मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेक्स्ट इज व्हॉट ???

गवि · · काथ्याकूट
लहानपणी बाबांना दोन रुपये लिटरने फटफटीच्या टाकीत पेट्रोल भरताना बघितलं. आता सत्तरी गाठली (मी नव्हे, पेट्रोलने.. !!) फोन सगळ्या गावात एकादोघांच्या घरी होते. काळे जड ठोकळ्यासारखे. कटर्र कटर्र आवाज करत डायल करण्याचे. पेजर येऊन "वा.. काय टेक्नॉलॉजी आहे.." म्हणण्याच्या आत जुने झाले. आता मोबाईल सगळ्यांकडे आहे.. वरुन थ्री जी आलं.. टॅब तीनहजारात येऊ घातलाय.. फार पूर्वी पंजाबात अतिरेकी होते. मग काश्मिरात, आता मध्यपूर्वेत.. आणि जगभरात.. फास आवळतो आहे असं फीलिंग सगळीकडे आहे. आर्थिक बाबतीत आता युरोपमधे जबरदस्त क्रायसिस आहे.. आपण यातले अडाणी.. पण ऐकून ऐकून इंटरेस्ट येतोच. कंझ्युम करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी वाढती लोकसंख्या नाही असं काही म्हणतात.. काही म्हणतात की वेल्फेअर पद्धतीने (कमावणार्‍यांनी रिटायरांचा भार उचलायचा) चाललेली त्यांची व्यवस्था आहे. त्यात कमावणारी लोकसंख्या आणि रिटायर्ड लोकसंख्या यांचं प्रमाण उलटं होत चालल्याने समस्या उभी राहात आहे. त्यांना कदाचित लोकसंख्या वाढवायला लागेल. किंवा बाहेरच्या देशांतून नागरिक आणावे लागतील. काहीजण म्हणतात की भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू.. उडणारी कार ही बालकथांमधे किंवा फँटसी पिक्चरमधे असायची. आता अनेक कोटींची का होईना पण शक्य कोटीतली अशी कार बनली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर आली तरी त्यात चॅलेंजेस खूप आहेत, ट्रॅफिक आणि कायद्याचे. पण तरीही ती आता अशक्य गोष्ट राहिली नाही. मरण हे एजिंग प्रोसेसमुळे येतं.. या प्रोसेसवर इतकं संशोधन झालं की आता वय वाढण्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवणं शक्य होऊ घातलंय. अर्थात मनुष्य अमर होणं हेही आता प्युअर फँटसी म्हणून मानता येणार नाही. या प्रकारे नैसर्गिक मरण टाळता आलं तरी अपघात, इजा, हत्या यांनी येणारं मरण टाळता येणार नाही. पण नैसर्गिक मरण टाळता येणं हेही नसे थोडके. सुरुवातीला हे अमरत्व महागडं असेल पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर सगळ्या नवीन शोधांच्या किंमती इव्हेंच्युअली स्वस्त होत जाऊन सर्वांना परवडण्याजोग्या होतातच. असं झालं तर मग जिवंत राहण्याविषयीच्याच शेकडो समस्या येतील. नवीन जन्म बंद करावे लागतील. स्पेसमधे प्रवास करणं हे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यांना शक्य झालं होतं. आता स्पेस टुरिझम फार दूर नाही. सध्या महाग आहे पण वीसतीस वर्षांत तेही केसरी टूरतर्फे जावं इतकं सहज होईल. एड्सवर औषध अजून नाही. प्रसार झपाट्याने होतोय. तापमान वाढतंय, बर्फ वितळ्तंय. इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय? ते वाढतंय.. झिंबाब्वेसारख्या देशांत किमान लाखालाखांच्या नोटा छापाव्या लागताहेत. महागाई किती वाढेल? मुंबईत तीन वर्षांपूर्वी दहा लाखात मिळणारा फ्लॅट आज चाळीस लाखाचा झालाय आणि मुंबईच्या थोडं बाहेर दहा वर्षांपूर्वी चाळीस लाखात मिळणारा जमिनीचा प्लॉट वीस कोटीचा झालाय. किंमती अनंतापर्यंत वाढत जातील? घराची किंमत तीनशे कोटी आणि पगार एक कोटी अशी स्थिती खरंच येईल? आणखी काय काय होईल जगात? ...................................... हे सर्व वेडंवाकडं मिश्रण वर छापण्याचं कारण हे, की मला येणार्‍या शंभरेक वर्षांबाबत तुमच्या कल्पना जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या मते: कोणते शोध प्रत्यक्षात येतील? तंत्र किती पुढे जाऊ शकेल? की त्याला लोक विटतील? कोणत्या इव्हेंट्स / घटनांमुळे जगात जबरदस्त बदल होतील? आपली / आपल्या पुढच्या पिढीची लाईफस्टाईल कशी असेल? आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? माणसं सहज शंभरी गाठतील का? आणखीही अनंत मतं आणि विचार (आपापल्या वर्किंग फिल्डशी संबंधित किंवा जनरलही) आपल्या मनात येत असतील, किंवा आता येतील.. ते इथे मांडून आपली काही फोरसाईट दिलीत तर खूप आनंद होईल. आजच्या दिवसात जगावं, उद्याचा विचार करु नये अशी एक फिलॉसॉफी आहे, तिचा आदर करुन इथेच त्याची पोच देतो. कारण अशा स्वरुपाच्या प्रतिसादाने विचार पुढे जाणार नाही, म्हणून केवळ ते न म्हणण्याची विनंती करतो. मी स्वतःपासून सुरुवात करतो: काय होऊ शकेल याच्या कल्पना: -बँका फक्त मीडिएटर राहतील आणि कर्ज देऊ इच्छिणारा ग्राहक कर्ज घेऊ इच्छिणार्‍याला बँक या एजंटमार्फत थेट कर्ज देईल. -लग्न ही संकल्पना कालबाह्य -भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले. -अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता -कॅन्सरवर मूलगामी उपाय -मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य. ................. ............. नेक्स्ट इज व्हॉट??

वाचने 35634 वाचनखूण प्रतिक्रिया 87

१. सूर्यमालेतील सर्व ग्रह फुल्ल होतील , आंतर-आकाशगंगा प्रवास प्रचंड प्रमाणात वाढेल (आणि महाग पण होईल) २. आणखीन जास्त श्रीमंत लोकांना वस्तुमानपासून - प्रकाश - ते परत मूळ रूपात असा प्रकाशयाच्य वेगानी प्रवास करता येईल ३. क्लोनिन्ग आणि जीन्स बदल करून सुपर-ह्युमन अस्तिवात येईल ४. बायकाना मूल घालण्यपसून ते मासिक धर्म ह्या पासून सुट्टी. ५. सर्वांना सोप्या उपकरणाने उडता येईल कुठलीही वाहने वापरण्याची गरज पडणार नाही ६. स्वयंपाक कालबाह्य सगळ काही कप्सुल किवा इंजेक्षन किवा जन्मचच वेळी आयुष्य भरासाठी डोस पाजन्यात येईल , काहीही खाण हे फक्त व्हरचुअल असेल ७ कमीत कमी दोन तरी जीवन सृष्टी चा शोध लागेल , कदाचित त्याच्या बरोबर युध्य तह वैगरे होऊ शकतील तूर्ताच थांबतो :)

मराठी_माणूस Tue, 10/18/2011 - 14:49
मरण हे एजिंग प्रोसेसमुळे येतं.. या प्रोसेसवर इतकं संशोधन झालं की आता वय वाढण्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवणं शक्य होऊ घातलंय. अमर्यादित लांबवणं याबद्दल साशंक आहे

In reply to by मराठी_माणूस

ज्ञानव Fri, 01/10/2014 - 09:38
बायो प्रिंटींगने ते ही शक्य आहे. आज फुफुस प्रिंट करून शरीरात फिट करण्याबाबत संशोधन चालू आहे.

मृत्युन्जय Tue, 10/18/2011 - 14:52
श्री श्री गविशंकर काय म्हणजे काय सुसंगती नाय लागली हो. किती चिंता कराल? अवांतर: मला वाटले होते, पहिल्यांदा अवलियांनी (जालीय) आत्महत्या केली मग पंगाशेठ निवर्तले मग काही आयडी हद्दपार झाले आता काळेकाकांनी स्वत:ला स्थानबद्ध करुन घेतले आहे म्हणुन नेक्स्ट व्हॉट असा धागा टाकला की काय ;)

विजुभाऊ Tue, 10/18/2011 - 14:55
इतर ग्रहांवर वसती वगैरे होणार नाही. साक्षरते मुळे जन्म दर कमी होईल. बहुधा शंभर वर्षांनन्तर जनन दर शून्यवत असेल. मानवाला हीच चिंता असेल.

चिरोटा Tue, 10/18/2011 - 15:05
१) पृथ्वीपासून मंगळ,बुध,शुक्र पर्यंत मुंबई-पुणे सारखे एक्स्प्रेस वे. २) सकाळचे काम पृथ्वीवर, दुपारी आणी कुठ्ल्या ग्रहावर.. ३) माणसाचे ईतर प्राण्यांमध्ये मध्ये रुपांतर्, परत बॅक टू माणूस. सध्या ईथेच थांबतो आणि ईतरांना चान्स देतो.

मदनबाण Tue, 10/18/2011 - 15:14
कोणते शोध प्रत्यक्षात येतील? डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील आणि निरनिराळ्या प्रकारचे डिस्प्ले पहायला मिळतील.( उदा. येउ घातलेले फ्लेक्सीबल डिस्प्ले.) तंत्र किती पुढे जाऊ शकेल? तंत्र बरेच पुढे जाईल ! ( तसेही गारगोटी घासणारा मानव सॅटॅलाईट आकाशात सोडण्याच्या कुशलते पर्यंत पोहचला आहेच म्हणा ! ) वेगवेगळे डिव्हाईस शरीरात बसवुन घ्यायची बहुधा फॅशनच येईल. ;) की त्याला लोक विटतील? ह्म्म... अती तिथे माती ! लोक टेक्नॉलॉजिच्या अती वापराने कंटाळवाणे जीवन जगतील ! आणि शांतता काय आणि कशी मिळवायची याचा अभ्यास / प्रयत्न / जमल्यास पीएचडी सुद्धा याच विषयात करतील. ;) लांब कुठे माणसांची गर्दी नसेल अशा डोंगर टेकड्यांवर राहण्याचा प्रयत्न लोक करतील. कोणत्या इव्हेंट्स / घटनांमुळे जगात जबरदस्त बदल होतील? वातावरण / पर्यावरण तसेच होणारी संभावित युद्ध यांनी जगात जबरस्त बदल होतील. आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? कठीण काळ असेल... ज्याच्याकडे पैसा आणि सत्ता असेल तोच श्रेष्ठ ठरेल. माणसं सहज शंभरी गाठतील का? कलियुगाचा विचार करता,त्याचे वर्णन वाचल्यावर ३०शी गाठणे सुद्धा मोठी गोष्ट ठरेल असे वाटते.

In reply to by मदनबाण

गवि Tue, 10/18/2011 - 15:50
लांब कुठे माणसांची गर्दी नसेल अशा डोंगर टेकड्यांवर राहण्याचा प्रयत्न लोक करतील. जमीन व्यक्तिगत मालमत्ता म्हणून विकत घेता येणं बंद होईल असं वाटतं का? (लँड सीलिंग अ‍ॅक्टप्रमाणे होल्डिंग लिमिट कमी होत होत शेवटी जमीन सरकारचीच. फक्त वर लीजने घरे बांधता येतील असं काही?)

In reply to by गवि

मदनबाण Tue, 10/18/2011 - 17:14
जमीन व्यक्तिगत मालमत्ता म्हणून विकत घेता येणं बंद होईल असं वाटतं का? (लँड सीलिंग अ‍ॅक्टप्रमाणे होल्डिंग लिमिट कमी होत होत शेवटी जमीन सरकारचीच. फक्त वर लीजने घरे बांधता येतील असं काही?) नाही.लोकांना जिथे माणसांची गर्दी कमी आहे तिथे जायला /रहायला आवडेल (निसर्ग राहिला तर निसर्गाच्या सानिद्यात) असं दर्शवायच आहे मला. थोडक्यात टेक सॅव्हीपणाचा कंटाळा माणसाला येईल आणि अतीशय साधे,"शांत" जिवन जगावे असे त्याला वाटु लागेल. उदा. अती क्रिकेट झाल्यामुळे आता क्रिकेट पहावेसे वाटत नाही,ही भावना मनात का येते ? तसेच काहीसे अती यांत्रिकपणा आयुष्यात आल्याने भविष्यातल्या मानवाला साधेपणे जगावेसे वाटेल, वेगळ्या जागी जिथे इतर माणसांची गर्दी नसेल / कमी असेल असे ठिकाण ते राहण्यासाठी शोधतील.

In reply to by मदनबाण

मदनबाण Wed, 03/13/2013 - 16:25
डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील आणि निरनिराळ्या प्रकारचे डिस्प्ले पहायला मिळतील.( उदा. येउ घातलेले फ्लेक्सीबल डिस्प्ले.) २ वर्षा पूर्वी ज्या फ्लेक्सिबल डिस्ल्पे बद्धल मी बोललो होतो,त्याचे या वर्षी CES 2013 मधे दर्शन घडले. :) सॅमसंग कंपनीने हा डिस्प्ले तयार केला आहे.:) Samsung Youm Flexible Display Prototypes तसेच अ‍ॅन्ड्रोइडला स्पर्धा निर्माण झाली आहे ! :) ती सुद्धा फायरफॉक्समुळे ! कारण आता नविन ओएस लॉन्च झाली आहे. Firefox OS (project name: Boot to Gecko also known as B2G) तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस Tizen लवकरच बाजारात आणेल अशी शक्यता वाटते.

In reply to by मदनबाण

मदनबाण Fri, 01/10/2014 - 09:17
तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस Tizen लवकरच बाजारात आणेल अशी शक्यता वाटते. ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा चालु होती ते लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. अँड्रॉईड, आयओएसला आता टक्कर देणार जपानी ‘टायझेन’!

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 06/03/2014 - 19:44
ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा चालु होती ते लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. शेवटी सॅमसंग ने त्यांचा Samsung Z हा Tizen { Tizen 2.2.1 } ओएस असलेला फोन लाँच केला. Samsung Tizen Samsung Launches First Tizen Phone And It Is A Beast

In reply to by मदनबाण

मदनबाण Sun, 06/15/2014 - 16:44
तसेच अ‍ॅन्ड्रोइडला स्पर्धा निर्माण झाली आहे ! Smile ती सुद्धा फायरफॉक्समुळे ! कारण आता नविन ओएस लॉन्च झाली आहे. Mozilla to sell '$25' Firefox OS smartphones in India

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरे Dil Ka तुमसे Hai केहना... ;) { Armaan }

In reply to by मदनबाण

मदनबाण Wed, 05/27/2015 - 11:39

In reply to by मदनबाण

मदनबाण गुरुवार, 06/05/2014 - 09:06
वातावरण / पर्यावरण तसेच होणारी संभावित युद्ध यांनी जगात जबरस्त बदल होतील. चला प्राणवायु विकत घेउया... संदर्भ :- भारतातही जगण्यासाठी विकत घ्यावा लागेल प्राणवायू

In reply to by मदनबाण

मदनबाण गुरुवार, 06/05/2014 - 09:28
वेगवेगळे डिव्हाईस शरीरात बसवुन घ्यायची बहुधा फॅशनच येईल. तुमच्या शरिरात कोणती डिजिटल चीप बसवुन हवी आहे ? संदर्भ :- Why I want a microchip implant Would you implant an NFC chip into your hand? Would you have tattoo IMPLANTED under your skin? Artist has chip placed inside his hand that reveals artwork when read by a smartphone

गवि Tue, 10/18/2011 - 15:44
साधारण पुढे काय होईल म्हटल्यावर जास्त करुन विज्ञानाचा / तांत्रिक भरार्‍यांचा विचार केला जातो. (परग्रह वगैरे) त्याखेरीज इतर फिल्ड्सविषयीही ऐकायला आवडेल. किंवा इतर क्षेत्रातल्या (आर्थिक, कला वगैरे) घडामोडींच्या सोबतीने विज्ञानही असेल असं एकूण दिसतंय. म्हणजे चित्रकार ब्रश ऐवजी काही इलेक्ट्रॉनिक वापरतील किंवा ब्रशने चित्र काढणंच ऑब्सोलीट होईल. बँका व्याज देऊ शकतील का? पैशाचं महत्व काय आणि कशा प्रकारचं होत जाईल? पैशाची किंमत? खूप गोष्टी बदलू शकतात.. फक्त फँटसी अशाच अर्थाने विचारत नाही..

पिलीयन रायडर Tue, 10/18/2011 - 15:52
..तरी माणुस चिकाटीनं जगायच सोड्णार नाही... काही तरी नविन शोधुन काढेलच.... बाकीचे प्राणी नामषेश झाले आपल्यामुळे तरी आपण जगत राहणार... ..सगळं काही बदलेल्..पण "जगण्याची इच्छा" सुटणार नाही...

In reply to by पिलीयन रायडर

ज्ञानव Fri, 01/10/2014 - 09:43
मानसिक वैचारिक बदल आता तरी होतील का? निंदा, नालस्ती, टवाळी , चिमटे, गुद्दे , सूड, खून, बलात्कार ,पाशवीपणा हे जे प्रगतीचे बाय प्रोडक्ट्स आहेत ते बदलतील का? बाकी "ये जिना भी कोई जिना है लल्लू"

गणपा Tue, 10/18/2011 - 16:14
बाकी काय शोध लागो न लागो पण ते 'स्टार ट्रेक' मधल माणुस क्षणात अंतर्धान पावुन, इच्छीत स्थळी ट्रांसफर करणार्‍या ट्रान्स्पोर्टर यंत्राचा शोध कधी लागणार याची फार आतुरतेने वाट पहातोय. :) मी पहिला मोबाईल याच मालिकत पाहिला होता. :) चित्र आंजा वरुन साभार.

In reply to by आनंदी गोपाळ

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 13:56
हे फार दूर आहे असं नाही वाटत. थ्रीडी प्रींटिंग सध्या कायच्या काय गोष्टी करून दाखवत आहे.

In reply to by आत्मशून्य

५० फक्त Tue, 10/18/2011 - 17:17
५१ पैकी कोणत्या, म्हंजे तुम्हाला काय इंटर्नल न्युज वैग्रे. अतिअवांतर - आज संध्याका़ळी तुझ्या ग्रहाजवळ जेवायला यायला जमेल का रे ?

In reply to by ५० फक्त

आत्मशून्य Tue, 10/18/2011 - 18:23
५१ पैकी कोणत्या, म्हंजे तुम्हाला काय इंटर्नल न्युज वैग्रे.
असचं टाइमपास करतोय राव कसली न्युज, अंदाज, भाकित वैग्रे घेऊन बसलात राव. बाकी प्लॅनेटजवळ अवश्य भेट घेतल्या जाइल. (नॉस्ट्रेडॅम्स) - आत्मशून्य.

छोटा डॉन Tue, 10/18/2011 - 17:19
आम्हाला १०० वर्षे पुढे पाहवत नाही, आमची झेप पुढच्या ५० ( किंवा फार्फार तर २५ ) वर्षापर्यंतच. १. निम्मा भारत ( किंवा जमल्यास निम्मे जग ) पवार फ्यामिलीच्या नावावर असेल ( हे नेटवरुन साभार, आमची फक्त सहमती ) २. भारतात 'लोकपाल' नावाची संस्था अस्तित्वात येईल व लोक त्याच्याविरुद्ध उपोषणाला बसतील. ३. 'संसदेचे अधिवेशन' वगैरे गोष्टींपेक्षा जंतरमंतर, आझाद मैदान, क्रांती मैदान वगैरेवरच्या आंदोलनाला जास्त महत्व येईल. ४. फेसबुकवर 'लाईक' वगैरे करुन भारताचा पंतप्रधान वगैरे ठरवणे अशा गोष्टी शक्य होतील. ५. रिलायन्स बाकी सर्व उद्योगधंदे गुंडाळुन प्रामुख्याने 'मेणबत्त्या उत्पादना' क्षेत्रात जायंट म्हणुन नावाजली जाईल. ६. प्रसारमाधम्यांच्या चर्चा, फेसबुक वरच्या कमेंट्स आदींवरुन एखाद्याने पदावर रहावे अथवा राहु नये ह्याचे निर्णय घेतले जातील. ७. 'राळेगणसिद्धी' हे नवे सत्ताकेंद्र उदयास येईल, इकडुनच सर्व 'रिमोट डेस्कटॉप कनेक्शन्'ने काम करता येईल. ८. 'नागरी समिती'चे प्रमुख म्हणुन श्री. राहुल गांधी भारताच्या पंतप्रधान पदाची कितव्यांदातरी शपथ घेतील. भाजपा, काँग्रेस आदी सर्व पक्ष ह्या नागरी कमेट्यात विलीन होतील. ९. भारत घाना / त्रिनिदाद टोबॅगो / कंबोडिया / सोमालिया असल्या तत्सम देशांना हरवुन 'क्रिकेट विश्वचषक' कितव्यांदातरी जिंकेल. १०. प्रचंड भ्रष्टाचारामुळे आणि त्यातच सर्व पैसा संपल्याने 'दिल्ली ऑल्मिपिक्स' रद्द केले जातील. बाकी इतर सवडीने नंतर ... - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

फिरंगी Fri, 03/15/2013 - 19:52
फेसबुकवर 'लाईक' वगैरे करुन भारताचा पंतप्रधान वगैरे ठरवणे अशा गोष्टी शक्य होतील. रिलायन्स बाकी सर्व उद्योगधंदे गुंडाळुन प्रामुख्याने 'मेणबत्त्या उत्पादना' क्षेत्रात जायंट म्हणुन नावाजली जाईल.
हे उत्तम्...............

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ Fri, 01/19/2024 - 11:06
छोटा डॉन्शास्त्रेनी २०११ मधे वर्तवलेल्या भविष्यातील यातले काहीही घडले नाहिय्ये हे पाहून अत्यानंद झालेला आहे

मराठे Tue, 10/18/2011 - 18:37
माझा अत्यंत आवडता असा हा टाईमपास आहे. तूर्त फँटसीज बाजूला ठेउन व्यावहारिक दृष्ट्या विचार करू: - लोकांचं आयुर्मान वाढतंच आहे. त्यामुळे सरासरी आयुर्मान ८० ते ९० होईल. - त्यामुळेच जी स्थिती आत्ता युरोप, जपान मधे आहे तिचं स्वरूप जागतीक आणि अधिक गंभीर असेल. - ह्याचा परिणाम म्हणून 'रिटायरमेंट' चं वय ५५, ६० न राहता ७० पर्यंत वाढलेलं असेल. - दुसरीकडे जननप्रमाण झपाट्याने खाली येइल. मुख्य कारण म्हणजे - घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं असेल - मुलं जन्माला घालणं हा एक 'व्यावहारीक' निर्णय असेल कारण मुलांच्या सांगोपनाचा खर्च अफाट वाढलेला असेल. - ह्याचा एक चांगला परिणाम म्हणजे अधिक चांसुसंस्कृत पिढी जन्माला येइल (हा माझा आशावाद) व जगातील ज्वलंत समस्यांवर चर्चा करून त्या सोडवल्या जातील. - पेट्रोल डिझेल यांचे भाव आकाशाला भिडतील पण त्याच बरोबर इतर उर्जा साधनांना प्राधान्य दिलं जाईल. शतकाच्या अखेरीस आपण पेट्रोल्/डिझेल वर अवलंबून राहणार नाही. - तंत्रद्यानामधे चिक्कार बदल घडतील. आपण प्रत्येक क्षणी जगाच्या संपर्कात असू आणि त्यासाठी कुठला फोन / टॅब वगैरे घेउन फिरण्याचीही गरज नाही. (तुम्ही पाहिलं नसेल तर प्रणव मिस्त्री ह्या भारतीय मुलाचं कौतुक इथे पहा). - अवकाश प्रवास स्वस्त असेल. दुसर्‍या ग्रहावर किंवा अवकाशात वस्ती करण्याचं तंत्रद्यान उपलब्ध असेल पण तो निर्णय तंत्रशास्त्राचा नसून अर्थशास्त्राचा असेल. ------ (चिंतोबा) मराठे

पुढील शंभर वर्षात भारत महासत्ता बनेल . अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढेल .चंद्रावर मानवी पहिली मानवी वसाहत निर्माण होऊन त्या निर्मितीत भारताचा वाटा असेल . पाकिस्तान एकतर चीनच्या घशात जाईल ( आता काश्मीर जात आहेच )किंवा त्यांची शकले होतील . अमेरिका व भारत जगाचा भूगोल बदलतील . जग विज्ञानभिमुख होईल . . (हिंदू धर्म जगभर जोमाने पसरेल हा माझा भाबडा आशावाद आहे .)

रेवती Tue, 10/18/2011 - 20:14
आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? पैशाला असलेले वलय राहणार नाही. ज्या काय गरजा आहेत त्या भागल्या की झालं! माणसं सहज शंभरी गाठतील का? माणसं शंभरी गाठतील पण त्यांना ते नको असेल कारण माणसाने माणसाला आपुलकी कशी दाखवायची हेच माहीत नसेल मग जगून काय करायचं हेच समजणार नाही. ज्यांच्याकडे "काय म्हणता?", "कसे आहात?" हे विचारणारे सापडतील ते लोक एक्झिबिट म्हणून ठेवले जातील. आपुलकी दाखवणार्‍या एका दोघांचे असे झाले की बाकीचे लपून बसतील. मानसशास्त्र हा महत्वाचा विषय बनून राहील.

यकु Tue, 10/18/2011 - 22:23
छ्या:! कल्पनारंजनाचा प्रश्न आला की आमच्या डोक्श्याला आपोआप टाळे लागते. पण इथे आलेले प्रतिसाद रंजक आहेत. बाकी मला गविंच्या विचारी लेखनाचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. ;-) (वरचा मजला बंद पडलेला ) यशवंत

सोत्रि Tue, 10/18/2011 - 22:48
सर्व सायंस फिक्श्न कादंबर्‍यांमधले आणि स्पील्बर्ग मुव्हीज मधले 'चमत्कार' अस्तित्वात येतील. - (ह्याची अतीव खात्री असलेला) सोकाजी

सोत्रि Tue, 10/18/2011 - 22:52
नेक्स्ट इज व्हॉट हे वाचुन मायक्रो सॉफ्ट्च्या प्रख्यात Where do you want to go today? ह्या जाहिरात घोषवाक्याची आठवण झाली :) - ( तांत्रिक प्रगतीच्या वेगाने भारलेला ) सोकाजी

मन१ Tue, 10/18/2011 - 23:00
भारीच धागाय. चर्चेच्या प्रस्तावाइतकेच प्रतिसाद पण आवडले. वाचतोय.

पिवळा डांबिस Wed, 10/19/2011 - 04:02
१. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पोलार आईसकॅप्स वितळून बहुतांशी जमीन पाण्याखाली जाईल... १अ. जमीनच पाण्याखाली गेल्याने सीमारेषा रहाणार नाहीत, पर्यायाने देशही रहाणार नाहीत. मग देशा-देशांत भांडणेही होणार नाहीत. २. सर्वत्र समुद्र झाल्याने होणारी वादळं ही प्रचंड भयानक असतील आणि त्यामुळे बरीचशी जमीनीवरील प्राणीजात बुडून मरेल. माणसं (जी जगतील-वाचतील ती) तरंगणारी शहरं बांधून रहातील. अणि त्यांत झुरळं आपला शिरकाव करून घेतील. ३. सर्व वंशांची सरमिसळ होऊन गोरा, काळा, ब्राऊन, चायनीज हे भेद रहाणार नाहीत. सगळेच दिसायला थोडेफार सारखेच! ४. धर्मसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. जगबुडी होऊन भयानक मानवसंहार झाल्यानंतर (तरी) माणसाचा देवाच्या अस्तित्वावर पुनर्विचार होईल. ५. लग्नसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. माणसं प्रजननासाठी लैंगिक संबंध ठेवणार नाहीत. क्लोन्स आणि टेस्ट्ट्यूब बेबीजच होतील. ६. पैसा (करन्सी) ही गोष्ट अस्तित्वात रहाणार नाही. ७. कॅन्सरवर विजय मिळणार नाही. परंतु कॅन्सर क्रॉनिक होईल. म्हणजे माणसं कॅन्सर झाल्यानंतरही पंधरा-वीस वर्षे जगतील. ८.माणसाचे आयुर्मान वाढेल आणि माणसं शेवटी अल्झहायमर्स, पार्किन्सन्स सारख्या मेंदूच्या रोगाने मरतील. मेलेल्या माणसांना समुद्रात फेकून देण्यात येईल. ९. अन्नाचा मुख्य स्त्रोत समुद्र झाल्यामुळे मुख्य अन्न समुद्री प्राणी आणि माशांचा वास येणारे सी-वीड होईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, १०. हे सर्व पहायला मी जिवंत नसेन!!!!!!!!!!!!! :)

नगरीनिरंजन Wed, 10/19/2011 - 08:19
आर्थिक बाबतीतः सन २०५० पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले असेल. चीनने ते २०३० सालीच केलेले असल्याने भारतातले बहुतेक उद्योग चीनवर अमेरिका आणि युरोपपेक्षा जास्त अवलंबून असतील. बरेचसे भारतीय लोक मांदारिन भाषा शिकतील. उपभोगावर आधारित अर्थव्यवस्था कमीकमी करण्याचा प्रयत्न केला जाऊन आनंदावर आधारित अर्थव्यवस्था तयार केली जात असेल. त्यासाठी आजच्या जीडीपीसारखेच अत्यंत निरुपयोगी आणि सरसकट मोजमाप करणारे, चुकीचे आनंद निर्देशक तयार केले गेले असतील. त्यावरच्या बदलांवर शेअरबाजारात खरेदी-विक्री करणारे दलाल तेव्हाही असतीलच. सौर किंवा नवीनच शोधलेल्या इंधनावर चालणारी वाहने असतील. अशी वाहने बनवण्याची मक्तेदारी ठराविक कंपन्यांकडे असल्याने त्या कंपन्या गब्बर झालेल्या असतील. देशांपेक्षा मोठ्या अशा या कंपन्यांच्या तालावर जग नाचेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सारखेच या कंपन्यांचे स्वतःचे सैन्यही अधिकृतपणे असेल. सामाजिक: २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या २ अब्ज असेल आणि जगाची ९ अब्ज. यातील बहुसंख्य (५०%) लोक गरीब असतील. नवनवीन रोग होऊ लागले असतील आणि हृद्रोग, मधुमेह आणि रक्तदाब ही दुखणी सामान्य झाली असतील. जगाच्या एकूण उपलब्ध जमिनीपैकी बहुतेक जमीन शेतीसाठी आणि वस्तीसाठी वापरली जाऊन जंगले अगदी औषधापुरती उरली असतील. सर्व शेती जनुकांतरित बियाणांच्या सहाय्याने जास्तीतजास्त पीक काढून केली जात असेल पण जनुक बदलामुळे तयार होणार्‍या नित्य नवीन कीडींमुळे पुरेसे अन्यधान्य तयार करायला खूप कष्ट पडतील. या बियाण्यांचा मक्ता घेतलेल्या कंपन्याही गब्बर असतील. म्हणजेच जगातले मूठभर लोक अतिश्रीमंत आणि बरेचसे लोक खूप गरीब असे(च) चित्र राहील. तंत्रज्ञानः मध्यमवर्गीय माणसाचे सरासरी वयोमान १०० झाले असेल पण त्याचबरोबर वयाच्या तीशी-चाळिशीत आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले असेल. सतत ऑनलाईन असणे ही भावनिक गरज झालेली असेल आणि त्यातून नव्यानव्या मानसिक विकारांना माणसं बळी पडतील. 'आयडेंटिटी प्रोटेक्शन' हा एक मजबूत चालणारा धंदा झाला असेल आणि प्रत्येकालाच त्याची गरज पडेल. कधीही होऊ शकणार्‍या आण्विक संहाराच्या भीतीने 'नवे जग' शोधण्याचे वा निर्माण करण्याचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आलेले असतील. द्रव्य-प्रतिद्रव्याच्या संयोगाने जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने जाणारी याने तयार होऊ घातली असतील. अशा यानांमध्ये प्रवास करण्यासाठी ४००-५०० वर्षं जगू शकणारी माणसे आणि त्यांच्यासाठी यंत्रमानव तयार केले जात असतील. अतिवाहक द्रव्ये आणि चुंबक यांच्या सहाय्याने कोणताही आकार धारण करू शकणारी अंतराळ स्थानके केव्हाच अवकाशात विहरू लागली असतील आणि अशा स्थानकांवर राहणार्‍यांची संख्या लाखाच्या घरात असेल. अंतराळात जन्म झालेला माणूस अस्तित्वात असेल. कला: जुन्या जंगलांबद्दल, शुद्ध हवेबद्दल, मानवी नात्यांबद्दल नॉस्टॅल्जिक लिखाण प्रमाणाबाहेर वाढले असेल. चित्रकार मात्र तसेच असतील, पण चित्रांमध्ये शहरी जीवनाचे चित्रण जास्त असेल. शतकाच्या शेवटी किंवा पुढच्या शतकाच्या मध्यावर दोन शक्यता असतील असा कयास आहे. १. हवामान बदलामुळे किंवा अन्य काही कारणामुळे अन्नधान्य उत्पादनावर बराच परिणाम होऊन बहुसंख्य लोक उपासमारीने, रोगराईने मरतील. उरलेले जीव मुठीत धरून बिळांमधून राहतील. ज्यांना जमेल ते ग्रह सोडून जातील. २. वेळीच सावध होऊन किंवा मेंदूच्या विकासामुळे किंवा एखादा प्रभावशाली 'प्रेषित' येऊन लोकांच्या मनातली मरणाची भीती वाजवी होईल आणि लोक स्वतःहून हा तयार झालेला मानवी संस्कृती/नागरीकरणाचा डोलारा विघटीत करून, सगळं सोडून नैसर्गिक अवस्थेकडे परततील. बरेचसे लोक यातही मरतीलच पण येणार्‍या पिढ्यांसाठी एक नवी पहाट झालेली असेल. चक्र पूर्णत्वाकडे वळलेलं असेल.

समीरसूर गुरुवार, 10/20/2011 - 12:58
विचार करायला लावणारा धागा. माझे काही विचारः तंत्रज्ञानः
  1. मी माझ्या काँम्प्युटरसमोर बसलोय. माझ्या डोक्याला दोन वायरलेस पिना लावल्यात. मी 'लिहायचे' अशी आज्ञा करताच पटापट माझ्या डोक्यातले लिखाण माझ्या काँम्प्युटरच्या स्क्रीनवर उमटायला लागेल. एखादा शब्द नको असल्यास ती आज्ञा कॅच करून तो शब्द स्क्रीनवर खोडला जाईल. हे सध्या अस्तित्वात आहे की नाही माहित नाही पण असे काही तंत्रज्ञान निघाले तर मज्जाच येईल.
  2. कृत्रिमरीत्या माणसाची मेमरी वाढवता येईल. म्हणजे माझ्या मेंदूत एक चिप बसवून मला माझ्या मेमरीची स्पेस वाढवता येईल. मग फोटो मी त्या मेमरीत साठवून दुसरीकडे जाऊन प्रिंट करून घेऊ शकेन. परीक्षांच्या काळात अशा चिप्सचा धंदा तेजीत येईल. मग चिप्स फॉरमॅट करण्याचे तंत्रज्ञान निघेल आणि परीक्षेला जातांना चिप्सना एक पासवर्ड टाकून लॉक केले जाईल. प्रेयसीच्या चिपमध्ये हॅक करून जाता येईल. मग प्रियकराला आपल्या आधीच्या बकर्‍यांची माहिती मिळेल आणि त्यांनी काय-काय केले याची कदाचित सगळीच माहिती मिळेल. प्रेयसीला आपल्या प्रियकराच्या लफड्यांची माहिती मिळेल. तो दिवसातून १५ सिगारेटी फुंकतो असे कळल्यावर ती त्याच्यावर आगपाखड करेल आणि आपल्या पर्समधून बाटली काढून दोन घोट रिचवत त्याच्या या गुन्ह्याला उदार मनाने माफही करेल.
  3. मोबाईल (टॅब्लेटसारखे) हे एक सर्वशक्तिमान साधन बनेल. मोबाईलवरून तुम्हाला सगळे काही करता येईल. बूड हलवायची गरज पडणार नाही (अर्थात आवश्यक कामांसाठी ही अट शिथिल करावीच लागेल ;-)).
  4. सगळे जगच पेपरलेस होईल कारण पेपरची गरजच पडणार नाही. पैसे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्फर होतील. बाकीची कागदपत्रे सॉफ्ट फॉरमॅटमध्ये स्टोअर केली जातील.
  5. टॉकीज नामशेष होतील. सगळ्यांच्या टॅब्लेटमध्ये चित्रपट डायरेक्ट ब्रॉडकास्ट केले जातील. टेलिकॉम ऑपरेटर्स ही जबाबदारी सांभाळतील. घरी बसून टॅब्लेटमधल्या प्रोजेक्टरचा वापर करून आरामात मोठ्या पडद्यावर चित्रपट बघता येतील.
  6. इलेक्ट्रॉनिक मेमरी हा प्रकार फक्त क्लाउडसारख्या प्लॅटफॉर्म्सवर शिल्लक राहील कारण झटकन काहीही क्लाउडमधून काढता आल्याने लोकल मेमरीची गरजच राहणार नाही.
  7. फेसबुक वगैरे बंद पडेल. लोकांना या ऑनलाईन प्रेजेन्सचा खूप कंटाळा येईल. लोकांना जिवंत अनुभवांची आस लागेल.
  8. सामाजिकः
    1. 'वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे, वाट्टेल त्याच्यासोबत, वाट्टेल तेवढा सेक्स' ही गोष्ट अगदी एसटीच्या 'आवडेल तिथे प्रवास' या घोषणेइतकाच खूप नॉर्मल होईल. अलिकडेच एका पाहणीत असं आढळून आलंय की प्रचंड शहरी भागात जवळपास ७०% मुले-मुली लग्नाआधी सेक्सचा अनुभव मनमुराद लुटतात. विवाह्यबाह्य संबंध वगैरे संकल्पना मोडीत निघतील कारण त्यांना राजरोसपणे मान्यता मिळेल. भूक लागल्यावर सॅण्डविच खाण्याइतकी सेक्स ही गोष्ट साधारण होईल. त्यातही 'नो स्ट्रींग्ज अ‍ॅटॅच्ड' संबंधांना मान्यता मिळेल. आज आत्ता आनंद घेतला, आता तू तुझ्या रस्त्याने आणि मी माझ्या रस्त्याने...पुन्हा भेटलो तर पुन्हा आनंद घेऊ किंवा सोबत बसून कॉफी पिऊ आणि आपपापल्या घरी जाऊ...हाय काय नाय काय...
    2. लोकं शांत ठिकाणी जाऊन राहणे पसंत करतील. शहरीकरणाचा वीट येईल.
    3. माणसांमधला प्रत्यक्ष संवाद वाढेल.
    4. वैश्विकः
      1. तापमानवाढ इतकी होईल की जग वितळून पुन्हा सजीव सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होईल. पुन्हा अश्मयुग सुरु होईल. डायनासोर्स येतील...आणि पुन्हा तीच कहाणी सुफळ संपूर्ण...

In reply to by अनन्न्या

कवितानागेश Fri, 03/15/2013 - 12:56
प्रत्येक गोष्टीतली 'कृत्रिमता' वाढलेली दिसतच आहे. तीच अजून वाढेल. प्रेमाची भूक भागवणार्‍या गोळ्या आणि इन्जेक्शन्स मिळतील. सर्व लोक सुखी होतील! ;)

विटेकर Fri, 01/10/2014 - 09:55
भोग-वादाचा आणि चंगळ-वादाचा अतिरेक झाल्याने लोक सार्वकालिक आणि चिरंतन सुखाचा मार्ग शोधण्यासाठी मोठ्या आशेने भारतीय संस्कृतीकडे पाहतील. भारतीय संस्कृती विश्वविजयी होईल. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो.. ( हा माझा भाबडा आशावाद नाही .. तर खात्री आहे , ते पहायला मी नक्की असेन ,.. कदाचित वेगळ्या जन्मात ! ) बाकी हिंदू मान्यतेनुसार प्रलय तर होणारच आहे आणि पुन्हा नव्याने सृजन होणार आहेच, त्यावर विश्वास ठेऊन आपला "विवेक-प्रलय" करुन घ्यावा आणि सुखी रहावे....! उत्पत्ति स्थिति संव्हार| याचा निरोपिला वेव्हार |परमात्मा निर्गुण निराकार| जैसा तैसा ||१|| ये तो होनेवालाच है !

राजेश घासकडवी Wed, 06/04/2014 - 07:41
लेख वर आल्यामुळे लेख आणि प्रतिक्रिया पुन्हा वाचल्या. काही तांत्रिक प्रगती सोडल्यास मानवजातीबद्दलची इतकी भीषण भाकितं वाचून थोडं सुन्न झाल्यासारखं झालं. लोकहो, तुमच्या डोळ्यासमोर गेल्या पंचवीस - तीस - चाळीस वर्षांत अभूतपूर्व प्रगती झालेली आहे! आणि इतकं असूनही तुम्हाला भविष्य इतकं अंधकारमय वाटतं? का? पुढच्या शंभर वर्षांचा विचार करताना शंभर वर्षांपूर्वी जगाची काय हालत होती हे तपासून पाहणं इष्ट ठरेल. - जगातली ८०% हून अधिक लोकसंख्या पारतंत्र्यात होती. वसाहतवाद बोकाळला होता. मूठभर युरोपियन/अमेरिकन जनता सुखी राहण्यासाठी जलियावाला बाग हत्याकांडं होत होती. - रोगराई प्रचंड माजलेली होती. १९१८ साली इन्फ्लुएंझाच्या साथीने पाच ते दहा कोटी माणसं मेली. पोलियो, कुष्ठरोग, देवी तर होतेच. गेल्या शंभर वर्षांत या रोगांचं उच्चाटन झालेलं आहे. - दुष्काळ आणि अन्नाचा तुटवडा यामुळे कोट्यवधी माणसं मरत. शंभर वर्षांपूर्वीच का, १९४३ साली बंगालच्या दुष्काळातच सुमारे पंधरा ते चाळीस लाख लोकं मेली. आता आपण पाच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी हादरतो (हादरायलाच हवं - पण कुठे चाळीस लाख आणि कुठे पाच हजार!) - सुमारे पंच्याण्णव टक्के जनता निरक्षर होती. आता ८५% साक्षर आहेत. - जन्माला आलेल्या पोराचं अपेक्षित आयुर्मान ३५ वर्षं होतं. आता ७० च्या आसपास आहे. प्रत्येक आईबापांना सात पोरं व्हायची आणि त्यातलं किमान एक पण बऱ्याच वेळा दोन मरायची. आता दोन पोरं होतात आणि मोजक्या आईबापांना मूल दगावल्याचा अनुभव येेतो. गेल्या शंभर वर्षांत ज्या मानवी जीवनात सुधारणा झालेल्या आहेत त्याच पुढे चालू राहतील. कारण आता मनुष्याच्या जिवाची किंमत वाढलेली आहे. युद्धपिपासा कमी झालेली आहे. अन्नधान्य सुरक्षितता वाढलेली आहे. तेव्हा माझी भाकितं खालीलप्रमाणे २११४ साली - निरक्षरतेचं उच्चाटन झालेलं असेल. किंबहुना ग्रॅज्युएट होणारांचं प्रमाण ९० टक्क्यांच्या जवळ असेल. - आत्ता जे अविकसित देश आहेत ते सिंगापूरसारख्या प्रगत देश आत्ता आहेत त्या स्थितीत असतील. (सुबत्ता, आरोग्य, आणि सुशिक्षितता यांनुसार) - जगाची लोकसंख्या २०५० च्या आसपास ८ ते ९ बिलियनपर्यंत वाढून घसरत शतकाअखेरीस सुमारे ६ ते ७ बिलियनला स्थिरावेल. - अपेक्षित आयुर्मान वाढून ते ९० च्या आसपास जाईल. ७५ वर्षांपर्यंत सुधृढ राहणारांचं प्रमाण वाढेल. - तेलावर असलेलं अवलंबित्व संपून सौर ऊर्जैवर ट्रांझिशन झालेलं असेल. हे पुढच्या तीसेक वर्षांतच मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा आहे. - स्त्रीपुरुष समानता हा प्रश्न जवळपास शिल्लक राहणार नाही. स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या असतील. - लोकं चंद्रावर, मंगळावर वसाहती वगैरे बिलकुल करणार नाहीत. परग्रहांवरचं अस्तित्व हे केवळ तिथे मिळणाऱ्या संसाधनांसाठी असलं तर असेल. याबाबतही मला प्रचंड शंका आहे. - जगातली ९९ टक्केहून अधिक लोकं पक्क्या बांधलेल्या घरात राहत असतील, व त्या सर्वांना घरात पाणी, वीज, आणि शौचालयाची सोय असेल. - युद्धांमध्ये होणारे मृत्यू, दहशतवादापायी होणारे मृत्यू, खुनांमुळे होणारे मृत्यू हे आजच्या प्रमाणात सुमारे शंभर पटीने कमी झालेले असतील. असो. अजूनही बरंच काही लिहिता येईल, पण इथे थांबतो. इतका दुर्दम्य आशावाद लोकांना पचनी पडत नाही - त्याचा पाया कितीही निरीक्षणांत रोवलेला असला तरीही. त्यामुळे एक शेवटचं भाकित करतो. - इतकं चांगलं झालेलं असूनही 'परिस्थिती कशी बिघडत चालली आहे' वगैरे पिरपीर करणारे लोकं तेव्हाही असतीलच.

In reply to by राजेश घासकडवी

ब़जरबट्टू Wed, 06/04/2014 - 13:02
- इतकं चांगलं झालेलं असूनही 'परिस्थिती कशी बिघडत चालली आहे' वगैरे पिरपीर करणारे लोकं तेव्हाही असतीलच. :)) .. हे आक्शी बरोब्बर बघा.. अजुन एक.... "विग" नावाचा आय. डी.. "पाव-मिसळ" वर २००० साली जग कसे होते, यावर एक हजारी धागा काढेल... :))

In reply to by राजेश घासकडवी

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११. सह्मत

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव गुरुवार, 06/05/2014 - 02:39
- निरक्षरतेचं उच्चाटन झालेलं असेल. किंबहुना ग्रॅज्युएट होणारांचं प्रमाण ९० टक्क्यांच्या जवळ असेल. >> कदाचीत हेच बेरोजगारीचं कारण देखील असेल. - आत्ता जे अविकसित देश आहेत ते सिंगापूरसारख्या प्रगत देश आत्ता आहेत त्या स्थितीत असतील. (सुबत्ता, आरोग्य, आणि सुशिक्षितता यांनुसार) >> त्याकरता आज जे विकसीत देश आहेत त्यांना सुपर विकसीत व्हावं लागेल. विकसीत-विकसनशील-अविकसीत यामधल्या गॅपच्या संतुलनावर विश्वशांतीचा डोलारा उभा आहे. अन्यथा रिसोर्सेस आणि स्वामित्वाच्या भावनेचा असह्य ताण जगाच्या मुळावर उठेल (त्याची सुरुवात झाली आहे) - जगाची लोकसंख्या २०५० च्या आसपास ८ ते ९ बिलियनपर्यंत वाढून घसरत शतकाअखेरीस सुमारे ६ ते ७ बिलियनला स्थिरावेल. >> पण हे ट्रांझीशन ज्या गतीने होतेय त्यागतीने सामाजीक आणि मानवी व्यवहारात सुधारणा होण्याचे चान्सेस किती? - अपेक्षित आयुर्मान वाढून ते ९० च्या आसपास जाईल. ७५ वर्षांपर्यंत सुधृढ राहणारांचं प्रमाण वाढेल. >> सहमत. - तेलावर असलेलं अवलंबित्व संपून सौर ऊर्जैवर ट्रांझिशन झालेलं असेल. हे पुढच्या तीसेक वर्षांतच मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा आहे. >> सहमत. केवळ सौर ऊर्जाच नव्हे तर पुनर्प्रक्रियेच्या उद्योगात देखील अतिप्रचंड बदल(सुधारणा) होतील. त्यातुन ऊर्जेचे अन्य पर्याय विकसीत होतील. - स्त्रीपुरुष समानता हा प्रश्न जवळपास शिल्लक राहणार नाही. स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या असतील. >> सहमत. इन एडीशन टु दॅट सद्यः काळात स्त्रीया भोगत असलेली दु:ख पुरुषांच्या वाट्याला देखील येतील... खास करुन बलात्कार, वेश्या व्यवसाय वगैरे. पण स्त्रीस्वातंत्र्याला फार चांगले दिवस येतील हे नक्की. - लोकं चंद्रावर, मंगळावर वसाहती वगैरे बिलकुल करणार नाहीत. परग्रहांवरचं अस्तित्व हे केवळ तिथे मिळणाऱ्या संसाधनांसाठी असलं तर असेल. याबाबतही मला प्रचंड शंका आहे. >> मनुष्य जात पृथ्वीवर टिकुन राहिली तर पुढील दोन शतकात परग्रहांवर वस्ती नक्की होईल. - जगातली ९९ टक्केहून अधिक लोकं पक्क्या बांधलेल्या घरात राहत असतील, व त्या सर्वांना घरात पाणी, वीज, आणि शौचालयाची सोय असेल. >> सहमत. पण तोवर या सर्व सोयी बेसीक गरजांच्या यादीतुन हद्दपार झालेल्या असतील. - युद्धांमध्ये होणारे मृत्यू, दहशतवादापायी होणारे मृत्यू, खुनांमुळे होणारे मृत्यू हे आजच्या प्रमाणात सुमारे शंभर पटीने कमी झालेले असतील. >> किमान दोनशे पटीने वाढलेले असतील. पण त्यातले बरेचसे मृत्यु आनंददायी असतील व त्यामुळे त्याला गुन्हा समजल्या जाणार नाहि. --असो. अजूनही बरंच काही लिहिता येईल, पण इथे थांबतो. इतका दुर्दम्य आशावाद लोकांना पचनी पडत नाही - त्याचा पाया कितीही निरीक्षणांत रोवलेला असला तरीही. त्यामुळे एक शेवटचं भाकित करतो. - इतकं चांगलं झालेलं असूनही 'परिस्थिती कशी बिघडत चालली आहे' वगैरे पिरपीर करणारे लोकं तेव्हाही असतीलच. >> त्याकाळच्या समस्या आजच्यापेक्षा बर्‍याच वेगळ्या असतील. व त्यापुढे हतबल असणारे लोकं पिरपीर करण्यापलिकडे काय करु शकतील?

In reply to by अर्धवटराव

राजेश घासकडवी गुरुवार, 06/05/2014 - 08:50
तुम्ही बरीच भाकितं स्वीकारली, पण काहींबद्दल असहमती दर्शवलीत. म्हणून त्यातल्या
विकसीत-विकसनशील-अविकसीत यामधल्या गॅपच्या संतुलनावर विश्वशांतीचा डोलारा उभा आहे.
गेल्या पन्नास-साठ वर्षांत ही गॅप कमी कमी होत चाललेली आहे. पैसा, आयुर्मान, शिक्षण - सर्वच बाबतीत जगातल्या आहेरे आणि नाहीरे मधलं अंतर कमी होत चाललेलं आहे. आणि घटकाभर धरून चालू की विषमताही वाढेल. पण त्यावेळचे सर्वात गरीब लोक आत्ताच्या सिंगापूरींसारखे राहत असतील ही आनंदाची गोष्ट नाही का?
पण हे ट्रांझीशन ज्या गतीने होतेय त्यागतीने सामाजीक आणि मानवी व्यवहारात सुधारणा होण्याचे चान्सेस किती?
खरंतर लोकसंख्यावाढीचा वेग आता जगभर फारच मंदावला आहे. सत्तरीच्या दशकात जगाची लोकसंख्या काही दशकांत दुप्पट होत होती, त्यामुळे माल्थुशियन क्रायसिसची भीती जगभर होती. आता जगाची लोकसंख्या पुढच्या पस्तीस चाळीस वर्षांत हळुवारपणे पंचवीस टक्के वाढेल. आणि त्यानंतर हळूहळू थोडी कमी होऊन आत्ताच्याच पातळीला येईल.
किमान दोनशे पटीने वाढलेले असतील. पण त्यातले बरेचसे मृत्यु आनंददायी असतील व त्यामुळे त्याला गुन्हा समजल्या जाणार नाहि.
हे खरोखरच समजलं नाही. गेल्या सत्तरेक वर्षांचा इतिहास बघितला तर सर्वच प्रकारची युद्धं - आणि त्यात होणारे मृत्यू कमी होत चाललेले आहेत. हे शतक कदाचित मानवी इतिहासातलं सर्वात शांततामय शतक होईल अशी मला तरी आशा वाटते. युद्धं

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव गुरुवार, 06/05/2014 - 09:20
सध्याचे गरीब लोक, आताच्या सिंगापूरसारखी तर फार लांब राहिलं, सोमालीयासारखी राहिली तरी पुरे अशी परिस्थिती येणार आहे पुढे. आजचं अन्न, वैद्यक, इंधन, वाहातुक, शिक्षण, तंत्रज्ञान...हे इतक्या झपाट्याने ऑब्सोल्युट होइल कि त्यावर विचार आणि श्रम करायला कोणि धजावणारच नाहि व ज्यांना त्याची गरज असेल असे लोक हे सर्व प्राप्त करण्याच्या क्षमतेचेच नसतील. लोकसंख्या वाढीचा वेग जरी स्टेबल झाला तरी जगात पुरेशी गर्दी झालेली असणार. लोकल ट्रेनचा डबा ६० पॅसेंजर वाहुन नेऊ शकतो. त्यात सरसरी ९० लोक चढलेले असणार. डब्याचा आकार, बाथरूम-पंखे आदि सुवीधा, इंजीनाची वाहक क्षमता मात्र सुधरणार नाहि. परिणामी गाडी बसेल एक दिवस. राहिला मुद्दा शांततामय शतकाचा... बंदुकीच्या फक्त फैरी झडतानाचा आवाज म्हणजे युद्ध नाहि व बंदुक लोड करण्याचा काळ म्हणजे खरी शांतता नाहि. सध्या जग अस्त्रं-शस्त्र पारजुन घेण्यात गुंतलय. त्यांचा वापर अटळ आहे. इक्वेशन अगदी सोपं आहे. शक्ती प्रचंड वाढतेय...अगदी भयावह वेगाने... पण शक्तीचं विकेंद्रीकरण, डिस्ट्रिब्युशन, आणि शक्ती वापराचा विवेक त्याच प्रमाणात डेव्हलप होतोय का? मला तरी रियलिस्टीक उत्तर 'नाहि' असं वाटतय... अर्थात, माझि गृहीतकं चुकीची ठरली तर सर्वात जास्त आनंद मलाच होइल.

In reply to by राजेश घासकडवी

नगरीनिरंजन Fri, 06/06/2014 - 16:43
लोकसंख्येचा आकडा महत्त्वाचा नाहीय. अमेरिकेत जगातले ५% लोक राहतात आणि ते जगातले २५% रिसोर्सेस वापरतात. त्या दृष्टीने अमेरिकेची लोकसंख्या १.५ अब्ज आहे. सगळं जग अमेरिकन्स किंवा सिंगापुरी लोकांसारखं राहायला लागेल हे दिवास्वप्नही म्हणता येणार नाही.

In reply to by राजेश घासकडवी

असंका गुरुवार, 06/05/2014 - 11:08
सुरेख भविष्यवाणी... "परीस्थिती बिघडत चालली असल्याची पिरपिर" म्हणजे कहर झाला! पण एकंदरीत बघितलं तर अशा कुरकुर करणार्‍या़ंकडे दूर्लक्ष न केल्यामुळेच मनुष्याला कुठल्या दिशेला जायचं ते कळतं, असं वाटत नाही का? आहे ती परीस्थिती उत्तम आहे असं म्हणणारे काय प्रगती करणार?

In reply to by असंका

बाळ सप्रे गुरुवार, 06/05/2014 - 11:16
पण एकंदरीत बघितलं तर अशा कुरकुर करणार्‍या़ंकडे दूर्लक्ष न केल्यामुळेच मनुष्याला कुठल्या दिशेला जायचं ते कळतं, असं वाटत नाही का? आहे ती परीस्थिती उत्तम आहे असं म्हणणारे काय प्रगती करणार?
असलेल्या परिस्थितीत समाधान न मानणारेच प्रगती करतात हे खरं पण ही कुरकुर वेगळी, याच्यामुळे प्रगतीला हातभार नाही लागत. हे म्हणजे काही झालं की जायचं डॉक्टरकडे पण म्हणायच आजकालच्या औषधामुळे आरोग्य बिघडतं पूर्वीची लोकं कशी आरोग्यवान असायची!!

In reply to by बाळ सप्रे

असंका गुरुवार, 06/05/2014 - 12:00
पूर्वीची लोकं कशी आरोग्यवान असायची!!
म्हणजे पूर्वीची लोकं आपल्यापेक्षा आरोग्यवान नव्हती असं म्हणायचंय की काय आपल्याला!!!!! How blasphemous!! :-)) (ह. घ्या.) कुरकुर वाईटच हो...पण मला म्हणायचंय की पुढे जाणारा समाज सगळ्यांना घेऊन पुढे जातो. त्यांच्या कुरकुरीलाही उत्तर देण्याचा/शोधण्याचा प्रयत्न करतो. तिकडे दुर्लक्ष करत नाही. त्यातूनही कधी कधी दिशा सापडते.

बबन ताम्बे Wed, 06/04/2014 - 19:11
पुढच्या १०० नाही पण ३० वर्षांनी (सन २०४५) भारतात काय असेल याचे कल्पनाचित्र मी खालील लेखात लिहीले होते. मित्रास पत्र (सन 2045- एक झलक) स्व.गोपिनाथ मुंडेजींचा त्या लेखात उल्लेख आहे. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/05/2014 - 07:44
१. ५० किंवा १०० वर्षात गुगल जगाला टेकओव्हर करेल. २. थ्री डी प्रिंटर मधुन माणसाचे अवयव डी.एन.ए. सकट प्रिंट करता येतील. माणसाच्या मेंदुचा बॅकअप घेता येईल. डी.एन.ए. मधल्या तुटलेल्या साखळ्या जोडुन माणसं सुपर-ह्युमन स्टेज ला पोचतील. कोणीही अंध-अपंग असणार नाही. ३. अ‍ॅनिमस सारखी सिस्टीम खरचं अस्तित्वात येऊन आपल्या सर्व पुर्वजांच्या आठवणी आपल्याला पाहाता येतील किंवा त्यात प्रत्यक्ष सहभागही घेता येईल. (असासिन्स क्रिड गेम खेळणार्‍यांना नक्की समजेल काय प्रकार आहे हा ते. बाकीच्यांनी गुगलवा) ४. टाईम मशिन चा किमानपक्षी टेलिपोर्टेशनचा शोध लागेल. पुण्यात सहज फिरता यावं म्हणुन टेलिपोर्टेशन मशिन अंडरग्राऊंड बसवावीत का ओव्हर्हेड ह्यात २५ वर्षं खर्ची पडतील. शिवाय ह्यामधे 'माल'माडी, 'मुत'वार, 'मनी'मोळी, 'खा'व्हाण,'खा'.राजा, 'खाऊ'प्रसाद ई. मंडळी 'खा'टाळे करतील. आय.आर.बी. वाले "पैस"कर टेलिपोर्टेशनवर सुद्धा टोलवाटोलवी करतील. आम्ही पुणेकर मात्र लक्ष्मी रोडवर 'हॉवर' बाईक कुठे तरंगवायची तो विचार करत बसु. ५. शेतकरी राजा एकत्रं येईल आणि कॉर्पोरेट पद्धतीनी शेती करेल. अंबानी, टाटांच्या यादीमधे शेतकर्‍यांच्या कॉर्पोरेट फुड ऑर्गनायझेशन्स सुद्धा दिसतील. (खरचं घडु दे असं). शेतकर्‍यांच्या घामाचा-रक्ताचा पैसा खाणारे "भडवे" उपाशी मरतील. ६. मिसळपाव साठीची स्पेशल चिप मेंदुमधे एमबेड करुन घेता येईल. मिसळपाव चा विचार आला आणि उघडायची कमांड दिली की लेटेस्ट ट्रेंड्स, लिखाण आदी ग्लासेस वर दिसु लागेल. :)...जय हो टेक-सॅव्ही मिसळपाव की.

तिमा गुरुवार, 06/05/2014 - 12:29
ते बाकीचे शोध वगैरे जाऊ दे! आम्हाला विनोबा भावे जसे सूक्ष्मात जायचे तसे जाण्याची इच्छा आहे. म्हणजे तसा शोध लागला, तर आम्ही सूक्ष्मात जाऊन बाकीच्या जगाची मजा बघू, असे म्हणतो आहे.

म्हैस गुरुवार, 06/05/2014 - 15:18
@मदनबाण प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे १. निंदा, नालस्ती, टवाळी , चिमटे, गुद्दे , सूड, खून, बलात्कार ,पाशवीपणा ह्या गोष्टी बहुदा खूपच वाढतील असा वाटतंय. लोक सुसंस्कारित राहणार नाहीत. २. सगळ्यात मोठा परिणाम तापमान आणि पर्यावरणामुळे होईल असा वाटतंय . तसाच accidents चा प्रमाण बरंच वाढून सामूहिकरीत्या माणसं मरण्याच प्रमाण वाढेल असं वाटतंय . ३. display आणि automobile मध्ये नवीन शोध लागतील. nanotechnology चा वापर वाढेल . पण medical field मध्ये नवीन शोध लागणार नाहीत असं वाटतंय. माणसं वयाची ३० तरी गाठतील कि नाही अशी शंका आहे . :-( ४. धर्मसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. जगबुडी होऊन भयानक मानवसंहार झाल्यानंतर (तरी) माणसाचा देवाच्या अस्तित्वावर पुनर्विचार होईल. ५. लग्नसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. माणसं प्रजननासाठी लैंगिक संबंध ठेवणार नाहीत. क्लोन्स आणि टेस्ट्ट्यूब बेबीजच होतील.

मंदार कात्रे Fri, 06/06/2014 - 23:58
भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू..>> असे झाले तर फार छान ! -लग्न ही संकल्पना कालबाह्य / कुटुंब व्यवस्था नामशेष ! -भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले. -अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता -एड्स / कॅन्सरवर मूलगामी उपाय -मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य.>> हे शक्य आहे!

मंदार कात्रे Sat, 06/07/2014 - 00:02
अद्भुत भाग ३ प्रेषक, मंदार कात्रे, Sun, 10/03/2013 - 08:35 8 आज आपण एक नवीन तंत्र अभ्यासणार आहोत. त्याला Future Progression असे म्हणतात.अमेरीकेतील काही तज्ज्ञ संशोधक आणि Hypnotists यांनी हे तंत्र शोधून काढले आहे. दुसर्याा दिवशी पहाटे तीन वाजता पुन्हा गुरुजींनी त्याला उठवले. ध्यानाच्या गुंफेत गेल्यावर परत कालप्रमाणेच सम्मोहन सुरू झाले. ...... मी 1 ते 10 अंक म्हणतो.... आता तू भविष्यात जाणार आहेस. हे 2236 साल आहे.तुझ्या आसपास जे घडत आहे ते मला सांग पाहू....................... तुझे नाव काय? बार्बरा पुखरेस्ट तुझे वय काय? 134 वर्षे मी न्यू टेक्सास अंडरवॉटर सिटीमध्ये असते. तुझ्या नावावरून तू एक स्त्री आहेस हे मी ओळखले. तुला मी बार्बरा म्हणून हाक मारू का? हो चालेल ना. तुझे वय इतके जास्त कसे? आणि तुम्ही पाण्याखाली कासेकाय राहता? इ.स.2120 साली लागलेल्या काही आश्चर्यकारक वैज्ञानिक शोधांमुळे मानवाचे आयुर्मान वाढले होते . सध्या मानवाचे सरासरी आयुर्मान 200 वर्षे आहे. कॅन्सर आणि एड्स सारख्या रोगांवर आता गोळ्यांचा तीन महिन्यांचा एक कोर्स पुरा केल्यास कॅन्सर आणि एड्स सुद्धा बरे होतात. मृत्युचे प्रमाण कमी झाल्याने आणि वयोमान वाढल्याने पृथ्वीवर लोकसंख्या बेसुमार वाढली . आणि त्यामुळे सर्वांना राहायला,पोसायला जमीन कमी पडू लागली. त्यामुळेच अंडरवॉटर आणि अंडरग्राऊंड सिटीज बनवल्या गेल्या. ................ तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/ अॅन आहे तो कोण आहे? अर्धमानव म्हणजे? म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता. तो कसा काय? 2187 मध्ये एक नवीन महत्त्वपूर्ण शोध लागला ज्याने मानवी जीवन आणि मृत्यू यांच्या परिभाषाच बदलून टाकल्या . या शोधामुळे ज्या मृत व्यक्तींचे आत्मे astral plane वर suspended animation या अवस्थेत आहेत, त्यांना रोबोटमध्ये implant करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. अच्छा. म्हणजे हे भुतानी माणसांना झपाटण्या सारखेच दिसतेय... नाही.अगदी तसेच काही नाही. पण पूर्वीच्या काळात दुष्ट आत्मे सामान्य माणसांना झपाटून त्रास द्यायचे ,पण आता तसे होत नाही. Astral plane वर आता कायदा आणि सुव्यवस्था आहे. गुंड आणि समाजविघातक दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्याना रोबॉट्स मध्ये प्रवेश नाकारला जातो. अच्छा ,मग या अॅनला म्हणजेच अॅलेक्सला पूर्वीचे काही आठवते का? हो. तो जीवंत असताना 2010 साली त्याने हिमालयात जावून साधना केलेली होती. रोहन देसाई नावच्या मित्राबरोबर त्याने एका तिबेटी मठात बुद्धिस्ट गुरूंकडून दीक्षा घेतली होती. अच्छा ,म्हणजे आता अॅन आणि तुझे संबंध कशा प्रकारचे आहेत? अॅन एक पुरुष रोबोट आहे आणि मी एक जीवंत स्त्री. पण तरीही आम्ही जोडीदाराप्रमाणेच राहतो. म्हणजे नवरा-बायको? हो. आणि शारीरिक संबंध देखील? त्यात काय विशेष?अॅन अन्य कोणत्याही जीवंत पुरुषा पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मला तृप्तिचे सुख देवू शकतो. फक्त त्याच्याकडून अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कृत्रिम fertility centre ची मदत घ्यावी लागते. असे का? कारण 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात ढासळलेल्या पर्यावरण संतुलनाचा दुष्परिणाम , अन्नातील विषारी औषधांचा दुष्प्रभाव आणि सेक्सविषयीच्या लोकांच्या अतिविकृत संकल्पना ,तसेच अनियंत्रित सेक्स यामुळे मानवाची जनन-क्षमता कमी झालेली होती. यास्तव मग कृत्रिम-रीतीने स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग मशिनद्वारे करून प्रयोगशाळेत मानव जन्माला घातले जावू लागले. ही सर्व बालके अतिशय सुनियंत्रित वातावरणात आणि आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये देवून ,रोगप्रतिकारक औषधे देवून वाढविली जातात. आणि बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर आई किंवा बाबांच्या ताब्यात दिले जाते. आई किंवा बाबा? का? कपल्स नाहीत का? बरेच पुरुष व स्त्रिया अर्धमानवा सोबतच राहतात . काही तर पूर्ण यंत्रमानवा सोबतही! त्यामुळे आजकाल शुद्ध मानवी जोडी पाहायला मिळणे मुश्किलच आहे. नाही म्हणायला भारतात काही ठिकाणी अजूनही पूर्ण मानवी कपल्स आहेत. जे देवांची पूजा आणि देवळांची व्यवस्था वगैरे पाहतात ! ...... http://www.misalpav.com/node/24187

ससन्दीप Fri, 06/12/2015 - 00:29
रोहित शेट्टी अॅन्ड ग्रेन्डसन्स प्राॅडक्शनचा स्पेस शटलच्या अवकाशात उसळणार्‍या टक्कर असलेला 'गोलमाल १००' नावाचा टूकार चित्रपट येईल.

अन्नू Sat, 06/13/2015 - 19:43
धागा वाचून सुहास शिंरवळकरांच्या अनुभव पुस्तकातील "योगायोग" या कथेची आठवण झाली. पुढे काय? याचं अगदी तंतोतंत वर्णन त्यांनी त्या कथेत केलं आहे. :)

नमकिन Mon, 06/15/2015 - 22:50
The Island, oblivion इ. व इतर हॅालिवुडपटात यथार्थ चित्रण आहेच, परंतु अंतिमत: प्रेम ही भावना राहीलच. बाकी प्रदूषण व भेसळ यामुळे "सिडलेस" मानव जमात निर्माण होऊन मानवाचा निसर्ग मार्ग मोडुन निसर्गावर मात केल्याच्या आविर्भावात "वैज्ञानिक शोध" ने उपकृत भावना जोपासली जाईल. पुढे जाऊन मानवी मनातील विचारांवर नियंत्रण इथपर्यंत झेप/मजल जाईल का? हा प्रश्न.

एक एकटा एकटाच Mon, 06/15/2015 - 23:21
आत्ताच्या मानवाच्या लोभी आणि हव्यासामुळे काय होउ शकते ह्याचे उत्तम चित्रण WALL-E ह्या अनिमेटेड चित्रपटात फार चांगल दाखवलय. ज्यांनी हां चित्रपट अजुन पाहिला नाहिए त्यांनी तो आवर्जुन पहावा.

In reply to by एक एकटा एकटाच

मदनबाण Tue, 06/16/2015 - 12:32
WALL-E ह्या अनिमेटेड चित्रपटात फार चांगल दाखवलय.ज्यांनी हां चित्रपट अजुन पाहिला नाहिए त्यांनी तो आवर्जुन पहावा. या चित्रपटा बद्धल बरंच ऐकल आहे,पहावयास हवा. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by गवि

मदनबाण Tue, 06/16/2015 - 12:43
४ जी बद्धल अजुन जास्त वाचलं नाहीये... परंतु मागच्या वर्षी फास्ट इंटरनेट टेस्ट घेतली होती त्याचा एक दुवा दिल्याचा आठवतो. तो परत इथे देतो. 'Fastest ever' broadband passes speed test स्मार्ट टिव्ही एक वेगळा बदल घडवेल का ? याचा हल्ली विचार करतोय. सध्या याचा अनुभव घेतोय आणि स्मार्ट टिव्हीवर मिपा वाचन तसेच युटूब पाहताना मजा आली. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

मदनबाण Sat, 06/25/2016 - 23:22

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ने ब्राह्मोस मिसाईल अन सुखोई 30 एमकेआय एकत्र केलेत , बहुतेक हे जगात पहिल्यांदा झाले आहे !! , तसेही ब्राह्मोस हे जगातले सर्वाधिक घातक क्रूझ मिसाईल समजले जातेच, ह्या एका तांत्रिक प्रगतीमुळे परत एकदा ताकदीचा तराजू भारताच्या बाजूने झुकला आहे, भारतीय वायुसेना अन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अभियंते तंत्रज्ञ अन वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन

गवि Tue, 01/16/2024 - 17:23
https://m.economictimes.com/news/international/business/china-introduces-revolutionary-nuclear-battery-that-lasts-50-years-without-charging/articleshow/106880627.cms ५० वर्षे सलग चालणारी बॅटरी आणि तीही नाण्याइतक्या आकाराची. आण्विक बॅटरी इतक्या छोट्या आकारात येणे हा मोठा ब्रेक-थ्रूच आहे.