मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रांजण खळगी

अभिजीत अवलिया · · भटकंती
पुण्यापासून अंदाजे 80 किमी वर आहे अहमदनगर जिल्हयातील टाकळी हाजी व निघोज हे गाव. आणी ह्या दोन गावांच्या दरम्यान आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक रित्या तयार झालेली खळगी (रांजण खळगी) ज्याची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहेत. बरीच वर्ष जाऊ जाऊ करत होतो पण इथे जाणे काही होत न्हवते. शेवटी मे महिन्यात अचानक एके दिवशी गेलो बघायला. शेकडो वर्षे कुकडी नदीच्या पाण्यातून येणारे दगड गोटे ह्या नदीपात्रातील बसाल्ट खडकावरून 'वर्तुळाकार पद्धतीने' फिरल्याने ही सर्व खळगी तयार झाली असावीत असा भूगर्भ शास्त्रन्यांचा कयास आहे. ही क्रिया सतत चालूच असल्याने खळग्यान्चा आकार वाढतच चालला आहे. गावकऱयांच्या मते काही खळगी 100 फूट देखील खोल आहेत. सर्व खळग्यान्चा आतील भाग तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतका गुळगुळीत आहे. खाली काही फोटो.            खळग्यामुळे तयार झालेले दरवाजे.   ही खळगी इतकी विस्मयकारक आहेत की त्या जागी उभे असताना आपण दुसऱ्याच कुठल्या तरी ग्रहावर आलो असू असेच वाटते. पाहण्याची योग्य वेळ - 1) दोन वेळा जावे. एकदा रिमझिम पाऊस असताना आणी नंतर फेब्रुवारीच्या दरम्याने. हलक्या पावसात ह्या खळग्यातून वाहणारे पाणी खूप सुंदर दिसत असेल. तर पावसाळा संपल्यावर काही दिवसांनी एकदम खोलवरची खळगी देखील नीट दिसतील. पावसाळयात विशेष काळजी घ्यावी. कारण कुठले खळगे किती खोल असेल ह्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. आम्ही मे महिन्यात गेलो होतो तेव्हा बरीच खळगी घाणीने भरली होती. लोकांनी जुने कपडे, थर्मोकोलच्या प्लेट्स, घरातील नको असलेल्या देवांच्या मूर्ती फेकून ही जागा बरीच खराब करून ठेवली होती. ह्या वर्षी झालेल्या दमदार पावसाने ही सगळी घाण वाहून गेली असेल त्यामुळे खळग्यान्चा आस्वाद खूप चांगल्या रीतीने घेता येऊ शकेल. ह्या ठिकाणा पासून पुढे 25 की.मी वर वडगाव दर्या गाव आहे जिथे लवणस्तंभ आहेत असे एकदा कट्ट्याच्या वेळी शांतीप्रिय बोलले होते. पण वेळे अभावी तिथे जाऊ शकलो नाही. परतीच्या प्रवासात वढू येथील संभाजी महारांजाची समाधी देखील पाहू शकता.

वाचने 8873 वाचनखूण प्रतिक्रिया 18

प्रचेतस Sun, 07/17/2016 - 07:33
खूप छान. इतकं जवळ असूनही निघोजची रांजणकुंडं अजून पाहिली नाहित. ह्या भागात बरीच नैसर्गिक आश्चर्य आहेत. गुळूंचवाडीचा शिलासेतू जो एका दरीत मळगंगा नदीवर आहे, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ही दोन्ही पाहिली.

दुर्गविहारी Sun, 07/17/2016 - 17:16
अतिशय उत्तम प्रकाशचित्रे आहेत. निघोजचे रान्जणखळगे, वडगाव दर्याचे लवणस्तम्भ, अणे घाटातला शिलासेतु एकाच दिवशी पाहीले. निघोज मध्ये पायरयाची विहिर म्हणजे बारवही पाहण्यासारखी आहे.

संत घोडेकर Sun, 07/17/2016 - 17:38
दोन वर्षांपूर्वी खळगे पाहण्याचा योग आला. हे एक सुंदर निसर्गनिर्मित आश्चर्य आहे पण आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.

अभिजीत अवलिया Sun, 07/17/2016 - 18:36
@कंजूस काका, खळगी पाण्याने वाजतात का अशी तुमची शंका असेल तर मला नक्की माहीत नाही कारण मी पावसाळ्यात गेलेलो नाही. पण तसे होत असण्याची शक्यता आहे. @संत घोडेकर, ह्या घाणीचे सोडा, कितीतरी प्रेमवीरांनी ह्या खळग्याच्या आतील बाजूस ऑईल पेंट ने आपले प्रेम कोरलेले आहे. ते तर बहुतेक काही केले तरी जाणार नाही. भारताची साक्षरता वाढत चालली आहे. पण साक्षर जनता सुक्षिशित असेलच असे नाही. त्यामुळे कितीही ओरड केली तरी अशा ठिकाणी घाण असणारच. @प्रचेतस अणे दुर्गविहारी, तुम्ही सांगितलेले ठिकाणे आता लवकरच पहिली जातील.

In reply to by किसन शिंदे

अभिजीत अवलिया Mon, 07/18/2016 - 19:10
जर ह्या जागेचे कुणी संशोधन केले असेल तर नक्की किती खोलीची खळगी असू शकतील हे समजेल. बाकी फोटोंच्या बाबतीत, मी रंगीत फोटो पण काढले होते. पण ह्या जागेचे कृष्णधवल फोटोच मला जास्त चांगले वाटले. म्हणून रंगीत न टाकता कृष्णधवल टाकले.

चांदणे संदीप Mon, 07/18/2016 - 13:23
निघोज, वडगावदर्या इथेच मी कॉलेजात असताना सर्व्हे केला होता! सेंब टू सेंब फोटो कोडॅक केबी १० ने काढून प्रकल्प अहवालात चिकटवले होते :) जुन्या आठवणी जाग्या झाल्या! :) Sandy

खरं म्हणजे महाराष्ट्रात, असे काही असेल असे माहीत सुद्धा नव्हते. त्यातही ग्रिनिज वर्ल्ड बुकात नोंद , त्यामुळे आता उत्सुकता वाढली असल्याने, तेथे भेट देण्यासाठी नक्की जाणार . माहिती दिल्याबद्दल आभार.

In reply to by जयन्त बा शिम्पि

किसन शिंदे Mon, 07/18/2016 - 23:38
खूप जास्त अपेक्षा ठेवून जाल तर अपेक्षाभंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत.
आम्ही मे महिन्यात गेलो होतो तेव्हा बरीच खळगी घाणीने भरली होती. लोकांनी जुने कपडे, थर्मोकोलच्या प्लेट्स, घरातील नको असलेल्या देवांच्या मूर्ती फेकून ही जागा बरीच खराब करून ठेवली होती.
मी ही मे मध्येच गेलो होतो आतेबहिणीच्या लग्नासाठी, दुपारी थोडा निवांत वेळ मिळाला म्हणून कुंडावर भटकायला गेलेलो, तेव्हा तेथे एका खळग्यात काॅन्डोमचे पाकीट पडलेले पाह्यले. :( एवढं चांगलं नैसर्गिक देणं आहे पण त्याची पार रया गेल्यासारखी वाटते.

In reply to by किसन शिंदे

नाखु Wed, 07/20/2016 - 09:19
सदरहू गाव राज्यसरकारच्या हा.मुक्त.गाव योजनेत (स्वेच्छेने) नसल्याने फार जवळून खळगे पाहायला जाऊ नये, झुलत्या पुलावरून दिसतात तितकेच पहावेत आणि बाजूचे (बाहेरून भडक रंगानी रंगवलेले ) मंदीर पहावे आणि मुकाट जवळच्या मोराच्या चिंचोलीला मोर पाहण्यास जावे. अनुभवाने शहाणा नाखु

रुपी Wed, 07/20/2016 - 23:33
ही रांजणखळगी आणि वडगाव दर्याचे लवणस्तंभ दोन्ही पाहिले आहेत. अनमोल नैसर्गिक देणी असूनही आपल्याकडे त्याची किंमत फारशी नसतेच. घाणीबद्दल तर वर लिहिले आहेच. मी भेट दिली तेव्हा फार काही जाणवले नव्हते. पण भारताबाहेर बाकी ठिकाणी भेटी दिल्यावर आपल्याकडच्या अशा स्थळांची दुर्दशा बघून वाईट वाटते. ना कुठे माहितीचा फलक असतो, ना जवळपास प्रसाधनगृहे, ना दुसर्‍या काही सोयी. पाश्चात्य देशात कुठे एक झाड उगवलेले असले तर त्यालाही "लोन ट्री पोईंट" सारखे नाव देऊन, एखादे व्हिजिटर सेंटर, पार्कींगची सोय, सोव्हिनीअर शॉप, शिवाय बाकी सुविधा पुरवण्यामागे कल असतो. बर्‍याच ठिकाणी तर अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी करतात. अर्थात खरेदी, खाणेपिणे नाही केले तर आपल्याला प्रवेशशुल्क भरण्यापुरताच खर्चही करता येतो. पण भारतातही थोड्या प्रमाणात तरी असे काही करायला हवे. त्यातून मिळालेल्या रकमेतून ह्या स्थळांची डागडुजी, साफसफाई या गोष्टींचा खर्चही काही प्रमाणात तरी निघेल, शिवाय पर्यटनही वाढेल.