीय आहे. श्री बोकील यांची मुलाखत पाहीली आणि आधीचे पंतप्रधान खरचं अर्थतज्ञ होते का असा सोपा प्रश्न पडला. असो!

In reply to by बंड्याभाय

चौकटराजा Tue, 11/15/2016 - 09:03
आधीचे पंतप्रधान म्हणजे आजचे सर्व नाही पण बरेचसे एम बी ए ... आपले असे साधे गणित आहे !!! एम बी ए झाला तरी निर्णयासाठी पुन्हा ए जी एम कडे !! जी एम कडे ! अहो इथे कंपनीत ए जी एम हे सत्ताबाह्य केंद्र नरी नसते.....तिथे दिल्लीत काय ...... ?

In reply to by बंड्याभाय

आधीचे पंतप्रधान उत्तम अर्थतज्ञ होते यात वाद नाही. त्यांचे शिक्षणक्षेत्रातले (प्रोफेसर), भारतिय व जागतिक स्तरावरचे ब्युरोक्रॅट म्हणून आणि पंतप्रधान नरसिंह राव अर्थमंत्री म्हणून त्यांचे काम अत्यंत प्रशंसनिय होते याबद्दल दुमत नाही. मात्र, पंतप्रधान उर्फ भारताचे सर्वोच्च अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांचे काम त्यांच्या अगोदरच्या कारकिर्दीला शोभेसे झालेले नाही. याचे मुख्य कारण ब्युरोक्रॅटने कितीही मोठ्या दर्जाच्या योजना समोर आणल्या तरी त्याची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या (भारताच्या बाबतीत पंतप्रधानांच्या) परवानगी व राजकीय पाठींब्याशिवाय होऊ शकत नाहीत. नव्वदीच्या दशकात ममोसिंगांच्या ब्युरोक्रॅट कारकिर्दीत त्यांना तशी परवानगी व राजकीय पाठींबा देणारा पंतप्रधान नरसिंह रावांच्या स्वरूपात होता. त्यामुळे त्या जोडगोळीने भारताला आर्थिक दुर्दशेतून बाहेर खेचायची सुरुवात केली. त्यांची ती कारकीर्द देशाला व त्यांना स्वतःला अभिमानस्पद होती. मात्र, त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांना पंतप्रधानाचे फारसे अधिकार नव्हते व ते घटनाबाह्य शक्तीकेंद्राच्या अधिकाराखाली काम करत होते ही उघड गुप्त गोष्ट (ओपन सिक्रेट) होती. अर्थातच, त्या काळी ते घहटनाबाह्य शक्तीकेंद्राच्या आदेशाप्रमाणे काम करणारे केवळ नावाचे पंतप्रधान पण प्रत्यक्षात ब्युरोक्रॅटच होते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक योजना व्यवहारात आणण्याऐवजी त्यांना घटनाबाह्य शक्तीकेंद्राचे आदेश पाळणे इतकेच काम करावे लागले व दुर्दैवाने ते आदेश देशाच्या फायद्याचे ठरले नाहीत. सर्वात वाईट म्हणजे, एखाद्या अभिमानी शिक्षकासारखे किंवा ब्युरोक्रॅटप्रमाणे, मनाला न पटणार्‍या आदेशांचे पालन न करता किंवा आपल्या अधिकाराखाली घडणार्‍या कुकृत्यांकडे डोळेझाक न करता, सत्तेचा लोभ सोडून पंतप्रधानपदाचा त्याग करणेही त्यांना जमले नसते. त्यांनी तेवढेही केले असते तरी आजही त्यांचे नाव अभिमानाने घेतले गेले असते.

चौकटराजा Tue, 11/15/2016 - 06:23
एक नोंद करतो. मानूस हा मुळात जनावर आहे त्याला संस्कृति व कायदा यानी जखडले आहे. सबब तो स्खलन्शील आहे , अगदी मी सुद्धा ! तेंव्हा भ्रष्टाचार हा मलाही हवा असतो. कारण मला खिडकीतली सीट मिळवायची असते. इतराना ती नको अशी माझीच भूमिका॑ असते.पण माझ्या मनाची अशीही धारणा असते की इतरानी नाखुशीने का होईना कायदा पाळला तर मी पाळेन. अशी माझ्यासारखी अनेक माणसे समाजात असतात. वहातुक पोलिस सिग्नल तोडला तर शिक्षा करताना दिसत नाहीत म्हणून आज पुण्यात आधी पाच सेकंद समूहाने गाडी दामटण्याची संवय सर्वाना झाली आहे. अशी संवय मोदी मोडू पहात आहेत. त्याना आर बी आय, सी बी आय.. ई डी , पोलिस , न्याययंत्रणा तुरूम्ग प्रशासन , सायबर सेल यातून अगदी १० टक्के जरी नुसते बाबू लोक न मिळता॑ पेटलेले देशभक्त उच्च पदावर मिळाले तरी सरकारी यंत्रणांचा जरब निर्माण होऊ शकते. " बच्चे सोजा नही तो मोदी आयेगा" अशी धारणा निर्माण झाली तर॑ काम होउ शकते. वरील सर्व यंत्रणामधील भ्रश्ट लोकांच्या भीतीने मोदीनी ही गैरसोयीची पण गुप्त मोहिम आखली. आपल्या देशात काहीच भले होणार नाही अशी भावना सर्वत्र झाली होती .आता गैर लोकाना नवे मार्ग शोधावे लागतील. त्याने देशाचे सॉफ्टवेअर अधिकच विकसित होत जाईल. पुन्हा सांगतो माणूस मुळातच स्खलन्शील आहेच .

In reply to by चौकटराजा

सहमत, करप्शन इज अ ह्युमन प्रोसेस नॉट अ टेक्निकल प्रोसेस हेन्स इट कॅन बी जस्ट 'कंट्रोल्ड' इट कॅनॉट बी 'स्टॉप्ड'.

In reply to by चौकटराजा

आता गैर लोकाना नवे मार्ग शोधावे लागतील. हे प्रश्न मानवी स्वभावामुळे निर्माण होत असल्याने, हा चोर-पोलिस खेळ मानवाच्या सुरुवातीपासून चालू असून मानवाच्याच्या अंतापर्यंत चालू राहील, यात संशय नाही.

चौकटराजा Tue, 11/15/2016 - 08:58
जनधन सारख्या योजनेत आतापर्यंत ५०० च्या खाली शिल्लक आहे पण ९ नोव्हेंबर नम्तर ती ४५००० पर्यंत वाढली तर अशा खातेदारांचे महाराष्ट्र राज्यात तरी जातीनिहाय सर्वेक्षण करावे म्हण्जे नक्की कोणती जात किती मागास आहे हे पुराव्यासकट कळून येईल. अभ्यासगटाची गरजच भासणार नाही. बघा पटतं का ..... ?

डँबिस००७ Tue, 11/15/2016 - 11:41
कपिलमुनी, झी न्यूज ही सर्वात खोटारडी ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे. मग सर्वात चांगली NDTV आहे का ?

बँकांसमोरच्या रांगा अजूनही लांबलचक आहेत. याचे एक कारण म्हणजे काळा पैसा असलेले लोक स्वतः आणि इतरांना हाताशी धरून वारंवार अनेक बँकांना भेट देऊन रु४००० (आजपासून रु४५००) नवीन नोटांत बदलत आहेत असे दिसते. यामागे, या राष्ट्रीय कामात मदत तर नाही, पण "कारवाई मागे न घेतल्यास अनागोंदी माजेल" अश्या धमक्या राष्ट्रीय वाहिन्यांवर देणार्‍या पक्षांचा किती हात आहे हे पाहणेही योग्य ठरेल. याला उपाय म्हणून आता सरकारने न पुसणारी शाई (निवडणूकीत वापरली जाणारी) वापरण्याचे ठरवले आहे. बहुसंख्य लोक अजूनही सकारात्मक आहेत आणि "आजके दुखके बाद सुखही आने वाला है ।" अशा अर्थाची विधाने करताना वाहिन्यांवर दिसत आहेत. त्यावरून लोक या कारवाईचे स्वागतच करत आहेत व त्रास सोसायला तयार आहेत. याविरुद्ध, विरोधी पक्ष जनतेच्या फायद्याच्या कारवाईत सरकारची मदत करण्याऐवजी लोकसभेच्या येत्या सभेत सरकारला कसे घेरता यासाठी एकी दाखवत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्रीगुरुजी Tue, 11/15/2016 - 14:45
टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेली खालीच चित्रफीत बघा. चित्रफितीत पहिल्या २० सेकंदांच्या जाहिरातीनंतर लोकांच्या रांगा दाखविल्या असून ८-१० जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. चित्रफितीत पार्श्वभूमीला एखादी दु:खद घटना दाखवित असल्यासारखे करूण संगीत असून चित्रफीतीच्या खाली अशी वाक्ये लिहिली आहेत. Impatience, disappointment and anger prevailed as people across the country continued to face hardship in exchanging demonetised currency notes and withdrawing money and struggled to procure essentials to meet daily needs. जर पूर्ण चित्रफीत पाहीली तर हे लक्षात येते की प्रतिक्रिया दिलेल्या सर्व ८-१० जणांपैकी एकानेही या निर्णयाबद्दल नाराजी, विरोध, संताप, निराशा व्यक्त केलेला नाही. थोड्या दिवसात समस्या दूर होईल, आम्हाला काहीच समस्या नाही असे सर्वजण सांगत आहेत. असे असताना वरील दिशाभूल करणारी वाक्ये लिहून चित्रफितीत शोकसंगीत टाकण्याची काय गरज होती? सरकारच्या या निर्णयामुळे काही ठराविक लोकांच्याच बुडाशी जाळ झाल्याचे दिसत आहे व तीच मंडळी विरोध करीत आहेत. बहुसंख्य जनता या निर्णयाला अजिबात विरोध करताना दिसत नाही.

संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 16:48
म्हात्रे सर, या कारवाईचे सर्वात मुख्य हेतू, उद्देश व ध्येय काय होते? १. नकली नोटा कि 2. नोटांच्या स्वरूपातील काळा पैसा कि 3. भ्रष्टाचार कि तिन्ही एकत्र? गोंधळमुक्त नियोजन कसे झाले असते यावर लेख लिहिण्याचा विचार करतोय म्हणून मुख्य उद्देश जाणून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या कवायतीतून नेमके आउटपुट काय अपेक्षित होते?

In reply to by संदीप डांगे

चौकटराजा Tue, 11/15/2016 - 17:11
नोटा बदलणे हा सामान्य बदल नाही. माझ्या तरी अयुष्यात मानव चंद्रावर गेला या पेक्षाही ही अवघड गोष्ट आहे. तिथे कोपर्‍यावर साड्या वाटताहेत अशी अफवा पसरल्यावर चांगल्या सुशिक्षित बायकाही ती साडी घ्यायला पळालेल्या मी पाहिल्यात. ( नगर सेविकेची कमाल ) हा तर पैशाचा मामला. पैसा कोणत्याही माणसाला कसलीही दुर्बुद्धी सुचविणारा जादूगार. मोदींची ही लढाई १२० कोटी पापी माणसांविरूद्ध आहे. आपण अत्यन्त हिडीस माणसाना पैशातून सत्ता , सत्तेतून पैसा या चक्रात पोहोचवले आहे. या॑ ऑपरेशन मधे संयम, उधारी व काटकसर या तीन तत्वानाच स्थान आहे. बाकी व्यवस्थापनाची नेहमीची तत्वे इथे फोल. काळा पैसा त्यातून बॅकेत येतो आहे हे खरे आहे. पण आता तो अपरिहार्यपणे चौकशीच्या आवाक्यात येतो आहे हे काय कमी आहे. वाईट माणूस स्वता: ला जेवढा हुशार समजतो तेवढा तो नेहमीच नसतो. यात काही मध्यम दर्जाची " काळा" वाले नक्की सापडतील. आज एक शक्क्ल एकाने बोलून दाखविली--- जनधन मधे ० ब्ल्यलन्स असताना ४५००० ची रक्क्म सापडली व त्या व्यक्तीस काही कर्ज असेल तर त्याला पैसे परत न देता कर्ज वसूल करून घ्यायचे. आता बोला !

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे Tue, 11/15/2016 - 20:45
दुसऱ्या ठिकाणी लिहिलेला प्रतिसाद इथे परत लिहीत आहे. जिनियस माणसांना वाटत असतं कीआपल्या पेक्षा हुशार माणूस कुणीच नाही. जो उठतो तो असे समजतो कि काळा पैसे ठेवणारे लोक अत्यंत हुशार आहेत आणि काहीही करून त्यांना पकडता येणार नाही. तसेच अंबानी अडानि यांच्यावर जो तो ताशेरे ओढतो आहे. सरकारी/ आयकर अधिकारी भ्रष्ट असतील पण मूर्ख किंवा ढ नक्कीच नाहीत. जिनियस माणसे वापरात असलेल्या क्लृप्त्या त्यांना माहित नाहीत असे समजणे हा भाबडेपणा ठरेल. आतापर्यंत कायद्यात अनेक त्रुटी होत्या.त्या मोदी सरकार कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. अजूनही त्या संपल्या असे मानणे हे भाबडेपणाचे ठरेल. (या अनेक त्रुटी मागील सरकारने जाणून बुजून तशाच ठेवल्या असे मानण्यास जागा आहे.परंतु तो वादाचा मुद्दा ठरेल म्हणून तो बाजूला ठेवा) परंतु गळक्या भांड्याला आपण डाग लावतो तेंव्हा मोठे भोक बंद झाल्यावर लहान भोकातून गळताना दिसते तसेच इथे आहे. जित्कीजास्त भोके तुम्ही बंद कराल तितके तुमचे भांडे जास्त भरेल आणि जास्त काळ त्यात पाणी टिकेल. छिद्रान्वेषी लोक बंद झालेली भोके ना पाहता जी छोटी भोके आहेत त्याकडेच बोटे दाखवून" हेच का तुमच्या मोदी सरकारचे ( सरकार आमचे किंवा तुमचे नसून आपल्या सर्वांचे आहे हे सोयीस्कररीत्या विसरून) भ्र्रष्टाचाराविरुद्ध युद्ध" म्हणून काड्या घालण्यात धन्यता मानत आहेत. आजता गायत कोणत्याही नेत्याला या नोटा "रद्द" करणे हा निर्णय चुकीचा होता हे सिद्ध करता आलेले नाही. म्हणून "त्यामुळे सामान्य जनतेला प्रचंड त्रास होतो आहे" याबद्दल च तुणतुणे वाजवणे चालू आहे. जसे काही सामान्य जनतेचे हेच तारणहार आहेत आणि इतकी वर्षे सामान्य जनतेला भ्रष्टाचारापासून यांनीच मुक्त ठेवले होते. सामान्य जनतेच्या त्रासापेक्षा हि योजना सफल झाली तर आपली दुकाने बंद होतील, पैसा तर गेला आहेच आणि आता पुढच्या निवडणुकीत हि बाराच्या भावात जायला लागेल या भीतिने कावकाव करणे चालू आहे.

In reply to by संदीप डांगे

हे सगळे आणि पाकिस्तानी आयएसआयने छापलेल्या खोट्या नोटा चलनवलनातून काढून टाकणे. कारवाईत काही गोंधळ होणे अपेक्षित होतेच याची मुख्य कारणे (अ) भारतासारख्या देशातील १२५ कोटी लोकांशी संबंध असलेला कारवाईचा आवाका आणि (आ) तुम्ही लिहिलेल्या आणि अतिरक्यांपासून ही कारवाई पंतप्रथान टीव्हीवर उघड करेपर्यंत गुप्त ठेवण्याची निकड (नाहीतर तिची उपयुक्तता बरीच कमी किंवा जवळ जवळ शुन्य झाली असती). या लेखात व माझ्या इथल्या व इतर लेखांवरच्या प्रतिसादांत याबाबतीत बरेच तपशील आले आहेतच. आता लगेच काही कामानिमित्त काही तास बाहेर जात असल्याने सद्या एवढेच.

गामा पैलवान Tue, 11/15/2016 - 22:36
डॉक्टर सुहास म्हात्रे आणि वाचकहो, मोदींचे पुढील लक्ष्य कोणते? माझ्या मते बेनामी लघुउद्योग. त्यांच्यात मजबूत काळा पैसा आहे. २०१७ नंतर एकही डास उडू शकणार नाही असे मोदींचे वक्तव्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

याबाबतीत माझे काही अंदाज (ते अंदाजच आहेत कारण कोणत्याही सरकारी सुत्रांशी माझे संबंध नाहीत) आहेत... आणि त्यांची वाच्यता करून भारताविरुद्धच्या हितसंबंधाना कळत-नकळत होणारी मदत करू नये असे मला वाटते. इतरांनीही तेच करावे अशी माझी विनंती आहे. अंदाजाच्या गदारोळात एखादा मुद्दा भारताविरुद्धच्या हितसंबंधाना सजग करू शकतो. "पुढे काय होईल" या चिंतेत ठेवून शत्रूला सतत असुरक्षित मनःस्थितीत ठेवणे अर्धी लढाई जिंकण्यासारखे असते.

विरोधी पक्षांचे नेते केवळ सरकारच्या मोहिमेचा विरोध करून थांबलेले नाहीत तर काहीजण "काळ्या धनाने जागतिक अर्थसंकटात भारतिय अर्थव्यवस्थेला तारून नेले आहे" असे राष्ट्रीय वाहिन्यांवर म्हणू लागले आहेत" !!!!!!!!!!!!!!!! Black money helped Indian economy during global recession: Akhilesh Yadav हे स्वप्न आहे काय ? कोणीतरी मला चिमटा काढा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सही रे सई Wed, 11/16/2016 - 00:22
देवा विरोधी पक्षातील अश्या नेत्यांना माफ कर. त्यांना समाजत नाहीये कि ते काय बोलत आहेत.

मोहन Wed, 11/16/2016 - 17:37
आत्ताच वाचनात Eco times ची बातमी आली. Modi's Surgical strike backfires. तशाच आशयाचा रिपोर्ट NDTV ने परदेशी मिडीयाचा हवाला देवून प्रसिद्ध केला आहे. (कंटाळ्यामुळे लिंकवत नाही) . हा निर्णय Backfire होउ शकतो का ? मला तरी सामान्य जनतेच्या भल्याचाच निर्णय आहे असे वाटत होते. अशा प्रकारचा रिपोर्ट वाचुन जरा शंकेची पाल चुक - चुकली. मिपा तज्ञांच्या मते backfire चे chances आहेत का किंवा कसे. ?

In reply to by मोहन

संदीप डांगे Wed, 11/16/2016 - 17:45
बॅकफायर म्हणजे रद्दबातल नाही हो. बॅकफायर म्हणजे घेतलेल्या निर्णयांचे फायद्यापेक्षा तोटे जास्त होणे ज्यायोगे फायद्यांचे परिणाम शून्य होऊन तोट्याचे परिणाम जास्त होणे. मोदींनी कितीही दबाव आला तरी हा निर्णय अजिबात मागे घेऊ नये, फक्त चलन टंचाईवर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.

मोहन Wed, 11/16/2016 - 22:14
डांगेजी - मी ही Backfire म्हणजे फायद्यापेक्षा तोटे जास्त या न्यायानेच वापरला. ( त्याला पर्यायी मराठी शब्द सुचला नाही म्हणून ) . या लेखांनुसार मोदींनी कुणाही तज्ञाची मदत न घेता हा निर्णय आपल्या मर्जीतल्याच काहीच्या भरवशावर घेतला असावा. हे आता मोदींच्याही लक्षात आले असल्याने त्यानी गोव्यात मेलोड्राम्याटीक भाषण केले असाही युक्तीवाद केला आहे.

In reply to by मोहन

संदीप डांगे Wed, 11/16/2016 - 22:55
अशा लेखांना फाट्यावर मारायचं, लक्ष देऊ नका. आपण आपल्या आजूबाजूच्या जनजीवनावर काय परिणाम होतो त्यावर बारीक लक्ष ठेवायचे. ही कायमची सवय ठेवली तर बदल लक्षात येत राहतात व माध्यमांमधे आलेले कितपत योग्य त्याची पडताळणी होते. त्यांच्या लेवलला त्यांना काय माहिती, सल्ले उपलब्ध होते त्यावर त्यांनी अमूक एक निर्णय का घेतला हे त्यांनी स्वत: सांगितल्याशिवाय समजणार नाही. आपण फक्त अंदाज लावणार. मी इथे बसून टाइप करतोय, माझी साधने अत्यंत मर्यादित आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तिकडे असलेली साधने, मनुष्यबळ हे हजारोपटीने माझ्यापेक्षा जास्त सक्षम व सर्वंकष आहे. त्यांचा निर्णय हा योग्य व पूर्ण अभ्यासाअंतीच आलेला आहे. तो त्यांनी स्वतः घेतल्याची शक्यता शंभर टक्के आहे. पंतप्रधान एक धाडसी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या स्वभावाला साजेसेच वर्तन घडले आहे त्यात आश्चर्यकारक काहीच नाही. काही निर्णय अंमलबजावणीला आल्यावरच त्यातले गुणदोष कळायला लागतात. पुर्वी असं झालंय म्हणून आताही होईल असे काही नसतं. दोन आणि दोन बरोबर चार हे गणितात होतात, प्रत्यक्ष होतीलच असे नाही. कागदावर दिसणारी योजना प्रत्यक्षात आली की वेगळी होऊ शकते. किंवा काही मोठे फायदे-बदल घडवून आणण्याच्या मोठ्या उद्दिष्टांना जास्त प्राथमिकता देऊन कोलॅटरल डॅमेजही गृहित धरलेला असतो. नुकसानाचा परिघ व प्रभाव किती हेही बघितलेले असते. मला वाटतं ते असं की पंतप्रधानांच्या निर्णयाच्या परिणामांचा आवाका व त्यासाठी करायला लागणारी व्यवस्था याचे कुठेतरी काहीतरी बिनसले. तिसर्‍या-चौथ्या लेवलपासून खालच्या अधिकार्‍यांना गुप्ततेमुळे निर्णयाची तातडी व गंभीरता लक्षात आली नसल्याने थोडी दिरंगाई, चालढकल झाली असल्याचा माझा 'अंदाज' आहे. आपल्याला सर्व प्लानिंग ने घरातून ७ चाजता निघून चौकातली बस पकडून रेल्वेस्टेशनला जाऊन लोकल पकडून दोन तासाचा प्रवास करुन एखाद्या ठिकाणी पोचायचे आहे. पण घरातून निघायला १० मिनिट उशीर झाला तरी पुढचे नियोजन कुठेतरी बिघडून आपण प्रत्यक्ष गंतव्यस्थळी एक तास उशीराने पोचण्याची शक्यता निर्माण होते. कारण मधल्या साखळीतल्या विविध शक्यतांचा एकमेकांशी असलेला ताळेबंद हुकतो. दुसरं असं की काळापैसा हा वरकरणी दाखवला जाणारा उद्देश शत्रूंना अजूनही गाफिल ठेवण्यात व कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. पण माझ्यामते कालांतराने तरी हा उद्देश जनतेसमोर आला पाहिजे, अन्यथा अशा प्रकारच्या प्रचंड प्रयोगात पुढच्या वेळेस जनतेची साथ लाभेलच असे नाही. बाकी जर तर च्या वादविवादात आता पडून उपयोग नाही. ३१ डिसेंबर डेडलाईन आहे. तोवर बॅन्काण्च्या बाहेरच्या लाईनी डेड झाल्या तरी पुरे! सध्या लाईनीतली माणसेच डेड व्हायची साथ सुरु आहे.

In reply to by मोहन

या निर्णयाने ज्यांचे मोठे नुकसान होईल अश्या भारतात आणि भारताबाहेर अनेक लॉबीज आहेत. तेव्हा या कारवाईच्या विरोधी मते माध्यमांत आली नाही तरच आश्चर्य वाटायला हवे. कारवाईच्या विरुद्ध असलेली मतेही (काही अतिउत्साही राजकारणी सोदले तर) अगदी लॉजिकल वाटावी अशीच मांडली जाणार. कारण भ्रष्टाचारी तत्वांसाठी भ्रष्टाचार कायम ठेवणे किंवा अतिरेकी तत्वांसाठी त्यांचे रुळलेले अर्थिक मार्ग कायम ठेवणे हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. या आणि कोणत्याही मोठ्या कारवाईत, "उपाय मूळ रोगापेक्षा जास्त जालीम होऊ नये इतके तिला व्यवहारी बनवण्यासाठी", काही कमी ठेवाव्या लागतातच (उदाहरणार्थ, या कारवाईत काही लोकोपयोगी सेवांत जुन्या नोटा स्विकारण्याची सूट दिलेली आहे. त्याच्या आधारे बराच काळा पैसा वापरला जात असणारच.). अश्या 'मोहरीचा पर्वत बनवणे' आणि 'नसलेल्या मोहरीतूनही पर्वत तयार करणे' यासाठी सर्वच गट अनेक विचारवंत पोसत असतात, याची भारतात (व सर्व जगात) कमी उदाहरणे नाहीत. सर्वसामान्य भारतीय म्हणून आपला सरकारवर आणि त्याच्या कारवाईवर विश्वास असला तर, उगाच गोंधळात न पडता (कारण त्याने आपला गोंधळ वाढण्यापलिकडे जास्त काही परिणाम होत नाही; आणि लोकांचा गोंधळ वाढवणे हा तर विरोधी तत्वांचा मुख्य उद्येश असतो.), सरकारला त्याची मुदत (या कारवाईत ३० डिसेंबरपर्यंत) देऊन काय परिणाम होत आहेत तिकडे लक्ष देत रहावे, हे मला योग्य वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कारवाईच्या विरुद्ध असलेली मतेही (काही अतिउत्साही राजकारणी सोडले तर) अगदी लॉजिकल वाटावी अशीच मांडली जाणार. वरचे अखिलेश यादव यांचे "काळा पैसा अर्थव्यवस्थेला उपयोगी असते" हा दावा एक मूर्खपणा नसून नेत्याच्या शब्दांवर डोळे मिटून विश्वास ठेवणार्‍या भारतातल्या असंख्य अंधभक्तांना आपल्या बाजूला वळविण्याचा किंवा त्यातला खोटेपणा ओळखूनही स्वार्थी हितसंबंधासाठी त्या दाव्याची भलावण करून आपली रोटी भाजणार्‍या लोकांना दिलेला दिलासा आहे. जेव्हा केजरीवाल किंवा राहूल गांधी "कोठे आहेत करोडपती बँकेच्या रांगात?" असे विचारतात तेव्हा फारसा विचार न करणार्‍या सर्वसाधारण माणसाचा "अरे खरंच, ते लोक का नाही उभे माझ्याबरोबर उभे?" असा विचार करण्याइतका बुद्धीभेद होतो. जरा विचार केल्यावर हे ध्यानात येते की, (अ) ज्यांना खर्‍या व्यवहारांसाठीसुद्धा बँकेत जावे लागत नाही असे कोट्याधिश आता तेथे जावून १, ५, १०, १०० कोटी बॅगेत (किंवा टेंपोमध्ये) घेऊन बँकेत जातील व सरकारच्या जाळ्यात अडकण्याचा मूर्खपणा करतील का?"; (आ) "असे केले तरी त्यांचे त्याच्या कोट्यावधी काळ्या पैशातले कितीसे पैसे सुरक्षितपणे पांढरे होतील?"; (इ) "काळे पैसे लपवायला इतर सुरक्षित मार्ग शोधणे किंवा 'बिझनेस लॉस' समजून काळे पैसे नष्ट करणे/कचर्‍यात टाकून देणे व स्वतः सुरक्षित रहाणे (पक्षी : सीर सलामत तो पगडी पचास न्याय) त्यांच्या करिता जास्त चांगले असणार नाही का?" या प्रश्नांची खरी उत्तरे वरची विधाने करणार्‍या राजकारण्यांना माहित नसतील इतके ते निर्बुद्ध निश्चितच नाहीत. त्याउलट, लोकांचा बुद्धीभेद करून आणि त्यांना उल्लू बनवून त्यांच्यावर राज्य करणे हा तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ आणि जीवनभरचा व्यवसाय असतो, नाही का ? :)

मोहन गुरुवार, 11/17/2016 - 12:23
डांगेजी व म्हात्रे साहेब आपल्या दोघांशीही सहमत आहे. मी मोदींचे गोव्यातले भाषण टी.व्ही वर पाहिले आणि तेंव्हाच मला तरी ते "मोदींसारखे" वाट्ले नाही. " वो लोग जान के पीछे पडे है, किंवा ५० दिन दो ... उसके बाद चौराहेपर जो सजा देश देगा .... वगैरे बाबी तर फारच खटकल्या " कुठे तरी तणाव आणी Fear of Unknown जाणवत होता. इतरांच्या बाबतीत जरी हे अपेक्षीतच असते तरी मोदी जरा वेगळ्याच मुशीतुन घडलेले सामान्यतः दिसतात. म्हणुन जरा शंका यायला लागली होती.

मराठी कथालेखक गुरुवार, 11/17/2016 - 13:01
भ्रष्टाचार वाढून सामान्यांना झळ पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक उदाहरण देतो. एक शिक्षण संस्था आहे तिथे शिक्षकांना तीस हजार पगार आहे. तो त्यांच्या बॅक खात्यात थेट जमा होतो. पण भ्रष्ट संस्थाचालकांनी एक अलिखित नियम बनवला आहे की पगार जमा झाल्यावर दहा हजार रुपये रोख कार्यालयात आणून जमा करावे. जे असं करणार नाहीत त्यांच्या नोकरीचे अर्थातच काही खरे नाही. अशा प्रकारे संस्थाचालकांनी भरपूर माया/काळा पैसा जमवला आहे. आता नोटा रद्द झाल्याने त्यांचे काही लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे चरफडणार्‍या संस्थाचालकांनी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी फर्मान काढले की पूढील महिन्यापासून शिक्षकांनी दहा ऐवजी बारा हजार जमा करावे. असे झाल्यास सामान्य माणसाला झळ पोहोचली असेच म्हणावे लागेल ना ? मी मोदी विरोधक नाही. नोटा रद्द करण्याच्या निर्णयालाही माझा विरोध नाही. [अर्थात अंमलबजावणी अजून चांगल्या प्रकारे व्हायला हवी होती. निदान आता लवकरात लवकर नवीन नोटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन द्याव्यात] पण पाठिंबा देतानाही सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा करणे योग्य असे मला वाटते. साठलेल्या काळ्यापैशाविरोधी कारवाई करतानाच भ्रष्टाचार विरोधी अनेक पावले उचलणे गरजेचे आणि तातडीचे आहे. मुख्य म्हणजे देशात वेगवेगळ्या ठिकाणी चालणारा भ्रष्टाचार निपटून काढणे एकट्या केंद्राला कधीच शक्य होणार नाही. खरं तर खूपशा बाबी राज्याच्या अखत्यारित आहेत, शिवाय न्यायव्यवस्था पूर्णपणे प्रामाणीक आणि सक्षम हवी. जसे वरील उदाहरणात शि़क्षक संस्थाचालकांविरुध्द तक्रार का करत नाहित ? तर त्यांना न्याय मिळण्याची खात्री नाही.. न्याय मिळणे तर दूर हातात असलेली नोकरी पण जाईल ही भिती आहे. प्रकरण जास्त ताणले गेल्यास अजूनही इतर प्रकारे त्रास होण्याची शक्यता आहे. कुणी म्हणेल त्याने धैर्याने , न डगमगता ही लढाई लढावी. पण सामान्य माणूस असे करु शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

ट्रेड मार्क Fri, 11/18/2016 - 01:28
अनंत अडचणी आहेत, व्यक्ती तितक्या अडचणी असणारच. एवढं जनार्दन रेड्डीने खर्च करून लग्न लावलं, पण त्याला विचारलंत तर तो पण अडचणी सांगेल. तुम्ही बहुतेक सर्व सांगत आहात त्या मानसिकतेशी निगडीत आहेत. ज्याला भ्रष्टाचार करायचाच आहे तो विविध मार्ग शोधत राहणार. पण म्हणून उपाय करू नये का? भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि परत काळा पैसा तयार होऊ नये अशी एक किंवा अनेक योजना असतील तर कृपया सांगा. आपण सर्व मिळून साधक बाधक विचार करू आणि मग PMO ला कळवू. हे उपहासाने म्हणत नाहीये आणि वैयक्तिक तुमच्यावर आरोप करतोय किंवा आव्हान देतोय असे कृपया समजू नये. निर्णय आवणाऱ्याने/ न आवडणार्याने किंवा कोणी पण एक किंवा अनेक लोकांनी मिळून उपायांवर चर्चा करावी अशी अपेक्षा आहे.

In reply to by ट्रेड मार्क

मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 14:08
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि परत काळा पैसा तयार होऊ नये अशी एक किंवा अनेक योजना असतील तर कृपया सांगा. आपण सर्व मिळून साधक बाधक विचार करू आणि मग PMO ला कळवू.
वरती थोडक्यात लिहिलंय. पुन्हा लिहितो भ्रष्टाचार आणि 'कायदा व सुव्यवस्था' या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत खूपशा गोष्टी राज्यांच्या अखत्यारित येतात. सर्वात महत्वाच्या म्हणजे पोलीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक खाते (ACB) त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे मग दुसरा उपाय हा की राज्यांचा या खात्यांवरील प्रभाव कमी करणे पोलीस किंवा ACB विरोधात केंद्राकडे सहज तक्रार करता आली पाहिजे. 'आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा. तक्रारींची दखल वेळेत घेतली गेली पाहिजे. दुसर्‍या बाजूने न्याययंत्रणा भ्रष्टाचार मुक्त आणि सक्षम हवी. 'तारीख पे तारीख' पद्धत बदलून वेळेत न्याय मिळायला हवा. त्याकरिता मात्र एकटे सरकार फार काही करु शकत नाही. सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत. भ्रष्टाचार्‍यांना आधी रोखणे गरजेचे आहे. नोटा रद्द करण्याच्या top down approach इतकंच bottom up approach महत्वाचं आहे. यासाठी एक-दोन उपाय सांगता येणार नाही. तर प्रत्येक यंत्रणेचा स्वतंत्र अभ्यास करुन त्यातील loopholes हळू हळू दूर केले पाहिजेत. Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाही. काळा पैसा बाहेर काढण्याचं काम नंतर केल्यास बरं असं माझं मत आहे.

In reply to by मराठी कथालेखक

ट्रेड मार्क Sat, 11/19/2016 - 02:59
त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे:
जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी तेवढा चांगला शासनकर्ता पूर्ण बहुमताने सगळ्या राज्यांमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहिजे. आपल्याकडची राजकीय पक्षांची संख्या बघता तर हे नजीकच्या भविष्यात होईल असं वाटत नाही.
आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा
यासाठी ऑनलाईन पोर्टल केले आहेत/ काम चालू आहे
सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत.
माझ्या आठवणीप्रमाणे मोदी सरकारने सुरुवातीच्या काळात बरेच जुने कायदे रद्दबातल केले होते. या कायद्यांचा उपयोगापेक्षा त्रासच जास्त होता. त्यामुळे काम चालू आहे पण गेल्या ६०-७० वर्षांची घाण साफ करायला वेळ तर लागणारच.
भ्रष्टाचार्‍यांना आधी रोखणे गरजेचे आहे
हा परत मानसिकतेचा मुद्दा आला. जिथे लहानपणापासून नियमांच्या विरुद्ध करणारा म्हणजे हिरो, हे बिंबवलं जातं तिथे हे कसं साध्य करणार? मुळात भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. याचा फक्त पैश्यांशी संबंध नसून प्रत्येकाच्या वागण्याशी पण आहे. जिथे लोकांना साधं सिग्नलला १ मिनिट थांबता येत नाही, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबता येत नाही तिथे तुम्ही भ्रष्टाचार कसा रोखणार? पाणपोईवरच्या पाण्याच्या भांड्यांपासून रस्त्यांवरच्या गटाराच्या झाकणापर्यंत चोरून नेलं जातं. रुपये ५०००० च्या खरेदीवर १०००-१५०० रुपये वाचावे म्हणून बिल नाकारलं जातं तिथे भ्रष्टाचार कसा रोखणार? असो.
Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाही
continuous improvement तर असणारच आहे. पण ज्यावेळेला एखादी गुंतागुंतीची प्रणाली (functionality), ज्यात भरपूर परस्परावलंबित्व आहे, ती एकदमच पूर्ण करायला लागते. मग एकदा बेसिक नीट झालं की मग continuous improvement करत राहायला लागतं. आत्ता सुद्धा हा तुम्हाला एकदम स्ट्राईक वाटतोय पण - जनतेला बँकिंग प्रणाली मध्ये आणण्यासाठी जन धन योजना, मॉरिशस व इतर पैसे फिरवण्याचे मार्ग बंद केले किंवा प्रयत्न तरी केले गेले, बेहिशोबी पैसा जाहीर करण्यासाठी २ वेळा मुदत दिली, २००० च्या नोटा छापण्याची तयारी ६ महिने चालू होती, बँकांना १०० व त्याच्या आतील नोटा जास्त प्रमाणात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. आता यापेक्षा जास्त म्हणजे फक्त या तारखेपासून ५००-१००० च्या नोटा बंद करणार असं सांगणं बाकी होतं. जे आधी सांगणं उपयोगी नव्हतं कारण मग काळाबाजारवाल्यांनी सगळ्या १०० व त्याखालील नोटा आधीच पळवल्या असत्या. म्हणजे परत सामान्य माणसाचे हालच झाले असते. मी एक मस्त प्लॅन मिळेल, ज्यात स्टेप बाय स्टेप काय आणि कसं करावं हे असेल, अशी अपेक्षा केली होती. तुम्ही म्हणताय ती सर्वसाधारण रूपरेखा झाली. यात जो पडून राहिलेला पैसा आहे किंवा जो मालक बदलतोय पण बँक/ आयकर विभाग टाळतोय त्या बाहेर कश्या काढणार आणि खोट्या नोटा आहेत त्या रद्द कश्या करणार?

संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 01:38
पोलीस वाहनांमधून नेल्या जाणाऱ्या जुन्या नोटा पकडत आहेत. जर त्या सिर्फ कागज का तुकडा रह गयी है तर हे कागज के तुकडे पकडण कसं काय योग्य, काही लोक अजूनही बंद नोटा स्वीकारत आहेत, तेही कसे कायदेशीर? पोलीस कंप्लेंट करावी काय?

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान Fri, 11/18/2016 - 02:22
संदीप डांगे, मागे लिहिल्याप्रमाणे जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द झालेली असली तरी लोकं त्या आपसांत व्यवहारार्थ वापरू शकतात. त्यांना अडवणारं कोणी नाही. मात्र यामुळे काळा पैसा खेळता राहायला मदत होईल. म्हणून पोलीस असा पैसा पकडत आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 02:37
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही तो 30 डिसेंम्बर पर्यन्त खेळत राहील? त्यानंतर त्याची किंमत शून्य होईल, म्हणजेच 9 तारखेला जे झालं ते काय मग? काय तरी मिसिंग आहे. ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी रुपये आहेत ते मजूर, नोकर, लेबर कॉन्ट्रॅक्टर तर्फे 300 रुपये रोजंदारीवर पैसा पांढरा करून घेत आहेत. 50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात. कारण 200 कोटीवाला मध्यमवर्गीय पापभिरू नाही, त्याच्याकडे त्याच्या लेव्हलचे रिसोर्सेस असतात,

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान Fri, 11/18/2016 - 12:54
संदीप डांगे, १.
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही तो 30 डिसेंम्बर पर्यन्त खेळत राहील?
३० डिसेंबरच कशाला, जगाच्या अंतापर्यंत खेळता राहू शकतो. ९ ला जे झालं तो शासकीय निर्णय होता. त्यानुसार जुन्या नोटा हे शासनमान्य वैध चलन ( = लीगल टेंडर) राहणार नाही. मात्र इतर लोकं ते चलन म्हणून वापरू शकतात. त्यावर शासन बंधन घालू शकंत नाही. २.
50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात.
आपापसांत अवैध चलन चालवणे म्हणजे पैसा पांढरा करून घेणे नव्हे. आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

असा "मजूर" एका बँकेतल्या एका व्यवहारात वापरणे थांबवणे व्यवहारात शक्य नाही. पण आता प्रत्येक ट्रांझॅक्शनसाठी पुसता न येणार्‍या शाईचा एक ठिपका बोटावर लावला तर असा मजूर एकूण किती वेळा "वापरला" गेला आहे ते समजेल आणि त्याने अनेक वेळा बँकांना भेट दिली असल्यास त्याच्या पैश्याचा स्त्रोत विचारता येईल. किंबहुना, आपल्या हातावर शाई लावतात इतकेच कारण बहुतेक अश्या मजूरांना वापरणे किंवा स्वतःला वापरून देणे थांबवायला पुरेसे होईल. त्यातही, कोणी ते चालू ठेवलेच तर "मजूराच्या" मदतीने वापरलेल्या काळ्या पैशाच्या स्त्रोतापर्यंत पोचणे शक्य आहे. सर्व पैसे बदलाचे व्यवहार लिखित स्वरूपात व ओळखपत्रासह आहेत. तेव्हा सद्याचा गदारोळ संपल्यावरही संशयास्पद प्रकरणांची चौकशी करता येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शाई वापरण्याचा मुद्दा कारवाईच्या मूळ मसुद्यात होता. पण लोकांना त्रास होऊ नये यासाठी (साध्या मराठीत : विरोधी पक्षांना, "बघा, बघा, आम जनतेवर सरकार अविश्वास दाखवतेय" असा कांगावा करायला मिळू नये यासाठी) तो अमलात आणला गेला नाही. आता काळाबाजारवाले जनतेतील भोळ्या माणसांचा गैरवापर करत आहेत यासाठी शाई वापरात आणली आहे. लोकशाहीत अश्या तडजोडी न करणे अशक्य असते. आता यामुळे बँकेसमोरची गर्दी दोनएक दिवसांत कमी झाली तर आश्चर्य वाटायला नको.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नुसते शाईचा ठिपका हातावर लावणार म्हणून जाहीर करताच बँकेसमोरच्या रांगातले लोक कालच निम्म्याने घटले अशी बातमी आहे... Queues getting shorter at banks; long wait at ATMs continues याचा अर्थ त्या रांगातले निम्मे लोक भाडोत्री होते, "स्वतःचे पैसे बदलायला आलेले तथाकथित गरीबबिचारे, उपाशी-तापाशी, आजारी आणि सरकारच्या छ्ळाने गांजलेले लोक" नव्ह्ते ! म्हणजे "वाहिन्यांवर अतीव सहानभूतीने बोलणारे नेते व वाहिन्यांवरचे वार्ताहर आणि त्यांचे पाठीराखे" हे केवळ चलाख कोल्हेकुईच करत होते असे दिसत आहे :) अवांतर : एका वाहिनिच्या वार्ताहाराच्या रिपोर्टचे मी अन्यत्र केलेले विश्लेषण बरोबर होते असेच दिसत आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एटीएमपुढच्या रांगा उद्यापासून कमी होतील असा अंदाज आहे. कारण आजचा दिवस एटीएमच्या रिकॅलिब्रेशनसाठी ठेवलेला आहे. एकदा एटीएममधल्या सर्व खान्यांतून रु १०० (किंवा रु १०० आणि रु५००) च्या नोटा बाहेर येऊ लागतील तेव्हा त्या रांगाही एकदोन दिवसांत नोटाबंदीपुर्वी होत्या तशाच होतील. कारण एटीएमचा उपयोग काळा पैसा पांढरा करायला (मजूर लावून) होऊ शकत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे Sat, 11/19/2016 - 16:30
आपण दिलेल्या बातमीत खालील तपशील वाचलेत People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes. At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation. A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in. आता या बातमीतले खरे खोटे देव जाणे!

In reply to by संदीप डांगे

याची अपरिहार्यता आणि कारणे अनेकदा अनेक प्रतिसादांत (त्यातले काही प्रतिसाद तुम्हालाच उद्देशून होते) दिलेली आहेत. यावर ती कुढे आहेत असे विचारू नका. ती तुम्हीच शोधून पहा. जरा आपण व ज्यावर मुद्द्यावर टीप्पणी करत आहे त्याबाबतीतले दुसर्‍यांचे प्रतिसाद वाचून निदान या विषयाची चर्चा संपेपर्यंत तरी लक्षात ठेवलेत तर बरे होईल असे वाटते. त्यामुळे, दुसर्‍याचे काहीच रगिस्टर न होता आपलेच म्हणणे रेटत आहे, असे होणार नाही व किमान सामंजस्यपूर्ण चर्चा शक्य होईल. ७० वर्षांची घाण साफ करण्यासाठी उचललेल्या कोणत्याही कारवाईत जनतेला काहीच तोशीस पोचणार नाही अशी समज असल्यास, शुभेच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे Sat, 11/19/2016 - 16:44
मला काहीच म्हणायचे नव्हते, म्हणायचे असते तर मेगाबायटी टाकला असता. असो. 'सत्तर वर्षांची घाण' चांगला शब्द आहे. वापरण्यात येईल! शुभेच्छांसाठी धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

"सत्तर वर्षांची घाण" या शब्दाचे पूर्ण श्रेय माझ्याकडे नाही. बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या घरकामे करणार्‍या गृहिणीला एका वाहिनीच्या वार्ताहराने तिला होणार्‍या त्रासाबद्दल विचारले तेव्हा तिने दिलेले उत्तर मलाही काहीकाळ सानंद चकीत करून गेले... ती गृहिणी म्हणाली ते साधारण असे होते, "घर खूप दिवसांनी साफ करायला काढले की त्रास होणारच. पण तो त्रास सहन केल्याशिवाय घर कसे साफ होणार. घर साफ झाल्यावर मात्र किती छान वाटतं, नै का ?" या प्रसंगाचे वर्णन एक दिवसाने कायप्पावरही फिरु लागले होते. आता, या सर्वसामान्य कामकरी बाईइतकी बुद्धी विरोध करणार्‍या नेत्यांत नाही, असे अजिबात नाही. म्हणजेच त्यां नेत्यांच्या विरोधाची उद्दिष्ये नक्कीच त्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बाईपेक्षा खूप वेगळी आहेत. ती उद्दिष्ये काय असू शकतात हा काही फार मोठे गुपित नाही :) भारताच्या सर्वसमावेशक उज्ज्वल भविष्याची इच्छा असणारा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हा फरक समजून घेणे मला फार निकडीचे वाटते.

In reply to by संदीप डांगे

People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes. At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation. आजच्या या बातमीवरून यातला निम्मा तरी त्रास पैसे बदलायला आलेल्या "मजूरांमुळे" होता असेच दिसत नाही काय ? पहिल्या दिवसापासून हाताला शाई लावायची असे मूळ योजनेत होते. पण तसे काही व्यावहारीक समस्या* आल्या असत्या म्हणून ते केल्याचे ताळले असे वित्तसचिवांनी राष्ट्रीय वाहिनीवर सांगितले आहे. * व्यावहारीक समस्या : असे केल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासून "अरे बघा, बघा, हे सरकार आम आदमीवर किती अविश्वास दाखवत आहे पहा !" अशी कोल्हेकुई सुरू करून त्याचे राजकिय भांडवल केले असते. A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in. त्यांना त्यांच्या रोजच्या कामाची मजूरी मिळाली नसली तरी त्यापेक्षा जास्त मजूरीची लालूच असल्याशिवाय ते रोजचे काम सोडून रांगात उभे राहतील काय ? ++++++++++++++++ एका बाजूला स्वतःच काळाबाजार्‍यांनी पैसे बदलायला मजूर लावले आहेत असे म्हणायचे आणि त्या रांगेत उभे असलेल्या सर्व (मजूर + सज्जन) लोकांबद्दल गळा काढाताना हा मुद्दा विसरायचा. एकूण काय, भ्र्ष्टाचारविरुद्ध एक चांगले पाऊल उचललेल्या सरकारला ते आपल्या आवडीच्या पक्षाचे नाही म्हणून डोळे मिटून झोडपायचे ! चूकीला चूक आणी बरोबरला बरोबर म्हणण्याव्यतिरिक्त इतर काही मला कधीच जमले नाही. चूकीला चूक आणि बरोबरलाही चूक म्हणायला इतर बरेच काही लागते, त्याची आमच्याकडे वानवा आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Sat, 11/19/2016 - 21:14
ह्या लोकांना स्वतःच्या खात्यात पैसे भरताही येत नाही व काढताही येत नाही., त्यामुळे त्यांना रांगेचा त्रासही नाही. आनंदी आनंद गडे..... हेच चित्र आहे सगळीकडे.

In reply to by मार्मिक गोडसे

सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी यासाठी सरकारने मोठी मोहीम चालवून तिच्यात बरेच यश आले असताना एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात, हे त्या भागातील नेत्यांना भूषणावह आहे का ? जिल्हा बॅंका अनेक वर्षे कार्यरत असूनही आरबीआयच्या मूलभूत नियमांचे (उदा: केवायसी) उल्लंघन करतात याला त्या बँका चालवणारे स्थानिक नेते जबाबदार नाहीत काय ? ते असे का करतात ? अश्या उल्लंघनाने शेतकर्‍यांचे (ही कारवाई नव्हती तेव्हाही) भले होत होते का ? आनंदी आनंद गडे अशी परिस्थिती होती का ? असो. या प्रश्नांची उत्तरे तितकिशी गुप्त नाहीत आणि आता त्यांची उत्तरे शोधायची वेळही नाही. आता पिडीत झालेले लोक स्थिरस्थावर झाल्यावर ते काम सावकाश करतील, अशी आशा करूया. ====== नकदेनेच ६० ते ७०% व्यवहार होतात असे बातमीत म्हटले आहे, याचा तेवढे नकद पैसे लोकांचा हातात आहेत. समस्या फक्त त्यातले जे पैसे जुन्या रु ५०० किंवा रु १०००च्या नोटांच्या स्वरूपात आहेत त्यांचा आहे. आताच्या स्थितीत योग्य बॅकेत जरूर ती ओळख कागदपत्रे घेऊन गेल्यास नवीन खाते काही तासांत उघडता येते. त्या खात्यात कितीही प्रमाणात नकद वैध उत्पन्न कोणत्याही प्रकारची चिंता न करता भरता येईल. शेतकी उत्पन्नावर आयकर नसल्याने कितीही वैध शेतकी उत्पन्न बँकेत भरले तर त्यावर आयकराचीही भिती नाही. त्यानंतर, सरकारने शेतकर्‍यांना खास वाढवून दिलेल्या रकमेत (शेवटच्या बातमीप्रमाणे दर आठवड्याला रु२५०००) नकद पैसे काढता येतील आणि बँकेत शिल्लक असेल त्या सीमेपर्यंत हवे तेवढे पैसे चेकने चुकते करता येतील. बँक जवळ नसली तर पोस्ट ऑफिस तरी असेलच. ====== अश्या कठीण काळात स्थानिक नेत्यांनी केवळ सरकारचा निषेध करत न बसता शेतकर्‍यांना (जे त्यांचे मतदारही असतात) योग्य बँकेत नवीन खाते उघडायला मदत केली तर त्याचा जेवढा फायदा शेतकर्‍यांना होईल तेवढाच (किंवा कांकणभर जास्तच) पुढच्या निवडणूकीत नेत्यांना होईल. किंबहुना अश्या वेळेस मतदारांच्या जे कामी येत नाही त्यांना नेते तरी कसे म्हणावे ?! सद्याच्या कठीण परिस्थितीत केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा शक्य ते वैध उपाय शोधणे गरजेचे आहे, असे वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Sun, 11/20/2016 - 12:26
सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी यासाठी सरकारने मोठी मोहीम चालवून तिच्यात बरेच यश आले असताना एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात
शेतकर्‍यांची जि.म. बॅकांमध्ये खाती असतातच. पिक नुकसान भरपाई, पिककर्ज ह्याच बॅकामार्फत मिळते. त्यामुळे ६० -७० टक्के व्यवहार बँकेशिवाय चालतो ह्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
जिल्हा बॅंका अनेक वर्षे कार्यरत असूनही आरबीआयच्या मूलभूत नियमांचे (उदा: केवायसी) उल्लंघन करतात याला त्या बँका चालवणारे स्थानिक नेते जबाबदार नाहीत काय ?
आरबीआय जेव्हा बँकांना परवाना देते तेव्हा संबंधीत बँका आरबीआयच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते की नाही हे पहाण्याची जबाबदारी आरबीआयची असते, स्थानिक नेत्यांची नाही.
आताच्या स्थितीत योग्य बॅकेत जरूर ती ओळख कागदपत्रे घेऊन गेल्यास नवीन खाते काही तासांत उघडता येते.
दुसर्‍या कशाला? ,ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील. परंतू सरकारने ह्या बँकाच्या व्यवहारावरच सध्या बंदी घातली आहे. ज्यांची ह्या बँकेत केवायसी पुर्ण आहे अशा खातेदारालाही आपल्याच खात्यातून रोख रक्कम काढता येत नाही. नोटाबंदीचा निर्णय हा सरकारने आरबीआयला बरोबर घेउनच घेतलेला आहे. ह्या चलनबदलीकरता बँक व पोस्ट प्रणाली वापरावी लागणार हे माहीत असताना, ह्या प्रणालीत येणार्‍या संभाव्य अडचणी दूर करूनच हा निर्णय राबवायला हवा होता. सरकारने फार घाईघाईत निर्णय घेताना लोकाच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले व त्याचे खापर स्थानिक नेत्यांवर फोडणे योग्य नव्हे.
सद्याच्या कठीण परिस्थितीत केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा शक्य ते वैध उपाय शोधणे गरजेचे आहे, असे वाटते.
सरकारच्या निर्णयाला कधीच विरोध केला नाही. परंतू जे लोक म्हणतात जनतेला ह्या निर्णयामुळे काहीच त्रास होत नाहीये, ग्रामीण भागातील जनतेला त्रास होतोय,परंतू काही कारणामूळे तो लोकांसमोर येत नसल्याने सर्वत्र आनदी आनंदाचे वातावरण आहे असे ज्यांना वाटते अशांसाठी वरील संदर्भ दिला होता.

In reply to by मार्मिक गोडसे

अमितदादा Sun, 11/20/2016 - 13:03
प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे. लोकांचा निर्णयाला विरोध नाही मात्र निर्णयातील अंमलबजावणीतील ढिसाळपणा ला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा त्रास होतो आहे. आज मी ज्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलोय तिथे आमच्या गावातील पंचक्रोशीत फक्त एक महाराष्ट्र बँकेची शाखा आहे इतर कोणतीही मोठी पब्लिक सेक्टर किंवा private सेक्टर मधली बँक नाहीये. मात्र भरपूर गावात जिल्हा बँक, सहकारी बँका आणि पटसंस्थेचे जाळे आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून आहे. शेतकऱ्याचं कर्जवाटप, शासकीय मदत, ऊस बिले पूर्ण ह्या बँकांत जमा होतात, याचा कोणताही विचार न करता सहकारी आणि जिल्हा बँकेना नवीन नोटा न पाठवणे तसेच जुना नोटा स्वीकारण्यास बंदी घालणे चुकीचे वाटते. आज आता ऊस तोडीची बिले शेतकऱयांच्या खात्यात जमा होऊ लागलीयेत मात्र शेतकऱयांना त्याचा वापर करता येत नाहीये आज शेतकरी शेतमजुरांना काही 100 रुपये किंवा 200 रुपयाचे रोजच्या कामाचे चेक लिहून देऊ शकत नाही, आणि भरपूर जिल्हा बँकांना atm ची सुविधा लिमिटेड आहे त्यामुळे असे हि पैसे काढू शकत नाही. तसेच आज सहकारी आणि शेतकरी बँकेत 6 ते 8 हजार कोटी जुन्या नोटांच्या बदल्यात शेतकऱ्यांनी जमा केलेत त्याच करायचं काय हा प्रश्न पडलाय कारण मोठ्या बँका ह्या नोटा स्वीकारेनात. सरकार नक्कीच याचा विचार करून मार्ग काढेल हि अशा अन्यथा अत्यंत चांगल्या निर्णयाची मोठी राजकीय किंमत ग्रामीण भागात तरी मोजावी लागेल. अवांतर राजकीय भाष्य: जेटली हे मोदींचे राजकीय मॅनेजर म्हणूनच शोभून दिसतात, अर्थमंत्री म्हणून अप्रभावी, ढिसाळ तसेच inefficient.

In reply to by अमितदादा

मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 11:23
मोदी सरकारने घेतलेला निर्णय, त्यातही ज्यात मोदींचा अतिशय स्वत:चा महत्वाचा सहभाग ...मग असा निर्णउ चुकणं अशक्य. अंमलबजावणी मुळे सामान्य जनतेला २-४ वा ५० दिवस त्रास झाला तरी देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होवून त्याने तो सहन करावा. निर्णयावर टीका करणारा देशद्रोही. अंमलबजावणीतल्या त्रूटी दाखवणार्‍याची देशासाठी त्याग करण्याची तयारी नाही..या आणि अशा मानसिकतेतून बाहेर पडून सारासार विचार करणे गरजेचे आहे. मोदीभक्ती वा मोदीविरोध हे दोन्हीही व्यक्तीकेंद्रित आहे. ते बाजूला ठेवणून घेतलेला निर्णय आणि अंमलबजावणी याकडे वस्तुनिष्ठपणे बघायला हवे. आताही जिल्हा बँक, सहकारी बॅंक यांत kyc, PAN card ची माहिती पुर्ण करुन खातेदारांना पैसे स्वीकारण्यास / काढू देण्यास परवानगी द्यावी.

In reply to by मार्मिक गोडसे

एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात साहेब, आपण जो दुवा पुरावा म्हणून तुमच्या प्रतिसादात दिला आहे तो वाचला असतात तर या वाक्याला अर्थ नाही असे म्हटले नसतेत. ही माहिती तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या बातमीतूनच घेतली आहे !!!!!!!!!!!!! आता, (अ) प्रथम तुमचा दुवा वाचून आणि (आ) माझा प्रतिसाद वाचून मग (इ) तुमचा वरचा प्रतिसाद वाचलात तर मला इतरही जास्त काही सांगण्यासारखे उरणार नाही ! :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 14:54
सर्व शेतकर्‍यांचे जि,म. बँकेत खाते असले तरी, शेतकर्‍यांचे व्यवहार हे नेहमीच रोखीनेच असतात ह्याचे कारण शेतीमाल उत्पादनाची विक्री रोखीतच होत असल्यामुळे व शेतमजूरांना रोखीतच पैसे द्यावे लागत असल्यामूळे बहुतांश शेतकर्‍यांचा बँकेशी संबंध पिककर्ज, पिक नुकसानभरपाई ई. बँकेत जमा झालेल्या रक्कमा काढण्यापूरताच असतो. त्या अर्थाने ६०-७० टक्के व्यवहार बँकेशिवाय चालतात असा घ्यावा.

In reply to by मार्मिक गोडसे

ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील. या बँकांबद्दल तुम्हाला बरीच माहिती असावी असे लिखाणावरून दिसते. तेव्हा, आरबीआय ह्या बँकांच्या मागे लागूनही वर्षानुवर्षे हे केवायसीचे साधे सोपे काम का पूर्ण होत नाही, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगले माहित असणारच ! :) बँकांनी वर्षानुवर्षे टाळलेले हे काम आता त्यांच्याच हस्ते, घिसाडघाईत काम केल्याने ते जास्त वेळखाऊ, अपूर्ण, चुकीचे आणि गैरव्यहारांसाठी सुलभ होऊ शकेल हे सांगायला नकोच. मग त्यामुळे पैशांचे किंवा इतर गैरव्यवहार झाले की, पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 15:04
पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!
सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती.

In reply to by मार्मिक गोडसे

सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती. हे लिहायला सोपे आहे. पण... १. कठोर निर्णय !? शेतकर्‍याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्‍यांच्या आडून गदारोळ करणार्‍यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते. हे राजकारण भारताला नवीन नाही. आरबीआयने वारंवार नोटीसा पाठवूनही राजकिय दबाव वापरून ज्या कारणासाठी (जे सामान्य शेतकर्‍यांच्या फायद्याचे नाही) केवायसी केली जात नव्हती, ते कारण कायमच होते/आहे ना ? २. याशिवाय अजून जास्त महत्वाचे कारण : "आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती. गुप्तता तर या कारवाईचा प्राण होता. म्हणुनच तर सर्व विरोधकांचा रोख असाच आहे की, "कारवाई गुप्त का ठेवली ? पूर्वीच्या कारवायांप्रमाणे तिच्याबाबत अगोदर प्रसिद्धी करून मग सहाएक महिन्यांच्या मुदतीत ती लागू करायला हवी होती (पक्षी : आम्हाला काळ्याचे पांढरे करायला पळवाट ठेवायला हवी होती) ! :) दोन्ही बाजूंनी विचार केला तर बरेच ध्यानात येईल. जिल्हा बँकतून वर्षानुवर्षे मुद्दामहून ठरवून कामचुकारी केली गेली त्यामागे स्वार्थी हितसंबंध नव्हते, केवळ एक सामान्य आळस होता आणि केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 17:44
शेतकर्‍याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्‍यांच्या आडून गदारोळ करणार्‍यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते.
आरबीआय कोणत्याही राजकीय दबावाखाली निर्णय घेत नाही (माजी गवर्नरनी रेपो रेटच्या वेळी दाखवले आहे).
आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती.
काहीही. २०१६ च्या Income Declaration Scheme च्या दरम्यान सरकारने काळा पैसेवाल्यांना ही शेवटची संधी आहे असे सांगितले होते . नंतर काळा पैसा काढण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट सांगितले होते, तेव्हा नाही का ह्या "चलाख" मंडळींना वास लागला? घाईघाईत निर्णय घेतल्याने आरबीआयवर ही नामुष्की आली आहे. उगाच गुप्ततेचे समर्थन करण्यात अर्थ नाही.
केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)
हा आरबीआयच्या अखत्यारीतला विषय आहे उगाच सरकारला मध्ये आणू नका, सरकारची चूक आहे असे म्हटलेले नाही. सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती. नीट वाचा.

In reply to by मार्मिक गोडसे

तो निर्णय कठोरपणे का राबवता आला नसावा याबद्दल वर काही मी लिहिले आहे ते वाचा. वर लिहिल्याप्रमाणे हा मुद्द्यावर अनेकदा लिहिलेली उत्तरे परत परत लिहिण्याचा कंटाळा आला आहे. तेव्हा चर्चेतला हा माझा शेवटचा प्रतिसाद. काळ बाकी सर्व सत्य गोष्टी उलगडून सांगेल असा अंदाज आहेच. त्यामुळे धन्यवाद आणि राम राम !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 21:24
ठिक आहे, ६ महिन्यांपूर्वी आरबीआयला जि.म.बँकेचा भोंगळ कारभार माहीत असुनही गुप्तता धोक्यात येइल असे वाटल्याने कारवाई केली नाही. मग नोटाबंदी जाहीर झाल्यावर लगेच दुसर्‍याच दिवशी का नाही ह्या बँकांच्या व्यवहारावर बंदी आणली? का चार दिवस आरबीआयने दुर्लक्ष केले? ह्यावरून सिद्ध होते की, आरबीआयनेही पूर्वतयारी केली नव्हती. उगाच गुप्ततेचे समर्थन करू नका.

In reply to by गामा पैलवान

सचु कुळकर्णी Sat, 11/19/2016 - 03:10
त्यानुसार जुन्या नोटा हे शासनमान्य वैध चलन ( = लीगल टेंडर) राहणार नाही. मात्र इतर लोकं ते चलन म्हणून वापरू शकतात. त्यावर शासन बंधन घालू शकंत नाही. आ.न.गा.पै. पुन्हा एकदा वाचा काहि गल्लत तर होत नाहिये ना.

In reply to by सचु कुळकर्णी

+१ बाद केलेल्या नोटा कायद्याने सरकारजमा करायच्या असतात. त्यांचा कोणत्याही चलनी स्वरूपात केलेला उपयोग कायद्याने गुन्हा ठरेल. फार फार तर काही थोड्या नोटा "कलेक्टर्स आयटेम" म्हणुन संग्रहात ठेवल्या तर त्या बाबतीत सरकार डोळेझाक करते.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 14:14
ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी रुपये आहेत ते मजूर, नोकर, लेबर कॉन्ट्रॅक्टर तर्फे 300 रुपये रोजंदारीवर पैसा पांढरा करून घेत आहेत. 50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात. त्यासाठीच मोठ्या प्रमाणावर असलेला पैसा पकडला जातो आहे. योग्य ते स्पष्टीकरण दिल्यास तो परत देखील मिळेल. अन्यथा सरकारदरबारी जमा. बाकी मी आधीही लिहिले होते. ५० -६० लाखापर्यंत पैसा आरामात पांढरा होइल. १ कोटीपेक्षा जास्त अस्सेल तर अश्या माणसाला अडचण येइल २ कोटीपेक्षा जास्त असेल तर अश्या माणसाला नक्कीच झळ बसेल. त्याहुन जास्त असेल तर अश्या माणसांचे काही पैसे नक्की डब्यात जातील. ज्या मार्गाने अथवा सहजतेने १ कोटी पांढरे होउ शकतात त्या सहजतेने २०० कोटी नाही होउ शकत. किंबहुना होणारच नाहित. या मार्गाने अजुनही एक गोष्ट साध्य होइल की धनसंचय जो एकाच माणसाकडे आहे तो अनेक माणासांकडे विभागला जाइल आणी बाकीचा चलनबाह्य होइल.

In reply to by मृत्युन्जय

आता (अ) हाताला शाई लावणे; (आ) सरकार व रिझर्व बँकेकडून "बँकेअंतर्गत काळ्या व्यवहारातून काळाबाजार्‍यांना मदत केल्यास कारवाई होईल" असा संदेश देणे, (इ) जमा झालेल्या २.५ लाखावरच्या पैशाची चौकशी करणे* आणि (ई) जिल्हा स्तराच्या व त्याखालच्या बँकांना पैसेबदल कारवाईतून पहिल्यापासून वगळणे यामुळे असा पैसा खूपच कमी प्रमाणात (एकूण काळ्या पैशाच्या तुलनेत) बदलला जाईल. * कालच तशी एक नोटीस कायप्पावर पाहिली. अशा प्रत्येक विभागात एकदोन नोटीसेस गेल्या तरी काळाबाजार्‍यांना आपले बँकेचे खाते वापरायला देवून मदत करायला कोणी पुढे येईल असे वाटत नाही :) ...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अश्या नोटीसा आतापर्यंत दशहजार किंवा लाखांतही दिल्या गेल्याच्या बातम्या आहेत. म्हणजे काळ्याचे पांढरे करायला "उसने बँक अकाऊंट" वापरणे कठीण झाले आहे !

गामा पैलवान Sat, 11/19/2016 - 16:07
सचु कुळकर्णी,
आ.न.गा.पै. पुन्हा एकदा वाचा काहि गल्लत तर होत नाहिये ना.
आसं बगा की गामा पैलवानाला गावातल्या कुळकर्ण्याचा सांगावा आला की हिरीचा ऱ्हाट कोसळला हाये. गाम्या गेला तितं आन पैलवानकी दाखवीत येकट्यानं रहाट खेचडून काडला भाईर. आता कुळकर्ण्याकडं घरची शेती बऱ्यापैकी आसली तरीबी नगद पैका न्हाई. म्हून त्यानं घरचा गळका माठ पार फोडला आन एका खापरावर खडूने पैलवानास पन्नास रुप्ये देणे असा लिवला. हा खापर घेऊन गाम्या वाण्याच्या दुकानी जाऊन मीठमिरची इकत घेऊ शकतो की नाय? गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रसाद_१९८२ Sat, 11/19/2016 - 16:23
गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. == पण फक्त तीस डिसेंबर पर्यंत! (बॅंकेत जुन्या नोटा भरायची मुदतवाढ मिळाली नाहितर)

In reply to by प्रसाद_१९८२

गामा पैलवान Sun, 11/20/2016 - 00:04
प्रसाद_१९८२, या नोटा बँकेत भरण्यासाठी नाहीयेत. फक्त आपापसांत व्यवहार करण्यासाठीच आहेत. त्यामुळे जगाच्या किंवा नोटांच्या अंतापर्यंत चालतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. रद्द नोटांचा तसा उपयोगही बेकायदेशीर आहे =)) त्या नोटांचे तुकडे करून आरबीआय त्यांच्या विटा बनवते असे एका वाहिनीवर पाहिले आहे. त्या विटांची बांधकामात वापरण्यासाठी विक्री होते काय हे शोधून काढले पाहिजे :)

सरल मान Sat, 11/19/2016 - 17:57
बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. २००० च्या नोटा ८ तारखेच्या आधीच बँकात पोचल्या होत्या. माझ्या कायप्पाच्या एका ग्रुपवर ६ तारखेलाच २००० च्या नोटेचा फोटो आला होता आणि सर्व सदस्याना ती अफवा वाटली होती.

(अ) हाताला शाई लावणे (आ) नोटा बदलून देण्याची सीमा कमी करणे (रु४५०० ऐवजी रु२०००) (इ) दुसर्‍यांच्या "भाडोत्री खात्यांत" रक्कम जमा करणे बेकायदा आहे व त्यासाठी दोन्ही पार्टींना दंड व शिक्षा होऊ शकते, याला पुरेशी प्रसिद्धी देणे व अश्या संशयित खातेधारकांना करविभागाच्या नोटीसा जाणे (ई) बरीचशी एटीएम्स रु १०० व रु५०० साठी कार्यान्वित होणे या वरच्या उपायांमुळे, आजपासून बँकांसमोरच्या रांगा अर्ध्यावर किंवा त्यापेक्षा कमी झाल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत. आणि हे सर्व बँकेच्या एका दिवसाच्या सुट्टीनंतर घडत आहे ! यावरून, त्या रांगात "तथाकथित, गरीब, गांजलेल्या, पिडलेल्या आणि आजारी" लोकांचे किती प्रमाण असावे व भाडोत्री लोकांचे किती प्रमाण असावे याचा अंदाज, त्यांच्या नावाने दु:खी झालेल्या नेत्यांना, वार्ताहरांना आणि त्या दोघांच्या वचनांनी वाहत गेलेल्या लोकांनाही लावायला कठीण नाही. किंबहुना भाडोत्री लोक रांगात नसते तर सज्जन नागरिकांनी खूप खूप कमी त्रास झाला असता याचीही नोंद घ्यायला हवी ! रांगातल्या भाडोत्री लोकांचे समर्थन न करता त्यांचे बिंग फोडण्यासाठी जर नेतेगिरी, पत्रकारिता व नागरिक शक्ती वापरली गेली असती, तर त्या संबंधितांच्यातर्फे एक देशोपयोगी काम झाले असते. आता सद्याची वेळ गेली असली तरी, यावेळेस आपण प्रत्यक्षात कोणते/कोणाचे काम केले ह्याचे ज्याने त्याने आत्मपरिक्षण केले तर, भविष्यात काय करणे देशाच्या म्हणजेच पर्यायाने आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याचे होईल हे नीट कळून चुकेल, यात मात्र काहीच शंका नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

jp_pankaj Mon, 11/21/2016 - 18:44
आज बँका बाहेर तुरळक गर्दी होती. ( अपवाद SBI/SBH). HDFC,BOM,ICICI,SBH यांचे एटीएम (रिकॅलीब्रेट)चालु झालेले दिसले. उगाच टिपी करत फिरलो, फोटु पण काढले. (प्रत्यक्षदर्शी )

आज नोटा रु ५०० व रु१००० च्या नोटा रद्द होण्याचा १३ वा दिवस. आज शेतकर्‍यांना व इतर जनतेला दिलासा देणार्‍या अजून काही सुटी जाहीर केल्या गेल्या आहेत. मिपाकरांपैकी कोणाच्या मजरेतून निसटल्या असल्यास कळाव्या यासाठी त्या खाली देत आहे. अधिक माहितीकरिता आपापल्या बँकेत किंवा संबंधीत इतर जागी चौकशी करावी... १. कार, घर किंवा इतर काही कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या मुदतीतले हप्ते ६० दिवस पुढे ढकलले आहेत. यामुळे मूळ कर्जांच्या अटींत फरक (रिस्ट्रक्चरिंग) होणार नाही. २. शेतकर्‍यांना रु ५०० च्या जुन्या नोटा वापरून केंद्रिय व राज्य सरकारी केंद्रांतून आणि Indian Council of Agricultural Research येथून बियाणे खरेदीची परवानगी. ३. कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा असणारे दर आठवड्याला रु५०,००० नकद काढू शकतील (काही अटी आहेत). ही सुविधा करंट अकाऊंट्सना अगोदरपासूनच आहे. ४. रु ५०० कोटी खर्चाच्या आरोपामुळे बातमीत असलेल्या जनार्दन रेड्डी याच्या मुलीच्या लग्नाला सेवा पुरवलेल्या कंपन्या / व्यक्तींची आयकर विभागाकडून चौकशी सुरू झाली. ५. नोव्हेंबर १८ पर्यंत बँकांत रु५.४४ लाख कोटी किंमतीच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. ६. विरोधकांनी नोटा रद्द करण्याच्या कृतीवर चर्चा करण्यास नकार देवून राज्यसभेत सरकारवरील विश्वास ठरावाचा आग्रह धरला आहे व तोपर्यंत सर्व कामावर स्थगितीचा ठराव (अ‍ॅडजर्नमेंट मोशन) आग्रह केला आहे. स्त्रोत : http://timesofindia.indiatimes.com/india/Day-13-of-demonetisation-Key-developments/listshow/55545348.cms

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ट्रेड मार्क Mon, 11/21/2016 - 21:50
राज्यसभेत सरकारवरील विश्वास ठरावाचा आग्रह धरला आहे
राज्यसभेत तसेही बीजेपी किंवा एनडीए बहुमत नाहीये (माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित चुकीची पण असेल). त्यामुळे नक्की कोणावर विश्वास ठराव करणार? राज्यसभा केंद्र सरकारवर अविश्वास ठराव काढू शकते? जर का केंद्र सरकारवरचा अविश्वास ठराव राज्यसभेत मान्य झाला तर पुढे काय होणार? यात कुठे लोकांच्या मताला काही किंमत दिली जाणार नाही हे तर उघडच आहे पण याचा केंद्र सरकारवर काही परिणाम होऊ शकतो का?

In reply to by ट्रेड मार्क

बातमी तर तशीच आहे ! माझ्या अप्लमतीप्रमाणे या मागचा उद्येश फक्त "सरकारला राज्यसभेत कोणतेही बिल मांडण्याला प्रतिबंध करणे व त्यामुळे जेवढ्या नवीन कायदे-कारवाया अडवता येतील तेवढ्या अडवाव्या" हेच आहे. जे या सरकारच्या कारकिर्दीतल्या पहिल्या चारपाच अधिवेशनांत केले होते, आणि त्यामुळे सर्व बाजूंनी टीका सुरू झाल्याने गेल्या अधिवेशनात काही बिले पास करावी लागली. आता हे नवीन कारण पुढे करून मागच्याच नाटकाचा पुढचा प्रयोग चालू आहे. सबळ मुद्दे असले तर विरोधी पक्ष सरकारने चर्चा करावी असा आग्रह धरून सरकारला अडचणीत आणतो. इथे सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्ष अ‍ॅडजर्नमेंट मोशनची मागणी करत चर्चा टाळत आहे आणि गदारोळ करून दोन्ही सदनांचे काम बंद पाडत आहे ! गम्मत म्हणजे राज्यसभेतल्या विश्वास/अविश्वास ठरावाला शून्य किंमत असते ! तो लोकसभेत मांडून सरकारचा पराभव झाला तरच सरकारला राजिनामा द्यावा लागतो. हे सर्व माहित नाही असे राज्यसभेच्या माननिय सभासदांना माहित नसेल असे समजणे कठीण आहे. यावरून काय ते ओळखा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विरोधी पक्षाने आज लोकसभेत घोषणाबाजी करून कामकाज बंद पाडले. इतकेच काय पण नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल रेल्वेमंत्र्यांना निवेदन करू दिले नाही. कालपर्यंत ज्या जनतेच्या त्रासाबद्दल आरडाओरडा चालू होता त्या जनतेच्या बद्दलच्या सहानभूतीची ही नवीन पातळी आज लोकसभेत दिसली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ट्रेड मार्क Tue, 11/22/2016 - 00:33
राज्यसभेत आणि लोकसभेत काय चालू आहे हे जनता बघत असेलच पण त्यातून कोण किती पाण्यात आहे हे सर्वांना समजेल अशी आशा आहे. त्यामुळे जनतेचा कल कुठे आहे आणि ते आगामी विधानसभेच्या निवडणुलीत काय कौल देतात हे महत्वाचे आहे. बाकी दोन्ही सभागृहांत गोंधळ घालायचे काम राजकारणी इमाने इतबारे करत असतात. आता बऱ्याच राजकारण्यांची सांपत्तिक स्थिती खालावलेली असेल त्यावर ज्या दिवशी काम होऊ देणार नाहीत त्या दिवसाचे त्या मेम्बर्सचे मानधन कापून घ्यायचा निर्णय लवकरात लवकर व्हावा.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी Tue, 11/22/2016 - 14:59
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेली अनेक दशके अजितदादा, अंकुश काकडे इ. राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या ताब्यात आहे. ते हबकल्यासारखे वाटत नाहीत. व्यवस्था झालेली दिसते.

दिगोचि Tue, 11/22/2016 - 07:16
The greed of Indians for money causes them to use various tricks to hoard money so that they do not have to pay tax. The tactics that I know to have been used so far include: using cash coolies (these are people who deposit money into their employer’s account), buying expensive things such as Rolex watches, buying gold at high price and then reselling it to the dealer thus increasing price of gold, renting janadhan account created by Modi, and paying airlines for overseas trips. Another trick used by a hotelier which was told by a friend who has just returned from Mumbai is as follows: a family goes to the hotel for a meal and say the bill comes to say Rupees 1800 when two thousand Rupee not is presented to settle the bill the hotelier says sorry Sir but I do not have change because I am out of 100 Rupee notes. Thus he pockets this 200 Rupees when the bill shows 1800. I am sure all the public servants and police are busy devising tricks like this to amass black money. I do not know what Modi can do to stop this malpractice.

दिगोचि Tue, 11/22/2016 - 07:16
The greed of Indians for money causes them to use various tricks to hoard money so that they do not have to pay tax. The tactics that I know to have been used so far include: using cash coolies (these are people who deposit money into their employer’s account), buying expensive things such as Rolex watches, buying gold at high price and then reselling it to the dealer thus increasing price of gold, renting janadhan account created by Modi, and paying airlines for overseas trips. Another trick used by a hotelier which was told by a friend who has just returned from Mumbai is as follows: a family goes to the hotel for a meal and say the bill comes to say Rupees 1800 when two thousand Rupee not is presented to settle the bill the hotelier says sorry Sir but I do not have change because I am out of 100 Rupee notes. Thus he pockets this 200 Rupees when the bill shows 1800. I am sure all the public servants and police are busy devising tricks like this to amass black money. I do not know what Modi can do to stop this malpractice.

Demonetisation " Slew of steps to push digital transactions, help farmers इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी, शशिकांत दास यांनी काही नवीन सोईसचलती जाहीर केल्या आहेत. त्यातील काही मह्त्वाचे मुद्दे असे... १. नाबार्डला कोऑप बँकांना रु२१००० कोटीची देणे मंजूर करण्यास सांगितले. यामुळे शेतकर्‍यांना व शेतीविषयक बाबींना कर्जे मिळणे सोपे होईल. २. १.५ लाख पोस्टऑफिसांमध्ये नवीन नोटा उपलब्ध. ३. e-walletची सीमा दुप्पट ४. पैश्यांच्या बहुतेक इलेक्ट्रॉनिक व्यवहारांवरचे सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द. इलेक्ट्रॉनिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यास ते कायमचे रद्द होण्याचीही शक्यता. ५. रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंगवरचे सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द. ६. TRAI ने डिजिटल ट्रांसफरवरचे सेवाशुल्क रु१.५० वरून रु०.५० इतके कमी केले आहे आणि फोन कंपन्या हा रु०.५० चा भार उअचलणार असल्याने ग्राहकासाठी सर्व रु१.५० सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत माफ झाले आहे. ७. कालपर्यंत ८२०० एटीएम्स रिकॅलिब्रेट झाली आहेत. इतर काम जोरात चालू आहे. ८. Unified Payment Interface mobile phone application (app) च्या पायलट प्रोग्रॅममध्ये २० बँकाचा सहभाग झाला आहे, नंतर यात अजून वाढ होत राहील. या अ‍ॅपने रु ५०,००० पर्यंतचे पैश्याचे व्यवहार त्वरीत (रियल टाईम) करता येतात. या अ‍ॅपबद्दल तपशीलवार माहिती आपले मिपाकर निनाद यांनी एकात्मिक भरणा पद्धती या शीर्षकाखाली इथे दिलेली आहेच. ९. ECF-compliant RFID प्रणाली बसवलेल्या चारचाकींचा टोल एलेक्ट्रॉनिकली गोळा होण्याच्या दृष्टीने पावले उअचलली जात आहेत. याने टोल देण्यास चारचाकींना रांगेत उभे रहावे लागणार नाही. १०. भविष्यात सर्व सरकारी संस्था फक्त डिजिटल पद्धतींनीच शुल्क स्विकारतील. ११. सर्व सरकारी बँकांमध्ये डेबिट व इतर कार्डांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे. ज्यांना जरूर/अथवा शक्य असेल त्यांनी या माहितीचा फायदा करून घ्यावा व तशी शक्यता असणार्‍या इतरांनाही ही माहिती जरूर द्यावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

निनाद गुरुवार, 11/24/2016 - 07:06
सरकारी स्तरावर इतक्या वेगाने हालचाली होतात आणि जनतेची सोय पाहून लगेच इतके मोठे निर्णय पण होतात किंवा बदलता हे मोठे आश्चर्यकारक पण आनंददायी आहे! उदा. TRAI ने डिजिटल ट्रांसफरवरचे सेवाशुल्क रु१.५० वरून रु०.५० इतके कमी केले आहे आणि फोन कंपन्या हा रु०.५० चा भार उअचलणार सगळ्या कंपन्यांना एक्त्र आणून त्यांचा निर्णय ही होणे हे ग्रेट आहे. इथे एक हापिस मिटिंग घ्यायची म्हंटली तर पन्नास लोक म्हणतात वेळ नाही! :) इथे तर एक नाही, अनेक खाती वेगाने आणि कार्यक्षमतेने निर्णय घेत आहेत. ही अ‍ॅजिलिटी, चपळाई आश्चर्यकारक आहे.

In reply to by निनाद

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/24/2016 - 14:00
बर्‍याच सरकारी खात्यांत बरीच कामे होत आहेत. ब्युरोक्रॅट्स वेळेवर कामावर येत आहेत, उशीरा घरी जात आहेत कारण मंत्री वेळेवर ऑफिसमध्ये येत आहेत आणि उशीरापर्यंत काम करत थांबत आहेत :) यातल्या बर्‍याच पायाभूत व दूरगामी गोष्टी तडक लोकाभिमूख नसल्याने त्यांचे परिणाम जनतेपर्यंत पोचून त्यांचे व्यवहारातले फायदे दिसायला वेळ लागणारच. यातल्या रेल्वेच्या बाबतीतले फरक तडक लोकाभिमूख असल्याने दिसत आहेतच... इतरही दिसतील हळू हळू... लोक आपली जबाबदारी पाळायला शिकले/लागले तर जरा लवकर दिसतील :)

In reply to by नावातकायआहे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/24/2016 - 14:18
पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर जन धन बॅंक खात्यांमधील भरण्यात मोठी वाढ होऊन ती 21 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. यात पश्‍चिम बंगालचा प्रथम क्रमाक असून, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या प्रकारात पश्चिम बंगाल प्रथम क्रमांकावर आहे आणि ममता बॅनर्जी नोटा रद्द कारवाई मागे घ्या यासाठी हट्ट करत आहेत; यांचा काही संबंध असावा काय ? कालच्या टाईम्स नाऊच्या न्यूजअवरमध्ये गरीब जनतेला होणार्‍या त्रासासाठी नक्राश्रू ढाळणार्‍या तृणमूलच्या डेरेक ओब्रायनला जेव्हा, शारदा स्कॅमबद्दल (जिच्यात काही लाख गरीब लोकांचे पैसे बुडाले होते) काय कारवाई केली असा प्रश्न विचारला गेला तेव्हा, त्याचा चेहरा आणि प्रतिक्रिया बघण्याजोगी होती.

चौकटराजा गुरुवार, 11/24/2016 - 10:22
मी नुकताच राजस्थान व म. प्र चा दौरा करून आलो. मोदींच्या या निर्णयावर सामान्यलोक प्रचंड आशावादी आहेत असे चित्र आहे. टूरिझम मधे कोणतीही गैरसोय वा मंदी आलेली नाही. सरकारने वीस च्या नोटा मोठ्या प्रमाणात वितरित करायला सुरूवात केली आहे. असे दिसतेय. मोदीपेक्षा माझाच डोळा "जनधन" खात्यांवर जास्त आहे. गरीबी साळसुदीचा भाव आणून आर्थिक गुंडांची मद्त करणारे देखील गजाआड गेले पाहिजेत. अशा लोकानीच मुंबई व काश्मीर येथे दहशतवाद्याना मदत केली आहे. या लायनींमधे कोणते लोक जास्त उभे होते हे आपण पाहिले आहेच. मला वाटतेय "जनधन" हा सापळा मोदीनी फार कल्पकपणे वापरला आहे. ज्या काही केसेस विरोधी पक्ष दाखवीत आहेत त्या वैयक्तिक आहेत. त्या प्रातिनिधिक नाहीत. एरवी घरतला नातेवाईक वारला तर विवाह हे रद्द होत असतातच व उन्हामधे नातवाच्या प्रवेशासाठी उभे असलेले आजोबाही हार्ट अटॅक ने मरू शकतात. मरण व माणसाचे हेतू यांचा काय संबंध ?

In reply to by चौकटराजा

चौकटराजा गुरुवार, 11/24/2016 - 13:45
आह दोन राष्रीयीकृत बॅन्कात जाण्याची वेळ आली. दोन्ही वेळेस व्यवस्थापकाच्या केबिन मधे बसणे झाले. ३० डिसेम्बर पर्यंत काही व्यवस्थापक मानसिक ताणाने मरण्याची देखील शक्यता मला वाटतेय. खाजगी रुग्णालयानी लोकांची पंचाईत केली आहे असे दिसते. इथे चेक घेत नाहीत असे असावे. काही लोक इतके येडचाप आहेत की त्याना कार्ड स्वाईप करायला भिती वाटतेय. ( मी ही परवा परवा पर्यंत या लाईनीत होतोच).लोकाना ज्याअर्थी २५०००० लगनासाठी हवेत यात उधारीने का व्यवहार होत नाही ? हे कळत नाही. वा चेकने कार्डाने पेमेंट का नाही. कारण मॅनेजर ने ज्या लगनपत्रिका दाखविल्या त्या इतक्या भारी होत्या की त्या नवर्‍याकडे कार्ड॑ नसावे हे पटत नाही. भारतात हरेकाचे गुन्हेगारीकरण झाले आहे काय अशी शंका येउ लागली आहे.

संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 11:49
गुजरातमधल्या एका कॅशलेस गावाचा विडियो व बातमी सध्या माध्यमांतून फिरत आहे. त्याबद्दल ह्या बातम्या. दुवा १ दुवा २ दुवा ३ तीनही मुळातून वाचाव्या.

पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 16:22
आणखी एक मृत्यू :-( रांग हि एक व्यवस्था म्हणून शेकडो वर्षांपासून चालू आलेली आहे. तिचे फायदे अनेक असले तरी ती सर्व लोकांना समान संधी देत नाही. जसे वृद्ध, आजारी लोक रांगेत फार काळ उभे राहू शकत नाहीत. शिवाय आजकाल बँकेत लागणाऱ्या रांगा या बँकेच्या बाहेर वेगळ्या आणि फाटक उघडल्यावर वेगळ्या अश्या लागतात. फाटक उघडल्यावर सगळे पळत काउंटर च्या पुढे रांगा लावतात. वृद्ध, बायका सुद्धा धावत पळत रांग गाठतात. 4 5 तास हा सरासरी वेळ जातो. तेव्हा असे दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी काय करता येईल? रांग हि system कशी सुधारता येईल. इतके मृत्यू होणं हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे का? अजून किती दिवस असं चालू राहील?

स न वि वि गुरुवार, 11/24/2016 - 16:49
आता म्हणे घरांच्या किमती खाली उतरणार म्हणे? किती शक्यता आहे त्याची? आणि असेल तर कधी पर्यंत होऊ शकेल? काही अंदाजा? कुणाला ह्याचा काही नमुना दिसण्यात आलाय का?

In reply to by स न वि वि

संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 09:15
गेल्या पंधरा दिवसातल्या घडामोडीनुसार प्रॉपर्टी सेक्टर वर फारसा फरक पडणार नाही असे दिसते, छोटी व मध्यम किमतीची घरे यांचे भाव स्थिर राहतील, झालाच तर (ज्याची शक्यता 10 टक्के आहे) अगदी 5 टक्के बदल होईल पण तो फार मोठा बदल नव्हे. कारण इथे ब्लॅक मनी चे व्यवहार फार कमी प्रमाणात होतात, थेट बँकेकडून लोन घेऊन घरे घेतली जातात. व इथली मागणी हि राहण्यासाठी घरे या गरजेवर टिकून आहे व हि मागणी कमी होण्याची चिन्हे नजीकच्या भविष्यात दिसत नाहीत, ज्यांची अशी घरे आहेत त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये व अफवांना भुलू नये. किमान पाच वर्षे आपली घरे तातडीची गरज असल्याशिवाय विकू नये. एक कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या किंमतीत मात्र 25 ते 35 टक्के करेक्शन येण्याची शक्यता या क्षेत्रातल्या अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशी बहुतांश घरे गुंतवणूक व काळा पैसा जीरावण्याचं साधन म्हणून घेतली जातात,

In reply to by संदीप डांगे

निओ१ Sun, 11/27/2016 - 18:03
" कारण इथे ब्लॅक मनी चे व्यवहार फार कमी प्रमाणात होतात, थेट बँकेकडून लोन घेऊन घरे घेतली जातात" ही माहिती तुमची चूकीची आहे. सर्वात जास्त ब्लॅक मनी चे व्यवहार हे घर खरेदी मध्ये होतात, अगदी १०-२०% च्या आसपास देखील होतात. तुम्ही तुमच्या ओळखीच्या बिल्डरला विचारून पहा, तो ८ तारखे आधी अगदी ५०% पण रोख रक्क्म घेण्यासाठी तयार होत असेल. आता थोडी गोच्ची झाली आहे, पण काही महिन्यात ते वेगळा मार्ग शोधतील देखील. पण ज्या प्रकारे प्रत्येक ट्रान्जक्शनचा सरकार हिशोब ठेऊ पाहत आहे त्या सिस्टममध्ये ते जरा अवघड होईल अशी अपेक्शा आहे.

In reply to by निओ१

संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 19:27
याचा अर्थ असा होतो की घरांच्या किमती सरसकट 30 टक्के लगेच कोसळल्या पाहिजे होत्या, तसे झाल्याची माहिती तुम्हाला उपलब्ध असेल तर जरूर द्यावी, माझे मत बदलून घेईन.

अनुप ढेरे गुरुवार, 11/24/2016 - 20:52
ही मुलाखत छान आहे. एस. गुरुमूर्थी हे संघ परिवाराशी निगडीत आहेत. (ट्रिविआ: गुरू सिनेमातला आर माधवन = एस. गुरुमुर्थी)

In reply to by अनुप ढेरे

पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 21:32
मुलाखत भारी आहे. गुरुमुर्ती विश्वासार्ह वाटतात. उजव्या वर्तुळातील अतिशय कमी विचारवंतातील एक आहेत. त्यांचं analysis पटनेबल आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधील भ्रष्टाचार बघुन आपण इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सोडली असे ते सांगतात म्हणजे त्या खात्यावर पण डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही..:-(

In reply to by अनुप ढेरे

पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 21:34
त्यांचं भाषण प्रत्यक्ष ऐकायला मिळालं होतं. अरुण फिरोदिया आणि त्यांची जुगलबंदी जब्री झालेली.

In reply to by पुंबा

२.५ लाखापेक्षा जास्त जमा केलेल्या रकमेच्या बाबतीत, जर खातेधारक त्या उत्पन्नाचा योग्य स्त्रोत दाकह्वू शकला नाही किंवा ते करापासून लपवलेले उत्पन्न आहे असे सिद्ध झाले तर, सद्य कायद्याप्रमाणे, त्यावर (कर + करावर २००% दंड) अशी कारवाई सरकार करू शकते. दुसर्‍याचे काळे पैसे आपल्या खात्यात स्विकारून नको ते बालंट ओढवून घेऊ नये यासाठी सरकार/आरबीआय फार पूर्वीपासून इशारे देत आहेच. आता अश्या बेकायदेशीर कृती करणार्‍या खातेदारांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेलच, पण त्यांच्यातर्फे करविभागाला खर्‍या काळाबाजार्‍यांपर्यंत पोहोचायला मदत होईल.

श्रीगुरुजी Sat, 11/26/2016 - 08:37
नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अन्नपदार्थांचे भाव कोसळले असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे, सर्वसामान्य कष्टकरी वर्गावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली, जीडीपी वर वाईट परीणाम होत आहे, रब्बी पिकांची पेरणी खोळंबली आहे .... अशा अनेक आक्षेपांना उत्तर देणारा इंडियन एक्सप्रेस मधील सुरजित भल्ला यांचा लेख - http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisations-short-term-cost-4395435/ अर्थात सुरजित भल्ला यांना भक्त, आंधळा समर्थक समजले गेले तर प्रश्नच मिटला.

डँबिस००७ Sat, 11/26/2016 - 11:31
बर्याच शहरात परिस्थीती आटोक्यात आलेली आहे. गुरुमिर्तीनी दिलेल्या सल्ल्या प्रमाणे सरकारी नोकरांना पगार कॅश मध्ये केला जात आहे. त्यामुळे कॅश मार्केटमध्ये इंजेक्ट होईल,

पिजा Sat, 11/26/2016 - 12:20
पुणे: मोस्टली कॅशलेस व्यवहार करत असल्यामुळे अजूनतरी फारसा त्रास नाही. घरासमोरच SBI ATM असल्यामुळे आणि कधी नाही ते त्यात वेळोवेळी पैसे लोड होत राहिल्यामुळे ऐकून ४ हजार काढल्येत. रांगेतला एकूण वेळ १ तास. लोकही शांतपणे रांगेत उभे होते. त्यामुळे लोकांचा सपोर्ट दिसतोच आहे. आता गावाकडची परिस्थिती(मराठवाड्यतातलं तालुक्याचं ठिकाण): तीन nationalized बँका. तीन ATM . दिवाळीच्या ४ दिवसात हे तीनही ATM बंद होते. आजूबाजूच्या दोन तालुक्याच्या ठिकाणची हीच परिस्थिती. ह्यावरून आताची कल्पना करता यावी. ८ तारखेनंतर मार्केट कमिटीत सोयाबीन/कापसाचे व्यवहार बंद. व्यापारर्यांकडे कॅश नाही(आठवड्याला काही हजाराची लिमिट, ती तर नुसत्या उचल देण्यातच जाईल) अन शेतकरी cheque घ्यायला तयार नाहीत. इतरत्र हजाराचे ८०० मात्र करून मिळत होते. बहुदा पुढच्या आठवड्यात नगरपालिकेचे election झाल्यावर सुरु होतील असा अंदाज. नगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत, त्याचा लेटेस्ट अपडेट : प्रत्येक वॉर्डात १५ लाखाचा खर्च, प्रभागात ५० (२ ते ३ हजाराचा रेट).तर ह्यांच्याकडे पैसे आले कुठून? ज्याला manage करायला जमलंय तो नव्या २ हजाराच्या वाटतोय, बाकीच्ये हजार, पाचशेच्या जुन्या वाटतायत. हे बघितल्यावर काळ्या पैश्याचं काही होईल असं वाटत नाही. पुढे बघूया काय होतंय, पुण्यात महापालिकेच्या अन आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेतच. ह्यावरून एकच दिसतंय, नितीश कुमारांनी म्हटल्याप्रमाणे मोदी वाघावर बसयेत, त्यांना आता आपल्याला ह्या कडीचं त्या कडीला नेल्याशिवाय गत्यंतर नाही.

जयंत कुलकर्णी Sat, 11/26/2016 - 20:46
हे खरे असेल तर मात्र प्रकरण गंभीर आहे.... खोटे असेल तर बरेच आहे.. खरे असेल तर किती जणांना माहीत होते ही विचार करण्यासारखी गोस्ट असेल. खोटे असेल तर बरेच आहे... http://currentnews.in/bjp-knew-demonetizing-deposited-huge-amounts-banks-cpm-sena-warns-modi-peoples-anger/ If Mr. Dubey knew this, question is how many more knew this... Though the Centre has claimed that the decision to demonetise Rs 500 and Rs 1,000 notes were known only to a handful of people, the story was broken by a Kanpur-based Hindi journalist almost a fortnight before the dramatic late evening announcement by the Prime Minister. Brajesh Dubey of the Hindi daily Dainik Jagran is gleefully accepting congratulatory telephone calls and envious looks from his peers for his story of October 27 that also confidently reported that Rs 2,000 notes would be issued as a replacement. Talking over the phone, Dubey, who is on the business beat for the Hindi daily, did not reveal his source for the story citing the “ethics of journalism”, but said it came from “informed and long-standing sources”. It was done routinely, he said and did not draw attention even from colleagues, forget readers, until the November 8 “surgical strike” on black money — an event that was so “top secret” that ministers were reportedly “quarantined” after the cabinet meeting where they were informed of the decision. Dubey is happy now that the story has not only been confirmed by subsequent developments but also that his byline has been noticed by the fraternity everywhere. “It is a normal yet a good feeling to have filed a story which subsequently was confirmed by the announcement of the Prime Minister,” he said. Sources in the newspaper, however, contended that Dubey got a whiff of the coming event on the sidelines of the board meeting of the Reserve Bank of India (RBI) — the first under new Governor Urjit Patel — which was held on October 20 in Kanpur. Opposition parties have been accusing the ruling Bharatiya Janata Party (BJP) of having leaked news of the impending demonetisation to those close to it.

In reply to by जयंत कुलकर्णी

संदीप डांगे Sat, 11/26/2016 - 23:53
2000 हजाराची नोट येणार हे खरंच बरेच दिवस आधीपासून माहित होते माध्यमात.. खरेतर आरबीआय ने याचे सूतोवाच खूप आधीच रघुराम राजन असताना केले होते,

श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 14:16
आता फक्त हेच सांगायचे शिल्लक होते. ______________________________________________________ नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात सध्या चलन कलह सुरु आहे. विरोधकांनी सभागृहात मोदी सरकारला धारेवर धरले असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडत सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचे वक्तव्य सिब्बल यांनी लखनऊमध्ये केले. मी दिल्लीच्या चांदनी चौक परिसरात राहतो आणि तेथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे, मी मुस्लिमांशी जोडला गेलो असल्याने मला याबाबत माहिती आहे असे सिब्बल म्हणाले. बहुतांश मुस्लिमांचे बँकेत खाते नसल्यामुळे सरकारच्या नोटाबंदीमुळे या समाजावर सर्वात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी लखनऊमध्ये अल्पसंख्यांकांच्या बैठकीला संबोधित करताना सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णय हा मुस्लिमांशी जोडल्याचे वृत्त ‘आजतक’ने दिले आहे. मुस्लीम समुदायातील छोटा किंवा मोठा व्यापारी व्याज मिळविण्याच्या हेतूने कमवत नसल्यामुळे तो बँकेत खाते उघडत नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांचा पैशाशी काहीही संबंध नसतो, असे सांगत या निर्णयामुळे दहशतवादाला आळा घालण्यास कोणतीही मदत होणार नाही, असेही सिब्बल म्हणाले. तसेच सरकारने घेतलेल्या नोटबंदीमुळे गरिबांनाही कोणताच फायदा होणार नाही त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सरकारने उचलले घातक पाऊल अाहे, असे ते म्हणाले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/muslims-are-facing-more-problem-due-to-demonetization-says-kapil-sibal-1348950/

पुढच्या पायर्‍या... मागच्या जनधन योजना, करचुकव्यांना माफीयोजना, इत्यादींनंतर आलेल्या डिमॉनेटायझेशन या पायरीनंतर तिच्यातून मिळणारे धागेदोरे पकडून अर्थगुन्हेगारांना कसे पकडले जाईल या पुढच्या पायर्‍यांचे संकेत येऊ लागले आहेत... १. करविभागाने २.५ लाखापेक्षा जास्त रोख रक्कम खात्यात जमा केलेल्यांना नोटीसा पाठवणे सुरू केले आहे. आजतागायत काही लाख नोटीसा लोकांपर्यंय पोचल्या आहेत. यात पांढरा पैसा असलेले लोक त्याचा पुरावा देवून मोकळे होतील. ज्यांच्याकडे तसा पुरावा नाही त्यांना (अ) कर+दंड भरावा लागेल आणि/किंवा (आ) दुसर्‍या करता आपले खाते मजूरीने दिले असल्यास त्या दुसर्‍या मोठ्या चोराचे नाव द्यावे लागेल... याने मोठे मासे आपोआप सबळ पुराव्यासह गळाला लागतील. २. बँकांत बसवलेल्या सीसीटीव्हीच्या रेकॉर्डची तपासणी, बँकेचे ट्रांझॅक्शन रेकॉर्ड व इतर प्रकारे मिळालेल्या माहितीवरून (आयकर इंटेलिजन्स) बँकेत केलेल्या "घोळदार व्यवहार" उघडकीसा आणले जावू लागले आहे. त्यातली ही एक बातमी... I-T cell finds Rs 40 crore deposit in banned notes at Delhi bank अश्या एका बँक मॅनेजरला पकडले की त्याच्याकडून बर्‍याच संखेने लहानमोठे "गंदे मासे" गळाला लागतील. ३. जुन्या नोटा घेऊन सोने विकणार्‍या सोनारांवर तर पहिल्यापासून डोळा आहेच ! अजून बरीच हुकुमाची पाने हळू हळू उघड होतील असे दिसते आहे. हा चोर पोलिसांचा खेळ काळाबाजरवाल्यांनी तो खूप काळापूर्वी सुरू केला आणि आता तो सरकारने आपल्या अटींवर संपवावा (पक्षी : तो नगण्य करण्याइतपत ताब्यात आणावा) ही अपेक्षा आहे.

डँबिस००७ Tue, 11/29/2016 - 00:23
डॉ म्हात्रे अचुक बोललात !! पंतप्रधानांनी ह्या सर्वांची सुरुवात केलेली आहे. नोटाबंदीची सुरुवात करताना गोपनियता राखणे महत्वाचे होतेच कारण आपल्या ईथे कुंपण शेत जास्त खाते. बँकेतले लोक, शासकीय खात्यातले लोक सरकारच्या नाका खालीच गैर प्रकार करतात, सरकारच्या ह्या बोल्ड मुव्ह मुळे सामान्य नागरीकांत एक जोश आलेला आहे, बर्याच ठिकाणी ५००/१००० च्या नोटाबद्दल गैरप्रकार सुरु आहेत अशी माहीती / टिप ही सामान्य जनतेनेच पुढे येऊन दिलेली आहे. आता सुद्धा जनतेने जागरुक राहुन अश्या संभावित प्रकाराची माहिती असल्यास सरकारच्या निदर्शनास आणावी.

संदीप डांगे Tue, 11/29/2016 - 01:00
29 तारखेपासून खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा पूर्णपणे शिथिल करण्यात आली आहे. आता पाहिजे तितकी रक्कम खातेधारक काढू शकतील. https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=10752&Mode=0

In reply to by संदीप डांगे

फक्त नवीन किंवा चालू नोटांमध्ये केलेले डिपॉजीट्स असतील तर काढण्यासाठी लिमिट नाही.

नोटाबंदी कारवाईचे अधिकाधिक परीणाम पुढे येत आहेत... १. Demonetisation leads to highest ever surrender of Maoists in a month नोटाबंदीनंतर आतापर्यंत ४६९ माओवादी किंवा त्यांचे पाठिराखांनी समर्पण केले आहे. यामागे त्यांच्या शस्तास्त्रे, दारूगोळा, औषधे आणि इतर सामुग्री मिळविण्यासाठी मिळणारा पैसा बंद झाला आहे हे महत्वाचे कारण आहे. त्याशिवाय, त्यांच्या स्थानिक भागांत होत असलेला विकासही या समर्पणामागे आहे. २. बँकात रु५०० व रु१००० च्या जुन्या नोटाम्च्या स्वरूपात जवळ जवळ रु८.५ लाख कोटी (नोटा खात्यात टाकणे : रु८,११,०३३ कोटी + नोटा बदल : रु३३,९४८ कोटी) जमा झाले आहेत व रु२,१६,६१७ कोटी नकद चेक किंवा एटीएमने काढली गेली आहे. म्हणजे, पूर्वीपेक्षा रु६ लाख कोटीपेक्षा जास्त पैसे बँकिंग व्यवस्थेत खेळू लागले आहेत. ३. यापुढे जुन्या नोटा फक्त आरबीआयच्या तडक देखरेखीखाली असलेल्या ठिकाणांवरच स्विकारत असलेल्याने त्या नोटा काळाबाजार्‍यांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरणे कठीण असल्याने, बँकांतून पैसे बाहेर काढण्यावरच्या सीमा उठवलेल्या आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

४. सशस्त्र सीमा बलाने झारखंडमधिल नक्षल अतिरेक्यांकडील, जुन्या नोटांच्या स्वरूपातले, रु३१ लाख पकडले.

In reply to by मोदक

फरक आहे... भारतीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत एकून पाच सशस्त्र पोलिस दले आहेत. त्यांना एकत्रितपणे "केंद्रिय सशस्त्र पोलीस बल उर्फ Central Armed Police Forces (CAPF)" असे म्हटले जाते. सीमा सुरक्षा बल उर्फ Border Security Force (BSF) : हे दल मुख्यतः शांतता काळात (युद्ध जाहीर केलेले नसताना) भारताच्या सीमेची व 'लाईन ऑफ कंट्रोल'चे रक्षण व तेथिल अवैध आंतरराष्ट्रीय माल वाहतूक (तस्करी) थांबवणे, ही कामे करते. हे बल भारताच्या सीमेवरची "फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स" आहे आणि जगातले सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल आहे. सशस्त्र सीमा बल उर्फ Sashastra Seema Bal (SSB) : हे दल भारत-नेपाळ सीमेचे रक्षण आणि तेथिल अवैध माल वाहतूक (तस्करी) थांबवणे, ही कामे करते. केंद्रिय राखीव पोलिस दल उर्फ Central Reserve Police Force (CRPF) : या दलाचे मुख्य काम देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यास केंद्र व राज्यसरकारांना मदत करणे हे आहे. याच्यात The Rapid Action Force (RAF) व Commando Battalion for Resolute Action (COBRA) हे विभागही सामील आहेत. केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल उर्फ Central Industrial Security Force (CISF) : हे दल भारतीय औद्योगीक व व्यापारी महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचे काम करते. हे दल विमानतळांच्या सुरक्षेचे काम करताना बहुतेकांनी पाहिले असेलच. जरूर पडल्यास, हे दल आपत्तीकालातील मदतीसाठी (डिझास्टर मॅनेजमेंट) आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाची मदत करण्यास पाचारण केले जाते. भारत-तिब्बत सीमा पुलिस बल उर्फ Indo-Tibetan Border Police (ITBP) : १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर, भारत-चीन (मुख्यतः चीनचा तिबेट प्रांत) सीमेचे रक्षण करण्यासाठी हे दल उभारले गेले. या दलाला नैसर्गिक आपत्तीकालात काम करण्याचे व त्यातल्या काही तुकड्यांना न्युक्लिअर, बायॉलॉजिकल व केमिकल आपत्तीकालात काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

निनाद गुरुवार, 12/01/2016 - 02:52
महत्त्वाची माहिती आहे. कृपया मराठी विकि मध्ये डकवण्यास परवानगी देता येईल का? किंवा तुम्हीच लावली तर अतिशय उत्तम! हा दुवा आहे. https://mr.wikipedia.org/wiki/पोलीस

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/01/2016 - 20:48
मात्र ते काम करताना "राज्य पोलिस दल (जे राज्य गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असते)" आणि "केंद्रिय पोलिस दले (जी केंद्रिय राज्यमंत्रालयाच्या अखत्यारीत असतात)" यांच्यातला फरक स्पष्ट होईल असे पहा. म्हणजे वाचकांच्या मनात या दोन स्वतंत्र व्यवस्थांबद्दल गोंधळ होणार नाही.

चौकटराजा Wed, 11/30/2016 - 14:32
मी आज अशा मेडिकल शॉपच्या शोधात गेलो जिथे स्वाईप आहे. दोघा तिघा कडे नव्हते. त्याना सांगितले बघा आपल्याकडे सोय नसल्याने दुसरीकडे जातोय. कार्डावर औषधे मिळाली.